Friday 17 November 2023

सदर- 'भारताबाहेर आमची संस्कृती'

  

                                             

सदर- 'भारताबाहेर आमची संस्कृती'

मिशिगनमधील मोकाशी कुटुंबिय

नमस्कार! पहिल्या साहित्य परिमळच्या अंकात आपण मॉरिशसची मराठी संस्कृती बघितली, मराठी टिकविण्याचे प्रयत्न बघितले. दुसर्‍या अंकात फिनलंड येथील अमित व राधिका यांची संस्कृती जपण्याची धडपड अनुभवली. आता या अंकात आपण मिशिगन येथे बरीच वर्षे वास्तव्यास असलेल्या एका मोठ्या कुटुंबातील प्रतिनिधी जयश्रीताई मोकाशी आणि मोकाशी काका यांना भेटणार आहोत.


अमेरिकेतील उत्तर भागातील मिशिगन राज्यात, लान्सिंगमध्ये मोकाशी कुटुंबिय राहतात. लान्सिंग हे मिशिगनच्या मध्यभागात ग्रँड नदीच्या काठावर वसलेले एक शहर असून ते डेट्रॉईट आणि ग्रँड रॅपिड्स या दोन शहरांच्या मध्ये आहे. डेट्रॉईट मिशिगन राज्यातील सर्वात मोठे शहर असून, लान्सिंग शहर मिशिगनची राजधानी आहे. मिशिगनमधली फोर्ड आणि बोईंग कंपन्यांची नावे आपल्या परिचयाची आहेत.

एका परदेशी मुलूखात आपल्याला केवळ आपले मराठी बांधवच नाही तर इंडियन म्हणजे कुठलेही भारतीय बांधव, कोणत्याही प्रांतातले असोत ते भेटले की कोण बरं वाटतं. भारतीय असल्याची अस्मिता जागृत असतेच शिवाय आपली उत्सवप्रियता आपल्याला गप्प बसू देत नाहीच आणि मग सुरु होतात भेटीचे सोहोळे. आपसातले नातेसंबंध आणखी दृढ करण्यासाठी महत्वाचे ठरतात ते आपल्या संस्कृती आणि परंपरा असलेले भारतीय सण आणि उत्सव - ज्याची योजना वर्षभर आपण करू शकतो.

परदेशात तर असे समाजबांधव एकत्र आले म्हणजे एक भारतीय कुटुंबच तयार होतं. हे तर झालं सार्वजनिक कार्यक्रमाचे, पण आपल्या कुटुंबातील व्यक्ति, मुले, सुना, नातवंडे व इतर कुटुंबिय यांनाही जोडणारा एक धागा असतो, तो म्हणजे आपले सण उत्सव!

असेच मिशिगनच्या लान्सिंगमध्ये राहत असलेले कुटुंब मोकाशी कुटुंब . भारतातही जे आता कमी दिसतं ते म्हणजे एकत्र कुटुंबपद्धती. चार भाऊ, त्यांच्या बायका, मुले, मुली, सुना, नातवंडे आणि वयोवृद्ध मातोश्री वय वर्षे ९८ !. असे भले मोठे भारतीय कुटुंब एकमेकाला धरून, सांभाळून चक्क एकत्र राहतय. दोघेही मोकाशी पती-पत्नी एकेक किस्से सांगत होते ! “सुट्ट्या आणि वेळापत्रक नीट जमलं तर, सणावारांना २९ जण जमतो आम्ही. परदेशातील हवामान व वातावरण आणि कामाचे वेळापत्रक बघितलं तर भारतीय कॅलेंडरप्रमाणे बहुतेक वेळा जमत नाही . पण पुण्यात- तेही सदाशिव पेठेत राहणारे आम्ही सर्वजण हौशी आहोत, आपले सण -उत्सव पारंपरिक पद्धतीने पाळण्याला महत्व देतो. मोठे कुटुंब असल्याने एकत्र येऊन ते साजरे करायला मज्जा येते. सर्वांनाच आवडतं. फक्त एक प्रोब्लेम येतो इथे, रजा नसतात आणि सुटीचा दिवस आपल्या सणालाच येईल असे नाही”.


परंपरा पाळताना कसे नियोजन करावे लागते या बद्दल जयश्रीताई म्हणतात, “दिवाळी असली तरी नोकरीनिमित्त दुसर्‍या शहरात रहात असलेली मुले सुटीच्या दिवशीच येऊ शकतात, त्यामुळे सकाळी अभ्यंगस्नान करून एकमेकांकडे फराळाला जाणे शक्य नसते. पण जे घरात आहेत ते आम्ही सगळे पाडवा, भाऊबीज, लक्ष्मीपूजन, अभ्यंग स्नान पारंपरिक पद्धतीने करतोच. फराळाचे सर्व पदार्थ घरी तयार करतो. सुरूवातीला इथे आलो तेंव्हा चकलीची भाजणी मिळायची नाही. तेंव्हा त्याला पर्याय म्हणून मुगाच्या चकल्या करायला लागलो. आता दोन तीन वर्षे झाली; मिशिगनमध्येही ही भाजणी विकत मिळते. त्यामुळे रव्याचे व बेसनाचे लाडू, चकल्या, शेव, चिवडा, शंकरपाळे, करंज्या हे पदार्थ घरी बनवतो. मुलांनापण आवडतात. सध्या मुलांना गोड पदार्थ नको असतात. त्यामुळे अगदी शास्त्रापुरतं तरी गोड करतोच आम्ही. कारण मुलांना शाळेतच जेवण असते. त्यामुळे इथल्या चवीची सवय झालेली असते म्हणून रोजच्या रोज सण असला तरी गोड खात नाहीत”.

“दिवाळीत आपल्याकडे सकाळी एकमेकांच्या घरी पूर्वी जी फराळाला बोलवण्याची पद्धत होती तसे मात्र इथे करता येत नाही, ते दिवाळीच्या आसपास येणार्‍या सुट्टीच्या दिवशीच करावे लागते. पण समाधान हे आहे की आम्ही सर्व ज्येष्ठ मंडळी एकत्र राहतो आणि मुले नोकरीच्या शहरात पण जवळच असल्याने एकत्र जमणे, भेटणे आणि आपली परंपरा जपणे हे जमते आणि यात सर्वांनाच समाधान वाटते. त्यामुळे जरी दुसर्‍या देशात राहत असलो, दुसर्‍या संस्कृतीत राहत असलो तरी, आपल्या परंपरांमुळे आम्ही आपल्या भारतीयत्वाशी कायम जोडलेले राहतो”.

“दिवाळीची रोषणाई करतो, आकाश कंदील लावतो. पणत्या दिवे लावतो. दिवाळी उत्सव म्हणून आपल्या सारखेच वातावरण इथेही निर्माण करतो. ऑक्टोबर/ नोव्हेंबरमध्ये दिवाळी असते तेंव्हा इथे खूप थंडी असते. तेंव्हा झेंडूची फुले मिळत नाहीत. पण प्रत्येकाला पर्याय आहेतच. आम्ही आमच्या बागेत झेंडूची रोपे लावतो त्यामुळे दारातच फुले मिळतात. मात्र थंडीत ही झाडे टिकत नाहीत. आम्ही भारतातुनच फुलांच्या कृत्रिम माळा आणल्या आहेत. गरज पडली तर त्या वापरुन सजावट करतो. जे उपलब्ध आहे त्यातून सर्व साग्रसंगीत पार पाडतो. आंब्याची पाने मिळतात. त्याचे तोरण करतो. रांगोळी काढतो दारात. आकाशकंदील घरीच तयार करून लावतो. त्याचे सर्व साहित्य इथे मिळते. घराला रोषणाई करतो. फटाके उडवता येत नाहीत नियमाप्रमाणे. सुरूवातीला घेऊन ठेवलेले म्हणून उडवले होते पण लगेच पोलिस येतात, तक्रार होते. छोटे फुलबाज्यासारखे फटाके चालतात. न्यू ईअरला कॉमन जागेवर उडवतात. दिवाळीत महाराष्ट्रियन लोक एकत्र येऊन हॉल घेऊन दिवाळी साजरी करतात, कार्यक्रम बसवतात. एव्हढच काय मातीचा किल्ला पण मंडळात केला जातो. सगळ्यांनाच हौस असते”.उत्साह आणि आनंद असे वातावरण जगाच्या पाठीवर कुठेही आपण असलो तरी संस्कृतीच्या निमित्ताने आपण निर्माण करू शकतो हेच सिद्ध होते यावरून.

ताई सांगत होत्या, “आम्ही इथे आलो तेव्हा भारतात गौरी गणपती आमच्याकडे होतेच. इथेही ते साजरे करतो. उलट सुरुवातीला या निमित्ताने सर्वांना घरी बोलविणे, हळदीकुंकू करणे आणि आमच्याकडे आमचे शंभरावर परिचित इ. जेवायला बोलवत असू. सर्व पुरणपोळ्यांचा स्वयंपाक घरी करत असू. आनंद वाटतो त्यात. त्यानंतर इथे गणपती मंदिर झाले तेंव्हापासून सार्वजनिक गणेशोत्सव सुरु झाला. तोही जोरदार साजरा होतो इथे. आता महाराष्ट्र मंडळपण आहे. मराठी समाज बांधव एकत्र येऊन साजरे करतात. सुरूवातीला गणपतीची मूर्ति भारतातून आणायचो, आता इंडियन स्टोअर्स झाली आहेत. आता गणपतीपण मिळतात. इथे गणेश विसर्जनाचा प्रश्न येतो. नियम कडक आहेत. रंग नैसर्गिक हवे. ठराविक मातीचीच मूर्ति हवी, पर्यावरणाला हानी पोहोचवायची नाही. आता तर त्यांच्या नियमांनुसार मंडळाची मूर्ती बनवली जाते इथेच. पण आता विसर्जन मात्र टाकीतच करायची पद्धत सुरू झाली आहे”.

“नातवंडांची नवी पिढी आहे, त्यांनाही आपली संस्कृती समजली पाहिजे, परंपरा समजल्या पाहिजेत असे वाटते आणि आपणच नाही या गोष्टी पाळल्या तर त्यांना तरी कशा दिसणार? आणि समजणार?कारण इथे बाहेर कुठलेही वातावरण नाही, असे जयश्रीताईना वाटते. त्या म्हणतात, “नातवंडांना आपल्या कॅलेंडर प्रमाणे येणारे सण, उत्सव व दिनविशेष असतात त्या दिवशी त्यांना फोन करून आज काय आहे याची माहिती आम्ही देतो आणि त्याची एखादी कथा सांगतो, महत्व सांगतो आणि शुभेच्छा व आशीर्वाद देतो . जसे हॅप्पी दिवाळी. हॅप्पी न्यू इयर करतो तसे हॅपी संक्रांत, हॅपी गुढीपाडवा, होळी असे सर्व सणांना शुभेच्छा देणे हा उपक्रम चालू असतो आमचा. गोकुळाष्टमीला कृष्णाची गोष्ट सांगायची. कारण या पिढीला सतत या गोष्टी सांगत राहिल्या पाहिजेत तेंव्हाच त्यांना कळतील आणि ते या विषयाशी जोडलेले राहतील”. ऑक्टोबरमध्ये इथे हॅलोविनचे वातावरण असते. आम्हाला विज्ञान आणि योग्य उत्तर देऊन एखाद्या प्रश्नाचे समर्थन द्यावे लागते. आपली संस्कृती व विज्ञान पटवून द्यावे लागते”.


  त्यांच्या कुटुंबातील सगळ्या सुना मराठी आहेत पण एक सून अमेरिकन आहे, ती पण या संस्कृतीशी एकरूप झालेली आहे. ती सुद्धा दिवाळीत लक्ष्मीपूजन करते, सर्वांना हौसेने बोलवते, पदार्थ, पूजा सर्व आनंदाने करते, समजून घेऊन विचारून करते. तिला अनेक प्रश्न असतात. हे असेच का? तेच का ? त्याचं निरसन आम्ही करतो. तिने आवडीने शिकून घेतले आहे सर्व.”

जयश्री ताईंच्या मते, आपण वेगळ्या प्रांतात राहत असू तर आपल्या प्रांताची, आपल्या जीवन पद्धतीची ओळख नव्या पिढीला करून देणं आणि ती आपल्या कृतीतून सुद्धा दाखवणं आवश्यक आहे. आपण आहे तिथे आहे तसेच राहिलो तर आमची संस्कृती आमच्या मुलांना कळणारच नाही आणि हळू हळू ही ओळख विसरत जातील. त्या म्हणतात, “इथे शाळेत अथवा बाहेर सुद्धा आपल्या सणांचे वातावरण काहीच नसते. वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक एकत्र राहतात. त्यांच्या संस्कृतीचा परिचय होत राहतो. पण आपली संस्कृती सुद्धा त्यांना कळली पाहिजे, त्याची जाणीव त्यांना राहिली पाहिजे, म्हणून आम्ही घरी तरी मुद्दाम पाळतो. या वातावरण निर्मितीमुळे एक प्रकारचा आनंद व उत्साह असतो, मन उल्हसित होते. भेटीची ओढ असते त्यामुळे आवर्जून भेटायला येतातच”. आपण पालकांनी किंवा घरातील मोठ्या माणसांनी या परंपरा संस्कृती पाळणे आवश्यक असते असे जयश्री ताईना वाटते. तरच मुलांना घरात दिसेल आणि त्याचे महत्व वाटेल. जयश्री ताई मोकाशी पतीपत्नींनी आणि त्यांच्या कुटुंबाने दीर्घ काळ अमेरिकेत राहूनही नाते संबंध, आपल्या परंपरा, आपली शिकवण, अध्यात्म जपले आहे. एक मोठे कुटुंब आणि त्यांच्यातील नात्यांचे बंध घट्ट पकडून ठेवले आहेत. सर्व भाऊ आणि त्यांच्या बायका एकत्र राहून वय वर्षे ९८ च्या आपल्या आईला एकत्र सांभाळत आहेत. आनंद घेत आहेत आनंद देत आहेत. अशा या कुटुंबाला मानाचा मुजरा !

(हे सदर 'साहित्य परिमळ' या ई- त्रैमासिकासाठी सुरू केले आहे. ते ब्लॉग वाचकांसाठी, हा दिवाळी अंक प्रसिद्ध झाला .link=  https://online.pubhtml5.com/bmycd/xifv/index.html )   

- डॉ. नयना कासखेडीकर

-----------------------------

 

Wednesday 16 August 2023

भारताबाहेर आमची संस्कृती - फिनलंड मधील मराठी माणसं.

 

साहित्य परिमळ या ई पत्रिकेसाठी नवे सदर-

भारताबाहेर आमची संस्कृती

फिनलंड मधील मराठी माणसं.

हेलसिंकी हे फिनलंड मधले सर्वात मोठे शहर आणि देशाची राजधानी. एका सर्वेक्षणात हेलसिंकी शहरातील नागरिक प्रामाणिकपणात प्रथम क्रमांकावर आहेत. युरोपिय संघातला देश. औद्योगिक दृष्टीने प्रगत असलेला हा देश जीवन शैली, अर्थव्यवस्था, आरोग्य, शिक्षण या बाबतीतही सर्वोत्तम श्रेणी असलेला आणि सामाजिक व राजकीय स्थैर्य आलेला देश सिद्ध झाला आहे.अशा विविध देशात राहणारे आपले भारतीय लोक संस्कृती कशी जपतात हे जाणून घेण्यासाठीहे सदर चालू केले आहे. आजचे कुटुंब आहे  अमित व राधिका जोशी –फिनलंड    

      फिनलंड येथे गेली सहा सात वर्षे राहत असलेले भारतीय, महाराष्ट्रियन कुटुंब. अमित, राधिका आणि त्यांच्या दोन मुली. इथे असताना आय.टी.त असणारे आणि उच्च शिक्षित असून सुद्धा घरात सर्व सणवार, आपल्या परंपरा नेमाने पाळणारे जोडपे.  अचानक दुसर्‍या देशात जावे लागले तरी त्या वातावरणात आपली संस्कृती पाळण्यासाठी आग्रही असणारी, दोन्ही लहान मुलींचे संगोपन करताना आपल्याच पद्धतींवर ठाम असणारी राधिका आणि अमित यांची भेट झाली आणि उत्सुकतेने अनेक शंका त्यांना विचारल्या. एका मजेशीर प्रसंगाने सुरुवात झाली. अमित सांगत होता, “एका परदेशी कुटुंबाकडे आम्हा सर्वांना आग्रहाने जेवायला बोलावले होते, बराच वेळ झाला तरी कुठलीही स्वयंपाक किंवा जेवणाची तयारी, घाई नाही, लगबग नाही. बराच वेळ गप्पा- टप्पा झाल्या आणि चला जेवू या असे म्हणत त्यांनी आमच्या समोर उकडलेले बटाटे जेवण म्हणून प्लेट मध्ये ठेवले. असे हे अनपेक्षित जेवण म्हणून मान्य कसे करायचे? कुठल्याही पद्धतीने कुठलेही एक्सप्रेशन न देता, आम्ही मुकाट्याने बटाटे जेवलो आणि घरी येऊन वरण भात पोळी भाजी असा स्वयंपाक करून रीतसर जेवणे झाली”. हा प्रसंग त्यांच्या कडून ऐकतांना आपल्या खाद्य संस्काराचे महत्व भारतीय लोकांना जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात गेलं तरी असतच हे ऐकून आनंद झाला.

     आपली संस्कृती म्हणजे त्यात खाद्यसंस्कृती आली, पोशाख, धार्मिक, आध्यात्मिक, आपली भाषा, नाते संबंध, देशाभिमान आणि आपले आचार विचार सुद्धा आलेच. यावर जाणून घेताना साहजिकच तिथल्या संस्कृतीचे पैलू पण कळले.   

    अगदी फिनलंड मध्ये पाय ठेवला पहिल्यांदा तेंव्हा घर आणि काही व्यवस्था दाखवायला ऑफिसच्या एक बाई आल्या, त्यांना आल्या आल्या पाणी दिलंत्यांना हे आदरातिथ्य नवीन होतं. त्या म्हणल्या आम्ही असे कोणाकडे पाणी पित नाही, काही अडचण असेल तर विचारा, लगेच विचारलं, लाइट गेले तर काय व्यवस्था आहे? त्या म्हणल्या इथल्या माझ्या नोकरीच्या २४ वर्षांच्या अनुभवात आज पर्यन्त एकानेही असा प्रश्न विचारला नाही. फिनलंड मध्ये लाइट जातच नाहीत.

   भारतीय म्हणून इथे खूप चांगला अनुभव आहे. आपल्याला चांगली ट्रीटमेंट देतात. मी ऑफिसला जाताना सुद्धा आपलाच पोशाख, कपाळाला टिकली, गळ्यात मंगळसुत्र घालते. फक्त त्याच प्रदर्शन होणार नाही याची काळजी घेते. असही इथे आठ महीने थंडी असल्याने पूर्ण कपडे असतात त्यात तुम्ही घातलेले बांगड्या, गळ्यातले हे दिसत नसतेच.

 


             मात्र एकदा रांगोळीच्या बाबतीत अनुभव आला. एकदा दिवाळीत स्वस्तिक चिन्हांची रांगोळी दारात काढली होती, दुसर्‍या दिवशी सकाळी पाहिलं तर पुसलेली दिसली. मला वाटलं स्वच्छता कामगार येतात ते स्वच्छता करून गेले असावेत.पण परत दिवाळी म्हणून रोज पाच दिवस मी रांगोळी काढतेच. दुसर्‍या दिवशी पुन्हा छोटीशी स्वस्तिक असलेली रांगोळी काढली. पुन्हा दुसर्‍या दिवशी पुसलेली दिसली मग छडा लावला .रोज स्वच्छता कामगार येत नाहीत मग कशी पुसली गेली? म्हणून लक्ष ठेवून होते, तेवढ्यात शेजारच्या बाईंनी बेल वाजवली. त्यांनी आमच्याकडे काळजीने विचारपूस केली की तुम्हाला इथे कुणी त्रास देतय का? तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का कुणाकडून? आम्हाला काही कळेनासे झाले. मी म्हटलं, "नाहीं , असं काहीच नाही पण तुम्ही असं का विचारता ? ". तेव्हा त्यांनी सांगितले की कधीतरी काही बदमाश लोकं विद्वेषाच्या भावनेतून त्रास देण्याच्या उद्देशाने लोकांच्या घराबाहेर असं नाझी लोकांचं चिन्ह काढतात. गेले २ दिवस तुमच्या घरासमोर असंच काहीसं  चिन्ह मला दिसलं. तुम्हाला त्रास नको म्हणून मीच ते मिटवून टाकलं .  तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यांचा काय गैरसमज झालाय ते. या अशा किस्स्यांबद्दल आम्ही ऐकून होतो, पण आम्हालाच असा काही अनुभव येईल असं कधी वाटलं नाही. पण परदेशात सुद्धा तुमची काळजी करणारे शेजारी लाभणं म्हणजे नशीबच. फिनिश लोक स्वभावाने खूप चांगले असतात याचा आलेला हा अजून एक अनुभव.

रांगोळी बरोबर उत्सुकता होती देवपूजा ? रोज होते ? राधिका म्हणाली हो रोज देवाची पूजा करतो. पण आरतीच्या वेळी घंटा हळू वाजवतो कारण इथे आवाज चालत नाही. रात्री दहा ते सकाळी सात हे सायलेंट अवर असतात. बाहेर कुठलाही आवाज जायला नको..मिक्सर, मशीन असे आवाजाचे यंत्रेही लावत नाहीत.  एवढंच काय कुठेही ओपन फ्लेमची सुद्धा परवानगी नाही, आग लागू शकते म्हणून,म्हणून इथे गॅस नाहीत इंडक्शन आहेत, घराबाहेर फ्लेम चालते गार्डन मध्ये वगैरे करू शकता . पण देवाजवळ दिवा तर लावायलाच हवा . मी अगदी छोटासाच लावते, उदबत्ती धूर चालत नाही, सेंसर आहेत सगळीकडे ,ते वाजले की दंड भरावाच लागतो. तुळशीला पण दिवा लावते .

 

मी आश्चर्याने विचारलं, तुळस आहे तुझ्याकडे? हो, तुळस आहे ,मैत्रिणीकडून तुळशीच बी आणून माती विकत आणून कुंडीत लावली. मात्र खूप काळजी घ्यावी लागते इथे थंडीमुळे.  त्या रोपाला थंडी पासून संरक्षण मिळावं म्हणून उष्णतेसाठी एक बल्ब लावला आहे. जो सूर्यासाखं काम करतो. त्या उष्णते प्रमाणे तुळस वाढते. आता तुळस छान वाढली आहे.    

बापरे आपले खाद्य पदार्थ आणि दिवा बत्ती, तळण, धूर काहीच चालणार नाही .अगदी भाजलेल्या वांग्याचे भरीत, बटाटेवडा, भजी, दिवाळीचा फराळ, धूप दीप कसं काय जमणार? कितीतरी वेळा सेन्सर वाजतील? तर राधिकाने दिवाळीची गमतीशीर आठवण सांगितलीच, “दिवाळीत मी भजी, पापड ,कुर्डया एका पाठोपाठ तळले, सगळ्याचा धूर झाला आणि सायरन वाजायला लागला. माझी धावाधाव झाली. सायरन बंद करण्याची धडपड केली, बंद होईना, ऊशा वगैरे घेऊन त्या स्पीकर वर टेबलवर चढून दाबून धरल्या की आवाज बाहेर जाणार नाही. तरी नाही. खूप कर्कश आवाज आणि बाहेर गेला तर? शेवटी अमितला फोन करून सांगितलं, तासभराने त्याने येऊन सर्व वायर्स काढून नीट केला तेंव्हा आवाज थांबला”.

     आम्ही इथे सुद्धा आजकाल सणवार पाळायला उत्सुक नसतो. त्याची अनेक कारणे आहेत. पण देशाबाहेर गेलात की ही संस्कृतीच आपला आधार पण असते . राधिका  दिवाळी, गुढीपाडवा आणि येणारे सर्व उत्सव करते, मुलींना आपली खाद्य संस्कृती समजावी म्हणून, कटाची आमटी, नारळी भात, पुरणपोळया असा नेहमीचा साग्रसंगीत स्वयंपाक करते. तेंव्हा घरात सणाचे वातावरण निर्माण होते. मुलींनाही परिचय होतो”.  

एकत्रित सण साजरे होतात महाराष्ट्र मंडळात, पण सर्वात जास्त गौरी गणपतीच्या आनंदाला मुकतो. पाडव्याला गुढी उभी करतो, पंचांग वाचतो, फक्त कडुनिंबाची पाने मिळत नाहीत. हे सर्व आम्हाला सकाळी ८ च्या आत नेहमी उरकावे लागतात, सुटीच्या दिवशी आले तर चांगले. अमित दत्तजयंती चे पारायण पण करतो, उद्यापन करतो. संक्रांतीचे हळदीकुंकू करतो मग जरा हायफाय वस्तु लुटतो. इथे जे मिळते ते.  मुलींच्या वाढदिवसाला सकाळी औक्षण, घरी जेवायला गोडधोड आणि संध्याकाळी देव दर्शन असा वाढदिवस साजरा करतो. इस्कोन मंदिर आहे. साई मंदिर आहे. इथे भजन, कीर्तन महाप्रसाद असतो.   

    आदर ही आपल्या संस्कृतीतली मोठी महत्वाची गोष्ट आहे. शिक्षक, गुरु किंवा मोठी वडीलधारी माणसे यांना आपण आदराने हाका मारतो, अरे तुरे करत नाहीत, ते इथे राधिकाला खटकते, इथल्या संस्कृतीत लहान मुले सुद्धा सहजपणे मोठ्या माणसांना नावानेच संबोधून बोलतात.

मुलींना अथर्वशीर्ष, रामरक्षा, पसायदान, गणपती स्तोत्र, मारुती स्तोत्र पाठ आहे .रोज म्हणतात. बाराखडी उजळणी रोज घेतो, परदेशात राहून आपली भाषा टिकवणे हा एक महत्वाची जबाबदारीच असते, त्या बद्दल  अमितने या खूप सकारात्मक बाजू सांगितली की,  “इथल्या शिक्षणात मातृभाषेला महत्वाचं स्थान आहे. सर्व शिक्षण मातृभाषेतच म्हणजे फिनिश भाषेतच असतं. ते अनिवार्य आहे. त्यामुळे तिथली भाषा तुम्हाला यायलाच पाहिजे. पुस्तके, शिकविणे हे सर्व फिनिश भाषेतच असते”.

       “इथे आणखी एक कौतुकाची गोष्ट जाणवली की इथल्या शाळेतील शिक्षक किंवा पाळणाघरातील केअर टेकर सुद्धा पालकांना सांगतात की तुम्ही मुलांशी घरी तुमच्या मातृभाषेतच बोला. मुलांना मातृभाषेत जे ज्ञान मिळतं ते दुसर्‍या भाषेतून मिळू शकत नाही यावर त्यांचा भर आहे. ते म्हणतात तुम्ही घरी कुठलीही भाषा शिकवू नका मुलांना, जी भाषा शिकवायची ती आम्ही शिकवू, पण जे ज्ञान त्यांना मिळणार आहे ते तुमच्या मातृभाषेतुनच मिळेल. आपल्याकडे मात्र उलटे चित्र दिसते ते हे की, आपण मातृभाषे ऐवजी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच टाकतो कारण, असे शिक्षण हा सामाजिक प्रतिष्ठेचा आणि सामाजिक दडपणाचा विषय असतो. अपराधीपणाची भावना असते”. घरात मराठीच बोलतो. इथे महाराष्ट्र मंडळ आहे. मराठी कुटुंबे आहेत आणि इथे भारतीय लोक भेटले की राष्ट्रभाषा हिंदीतच शक्यतो बोलतो सगळे” .

   “आता महाराष्ट्र मंडळात मराठी भाषा शिकवण्याचा काही उपक्रम घेण्याचा प्रयत्न आहे . आपली मराठी इथेही टिकवावी हा आमचा पहिला प्रयत्न आहे. विशेष सांगायचे म्हणजे भारत सरकार इथल्या भारतीय दूतावासच्या माध्यमातून अशा बाहेर राहणार्‍या सर्व भारतीय भाषिकांना त्यांची भाषा टिकविण्यासाठी प्रोत्साहन देते आणि निधी पण पुरवते”.

  “शाळेत सुद्धा रिलीजन हा एक विषय आहे. पण त्यात पर्याय आहेत तुम्हाला जो समजून घ्यायचा आहे तो तुम्ही घेऊ शकता. ख्रिश्चनिटी, इस्लाम, एथीक्स, हिंदू नाही पण इस्कॉन चे  कृष्ण, हे चार पर्याय आहेत. सुदैवाने आम्हाला चांगला पर्याय मिळाला. मुलीने कृष्ण विषय घेतला आहे . इथे इस्कॉन मुव्हमेंट आहे. तिला भागवत शिकवतात, कथा शिकवतात, जन्म, मृत्यू, देव – दानव, पाप -पुण्य या गोष्टी यातून कळतात. हा इंग्लिश मध्ये शिकवतात आणि कृष्ण विषय फिनिश भाषेत पण शिकवतात, भगवतगीता फिनिश भाषेत सुद्धा आहे. इस्कॉनचे प्रभूजी हे स्वत: फिनिश आहेत. त्यांची कृष्णावर भक्ति आहे. अभ्यास आहे. म्हणून ते कृष्णाचा तिथे प्रसार करतात. ही गोष्ट मला अभिमानाची वाटली”.

 “आम्ही महाराष्ट्र मंडळात प्रामुख्याने गुढीपाडवा, गणेश उत्सव आणि दिवाळी  मोठ्या प्रमाणावर साजरे करतोच, यावर्षी पासून संक्रांत सण, हळदीकुंकू आणि १ मे हा महाराष्ट्र दिन साजरा करायला सुरुवात केली. मुलांना कळलं पाहिजे की महाराष्ट्र दिन म्हणजे काय ? या वर्षी आम्ही मुलांची वत्क्तृत्व स्पर्धा घेतली. वेगवेगळे विषय देऊन मुलांना भित्तिपत्रक बनवायला सांगितले होते. भाषणे दिली मुलांनी, आपल्या संस्कृतीतले खेळ समजण्यासाठी, चमचा लिंबू, संगीत खुर्ची, रस्सीखेच हे खेळ आयोजित केले होते. त्यामुळं त्या देशात जन्मलेली मराठी मुले यांना माहिती होईल. शारदीय नवरात्र ,भोंडला यावर्षी करणार आहोत. आपली मराठी संस्कृती, मराठी भाषा, मराठी खाद्य पदार्थ हे नव्या पिढीला माहिती होतील याचा प्रयत्न असतो. या शिवाय महाराष्ट्राची संत परंपरा, इथली उद्योग क्षेत्रातील घराणी उदा किर्लोस्कर, गरवारे, चितळे इ, या संबधित माहिती देणे, चर्चा घडवून आणणे किंवा वत्कृत्व स्पर्धा घेणे असेही उपक्रम करतो. या निमित्ताने पालक आणि मुले दोघांचेही वाचन होते. अनेक गोष्टी आपल्या संस्कृती संदर्भात त्यांना कळतात”.

हे सगळं ऐकल्यावर मनात प्रश्न होता तुम्ही स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताकदिना बद्दल मुलांना सांगता का काही? तर, अमित म्हणाला, “हे दोन्ही दिवस फिनलंड च्या भारतीय दूतावासा तर्फे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मुलांना घरच्या घरी तिरंगा बनवायला शिकवतो. २६ जानेवारीची दिल्लीची परेड असते ती आम्ही आवर्जून टीव्हीवर दाखवतोच, जर शाळा असेल तर, ही परेड, चित्ररथ, सैन्य दले हे  यू ट्यूब वर मुलांना विडिओ द्वारे दाखवतो आणि ओळख करून देतो”. 

“पण एक जाणवतं की १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या आपल्या राष्ट्रीय दिवसांच महत्व व अटॅचमेंट जेव्हढी आम्हाला होती तेव्हढी या मुलांना नाही.कारण हे आम्ही स्वता भाग घेत अनुभवले आहे पण या मुलांना हे राष्ट्रीय दिवस म्हणजे इतर डे सारखेच साजरे करायचे डे असतात. तेव्हढच महत्व.म्हणून कमुनिटीत साजरे करतो. पण भारत आपला देश म्हणून त्यांना खूप आत्मीयता आहेच, त्यांना आपल्या घर नातेवाईक यांची आठवण येते. आपल्याला पुन्हा भारतात जायचे आहे, भारतच बेस्ट आहे हे त्यांच्या डोक्यात फिट्ट आहे”.

      मागची अनेक वर्षे वाचतो की जगात फिनलंडचा हॅप्पीनेस इंडेक्स सर्वात जास्त आहे. त्याचे कारण आर्थिक ताण कमी आहे. सरकारची मदत हा मोठा आधार असतो. इथे लक्षात घेतलं पाहिजे की आपण टॅक्स भरायचा असतो. तेंव्हा या सुविधा आहेत. मुलांच्या संगोपनाचा आर्थिक भार आईवडिलांवर नाही आणि वृद्धापकाळात आईवडिलांना सांभाळायचा आर्थिक भार मुलांवर नाही म्हणून दोघेही आनंदी च असणार.जॉब सिक्युरिटी किंवा सार्वजनिक जीवनात सिक्युरिटी सरकार देते त्यामुळे ही जबाबदारी कमी आहे त्यांना. जॉब गेला तर त्यामुळे काळजी करत नाहीत. जास्त पगार मिळतो म्हणून नोकरी बदलायची मानसिकता इथे नाही. आहे त्यात ते समाधान मानतात. तिथल्या संकल्पना वेगळ्या आहेत जीवनाच्या. पण फिनलंड मध्ये लोकांची स्वभाव वैशिष्ठ्ये म्हणजे, प्रामाणिकपणा, विश्वास ,संयम ,वक्तशीरपणा अशा अनेक गोष्टी आणि असे अनेक पैलू अमित आणि राधिका कडून आज कळले. धन्यवाद राधिका आणि अमित !

मुलाखत- डॉ. नयना कासखेडीकर

------------------------------     

Saturday 3 June 2023

देखणी ती पाऊले, जी ध्यासपंथे चालती |

 

देखणी ती पाऊले, जी ध्यासपंथे चालती |

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू व महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचलित गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स चे प्राचार्य डॉ. एन. एस. उमराणी सर त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत, त्या निमित्त त्यांच्याशी झालेला हृद्य संवाद.

                                       

         सोलापूर जिल्ह्यातील भंडारकवठेसारख्या ग्रामीण भागातून येऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासारख्या नामवंत विद्यापीठाच्या प्र- कुलगुरू पदावर नियुक्ती झालेले प्राचार्य डॉ. एन.एस. उमराणी सर! अत्यंत अभिमानास्पद वाटणार्‍या या कामगिरीमागची प्रेरणा काय होती, त्यांचा इथवरचा प्रवास, त्यांची शालेय जीवनातील जडण घडण कशी झाली याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता होतीच. साहजिकच त्यांचे मूळ गाव, सामाजिक पार्श्वभूमी, कुटुंब आणि बालपण या विषयाकडे प्रारंभी मोर्चा वळला. तोवर सर त्यांच्या कर्नाटक, विजापूरच्या सीमेवरील दक्षिण सोलापूरमध्ये असलेल्या भंडारकवठे या गावाकडे मनाने पोहोचले सुद्धा!

     रम्य ते बालपण, हा अनुभव सांगताना त्यांना आधी आठवते ती नदी, आईवडील,मित्र, शेतातले घर, शाळा आणि गाव. दुथडी भरून वाहणारी भीमा नदी, गावकर्‍यांना आपल्या नावेतून सुरक्षितपणे वाहतूक करून पलीकडच्या तीरावर पोहोचविणारे, पावसाळ्याआधी नावेची दुरूस्ती करणारे नावाडी, तर नदीवर खेळतांनाच्या आठवणी, पाणी कमी असताना, पेरु बोरं खायला नदीच्या पलीकडे कर्नाटकात जाणारी आम्ही मुले या सर्व आठवणी मनावर कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत असे सर म्हणतात.

पूर्वी एकूणच समाज कसा होता, सामाजिक वातावरण, एकोपा, भारतीय संस्कृतीतील ‘वसुधैव कुटुंबकम’ चा अनुभव आणि अनुभवलेले प्रसंग सरांनी सांगितले. ते म्हणाले, ‘एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या विचाराने कामे करणारी जनता होती. वेळप्रसंगी एकमेकांसाठी धावून जाणे, सहकार्य करणे, एकमेकांना सुख दु:खात साथ देणे यामुळे समाजात एकोपा व शांतता नांदत असे”.

“माझे आई वडील दोघेही शेतमजूर होते. शिक्षण नसले तरी त्यांचे आचार विचार, सामाजिक जाणीव, शिक्षित लोकांच्या बरोबर असलेली ऊठबस व चांगले संबंध, त्याच प्रमाणे सामाजिक व राजकीय क्षेत्रात जे लोक गावासाठी काम करायचे त्यांच्याशी आई वडिलांचे खूप चांगले संबंध होते. आई वडील शेती बटाईने करायचे, जमीन मालकाने शेतातच एक झोपडी बांधून दिलेली होती, तिथे राहूनच शेतीची कामे करायचो. १९७२ला दुष्काळ पडला होता. रस्त्यांची कामे, नाला बंडीग कामे अशी दुष्काळी कामे करायला मी पण जायचो आईवडीलांबरोबर. मी ११ वर्षांचा होतो, मोठ्या माणसांपेक्षा जास्त काम करायचो तेंव्हा लोक कौतुक करायचे. एक रुपया रोज मजुरी मिळायची.पण आठवड्याच्या शेवटी हातावर मिळायचे सात रूपयांऐवजी फक्त साडेतीन रुपये. म्हणजे रोजचे पन्नास पैसेच, निम्मीच मिळायची कारण मी लहान होतो. हे पैसे मोजताना तेव्हा डोळ्यात पाणी आले. माझ्यासाठी हे धक्कादायक होते. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवी पर्यंतचे शिक्षण आणि नंतर दहावी पर्यन्त हायस्कूल होते. दहावी होईपर्यन्त मी सातत्याने काही ना काही शेतीकाम करत असे. शाळेच्या उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुटीतपण आम्ही काम करून शाळेचा खर्च, युनिफॉर्म, वह्या पुस्तके हा खर्च भरून काढत असू. परिस्थितीमुळे आई वडिलांना तेव्हढाच आर्थिक हातभार!”

आपली आर्थिक बाजू खूप मजबूत पाहिजे याची जाणीव त्यांना अश्या प्रसंगातून झाली होती. १९७२ सालच्या दुष्काळाने आर्थिक पिळवणुक आणि कष्टकर्‍यांचा अवमान याचा आघात त्यांच्या बालमनावर झाला होता.

दहावीनंतर सोलापूर शहरात संगमेश्वर कॉलेजमध्ये प्रवेश झाला. नवे शहरी वातावरण, हॉस्टेलला राहणे, परिस्थितीशी जुळवून घेणे यातून जीवनातल्या अनेक गोष्टी त्यांना शिकायला मिळाल्याचे ते सांगतात. निम्नआर्थिक स्तरातल्या हुशार विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप होती ती आपल्याला मिळायची असे सांगताना, विद्यार्थ्यांच्या परिस्थितीची जाणीव असणारे त्या कॉलेजचे प्राचार्य के. भोगीशयन यांच्याबद्दल त्यांनी आदर व्यक्त केला. वर्षाच्या शेवटी मिळणारी स्कॉलरशिप दर महिन्याला खर्चायला काही रक्कम मिळावी म्हणून ती अॅडवान्स द्यायची असे ठरवल्याने खूप सोय झाली.

संगमेश्वर कॉलेज मधून १९८२ ला बी.कॉम. होत असताना वडिलांचे अचानक निधन झाले. पुढे एम.कॉम. होऊन प्राध्यापक होण्याचे स्वप्न बघितलेल्या उमराणी सरांच्या समोर आता पुढे काय? असा प्रश्न उभा राहिला आणि साहजिकच नोकरी शोधावी लागली. स्पर्धा परीक्षा देऊन बँक, रेल्वे, एअर इंडिया यांच्या परीक्षा ते उत्तीर्ण झाले आणि मुंबईत एअर इंडियातली नोकरी स्वीकारली. मोठे शहर, नावाजलेली कंपनी, वातानुकूलित चकचकीत ऑफिस अशा एकदम नव्या वातावरणामुळे अनेक नव्या गोष्टींची ओळख झाली. रहाणीमान सुधारलं. आईला दरमहा पैसे पाठवता येऊ लागले. आयुष्याच्या प्रत्येक महत्वाच्या टप्प्यावर त्यांच्या कुटुंबाची तेव्हढीच भक्कम साथ होती.

एअर इंडिया सारखी चांगली स्थैर्य असलेली सोडून शिक्षण क्षेत्रात स्थिर होण्याचा निर्णय घेण्याचे कारण सांगताना ते म्हणतात, “ एम.कॉम. होऊन प्राध्यापकी करायची हे पहिल्यापासूनच मनात होत, ते स्वप्न होतं माझं. ते पूर्ण करण्यासाठी १९८८ ला एअर इंडिया सोडण्याचा निर्णय घेतला. आर्थिक स्थिति थोडी सुधारली होती, मग स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा पुन्हा उफाळून आली. तो विचार गप्प बसू देईना. मुंबई विद्यापीठातून एम.कॉम. केलं. पुढे शिवाजी विद्यापीठातूनपण एम.कॉम. केलं. बार्शीच्या सुलाखे कॉलेज मध्ये इंस्ट्रक्टरची नोकरी मिळाली. सन १९८८ ते १९९४ पर्यन्त ही नोकरी केली. याच काळात NET परीक्षा पास झालो”.

“सीनियर कॉलेजमध्ये काम करायची इच्छा होतीच. १९९४ला शाहू कॉलेजमध्ये रुजू झालो. १४ वर्षे काम केल्यानंतर म.ए.सो. जाहिरात आली आणि अर्ज केला. २००८ ते २०२३ गरवारे वाणिज्य महाविद्यालयाच्या सेवेत प्राचार्य म्हणून काम केले. या काळात महाविद्यालायला विद्यापीठ अनुदान आयोगाचे (UGCचे) मानांकन मिळाले, तर महाविद्यालायाची शैक्षणिक गुणवत्ता आणि आर्थिक स्वावलंबन याची घडी सरांनी बसवली. म ए.सो.च्या दहा वर्षांच्या सेवेत शैक्षणिक गुणवत्ता वाढवली. इन्फ्रास्ट्रक्चर चांगले झाले. रिसर्च सेंटर सुरू झाले. विद्यार्थी संख्या वाढली.

आपल्या सेवेच्या काळात कॉलेजला नॅक कमिटीकडून ए श्रेणीचं मानांकन २०१० साली ३.३९ स्कोअर आणि २०१६साली ३.४५ स्कोअर असं दोनदा मिळालं, हे सांगताना सरांना समाधान आहे. ते म्हणतात, “शिक्षण क्षेत्रात महाविद्यालयाचा दर्जा चांगला राहण्यासाठी, व्यवस्थापन, प्राध्यापक, विद्यार्थी सर्वांचाच चांगला सहभाग आवश्यक असतो. महाविद्यालयाचे नाव मोठे होण्यासाठी आवश्यक ते कष्ट घेण्याची तयारी असायला लागते, ती सर्वांची जबाबदारी असते. एकमेकात सुसंवाद असणं महत्वाच असतं आणि काम करण्याची प्रेरणा देणंही गरजेचं असतं. तेच आम्ही केलं. भारतात आणि परदेशात महाविद्यालय पाहणीसाठी अभ्यास दौरे केले.

या पाहणीतून उच्च शिक्षण अभ्यासक्रम कसा असावा याची दृष्टी मिळाली, शिकविण्याच्या पद्धती कशा असाव्यात, आधुनिक काळात विद्यार्थ्यांना कोणकोणत्या सुविधा द्यायला पाहिजेत, इन्फ्रास्ट्रक्चर कसे असावे, प्रशासन कसे असावे, परीक्षा पद्धत कशी असावी याबद्दल एक दृष्टी आली. विद्यार्थ्यांचा पाठिंबापण महत्वाचा असतो. विद्यार्थ्यांच्या आकांक्षा काय आहेत, त्या कशा पूर्ण करायच्या हा ही महत्वाचा विषय या दौर्‍यात समजला. कारण या व्यवस्थेतला विद्यार्थी हा एक महत्वाचा घटक असतो. नॅक कमिटीच्या अपेक्षा समजून घेऊन त्यावर अभ्यास करून निर्णय घेतले. नियोजन केले. या काळात UGC ने पण स्वायत्तता दिली. तसेच पुणे विद्यपीठा कडून २०१४ ला बेस्ट कॉलेज आवर्ड म्हणून गौरव झाला.

यानंतर सरांनी २०१७ पासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू म्हणून साडेचार वर्षे पदभार सांभाळला. MES मध्ये जे चांगलं काम केलं, त्याची ही पोचपावती मिळाली असे सरांना वाटते. कॉमर्स चा पहिला प्र-कुलगुरू होण्याचा मान सरांना मिळाला. ही नियुक्ती म्हणजे पत्नी महानंदा आणि मी- आमच्या जीवनातला सर्वात आनंदाचा क्षण हाच होता, असे सर म्हणतात.

कोविड काळ सर्वांनाच काहीतरी शिकवून गेला. विद्यापीठही त्याला अपवाद नव्हते. उपचारांसाठी प्रारंभी रोग्याची चाचणी ही मोठीच समस्या होती. आवश्यक ती यंत्रणा उभी करून कोविड टेस्टिंग प्रयोगशाळा उभी केल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठातील टेक्नॉलॉजी विभागाने व्हेंटीलेटर निर्मितीसुद्धा केली. सर्व्हे घेतले, या काळात जागृती निर्माण केली, शिक्षणाशिवाय अशी विधायक कामे सुद्धा विद्यापीठाने या काळात केली. प्रशासन, कर्मचारी, प्राध्यापक आणि त्यांच्यावरील कामाचा ताण, विद्यार्थ्यांसकट सर्वांच्या वाढलेल्या अपेक्षा विचारात घेऊन आत्मियतेने त्यावर तोडगा काढावा लागतो. समस्या कालही होत्या, आजही असणारच”. संवादावर सरांचा भर असतो. “कुलगुरू आणि मी असे दोघांनी मिळून विद्यापीठ आपले एक कुटुंब आहे अशा नात्याने एकत्र सांभाळले, त्याचे खूप समाधान वाटते”. असे सर म्हणतात.

जाता जाता त्यांनी नवीन शैक्षणिक धोरण चांगलं असल्याच सांगितले. पुणे विद्यापीठाचे मोठे नाव आहे. संविधानिक मूल्ये जोपासण्यासाठी, लोकशाही अधिकाधिक बलशाली करण्यासाठी, तसेच ज्ञान निर्मितीद्वारे संपत्ती निर्माण करण्यासाठी उच्चशिक्षणाचा पसारा भरभक्कम असणे अत्यंत आवश्यक आहे. शासनाच्या सक्रिय आर्थिक सहभागाशिवाय उच्च शिक्षणाची आव्हाने पेलणे अशक्य आहे असेही ते म्हणाले.

सरांना ट्रेकिंगची आवड आहे. २००५ पासून आजपर्यन्त नियमितपणे दर रविवारी सर सिंहगड चढतात. त्यांचे महाराष्ट्रातील सर्व महत्वाचे किल्ले चढून झाले आहेत. मार्च २०२३मध्ये भूतानमधला टायगर नेस्ट ट्रेक त्यांनी केला. ट्रेकमुळे आपण ताजे तवाने होतो, कुठलाही ताण येत नाही, आत्मविश्वास वाढतो, व्यायाम होतो, स्ट्रेस टेस्ट आपोआपच होते आपली ! तर ग्रामीण साहित्य सरांना वाचायला आवडते. मराठीत व्यंकटेश माडगूळकर आणि इंग्रजीत आर. के. नारायण हे त्यांचे आवडते साहित्यिक. प्रामाणिकपणा आणि योग्य दिशेने कष्ट करत राहणं हा मंत्र सर सर्वांना देतात.

शैक्षणिक क्षेत्रात सर्वांना सामावून घेणारे, सामाजिक भान ठेवणारे, नेहमीच सर्वांना उत्तमोत्तम कामाची प्रेरणा देणारे, प्रगती करण्याची उर्मी देणारे नेतृत्व असेच त्यांचे व्यक्तिमत्व आहे. बा.भ. बोरकरांची कविता ‘लावण्य रेखा’ याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

देखणे ते हात ज्यांना, निर्मितीचे डोहळे |
मंगलाने गंधलेले, सुंदराचे सोहळे |

देखणी ती पाऊले जी, ध्यासपंथे चालती |
वाळ्वंटातूनीसुध्दा, स्वस्तिपद्मे रेखिती |

अध्यापनाचा ध्यास घेऊन त्याच मार्गावर यशस्वीपणे चालत राहिलेले उमराणी सर या महिन्यात लौकीकार्थाने निवृत्त होत आहेत. पण त्यांचा सामाजिक कामाचा ध्यास त्यांना निवृत्त होऊ देणार नाही. म्हणूनच पुढच्या योजलेल्या कामासाठी सरांना अनेक शुभेच्छा !(ही मुलाखत 29 मे 23 ला ई-विवेक व साप्ताहिक विवेक मध्ये प्रसिद्ध झाली.)

लेखन- डॉ. नयना कासखेडीकर, पुणे .

------------------------------

Monday 15 May 2023

स्वामी विवेकानंद,एक महान यात्रिक,विचार – पुष्प, भाग ६८

 

उत्तरार्ध

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा,

प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका

विचार – पुष्प, भाग ६८

 स्वामी विवेकानंद,एक महान यात्रिक


       रामकृष्ण मिशन चे काम सुरू झाले. स्वामीजिंचा प्रवास, भेटीगाठी, काम वाढवण्याच्या दृष्टीने सुरूच होता. भारतात भारतीय शिष्य आणि परदेशी शिष्य काम करत होतेच. पण परदेशातील शिष्य यांच्याशी पण पत्रव्यवहाराने संपर्क होत होता. सतत मार्गदर्शन चालू होते, काश्मीर, पंजाब, खेतडी, नैनिताल, कलकत्ता, आल्मोरा, अमरनाथ, मायावती, पूर्व बंगाल असं सगळीकडे संचार झाला. त्याच प्रमाणे पुन्हा एकदा दीड वर्षे ते पाश्चात्य देशांचा प्रवास करून परतले. बेलूर मठात पोहोचल्यावर मन प्रसन्न झाले. एक दिवस विश्रांती झाल्यानंतर एकेक वृत्तान्त कळू लागला. आपल्या कार्यासाठी ज्यांनी स्वतच्या देशाचा त्याग केला आणी आपल्या हिमालयासारख्या दुर्गम भागात राहून मोठ्या कष्टाने अद्वैत आश्रम उभा केला. आपले एक स्वप्न साकार केले ते सेव्हियर पती पत्नीने. त्यातले स्वत: सेव्हियर कार्य करता करताच निधन पावले, तर गुडविन आधीच गेले होते. या दोन इंग्रज शिष्यांनी भारतमातेच्या चरणी आपली जीवनपुष्पे वाहिली, याचे स्वामीजींना दु:ख झाले. मिसेस सेव्हियर मायावतीला होत्या, त्यांचे ताबडतोब सांत्वन करायला गेले पहिजे आणि तशी तार त्यांनी मिसेस सेव्हियर यांना केली. प्रकृती ठीक नसतानाही स्वामीजी प्रतिकूल हवामान व परिस्थितीत ,गैरसोयीचा प्रवास असतानाही ते शिष्यांबरोबर गेले.   

मदतीशिवाय त्यांना चालणेही कठीण झाले. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला,  त्यावर बरोबर असलेल्या  विरजानंदाना ते म्हणाले, “पहा मी किती दुबळा आहे जणू वृद्ध होऊन गेलो आहे. हे एव्हढेसे चालायचे आहे तेही मला बिकट वाटते आहे, पूर्वी पर्वत प्रदेशात २५- २५ मैल चालायलाही काही वाटायचे नाही. माझ्या आयुष्याचा शेवट जवळ येत चालला आहे हेच खरं”. ते ऐकून विरजानंद मनातून हादरून गेले. मिसेस सेव्हियरना भेटणे आपले कर्तव्य आहे म्हणून हा खडतर प्रवास ते करत होते.मिसेस सेव्हियर ने आपले दु:ख बाजूला ठेऊन स्वामीजींचे स्वागत केले. पतीच्या निधनाचे दु:ख मोठे असतानाही आपण घेतलेले व्रत चालूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले, मायावतीला स्वामीजी पंधरा दिवस राहिले. सेव्हियर पती पत्नी ने  इथे अद्वैत आश्रमाचे काम मार्गी लावले होते. इथल्या वास्तव्यात अनेकजण स्वामीजींना भेटायला येऊन गेले. मायावती हून स्वामीजी कलकत्त्याला निघाले, बेलूर मठात आल्यावर आणखी एक धक्कादायक वृत्त समजले ते म्हणजे खेतडीचे राजा अजित सिंग यांचे अपघाती निधन झाले. या अकस्मात दुर्घटनेमुळे स्वामीजीना मोठा धक्का बसला. राजा अजित सिंग हा त्यांचा मोठा आधार होता.

     बेलूरला आल्यावर मठाच्या व्यवस्थेतील काही कायदेशीर पूर्तता आणि विश्वस्त मंडळ करून घेतले. ब्रह्मानंद ,शिवानंद, प्रेमानंद, सारदानंद, अखंडानंद, त्रिगुणातीतानंद, रामकृष्णानंद, अद्वैतानंद, सुबोधानंद, अभेदानंद, आणि तुरियानंद यांचे विश्वस्त मंडळ करून त्यांच्यावर कारभार सोपवला, यात त्यांनी एकही पाश्चात्य शिष्य घेतला नाही, ते दुरदृष्टीने कायदेशीर गुंतागुंत होऊ नये म्हणून. ६ फेब्रुवारीला रीतसर नोंदणी करण्यात आली. विवेकानंदांनी कोणतेही अधिकार पद स्वीकारले नाही. स्वत:च्या मालकीच्या जागेत रामकृष्ण संघाचे काम आले. भारताच्या इतिहासात एक नवे पान उघडले गेले होते, स्वामीजींनि पाहिलेले स्वप्न साकार झाले होते. फेब्रुवारीत रामकृष्ण परमहंस यांचं जन्मदिन बेलूर मठात साजरा झाला तेंव्हाही स्वामीजीना खूप समाधान वाटले.

   त्यानानंतर त्यांनी पूर्व बंगालचा प्रवास आखला आणि आई भुवनेश्वरी देविंची इच्छा पण पूर्ण करावी असे मनात होते. बंगालच्या या सुपुत्राने एकदा तरी आपल्या गावात यावे अशी तिथल्या लोकांची इच्छा होती. चंद्रनाथ आणि कामाख्यादेवी ही  तीर्थ क्षेत्रे भुवनेश्वरी देविंच्यासह स्वामिजिनी केली आणि आईसाठी काही केल्याचे समाधान त्यांना होते. या यात्रेत तिथल्या भेटी, स्वागत, आपल्या मुलाबद्दल लोकांचे प्रेम आणि आदर पाहून भुवनेश्वरी देविंना मनोमन समाधान वाटले. हाच तो आपला लहान बिले ना ? असे नक्की वाटले असेल.

पूर्व बंगाल आणि आसामचा हा प्रवास दोन महिन्यांचा झाला आणि स्वामीजींची प्रकृती आणखीनच ढासळली ,विश्रांती नाही, सतत कामाचा ताण यामुळे दम्याचा त्रास आणखीन बळावला .आपलं अखेरचा क्षण जवळ आला की के अशी शंका स्वामीजींच्या मनात डोकावली. प्रवासात ते अनेकांना पत्र लिहीत असत. अधून मधून जरा बारे वाटले की लगेच उत्साहाने पुढचे नियोजन करीत. एकदा त्यांचे शिष्य शरदचंद्र चक्रवर्ती भेटले तेंव्हा त्यांनी सहज प्रकृती बद्दल विचारले, तर स्वामीजी म्हणाले, “ अरे बाबा आता प्रकृतीची चौकशी कशाला करायची? प्रत्येक दिवशी शरीराचा व्यापार बिघडत चालला आहे. जे काही आयुष्याचे थोडे दिवस आता राहिले आहेत ते मी तुम्हा सर्वांसाठी काहीना काही करण्यात घालवेन आणि असा कार्यमग्न असतानाच एके दिवशी या जगाचा निरोप घेईन”.

'दुर्गापूजा उत्सव' बंगाल मधला महत्वाचा उत्सव, आता स्थिरावलेल्या बेलूर मठात दुर्गा पूजा व्हावी असे सगळ्यांच्याच मनात आले. स्वामीजींच्या अंगात बराच ताप होता. श्री दुर्गा प्रतिष्ठापना झाली होती. अष्टमीला मुख्य पूजेला स्वामीजी कसेबसे आले. नवमीला थोडे बरे वाटले तेंव्हा देवीसमोर त्यांनी काही भजने म्हटली. श्रीरामकृष्ण यांची आवडती भजने त्यांनी गायली. हे पाहून भुवनेश्वरी देवींना बरे वाटले. बरोबर केलेल्या  तीर्थयात्रेपासूनच त्यांना माहिती होते की आपल्या मुलाची प्रकृती अलीकडे ठीक नसते. त्याला भेटायला त्या मधून मधून मठात येत असत. आल्यावर बाहेरूनच ‘बिले..’ अशी हाक मारत आणि विश्वविख्यात बिले, संन्यासीपुत्र नरेन आईची हाक आल्यावर भरभर खाली येइ. दोघांच्या गप्पा होत. मग त्या परत जात.  

एकदा नरेंद्र लहान असताना आजारी पडला, तेंव्हा तो बरा व्हावा म्हणून बोललेला देवीचा नवस आपल्याकडून पूर्ण करायचा राहिला हे अनेक वर्षानी लक्षात आले. तेंव्हा आता कालीमातेला जाऊन, विशेष पूजा करून मुलाला तुझ्यासमोर लोळण घ्यायला सांगेन असा तो, आता पूर्ण करायला हवा. आईची इच्छा पूर्ण करायची म्हणून विवेकानंद बरे नसतानाही गंगेत स्नान करून कालिघाटावर ओल्या वस्त्रानिशी मंदिरात गेले. पूजा केली, तीन वेळा  लोळण घेतली, गाभाऱ्याला सात प्रदक्षिणा घातल्या. विधिपूर्वक होम हवन केले. आईला खूप समाधान झाले आणि इतक्या वर्षानी नवस पूर्ण झाल्याचा आनंद पण.

साधारण २८ जून चा दिवस, शुद्धानंदाना विवेकानंद यांनी पंचांग घेऊन बोलावले आणि ते चाळून, तिथी पाहून ठेऊन घेतले. नंतर ची ४,५, दिवस रोज ते पंचांग चाळायचे आणि स्वत:शीच काही विचार करायचे ,बाकी सर्व रोजचे व्यवहार नेहमीप्रमाणे चालू होते. १ जुलैला विवेकानंद, मठाच्या बाहेर हिरवळीवर फेऱ्या मारत होते. त्यावेळी प्रेमानंदाना एका  जागेकडे बोट दाखवून म्हणाले, “माझ्या मृत्यूनंतर या ठिकाणी माझे दहन करा”. अंत्यसंस्काराचा एव्हढा स्पष्ट उल्लेख केलेला कोणाच्याच लक्षात आला नाही.

२ जुलै बुधवार – एकादशी, विवेकानंदांनी शास्त्रोक्त पद्धतीने उपवास केला होता. त्या दिवशी भगिनी निवेदिता बेलूर मठात स्वामीजींना भेटण्यास आल्या होत्या. त्यांच्यासाठी काही पदार्थ विवेकानंदांनी मागवले, हात धुण्यासाठी निवेदिता उठल्या तेंव्हा स्वामीजींनी त्यांच्या हातावर स्वत पाणी घातले, एक पंचा घेऊन हात पुसले. हे पाहून निवेदिता खजील झाल्या. त्या म्हणाल्या, "स्वामीजी हे मी तुमच्यासाठी करायचे तर तुम्हीच..?" स्वामीजी म्हणाले,  का? जिझसने तर आपल्या शिष्यांच्या पायांवर पाणी घातले होते ना? . पण ती त्यांची अखेरची वेळ होती असे निवेदिता म्हणणार पण आवंढा गिळला. कदाचित ही शेवटची वेळ..?ही खरचच दोघांची अखेरची भेट ठरली .

४ जुलैचा दिवस उजाडला. शुक्रवार, नेहमीपेक्षा स्वामीजी लवकर उठले. ध्यानसाठी देवघरात गेले. दारे खिडक्या बंद केल्या. तीन तास एकटे खोलीत होते. त्यानंतर दार उघडून बाहेर येताना कालिमातेचे गीत गुणगुणत बाहेर आले.श्री रामकृष्ण यांच्या प्रतिमेसमोर बसून इतका वेळ ध्यान मग्न झालेले विवेकानंद स्वतच्याच नादात मुग्ध असे बाहेर येऊन फेऱ्या मारू लागले ,इतरत्र कुठेही लक्ष नव्हते. सकाळी पण अतिशय प्रसन्नपणे हसत खेळत सर्वांच्या बरोबर अल्पोपहार घेतला होता . आणि आज आपल्याला उत्साह वाटतोय असेही म्हणाले होते. दुपारच्या जेवणानंतर तीन तास संस्कृत व्याकरणाचा वर्ग त्यांनी घेतला. दुपारनंतर प्रेमानंदांच्या बरोबर बेलूर मध्ये तीन किलोमीटर लांब पर्यन्त फेरफटका मारून आले.आल्यावर संन्यासांशी गप्पा झाल्या.

आल्यावर खोलीत जाऊन आपली जपमाळ मागवून घेतली, तासभर जप झाला. मग अंथरुणावर आडवे झाले उकडते आहे म्हणून थोडा वारा घालण्यास शिष्याला सांगितले.थोडे तळपाय चोळले तर बरे वाटेल म्हणून तेही शिष्याने चोळले. डाव्या कुशीवर वळलेले, हातात जपमाळ तशीच, पाठोपाठ दोन वेळ दीर्घ श्वास घेतला. नंतर काही हालचाल नाही. नऊ वाजले होते, जेवणाची घंटा वाजली. जवळचा शिष्य घाबरत घाबरत खाली आला. प्रेमानंद आणि निश्चयानंद वर धावत आले. रामकृष्ण यांचे नाव घेतले तर ही दीर्घ समाधी उतरेल स्वामीजींची, असे वाटले, पण नाही, डॉक्टर महेंद्रनाथ मजुमदार यांना बोलावले गेले. मध्यरात्री पर्यन्त बरेच प्रयत्न केले. प्राणज्योत मालवली आहे हे डॉक्टरांचे शब्द ऐकून सारा बेलूर मठच दु:खाच्या छायेत गेला.

स्वामीजींचे वय यावेळी ३९ वर्ष, ५ महीने, आणि २४ दिवस इतके होते. सगळीकडे वाऱ्या सारखी बातमी गेली. भारतात, परदेशात तारा  गेल्या. बेलूर मठाकडे चारी दिशांनी दर्शनासाठी लोंढे येऊ लागले. भुवनेश्वरी देवी पण आल्या. त्यांचा अवखळ बिले अवखळपणेच साऱ्या जगात फिरून येऊन आता शांतपणे पहुडला होता. भले जगासाठी तो कीर्तीवंत असला, तरी या जन्मदात्रीचा तो पुत्र होता. पुत्रवियोगाने तिच्या हृदयाला किती घरे पडले असतील? शब्दच नाहीत.   

बिल्व वृक्षाची जागा प्रेमानंदाना विवेकानंद यांनी ४,५ दिवसांपूर्वीच दाखवली होती. तिथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. भारताच्या या महान, असामान्य, अलौकिक सुपुत्राची ही जीवनयात्रा. (मालिका समाप्त)

-       © डॉ. नयना कासखेडीकर

------------------------------------- 

रामकृष्ण संघाची स्थापना,विचार – पुष्प, भाग ६७

 

उत्तरार्ध

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा,

प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका

विचार – पुष्प, भाग ६७

रामकृष्ण संघाची स्थापना

      स्वामी विवेकानंद कलकत्त्यात होते, बंगालमध्ये उत्साहाचे वातावरण होते, योगायोगाने श्रीरामकृष्णांचा जन्मदिवस ७ मार्च ला होता. पश्चिमेकडून विवेकानंद नुकतेच आल्यामुळे हा दिवस मोठ्या प्रमाणात दक्षिणेश्वरच्या कालीमंदिरात साजरा करण्यात आला, प्रचंड गर्दी. गुरुबंधु बरोबर विवेकानंद कालीमातेचे दर्शन घेऊन  श्रीरामकृष्णांच्या खोलीकडे वळले, ते ११ वर्षानी या खोलीत पाऊल ठेवत होते. मनात विचारांचा कल्लोळ होता. १६ वर्षांपूर्वी येथे प्रथम आल्यापासून ते आज पर्यन्त गुरु श्रीरामकृष्णांबरोबर चे दिवस, घडलेल्या अनेक घटना, प्रसंग आणि मिळालेली प्रेरणा-ते, हिंदू धर्माची पताका जगात फडकवून मायदेशी परतलेला नरेंद्र आज त्याच खोलीत उभा होता. त्यांच्या डोळ्यांसमोरून या कालावधीचा चित्रपटच सरकून गेला.

   या वास्तव्यात विवेकानंद यांना अनेकजण भेटायला येत होते. काही जण फक्त दर्शन घ्यायला येत. काहीजण प्रश्न विचारात, काही संवाद साधत. तर कोणी त्यांचा तत्वज्ञानावरचा अधिकार पारखून घ्यायला येत. एव्हढे सगळे घडत होते मात्र स्वामी विवेकानंद यांना आता खूप शीण झाला होता. थकले होते ते.परदेशातील अखंडपणे चाललेले काम आणि प्रवास ,धावपळ, तर भारतात आल्यावरही आगमनाचे सोहळे, भेटी, आनंद लोकांशी सतत बोलणे यामुळे स्वामीजींची प्रकृती थोडी ढासळली . त्याचा परिणाम म्हणजे मधुमेय विकार जडला. आता त्यांचे सर्व पुढचे कार्यक्रम रद्द केले. आणि केवळ विश्रांति साठी दार्जिलिंग येथे वास्तव्य झाले.   

 त्यांना खरे तर विश्रांतीची गरज होती पण डोळ्यासमोरचे ध्येय गप्प बसू देत नव्हते. कडक पथ्यपाणी सांभाळले, शारीरिक विश्रांति मिळाली, पण मेंदूला विश्रांति नव्हतीच, त्यांच्या डोळ्यासमोर ठरवलेले नव्या स्वरूपाचे प्रचंड काम कोणावर सोपवून देणे शक्य नव्हते.

   मात्र हिमालयाच्या निसर्गरम्य परिसरात साग, देवदारचे सुमारे दीडशे फुट उंचीचे वृक्ष, खोल दर्‍या, समोर दिसणारी बर्फाच्छादित २५ हजारांहून अधिक उंचीच्या डोंगरांची रांग, २८ हजार फुटांपेक्षा जास्त ऊंच असलेले कांचनगंगा शिखर, वातावरणातील नीरव शांतता, क्षणाक्षणाला बदलणारी आकाशातली लाल निळ्या जांभळ्या रंगांची उधळण, अशा मन उल्हसित आणि प्रसन्न करणार्‍या निसर्गाच्या सान्निध्यात स्वामीजी राहिल्यामुळे त्यांना मन:शान्ती मिळाली, आनंद मिळाला, बदल ही पण एक विश्रांतीच होती. एरव्ही पण आपण सामान्यपणे, “फार विचार करू नकोस, शांत रहा”, असे वाक्य एखाद्या त्रासलेल्याला समजवताना नेहमी म्हणतो. पण ही मनातल्या विचारांची प्रक्रिया थांबवणे शक्य नसते. शिवाय स्वामीजींसारख्या एखाद्या ध्येयाने झपाटलेल्या व्यक्तिला कुणीही थांबवू शकत नाही. त्यात स्वामीजींचे कार्य अजून कार्यान्वित व्हायचे होते. त्याचे चिंतन करण्यात त्यांनी मागची अनेक वर्षे घालवली होती. आता ते काम उभे करण्याची वेळ आली होती.

    संस्था! एक नवी संस्था, ब्रम्हानंद आणि इतर दोन गुरुबंधु यांच्या बरोबर स्वामीजी संबंधीत विचार करून तपशील ठरवण्याच्या कामी लागले होते. येथे दार्जिलिंगच्या वास्तव्यात आपल्या संस्थेचे स्वरूप कसे असावे याचा आराखडा केला गेला. युगप्रवर्तक विवेकानंदांना आजच्या काळाला सुसंगत ठरणारी सेवाभावी, ज्ञानतत्पर, समाजहित वर्धक, शिस्त आणि अनुशासन असणारी अशी संन्याशांची संस्था नव्हे, ऑर्गनायझेशन बांधायची होती. त्याची योजना व विचार सतत त्यांच्या डोक्यात होते. ही एक क्रांतीच होती, कारण भारताला संन्यासाची हजारो वर्षांची परंपरा होती. आध्यात्मिक जीवनाचे आणि सर्वसंगपरित्याग करणार्‍या संन्याशाचे स्वरूप विवेकानंद यांना बदलून टाकायचे होते.

     दार्जिलिंगहून १ मे १८९७ रोजी स्वामीजी कलकत्त्याला आले. तेथे त्यांनी श्रीरामकृष्णांचे संन्यासी शिष्य आणि गृहस्थाश्रमी भक्त यांची बैठक बोलवून संस्था उभी करण्याचा विचार सांगितला. पाश्चात्य देशातील संस्थांची माहिती व रचना सांगितली. आपण सर्व ज्यांच्या प्रेरणेने हे काम करीत आहोत त्या श्रीरामकृष्णांचे नाव संस्थेला असावे असा विचार मांडला. श्रीरामकृष्ण यांच्या महासमाधीला दहा वर्षे होऊन गेली होती. या काम करणार्‍या संस्थेचे नाव रामकृष्ण मिशन असे ठेवावे, आपण सारे याचे अनुयायी आहोत. हा त्यांचा विचार एकमताने सर्वांनी संमत केला.

     पुढे संस्थेचे उद्दिष्ट्य, ध्येयधोरण ठरविण्यात आले.आवश्यक ते ठराव करण्यात आले, श्री रामकृष्णांनी आपल्या जीवनात ज्या मूल्यांचे आचरण केले, आणि मानव जातीच्या भौतिक आणि आध्यात्मिक कल्याणचा जो मार्ग दाखविला त्याचा प्रसार करणे हे संस्थेचे मुख्य ध्येय निश्चित करण्यात आले. संस्थेचे ध्येय व कार्यपद्धती आणि व्याप्ती निश्चित केल्यावर पदाधिकारी निवडण्यात आले. विवेकानंद,रामकृष्ण संघाचे पहिले अध्यक्ष निवडले गेले.आध्यात्मिक पायावर उभी असलेली एवभावी आणस्था म्हणून १९०९ मध्ये रीतसर कायद्याने नोंदणी केली गेली. विश्वस्त मंडळ स्थापन झाले. खूप काम वाढले, शाखा वाढल्या, शिक्षण, रुग्णसेवा ही कामे वाढली, १२ वर्षे काळ लोटला. आता थोडी रचना बदलण्यात आली. धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात काम करणारी ती रामकृष्ण मठ आणि सेवाकार्य करणारी ती संस्था रामकृष्ण मिशन अशी विभागणी झाली. या कामात तरुण संन्याशी बघून अनेक तरुण या कामाकडे आकर्षित होत होते, पण अजूनही तरुण कार्यकर्ते संन्यासी कामात येणे आवश्यक होते. नवे तरुण स्वामीजी घडवत होते. या संस्थेतील संन्याशाचा धर्म, आचरण, दिनचर्या, नियम, ध्यान धारणा, व्यायाम,शास्त्र ग्रंथाचे वाचन, त्या ग्रंथाचे रोज परीक्षण समाजवून सांगणे, तंबाखू किंवा कुठलाही मादक पदार्थ मठात आणू नये. अशा नियमांची सूची व बंधने घालण्यात आली. त्या शिवाय प्रार्थना, वर्षिक उत्सव, विविध कार्यक्रमांची योजना ,अशा सर्व नियमांची आजही काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते.     

स्वामी विवेकानंद यांच्या या संस्थेचे बोधवाक्य होते || आत्मनो मोक्षार्थ जगद्धिताय च ||

आज शंभर वर्षे  आणि वर १४ वर्षे अशी ११४ वर्षे हे काम अखंडपणे सुरू आहे.  (क्रमश:)  

   -  डॉ.नयना कासखेडीकर  

---------------------------- 

Friday 5 May 2023

विचार – पुष्प ,भाग ६६ याची देही याची डोळा ..

 

उत्तरार्ध 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा,

प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका

विचार – पुष्प ,भाग ६६

याची देही याची डोळा ..


 भारतभूमीवर पाऊल ठेवले आणि स्वामीजींचे स्वागत सोहोळे व स्वामीजींना भेटायला
, पाहायला येणार्‍यांची ही गर्दी या वातावरणाने सारा प्रदेश भारून गेला होता. २७ जानेवारीला स्वामीजी जाफन्याहून पांबन येथे आले. ते रामनाद संस्थानमध्ये उतरले. संस्थांनचे राजे भास्कर सेतुपती स्वत: स्वामीजींना सन्मानपूर्वक घेऊन आले.आल्या आल्याच स्वामीजींना त्यांनी व सर्व अधिकार्‍यानी साष्टांग नमस्कार केला. खास शामियान्यात औपचारिक स्वागत झालं.विवेकानंदांनी सर्वधर्म परिषदेला शिकागोला जावे म्हणून प्रयत्न करणार्‍यात राजे भास्कर सेतुपती होते. स्वागत समारंभा ठिकाणी घोडा गाडीने नेण्यात येत असताना लगेचच गाडीचे घोडे काढून लोकांनी स्वता ती गाडी ओढली आणि एव्हढेच काय स्वत: राजे सुद्धा गाडी ओढण्यात सहभागी झाले होते. स्वामीजींबद्दल एव्हढा आदर सर्वांनी दाखवला. एका संस्थांनाचा अधिपति एका संन्याश्याची गाडी ओढत होता हे दृश्य प्राचीन परंपरेची आठवण करून देत होते.

पांबन नंतर ते रामेश्वरला गेले. स्वामीजी स्वागताला उत्तर देण्यासाठी भाषणकर्ते झाले. त्यांच्या इंग्रजी भाषणाचे तमिळ भाषेत रूपांतर करून उपस्थितांना सांगण्यात येत होते. सर्वश्रेष्ठ धर्मपुरुषाचा सन्मान मंदिरातील पुजारी व व्यवस्थापक यांनी केला. सजवलेले ऊंट, हत्ती, घोडे असलेली मिरवणूक काढून रामेश्वर मंदिरापर्यन्त नेण्यात आली. इथल्या भाषणात त्यांनी सांगितले की, “केवळ मूर्तिपूजा करण्यापेक्षा दरिद्री माणसाला दोन घास अन्न आणि अंग झाकण्यासाठी वस्त्र देणे हाच खरा धर्म आहे”.

    रामेश्वर नंतर रामनाद च्या सीमेवर जोरदार स्वागत करण्यात आले. स्वामीजींच्या आगमनार्थ तोफांची सलामी दिली, भुईनळे आतषबाजी केली, 'हर हर महादेव' च्या प्रचंड घोषणा देण्यात आल्या. रामनाद चे राजे स्वता स्वामीजींच्या गाडी समोर पायी चालत होते, पुढे पुढे तर स्वामीजींना घोडागाडीतून ऊतरवून, सजवलेल्या पालखीत बसविण्यात आले, भाषणे झाली, नक्षीकाम केलेल्या सोन्याच्या करंडकातून स्वामिजींना मानपत्र अर्पण केले गेले. सत्कारादाखल उत्तर देताना स्वामीजी म्हणाले, “प्रदीर्घ कालावधीची रात्र संपत आहे, अत्यंत क्लेशकारक दु:ख मावळू लागले आहे, मृतप्राय वाटणार्‍या शरीरात नवी चेतना जागी होत आहे, जाग्या होणार्‍या या भारताला आता कोणी रोखू शकणार नाही, तो पुन्हा निद्रित होणार नाही, बाहेरची कोणतीही शक्ति त्याला मागे खेचू शकणार नाही. अमर्याद सामर्थ्य असणारी ही भारतभूमी आपल्या पायांवर ताठ उभी राहत आहे”. केवळ या सुरुवातीच्या स्वागतासाठी उत्साहाने जमलेल्या स्वदेशातील बांधवांकडे बघून स्वामीजींना एव्हढा विश्वास वाटला होता. आणि आपला देश आता पुढे स्वत:च्या बळावर ताठपणे उभा राहील अशी खात्री त्यांना वाटली होती. एका निष्कांचन संन्याशाचा उत्स्फूर्तपणे होणारा गौरव ही स्वामीजींच्या जगातील कामाची पावती होती.

     रामनाद सोडल्यानंतर स्वामी विवेकानंद मद्रासच्या दिशेने रवाना झाले. आतापर्यंत छोट्या छोट्या शहरात व गावातील उत्साह आणि आनंद एव्हढा होता, आता तर मद्रास सारख्या मोठ्या शहरात मोठ्या लोकवस्तीच्या ठिकाणी भव्य सोहळे होणार होते. रामनाद, परमपुडी, मानमदुराई,मीनाक्षी मंदिरचे मदुराई, तंजावर असे करत स्वामीजी कुंभकोणमला आले.कुम्भकोणम नंतरच्या एका रेल्वे स्थानकावर गाडी थांबणार नव्हती तिथेही लोक स्वामीजींना बघायला आणि एकदा तरी त्यांचे दर्शन घ्यायला प्रचंड प्रमाणात जमले होते. गाडी थांबणार नाही असे दिसताचा लोक रेल्वे रुळांवर आडवे झाले आणि गाडी थांबवावी लागली तेंव्हा स्वामीजी डब्यातून बाहेर येऊन शेकडो लोकांनी  केलेले स्वागत स्वीकारले, छोटेसे भाषण केले. त्यांच्याप्रती आदर दाखवला.

        कुंभकोणमहून स्वामीजी मद्रासला आले. हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करण्यासाठी स्वामीजींनी अमेरिकेला जावे यासाठी मद्रास मध्ये खूप प्रयत्न केले गेले होते. त्यामुळे पाश्चात्य देशात उदंड किर्ति मिळवून वेदांतचा प्रचार करून आलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या स्वागताची तयारी खूप आधीपासून केली होती, एक स्वागत समिति स्थापन करण्यात आली होती. पद्धतशीरपणे  नियोजन केले गेले होते. वृत्तपत्रातून लेख प्रसिद्ध केले गेले. स्वामीजींच्या धडक स्वागत समारंभाची  वृत्ते प्रसिद्ध होत होती. त्यांनी पाश्चात्य देशात केलेल्या कामांवर अग्रलेख लिहिले गेले. विविध शाळा, संस्था, महाविद्यालये बाजारपेठा सार्वजनिक ठिकाणे येथे स्वामीजींना बोलावण्याचा धडाका सुरू होता. मद्रासमध्ये रस्ते, विविध १७ ठिकाणी कमानी, फलक, पताका यांची सजावट असे उत्सवी वातावरण होते. एगमोर स्थानकावर उतरल्यावर (६ फेब्रुवारी १८९७)  स्वागत समितीने स्वागत केले. घोष पथकाने स्वागतपर धून वाजविली. मिरवणूक काढण्यात आली. दुतर्फा लोक जमले होते, मोठ्या संख्येने स्त्रिया, मुले, प्रौढ, असे सर्व सामान्य नागरिक ते सर्व क्षेत्रातील नामवंत मंडळी आवर्जून उपस्थित होती.

स्वामीजींचा मद्रासमध्ये ९ दिवस मुक्काम होता. अनेक कार्यक्रम झाले. वेगवेगळ्या भाषेतील २४ मानपत्रे त्यांना देण्यात आली. खेतडीचे राजा अजितसिंग यांनी मुन्शी जगमोहनलाल यांच्याबरोबर स्वागत पत्र पाठवले होते. कोणी स्वागतपर संस्कृत मध्ये कविता लिहून सादर केली.

७ फेब्रुवारीला मद्रास मध्ये विक्टोरिया हॉल मध्ये मद्रास शहराच्या वतीने स्वामीजींचा मोठा सत्कार समारंभ झाला. जवळ जवळ दहा हजार लोक उपस्थित होते. असे सत्कार स्वामीजींनी याची देही याची डोळा अनुभवले, लोकांचे प्रेम आणि असलेला आदर अनुभवला. पण मनात, शिकागो ल जाण्यापूर्वी आणि शिकागो मध्ये गेल्यावर सुद्धा ब्राम्हो समाज आणि थिओसोफिकल सोसायटीने जो विरोध केला होता, असत्य प्रचार केला होता, वृत्तपत्रातून लेख, अग्रलेख यातून स्वामीजींची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला होता त्याचे शल्य होतेच, त्याचे तरंग आता मनात उमटणे साहजिकच होते. यातील काही अपप्रचाराला उत्तर देण्याची खर तर संधी आता मिळाली होती आणि ती संधी स्वामीजींनी घेतली सुद्धा. त्यांनी भाषण करताना अनेक खुलासे केले. धर्म नाकारणार्‍या समाज सुधारकांचा परखड परामर्श घेतला. भारताचे पुनरुत्थान घडवायचे असेल तर त्याचा मूळ आधार धर्म असायला हवा असे विवेकानंद यांना वाटत होते. भारतातील सुधारणावाद्यांचा भर सतत धर्मावर आणि भारतीय संस्कृतीवर केवळ टीका करण्यावर होता ते स्वामीजींना अजिबात मान्य नव्हते. मद्रासला त्यांची या वेळी चार  महत्वपूर्ण प्रकट व्याख्याने झाली. एका व्याख्यानात त्यांनी म्हटले की, “आम्हाला असा धर्म हवा आहे की, जो माणूस तयार करील, आम्हाला असे विचार हवे आहेत की, जो माणूस उभा करतील”.

स्वामीजींचे मद्रासला आल्यावर जसे जोरदार स्वागत झाले तसे ते नऊ दिवसांनी परत जाताना त्यांचा निरोप समारंभसुद्धा जोरदार झाला. इथून ते कलकत्त्याला गेले. स्वामीजींचे मन केव्हढे आनंदी झाले असणार आपल्या जन्मगावी परतताना, याची कल्पना आपण करू शकतो. बंगालचा हा सुपुत्र त्रिखंडात किर्ति संपादन करून येत होता.                  

     कलकत्त्याला स्वागतासाठी एक समिति नेमली होती, अनेक जण ही धावपळ करत होते. कलकत्त्यातील सियालदाह रेल्वे स्थानकावर स्वागतासाठी वीस हजार लोक जमा झाले होते. फलाट माणसांनी फुलून गेला होता. त्यांच्या बरोबर काही गुरु बंधु, संन्यासी, गुडविन, सेव्हियर पती पत्नी, अलासिंगा पेरूमल, नरसिंहाचार्य या सगळ्यांचे स्वागत केले गेले. सनई चौघड्याच्या निनादात आणि जयजयकारांच्या घोषणेत स्वामीजींचे पुष्प हार घालून स्वागत केले गेले. यावेळी परदेशातून सुद्धा अनेक मान्यवरांनी गौरवपर पत्रे पाठवली, त्याचे ही वाचन झाले व सर्वांना ती वाटण्यात आली. केवळ चौतीस वर्षाच्या युवकाने आपल्या कर्तृत्वाची असामान्य छाप उमटवली होती, त्याने बंगाली माणसाची मान अभिमानाने उंचावली होती. रिपन महाविद्यालय, बागबझार,काशीपूरचे उद्यान गृह, आलम बझार मठ, जिथे गुरूंचे कार्य पुढे नेण्याचा संकल्प सारदा देवींसमोर सहा वर्षापूर्वी नरेंद्रने सोडला होता तिथे पाय ठेवताच आपण दिलेले वचन पुरे केले याचे समाधान स्वामीजींना वाटले, येथे रामकृष्णांनंद आणि अखंडांनंद यांनी दाराताच आपल्या नरेन चे स्वागत केले. पुजाघरात जाऊन श्रीरामकृष्णांना नरेन ने कृतार्थ होऊन अत्यंत नम्रतेने नमस्कार केला. नरेन ने ठाकूरांना नमस्कार केला तो क्षण गुरुबंधुना पण धन्य करून गेला. आता पुढच्या कार्याची आखणी व दिशा ठरणार होती. (क्रमश:) 

                    

-              -  डॉ.नयना कासखेडीकर   

----------------------------