Thursday, 5 February 2026

'आजीची भातुकली'

 

'आजीची भातुकली'

तुमच्या आमच्या मनात बालपणीच ठसलेली ठकी आणि तिचा संसार अर्थातच 'भातुकली' हा विलास करंदीकरांचा संग्रह नुकताच अमेरिकेतल्या फिलाडेल्फियातल्या मराठी जनांना भेटून आला. १४ विद्या व ६४ कला या संस्थेचे संयोजक संजय पेठे यांच्या माध्यमातून बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या द्विवार्षिक संमेलनासाठी गेलेलं हे प्रदर्शन प्रथमच भारताबाहेर भरलं. करंदीकरांना भेटले त्यांच्या मॉडर्न शाळेत भरलेल्या भातुकलीच्या प्रदर्शनात. आणि नन्तरही मुलाखतीसाठी, घरी,त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या आणखी प्रदर्शना ठिकाणी.राजा केळकर संग्रहालयात त्यांनी सुरु केलेल्या सुट्टीच्या काळातले भातुकली प्रत्यक्ष खेळणे या उपक्रमावेळी पण जाऊन बघितले.    

भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य म्हणजे इथली कुटुंबव्यवस्था पद्धती, नातेसंबंध, परंपरा होत. आपल्या संस्कृतीचा पायाच भक्कम. 'भातुकली' या चिमुकल्या संसारात या सर्व संस्कृतीचं प्रतिबिंब पाहायला मिळतं. बालपणीचा हा काळ जीवनातला अत्यंत आनंदाचा, नवीन चांगल्या गोष्टी शिकण्याचा महत्वाचा काळ.

बालपण जगातल्या सर्व देशात, सर्व काळात आहे. म्हणूनच लहान मुलांच्या करमणूकीसाठी रंगीबेरंगी साधने व उपकरणे जगात सर्वत्र आढळतात. अगदी अश्मयुगापासून ती तयार होत असल्याचे अनेक पुरावे उत्खननात सापडले आहेत. भातुकलीत बाहुलीचं स्थानही अढळ आहे. 'बाहुली' हे जगभरातलं समान खेळणं. आजच्या काळातल्या मुलांना 'बार्बी' बाहुली माहिती आहे पण आमची 'मराठी ठकी' कुठं माहितीये? मोहेंजोदडो-हडप्पा संस्कृतीत, शृंगकाळात, कुशाणकाळात व गुप्त काळातल्याही बाहुल्या आहेत. भारतात महाराष्ट्र उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश या प्रांतात मुली भातुकली मांडून बहुला-बाहुलीचं लग्न लावतात. शिवाय काही ठिकाणी तर मुलीच्या लग्नात बाहुल्या, भातुकलीची भांडी अशा वस्तू आंदण म्हणून देण्याची प्रथा आहे. जेणे करून मुलामुलींनी प्रत्यक्ष संसाराला लाब्ण्यापुर्वी ती हाताळावीत, अनुभवावीत. प्रत्येक राज्यातल्या बाहुलीचं नाव वेगळं. बंगालची कालीचंडिका, राजस्थानची गंगावती तर महाराष्ट्राची आपली ठकी. या बाहुल्यांवरून त्या प्रांताची परंपरा, पोषाख यांचा इतिहास कळतो.

 
काळ बदलतोय त्याला खेळणीही अपवाद नाहीत. आजच्या मुलांच्या जगात आहेत रिमोटची यांत्रिक खेळणी, कंप्यूटरवरचे, व्हाईस सिटी, काउंटर स्ट्राईक, एन.एफ.एस., फायनल फेंटसी, फिफा हे खेळ. या खेळांनी तर भारतात, अमेरिकेत सगळीकडच्या मुलांना वेड लावलं आहे. खेळण्यांच्या जगात चीनने बाजी मारली आहे. परंतु हि चिनी बनावटीची खेळणी धोकादायक ठरल्याने त्यावर सध्या बंदी घातली गेली आहे. या सर्वांच्या पलीकडे जाऊन आपली भारतीय पद्धतीची खेळणी अतिशय साधी-सोपी, विनाखर्च, वीज, बैटरीची आवश्यकता नसलेली, कुणीही कशीही हाताळावीत, खेळवीत. धोका कसलाही नाही. नुकसान नाही. अशी आहेत.





भारतातही काळाच्या ओघात चौसोपी वाडे जाऊन घरे झाली, घरे जाऊन आज इमारती उभ्या राहिल्या. त्यामुळे वन बीएचके, टू बीएचके चा फ्लेटमध्ये जागाही कमी झाली. प्लास्टीकचा जमाना. युज एंड थ्रो सिस्टीमची पद्धत, शिवाय गरजाही बदलल्या. त्यामुळे जुनी, पारंपारिक भांडी, वस्तू जपून ठेवायला जागाच नाही. मुलांच्या खेळण्यांना तर थाराच नाही. आमच्या वेळचा भातुकलीचा संसार आम्ही सांभाळून ठेवू शकलो नाही ही खंत वाटते. मला वाटतं ही सर्वांचीच खंत असणार पण आपल्या आजच्या पिढीला, पुढच्या पिढीला ही संस्कृती, हा वारसा, परंपरा, इतिहास समजावा म्हणून विलास करंदीकरांचा भातुकलीचा खटाटोप आहे.

ही संस्कृती, हे संस्कार जपले जावेत, तुमच्या आमच्या घरातल्या काळाच्या पडद्याआड गेलेल्या वस्तूंची माहीती व्हावी, परंपरेची ओळख व्हावी या उद्देशाने करंदीकर आपल्या भातुकलीचं प्रदर्शन भरवतात. 'भातुकली म्हणजे करंदीकरच' हे समीकरण पुणेकरांना ठाऊक आहे. कारण झाडून सर्व पुणेकर इतिहासप्रेमी, परंपरा व वारसा जतन करणारे. योगायोगाची गोष्ट म्हणजे करंदीकरांच्या पुढच्याच गल्लीत राजा केळकर हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचं संग्रहालय आहे. जे कै. दिनकर केळकर यांच्या वैयक्तिक छंदातूनच निर्माण झालेलं आहे. विलास करंदीकरांचं 'भातुकली' प्रदर्शन हेदेखील वैयक्तिक छंदातूनच साकारलंय परंतु मुख्य फरक आहे 'भातुकली' हे प्रदर्शन फिरतं, चालतं बोलतं आहे. आणि या संग्रहातल्या पारंपारिक वस्तूंशी आपला थेट संबंध आहे. ते पाहताना अरे ही तर आपण खेळलेली भांडीकुंडी, चूल बोळकी आहेत. मग आपण मुलामुलींना, भाच्या पुतण्यांना, नातवंडांना "आमच्यावेळी हे असं होतं" हे सांगताना, त्या वस्तू प्रत्यक्ष दाखविताना, केवढा आनंद होतो. तर आपल्याला झालेला हा आनंद पाहताना करंदीकरांना परमोच्च कोटीचं समाधान मिळतं. ते म्हणतात, "माझ्या या आनंदाचं मूल्यमापन होऊच शकत नाही." अशा या भातुकली प्रदर्शनातील भांड्यांच्या इतिहासाचे साक्षीदार आपण स्वतःच असतो.

                                   

करंदीकरांच्या या चिमुकल्या संसारात ३००० भांडी आहेत. ती पितळी, स्टील, तांबे, लाकूड, दगड, सिमेंट, कापड, माती आणि चांदीची सुद्धा आहेत. भांड्यांच्या छोट्या प्रतिकृती अगदी हुबेहूब. छोटी असूनही प्रत्यक्ष वापरता येणारी भांडी आहेत. यातला तांब्याचा छोटा बंब पेटवून पाणी गरम होतं, स्टोव्ह पेटवून चहा करता येतो, चकलीच्या सोऱ्यातून चकली करता येते. हापशीतून धो-धो पाणी पडते.

यात काथवट, जातं, उखळ-मुसळ, शेवयाचा शेवगा, घुसळण खांब, पाटा-वरवंटा या वस्तूंचे उपयोग प्रत्यक्ष समजावेत म्हणून इलेक्ट्रिक मोटर्सची जोड देऊन त्याचे हलते मॉडेलच त्यांनी तयार केले आहे. तसंच, वसुदेव प्याला, संपूट, दिव्याच्या समया, गंगेचे भांडे, तिर्थोटी, आड-रहात, दगडी डोणी, अग्नीहोत्र पाट, बंब, दूधदूभत्याचं कपाट, चुली व शेगड्यांचे, भांड्याचे अनेक प्रकार, भाताच्या भत्त्या, वेड्भांडे, शकुंतला भांडे, रुबवटा, ठेचणी या घरातून हद्दपार झालेल्या वस्तूंबरोबरच मोक्षपट, गंजीफा, सारीपाट, सागरगोटे, गुंजा असे पारंपारिक खेळही आहेत. देवपूजेची भांडी, प्रवासाची साधने यांचाही इतिहास कळतो. आता त्यांच्या प्रदर्शनात भर पडली आहे. ती चांदीच्या भातुकलीची पूर्वी राजेरजवाड्यांतील लहान मुलांची खेळणी चांदीची असतं. ती सुद्धा एक किलो चांदीची ही भांडी त्यांनी तयार करून घेतली आहेत. हॉटेल संस्कृतीचं पेव, सण, उत्सवांना, परंपरांना घरात जागा नाही, मनुष्यबळ नाही, त्यामुळे घराघरात जेवणाच्या पंगती झडत नाहीत. त्यामुळेच पंगत म्हणजे काय? पाटपाणी घेणं, पण वाढणं यांच्या पद्धती आजच्या पिढीला माहिती कशा होणार? या संग्रहात ही पंगत आहे. त्यात पारंपारिक तसेच्या तसे पाट चौरंग, ताटे, वाट्या, फुलपात्री, ताटाभोवतीच्या महिरपी अशा साग्रसंगीत वस्तू आहेत. हा त्यांचा छंद सुरु झाला तो अपघातानंच.

१९९० मध्ये त्यांच्या वाड्यांच्या नूतनीकरणाच्या वेळी घरातल्या झोपाळ्याला पितळी फुले व कड्या आणायला जायचं निमित्त झाले. त्याच दुकानात भातुकलीची पितळी भांडी एका पाटीत विक्रीला ठेवली होती. ते ऐकून त्यांना आश्चर्य वाटलं. ती भांडी ६० रु. किलोने ते घेऊन आले. तसंच त्यांची स्वतःची जुनी भातुकलीची खेळणी होतीच. हाच त्यांचा सुरुवातीचा संग्रह. पुढे हा संग्रह वाढत गेला. २६८ भांडी झाली. मे १९९८ मध्ये छंदकलावर्धीनीतर्फे छंद जोपासणाऱ्या व्यक्तींच्या संग्रहाचं प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात भरलं. करंदीकरांची ही छोटी भांडी पाहून या फंटास्टिक संग्रहाला आयोजकांनी तत्काळ मान्यता दिली. त्यांचे हे पहिलं प्रदर्शन. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. या संग्रहाचं खूप कौतुक झालं. ते या प्रदर्शनाबद्दल म्हणतात, "लोकांचा हा प्रतिसाद, त्यांच्या चेहेऱ्यावरचा आनंद पाहणं हा माझ्यासाठी माझ्या आयुष्यातला वेगळाच अनुभव होता. लोकांच्या या आवडीची, त्यांच्या याबद्दलच्या अतूट नात्याची दखल मी घेतली. तोच ध्यास घेऊन माझा या संसाराचा पसारा वाढवतोय. दिवसेंदिवस त्यात भरच पडत चालली आहे.

प्रदर्शन पाहिल्यानंतर लोकांच्या सूचना, प्रतिक्रिया, मौल्यवान ठरत आहेत माझ्यासाठी. त्यामुळेच मला संशोधन करून निरनिराळे नमुने वाढविण्याची प्रेरणा मिळते."

हा ठकीचा चिमुकला संसार पुणे, सातारा, नाशिक, जळगांव, संगमनेर, मुंबई शिवाय महाराष्ट्राच्या बाहेरही जाऊन आलाय. आतापर्यंत या भातुकलीची १५० ठिकाणी प्रदर्शने भरली. लिम्का बुकमधेही या छंदाची नोंद झाली आहे. त्यांनी या संग्रहासाठी भारतभर प्रवास केला आहे. जिथे जिथे भातुकलीची भांडी मिळतील ती ती संग्रहात भर घातली आहेत.

प्रदर्शन बघायला ९१ वर्षांच्या आजी, त्यांची ६६ वर्षांची मुलगी, तिची ३५ वर्षांची सून व तिची ६ वर्षांची मुलगी अशा चारपिढ्या एकाच वेळी येतात तेव्हा त्या आजींना त्यांचं बालपण आठवतं. तर पणतीला या पणजीच्या वेळेच्या भांड्याचं फारच कुतूहल वाटतं.

काही वस्तू संग्रह म्हणून ते जमवतात. काही स्वतः तयार करतात. भांड्याच्या दुकानातून कारागीराकडून काही तयार करवून घेतात. हौसेला मोल नसतं. तसं ते या छंदासाठीही खर्च करतात. त्यांच्या घरातच पारंपारिक वस्तू रोजच्या वापरात आहेत. वाडासंस्कृतीही आहे. आधुनिक जीवनशैलीही आहे. खरा संसार सांभाळून त्यांच्या पत्नी अश्निनी करंदीकर चिमुकल्या संसारातही साथ देत आहेत. तेही नोकरी सांभाळून.

अशी ही भातुकली. म्हटलं तर लहान मुलांचाच खेळ. पण त्यांच्या जीवनातील हा महत्वाचा टप्पा. खेळ त्यांच्या मानसिक वाढीला पोषक असतात. खेळणी मुलांची नुसतीच करमणूक करत नाहीत. त्यांच्यात जिज्ञासा निर्माण करतात. त्यांची कलात्मक प्रवृत्ती वाढवितात. या खेळातून त्यांना एकमेकांबद्दल प्रेम, ओढ, मन जपण्याची, सहकार्याची, कर्तव्याची अशा मानवी नातेसंबंधातल्या भावभावनांची, जीवनातल्या मूल्यांची शिकवण मिळत असते. खेळ म्हणजे बिनभिंतींची शाळाच असते. अभिनेते वासुदेव पाळंदेंनी म्हटलंय, "मुलगा किंवा मुलगी खऱ्या संसारी जीवनात प्रवेश करते ती. या रंगमंचावर येण्याआधी पहिलं पाऊल 'भातुकली' खेळामध्ये टाकत असते कारण ती या खेळात अनेक भूमिका रंगवत असते." या लुटूपूटूच्या संसारात ही मुले कधी आई-बाबा होतात, कधी डॉक्टर, तर क्षणात शाळाशाळा खेळतात. क्षणात भूक लागते. दुसऱ्याच क्षणाला विद्यार्थी झालेली ही मुलगी आई होऊन स्वयंपाक करते. सर्वांना समाधानाने जेवू घालते. असं हे बालविश्व. याच्या आपल्या आठवणींना हे प्रदर्शन उजाळा देतं. ६४ कलांपैकीच ही एक कला. जशी 'लावणी' ही लोककला सातासमुद्रापार जाते तसंच माझी ही संस्कृती वारसा जपणारी भातुकली ही जावी ही विलासरावांच्या मनात इच्छा होती. ही संधी त्यांना मिळाली. आता या संस्कृतीची आठवण व ओळख होणार आहे. फिलाडेल्फियाच्या नागरिकांना. आपल्या बांधवांना. तिथेही त्यांना भरघोस प्रतिसाद मिळेल हे सांगणे न लगे. शिवाय त्यांच्या प्रदर्शनातही संग्रहात काही मोलाची भर पडेल.

असे हे एकमेव संग्रहालय. त्यांचं रेकॉर्ड तोडणारं दुसरं कुणी नाहीच त्यामुळे गिनीज बुकात त्यांची नोंद होऊ शकत नाही पण कुणाचं रेकॉर्ड तोडण्यासाठी संग्रह हा उद्देशच नाही त्यांचा. इथे कुठलंही मार्केटिंग नाही, आपल्या संस्कृतीच्या आठवणी जागवणं हाच उद्देश.

डॉ. नयना कासखेडीकर, पुणे.

-------------------------------------

चित्रकार व कलाप्रसारक- रवींद्र देव

 चरित्र नायक 

चित्रकार व कलाप्रसारक- रवींद्र देव

२३ मार्च १९६४


      चित्रकलेच्या प्रचारासाठी साप्ताहिक चित्रकला वर्ग, सामूहिक चित्रप्रदर्शने, प्रात्य-क्षिके, व्याख्याने, कलाकारांचे एकत्रीकरण आणि भारतभर प्रवास अशा उपक्रमांतून सातत्याने काम करणारे व त्या सोबतच स्वतःचा उपयोजित-कलेचा व्यवसाय सांभाळून चित्रकार म्हणून कार्यरत असलेले पुण्यातील उत्साही तरुण व्यक्तिमत्त्व म्हणजे रवींद्र गजानन देव.

आई कुमुदिनी जुन्नरच्या सराफ व्यावसायिक जोशी कुटुंबातल्या होत्या तर वडील गजानन हेरंब देव व्यवसायाने वकील व सामाजिक कार्यकर्ते होते. पुण्यातल्या शिवाजीनगर गावठाण भागात, एकत्र कुटुंबपद्धतीत देव वाड्यात रवींद्र लहानाचे मोठे झाले. गल्लीत अठरापगड जातींची वस्ती, अनेक धर्मांचे लोक व घरातले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वातावरण अशा संस्कारात घडलेल्या रवींद्र देव यांना सामाजिक समरसतेचे धडे इथेच मिळत होते.


        त्यांचे दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण मॉडर्न विद्यालयात झाले. त्यांनी शालेय जीवनात अरुण फडणीस यांच्याकडून चित्रकलेचे प्राथमिक धडे गिरवले. वयाच्या तेराव्या वर्षापासूनच चित्रकलेत रवींद्र देवांना चांगली गती होती. त्यांच्या आईवडिलांनी, तसेच थोरले काका चिंतामणी देवांनी चित्रकलेचे साहित्य देऊन रवींद्रच्या चित्रकलेला सतत प्रोत्साहन दिले. वयाच्या तेराव्या वर्षी चिंचवड संस्थानाने मोरया गोसावींच्या व चिंतामणी महाराजांच्या जीवनावरील प्रसंगचित्रे काढण्याची संधी त्यांना दिली. फडणीस सरांनी त्यांच्यातील गुण हेरून अभिनव कला महाविद्यालयात प्रवेश घेण्यापर्यंत सतत केलेला पाठपुरावा या क्षेत्रात स्थिरावण्यास त्यांना मार्गदर्शक ठरला आणि निसर्गचित्रण व स्केचिंगसाठी त्यांनी सामूहिक प्रयत्न केले. शिस्त, अनुशासन, काटेकोरपणा, वेळ पाळणे व सातत्य या संस्कारांमुळे शिक्षण, व्यवसाय व सामाजिक जीवन यांमध्ये ते यशस्वी झाले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर चित्रकलेत प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. लंडन येथील राम अगरवाल यांच्यासाठी भारतीय संस्कृती या विषयावर चित्र काढण्याची संधी त्यांना मिळाली.


नवे बदल, नवे माध्यम यांमुळे चित्रकलेचे उपयोजित अंग असणार्‍या जाहिरात क्षेत्राच्या व्यवसायात देव उतरले. प्रथम घर, घरातून वाड्याची ओसरी नंतर स्वतःचे आधुनिक कार्यालय अशी त्यांची व्यावसायिक प्रगती झाली. त्यांनी १९८६ मध्ये ‘ग्रफी अ‍ॅडव्हर्टायझिंग अ‍ॅण्ड मार्केटिंग’ या नावाने फर्म सुरू केली व व्यावसायिक क्षेत्रात चित्रकलेचा समर्पक उपयोग केला. त्याचबरोबर ‘संस्कार भारती’ या कलाक्षेत्रातील संघटनेत समाजात कलाविषयक जाण वाढावी व कलावंतांनी एकत्र येऊन कलाविषयक कार्यक्रम करावेत या दृष्टीने संघटक म्हणून ते काम करू लागले.


संस्कार भारतीमुळे त्यांना चित्रकलेचा प्रचार व प्रसार करण्याची संधी मिळाली. या माध्यमाद्वारे ते चित्रकला या विषयात विविध प्रयोग करत राहिले. त्यातून त्यांनी साप्ताहिक चित्रकला वर्ग हा उपक्रम अत्यंत यशस्वीपणे राबविला. कलावंतांचा व्यक्तिगत अहंकार बाजूला सारून कलाकारांचे संघटन झाले व या प्रयोगामुळे या क्षेत्रात अनेक मान्यवर व सामान्य कलाकार एकत्र आले. अनेक चित्रकार तयार झाले. कला व विचार यांची देवाणघेवाण झाली. चांगला संवाद घडून आला. कामात सुसूत्रता व उत्तम नियोजन यांमुळे निसर्गचित्रणाचे वर्गही सुरू झाले. संकुचितता कमी झाली. कलाकारांमध्ये आत्मीयता व सहकारीवृत्ती वाढली. विविध वयांचे लोक एकत्र आल्याने लहान-मोठे हे वयाचे अंतर गळून पडले आणि सर्व चित्रकार समभावनेने, सामूहिकतेने काम करू लागल्याने सहभागी कलाकारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर दाद मिळू लागली. त्यांच्यात सामाजिक जाणीवही निर्माण झाली.


स्थानिक पातळीवर काम करताना देशाच्या इतर प्रांतांत : कर्नाटक, तामीळनाडू, आंध्र प्रदेश, झारखंड, उत्तर प्रदेश, अरुणाचल, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली अशा अनेक ठिकाणी चित्रकला या विषयासाठी त्यांनी वर्षानुवर्षे प्रवास करून प्रात्यक्षिके, व्याख्याने, कला व संघटन, विविध उपक्रम यांसाठी मार्गदर्शन केले. या प्रांतांत त्यांनी अनेक ठिकाणी साप्ताहिक चित्रकला व निसर्गचित्रण वर्गाचा उपक्रम सुरू केला.


असे विविध उपक्रम सुरू असतानाच रवींद्र देव यांनी स्वतःचा चित्रकलेचा सराव सुरू ठेवला व विविध माध्यमे हाताळली. पोटर्र्ेट सोसायटी ऑफ अमेरिकाचे ते सदस्य आहेत. फिलाडेल्फिया येथे २००८ मध्ये झालेल्या व्यक्तिचित्रण कार्यशाळेत ते सहभागी झाले होते. त्यांच्या मासिकासाठी रवींद्र देव यांचे चित्रही निवडले गेले होते. दक्षिण कर्नाटक, तवांग, आसाम, मेघालय या ठिकाणी ते प्रत्यक्ष पेंटिंगसाठी जाऊन आले. त्यांची पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर, आर्ट टू डे गॅलरी, जहांगीर आर्ट गॅलरी, तसेच चित्रकला परिषद, बंगळुरू येथे वैयक्तिक व सामूहिक चित्रप्रदर्शने झाली आहेत.

याशिवाय अनेक सामाजिक व स्वयंसेवी संस्थांमध्ये ते प्रत्यक्ष कामांत सहभागी आहेत. अखिल भारतीय चित्रकला संयोजक म्हणून संस्कार भारतीची मोठी जबाबदारी रवींद्र देव पार पाडत आहेत. त्यांचा व्यवसाय सांभाळताना, सामाजिक व सांस्कृतिक जबाबदार्‍यांत कमर्शिअल आर्टिस्ट व शास्त्रीय गायिका असलेली त्यांची पत्नी स्वाती, (पूर्वाश्रमीची करंदीकर) हिची सदैव उत्तम साथ असते. प्रचंड धावपळीच्या जीवनातही रोज नेमाने चित्रकलेचा रियाज हे त्यांचे वैशिष्ट्य होय. त्यांच्या संघटन व संवाद यांच्या कौशल्यामुळे, तर निगर्वी व साधी राहणी व उच्च विचारसरणी यांमुळे अनेक माणसांशी व कुटुंबांशी ते नाती जोडून आहेत.

- डॉ.नयना कासखेडीकर.पुणे

------------------------

चित्रकार- ग.ना.जाधव

 चरित्र नायक 

चित्रकार- ग.ना.जाधव

१४ नोव्हेंबर १९१७ - ५ जानेवारी २००४


मासिकांची मुखपृष्ठे, विविध लेख, कथांसाठीची रेखांकने, व्यक्तिचित्रे व निसर्गचित्रांसाठी प्रसिद्ध असलेले चित्रकार गजानन नारायण ऊर्फ ग.ना. जाधव यांचा जन्म कोल्हापूरचा; परंतु त्यांची कर्मभूमी मुंबई-पुणे होती. त्यांच्या आईचे नाव तानाबाई. परिस्थितीमुळे त्यांचे शालेय शिक्षण केवळ चौथ्या इयत्तेपर्यंत झाले. लहानपणापासून ते चित्रकलेत रमत. अठराव्या वर्षी त्यांनी चित्रकलेच्या गे्रड परीक्षा दिल्या व प्रत्येक वेळी अव्वल यश संपादन केले. इथूनच त्यांच्या चित्रकलेचा प्रवास सुरू झाला. घरीच गणपतराव वडणगेकर व बाबूराव पेंटर यांच्याकडून चित्रकलेचे धडे घेणे सुरू झाले. पुढे बाबा गजबर, माधवराव बागल, चित्रकार जांभळीकर या गुरूंचेही त्यांना मार्गदर्शन मिळत
गेले. १९४२ मध्ये त्यांचा विवाह इंदिरा कदम यांच्याशी झाला.

     रेखाटनांवरचे प्रभुत्व पाहून माधवराव बागल यांनी जाधवांना शंकरराव किर्लोस्करांकडे पाठविले. चित्रकलेतले ज्ञान, कौशल्य व श्रम बघून शंकररावांनी जाधवांना किर्लोस्कर कंपनीत नोकरीस ठेवून घेतले. त्यांना संधी मिळावी म्हणून माधवराव बागल यांनी शिफारसपत्र दिले होतेच. जाधवांच्या आयुष्याला येथे दिशा मिळाली. किर्लोस्कर कंपनीत, ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’ व ‘मनोहर’ या मासिकांसाठी मुखपृष्ठ व आतील मजकुरांसाठी रेखाचित्रे काढण्याचे काम होते. सतरा वर्षांच्या या प्रयोगशील चित्रकाराने हे काम करताना विविध तंत्रे वापरून अनेक प्रयोग केले. ही नोकरी चालू असतानाच त्यांनी मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून १९५३ मध्ये जी.डी. आर्ट पेन्टिंगचा अभ्यासक्रम प्रथम श्रेणीत पूर्ण केला.

      या कंपनीत मासिकांचे काम करताना खर्या अर्थाने जाधवांच्या प्रतिभेला वाव मिळत होता. इथे त्यांचा चित्रकलेबरोबर वाङ्मयाचाही अभ्यास होत होता. मासिकांसाठी आलेले लेख, कथा, कविता आधी वाचून त्यावर चित्रे काढावी लागत असत. जाधव चित्रण योग्य प्रसंग निवडत व त्यांचे तेवढेच उत्कृष्ट, परिणामकारक चित्र वा रेखाटन करीत. मोठमोठ्या साहित्यिकांचा सहवास व मार्गदर्शन मिळाल्यामुळे कलेला पोषक असे वातावरण त्यांना लाभले.

      चित्राचा विषय, त्याची मांडणी, त्यातली गती, भावनेचा आविष्कार, कुंचल्यावरील प्रभुत्व, रंगातली कलात्मकता यामुळे अल्पावधीतच सार्या महाराष्ट्रातील लोक त्यांना ओळखू लागले. मासिकांच्या मुखपृष्ठासाठी ग.ना. जाधव, दलाल आणि सिरूर हे तीन कलाकार प्रसिद्ध होते. या सर्वांनी चित्रांबद्दल एक अभिरुची निर्माण केली. जाधवांनी चित्रातून महाराष्ट्राची कालानुरूप बदलत चाललेली संस्कृती, ग्रमीण संस्कृती, सण, उत्सव, कला, नामांकित व्यक्तिमत्त्वे यांचा परिचय वाचकांना करून दिला. दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठांवरील कौटुंबिक प्रसंग-चित्रांमुळे वाचकांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित होत असे. अशा चित्रांच्या माध्यमातून आपोआपच वाचकांवर भारतीय संस्कृती व परंपरांचे संस्कार होत असत. ना.सी फडके यांच्या ‘अंजली’ मासिकासाठी व डॉ. सरोजिनी बाबर यांच्या अनेक पुस्तकांसाठी तसेच अनेक कथा, कादंबर्यांसाठीही त्यांनी रंगचित्रे काढली.

         सुरुवातीपासून पेन्सिल, चारकोल, पेन व शाईचा योग्य वापर, ब्रश व फटकार्यातील विविधता, काळ्या-पांढर्या रंगातील आकारांची समर्पक, ठसठशीत मांडणी यांमुळे त्यांची चित्रे वैशिष्ट्यपूर्ण ठरत असत. अशा प्रकारे रेखाटनांमध्ये ते विविध तंत्रांचा अवलंब करीत. ब्रॉड स्ट्रोक, बारीक टोकाने पण हळुवारपणे हाताने काढलेली ओघवती व सफाईदार रेषा, रचनाकौशल्य, योग्य ठिकाणी मनुष्याकृतीचा वापर, यामुळे चित्राची गुणवत्ता वाढत असे. स्केचिंग करताना रेल्वेत बसलेले प्रवासी, रस्त्यावरील भिकारी, नदीवरील यात्रेकरू यांची चित्रे ते ‘स्नॅपशॉट’प्रमाणे काढत. ते कुठेही प्रवासात, गायनाच्या मैफलीत लग्न-समारंभात, कार्यक्रमात, सण-उत्सवांत प्रत्यक्ष त्या प्रसंगाची चित्रे काढीत. हा जिवंत प्रसंग चित्रात पकडण्यासाठी त्यांच्या खिशात नेहमी स्केचबुक व पेन्सिल असायची. त्यांना हे व्यसनच होते. घाईघाईत टिपलेले ते स्केच फावल्या वेळेत व्यवस्थित करून, कटिंग, पेस्टिंग व माउण्ट करून ठेवत.

         त्यांची निसर्गचित्रेही दर्जेदार असत. आउटलाइन व जलरंग माध्यमावर त्यांची हुकमत होती. रंगलेपनातील धीटपणा, पारदर्शकता, काही ठिकाणी पांढरा रंग वापरून ‘ग्वॉश’ पद्धतीचे चित्रण, अपारदर्शक पोस्टर कलर्सचा ब्रश व नाइफने केलेला वापर, यांमुळे चित्र आकर्षक व्हायचे. जलरंग माध्यमातील ‘दादा’ या त्यांच्या चित्रास १९७१ मध्ये महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनात प्रथम पारितोषिक मिळाले होते. महाराष्ट्राच्या इतिहासाचे प्रतीक असलेले त्यांचे ‘कल्याणचा खजिना’ हे चित्र त्यांनी भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना भेट दिले होते. हे चित्र आजही दिल्लीला राष्ट्रपती भवनाच्या संग्रहात विराजमान आहे. दिल्लीच्या तालकोटा मैदानावर १९५१ मध्ये ‘कृषिप्रधान हिंदुस्थान’ हे कृषिप्रदर्शन आयोजित केले होते. महाराष्ट्राच्या स्टॉलवर जाधवांच्या चित्रांचे प्रदर्शन होते. भाऊ किर्लोस्करांनी किर्लोस्करवाडीहून या प्रदर्शनासाठी चाळीस जणांचा जामानिमा स्वखर्चाने दिल्लीला पाठविला होता. प्रदर्शन बघायला आलेल्या पंडित नेहरूंनी या मराठी कलासाधकाचे भरभरून कौतुक केले. मार्च १९६१ च्या ‘स्त्री’ मासिकाच्या मुखपृष्ठावरील पंडित नेहरू, इंदिरा गांधी व लहानगा राजीव गांधी या तीन पिढ्यांच्या चित्रावर पंडितजी खूश झाले. त्या चित्रावर त्यांनी स्वाक्षरी केली. याच प्रसंगी जाधवांनी पंडित नेहरू व इंदिरा गांधींचे केलेले एक मूळ चित्र नेहरूंना भेट दिले.

      जलरंगांच्या व्यक्तिचित्रातील ग.ना. जाधव यांचे कौशल्य वाखाणण्याजोगे होते. रंगात आधुनिकतेची छाप, पण मॉडर्न आर्टची दुर्बोधता नाही. चित्रात कुठेही विकृती नाही. त्यात भावनेचा आविष्कार व गतीही होती. तंत्र, प्रतिभा, भावना आणि बुद्धी यांचा सुरेख संगम या कलासाधकात पाहायला मिळतो.

     पुणे विद्यापीठातील कर्मवीर शिंदे व ना. यशवंतराव चव्हाण, नवीन विद्याभवनातील पंडित जवाहरलाल नेहरू, ‘ल.का.कि.’ यांच्या संग्रहातील लक्ष्मणराव किर्लोस्कर व शंतनुराव किर्लोस्कर, बालगंधर्व कला दालनातील बालगंधर्व, नाशिक येथील कला महाविद्यालयातील ‘अरुणा’ हे चित्र, अशी अनेक उत्तम चित्रे ग.ना. जाधवांच्या कौशल्याची साक्ष देतात. प्रसिद्ध लेखक वि.द. घाटे यांच्या प्रत्यक्ष सिटिंंगवरून काढलेल्या ‘दादा’ या चित्रास तर पुरस्कार मिळाला.

     त्यांनी अनेक नामांकित व्यक्तींची प्रत्यक्ष सिटिंगवरून काढलेली चित्रे आहेत; त्यांत कलामहर्षी बाबूराव पेंटर, गणपतराव वडणगेकर, कर्मवीर भाऊराव पाटील, म.म. दत्तो वामन पोतदार, प्र.के.अत्रे, शिल्पकार तालीम, शंकरराव किर्लोस्कर, शंतनुराव किर्लोस्कर, कवयित्री शांता शेळके, ह.ना. आपटे, ना.सी. फडके, मालती किर्लोस्कर, अनंत काणेकर, चित्रकार अलमेलकर, चित्रकार रवींद्र मिस्त्री, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, कवी मनमोहन, गोपीनाथ तळवलकर यांचा समावेश आहे.

     केंद्र सरकारतर्फे लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचे टपालतिकीट काढण्यात आले तेव्हा लक्ष्मणराव किर्लोस्करांचे छायाचित्र न घेता त्या तिकिटाचे डिझाइन किर्लोस्कर यांच्या आग्रहावरून ग.ना. जाधव यांच्याकडून घेतले गेले व तेच शासनाने प्रसिद्ध केले.

      ग.ना. जाधव यांना चित्रात वास्तवता दाखवायला आवडायची; पण आधुनिक कलेचेही ते निरीक्षण करत. त्यांचे आवडते चित्रकार म्हणजे व्हॅन गॉग, मातिस, मॉदिग्लियानी, रेम्ब्रां, पिकासो, हुसेन व रझा हे होते. ग.ना. जाधवांचे वयाच्या सत्त्याऐंशीव्या वर्षी निधन झाले.

- डॉ. नयना कासखेडीकर

--------------------------------------------

चित्रकार व गणेश मूर्तिकार- दत्तात्रय खटावकर

 

                                        चरित्र नायक 

शिल्पकार,चित्रकार व मूर्तिकार- दत्तात्रय खटावकर

जन्म- ४ एप्रिल १९२९, मृत्यू - २३ जानेवारी २०१६


     पुण्यातील गणपतिउत्सवात गेली चार दशके डी.एस. खटावकर यांचे नाव त्यांच्या अलंकरणात्मक गणेशमूर्ती व कलात्मक सजावटीसाठी प्रसिद्ध आहे. पुण्यातील अनेक तरुण चित्रकारांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्यासोबतच अलंकरणात्मक शैलीतील चित्रे काढण्यासाठीही ते प्रसिद्ध आहेत.

दत्तात्रेय श्रीधर खटावकर यांचा जन्म पुण्यातील सुप्रसिद्ध तुळशीबाग मंदिराच्या परिसरात श्रीधर व चंद्रभागा या दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे शालेय शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, नानावाडा या शाळेत झाले. लहानपणापासूनच त्यांना चित्रकला व मूर्तिकलेची आवड होती. त्यांच्या घराजवळच असणार्या दादा केळकर यांच्या ‘केळकर चित्रशाळे’तील नाटकांचे कलात्मक पडदे, हालत्या पुतळ्यांची उभारणी व साइनबोर्ड ते व्यक्तिचित्रे अशा सर्व कामांचा त्यांच्यावर संस्कार झाला.

शालेय शिक्षणानंतर खटावकरांनी कलाशिक्षणासाठी इन्स्टिट्यूट ऑफ मॉडर्न आर्ट (सध्याचे अभिनव कला महाविद्यालय) येथे प्रवेश घेतला. रेखाकला व रंगकला या विषयांची पदविका ते १९५३ मध्ये उत्तीर्ण झाले. याच काळात त्यांनी उपयोजित कला व हस्तकला या विषयांचेेही शिक्षण घेतले. १९५४ मध्ये त्यांचा विवाह फलटणच्या कुसुम काकडे यांच्याशी झाला.

खटावकर १९५३ ते १९८९ या काळात कलाशिक्षण क्षेत्रात कार्यरत होते. लोणी-काळभोरचे अध्यापक महाविद्यालय, पुण्यातील मुलींचे आगरकर विद्यालय व अभिनव कला महाविद्यालयात त्यांनी शिकविले असून १९९६ मध्ये भारती विद्यापीठ, पुणे येथे त्यांनी कलाशिक्षणविभागाची नव्याने सुरुवात केली. याशिवाय पुण्याच्या गणपतिउत्सवात खटावकर विद्यार्थ्यांसह गणेशमूर्ती व अलंकरणात्मक सजावटीच्या कामात आपला शिक्षकी पेशा सांभाळून रात्री उशिरापर्यंत व्यग्र असत. किंबहुना, त्यांच्या घराच्या जिन्याखालची जागा ही अशा प्रकारचे शिक्षण देणारी व रात्रंदिवस सुरू असणारी शिक्षणसंस्थाच होती. या संस्थेत पात्रतेची अट किंवा फी नव्हती, तसेच स्त्री-पुरुष असा भेदभाव न करता कोणालाही मुक्त प्रवेश असे व अनेक तरुण-तरुणी यातून चित्र - शिल्पकलेकडे वळल्या.

खटावकर १९५३ पासून तुळशीबाग या मानाच्या गणपतिउत्सवाच्या कार्यात सहभागी असून १९७५ मध्ये त्यांनी गणेशमूर्ती व सजावट करण्यासाठी फायबरग्लासचा प्रथमच वापर केला व या माध्यमाचा वापर चित्रपट व बांधकाम क्षेत्रांत पुढील काळात मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. आज हे माध्यम अत्यंत लोकप्रिय असून त्याचा कलात्मक मूर्तीसाठी महाराष्ट्रात यशस्विरीत्या प्रथम वापर करण्याचे श्रेय खटावकर यांना जाते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘जाणता राजा’ या नृत्यनाट्यातील १४ फूट उंचीची महिषासुरमर्दिनीची बारा भागांची व जोडता येणारी मूर्ती त्यांनीच बनविली आहे.


याशिवाय पंढरपूर येथील संत नामदेव महाराजांचा रथ व प्रतापगडावरील भवानी देवीच्या देवळातील देवीचे मखर ही खटावकरांची फायबरग्लास या माध्यमातील महत्त्वाची कामे आहेत. अनेक पौराणिक व ऐतिहासिक देखावे आणि गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीतील त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण रथ लक्षवेधक ठरले.

सार्वजनिक उत्सव व त्यातील अलंकरणात्मक सजावटीतून सामान्य जनतेला आकर्षित करण्याचे त्यांचे कार्य, त्यांचे चिरंजीव विवेक यांनी सुरू ठेवले आहे. त्यांनी केलेली मंडईचा गणपती व दगडू शेठ हलवाई या गणपतीची कामे गाजली आहेत. याशिवाय स्मारके, शिल्पे, समारंभाची भव्य सजावट या क्षेत्रांतही खटावकर पिता-पुत्रांनी नावलौकिक संपादन केला आहे.

                        

गणेशोत्सव मिरवणुकीतील सजावट हे दालन खटावकर यांनी सुरु केले. कलाकारांना आणखी एक क्षेत्र उपलब्ध झालं.

- डॉ. नयना कासखेडीकर

------------------


Wednesday, 4 February 2026

शिल्पकार-बी आर खेडकर

                                                   

चरित्र नायक -शिल्पकार चरित्र कोश

शिल्पकार-बी आर खेडकर

१२ ऑगस्ट १९२६, मृत्यू १३ ऑगस्ट २०१६

 
                                       

ज्यांची स्मारकशिल्पे सर्वाधिक संख्येने महाराष्ट्रभर लागली आहेत असे शिल्पकार म्हणजे बी.आर. खेडकर. त्यांच्या आईचे नाव चंद्रभागा. खेडकरांच्या वडिलांचा गणपतीच्या मूर्ती व खेळणी बनविण्याचा व्यवसाय होता. लहानपणीच मातृ-पितृछत्र हरपल्याने वडीलबंधू दत्तोबा खेडकर यांनीच बी.आर. खेडकरांना वाढविले. घरातच मूर्तिकाम होत असल्याने त्यांना साहजिकच त्यात रस होता. शाळेत जाता-येता शिवाजी प्रिपरेटरी हायस्कूलच्या आवारातील शिवाजी महाराजांचा पुतळा ते तासन्तास न्याहाळत असत. ‘अशी भव्य मूर्ती आपल्याला कधी बनवता येईल’ हा ध्यास त्यांच्या बालमनाने घेतला आणि हीच त्यांच्या शिल्पसाधनेची सुरुवात ठरली. केवळ दुसर्या इयत्तेपर्यंत शालेय शिक्षण घेतलेल्या खेडकरांनी शिल्प किंवा चित्रकलेचे रीतसर शिक्षण न घेताच स्वत:ची कला विकसित केली.

खेडकर पुण्यात १९५०-१९५५ च्या दरम्यान गणेशाच्या सुबक मूर्ती, सजावटी, ऐतिहासिक, पौराणिक, राजकीय व सामाजिक विषयावरील देखावे व सजावटी करत. त्यामुळे त्यांना नावलौकिक मिळाला. पण यात ते समाधानी नव्हतेे. शिल्पकार करमरकरांनी केलेल्या शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याने त्यांच्या मनात घर केले होते. त्याचा प्रभाव इतका होता की, लहानपणी त्यांनी गणपतीची मूर्ती बनवली होती व तिला शिवाजी महाराजांचे तोंड लावले होते!

मूर्तिकामातून मिळणारे पैसे व गरिबी यांचा ताळमेळ बसत नव्हता. म्हणून त्यांनी सिनेमा क्षेत्रात, स्टूडिओतील सेटवर कलात्मक काम करण्याचे ठरविले. भालजी पेंढारकरांच्या पुण्यातील स्टूडिओत खेडकरांना नोकरी मिळाली. त्यानंतर प्रभात फिल्म कंपनीतल्या उमेदवारीच्या काळात दिग्दर्शक फत्तेलाल व मोल्डिंग विभागाचे सोनोपंत परदेशींनी त्यांना मोल्डिंग कौशल्यांबरोबर व्यवहारी जीवनासंबंधीही मोलाचे मार्गदर्शन केले. पुढे मुंबईच्या मोहन स्टूडिओत त्यांनी के. आसिफ यांच्याकडे नोकरी केली. तेथे खेडकर यांनी मुगल-ए-आझम या चित्रपटाचे भव्य सेट व शिल्पे तयार केली. याच वेळी त्यांनी सिनेसृष्टीला डमी पात्रासाठी मुखवटा तयार करण्याच्या तंत्राची ओळख करून दिली. यानंतर मात्र ते सिनेसृष्टीतील नावलौकिक व पैसा सोडून पुण्यात परतले व त्यांनी शिल्पकलेला वाहून घेतले.

                                            

१९६१ मध्ये घडविलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा हे खेडकरांचे पहिले शिल्प होय. हा पुतळा सातार्याला पवई नाका येथे आहे. आशिया खंडातला सर्वांत मोठा समजला जाणारा शिवाजी महाराजांचा साडेअठरा फुटांचा अश्वारूढ पुतळा कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र व अमेरिकेतील सॅन होजे येथील त्यांनी बनविलेले शिवाजी महाराज, संत बसवेश्वर, श्रीमंत बाजीराव पेशवे असे अश्वारूढ पुतळे त्यांच्या शिल्पप्रतिभेची साक्ष देतात.

                                       
शाहू महाराज, संभाजी महाराज, महात्मा गांधी, जोतिबा फुले, डॉ. आंबेडकर, महर्षी कर्वे, स्वा. सावरकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आचार्य अत्रे, यशवंतराव चव्हाण, इंदिरा गांधी, राजीव गांधी, एस.एम. जोशी, साधू वासवानी यांचे पूर्णाकृती पुतळे त्यांनी तयार केले आहेत. अहिल्याबाई होळकर, कस्तुरबा गांधी, क्रांतिवीर नाना पाटील, लाल बहादूर शास्त्री, पं. नेहरू, सुभाषचंद्र बोस इत्यादींचे ३०० ते ४०० अर्धपुतळे त्यांनी तयार केले आहेत.

पुण्यातील शनिवार वाड्यासमोरील दिल्ली दरवाज्याकडे असलेला,थोरले बाजीराव पेशवे यांचा पुतळा खेडकर यांनीच तयार केला.


                                       
शिल्पाची प्रमाणबद्धता, साधर्म्य, आविर्भाव, व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास, इतिहासाच्या जाणकारांकडून शिल्पाचे परीक्षण करून घेण्याची पद्धत यांमुळे खेडकरांची शिल्पे जनसामान्यांनाही आवडतात. स्मारकशिल्पांच्या व व्यावसायिक कामात शिल्पकार खेडकर गुंतले होते. त्यामुळे आयुष्यात शिल्पकलेची कलात्मक अभिव्यक्ती व प्रयोगशील आविष्कार यांकडे ते वळू शकले नाहीत.

खेडकरांना ‘फाय फाउण्डेशन’ पुरस्कार, पुणे विद्यापीठाचा ‘जीवन साधना’ पुरस्कार, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा ‘लोकमान्य कलोपासक’ पुरस्कार, २००७ चा भारती विद्यापीठाचा ‘जीवन गौरव’ पुरस्कार, शारदा ज्ञानपीठाचा ‘महर्षी’ पुरस्कार, असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

- डॉ. नयना कासखेडीकर

--------------------

Tuesday, 3 February 2026

ज्येष्ठ नाट्य समीक्षक वि.भा.देशपांडे


                                                 मराठी विश्वकोश कोश नोंद -नाट्य शास्त्र

ज्येष्ठ नाट्य समीक्षक वि.भा.देशपांडे

डॉ. देशपांडे विश्वनाथ भालचंद्र उर्फ विभा (जन्म- ३१मे १९३८,पुणे, मृत्यू- ९मार्च २०१७,पुणे.),


नाट्य समीक्षक वि भा. देशपांडे यांचा जन्म पुणे येथे ३१ मे १९३८ रोजी झाला. पुणे येथील नूतन मराठी विद्यालय आणि स.प. महाविद्यालय येथे त्यांचे शालेय आणि एम ए पर्यन्त, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले. विद्यार्थी दशेतच त्यांच नाटकात सहभाग सुरू झाला. नूमवि प्रशालेत स्पर्धा, वार्षिक संमेलने, आंतरशालेय नाट्य वाचन स्पर्धेत सहभाग आणि यश. आणि नाट्य प्रेमी शिक्षक यांचे संस्कार या काळात झाले. तर महाविद्यालयीन जीवनात सुद्धा नाटक आणि एकांकिका यामध्ये सहभाग असायचा. त्यासाठी काही बक्षिसेही त्यांना मिळाली होती. पुढे पीडिए(प्रोग्रेसिव्ह ड्रामाटिक असोसिएशन) आणि रंगायन या संस्थांशी त्यांचा संबंध आला. एकीकडे शिक्षण चालू असताना त्याच वेळी रंगभूमीचा अभ्यास व नाट्यानुभव घेणं पण चालू होतं. पदवी नंतर, साधारण १९६३ पासून त्यांचे नाट्य विषयक लेखन सुरू झाले. प्रसिद्ध अशी पुरुषोत्तम नाट्यस्पर्धा त्याच वेळी सुरू झाली होती त्यात पहिल्याच वर्षी भाग घेतला,तेंव्हापासून पुढची पन्नास वर्षे स्पर्धक, परीक्षक, संयोजक आणि प्रमुख पाहुणे या नात्याने ते पुरुषोत्तमशी जोडलेले राहिले. पुढे स्पर्धेवर त्यांनी समीक्षात्मक लेखन सुरू केले.

महाविद्यालयीन शिक्षणानंतर ते सांगली येथील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले.त्यानंतर १९७१ मध्ये ते पुण्याच्या मॉडर्न महाविद्यालयात मराठी आणि नाट्यशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यांचे नाट्य विषयक लेखन सुरूच होते. मॉडर्न महाविद्यालय, एम.ई.एस व विलींग्डन महाविद्यालयात त्यांनी ३५ वर्षे अध्यापनाचे काम केले.मॉडर्न महाविद्यालयातून ते १९९८ मध्ये निवृत्त झाले. नंतरचा पूर्ण वेळ नाट्य समीक्षक म्हणून काम केले. पुणे विद्यापीठ, फर्ग्युसन कॉलेज शिवाजी विद्यापीठ, मराठवाडा विद्यापीठ येथे त्यांनी नाट्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोळा विद्यार्थ्यानी पीएचडी आणि एम फिल चे प्रबंध संशोधन केले आहे.

नाटकातल्या माणसांच्या सहवासात वावरत असताना ,रंगभूमि समजून घेत असताना आणि ट्य विषयी लेखन करत असताना विभांना वाटले की, या विषयातले सैद्धांतिक ज्ञान संपादन करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी सर्वोच्च अशी पदवी मिळवण पण आवश्यक आहे म्हणून त्यांनी डॉक्टरेट मिळवायचे ठरविले. ‘पौराणिक आणि ऐतिहासिक नाटकातील व्यक्तिरेखाटण’ (१८८०ते१९८०), या नाट्यविषयावर त्यांनी पीएचडी केली.पीएचडी ही पदवी १९७४ साली यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते मिळाली. त्यांनी मराठी, बंगाली, कर्नाटक, अशा वेगवेगळ्या रंगभूमीचा अभ्यास केला. नाट्य परंपरेचे सामाजिक भान शोधण्यासाठी ते भारतभर फिरले. संस्कृत, हिन्दी, छत्तीसगढी, कन्नड, तमीळ, तेलुगू, पंजाबी, गुजराथी, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन या भाषेतली नाटके ही पाहिली,अभ्यासली. वेगवेगळ्या वृत्तपत्रात लिखाण करण्याबरोबर त्यांनी नाटक या विषया संबधी जवळ जवळ ५० ग्रंथ लिहिले व काही संपादित केले आहेत.

पाच दशकाहून जास्त काळ ते सांस्कृतिक अर्थात नाट्य क्षेत्रात कार्यरत होते. नाट्य विषयक रंगमंचीय कार्यक्रम , सादरीकरण, एकपात्री प्रयोग, व्याख्याने, चर्चा यात त्यांचा मार्गदर्शक, संहिता लेखक आणि वक्ता म्हणून सहभाग असायचा. त्यांचे नाट्य विषयक दहा स्वतंत्र ग्रंथ आहेत. नाट्य विषयक संपादित पंधरा ग्रंथ आहेत. त्यांनी मराठी वाड:ग्मयात टाकलेली मोलाची भर म्हणजे, त्यांचा १२०० पानी मराठी नाट्यकोश २००० साली प्रकाशित झाला. हा नाट्यकोश भारतातला पहिला कोश आहे. मराठी भाषेतील नाट्य सृष्टीतीची साद्यंत माहिती देणारा हा मराठीतलाही पहिला नाट्यकोश मानला जातो. या कोशासाठी खुद्द तात्यासाहेब शिरवाडकर यांनी त्यांना प्रेरणा दिली होती. दीडशे वर्षात असा नाट्य कोश मराठी रंगभूमीसाठी असलेला उपलब्ध नव्हता. हा कोश म्हणजे विसाव्या शतकात रंगभूमीला मिळालेली देणगी ठरली. विष्णुदास भावे यांच्या पासून ते तेंडुलकर यांच्या पर्यंत नाटककारांचा अभ्यास त्यांनी केला. मराठी रंगभूमीचा शंभर वर्षांचा कालखंड त्यांनी शब्दबद्ध केला. यात दीडशे वर्षातील नाटके, नाटककार, कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, समीक्षक, पडद्या मागील मदतनीस, प्रेक्षक, नाट्यसंस्था, नाट्यगृह, नाट्यनिर्माते, नाट्य ग्रंथ, नियतकालिके, संमेलनाध्यक्ष, नाट्य परिनिरीक्षण मंडल आणि भारतीय रंगभूमीचा आलेख इत्यादी माहिती आहे. या कोशाचा हिन्दी अनुवाद सुद्धा प्रकाशित झाला आहे.

संस्कृतिक आणि नाट्य क्षेत्रात त्यांचा सतत वावर असायचा. कोणत्याही नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला ते आवर्जून जायचे. सभासमारंभाला जायचे. नाट्य विषया बरोबरच माणसे जोडण्याची त्यांची आवडती कला होती. रंगमंचीय मित्रच असायचे ते सर्वांचे. मराठी नाट्य समीक्षा करताना ते अभिनेते, दिग्दर्शक यांच्याशी चर्चा करत, नाटक, साहित्य आणि संगीत या त्यांच्या आवडत्या विषयावर प्रेम असल्याने त्यांना या संदर्भात,नाटके पाहताना व या क्षेत्रातील संबंधित माणसांना भेटताना त्यांच्या या साहित्य आणि नाट्य प्रवासात अनेक दिग्गज माणसे भेटली. त्यावर सुद्धा त्यांनी ‘भ्रमणगाथा’ हे पुस्तक लिहिले.

या प्रवासात त्यांना आचार्य अत्रे, वि.वा.शिरवाडकर, पु.ल.देशपांडे, वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, निळू फुले, विजया मेहता, ज्योत्स्ना भोळे, पंडित भीमसेन जोशी, कमलाकर सारंग, अशी दिग्गज नाटककार मंडळींशी विभांचा संपर्क आला. मैत्री झाली. त्यांच्यावर विभांनी पुस्तके लिहिली. यात त्यांची नाटके , त्यांचे प्रयोग, त्या त्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ठ्ये त्यांनी लिहिली आहेत. त्यामुळे या पुस्तकातून रंगभूमीच्या इतिहासातील अनेक प्रसंग व घटना उलगडल्या आहेत.

त्यांची आणखी काही पुस्तके म्हणजे, नाटकातील माणसे, गाजलेल्या भूमिका, नाटक नावाचे बेट, निळू फुले, निवडक नाट्यप्रवेश-पौराणिक,निवडक नाट्यप्रवेश ऐतिहासिक ,निवडक नाट्यप्रवेश सामाजिक, भाग एक व भाग दोन, वारसा रंगभूमीचा, आचार्य अत्रे प्रतिभा आणि प्रतिमा, कालचक्र एक अभ्यास, नटसम्राट एक आकलन, नाटककार खानोलकर, नाट्यरंग (कलावंतांच्या मुलाखती), नाट्य मित्र, नाट्य व्यक्तिरेखाटण-पौराणिक, ऐतिहासिक, नाट्यसंवाद रचना कौशल्य, नाट्यस्पंदने (नाट्य विषयक लेख), निवडक नाट्य मनोगते, मराठी नाटक पहिले शतक, मराठी रंगभूमी-स्वातंत्र्यपूर्व मराठी नाटक व स्वातंत्र्योत्तर काळ, रंगभूमीचा इतिहास - खंड एक व खंड दोन, माझा नाट्यलेखन-दिग्दर्शनाचा प्रवास, यक्षगान लोकनाटक, रायगडला जेंव्हा जाग येते-सिंहावलोकन, (१९६३ पासूनच्या) स्फुट आणि ग्रंथ स्वरूपाचे लेखन, स्वातंत्र्योत्तर मराठी नाटक, वसंत शिंदे व्यक्ति- कलावंत, मराठी एकांकी, अशी नाट्य विषयक पुस्तके प्रकाशित आहेत.नाटकातली माणसं या त्यांच्या पुस्तकात विभांनी प्रेक्षक म्हणून नाटकातल्या माणसांना फक्त रंगमंचावर बघता येते परंतु, नाट्य वेड आणि नाट्य अभ्यासामुळे विभांनी, मुखवट्या पलीकडची माणसे अनुभवली.त्या माणसांच्या सृजनाचा अनुभव घेतला. त्यांच्यातले माणूसपण शोधले. त्यांच्या या पन्नासाव्या पुस्तकात निवडक वीस कलाकार अर्थात नाटकीय माणसे त्यांनी मांडली आहेत, ती आहेत भालचंद्र पेंढारकर, शिलेदार कुटुंबिय, आत्माराम भेंडे, डॉ.श्रीराम लागू,विजया मेहता, प्रा.मधुकर तोरडमल, श्रीकांत मोघे, सई परांजपे,रत्नाकर मतकरी,सुलभा देशपांडे,,अमोल पालेकर, विक्रम गोखले, नाना पटेकर, सुहास जोशी, दिलीप प्रभावळकर,विनय आपटे, सतीश आळेकर,डॉ. मोहन अगाशे, प्रशांत दामले इत्यादी. नाटकातली अमराठी माणसेही त्यांना भेटली. तसेच २००४ साली ते लंडन येथे गेले असताना शेक्सपियर चे स्मारक आणि इंग्लिश रंगभूमी त्यांनी पाहिली.

त्याच प्रमाणे त्यांनी काही पुस्तकांचे संपादन केले. ती पुस्तके म्हणजे, प्रतिमा रूप आणि रंग- के नारायण काळे यांच्या लेखांचे संपादन, गानयोगी मल्लिकार्जुन मन्सूर, निवडक एकांकिका, प्रयोगक्षम एकांकिका, पु.ल.पंच्याहत्तरी, मराठी कलभिरुची, मराठी नाट्यसमीक्षा–काही दृष्टीकोण, मराठी भाषा-साहित्य, रंगयात्रा(१९५० ते १९८५ रंगभूमीविषयक लेख संग्रह) अशा संपादित पुस्तकांप्रमाणेच त्यांनी काही गौरव ग्रंथ सुद्धा संपादित केले. ते असे, चित्तरंजन कोल्हटकर, जितेंद्र अभिषेकी, नाट्य गौरव विशेषांक, पी.डी.ए नाट्य निर्मिती, पी.डी.ए. वार्षिक, पुणे नाट्य संमेलन, बालगंधर्व जन्मशताब्दी, मॉडर्न महाविद्यालय दशक पूर्ती, राम गणेश गडकरी दशकपूर्ती, ललित कला दर्श ७५ वर्षे, शरद तळवलकर, साहित्य सूची दिवाळी अंक

नाट्य समीक्षक वि भा देशपांडे, पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अनेक वर्षे २००६ ते २०११ पर्यन्त प्रमुख कार्यवाह होते. त्यांनी कार्याध्यक्ष, प्रमुख कार्यवाह अशा वेगवेगळ्या जबाबदार्‍या सांभाळल्या. या क्षेत्रात ते ‘विभा’ म्हणूनच ओळखले जायचे. साहित्य परिषदेच्या मराठी वाड:मयाचा इतिहास खंड सात चे कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी काम केले. कोशासारख्या संशोधनपर लेखनापासून ते वृत्तपत्रीय सदर लेखनापर्यन्त जवळ जवळ चाळीस वर्षे त्यांनी नाट्य किंवा रंगभूमीविषयक सर्व विषय हाताळले.

अध्यापन करताना आकाशवाणी आणि दूरदर्शन वरील अनेक नाट्य विषयक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग होता. त्यांनी नभोनाट्य लेखन सुद्धा केले.पीडीए संस्थेत जाणार कुठे, बंडू नानू गुलाबी हत्ती अंमलदार या नाटकातून अभिनय केला तर, तुझे आहे तुजपशी,ससा आणि कासव या नाटकाचे दिग्दर्शन केले. विविध मान्यवरांच्या जाहीर मुलाखती घेतल्या.

त्यांना अनेक महत्वाचे पुरस्कार मिळाले. त्यातले काही म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट संपादनाचा पुरस्कार, जयंतराव टिळक गौरव निधि पुरस्कार, नाट्यगौरव पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार, पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिकेचा गौरव, कै.माधव मनोहर नाट्य समीक्षक पुरस्कार, राजा मंत्री पुरस्कार,वि.स. खांडेकर नाट्य समीक्षक पुरस्कार (१९८३),कॉसमॉस पुरस्कार, भाषा रत्नम पुरस्कार (२००४) रंगत संगत सन्मान, वत्सला बाई अंबाडे साहित्य निर्मिती पुरस्कार असे चौदा पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

इंदिरा भालचंद्र पुरस्कार – वि.भा. देशपांडे यांच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ दर वर्षी एका चांगल्या ग्रंथाला इंदिरा-भालचंद्र पुरस्कार देण्यात येतो. २०१६ साली हा पुरस्कार रत्नाकर मतकरी यांना, त्यांचे ‘माझे रंगप्रयोग’ या पुस्तकासाठी देण्यात आला. दहा हजार रुपये रोख व सन्मान चिन्ह असे याचे स्वरूप आहे. या आधी विजया मेहता यांच्या ‘झिम्मा’ आणि डॉ. अजय वैद्य यांच्या ‘मास्टर दत्ताराम :नाट्यवीर ‘यांना ,तसेच मोहन जोशी यांना ‘नट-खट’ साठी हा पुरस्कार देण्यात आला.

डॉ. वि.भा. देशपांडे यांनी रंगभूमीचे साक्षेपी अभ्यासक म्हणून जवळ जवळ चार दशके काम केले. ९ मार्च २०१७ रोजी त्यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी विशाखा,जावई आणि नातू असा परिवार आहे.

संदर्भ-

१. http://prafullaphadkemhantat.blogspot.com/2017/03/blog-post.html

२. https://www.bookganga.com/eBooks/Books?AID=466678599711

३. https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/vb-deshpande-1428949/

४. https://www.marathisrushti.com/articles/dr-vi-bha-deshpande/

५. ले. देशपांडे वि.भा.पुस्तक- मराठी नाट्य कोश, निशांत प्रकाशन,पुणे .वर्ष-२०००

६. ले. देशपांडे वि.भा. पुसतक- नाटकातली माणसे, उन्मेष प्रकाशन,पुणे

७. ले. देशपांडे वि.भा. पुस्तक- गाजलेल्या रंगभूमिका- रोहन प्रकाशन,पुणे वर्ष- २००६

८. ले.देशपांडे वि.भा.,पुस्तक- भावलेली नाटके- श्रीपाद प्रकाशन ,पुणे

९. विकिपिडिया वेबसाईट

१०.मराठी विश्वकोश वेबसाईट

११. लोकसत्ता,लोकमत,सकाळ, दिव्य मराठी, महाराष्ट्र टाईम्स. याचे ई- अंक

( ही नोंद मराठी विश्वकोश नाट्य शास्त्र यासाठी लिहिली होती. ती कोशाच्या website वर उपलब्ध आहे . त्याची लिंक = https://marathivishwakosh.org/59849/ )

-ले- डॉ. नयना कासखेडीकर.





-------------------------------------------

चरित्र नायक - शिल्पकार प्रमोद कांबळे

 

                             चरित्र नायक -   चित्रकार, शिल्पकार

                                         प्रमोद कांबळे (११ ऑगस्ट १९६४)     


          वास्तववादी शैलीत काम करणारे प्रमोद दत्तात्रेय कांबळे हे अहमदनगरचे. माझी मुलं चित्रकारच होतील’, असे ठाम विश्वासाने सांगणाऱ्या चित्रकार दत्तात्रेय कांबळे व आई अन्नपूर्णा यांची प्रेरणा सतत त्यांच्या पाठीशी होती. वडील नगरच्या प्रगत कला विद्यालयात कलाशिक्षक होते. प्रमोद यांचे तीनही भाऊ चित्रे काढीत. त्यामुळे घरात चित्रकलेला पोषक वातावरण होतेच. वडिलांबरोबरच शाळेतील कलाशिक्षक व ज्येष्ठ चित्रकार र.बा. केळकर यांनी तिसर्या इयत्तेपासूनच प्रमोद यांना प्रत्यक्ष शिल्प बनविण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वत:चे शिक्षण पूर्ण करण्यासाठी जाहिरातींचे फलक रंगवणे, निवडणूक काळात भिंती रंगवणे, संक्रांतीत पतंग करून विकणे, दिवाळीत आकाशकंदील विकणे, गणपतीसाठी आराशी करून देणे ही कामेही त्यांनी केली. दहावी उत्तीर्ण झाल्यावर नगरलाच प्रगत कलाविद्यालयात फाउण्डेशन कोर्स करून नंतर मुंबई येथील सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांनी शिल्पकलेचे शिक्षण पूर्ण केले.

या काळात त्यांना अनेक बक्षिसे मिळाली. अंतिम वर्षी जे.जे.चे सुवर्णपदकही मिळाले. शिक्षण संपल्यानंतर चित्रपट क्षेत्रात चांगली संधी मिळत असतानाही त्यांचे मन तिथे रमले नाही; कारण ओढ होती गावच्या मातीची. त्यामुळेच मुंबई-पुण्यासारखी कलेला पोषक अशी शहरे सोडून कलेचे वातावरण नसलेल्या अहमदनगर या गावात अनेक आव्हाने झेलत, त्यांनी चित्र व शिल्पकलेचा व्यवसाय सुरू केला.

भारताच्या स्वातंत्र्याला १९९७ मध्ये ५० वर्षे पूर्ण झाली म्हणून सारे जहाँ से अच्छाया शीर्षकाचे ७०×२० फुटांचे ५०० हून अधिक थोर व्यक्तींची पेन्सिलचित्रे असलेले भव्य चित्र त्यांनी नगर महापालिकेच्या महावीर सभागृहात काढले. या कलाकृतीत देवदेवता, ॠषिमुनी, थोर महापुरुष, स्वातंत्र्यसेनानी, सामाजिक कार्यकर्ते, कलावंत, खेळाडू अशा विविध क्षेत्रांतील विशेष व्यक्तींची चित्रे असून ते नगर शहरात येणार्या पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. एम.आर.आर.सी.चा गौरवशाली इतिहास सांगणारे द स्पिरिटहे ९०×१० फुटांचे पेन्सिल चित्र, वॉर मेमोरियल्सचे भव्य शिल्प, गणपती उत्सवातील भुलेश्वर मंदिराची प्रतिकृती अशी त्यांची आणखी काही उल्लेखनीय कामे आहेत.

नानाजी देशमुख यांच्या चित्रकूट येथील नन्ही दुनियाया प्रकल्पासाठी कांबळे यांनी २००४ मध्ये वन्य प्राण्यांची लाइफ साइजशिल्पे बनविली. आई व मूल या संकल्पनेवर आधारित वाघ, हत्ती, गोरीला, उंट, गाय, मगर, जिराफ, झेब्रा अशा सर्व वन्यप्राण्यांची फायबरमधील ही अभ्यासपूर्ण शिल्पे लोकप्रिय झाली. त्यांचे उद्घाटन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते झाले. यांतील काही शिल्पांच्या प्रतिकृती मुंबईच्या काळाघोडा फेस्टिव्हलमध्ये २०१० मध्ये प्रदर्शित केल्या होत्या.

तसेच कलाजगत न्यासाची स्थापना, लहान मुलांसाठी स्पर्धा, शिबिरे अशा उपक्रमांतून मुलांमध्ये चित्र व शिल्पकलेची आवड निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न ते करीत आहेत. नगरसारख्या ठिकाणी प्रमोद कांबळे यांनी आर्ट गॅलरीही सुरू केली आहे.

या सगळ्या उपक्रमांत मूळ नगरच्याच असणार्या त्यांच्या सुविद्य अर्धांगिनी, पूर्वाश्रमीच्या स्वाती उपासनी, सर्वार्थाने सहभागी असतात.

उत्तम कौशल्य, तांत्रिक ज्ञान व व्यवसायाची उत्तम जाण असणारे प्रमोद कांबळे शिल्पाकृतींचा विविध प्रकारे वापर करून त्यांतून यशस्वी व्यावसायिक शिल्पकार म्हणून नावारूपाला आले आहेत.

-----------------------


प्रमोदजींच्या स्टुडीओ ला नगर येथे भेट दिली तेंव्हाची छायाचित्रे -







- डॉ. नयना कासखेडीकर

                                                -----------------------