Wednesday, 4 February 2026

शिल्पकार-बी आर खेडकर

                                                   

चरित्र नायक -शिल्पकार चरित्र कोश

शिल्पकार-बी आर खेडकर

१२ ऑगस्ट १९२६, मृत्यू १३ ऑगस्ट २०१६

 
                                       

ज्यांची स्मारकशिल्पे सर्वाधिक संख्येने महाराष्ट्रभर लागली आहेत असे शिल्पकार म्हणजे बी.आर. खेडकर. त्यांच्या आईचे नाव चंद्रभागा. खेडकरांच्या वडिलांचा गणपतीच्या मूर्ती व खेळणी बनविण्याचा व्यवसाय होता. लहानपणीच मातृ-पितृछत्र हरपल्याने वडीलबंधू दत्तोबा खेडकर यांनीच बी.आर. खेडकरांना वाढविले. घरातच मूर्तिकाम होत असल्याने त्यांना साहजिकच त्यात रस होता. शाळेत जाता-येता शिवाजी प्रिपरेटरी हायस्कूलच्या आवारातील शिवाजी महाराजांचा पुतळा ते तासन्तास न्याहाळत असत. ‘अशी भव्य मूर्ती आपल्याला कधी बनवता येईल’ हा ध्यास त्यांच्या बालमनाने घेतला आणि हीच त्यांच्या शिल्पसाधनेची सुरुवात ठरली. केवळ दुसर्या इयत्तेपर्यंत शालेय शिक्षण घेतलेल्या खेडकरांनी शिल्प किंवा चित्रकलेचे रीतसर शिक्षण न घेताच स्वत:ची कला विकसित केली.

खेडकर पुण्यात १९५०-१९५५ च्या दरम्यान गणेशाच्या सुबक मूर्ती, सजावटी, ऐतिहासिक, पौराणिक, राजकीय व सामाजिक विषयावरील देखावे व सजावटी करत. त्यामुळे त्यांना नावलौकिक मिळाला. पण यात ते समाधानी नव्हतेे. शिल्पकार करमरकरांनी केलेल्या शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याने त्यांच्या मनात घर केले होते. त्याचा प्रभाव इतका होता की, लहानपणी त्यांनी गणपतीची मूर्ती बनवली होती व तिला शिवाजी महाराजांचे तोंड लावले होते!

मूर्तिकामातून मिळणारे पैसे व गरिबी यांचा ताळमेळ बसत नव्हता. म्हणून त्यांनी सिनेमा क्षेत्रात, स्टूडिओतील सेटवर कलात्मक काम करण्याचे ठरविले. भालजी पेंढारकरांच्या पुण्यातील स्टूडिओत खेडकरांना नोकरी मिळाली. त्यानंतर प्रभात फिल्म कंपनीतल्या उमेदवारीच्या काळात दिग्दर्शक फत्तेलाल व मोल्डिंग विभागाचे सोनोपंत परदेशींनी त्यांना मोल्डिंग कौशल्यांबरोबर व्यवहारी जीवनासंबंधीही मोलाचे मार्गदर्शन केले. पुढे मुंबईच्या मोहन स्टूडिओत त्यांनी के. आसिफ यांच्याकडे नोकरी केली. तेथे खेडकर यांनी मुगल-ए-आझम या चित्रपटाचे भव्य सेट व शिल्पे तयार केली. याच वेळी त्यांनी सिनेसृष्टीला डमी पात्रासाठी मुखवटा तयार करण्याच्या तंत्राची ओळख करून दिली. यानंतर मात्र ते सिनेसृष्टीतील नावलौकिक व पैसा सोडून पुण्यात परतले व त्यांनी शिल्पकलेला वाहून घेतले.

                                            

१९६१ मध्ये घडविलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा हे खेडकरांचे पहिले शिल्प होय. हा पुतळा सातार्याला पवई नाका येथे आहे. आशिया खंडातला सर्वांत मोठा समजला जाणारा शिवाजी महाराजांचा साडेअठरा फुटांचा अश्वारूढ पुतळा कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र व अमेरिकेतील सॅन होजे येथील त्यांनी बनविलेले शिवाजी महाराज, संत बसवेश्वर, श्रीमंत बाजीराव पेशवे असे अश्वारूढ पुतळे त्यांच्या शिल्पप्रतिभेची साक्ष देतात.

                                       
शाहू महाराज, संभाजी महाराज, महात्मा गांधी, जोतिबा फुले, डॉ. आंबेडकर, महर्षी कर्वे, स्वा. सावरकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आचार्य अत्रे, यशवंतराव चव्हाण, इंदिरा गांधी, राजीव गांधी, एस.एम. जोशी, साधू वासवानी यांचे पूर्णाकृती पुतळे त्यांनी तयार केले आहेत. अहिल्याबाई होळकर, कस्तुरबा गांधी, क्रांतिवीर नाना पाटील, लाल बहादूर शास्त्री, पं. नेहरू, सुभाषचंद्र बोस इत्यादींचे ३०० ते ४०० अर्धपुतळे त्यांनी तयार केले आहेत.

पुण्यातील शनिवार वाड्यासमोरील दिल्ली दरवाज्याकडे असलेला,थोरले बाजीराव पेशवे यांचा पुतळा खेडकर यांनीच तयार केला.


                                       
शिल्पाची प्रमाणबद्धता, साधर्म्य, आविर्भाव, व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास, इतिहासाच्या जाणकारांकडून शिल्पाचे परीक्षण करून घेण्याची पद्धत यांमुळे खेडकरांची शिल्पे जनसामान्यांनाही आवडतात. स्मारकशिल्पांच्या व व्यावसायिक कामात शिल्पकार खेडकर गुंतले होते. त्यामुळे आयुष्यात शिल्पकलेची कलात्मक अभिव्यक्ती व प्रयोगशील आविष्कार यांकडे ते वळू शकले नाहीत.

खेडकरांना ‘फाय फाउण्डेशन’ पुरस्कार, पुणे विद्यापीठाचा ‘जीवन साधना’ पुरस्कार, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा ‘लोकमान्य कलोपासक’ पुरस्कार, २००७ चा भारती विद्यापीठाचा ‘जीवन गौरव’ पुरस्कार, शारदा ज्ञानपीठाचा ‘महर्षी’ पुरस्कार, असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

- डॉ. नयना कासखेडीकर

--------------------

Tuesday, 3 February 2026

ज्येष्ठ नाट्य समीक्षक वि.भा.देशपांडे


                                                 मराठी विश्वकोश कोश नोंद -नाट्य शास्त्र

ज्येष्ठ नाट्य समीक्षक वि.भा.देशपांडे

डॉ. देशपांडे विश्वनाथ भालचंद्र उर्फ विभा (जन्म- ३१मे १९३८,पुणे, मृत्यू- ९मार्च २०१७,पुणे.),


नाट्य समीक्षक वि भा. देशपांडे यांचा जन्म पुणे येथे ३१ मे १९३८ रोजी झाला. पुणे येथील नूतन मराठी विद्यालय आणि स.प. महाविद्यालय येथे त्यांचे शालेय आणि एम ए पर्यन्त, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले. विद्यार्थी दशेतच त्यांच नाटकात सहभाग सुरू झाला. नूमवि प्रशालेत स्पर्धा, वार्षिक संमेलने, आंतरशालेय नाट्य वाचन स्पर्धेत सहभाग आणि यश. आणि नाट्य प्रेमी शिक्षक यांचे संस्कार या काळात झाले. तर महाविद्यालयीन जीवनात सुद्धा नाटक आणि एकांकिका यामध्ये सहभाग असायचा. त्यासाठी काही बक्षिसेही त्यांना मिळाली होती. पुढे पीडिए(प्रोग्रेसिव्ह ड्रामाटिक असोसिएशन) आणि रंगायन या संस्थांशी त्यांचा संबंध आला. एकीकडे शिक्षण चालू असताना त्याच वेळी रंगभूमीचा अभ्यास व नाट्यानुभव घेणं पण चालू होतं. पदवी नंतर, साधारण १९६३ पासून त्यांचे नाट्य विषयक लेखन सुरू झाले. प्रसिद्ध अशी पुरुषोत्तम नाट्यस्पर्धा त्याच वेळी सुरू झाली होती त्यात पहिल्याच वर्षी भाग घेतला,तेंव्हापासून पुढची पन्नास वर्षे स्पर्धक, परीक्षक, संयोजक आणि प्रमुख पाहुणे या नात्याने ते पुरुषोत्तमशी जोडलेले राहिले. पुढे स्पर्धेवर त्यांनी समीक्षात्मक लेखन सुरू केले.

महाविद्यालयीन शिक्षणानंतर ते सांगली येथील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले.त्यानंतर १९७१ मध्ये ते पुण्याच्या मॉडर्न महाविद्यालयात मराठी आणि नाट्यशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यांचे नाट्य विषयक लेखन सुरूच होते. मॉडर्न महाविद्यालय, एम.ई.एस व विलींग्डन महाविद्यालयात त्यांनी ३५ वर्षे अध्यापनाचे काम केले.मॉडर्न महाविद्यालयातून ते १९९८ मध्ये निवृत्त झाले. नंतरचा पूर्ण वेळ नाट्य समीक्षक म्हणून काम केले. पुणे विद्यापीठ, फर्ग्युसन कॉलेज शिवाजी विद्यापीठ, मराठवाडा विद्यापीठ येथे त्यांनी नाट्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोळा विद्यार्थ्यानी पीएचडी आणि एम फिल चे प्रबंध संशोधन केले आहे.

नाटकातल्या माणसांच्या सहवासात वावरत असताना ,रंगभूमि समजून घेत असताना आणि ट्य विषयी लेखन करत असताना विभांना वाटले की, या विषयातले सैद्धांतिक ज्ञान संपादन करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी सर्वोच्च अशी पदवी मिळवण पण आवश्यक आहे म्हणून त्यांनी डॉक्टरेट मिळवायचे ठरविले. ‘पौराणिक आणि ऐतिहासिक नाटकातील व्यक्तिरेखाटण’ (१८८०ते१९८०), या नाट्यविषयावर त्यांनी पीएचडी केली.पीएचडी ही पदवी १९७४ साली यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते मिळाली. त्यांनी मराठी, बंगाली, कर्नाटक, अशा वेगवेगळ्या रंगभूमीचा अभ्यास केला. नाट्य परंपरेचे सामाजिक भान शोधण्यासाठी ते भारतभर फिरले. संस्कृत, हिन्दी, छत्तीसगढी, कन्नड, तमीळ, तेलुगू, पंजाबी, गुजराथी, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन या भाषेतली नाटके ही पाहिली,अभ्यासली. वेगवेगळ्या वृत्तपत्रात लिखाण करण्याबरोबर त्यांनी नाटक या विषया संबधी जवळ जवळ ५० ग्रंथ लिहिले व काही संपादित केले आहेत.

पाच दशकाहून जास्त काळ ते सांस्कृतिक अर्थात नाट्य क्षेत्रात कार्यरत होते. नाट्य विषयक रंगमंचीय कार्यक्रम , सादरीकरण, एकपात्री प्रयोग, व्याख्याने, चर्चा यात त्यांचा मार्गदर्शक, संहिता लेखक आणि वक्ता म्हणून सहभाग असायचा. त्यांचे नाट्य विषयक दहा स्वतंत्र ग्रंथ आहेत. नाट्य विषयक संपादित पंधरा ग्रंथ आहेत. त्यांनी मराठी वाड:ग्मयात टाकलेली मोलाची भर म्हणजे, त्यांचा १२०० पानी मराठी नाट्यकोश २००० साली प्रकाशित झाला. हा नाट्यकोश भारतातला पहिला कोश आहे. मराठी भाषेतील नाट्य सृष्टीतीची साद्यंत माहिती देणारा हा मराठीतलाही पहिला नाट्यकोश मानला जातो. या कोशासाठी खुद्द तात्यासाहेब शिरवाडकर यांनी त्यांना प्रेरणा दिली होती. दीडशे वर्षात असा नाट्य कोश मराठी रंगभूमीसाठी असलेला उपलब्ध नव्हता. हा कोश म्हणजे विसाव्या शतकात रंगभूमीला मिळालेली देणगी ठरली. विष्णुदास भावे यांच्या पासून ते तेंडुलकर यांच्या पर्यंत नाटककारांचा अभ्यास त्यांनी केला. मराठी रंगभूमीचा शंभर वर्षांचा कालखंड त्यांनी शब्दबद्ध केला. यात दीडशे वर्षातील नाटके, नाटककार, कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, समीक्षक, पडद्या मागील मदतनीस, प्रेक्षक, नाट्यसंस्था, नाट्यगृह, नाट्यनिर्माते, नाट्य ग्रंथ, नियतकालिके, संमेलनाध्यक्ष, नाट्य परिनिरीक्षण मंडल आणि भारतीय रंगभूमीचा आलेख इत्यादी माहिती आहे. या कोशाचा हिन्दी अनुवाद सुद्धा प्रकाशित झाला आहे.

संस्कृतिक आणि नाट्य क्षेत्रात त्यांचा सतत वावर असायचा. कोणत्याही नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला ते आवर्जून जायचे. सभासमारंभाला जायचे. नाट्य विषया बरोबरच माणसे जोडण्याची त्यांची आवडती कला होती. रंगमंचीय मित्रच असायचे ते सर्वांचे. मराठी नाट्य समीक्षा करताना ते अभिनेते, दिग्दर्शक यांच्याशी चर्चा करत, नाटक, साहित्य आणि संगीत या त्यांच्या आवडत्या विषयावर प्रेम असल्याने त्यांना या संदर्भात,नाटके पाहताना व या क्षेत्रातील संबंधित माणसांना भेटताना त्यांच्या या साहित्य आणि नाट्य प्रवासात अनेक दिग्गज माणसे भेटली. त्यावर सुद्धा त्यांनी ‘भ्रमणगाथा’ हे पुस्तक लिहिले.

या प्रवासात त्यांना आचार्य अत्रे, वि.वा.शिरवाडकर, पु.ल.देशपांडे, वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, निळू फुले, विजया मेहता, ज्योत्स्ना भोळे, पंडित भीमसेन जोशी, कमलाकर सारंग, अशी दिग्गज नाटककार मंडळींशी विभांचा संपर्क आला. मैत्री झाली. त्यांच्यावर विभांनी पुस्तके लिहिली. यात त्यांची नाटके , त्यांचे प्रयोग, त्या त्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ठ्ये त्यांनी लिहिली आहेत. त्यामुळे या पुस्तकातून रंगभूमीच्या इतिहासातील अनेक प्रसंग व घटना उलगडल्या आहेत.

त्यांची आणखी काही पुस्तके म्हणजे, नाटकातील माणसे, गाजलेल्या भूमिका, नाटक नावाचे बेट, निळू फुले, निवडक नाट्यप्रवेश-पौराणिक,निवडक नाट्यप्रवेश ऐतिहासिक ,निवडक नाट्यप्रवेश सामाजिक, भाग एक व भाग दोन, वारसा रंगभूमीचा, आचार्य अत्रे प्रतिभा आणि प्रतिमा, कालचक्र एक अभ्यास, नटसम्राट एक आकलन, नाटककार खानोलकर, नाट्यरंग (कलावंतांच्या मुलाखती), नाट्य मित्र, नाट्य व्यक्तिरेखाटण-पौराणिक, ऐतिहासिक, नाट्यसंवाद रचना कौशल्य, नाट्यस्पंदने (नाट्य विषयक लेख), निवडक नाट्य मनोगते, मराठी नाटक पहिले शतक, मराठी रंगभूमी-स्वातंत्र्यपूर्व मराठी नाटक व स्वातंत्र्योत्तर काळ, रंगभूमीचा इतिहास - खंड एक व खंड दोन, माझा नाट्यलेखन-दिग्दर्शनाचा प्रवास, यक्षगान लोकनाटक, रायगडला जेंव्हा जाग येते-सिंहावलोकन, (१९६३ पासूनच्या) स्फुट आणि ग्रंथ स्वरूपाचे लेखन, स्वातंत्र्योत्तर मराठी नाटक, वसंत शिंदे व्यक्ति- कलावंत, मराठी एकांकी, अशी नाट्य विषयक पुस्तके प्रकाशित आहेत.नाटकातली माणसं या त्यांच्या पुस्तकात विभांनी प्रेक्षक म्हणून नाटकातल्या माणसांना फक्त रंगमंचावर बघता येते परंतु, नाट्य वेड आणि नाट्य अभ्यासामुळे विभांनी, मुखवट्या पलीकडची माणसे अनुभवली.त्या माणसांच्या सृजनाचा अनुभव घेतला. त्यांच्यातले माणूसपण शोधले. त्यांच्या या पन्नासाव्या पुस्तकात निवडक वीस कलाकार अर्थात नाटकीय माणसे त्यांनी मांडली आहेत, ती आहेत भालचंद्र पेंढारकर, शिलेदार कुटुंबिय, आत्माराम भेंडे, डॉ.श्रीराम लागू,विजया मेहता, प्रा.मधुकर तोरडमल, श्रीकांत मोघे, सई परांजपे,रत्नाकर मतकरी,सुलभा देशपांडे,,अमोल पालेकर, विक्रम गोखले, नाना पटेकर, सुहास जोशी, दिलीप प्रभावळकर,विनय आपटे, सतीश आळेकर,डॉ. मोहन अगाशे, प्रशांत दामले इत्यादी. नाटकातली अमराठी माणसेही त्यांना भेटली. तसेच २००४ साली ते लंडन येथे गेले असताना शेक्सपियर चे स्मारक आणि इंग्लिश रंगभूमी त्यांनी पाहिली.

त्याच प्रमाणे त्यांनी काही पुस्तकांचे संपादन केले. ती पुस्तके म्हणजे, प्रतिमा रूप आणि रंग- के नारायण काळे यांच्या लेखांचे संपादन, गानयोगी मल्लिकार्जुन मन्सूर, निवडक एकांकिका, प्रयोगक्षम एकांकिका, पु.ल.पंच्याहत्तरी, मराठी कलभिरुची, मराठी नाट्यसमीक्षा–काही दृष्टीकोण, मराठी भाषा-साहित्य, रंगयात्रा(१९५० ते १९८५ रंगभूमीविषयक लेख संग्रह) अशा संपादित पुस्तकांप्रमाणेच त्यांनी काही गौरव ग्रंथ सुद्धा संपादित केले. ते असे, चित्तरंजन कोल्हटकर, जितेंद्र अभिषेकी, नाट्य गौरव विशेषांक, पी.डी.ए नाट्य निर्मिती, पी.डी.ए. वार्षिक, पुणे नाट्य संमेलन, बालगंधर्व जन्मशताब्दी, मॉडर्न महाविद्यालय दशक पूर्ती, राम गणेश गडकरी दशकपूर्ती, ललित कला दर्श ७५ वर्षे, शरद तळवलकर, साहित्य सूची दिवाळी अंक

नाट्य समीक्षक वि भा देशपांडे, पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अनेक वर्षे २००६ ते २०११ पर्यन्त प्रमुख कार्यवाह होते. त्यांनी कार्याध्यक्ष, प्रमुख कार्यवाह अशा वेगवेगळ्या जबाबदार्‍या सांभाळल्या. या क्षेत्रात ते ‘विभा’ म्हणूनच ओळखले जायचे. साहित्य परिषदेच्या मराठी वाड:मयाचा इतिहास खंड सात चे कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी काम केले. कोशासारख्या संशोधनपर लेखनापासून ते वृत्तपत्रीय सदर लेखनापर्यन्त जवळ जवळ चाळीस वर्षे त्यांनी नाट्य किंवा रंगभूमीविषयक सर्व विषय हाताळले.

अध्यापन करताना आकाशवाणी आणि दूरदर्शन वरील अनेक नाट्य विषयक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग होता. त्यांनी नभोनाट्य लेखन सुद्धा केले.पीडीए संस्थेत जाणार कुठे, बंडू नानू गुलाबी हत्ती अंमलदार या नाटकातून अभिनय केला तर, तुझे आहे तुजपशी,ससा आणि कासव या नाटकाचे दिग्दर्शन केले. विविध मान्यवरांच्या जाहीर मुलाखती घेतल्या.

त्यांना अनेक महत्वाचे पुरस्कार मिळाले. त्यातले काही म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट संपादनाचा पुरस्कार, जयंतराव टिळक गौरव निधि पुरस्कार, नाट्यगौरव पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार, पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिकेचा गौरव, कै.माधव मनोहर नाट्य समीक्षक पुरस्कार, राजा मंत्री पुरस्कार,वि.स. खांडेकर नाट्य समीक्षक पुरस्कार (१९८३),कॉसमॉस पुरस्कार, भाषा रत्नम पुरस्कार (२००४) रंगत संगत सन्मान, वत्सला बाई अंबाडे साहित्य निर्मिती पुरस्कार असे चौदा पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

इंदिरा भालचंद्र पुरस्कार – वि.भा. देशपांडे यांच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ दर वर्षी एका चांगल्या ग्रंथाला इंदिरा-भालचंद्र पुरस्कार देण्यात येतो. २०१६ साली हा पुरस्कार रत्नाकर मतकरी यांना, त्यांचे ‘माझे रंगप्रयोग’ या पुस्तकासाठी देण्यात आला. दहा हजार रुपये रोख व सन्मान चिन्ह असे याचे स्वरूप आहे. या आधी विजया मेहता यांच्या ‘झिम्मा’ आणि डॉ. अजय वैद्य यांच्या ‘मास्टर दत्ताराम :नाट्यवीर ‘यांना ,तसेच मोहन जोशी यांना ‘नट-खट’ साठी हा पुरस्कार देण्यात आला.

डॉ. वि.भा. देशपांडे यांनी रंगभूमीचे साक्षेपी अभ्यासक म्हणून जवळ जवळ चार दशके काम केले. ९ मार्च २०१७ रोजी त्यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी विशाखा,जावई आणि नातू असा परिवार आहे.

संदर्भ-

१. http://prafullaphadkemhantat.blogspot.com/2017/03/blog-post.html

२. https://www.bookganga.com/eBooks/Books?AID=466678599711

३. https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/vb-deshpande-1428949/

४. https://www.marathisrushti.com/articles/dr-vi-bha-deshpande/

५. ले. देशपांडे वि.भा.पुस्तक- मराठी नाट्य कोश, निशांत प्रकाशन,पुणे .वर्ष-२०००

६. ले. देशपांडे वि.भा. पुसतक- नाटकातली माणसे, उन्मेष प्रकाशन,पुणे

७. ले. देशपांडे वि.भा. पुस्तक- गाजलेल्या रंगभूमिका- रोहन प्रकाशन,पुणे वर्ष- २००६

८. ले.देशपांडे वि.भा.,पुस्तक- भावलेली नाटके- श्रीपाद प्रकाशन ,पुणे

९. विकिपिडिया वेबसाईट

१०.मराठी विश्वकोश वेबसाईट

११. लोकसत्ता,लोकमत,सकाळ, दिव्य मराठी, महाराष्ट्र टाईम्स. याचे ई- अंक

( ही नोंद मराठी विश्वकोश नाट्य शास्त्र यासाठी लिहिली होती. ती कोशाच्या website वर उपलब्ध आहे . त्याची लिंक = https://marathivishwakosh.org/59849/ )

-ले- डॉ. नयना कासखेडीकर.





-------------------------------------------

चरित्र नायक - शिल्पकार प्रमोद कांबळे

 

                             चरित्र नायक -   चित्रकार, शिल्पकार

                                         प्रमोद कांबळे (११ ऑगस्ट १९६४)     


          वास्तववादी शैलीत काम करणारे प्रमोद दत्तात्रेय कांबळे हे अहमदनगरचे. माझी मुलं चित्रकारच होतील’, असे ठाम विश्वासाने सांगणाऱ्या चित्रकार दत्तात्रेय कांबळे व आई अन्नपूर्णा यांची प्रेरणा सतत त्यांच्या पाठीशी होती. वडील नगरच्या प्रगत कला विद्यालयात कलाशिक्षक होते. प्रमोद यांचे तीनही भाऊ चित्रे काढीत. त्यामुळे घरात चित्रकलेला पोषक वातावरण होतेच. वडिलांबरोबरच शाळेतील कलाशिक्षक व ज्येष्ठ चित्रकार र.बा. केळकर यांनी तिसर्या इयत्तेपासूनच प्रमोद यांना प्रत्यक्ष शिल्प बनविण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वत:चे शिक्षण पूर्ण करण्यासाठी जाहिरातींचे फलक रंगवणे, निवडणूक काळात भिंती रंगवणे, संक्रांतीत पतंग करून विकणे, दिवाळीत आकाशकंदील विकणे, गणपतीसाठी आराशी करून देणे ही कामेही त्यांनी केली. दहावी उत्तीर्ण झाल्यावर नगरलाच प्रगत कलाविद्यालयात फाउण्डेशन कोर्स करून नंतर मुंबई येथील सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांनी शिल्पकलेचे शिक्षण पूर्ण केले.

या काळात त्यांना अनेक बक्षिसे मिळाली. अंतिम वर्षी जे.जे.चे सुवर्णपदकही मिळाले. शिक्षण संपल्यानंतर चित्रपट क्षेत्रात चांगली संधी मिळत असतानाही त्यांचे मन तिथे रमले नाही; कारण ओढ होती गावच्या मातीची. त्यामुळेच मुंबई-पुण्यासारखी कलेला पोषक अशी शहरे सोडून कलेचे वातावरण नसलेल्या अहमदनगर या गावात अनेक आव्हाने झेलत, त्यांनी चित्र व शिल्पकलेचा व्यवसाय सुरू केला.

भारताच्या स्वातंत्र्याला १९९७ मध्ये ५० वर्षे पूर्ण झाली म्हणून सारे जहाँ से अच्छाया शीर्षकाचे ७०×२० फुटांचे ५०० हून अधिक थोर व्यक्तींची पेन्सिलचित्रे असलेले भव्य चित्र त्यांनी नगर महापालिकेच्या महावीर सभागृहात काढले. या कलाकृतीत देवदेवता, ॠषिमुनी, थोर महापुरुष, स्वातंत्र्यसेनानी, सामाजिक कार्यकर्ते, कलावंत, खेळाडू अशा विविध क्षेत्रांतील विशेष व्यक्तींची चित्रे असून ते नगर शहरात येणार्या पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. एम.आर.आर.सी.चा गौरवशाली इतिहास सांगणारे द स्पिरिटहे ९०×१० फुटांचे पेन्सिल चित्र, वॉर मेमोरियल्सचे भव्य शिल्प, गणपती उत्सवातील भुलेश्वर मंदिराची प्रतिकृती अशी त्यांची आणखी काही उल्लेखनीय कामे आहेत.

नानाजी देशमुख यांच्या चित्रकूट येथील नन्ही दुनियाया प्रकल्पासाठी कांबळे यांनी २००४ मध्ये वन्य प्राण्यांची लाइफ साइजशिल्पे बनविली. आई व मूल या संकल्पनेवर आधारित वाघ, हत्ती, गोरीला, उंट, गाय, मगर, जिराफ, झेब्रा अशा सर्व वन्यप्राण्यांची फायबरमधील ही अभ्यासपूर्ण शिल्पे लोकप्रिय झाली. त्यांचे उद्घाटन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते झाले. यांतील काही शिल्पांच्या प्रतिकृती मुंबईच्या काळाघोडा फेस्टिव्हलमध्ये २०१० मध्ये प्रदर्शित केल्या होत्या.

तसेच कलाजगत न्यासाची स्थापना, लहान मुलांसाठी स्पर्धा, शिबिरे अशा उपक्रमांतून मुलांमध्ये चित्र व शिल्पकलेची आवड निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न ते करीत आहेत. नगरसारख्या ठिकाणी प्रमोद कांबळे यांनी आर्ट गॅलरीही सुरू केली आहे.

या सगळ्या उपक्रमांत मूळ नगरच्याच असणार्या त्यांच्या सुविद्य अर्धांगिनी, पूर्वाश्रमीच्या स्वाती उपासनी, सर्वार्थाने सहभागी असतात.

उत्तम कौशल्य, तांत्रिक ज्ञान व व्यवसायाची उत्तम जाण असणारे प्रमोद कांबळे शिल्पाकृतींचा विविध प्रकारे वापर करून त्यांतून यशस्वी व्यावसायिक शिल्पकार म्हणून नावारूपाला आले आहेत.

-----------------------


प्रमोदजींच्या स्टुडीओ ला नगर येथे भेट दिली तेंव्हाची छायाचित्रे -







- डॉ. नयना कासखेडीकर

                                                -----------------------


चरित्र नायक नोंद -डॉ नीलम गोऱ्हे

                                                               


                                                            चरित्र नायक नोंद -डॉ नीलम गोऱ्हे 

                                                                शिल्पकार चरित्रकोश ,खंड १० 

                                                                       भाग -राजकारण 














 मा.नीलम ताईन्ची मुलाखत घेतली तेंव्हा 


          -डॉ नयना कासखेडीकर , पुणे

----------------------------------------------------------------





Monday, 22 September 2025

‘नवरात्र’ - एक शक्तिपूजा, एक कुलाचार

 



नवरात्र’ - एक शक्तिपूजा, एक कुलाचार


                                      

या देवी सर्वभूतेषु मातृरुपेण संस्थितः |
नमस्तस्यैः नमस्तस्यैः नमस्तस्यैः नमो नमः
या देवी सर्वभूतेषु शक्तिरुपेण संस्थितः |
नमस्तस्यैः नमस्तस्यैः नमस्तस्यैः नमो नमः
या देवी सर्वभूतेषु शान्तिरुपेण संस्थितः |
नमस्तस्यैः नमस्तस्यैः नमस्तस्यैः नमो नमः |

अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस चालणारा हिंदूंचा दुर्गा देवीचा उत्सव, अर्थात ‘शारदीय नवरात्र’. ऋतुंवरून प्रचारात आलेला हा उत्सव धार्मिक उत्सव पण आहे. दुर्गा किंवा काली ही सर्वांची कुलदेवता असल्याने भारतात हा उत्सव एक कुलाचार सुद्धा असतो. यावर इथला प्रादेशिक ठसा उमटलेला आहे.


                            

उत्तर भारतात नवरात्र उत्सव म्हणजे प्रभू रामचंद्रांनी दुष्ट शक्तिवर मिळविलेला विजय म्हणून साजरा केला जातो. दुष्ट प्रवृत्तीपासून वाचवणारी शक्ति म्हणून देवीचे पूजन होते. रजपूत लोकांनी उत्तर हिंदुस्थानात अनेक ठिकाणी आपली सत्ता स्थापन केली. ते लोक शिवोपासक होते. रजपूत लोक देवीच्या ऐवजी नवरात्रात तोफेची पुजा करतात. त्यावर त्रिशूळाचे चिन्ह काढतात.

महाराष्ट्रातसुद्धा मराठ्यांच्या राज्यस्थापनेनंतर आपले उपास्य दैवत भवानीदेवीच्या पूजेचा प्रसार झाला. चारही दिशांना ही देवालये स्थापित झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनीसुद्धा आई भवानी जगदंबेची पूजा बांधली होती हा इतिहास सर्व परिचित आहेच. पेशवे काळातसुद्धा दसर्‍याआधी वार्षिक दुर्गोत्सव साजरा करण्याची प्रथा होती.

पश्चिम भारतात गुजरातमध्ये नवरात्रात नऊ दिवस अखंड दीप लावून शक्तिमातेच जागर म्हणून गरबा मांडला जातो. यात गरबा म्हणजे गर्भदीप लावला जातो. सछिद्र मातीच्या घटात दिवा तेवत ठेवतात. हा घट म्हणजे मनुष्याच्या शरीराचे प्रतीक आणि आतला तेवत असलेला दिवा म्हणजे शुद्ध आत्म्याचे प्रतीक मानले जाते. ही आत्मरूपी ज्योत अखंड तेवत राहो, उदंड आयुष्य मिळो अशी प्रार्थना आदिशक्ती दुर्गादेवीकडे केली जाते.


                                       

पुर्वेकडे पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडे नवरात्रीचे शेवटचे पाच दिवस दुर्गापुजा केली जाते. यातील सिंहावर आरुढ झालेली देवी हातात सर्व शस्त्र घेतलेली आहे. ती महिषासुरमर्दिनी आहे.


                                    

दक्षिण भारतात बाहुल्यांचे प्रदर्शन ‘कोलू’ असते. ते बघायला सर्वजण एकमेकांच्या घरी जातात. कर्नाटकात नवरात्रात रात्रभर पुराण कथांवर आधारित यक्षगानचे प्रयोग नऊ दिवस केले जातात. दुष्टांवर विजयाचे प्रतीक म्हणून मोठ्या थाटामाटात ‘म्हैसूर दसरा’ साजरा केला जातो. काही भागात नवमीला आयुधांची पूजा करतात.
 
                                     

केरळमध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर लहान मुलांचा विद्यारंभ केला जातो. भाषा आणि वेष नि आहार वेगवेगळा, पद्धती वेगळ्या, पण या संस्कृतीतून दिला जाणारा संदेश एकच. विविधतेतून एकता हेच या संस्कृतीचे वैशिष्ट्य, हीच परंपरा. अनेक काव्यातून वाड्मयातून शक्ति देवीची स्तुती केलेली दिसते.


जगातील दुष्ट लोकांचे प्राबल्य कमी करण्यासाठी, लोकांची त्यातून सुटका करण्यासाठी ईश्वर अवतार घेतो अशी समजूत आहे. ईश्वर निर्गुण असल्याने त्याला जेंव्हा कार्य करायचे असते तेंव्हा तो अवतार घेऊन आपल्या शक्तिदेवीला प्रेरित करतो आणि ही शक्ति वेगवेगळ्या रूपात प्रगट होते म्हणून त्या अवतरांची पुजा करतात. ज्या उर्जेतून तेजस्वी तार्‍यांचा, सूक्ष्म मानवी मनाचा, भावनांचा जन्म होतो ती ऊर्जा/शक्ति म्हणजे देवी असे म्हटले जाते. ब्रम्हा, विष्णु, महेश या प्रमाणे पार्वती,लक्ष्मी, सरस्वती ही शक्तीची तीन रुपे मानली जातात. या शक्तीचे मुख्य नऊ आणि इतर अनेक असे अवतार मानले जातात.

विविध महिन्यात महत्व असलेल्या चैत्र गौर,अन्नपूर्णा-चैत्र, ज्येष्ठ गौर व हरितालिका-भाद्रपद, मंगळागौर-श्रावण,अश्विनातील ललिता ही शक्तीची सौम्य रुपे मानली जातात. तर दुर्गा, काली, चंडी ही रौद्र रूपं. पृथ्वीवरील राक्षसांच्या निःपातासाठी या शक्तीने /देवीने रौद्र रूप घेतले. नऊ दिवस युद्ध करून त्यांच नाश केला.

आम्ही काही काळी स्त्रीला अबला मानलं होतं. पण शक्तीरूपातली देवी हीच सर्वांची आदिशक्ती असून ती अत्यंत सामर्थ्यवान आहे असेही मानले गेले आहे. याच कारणामुळे देवीची अनेक व्रते करण्याची प्रथा सुरू झाली.


                                     

प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी ।
तृतीयं चन्द्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम् ।।
पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच ।
सप्तमं कालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम् ।।
नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।
उक्तान्येतानि नामानि, ब्रह्मणैव महात्मना ।।

नऊ दिवसात देवीची ही नऊ रुपे पूजली जातात. ऊर्जा हे देवीचे मूळ तत्व, संरक्षणाची देवता दुर्गादेवी, ऐश्वर्याची देवता लक्ष्मीदेवी आणि ज्ञानदेवता सरस्वतीदेवी या शक्ति रूपात आपण मानतो. हे मानणे म्हणजेच आपल्या मनातील द्वंद्वाच्या, त्रासदायक नकारात्मक भावनांना दूर सारून सकारात्मक दृष्टीचा स्वीकार करणे. कारण जेंव्हा एखादा मनुष्य लहान, मोठ्या संकटाचा सामना करत असतो, तेंव्हा तो आधार शोधतो. मन:शान्ती कशात मिळेल हे शोधतो आणि ती त्याला अध्यात्मामधून, साधनेमधून कुठल्याही रुपातल्या आराधनेमधून मिळते. ही रुपे अर्थातच शक्तीची असतात. त्याची मनुष्याने प्रतीके शोधली. कारण अमुर्ताला मूर्त स्वरूप दिले की आश्वासक वाटत असते. म्हणून वेगवेगळ्या प्रतिकातून सूचक अर्थ निघत असतात. प्रतिकांचा वापर आपल्या संस्कृतीत प्राचीन काळापासून दिसतो. प्रतीक म्हणजे एखादं चिन्ह किंवा खूण.

देवीची नवरात्र चार प्रकारची आहेत. शारदीय, वासंतिक, शाकंभरी आणि गुप्त नवरात्र. तर इतर नवरात्र म्हणजे चंपाषष्टीला खंडोबाचे नवरात्र असते आणि मार्गशीर्षात नृसिंहाचे नवरात्र असते. थोडक्यात, मनुष्य हा बुद्धीमान प्राणी आहे. त्याला बुद्धी आहे म्हणूनच तो चराचराचा, निसर्गाचा, प्राणिमात्रांचा विचार करतो. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, आदर व्यक्त करतो. तसाच तो या अमूर्त शक्तीची पूजा करतो. हे आपल्या देशाचे सांस्कृतिक महत्व आहे. ते मूळ भावात आपण जपले पाहिजे. आपल्या संस्कृतीचा, परंपरांचा बाजार होत नाही ना ? याकडे आपणच जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे.

आजच्या जाहिरातीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपली संस्कृती जाहिरातीचा फंडा यात अडकत चालली आहे असे वाटते. मूळ तत्व बाजूला पडत चालल आहे. नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या परिधान करणं, गरबा खेळण्यासाठी ऊंची ड्रेसेसची खरेदी अशा अनेक गोष्टींचे आकर्षण निर्माण करणारे केवळ आपले उत्पादन विकत आहेत. याला बळी न पडता, त्यातला मूळ भाव शोधा, मूळ तत्व शोधा आणि केवळ निर्मळ मनाने, अंत:करणापासून हे नवरात्र जल्लोषात साजरे करा. आपल्या देशाची सांस्कृतिक प्रतिके जपुन ठेवा, अन्यथा चुकीचे पायंडे पडतील.

सर्व मंगल मांगल्ये शिवेसर्वार्थ साधिके |
शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते ||



ले. डॉ. नयना कासखेडीकर

                                                                    -----------------------------

Tuesday, 26 August 2025

आमचे पारंपरिक खेळ

                                     आमचे पारंपरिक खेळ

        आपल्याला अभिजात कला आणि विद्या यांच्याप्रमाणे खेळांचासुद्धा एक प्राचीन वारसा लाभला आहे. शारीरिक सुदृढतेसाठी व्यायाम ही आपल्या समाधानी जीवनासाठीची एक नितांत आवश्यकता फार पूर्वीपासूनच समजली गेली आहे. आपले पारंपरिक स्वरूपाचे खेळ, हे आपला देश, आपली संस्कृती आणि लोकजीवन यांचा अविभाज्य भाग आहेत. मात्र जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे समाजव्यवस्थाच आमुलाग्र बदलत चालली आहे. पूर्वीच्या सामाजिक रचनेत पुस्तक वाचन आणि विविध प्रकारचे मैदानी खेळ याला महत्वाचे स्थान होते. आताची जीवनशैली अधिक सोयीस्कर, जलद, सुखावह झालेली आहे. आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाच्या हातात मोबाईल हे साधन आल्याने पालक आणि मुले एका वेगळ्याच जगात वावरत आहेत. आधीच्या पिढीत वेगळे वातावरण होते. एकत्र कुटुंब व्यवस्था होती, साहजिकच घरात संस्कार करणारे आजी-आजोबा, एकमेकात सुसंवाद असणारे पालक आई-वडील, गावात-शहरात खेळायला असलेली मोकळी मैदाने, घरासमोरील अंगण, फिरायला व सायकलिंगला मोकळे रस्ते, सकाळ संध्याकाळचा निवांत वेळ, या सगळ्या गोष्टी मुलांच्या जडणघडणीत महत्वाच्या असत. पारंपरिक खेळ या जडणघडणीचा भाग होता. आता या पारंपरिक खेळांची जागा मोबाईल गेम्सने घेतली आहे आणि भयावह दुष्परिणाम सतत दिसत आहेत, सिद्ध होत आहेत.


                                      

वैदिक काळामध्ये स्वसंरक्षण व आत्मबल वाढवण्यासाठी शारीरिक शिक्षण दिले जायचे. ते युद्धोपयोगी असे. त्यात धनुर्विद्या, घोडदौड, रथ चालविणे याबरोबरच योग विद्या, सूर्य नमस्कार, प्राणायाम हेही शिकविले जात असे. नंतरच्या मध्ययुगीन काळामध्ये लढाऊ वृत्ती वाढीस लागण्यासाठी व टिकण्यासाठी इतर शारीरिक शिक्षणाचा समावेश करण्यात आला. त्यात अश्वारोहण, मुष्टी युद्ध, भालाफेक, तिरंदाजी, कुस्ती यांचा समावेश होता. यामुळे शरीर स्वास्थ्य ही टिकून राहत असे. छत्रपती शिवरायांच्या काळात युवकांना बलसंवर्धन व युद्धाचे शिक्षण मिळू लागले. समर्थ रामदास स्वामींनी तर राष्ट्रभक्ती बरोबरच बलोपासना करण्याचे तंत्र शिकवून आपला शिष्यवर्ग निर्माण केला होता. त्यांनी हनुमान मंदिरे स्थापन करून भक्ती बरोबर शक्ती संवर्धनासाठी दंड, बैठका, सूर्यनमस्कार, कुस्ती, वजन उचलणे, लाठी काठी, दांडपट्टा, ढाल तलवार, जंबिया व भाल्याने युद्ध खेळणे असे प्रशिक्षण सुरू केले. त्याचेच पुढे आखाडे झाले. देवाचे चिंतन करण्यापूर्वी वैयक्तिक विकासावर ( म्हणजे उच्च आत्मबल आणि सुदृढ शरीर ) चिंतन करण्याचा त्यांनी उपदेश केला. धर्मप्रचारक बलवान असला पाहिजे असे त्यांना वाटत असे. त्यातूनच शरीर कसदार व बलवान, घाटदार बनविण्याचे व्यायाम प्रकार म्हणजे मल्लखांब, मल्लविद्या इ. वर भर देण्यात आला. कालांतराने यातील काही प्रकार खेळ म्हणून मान्यता पावून त्याच्या स्पर्धा होऊ लागल्या, विजेतेपद मिळवण्याची चुरस वाढली, विजयी संघांना पारितोषिके देण्यात येऊ लागली.


                                  

खेळ शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्वाचे असतात तसेच ते मनोरंजनसाठी सुद्धा महत्वाचे ठरतात. शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच खेळांमुळे आत्मविश्वास वाढतो, अंगी लवचिकता येते, चापल्य येते, स्नायू बळकट होतात आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते, व्यक्तीची निर्णय क्षमता विकसित होते, नेतृत्व गुणांचा विकास होतो, संयम शिकायला मिळतो, संघभावनेने वागण्याचे धडे मिळतात.


                                   

खेळांचे अनेक प्रकार आहेत, परंतु मुख्य दोन प्रकार. एक म्हणजे बैठे खेळ आणि दुसरे मैदानी खेळ. बुद्धिबळ, कॅरम, पत्ते, सागरगोटे, सोंगट्या, काचकवड्या, भातुकली हे खेळ बसून खेळले जातात, म्हणून ते बैठे खेळ. यात बुद्धीचा वापर केला जातो. अशा खेळात तर्कशक्ती वाढते. तर खो खो, कबड्डी, क्रिकेट, फुटबॉल, हॉकी आदि खेळ मैदानात खेळले जातात. यात भरपूर शारीरिक हालचाली असतात, कौशल्याची कसोटी लागते. आपले पारंपरिक खेळ म्हणजे कबड्डी, खो-खो, गोट्या, विटीदांडू, लंगडी, आट्यापाट्या, लगोरी, फुगडी, ठिक्कर ,झिम्मा, भिंगऱ्या, भोवरा इत्यादि.


                                      

याशिवाय आणखी खेळ आहेत. लपंडाव, शिवाजी म्हणतात, तळ्यात-मळ्यात, पकडा-पकडी, विषामृत, डोंगराला आग लागली, डब्बा ऐस पैस, मामाचं पत्रं हरवलं, आबा धोबी,पोत्यात पाय घालून पळणे, नाव-गांव-फळ-फूल, आंधळी कोशिंबीर, दोरीवरच्या उड्या, लुटुपुटूची लढाई या सगळ्या खेळात पूर्वी लहान मुले मनसोक्त रमायची, खेळायची. यातून मुलांच्या शरीर व मनावर चांगले व योग्य संस्कार होत असत. इतिहासात डोकावल्यावर आपल्या संस्कृतीतले लोकजीवन कसे होते हे कळतेच, पण खेळ व व्यायाम यासाठी त्या काळात काय साधने वापरत याचाही अंदाज येतो.


                                      

क्षत्रिय लोकांच्या शारीरिक विकासासाठी धनुर्विद्या, तलवारबाजी, घोडेस्वारी, मल्ल युद्ध, कुस्ती, भालाफेक याचे प्रशिक्षण दिले जात असे. त्या शिवाय बैलगाडी स्पर्धा व नौका नयन स्पर्धापण होत असत. हडप्पा आणि मोहेंजोदडोच्या उत्खनन अवशेषात सिंधु संस्कृतीत कित्येक प्रकारचे अस्त्र, शस्त्र ,खेळणी आणि खेळ उपकरणे सापडली आहेत. पौराणिक कथांमधील बलराम, भीम, हनुमान, जांबूवंत, जरासंध यांची मल्लयुद्ध प्रसिद्ध आहेत. वैदिक काळात शिकार करणे, हत्तींना वश करणे, रथांची शर्यत, असे अनेक खेळ होते. पूर्वी तर द्यूत खेळणे व रथ शर्यत हा राज्याभिषेकाच्या विधीचाच एक भाग होता. पुरुष आणि स्त्रियामध्ये चेंडू खेळण्याची प्रथा होती. पकडा पकडी, लपाछपी हे खेळ मुलींमध्ये खेळले जात. पौराणिक काळातील इतिहासावरून स्वयंवरासाठी झालेल्या स्पर्धेमध्ये शारीरिक क्षमताच तपासल्या जायच्या. याचे उदाहरण म्हणजे सीतास्वयंवर हे आपल्याला माहिती आहे. तर अर्जुनाचे नेमबाजीचे कौशल्य आपण वाचले आहे. गुरु द्रोणाचार्यांनी घेतलेल्या परीक्षेत अर्जुनाने आपल्याला फक्त पक्ष्याचा डोळा दिसतो आहे हेच सांगितले आणि यावरून एकाग्रता किती महत्वाची असते ते सिद्ध होते. खेळांमध्ये एकाग्रता महत्वाची असते.

युद्धकला भारतात सर्वप्रथम सुरू झाल्या. योग कलासुद्धा भारतातच सुरू झाल्या. याला हजारो वर्षांचा इतिहास आहे. इतके ते प्राचीन आहे.

बुद्धिबळ खेळ हा आता जगप्रसिद्ध खेळ झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर याच्या स्पर्धा भरवल्या जातात. पण रावणाच्या पत्नीने मंदोदरीने सर्वात प्रथम हा खेळ रावण बरोबर खेळल्याचे इतिहास सांगतो. सहाव्या शतकात या खेळाला शतरंज म्हटले जाऊ लागले. तर, हा खेळ युरोप मध्ये गेल्यावर त्याला chess नाव पडले.


                                   

सापशिडी हा खेळसुद्धा भारतीय खेळ आहे. याला मोक्षपटसुद्धा म्हणतात. हा खेळ जगभरात खेळला जातो. तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी तयार केला होता. नैतिकतेचे धडे शिकविणारा हा खेळ सतराव्या शतकात तंजावर मध्ये प्रसिद्ध झाला. नैतिकतेवर आधारित हा खेळ इंग्रजांना पण भावला आणि तो त्यांनी १८९२ मध्ये इंग्लंड ला नेला. तिथून तो युरोपीय देशात गेला आणि ल्युडो किंवा स्नेक्स अँड लॅडर्स नावाने ओळखला जाऊ लागला.


                                     

कबड्डी - हा भारतीय सामूहिक खेळ आहे. याला हुतुतूपण म्हटले जाते. यात स्वसंरक्षण शिकवले जाते. महाभारतात या खेळाचा उल्लेख आहे. खो खो खेळसुद्धा प्राचीन भारतीय खेळ आहे. यात स्वसंरक्षण आणि आक्रमण व प्रती आक्रमण ही कौशल्ये शिकवली जातात.


                               

द्युत क्रीडा – महाभारतातील कौरव पांडवांचे युद्ध या द्यूतक्रिडेमुळेच झाले होते. इतिहासातील वर्णनावरून वेगवेगळ्या प्रसंगावरून द्यूत हा खेळ म्हणजे दुर्व्यसन मानले गेले होते. जिंकले तर वर्ष मंगलमय होते आणि द्यूतात हारले तर वर्षभर धनाची हानी होत राहते. द्यूतक्रीडा हे एक मनोरंजनाबरोबरच धनसंपत्ति जमविण्याचे त्या काळातले साधन होते. भारतीय संस्कृति व कलांमध्ये एक प्रमुख भाग म्हणून द्यूतक्रीडा समजली जायची.


                                                  

सागोल कांगजेई (पोलो)- आताच्या पोलो खेळाचे हे भारतीय प्राचीन रूप आहे. सागोल म्हणजे घोडा आणि कांगजेई म्हणजे घोड्यावर बसून चेंडू खेळण्यासाठी एका टोकाला त्रिकोणी लाकडी टोक असलेला वेताची लांब काठी. भारतातील मणिपुरचा हा प्राचीन खेळ समजला जातो. इसवी सन पूर्व ३१०० वर्षांपूर्वी या खेळाची सुरुवात मणिपुरमध्ये झाल्याचे इतिहास सांगतो. राजा खंगेम्बाच्या कारकिर्दीत हा खेळ खूप लोकप्रिय झाला होता. हा खेळ म्हणजे एक लढाऊ प्रशिक्षण असायचे. यातील खेळाचे खरे योद्धे लहान पण वेगवान, चपळ व शक्तिशाली असे मणिपुरी घोडे असतात. हा खेळ जगभरातल्या पोलो खेळाचे मूल स्वरूप मानले जाते. हा नुसता खेळ नाही तर मणीपुरचा इतिहास व संस्कृतीपण आहे. मणिपुर येथील मैतेई योद्ध्यांचा वारसा आहे. दरवर्षी नोहेमबर मध्ये सांगाई महोत्सवात संगोल कांगजेई स्पर्धा होतात. इंफाळमध्ये जगातले सर्वात जुने पोलो ग्राउंड आहे. ब्रिटीशांना हा खेळ खूप आवडला तो त्यांनी त्यांच्या देशात नेला, त्याचे नियम निश्चित केले. मोठे घोडे, मोठे मैदान असे बदल करून स्वत:चे नाव देऊन नवा खेळ पोलो म्हणून प्रसिद्ध केला. नंतर तो जगभर पसरला, आता जागतिक स्तरावर याच्या प्रतिष्ठित स्पर्धा भरतात. म्हणजे पोलो हा खेळ भारताने जगाला दिलेला खेळ म्हणजे एक देणगीच आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची अशीच गोष्ट आहे.


                                          

मार्शल आर्ट -मणीपुरी युद्धकला ‘थांग-ता’. वसाहतवादी राजवटीने या कलेवर बंदी घातली होती. पण योद्ध्यांनी ही कला कौटुंबिक परंपरा म्हणून नंतर जपली व वाढवली आणि आजतागायत जिवंत ठेवली आहे. यात तलवार आणि भाला या शस्त्रावर प्रभुत्व मिळवून लढण्याच्या आणि स्व-संरक्षणाच्या युक्त्या शिकविल्या जातात. मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी त्यांनी विकसित केलेले हे कौशल्य म्हणजे त्यांची जिवनशैलीच आहे.

तिरंदाजी- bow and arrow – धनुष्याच्या सहाय्याने आपल्या लक्षाच्या दिशेने बाण सोडणे व त्याचा वेध घेणे म्हणजे तिरंदाजी. हजारो वर्षापासून प्रचलित असलेली ही धनुर्विद्या आहे. सुरुवातीला युद्धाचे आणि शिकारीचे साधन म्हणून याचा वापर होत होता. याची मुळे पाषाण युगापासून दिसतात. ग्रीक, रोमन आणि आर्मेनियन यांच्या इतिहासात निष्णात धनुर्धारी अश्या वीरांचे उल्लेख आहेत. भारतात एकापेक्षा एक सरस असे धनुर्धर होते. आपल्या इथे पौराणिक कथांमध्ये कर्ण, अभिमन्यु, एकलव्य, अर्जुन, भीष्म, द्रोण, प्रभू श्रीराम, शिव ही व्यक्तिमत्वे नेमबाजीसाठी ओळखली जात होती.


                                

विदेशी खेळसुद्धा भारतात खेळले जातात. क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, बॅडमिंटन, टेनिस, गोल्फ, हे प्रामुख्याने पाश्चिमात्य देशातून आपल्याकडे आलेले आहेत व लोकप्रिय झाले आहेत. क्रिकेटच्या ‘वेडाचे’ वेगळे वर्णन करण्याची आवश्यकताच नाही.




                                     

लंगडी, खो-खो, कबड्डी, गोट्या, विटीदांडू, मल्लखांब, रस्सीखेच हे खेळ भारतीय परंपरेतून विकसित झालेले आहेत. हे खेळ शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासासाठी उपयुक्त ठरले आहेत. प्राचीन काळी खेळासाठी नैसर्गिक साधनसामग्री वापरली जात होती, उदा. दगड, लाकूड, माती. आज खेळांसाठी अत्याधुनिक साहित्य उपलब्ध आहे, जसे की फायबर बॅट, सिंथेटिक बॉल, कृत्रिम मैदान. पण तरीही पारंपरिक खेळातला आनंद हल्लीच्या पिढीतील मुलांना मिळत नाही, घेत येत नाही. याचे कारण व्यायामाचे महत्व वाटत नाही. दुर्दैवाने बहुसंख्य पालकांनासुद्धा याची गरज वाटत नाही. आई-वडीलांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. प्रत्येकजण करियरमागे व स्पर्धेत टिकण्यासाठी धावतोय. मोबाईलच्या आत्यंतिक आहारी गेलेले लोक आहेत आणि त्याच्या ‘व्यसनातून’ त्यांना कसे सोडावयाचे हा एक यक्ष प्रश्न समाजधुरीणांच्यासमोर निर्माण झालेला आहे. साहजिकच आपल्या परंपरा पाळायला, त्या पाळण्याचा आग्रह धरून त्या अंमलात आणायला मोठ्यानाच जमत नसेल तर आजची पिढी म्हणजे लहान मुले ही सुद्धा अनभिज्ञच राहतील. त्यांना खेळांचे महत्व कसे कळणार? त्याचे लाभ कसे कळणार ?


                                            
लाभ - खेळांमुळे शरीर तंदुरुस्त व सुदृढ राहते, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि स्नायू मजबूत होतात. धावणे, पोहणे या प्रकारच्या खेळांमुळे हृदय व फुफुसे मजबूत होतात. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर खेळ मनावरचा ताण-तणाव कमी करतात, व्यक्तीचा आत्मविश्वास वाढवतात आणि त्याची निर्णयक्षमता अधिक चांगली होते. सहकार्यभावना वाढीस लागते. तसेच खेळांमुळे आनंद व सकारात्मक विचारसरणी निर्माण होते. भारतीय पारंपरिक खेळांचा विचार केल्यास खो-खो, कबड्डी इ. खेळांसाठी फार साहित्याची आवश्यकता नसते. काही खेळांसाठी अत्यल्प साधने लागतात. ते खेळ खेळण्यासाठी विशेष अशा पूर्व अटी आवश्यक नसतात. सैलसर कपडे आणि मोकळे मैदान इतकेच आवश्यक असते. मागील अनेक वर्षांपासून क्रीडाक्षेत्रात अनेकविध व्यावसायिक संधीही निर्माण होत आहेत. एखाद्या क्रीडाप्रकारांत करीयर करायची महत्वाकांक्षा बाळगून अनेक युवक-युवती पुढे येतांना दिसतात. त्यांना उत्कृष्ठ मार्गदर्शन करणारी तज्ज्ञ मंडळीही सुदैवाने उपलब्ध आहेत. शासकीय पातळीवर अनेकविध प्रयत्न व उपक्रम आखले जात आहेत. लहानपणापासूनच भावी खेळाडूतील गुण हेरून त्याला त्यात प्राविण्य मिळवता यावे यासाठी अनेक पातळीवर प्रयत्न केले जातात. त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून शासनाने अनेक योजना आखल्या आहेत. त्यांना क्रीडाविषयक सोई-सुविधा देऊन, त्यांच्यातील ‘स्पार्क’ हेरून खेळाडूला घडवण्याचा प्रयत्न केला जातो.

आपले पारंपरिक खेळ शारीरिक विकासाबरोबरच, सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक दृष्टीने ही महातवाचे ठरतात, आजचे विद्यार्थी हे उद्याचे नागरिक आहेत अश्या विचारातून ही भावी पिढी शारीरिक तंदुरुस्त व मानसिकदृष्ट्या सक्षम व्हायची असेल, सामाजिक एकता टिकवायची असेल आणि संस्कृतीचे संवर्धन व्हावायचे असेल तर, सहज साध्य होणारे, सुलभ असणारे, आर्थिक दृष्टीने परवडणारे, मनाला आनंद देणारे, व्यक्तिमत्व विकसित करणारे, अनेक सामाजिक लाभ मिळणारे असे हे सर्व पारंपरिक खेळ माहिती करून घेऊन खेळले पाहिजेत. नालंदा आणि तक्षशीला या प्रसिद्ध विद्यापीठांमध्ये लष्करी प्रशिक्षण, कुस्ती, धनुर्विद्या, पोहणे, श्वासोच्छवासाचे व्यायाम, योग हे अभ्यासक्रमाचे अविभाज्य भाग होते. हा विचार प्रत्येक घरात, शाळांमध्ये, समाजामध्ये, रुजवला पाहिजे. हे खेळ जपले पाहिजेत. कारण हा आपल्या संस्कृतीचा समृद्ध वारसा आहे, जो मागच्या पिढीकडून आपल्याला मिळाला आहे.

ले. डॉ नयना कासखेडीकर .

------------------

राज्यकर्ती अहिल्याबाई

 

राज्यकर्ती अहिल्याबाई

राजकारणात  फक्त पुरुषांचीच मक्तेदारी आहे. महिलांना त्यातले काय कळते? असा दृष्टिकोन नेहमी दिसतो. एकोणिसाव्या शतकाच्या सामाजिक सुधारणेच्या काळापर्यंत स्त्रीचे विश्व म्हणजे चूल आणि मूल एव्हढेच मर्यादित होते. एव्हढेच नव्हे तर तिने त्या पलीकडे जाऊच नये. शिकू नये नाहीतर ती बिघडेल अशी भीती काही जणांना होती.पण इतिहासात डोकावले तर अशी अनेक उदाहरणे दिसतात कि स्त्रिया राजकारभारात प्रत्यक्ष कामात नसल्या तरी अप्रत्यक्षपणे सल्ला देण्याचे काम उत्तम करत होत्या. प्रत्यक्ष कामात त्यांना संधी नसेच. पण संधी मिळाली तर त्या उत्तम राज्य कारभार चालवू शकतात. चांगले कौशल्य साधू शकतात. शिक्षण मिळाले तर चांगले संधीचे सोने करू शकतात. हे अनुभवाने सिद्ध होत गेले आहे. या स्त्रिया प्रजेचे हित लक्षात घेतात. राज्याचे चांगले रक्षण करतात.

अहिल्याबाई होळकर या त्यातल्याच एक राज्यकारभार चालवणाऱ्या उत्तम राजकारणी होत्या. वेगवेगळ्या कालखंडात स्त्रियांच्या कर्तृत्वाचा आढावा घेतला तर ,अनेक धुरंधर स्त्रिया दिसतात. हे राज्य व्हावे हि तो श्रींची इच्छाअसे म्हणणारे छत्रपती शिवाजी महाराज, यांच्या मातोश्री जिजाबाई होत. हे हि ईच्छा शिवाजींच्या मनात बीजरूपाने रोवणाऱ्या मातोश्रीच  होत्या. असे संस्कार बालपणापासूनच शिवाजी महाराजांवर आई जिजाबाई यांनी केले होते. राज्य कारभारातील अनेक कौशल्ये त्यांनी बाल शिवाजींना शिकवली होती.

पेशवाईच्या कालखंडात पण कर्तृत्ववान स्त्रिया होत्या. अहिल्या बाई होळकर त्या पैकीच एक . रणांगणावर सुद्धा जीवाची बाजी लावणाऱ्या स्त्रिया भारतातीलच. राणी लक्ष्मीबाई यांचेही कर्तृत्व आपल्याला माहिती आहे. स्वातंत्र्य लढ्यात अनेक महिलांचा सहभाग होता. त्या नंतरच्या काळात सुद्धा अनेकींनी राजकारणात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे.

कुटुंबात स्त्री हि मुख्य घटक असते.लोकशाहीमध्ये तिचा वाटा निम्मा आहेच. तशी ती समाजात, चळवळीत,सार्वजनिक जीवनात, हातात तर राजकीय जीवनात सुद्धा ती महत्वाची भूमिका बजावत आहे. स्त्री जात्याच संवेदनशील असल्याने कुटुंब सांभाळतांना ती चोख जबाबदारी बजावते त्या प्रमाणेच इतर क्षेत्रात सुद्धा तशीच कर्तव्य बजावत असते.

फक्त तिला जाणणारा. तिची हुशारी, कौशल्य याची पारख करणारा समाज अथवा कुटुंब  हवे. ज्याला ते कळेल तोच स्त्रियांना संधी देईल. कारण अजूनही बऱ्याच अंशी पुरुषी वर्चस्व असलेल्या समाजात स्त्रियांना महत्वाची संधी मिळेलच असे नाही.अगदी हेच अहिल्याबाई यांच्या बाबत घडले असे म्हणता येईल.

  पूर्वी लहान वयात लग्न  होत असत. त्यामुळे सासरी घरात सून म्हणून जरी प्रवेश झाला असला तरी लहान वयातल्या या सुनेवर घरातले वडीलधारे संस्कार करत असत. अहिल्येचे खंडेरावांशी लग्न वयाच्या आठव्या वर्षीच झाले. होळकरांचे तर सुभेदार घराणे होते.त्यामुळे घरातले वातावरण, कामाचा प्रकार, हे सगळंच अहिल्याबाईंना लहानपणापासून परिचयाचे झाले होते. लहान अहिल्येची चुणूक बघून मल्हारराव तिलाच महत्वाची कामे सांगत असत.याच वातावरणात तीची जडणघडण होत होती. तिची बुद्धीमत्ता ,अंगभूत कौशल्ये, हजरजबाबीपणा, निर्णय क्षमता हे सासरे मल्हाररावांनी ओळखले होते. तिला लहान वयातच सांगितलेली कामे ती चोखपणे करत असे. हे ओळखूनच  मल्हररावांनी मुलगा खंडेराव याच्या निधनांनंतर अहिल्येला सती जाऊ न देता तिच्यावर विश्वास दाखवला होता. खंडेराव च्या मृत्यूनंतर मल्हाररावांनी काहीही सल्ला मसलत किंवा हितगुज करायचे असल्यास अहिल्या बाईंनाच ते विषय सांगत असत. इतकी अहिल्याबाई बद्दल मल्हार रावांना खात्री वाटत असे.

मल्हारराव मग खंडेराव आणि पुढे मुलगा मालेराव हेच वारस म्हणून सत्तेत होते.परंतु मुलगा खन्डेराव च्या मृत्युनंन्तर मल्हारराव अहिल्येकडेच खरा वारस म्हणून बघत होते. ते अहिल्येमध्येच खंडेराव बघत होते. मुलाचे दुःख तर मल्हाररावांना होतेच तेंव्हापासून ते अहिल्येची सतत मदत घेऊ लागले, त्यामुळे अहिल्येचा राज्यकारभारातील कामाचा आलेख दिवसेंदिवस चढताच राहिला. सुभेदारांच्या सर्व सूचना व त्यांनी दिलेली उद्दिष्ट्ये व्यवस्थितपणे पूर्ण करणे /सर्व परगण्यातील व्यवहार त्या चोख बघत असल्याने आता माळवा / इंदूर प्रांतांची मल्हाररावांना काळजी नव्हती राहिली. राजकीय परिस्थितीवर सुद्धा अहिल्येचे बारकाईने लक्ष होते हेही त्यांना दिसले.

 मल्हारराव मोहिमेवर गेले की सर्व कारभार अहिल्या बघत असे. मल्हाररावांच्या सूचनेनुसार सर्व व्यवस्था करीत असत. हिंदुस्थानात अब्दालीच्या करामतींच्या बातम्या कानवर येत होत्या. त्याने मथुरा वृंदावनात मुंडक्यांच्या राशी घातल्या, हे कळल्यावर त्यांनी ठरविले की, हिंदूंना आता चिरेबंद आश्रयस्थाने हवीत . त्यांनी ठिकठिकाणी धर्मशाळा बांधून घेतल्या.   

          राजकारण करता करता एकाच वेळी ब्रिटिश चोहोबाजूंनी वाढत असता, आपल्या समाजाचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्या प्रयत्न करत होत्या. संस्कृती टिकवण्याचे प्रयत्न करत होत्या. राज्यात पाणी पुरवठा सुधारणा घडवल्या. त्यांनी अन्नछत्रे उघडली, धर्मशाळा बांधल्या, चिरेबंदी विहिरी खोदल्या, राज्यातून उन्हाळ्यात प्रवास करणार्‍या लोकांसाठी पाणपोया बांधल्या, पांथशाळा, आश्रयशाळा बांधल्या, मंदिरे बांधली, नद्यांवर घाट बांधले, स्त्रियांसाठी कपडे बदलण्यासाठी व सुरक्षित स्नानासाठी बंदिस्त ओवर्‍या बांधल्या, वेळोवेळी आक्रमणात उध्वस्त झालेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला.

 पुलांचे बांधकाम, रस्ते निर्मिती, रस्ते दुरूस्ती, डाक व्यवस्था,रायते साथी शिक्षणाची व्यवस्था ग्रंथ संग्रह व ग्रंथ निर्मिती,आरोग्यासाठी दवाखाने , औषधी बागा, शेतीसाठी सिंचना सोयी, जमीनिसाठी ९\ ११चा  कायदा ,माळरानावर वृक्षलागवड  आरक्षित गायरान , करप्रणाली ,विद्वान आणि कलाकार यांना राजाश्रय अशा अनेक गोष्टी केल्या .

    मालेरावच्या निधनापर्यंत हातात सत्ता नसताना अहिल्याबाई राज्यकारभारात लक्ष देत होत्याच पण खऱ्या अर्थाने त्या मालेरावच्या मृत्यूनंतरच राज्यकर्त्या झाल्या. म्हणूनच हातात राज्याचा कारभार प्रत्यक्षपणे नसतांना सुद्धा अनेक विषय हाताळण्याचा अनुभव अहिल्या बाईंना आतपर्यंत काम केल्यामुळे होता. तसंच स्वतंत्रपणे राज्यकारभार हातात येईपर्यंतच्या काळात अहिल्या बाई अनेक बऱ्या वाईट प्रसंगांना सामोऱ्या गेल्या होत्या. एक स्त्री म्हणून सामाजिक, कौटुंबिक स्तरावर अनेक रूढी परंपरांचे मणामणांचे ओझे त्यांनी सांभाळले होते. सती सारख्या प्रथांना बळी पडलेल्या स्त्रिया त्यांच्या कुटुंबातच त्यांनी पाहिल्या होत्या. सती जाणं, वारसा हक्क, हुंडा पद्धती, विधवांचे अधिकार,अशा अनेक प्रथांचा स्त्रियांना काय त्रास भोगाव लागतो ते अहिल्याबाईंनी स्वतःअनुभवले होते. एक स्त्री म्हणून सर्व जाणीव आणि संवेदनशीलता त्यांच्यात होती. म्हणून त्यांच्या राज्यात समाजातील स्त्रियांना अहिल्याबाई एक हक्काचा आधार वाटत होत्या. अहिल्याबाईंनी अनेक स्त्रियांना परंपरेच्या काही जोखडातून मुक्त करून तिच्या व्यक्तिमत्व विकासाला वाट दिल्याचे दिसते. स्वातंत्र्य दिल्याचे दिसते. त्यांचे सुधारणावादी विचार यातून लक्षात येतात.         

     राज्य कारभारातले सर्व समस्या विषय अहिल्या बाई सहज पणे सोडवत असत. मग आर्थिक व्यवस्था, सामाजिक प्रश्न, लोकांचे हिताचे निर्णय, न्याय व्यवस्था, अगदी रणांगण अथवा युद्ध विषय, त्या संबधीचे निर्णय घेणं, हिशोब हे सर्व अहिल्याबाई कौशल्याने हाताळत असत. कुटुंबातील अनुभव प्रत्यक्ष घेतले होतेच पण आपल्या राज्यावर झालेले आक्रमण हेही त्यांनी पाहिले. पानिपत च्या युद्धात पराभव झालेला व त्याचे दुःख आणि परिणाम त्यांनी प्रत्यक्ष अनुभवले होते. यावेळी अहिल्येची सासरेबुवांना खूप मदत झाली. सुभेदाराची कर्तव्ये  ही   आपलीही  जबाबदारी समजून सून अहिल्या पुढे सरसावली.पानिपतानंतर सासूबाई गौतमा बाई यांचे निधन झाले त्यामुळे संसारात तत्वज्ञान सांगणाऱ्या, मैत्रीपूर्ण वागणाऱ्या, धीर देणाऱ्या, मार्गदर्शन करणाऱ्या सासूबाई पण गेल्या. जाताना अहिल्येला सांगून गेल्या कि तुला इथून पुढे कुटुंबाबरोबर राज्य कारभार आणि म्हातारे होत आलेले सुभेदार सासरे, मल्हारराव याना तुलाच सांभाळावे लागणार आहे. असा सगळ्यांचाच आधारवड म्हणजे अहिल्याबाई होत्या. प्रजेच्या कल्याणाबरोबरच त्या इतरांचीही काळजी घेत असत.  

     प्रजेबरोबरच प्राणी, पक्षी यांच्या आयुष्याचा विचार सुद्धा राज्यकर्ती  म्हणून अहिल्याबाई करत असत. त्यांचे कार्य इंदूर उज्जैन पर्यन्त्च मर्यादित नव्हते. केदारनाथ, रामेश्वर, जगन्नाथ पुरी, ते द्वारका असे चारही दिशांना होते. विशेष म्हणजे सर्व प्रांतातील माणसे जोडण्याची कला त्यांच्याकडे होती. त्यांनी गंगेचे पाणी महाशिवरात्रीला प्रांताप्रांतात कावडीने नेण्याची पद्धत सुरू केली. त्यामुळे प्रांतीय भारत जोडला गेला. ते कुठलीही सक्ती न करता, सात्विकता या त्यांच्या गुणामुळेच. माणसांबरोबरच पशू, पक्षी, प्राणी यांचाही विचार त्या करत. त्यांच्यासाठी डोण्या, वैद्यकीय उपचाराची सोय केली होती. सर्पदंशावर उपचार करण्यासाठी हकीम व वैद्य नेमले, एव्हढेच काय मुंग्या व जलचर प्राण्यांसाठी सुद्धा साखर, कणकेच्या गोळ्या असे  अन्नदान करीत. गोरगरिबांना सणासुदीला अन्नदान, कपडे ,थंडीपासून संरक्षण म्हणून घोंगड्या वाटप करीत.

त्यांच्याकडे दुर्मिळ हस्तलिखित ग्रंथसंग्रह होता. विद्वान आणि कलावंत यांची त्या कदर करीत, योग्य तो मानसन्मान देत. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी इतर प्रांतातील शास्त्री, पंडित, वैद्य व वैदिक यांना आणून,राहण्याची सोय करून त्यांनी एक प्रकारे ज्ञान संवर्धन व संरक्षण केले. उदा. काशी येथील ब्रह्मपुरी,

 कायदा आणि न्यायदानात सुद्धा योग्य दिशेने काम करत असत. त्या इतक्या चाणाक्ष होत्या कि त्या काळात कायद्यात आवश्यक ते बदल  (सुधारणा) त्यांनी करवून घेतले होते. जे समाजाच्या हिताचेच होते.राज्याचे आर्थिक धोरण सुद्धा त्या कौशल्याने हाताळत असत. जगाच्या इतिहासात उत्कृष्ट प्रशासिका म्हणून अहिल्याबाई होळकर यांची नोंद आहे  .

अठराव्या शतकातील, २८ वर्षे यशस्वीपणे राज्य सांभाळणार्‍या मुत्सद्दी, धैर्यवान, शूर, चतुर, धर्मनिष्ठ, दूरदर्शी अशा बहुपेडी स्त्री राज्यकर्ती म्हणजे अहिल्यादेवी . अहिल्यादेवी यांचा राज्याचा काळ ( १७६७ - गादीवर बसून ते १७९५- निधन होईपर्यंत )म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातले सोनेरी पान.  

  लोकांसाठी रोजगार निर्माण व्हावेत म्हणून योग्य ते धोरण त्यांनी आखले होते. राज्यकारभार चालवताना त्यांनी जनतेच्या अन्न ,वस्त्र, निवारा या मूलभूत गोष्टीबरोबरच, समता शांतता, बंधुता, न्याय, विचार स्वातंत्र्य आणि आत्मसन्मान या मुल्यांची जपणूक त्यांच्या काळात झालेली दिसते.

    अहिल्याबाईंच्या बुद्धीचातुर्य, मुत्सदीपणा ,प्रजाहित दक्ष आणि धर्मपरायणतेमुळे धर्म टिकला, संस्कृती संवर्धन झाले. कलेला प्रोत्साहन मिळाले. चरीतार्थाची साधने उपलब्ध झाली. त्यांनी आपल्या सासर्‍यांचे ,होळकर घराण्याचे नाव स्व -कर्तृत्वाने इतिहासात अजरामर केले.

     अठराव्या शतकातील, 28 वर्षे यशस्वीपणे राज्य सांभाळणार्‍या मुत्सद्दी, धैर्यवान, शूर, चतुर, धर्मनिष्ठ, दूरदर्शी अशा बहुपेडी स्त्री राज्यकर्तीची ओळख तुम्हा आम्हाला झाली ती गुणांची जाण असणाऱ्या केवळ आणि केवळ मल्हारराव होळकर यांच्यामुळेच .नाहीतर सर्व सामान्य अहिल्या खंडेरावांच्या मृत्यनंतर सती गेली असती तर एक कर्तृत्ववान राज्यकर्ती महिला म्हणून अहिल्या बाई कुणालाच समजल्या नसत्या. त्यांच्या राज्यकारभाराने अनेक मापदंड आजच्या राज्यकर्त्यांना घालून दिले आहेत, अनेक आदर्श उदाहरणे समोर ठेवली आहेत.राज्य कर्त्यांची कर्तव्ये काय असली पाहिजेत हे दाखवून दिले आहे. एक सामान्य स्त्री      बुद्धीचातुर्य, मुत्सदीपणा, प्रजाहित दक्ष आणि धर्मपरायणतेमुळे धर्म आणि संस्कृती टिकून ठेऊ शकते याचे पुढच्या पिढीला धडे देऊन गेली आहे. या राज्यकर्तीला शतशः प्रणाम !  (हा लेख 'राजकारणातील महिलांचा सहभाग' या विशेषांकात प्रसिद्ध झाला.)

ले. डॉ. नयना कासखेडीकर ,पुणे 

—------------------------------------------------------------