Thursday, 23 July 2026

आकाशवाणी आणि मी

 

आकाशवाणी आणि मी


“ ३११.५५ मीटर्स अर्थात ९६३ किलोहर्ट्झ वर आकाशवाणीचे हे जळगाव केंद्र आहे”. Opening signature tune झाली कि, ही उद्घोषणा करून केंद्र सुरु करायचे आणि आमची ड्युटी सुरु. पुढचे काही तास आम्ही AIR वर live. २०० किलोमीटर परिसरात या केंद्राचे श्रोते होते. केव्हढा हुरूप होता तो !

महाविद्यालयात शिकत असतांना आकाशवाणीत माझा गमतीशीर प्रवेश झाला. त्यावेळी रेडिओचे युग होते. कारण सकाळ रेडिओवरील पहिल्या सिग्नेचर ट्यूनने व्हायची आणि रात्र सुद्धा रेडिओवरील कार्यक्रमाने. त्यामुळे बहुतेक सर्व श्रोते रेडिओशी घट्ट नाते जोडून असायचे. एव्हढेच काय सर्वांचे दिवसाचे वेळापत्रक आकाशवाणीच्या कार्यक्रमाप्रमाणे जोडलेले असायचे. गावातल्या, शहरातल्या कॉलनी अथवा गल्लीतल्या, चाळीतल्या प्रत्येक घरात सकाळ संध्याकाळच्या ‘सातच्या बातम्यांचा’ आवाज येत असे. तसाच तो ‘बिनाका गीतमालिकेचा’ पण येई.

  ऐंशीच्या दशकांत, साधारण १९८२, ८३ चा काळ. असेच एकदा रेडिओवरील कार्यक्रम ऐकतांना निवेदन करणाऱ्या युवक युवतींची भाषा आम्हाला काही ऐकायला आवडत नव्हती. अतिशय अशुद्ध आणि कशीतरी रेलू वाटायची. अरे, आपण तर यांच्यापेक्षा शुद्ध व चांगले बोलू शकतो, आपल्याला देतील का बोलायला हे लोक? चला प्रयत्न करायला काय हरकत आहे, असे म्हणून एक मैत्रीण व मी आकाशवाणी जळगाव केंद्रात गेलो. तिथे भेटलो आणि आमची ही भाषेची तक्रार सांगितली. आमची टेस्ट घेतली, स्टुडीओत माईकवर, बोलायला आणि काही मजकूर वाचायला सांगितला आणि मग काय! दुसर्या दिवशी या म्हणून सांगितले. लगेच दुसर्या दिवशी धडधडत्या अंत:करणाने आकाशवाणीत पोहोचलो. युवावाणीच्या संध्याकाळच्या कार्यक्रमात आम्हाला कार्यक्रमाचे live compering करायला सांगितले. यशस्वीपणे ते केले. त्यानंतर एकदा एक विषय देऊन त्यावर भाषण द्यायला सांगितले. विषय होता हुंडा बंदी. वा, काय प्रसिद्धी मिळाली या talk ला. हुंडाबळीच्या रोज घटना घडत होत्या. हुंडाबंदीवर जोरदार भाषण लिहून काढून ते वाचलं होतं. अगदी तावातावात. अगदी आता आता पर्यंत ते सांभाळून ठेवले होते. बहुतेक सगळ्या ओळखीच्यांनी ते ऐकले होते. शाबासकी दिली होती. आपला आवाज एकाच वेळी एव्हढ्या लोकांनी ऐकला होता? नक्कीच अप्रूप होते ते, आपण हे करू शकतो असा आत्मविश्वास आणखीन दृढ झाला होता. त्याच वेळी उद्घोषक दत्ता सरदेशमुख यांनीही आमची धडपड बघून रीतसर ऑडीशन द्यायला सांगितली. पास होण्याची खात्री होतीच आणि सुरु झाला होता आकाशवाणीचा माझा प्रवास.


 नाही म्हणायला लहानपणी, आकाशवाणीच्या pune केंद्रावर ‘बालोद्यान’ हा मुलांचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी live असायचा. त्यात आम्ही सुट्टीच्या काळात प्रत्यक्ष सहभागी व्हायचो. बालगोपालांचा मेळाच भरे. मुलांशी प्रत्यक्ष संवाद होत असे. मनोरंजन, बालकलाकारांचे सादरीकरण असे ही असायचे, पुण्यात रंगमंचावर सादर होणारी तेंव्हाची बालनाट्ये, आकाशवाणीचा बालोद्यान कार्यक्रम, गणेश उत्सवातील देखावे, मेळे व त्यातील सहभाग, या सगळ्याचे गारुड मनावर असे.

वालचंदनगरला राहत होतो, मी तेंव्हा आठवीत शिकत होते. माझी आई तिथून शेळगाव (इंदापुर) जवळ अपडाऊन करायची. तिचे पहिल्यापासुनचे वेळापत्रक म्हणजे रेडिओच्या वेळा व कार्यक्रमच होते. त्यामुळे सकाळच्या सातच्या mumbai केंद्रावरच्या बातम्या हा अविभाज्य भाग होता आमच्या दैनंदिन जीवनाचा आणि त्यानंतर दर रविवारी लागणारी “मीने मीने ...टेकाडे भाऊजी ...” ही ‘प्रपंच’ श्रुतिका. अप्रतिम. हे मुंबई केंद्र आठवीत असतांना ऐकताना वाटले नव्हते कि आपणही अशाच मालिकेत पुढे भविष्यात भाग घेणार आहोत. असो. आकाशवाणीच्या प्रवासात खूप काही शिकायला मिळाले. व्यक्तिमत्व विकासाला पोषकच होते सारे.

उद्घोषिका बरोबरच वेगवेगळ्या विभागांत केलेले काम मग ते शैक्षणिक विभाग, कृषी विभाग, युवावाणी, ड्रामा, महिला विभाग, प्रत्येक विभागांत केलेले, production/ कार्यक्रम निर्मितीचे काम, drama artist म्हणून सहभाग, रेकॉर्डिंग, dubbing, निवेदन, live कार्यक्रम, ‘झुंबर’ या कौटुंबिक श्रुतीकेतला दीर्घ काळ सहभाग, नभोनाट्यांतील सहभाग, हे सर्व करताना केलेली धावपळ, केलेला अभ्यास. अनेक तज्ञ लोकांच्या झालेल्या भेटी, घेतलेले प्रशिक्षण आणि अनुभवी लोकांचे मार्गदर्शन याला तोड नाही. डॉ.उषा शर्मा त्यापैकीच एक. आजसुद्धा आमची मैत्री कायम आहे. हे आज जवळ जवळ ३६ वर्षांनी आठवले तरी ऊर अभिमानाने भरून येतो. ९० च्या दशकात जळगाव आकाशवाणी केंद्रात उद्घोषिका म्हणून घेतलेल्या अनुभवाचा भविष्यात अनेक ठिकाणी उपयोग झाला. सर्व meltron मशीन्सशी मैत्री झाली होती. पुण्यात शिफ्ट झाल्यानंतर इथल्या pune आकाशवाणीचा प्रवास सुरु झाला. इथे मात्र जबाबदाऱ्या, Ph.D. चा अभ्यास यामुळे ट्रान्स्मिशन केले नाही, सेक्शनलाच काम केले. कै.मा.नीलकंठ कोठेकर सर एक गुरुतुल्य व्यक्तिमत्व! त्यांना गुणांची चांगली पारख होती. पुन्हा पुण्यात ते भेटले. Ph.D thesis चा पहिला ड्राफ्ट त्यांनाच दाखवला होता. जळगावला असतांना डिप्लोमा इन जर्नालीझम मुक्त विद्यापीठाच्या आणि बॅचलर व मास्टर डिग्रीच्या वेळी ही त्यांचे मार्गदर्शन होतेच. १९९५ पासून माझा मोर्चा पत्रकारितेकडे वळला.

१३ फेब्रुवारी हा जागतिक रेडीओ दिन म्हणून साजरा होत असतो. कारण याच दिवशी १९४५ मध्ये संयुक्त राष्ट्र रेडिओचे पहिले प्रसारण झाले. आज सिंहावलोकन करताना, AI च्या नव्या जगात प्रवेश करताना, माध्यमांच्या आधुनिक युगांत वावरताना, आकाशवाणी/ रेडीओ हे माध्यम अगदी तळागाळापर्यंत, दुर्गम भागात, यशस्वीपणे पोहोचणारे आणि खात्रीचे होते, विश्वासार्ह होते, नव्हे अजूनही आहेच हे पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवते.

‘आकाशवाणी जळगाव केंद्र’ मध्यम लहरीवर प्रसारित होत असलेले हे all india radioचे खानदेशमधील ग्रामीण व शहरी भागाला जोडणारे एक महत्वाचे माध्यम. प्रादेशिक केंद्र. अर्थातच मराठी. या केंद्राची स्थापना १९७६ मध्ये झाली पण केंद्र प्रत्यक्षात १९७८ पासून सुरु झाले. या केंद्राचे कार्यक्रम शिरसोली या जळगावपासून ११ किलोमीटरवर असलेल्या प्रक्षेपण केंद्रातून सहक्षेपित होतात. जळगाव, धुळे, नाशिक व बुलढाणा या जिल्ह्यातील सांस्कृतिक आणि जडणघडणीत जळगाव आकाशवाणी केंद्राचा मोठा वाटा आहे. शिक्षण, कला, शेती, हवामान, आरोग्य, विज्ञान, क्रीडा, संस्कृती, व्यापार, अशा विषयातून, महिला, बाल, युवक, शेतकरी या सर्वांनाच मार्गदर्शन आणि मनोरंजन करणारी ही संस्थाच आहे जणू. विशेषतः या माध्यमाचा नैसर्गिक आपत्तीमध्ये थेट माहिती देण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी जास्त उपयोग होतो. रेडीओ हे जनसंवादाचं सर्वत्र, सहज उपलब्ध होणारे, टिकाऊ, बहुमुखी असं माध्यम आहे.

जळगाव केंद्र news on AIR App आणि १०२.१ वरील FM वर सुद्धा हे ऐकू येते. रेडीओ कम्युनिकेशनमध्ये रेडीओ लहरींचा वापर करून माहिती अवकाशात वाहून नेली जाते. या क्षमतेला ‘बँडविड्थ’ म्हणतात. ‘हेनरिक हर्ट्झ’ या जर्मन भौतिक शास्त्रज्ञाने ११ नोहेंबर १८८६ या दिवशी रेडीओ लहरींचे अस्तित्व पहिल्यांदा सिद्ध केले. या रेडीओ सम्प्रेषणाला प्रथम वायरलेस टेलिग्राफी म्हटले गेले. रेडीओच्या पहिल्या दोन दशकाला ‘रेडीओ टेलीग्राफी युग’ म्हटले गेले. या काळात रेडीओचा वापर व्यक्ती-व्यक्ती, व्यावसायिक, राजनैतिक व लष्करी मजकूर संदेशाचे वहन करण्यासाठीच होत होता. कारण ऑडीओ मोड्युलेशनसाठी आवश्यक असणाऱ्या सतत लहरींचे प्रसारण होऊ शकत नव्हते.


    रेडीओचा इतिहास बघितला तर त्याचे प्रसारण, शोध, कालरेषा यावर संशोधन होत असताना हर्ट्झ, लॉर्ड रेले, ऑगस्टो रीघी, ओलीव्हर यांच्या प्रमाणेच भारतीय भौतिकशास्त्रज्ञ जगदीश चंद्र बोस यांनी केलेले प्रयोगसुद्धा लक्षात घेतले गेले. १९०८ च्या सुमारास औद्योगिक देशांनी आंतरखंडांमधील टेलिग्राम ट्रॅफिकची देवाणघेवाण करण्यासाठी आणि त्यांच्या वसाहती आणि नौदल ताफ्यांशी संवाद साधण्यासाठी शक्तिशाली ट्रान्सोसेनिक ट्रान्समीटरचे जगभरातील नेटवर्क तयार केले. पहिल्या महायुद्धादरम्यान, सतत लहरी रेडिओ ट्रान्समीटर, रेक्टिफाइंग इलेक्ट्रोलाइटिक आणि क्रिस्टल रेडिओ रिसीव्हर डिटेक्टरच्या विकासामुळे रेजिनाल्ड फेसेंडेन आणि इतरांनी अॅम्प्लिट्यूड मॉड्युलेशन (AM) रेडिओटेलीफोनी साध्य केली, ज्यामुळे ऑडिओ प्रसारित करता आला.

१९२० मध्ये प्रसारण सेवा देणारी अनेक रेडीओ स्टेशन सुरु झाली. पुढे नियोजित सेवा सुरु झाली. रोटेड्राममध्ये नेदरलंड, कॅनडा, लंडनमध्ये चेम्सफोर्ड, नंतर मेक्सिको, क्युबा, ऑस्ट्रेलियात मेलबर्न, तसेच न्यूझीलंड, डेन्मार्क इथेही स्टेशन सुरु झाली. १९२२ मध्ये अमेरिकन स्टेशन निर्माण झाली. औद्योगिक प्रसारणही सुरु झाले. फ्रांस, सोविएत युनियन,चीन, बेल्जीयम, चेकोस्लोव्हेकिया, जर्मनी, स्पेन, इटली, जपान, नॉर्वे, पोलंड सर्वांनी ही सेवा सुरु केली. अगदी सुरुवातीला याचा उपयोग फक्त एखादा महत्वाचा निरोप पाठवणे एव्हढाच होता. पुढे विद्यापीठात याचा उपयोग केला गेला. शेतकर्यांना कृषी बाजार अहवाल पाठवण्यासाठी झाला. व्यवसायासाठी उपयोग झाला. हे सर्व काम हौशी आणि प्रायोगिक स्तरावर सुरु होते.

पुढे डेट्रॉईट न्यूज या वृत्तपत्राने जेंव्हा रेडीओ स्टेशन सुरु केले तेंव्हा ते खरे एक ‘नवे माध्यम’ म्हणून लोकांनी अनुभवले. ही स्टेशन्स म्हणजे हाताने बनवलेली उपकरणे होती. काही कार्यक्रमाच्या प्रयोगामुळे देशभर हे माध्यम लोकप्रिय झाले, सामान्य लोकांना खूप जवळचे वाटू लागले. श्रोत्यांना आकर्षित कसे करायचे, त्यांना सतत जोडून कसे ठेवायचे यावर सतत विचार करून रेडीओ कार्यक्रम याचे स्वरूप लोकांच्या लक्षात आले. त्यांच्या सर्जनशीलतेमुळे हे माध्यम हळूहळू स्थानिक भाषेतील एक अभिव्यक्तीचे माध्यम बनले. पुढे सुनियोजित प्रसारण सुरु झाले.

अनेक ट्रान्समीटर मधून येणाऱ्या रेडीओ लहरी एकमेकांमध्ये व्यत्यय न आणता, एकाच वेळी हवेतून जातात कारण प्रत्येक ट्रान्समीटरच्या रेडीओ लहरी हर्ट्झ, किलो हर्ट्झ, मेगा हर्ट्झ, किवा गिगा हर्ट्झ मध्ये मोजल्या जाणार्या वेगवेगळ्या फ्रीक्वन्सीवर आधारित असतात.

एकोणिसाव्या शतकात बिनतारी संदेश बरोबर रेडीओचा उदय झाला. भारतात २३ जुलै हा राष्ट्रीय प्रसारण दिन म्हणून साजरा केला जातो. १९२४ मध्ये मद्रासमध्ये पहिला रेडिओ क्लब स्थापन झाला होता. लाहोर, अलाहाबाद, पेशावर, डेहराडून इथेही हौशी रेडीओ क्लब सुरु होते.बडोदा, त्रिवेंद्रम, हैद्राबाद, औरंगाबाद या ठिकाणी सुद्धा नभोवाणी सुरु होती. म्हैसूरमध्ये १९३५ मध्ये सुरु झालेल्या नभोवाणीला ‘आकाशवाणी’ हे नाव दिले होते. आकाशवाणी म्हणजे आकाशातून येणारा आवाज, तेच नाव पुढे १९५६ मध्ये भारत सरकारने भारतातील सर्व केंद्रांना अधिकृतपणे दिले.


    पहिला खाजगी हौशी रेडीओ क्लब ऑफ बॉम्बे ने जून १९२३ मध्ये देशात प्रथम प्रसारण सुरु केले. त्यातून प्रेरणा घेऊन भारतातले पहिले औपचारिक प्रसारण मुंबई केंद्रावरुन १ जुलै १९२७ ला सुरु केले गेले आणि रेडीओ या नव्या माध्यमाचे युग सुरु झाले. सुरुवातीला मर्यादित श्रोत्यांसाठी प्रसारण होत असे. ४८ किलोमीटर परिसरातच हे प्रक्षेपण ऐकू यायचे. भजन, शास्त्रीय संगीत, बातम्या, सरकारी सूचना, सामाजिक भाषणे असत. उद्दिष्टे होती- देश विदेशातील बातम्या संकलित करून बातमी पत्रे देणे, जनतेला माहिती पुरविणे, मनोरंजन करणे , प्रबोधन करणे, सल्ला व मार्गदर्शन देणे. हे Indian Broadcasting Company मार्फत होत असे. ही कंपनी १९३० मध्ये बंद झाली आणि भारत सरकारने हे काम स्वताकडे घेतले.१९३० ते १९३६ ब्रिटीश सरकारने नियंत्रण ठेवले आणि all india radio ची (AIR) स्थापना झाली. ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीदवाक्य घेऊन air चे काम सुरु झाले. लोकांना माहिती देणे, लोकांना शिक्षण देणे आणि लोकांचे मनोरंजन करणे या त्रिसूत्रीवर आकाशवाणीचे काम सुरु आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात आकाशवाणीचा अधिक विकास झालेला दिसतो. आज आकाशवाणीची देशभरात सुमारे पाचशे ते सहाशे प्रसारण केंद्रे आहेत. भौगोलिक क्षेत्राच्या ९०% भागात ती आहेत. ९९.१९% लोकसंख्येपर्यंत ती पोहोचली आहे. २३ भाषा आणि १८२ बोलीभाषेत ही केंद्रे कार्यक्रमांची निर्मिती करत असतात. ते अत्यंत दुर्गम, ग्रामीण आणि सीमावर्ती भागातील श्रोत्यांपर्यंत आकाशवाणीच्या माध्यमातून पोहोचतात.

आकाशवाणी हे जगातील रेडीओचं सर्वात मोठं जाळं असलेले आणि देशातील सर्व लोकांपर्यंत पोहोचणार जनसंवादाचे माध्यम आहे. ‘भारत देश स्वतंत्र झाला’ ही अधिकृत ऐतिहासिक घोषणा या देशातील लाखो लोकांनी रेडिओवरून ऐकली आणि आनंद साजरा केला. ते किती परिणामकारक आहे ते भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात १९४७ मध्ये भाग घेतलेल्या अनेकांनी अनुभवले आहे. स्वातंत्र्य लढ्यात रेडिओ ने सर्व देशभक्तांना, सामान्य लोकांना, साहित्यिक व लेखक आणि कवींना, क्रांतीकारकांना, विचारवंताना, राजकारण्यांना, सैन्याला अशा सर्वाना स्वातंत्र्य या विषयाबद्दल एकत्र बांधून ठेवले. अशी मोठी शक्ती या माध्यमा मध्ये आहे. विश्वासार्हता हे खरे याचे वैशिष्ट्य आहे. प्रसारण हे जरी तांत्रिक दृष्ट्या महत्वाचे असले तरी मानवी सहभाग, मानवी विचार हे ही महत्वाचे आहे. त्यामुळे AI च्या नव्या जगात AI tools वापरून केलेले सादरीकरण यापेक्षा प्रत्यक्ष माणसाचा सहभाग असलेले सादरीकरण जास्त विश्वासार्ह असेल हे नक्की .

कारण रेडीओ हे माध्यम युद्धात, संकटात आणि आज आकर्षण असलेल्या अनेक नव्या डिजिटल माध्यमाच्या गर्दीत सुद्धा खात्रीशीर माध्यम आहे, हे जगभरात सिद्ध झाले आहे. अगदी पहिल्या महायुद्धापासून ते दुसऱ्या महायुद्धापर्यंत ते तंत्रज्ञानाचा एव्हढा मोठा विकास झाल्यानंतर सुद्धा आजच्या गाझा पट्टीतील युद्धापर्यंत, ‘रेडिओ’ हे प्रसार माध्यम महत्वाची भूमिका अखंडपणे बजावत आहे. या सर्व भौगोलिक अडचणीतून वाट काढत, कमी खर्चात, जास्त वेगाने व क्षणात माहितीचा प्रसार करणारे हे माध्यम आहे. त्यासाठी तुमच्याकडे फक्त रिसिव्हर म्हणजे रेडीओ फ़्रिक़्वेन्सि मिळणारे यंत्र/ट्रांझिस्टर हवे. बस्स. कारण तुम्हाला फक्त आवाज ऐकायचा आहे, आणि इथेच खात्री आणि विश्वासाची कसोटी लागते ती आकाशवाणीकडे आहे. ज्या लोकांना माहितीची आवश्यकता आहे त्यांच्या पर्यंत ती विश्वसनीयरित्या पोहोचली पाहिजे. म्हणून रेडीओ वरचा आवाज हा अधिक विश्वासक व आश्वासक दोन्हीही असतो.

चक्रीवादळ, पूरस्थिती, भूस्खलन, त्सुनामी किंवा भूकंप झालेल्या क्षेत्रात तसेच युद्धभूमीवर सर्व उद्ध्वस्त झालेल्या ठिकाणी पुढे काय वाढून ठेवले आहे? आत्ता त्या क्षणाला आपण काय करायचे? कुठे जायचे? संरक्षण कुठे मिळणार आहे? हे सर्व निर्णय घ्यायला, त्या क्षणी मार्गदर्शनाची गरज असते. ते रेडिओवरील संदेशाने मिळते.

याचे उदाहरण म्हणजे आता गाझा पट्टीतील ऑक्टोबर २०२३ मध्ये हमास ने केलेल्या हल्ल्यात सर्व उध्वस्त झाले. अनेक रेडीओ स्टेशन्स (२३स्टेशन्स) बंद पडली. मोठी जीवितहानी, शोकाकुल व भ्यायलेले नागरिक, सर्व व्यवहार ठप्प, रोगराई च्या प्रसाराची भीती, वीज नाही, आर्थिक महासंकट, पायाभूत सुविधांचा नाश, अन्न टंचाई, महागाई, उपासमार, पण अशा कोलमडलेल्या परिस्थितीत आणि युद्धजन्य परीस्थितीत विश्वसनीय प्रसारण होणे आवश्यक असते. गाझा पट्टीत ‘जमान एफ.एम.स्टेशन’ पुन्हा सुरु करून, प्रसारण सुरु झाले त्यामुळे लोकांना मोठा आधार वाटला असेल. अशा परिस्थितीत रेडिओ म्हणजे जीवदायिनी रेखा ठरते.

करोना साथीच्या काळात रेडिओवरील बिहार झारखंड मध्य प्रदेश इथे शाळा बंद असल्याने विद्यार्थी शिक्षण आकाशवाणीच्या प्रसारणावर अवलंबून होते. स्मार्ट फोन व इंटरनेट उपलब्ध नसलेल्या ठिकाणी आकाशवाणीने हे काम केले. ओरिसा तामिळनाडू सारख्या किनारी प्रदेशात मच्छीमार आकाशवाणीच्या हवामान बुलेटीन वर अवलंबून होते. २०१९ च्या फणी या तीव्र चक्रीवादळावेळी रेडिओच्या अलर्ट मुळेच अनेकजण सुरक्षितपणे किनार्यावर परतले. मोबाईल ला नेटवर्क नसतांना रेडिओच आपत्कालीन संदेश साधन म्हणून कामाला आले.

अशा बिकट प्रसंगी रस्ते बंद, फोन बंद, दळणवळण पूर्णतः कोलमडलेले, आताचे इंटरनेट कनेक्शन सुद्धा बंद झाले तर अशा परिस्थितीवर फक्त आणि फक्त रेडिओच मात करू शकतो. सगळे जग एकत्र जोडण्यासाठी ‘रेडिओ सिग्नल’ एक खात्रीशीर आधार होता, आहे आणि उद्याही असेल. रेडिओ चा सिग्नल नेहमीच युद्ध क्षेत्रातील संकट समयी, सुरु असलेल्या मदत कार्यात, संदेश जलद पोहोचवण्याच्या कामात. डिजिटल माध्यमांपर्यंत किंवा अवकाशातील दूरस्थ सीमेपर्यंत सुद्धा सर्वांच्या पुढे ताकदीने उभा असेल, कार्यरत असेल. कारण हे आवाजाचे तरंग अदृश्य असले तरी, तेच आज कुठल्याही बदलत्या तंत्रज्ञानातसुद्धा लोकांपर्यंत संदेश पोचविण्यात अग्रेसर असतील. त्यांचे रक्षण करण्यात आघाडीवर असतील आणि लोकांना जोडून ठेवण्यात ताकदवान असतील.

भारतात २००२ मध्ये कम्युनिटी रेडिओचा प्रवास सुरु झाला. पहिले कम्युनिटी रेडीओ स्टेशन फेब्रुवारी २००४ मध्ये सुरु झाले. आता भारतात ५२८ कम्युनिटी रेडीओ स्टेशन्स आहेत. अनेक विद्यापीठे, शैक्षणिक संस्था यांनी अशी कम्युनिटी रेडीओ स्टेशन्स सुरु केली आहेत. आरोग्य, शिक्षण, पोषण, शेती, सामाजिक विकास हे विषय घेऊन स्थानिक भाषा अथवा बोली भाषांमध्ये प्रसारण होत असल्याने, सांस्कृतिक दृष्ट्या ही सर्व समाजाशी जोडले जातात व लोक परंपरा, संगीत व मौखिक परंपरा व वारसा जपण्यात यशस्वी होत आहेत.

भारतीय लष्कराचा उत्तराखंड मध्ये ज्योतिर्मठ आणि j&k मधील राजौरी मधील एफ एम रेडीओ स्टेशन, बुंदेलखंड मधील महिलांचा कम्युनिटी रेडीओ, कच्छ मधील बोली भाषेतला कम्युनिटी रेडीओ, दिल्लीतील तिहार तुरुंगातील कैद्यांनी चालवलेला रेडीओ अभिव्यक्ती, असे हे लोकांशी थेट संवादाचे माध्यम खूप परिणामकारक आहे. त्याचेच एक उदाहरण म्हणजे ‘मनकी बात’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागरिकांशी थेट होत असलेला संवाद.

भारतातले रेडीओ उडान २०१४ मध्ये सुरु झालेले पहिले online रेडीओ स्टेशन, जे दृष्टीबाधित लोक /प्रस्तुतकर्ता व स्टाफ चालवतो. त्यांचे आज १२० देशात सव्वा लाख श्रोते आहेत.

अशा प्रकारे रेडिओचे अनेक व्यावहारिक उपयोग आहेत, ज्यामध्ये प्रसारण, व्हॉइस कम्युनिकेशन, डेटा कम्युनिकेशन, रडार, रेडिओ लोकेशन आणि रिमोट कंट्रोल यांचा समावेश आहे.

                             रेडीओच्या शोधकर्त्यांना मानाचा मुजरा.

 

डॉ. नयना कासखेडीकर, पुणे

--------------------------------

Tuesday, 14 July 2026

वारी पंढरीची .....

 

वारी पंढरीची .....

बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव !


पंढरपुरची वारी म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख. जगातल्या अनोख्या अध्यात्मिक यात्रेपैकी एक महत्वाची यात्रा. शिस्त, श्रद्धा, एकता आणि समरसतेची यात्रा. महाराष्ट्राच्या सर्व भागातून हजारो वारकरी आणि कर्नाटकातून हरिदास, इतर राज्यातून दर वर्षी आषाढी आणि कार्तिकी शुद्ध एकादशीला पंढरीत येतात. जुलै उजाडला कि वेध लागतात ते पंढरीच्या वारीचे, त्याची तयारी मात्र आधीच सुरु असते. दरवर्षीच पावसाळा आणि आषाढी वारीचे गणित काहीही झाले, काहीही घडले तरी पक्के असते. वारकरी संप्रदायासाठी पंढरीची ही वारी अतिशय महत्वाची असते. पाऊस नसल्याने कोरडा दुष्काळ असो वा अतिवृष्टीमुळे परिसर जलमय झालेला असो. वारकर्यांची, विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरीला जायची ओढ कायम असते. संततधार सरींमध्ये सुद्धा ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता वारकऱ्यांची पाऊले पंढरीची वाट चालत असतात. ... आळंदी - देहूहून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या निघणार्या पालख्यांचे वेळापत्रक जाहीर होते. अंदाजे २०ते २४ दिवसांनी पालख्या पंढरीत येऊन दाखल होतात.

पालखी सोहोळ्याच्या रचनेत क्रम ठरलेला असतो. आधी नगारा बैल गाडी, यांचे नगारा वादन प्रवास करताना अखंडपणे सुरु असते. त्यामागे दोन अश्व, एकावर जरीपटका घातलेला स्वार असतो तर दुसरा अश्व मोकळा असतो त्यावर संत बसतात अशी भक्तांची श्रद्धा असते. त्यामागे काही दिंड्या, जवळ जवळ २७ दिंड्या असतात. मग पालखी रथ, पुन्हा काही दिंड्या मागे.या मागच्या दिंड्या दोनशे पेक्षा जास्त असतात. प्रत्येक दिंडीमध्ये एक वीणा घेतला भक्त, एक पखावज वादक, टाळकरी, हातात ध्वज घेतलेले भक्त, डोक्यावर तुळशी वृंदावन व पाण्याचे हंडे घेतलेल्या महिला आणि अनेक इतर वारकरी चालत असतात. कपाळी गोपीचंदन व बुक्का, तुळशीमाळ गळ्यात घातली कि वारकरी होऊन त्या संप्रदायाचे नियम आचरायचे असतात. नियमित वारी करायची असते, ‘रामकृष्ण हरी’ हा जप करायचा असतो. नित्य नेमाने हरिपाठ म्हणायचा असतो. मांसाहार आणि मद्यपान वर्ज्य करायचे असते. परपुरुष व परस्त्री विठ्ठल रुक्मिणी समान मानायचे असते. अशी ही श्रद्धा, म्हणून वारकरी एकमेकांना माऊली म्हणूनच संबोधतात.


इतर सामील असलेल्या पालख्या म्हणजे ,त्र्यंबकेश्वर हून संत निवृत्तीनाथांची पालखी, पैठण हून संत एकनाथांची, सास्वधून सोपानकाका यांची, एदलाबाद हून संत मुक्ताबाईची, नरहरी सोनार, संत नामदेव,रोहिदास, चोखोबा यांची पंढरपूरहून, जनार्दन स्वामींची व संत बहिणाबाई यांची संभाजीनगरहून, वडगाव येथून जयराम स्वामी यांची पालखी, शिरसावडीचे शेकुबोवा यांची पालखी, कोळेहून घाडगे बाबा न्ची ,तर, चिंचगाव हून तपकिरी बोवा यांची पालखी, मच्छिंद्रगड हून मच्छिंद्र नाथांची, मंगळवेढा येथून दामाजी यांची, शंकर महाराज यांची माहुली अमरावती येथून,तर शिराळा येथून गोरक्षनाथ यांची पालखी पंढरपूरसाठी रवाना होते.


ज्ञानोबा माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.... अशा अखंड जयघोषात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून प्रस्थान करते. तर संत तुकारामांची पालखी देहू हून प्रस्थान करते. प्रस्थानानंतर संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचा पहिल्याच दिवशी मुक्काम त्यांच्या आजोळ घरी आळंदीत गांधीवाड्यात असतो तर तुकोबांच्या पालखीचा मुक्काम देहू गावातल्या त्यांच्या वंशजांच्या इनामदार वाड्यात असतो. भागवत धर्माची पताका हातात धरून, डोक्यावर तुळशी वृंदावन, गळ्यात तुळशीच्या माळा, टाळ आणि मृदुंगाच्या गजरात हजारो अबाल वृद्ध भक्तांचा मेळा पुण्यात दाखल होतो. वाकडेवाडी येथे दोन्ही पालख्याचा संगम होतो. हा वैष्णवांचा मेळा आळंदी देहूहून पायी चालत चालत मुळा मुठेच्या संगमावर येतो तेंव्हा गावातले सर्व भक्त, भाविक या पालख्यांचे दर्शन घेतात आणि या सोहोळ्याचे साक्षीदार होतात. नाही देहू आळंदी, नाही पंढरी, तर निदान अगदी आपल्या इथेच गावाच्या वेशीपाशी दर्शनाचा लाभ घेत भाविक धन्यता मानतात. विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट, हरिनामाचा गजर, टाळ मृदुंगाचा गजर होत असलेल्या या चैतन्यमय वातावरणात चिंब भिजतात.
 
                      

            
शिवाजीनगर ते फर्ग्युसन रोडने दोन्ही पालख्या, संत ज्ञानेश्वर महाराज पादुका मंदिर आणि संत तुकाराम महाराज पादुका मंदिर येथे थांबून आरत्या होऊन पालख्या डेक्कनला येतात. मग टिळक चौक आणि लक्ष्मी रोडने त्या आपल्या ठरलेल्या ठिकाणी, निवडुंग्या विठ्ठल मंदिरात तुकारामांची पालखी तर पालखी विठोबा मंदिरात ज्ञानेश्वरांची पालखी विसाव्याला थांबतात. पुण्यामध्ये दोन दिवस पालखीचा मुक्काम असतो, या वारीत अनेक दिंड्या सामील होतात. मग सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद, तरडगाव, फलटण, बरड, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडी शेगाव,वाखरी आणि पंढरपूर, असा पंधर ते सतरा दिवस पायी प्रवास करत करत पालख्या एकदाच्या चंद्रभागेच्या तीरावरील पंढरीला पोहोचतात.

या वारीतला रिंगण सोहोळा एक अनुभवण्याचा, आनंद देणारा, उर्जा देणारा असा ऐतिहासिक सोहोळा असतो. एकूण ३ ते ४ गोल रिंगण होतात तर ३ उभे रिंगण होतात. चांदोबाचा लिंब वाखरी, इसबावी या ठिकाणी उभे रिंगण होते. तर गोल रिंगण पुरंदवडे, खुडूस फाटा,भंडी शेगाव, बाजीराव विहीर इथे रिंगण सोहोळा होते. शेतकरी लोक आपल्या मेंढ्या घेऊन येतात तेंव्हा त्यांचे पालखीभोवती रिंगण होते. अश्वांची दौड असते. उडीचे खेळ होतात.वाखरी येथे शेवटचे रिंगण होते.       

आषाढ दशमीला संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल होतात. इथे पोहोचल्यावर वारकर्यांचा आनंद गगनात मावत नाही. “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल....” च्या गजराने मंदिराचा परिसर दणाणतो. विठुरायाच्या दर्शनाने पंधरा दिवस पायी चालल्याचे कष्ट सगळे भक्त विसरतात, एक अध्यात्मिक अनुभूती त्यांना मिळते. संपूर्ण पंढरपूर शहर भक्तिरसात न्हाऊन निघते. मंदिर परिसर भक्तीच्या उत्साहाने भारला जातो. मंदिर भक्तांनी फुलून गेलेलं असते.





यंदा पावसाने सुरुवातीला वाट पाहायला लावून, चिंता करायला लावून, एकदम जो कोसळला तो नद्या, नाले मुसळधार पावसाने दुथडी भरून वाहिल्या, इंद्रायणीला पूर आला. आळंदी जलमय झाली. मावळ मध्ये ढगफुटी सदृश पाऊस कोसळला, जनजीवन विस्कळीत तर झालेच पण, शेवटी देहू आळंदीला येणाऱ्या वारकर्यांना सुरक्षेसाठी पुण्यातच थांबण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे यंदा मोठ्या संख्येने वारकरी पुण्यात आधीच मुक्कामी पोहोचले होते.

दरवर्षी पेरण्या करून मराठवाड्यातील वारकरी भक्त वारीत सामील होत असतात. यंदा काही ठिकाणी पाऊस पडला नाही तर ते तसेच पेरण्या न करता सामील झाले आहेत. विठ्ठलाच्या भरवशावर. पावसाची आणि पुढील वर्षाची शेताची जबाबदारी पांडुरंगाच्या शिरावर टाकून भक्त या भक्तीच्या पदयात्रेत सामील होतात.

वारीचा इतिहास बघितला तर लक्षात येते कि, वारी म्हणजे तीर्थयात्रेची नियमित प्रथा. म्हणजे पवित्र स्थळी दर वर्षी जाणे येणे. भागवत धर्माचा प्रसार तेराव्या शतकात सुरु झाला तेंव्हाच वारीची परंपरा पण सुरु झाली. संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी आणि संत तुकारामाच्या घराण्याने ही पायी वारी परंपरा जोपासली. ही परंपरा ७०० ते ८०० वर्षांची आहे. अजूनही ही परंपरा तेव्हढ्याच उत्साहाने आणि श्रद्धेने साजरी करतात. पंढरपूर आणि वारी हे भक्तीचे अविभाज्य प्रतिक आहे. वारी हा श्रद्धेचा उत्सव असतो. सामुदायीक पदयात्रा असते,


ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम यांच्या पादुका पालखीतून नेण्याची परंपरा तुकाराम महाराजांचे सुपुत्र जगद्गुरू नारायण महाराज यांनी १६८५ मध्ये सुरु केली असे म्हणतात. एकत्र निघणार्या या पालख्या १८३२ पासून वेगवेगळ्या स्वतंत्र मार्गाने जाऊ लागल्या.

वारकरी आपल्या विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरला वर्षातून एकदा जातात.अशा चार तीर्थयात्रा निघतात. चैत्र वारी, कार्तिक वारी, आषाढी वारी, माघी यात्रा. वर्षातील सर्वात मोठी तीर्थयात्रा म्हणजे आषाढी एकादशीची यात्रा, यालाच देवशयनी एकादशी म्हणतात. याच दिवशी विठ्ठलाची निद्रा सुरु होते असे म्हणतात. व चातुर्मास सुरु होतो.

वारीची अनेक वैशिष्ट्ये आहेत. यात जात धर्म भाषा आणि श्रीमंत गरीब असा भेदभाव नसतो. सगळे एकाच पातळीवर, एकाच उद्देशाने विठ्ठलाच्या दर्शनाच्या हेतूने च एकत्र प्रवास करतात. वारीत सामील असलेला भक्त वारकरी शिस्तीचे पालन करतो. वेळेचे पालन करतात. सेवाभाव हा मुख्य गाभा असतो. प्रवासात अन्नदान पाणी दान आणि वारकर्यांची सेवा करणे याला खूप महत्व आहे. ही परंपरा समजून सर्व जण ते फॉलो करतात. यात दिंड्यांचे निरीक्षण केले तर खूप गोष्टी बघायला मिळतात. वारीच्या मार्गावर रस्त्यारस्त्यात वारकर्यांची व्यवस्था केलेली असते. तिथे पायी चालून दमलेल्या भक्तांना पायाला तेल चोळून देणे मसाज करणे, बरे नसेल तर औषध पाणी विचारणे, काहीही मदतीची गरज भासली तर ती त्याच्या पर्यंत पोहोचविणे, मुक्कामाच्या ठिकाणी त्यांच्या साठी सोयी सुविधांचा लाभ उपलब्ध करून देणे.


 या बाहेर गावाहून आलेल्या दिंड्या जिथे मुक्काम करतात तिथले दृश्य तर बघण्यासारखे असते. वारीतलेच लोक छोटी छोटी दुकाने थाटतात. इस्त्रीची सोय असते, दाढी कटिंग साठी दुकान अर्थात हे सलून म्हणजे फक्त खुर्ची टाकलेली किंवा खाली काही अंथरून त्यावर बसायची सोय केलेली. चहा कॉफीचे दुकान- हे बरोबर ट्रकमधून आणलेले छोटेसे टेबल मांडून केलेलं अमृतपेयाचे दुकान, पाण्याची व्यवस्था असते.ट्रक मध्ये तर, परिसरातील रहिवासी वारकर्यांची सेवा, त्यांना झोपायला जागा देऊन, सकाळचा नाश्ता देऊन आणि दोन्ही वेळचे जेवण देऊन सेवा करतात.



गल्ल्या गल्ल्यातून वारकऱ्यासाठी जेवणाच्या पंगती बसतात. शिवाजीनगर मधील आमच्या इमारती मधे आळंदीकर शहा पालखी मुक्काम काळात सर्व वारकर्यांना सकाळी गरम गरम पोहे आणि चहा यांची सोय करतात. या माउलींची सेवा घडावी म्हणून त्यांच्या मदतीला सर्व रहिवासी स्वखुशीने हजर राहतात. हे गेली अनेक वर्षे आम्ही पाहत आहोत. उजवीकडे गल्लीत नांदेड चि दिंडी थांबली होती. अत्यंत सुनियोजित वेळापत्रक असते त्यांचे. दिंडी प्रमुख स्पीकरवर सर्व सूचना देत होते. सकाळी अकरालाच जेवायला बसलेल्या वारकऱ्यांना, “पानात काहीही टाकू नका, जेव्हढे हवे तेव्हडेच घ्या, जेवणानंतर सुंदरकांड आहे. त्यानंतर भजन, हरीपाठ, कीर्तन असे एकापाठोपाठ नामस्मरणाचे कार्यक्रम जाहीर केले. संध्याकाळीच लवकर जेवणे करून लवकर झोपून उद्या पहाटे ३ लाच उठून आवरून तयार व्हायचे आहे आणि पहाटे ४ ला पुण्याहून पुढे मार्गस्थ व्हायचे आहे.” आणि खरच २,३ दिवस मुक्कामी असलेल्या विठुरायाच्या भक्तांचा हा वैष्णवांचा मेळा पहाटेच उठून पंढरीकडे रवाना झाला.आज दोन्ही पालख्या ज्ञानेश्वर माउलींची सासवड मार्गे लोणंद -फलटणकडे आणि तुकोबारायांची पालखी बारामती सणसर कडे निघाली आहे.


                                   
                                           चला पंढरीसी जाऊं । रखुमादेवीवरा पाहूं ॥१॥

डोळे निवतील कान । मना तेथें समाधान ॥ध्रु.॥

संतां महंतां होतील भेटी । आनंदें नाचों वाळवंटीं ॥२॥

तें तीर्थांचे माहेर । सर्वसुखाचें भांडार ॥३॥

जन्म नाहीं रे आणीक । तुका म्हणे माझी भाक ॥४॥

                                        - संत तुकाराम

                                                        जय जय रामकृष्ण हरी !

                                           (सर्व फोटो मायाजाल वरून साभार परत)

       - डॉ.नयना कासखेडीकर,पुणे.

                        ------------------------------------------------                 

Thursday, 16 April 2026

महिलांची कृषीक्षेत्रातील भूमिका- अपेक्षा आणि वास्तव

 

                   महिलांची कृषीक्षेत्रातील भूमिका- अपेक्षा आणि वास्तव

      स्त्री, कृषी आणि राष्ट्र यांचा संबंध म्हणजे डोळ्यासमोर येतो तो स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवताना, परकीय राजवटीत उध्वस्त झालेल्या पुण्याच्या भूमीवर राजमाता जिजाऊनी सोन्याचा नांगर फिरवला तो इतिहासातला प्रसंग. स्वराज्य मिळवून ते सुराज्य होण्यासाठीची सुरुवातच जमिनीशी नाते सांगणारी होती.

स्त्रिया आणि शेती यांचा संबंध तसा प्राचीन काळापासूनच आहे.पण अलीकडल्या शतकात आपल्या परिचयाचे नाव असणारी, जीवनाचे तत्वज्ञान सांगणारी आणखी एक अस्सल शेतकरी जी कष्टाचेच जीवन जगली, अनुभवाचेच बोल बोलली अशी कवयित्री बहिणाबाई चौधरी. तिचे सर्व आयुष्य शेतीशी निगडीत होते. ती निसर्गाला देव मानत होती. बी पेरलं कि कोंब येतो, मले त्यात देव दिसतोअसं शेतीशी तिचं नातं होतं. असं नातं असणाऱ्या स्त्रीचं मन शेती प्रक्रियेत किती गुंतलेले आहे हे लक्षात येते. हे प्रातिनिधिक उदाहरण आहे.


भारतातील शेती मुख्यता महिला कामगारांवर अवलंबून आहे.तर ७० % भारतीय कुटुंबांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. लोकसंख्येच्या पन्नास टक्के महिला या लोकशाहीमध्ये महत्वाच्या आहेत. समाजकारण, राजकारण, शिक्षण, मिडिया, उद्योग, असे संघटीत व असंघटीत अशा सगळ्या क्षेत्रात महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. त्याच प्रमाणे कृषिप्रधान असलेल्या भारतात तर कृषी क्षेत्रांत हा सहभाग जास्त आहे. हे क्षेत्र पारंपारिक असल्याने अनेक शतकांपासून या क्षेत्रांत स्त्रिया काम करत आहेत. त्यांचे योगदान मोठे आहे. घरकाम, मातृत्व, मुलांचे पालन-पोषण, कौटुंबिक जबाबदारी याबरोबरच त्या शेतीची कामे करतात. कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या ६० ते ७०% स्त्रिया निरक्षर आहेत. त्यामुळे शेतीविषयक काही माहिती अधिकचे कौशल्ये यापासून त्या वंचित राहतात.




  
  भारतातील कृषीक्षेत्रात कामगार महिलांची संख्या जास्त आहे पण विनावेतन कामाचे महिलांचे प्रमाण जास्त आहे. बिहार, उत्तर प्रदेश मध्ये ८० टक्के महिला कामगार प्रमाण आहे परंतु निम्म्याहून अधिक महिलांना पगार मिळत नाही. प्रत्यक्ष शेती, पेरणी, पुनर्लागवड त्यापूर्वी शेतातील कचरा वेचणे, तण काढणे, शेतीची स्वच्छता, कापणी, निंदणी, खते देणे, औषध फवारणी, सिंचन, तोडणी, उपणनी, खणणी आलेले उत्पादन साफ करणे, उन्हात वाळवणे व त्याची साठवण करणे, अशी सर्व कामे स्त्रीचीच. फुलशेती, फळे, भाजीपाला असेल तर तोडणी व सुरक्षित ठेवणे हे ही त्यांचीच जबाबदारी असते. तसेच त्याला पूरक असणारे उद्योग आणि पशुपालन , त्यांच्या चार पाण्याचे बघणे, मधमाशीपालन, मत्स्यपालन, कुकुट पालन, दुग्ध व्यवसाय, अळीम्बी लागवड, उसतोड कामगार, मासेमारी करणाऱ्या, वनउपज गोळा करणाऱ्या, सेंद्रिय शेती करणाऱ्या या शेतीशी निगडीत व्यवसायात महिलांचे योगदान जास्त आहे. खूप कष्ट आहेत. ही सर्व कामे गुंतागुंतीची आणि वेळखाऊ असल्याने तसेच ती हातानेच करायची असल्याने ती स्त्रियांच्याच वाट्याला येतात.




शेतकरी महिला नुसतीच शेतकरी स्त्री नाही तर ती शिक्षिका असते, स्त्री विविध भूमिका आणि जबाबदार्या संभाळताना तिचा माती,पाणी, वृक्ष जंगल अशा निसर्गाशी जोडलेली असते . तिची काही निरीक्षणे आणि अनुभव शेती व पर्यावरण यांचे संवर्धन आणि संरक्षण यासाठी कमी येतात. त्या अशा जबाबदार्या चांगल्या पार पाडतात. शेतकरी महिला कारागीर असते, उद्योजक असते. मार्गदर्शक असते. अशा अनेक पातळीवर तिची क्षमता असते, कुटुंबाची जबाबदारी सांभाळून एक शेतकरी स्त्री शेतीत सुद्धा जबाबदारीने कामे करत आहे, नव्या बदलांना सामोरे जात आहे. या सर्व गुणांमुळे स्त्रिया शेती व्यवस्थापनाचे उत्तम नियोजन करू शकतात.वेळ कष्ट, अर्थ आणि बी बियाणे यांचा योग्य वापर त्या करतात.कोविड-१९ या संकटात अनेक अन्न पुरवठा साखळ्या विस्कळीत झाल्या. अन्नौत्पादन व अन्न सुरक्षा प्रश्न निर्माण झाले ,गंभीर झाले,पण स्थानिक पातळीवर महिलांनी हे काम मोठ्या कष्टाने यशस्वीपणे केले, तेंव्हा शेतकरी स्त्रिया नुसत्या कामगार नाहीत तर त्या अन्नव्यवस्थेचा कणा आहेत हे सिद्ध झाले.





  
      २०११ च्या जनगणनेनुसार जवळ जवळ ५५% महिला शेतीची कामे करतात. २०१७ / १८ च्या आकडेवारीनुसार ७०% पेक्षा जास्त महिला कामगार शेतीच्या कामात सहभागी आहेत. गेल्या दशकात महिला कृषी कामगारांची संख्या वाढली आहे. शेतीसंबंधित सार्वजनिक किंवा धोरणात्मक व्यवहार असेल तर पुरूषच पुढे असतात. कारण शेतीचा मालकीहक्क स्त्रीला नाही. बहुतेक वारसा हक्कानेच जमिनीची मालकी मिळत असते. त्यामुळे काही योजना व फायदे केवळ जमीन मालकीच्या निकषामुळे स्त्रियांना मिळत नाहीत असे अनुभवास आले आहे. कारण शेतीवर/जमिनीवर फक्त शेतकर्याचे/पुरुषांचे नाव लागले असते त्यांच्या स्त्रियांचे /बायकांचे नाही. पितृसत्ताक पद्धत. त्यामुळे महिलांना शेतकरी म्हणून ओळख मिळत नाही. यासाठी ग्रामपंचायतीने महिलांना शेतकरी म्हणून ओळख पत्र द्यावे आणि त्या आधारे विविध योजना आणि सुविधांचा लाभ त्यांना मिळावा अशी मागणी महिला शेतकरी करत आहेत. कायद्यात तशी तरतूद आहे पण अंमलबजावणी होत नाही. भारतात च नव्हे तर जगभरात हीच परिस्थिती असल्याचे दिसते. जमीन मालकी, भाडेपट्टा हक्क व वारसा कायदे अशा धोरणांचा फायदा स्त्रियांना होत नाही.

 

 शासनाच्या ,महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी ‘नमो ड्रोन दीदी’ योजना, लखपती दीदी ,महिला किसान सक्षमीकरण परोयोजना अशा योजना व अनुदानाच्या योजना आहेत.यामुळे आर्थिक मदत, शाश्वत शेती प्रशिक्षण, उपजीविकेसाठी तांत्रिक प्रशिक्षण, सुविधा उपलब्ध होऊन महिला शेतकऱ्यांना लाभ मिळून,त्यांच्या सहभागाने राष्ट्रीय स्तरावर कृषी क्षेत्राचे चित्र बदलेल.

फक्त १३ ते १४ % महिलांकडेच जमीन नावावर आहे. त्यामुळे शेतातील महिलांच्या कामाचे अहवाल कमीच असतात. आणि त्याचा परिणाम म्हणून जनगणना आकडेवारीत महिला शेतकऱ्यांची संख्या कमीच नोंदली जाते. त्यामुळे कर्ज मिळणे, स्वतंत्र निर्णय घेणे, आणि सरकारी योजनांचा लाभ मिळणे यावर मर्यादा येतात. अशी कागद पत्रे महिलांकडे नसल्याने त्यांना पिक विमा संरक्षणाचा लाभ पण मिळत नाही. वास्तविक घरातले शेतकरी पुरुष कामानिमित्त शहरात स्थलांतर करतात तेंव्हा शेतकरी म्हणून सर्व जबाबदारी महिलांच्या अंगावर पडते. कुटुंबातीलच एक सदस्य समजून तिचे श्रम गृहीत धरले जातात. किंवा शेतीचे काम घरकामाचाच भाग गृहीत धरला जातो. त्यामुळेच त्यांना मोबदला मिळत नाही.


  स्त्रियांमध्ये उपजतच असलेल्या आत्मविश्वास, सहनशीलता, सेवा भाव, त्याग, संयम या गुणांमुळे त्यांना योग्य मार्गदर्शन व शिक्षण आणि संधी मिळाली तर कृषी क्षेत्रांत सुद्धा चांगली कामगिरी करू शकतात. हा विचार शासनाने त्यांच्या शेतकरी महिला धोरण ठरवताना करायला हवा. म्हणजे शेतकरी महिला आत्मनिर्भर होतील, त्यांना समान संधी उपलब्ध करून द्यायला हवी, शेती व्यवस्थापनासाठी नवे तंत्रज्ञान त्यानी अवगत करायला हवे. त्यांचा प्रात्याक्षिके. अभ्यास दौरे, भेटी, गट चर्चा अशा कार्यक्रमात सुद्धा सहभाग वाढवायला हवा .   

अशा अनेक महिलांचा गौरव करण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी पद्मश्री सारखे पुरस्कार शासन देत आहे. पद्मश्री पुरस्कार मिळालेली उल्लेखनीय नावे म्हणजे, बिहारची, नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणारी -राजकुमारी देवी, झारखंड मधील पर्यावरण संवर्धन करणारी जमुना तुडू, मेघालयातील हळदीची सेंद्रिय शेती करणारी - कमला पुजारी, स्वदेशी बियाण्यांची बँक तयार करणारी महाराष्ट्रातील राहीबाई पोपोरे, हरियानातील पिक पेरणी कापणी ते बाजारात उत्पादन विक्रीपर्यंत सर्व कामे स्वत करणारी अमरजित कौर, या सगळ्यांना पद्मश्री मिळाले आहे. हा गौरव इतर शेतकरी महिलांना प्रेरणा देणारा आहे.अशाच यशोगाथा भारताबाहेर सुद्धा अमेरिका, युरोप, आफ्रिका येथील शेतकरी महिलांच्या आहेत. या देशातील शेतकरी महिलांनी नवनव्या कल्पना राबवून, विज्ञाननिष्ठ शेती करून आणि सामुहिक प्रयत्न याच्या आधारे शेतीचे चित्रच बदलून टाकले आहे. म्हणजे दुष्काळग्रस्त भागात सूक्ष्म सिंचन व कोरडवाहू पिके घेऊन उत्पादन वाढवले आहे. सेंद्रिय शेती करून थेट ग्राहकांना विक्री करून शेतीला उद्योगाचे स्वरूप दिले आहे. हरितगृह व्यवस्थापन, देता आधारित शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यात युरोपातील महिला आघाडीवर आहेत.


सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला माल अथवा उत्पादने, भाजीपाला फळे सर्वच आरोग्याला हितकारक आहेत. विषमुक्त आहेत. शिवाय कमी खर्चात उपलब्ध होऊ शकतो.

म्हणूनच शेती व्यवसायात शेती विषयक सर्व उद्योगांमध्ये सुद्धा महिलांचे प्रमाण वाढायला हवे. सहभाग वाढायला हवा. प्रशिक्षित महिला उद्योजक निर्माण व्हायला हवेत. केंद्र सरकारची तसेच मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना जाहीर झाली आहे. त्यात महिलांना प्राधान्य द्यावे. कारण त्यांच्यात कृषी उद्योजक बनण्याची प्रचंड क्षमता आहे. तसेच सध्याच्या काळात ग्राहकांमध्ये आरोग्य विषयक जागरुकता वाढली आहे. त्यामुळे सुरक्षित आणि पौष्टिक वेष्टनबंद पदार्थांची मागणी वाढत आहे. दैनंदिन जीवनात या गोष्टीन्चे महत्व वाढल्याने सूक्ष्म अन्न प्रक्रियेतील रोजगाराच्या संधी सुद्धा वाढल्या आहेत. अन्नप्रक्रिया उद्योग तर स्त्रियांना योग्य संधी, योग्य आर्थिक मदत व तांत्रिक सहाय्य, प्रगत यंत्र सामग्रीचा पुरवठा, योजनांचा लाभ, सहकारी तत्वांचा लाभ, थोडे मार्गदर्शन यांचा व्यवस्थित मेळ घातला तर महिला शेतकरी उत्तम उत्पादनाबरोबर चांगल्या उद्योजक बनतील. देशाच्या अन्नप्रक्रिया उद्योगामध्ये महाराष्ट्राचा १३% वाटा आहे.महिलांचा सहभाग असल्याने अन्नप्रक्रिया उद्योगामुळे पोषणयुक्त ,दर्जेदार चांगला व परवडणारा माल तयार होईल.अन्न प्रक्रियेत गुणवत्ता सुधारणा होईल.भेसळयुक्त अन्नपदार्थापासून संरक्षण मिळेल.सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण होईल.  

यांत दुध प्रक्रिया उद्योग( खवा, पेढे, श्रीखंड, पनीर, ताक. लस्सी,दही, तूप ),मसाले प्रक्रिया (सर्व प्रकारचे मसाले व चटण्या), फळे व पालेभाज्या (जाम, जेली आईसक्रिम, सूप, चिप्स,ज्यूस), धान्य आणि तेलघाणा प्रक्रिया (सर्व तेल उत्पादने), पावडर ( धने, जिरे, हळद, मिरची ),पशुखाद्य, मांस आणि पोल्ट्री खाद्य, बेकरी product (केक, ब्रेड, बिस्किटे, टोस्ट, चिवडा) शीत साखळी, रेडी तू इट  व रेडी टू कुक उत्पादने अशा क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. मागील दोन दशकात महिला बचत गट चांगले काम करून दाखवत आहे. अशांचे सामुहिक गट तयार करून, ब्रँडिंग, विपणन, साठवणूक, पॅकेजिंग या प्रक्रियेतील आवश्यक ज्ञान उपलब्ध करून दिले तर त्या नक्की आत्मनिर्भर होतील यात शंका नाही. यातील औपचारिकता पूर्ण करताना येणारे अडथळे सरकारनेच दूर करावेत ,जेणे करून महिलांना लाभ मिळेल. तसेच ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल. ग्रामीण विकासाला चालना मिळेल.  त्यासाठी शेती तंत्रज्ञान व शिक्षणाची जोड प्रशिक्षण, स्वावलंबन व सक्षमीकरण याचे प्रयत्न झाले तर अंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा भारताची अर्थव्यवस्था फायद्याची ठरेल.हे नक्कीच शक्य आहे. २०२६ हे वर्ष महिला शेतकऱ्यांचे आन्तर्राष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे. या वर्षाच्या निमित्ताने खालील गोष्टींचा विचार व अंमलबजावणी व्हावी असे वाटते.     

1.      शेतकरी महिलांना आताच्या आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान युगांत, डिजिटल युगांत साक्षर व्हावे लागेल. तशी उपाययोजना ,प्रशिक्षण, सोय शासन व सहकारी तत्वावर अमलात आणली गेली पाहिजे. त्यामुळे हवामानाचा अंदाज, यासारखी शेतीसंबंधित माहिती डिजिटल माध्यमातून त्या मिळवू शकतील. 

2.      शासनाच्या कृषी विस्तार सेवांमध्ये असलेले पुरुषांचे वर्चस्व कमी करून महिलांना स्थान द्यायला हवे.

3.      वेगवेगळ्या कृषी केंद्रामार्फत महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिल्यास महिलांचा सहभाग वाढेल.

4.      शेती संबधित विशिष्ठ यंत्रे, अवजारे वापरण्याचे प्रशिक्षण महिला शेतकर्यांना द्यावे.

5.      शासनाच्या कुठल्याही योजनांचा लाभ मिळवण्यासाठी स्त्रीच्या नावावर सातबारा चा उतारा हवा अशी अटच आहे. तरच लाभ घेता येईल. म्हणून शेत जमिनींवर संयुक्त मालकी हक्क व ओळख महिला शेतकर्यांना मिळाली पाहिजे ज्यामुळे त्यांना कृषी कर्ज, सरकारी योजनांचा लाभ आणि स्वतंत्र निर्णय घेण्याची संधी मिळेल. त्यासाठी सर्व स्तरावरील विविध शासकीय योजना त्यांना माहिती असणे आवश्यक आहे. हा अवेअरनेस वाढवला पाहिजे. त्यासाठी एकत्र येऊन संवाद व्हायला हवा. यामुळे महिला शेतकरी केवळ मजूर न राहता त्या शेतकरी म्हणून सुद्धा त्यांना प्रतिष्ठा लाभेल. तेच अधिकार मिळतील.  

6.      महिलांनी केलेल्या सेंद्रिय उत्पादन शेती उत्पादने आणि सूक्ष्म अन्न प्रक्रियेतील उत्पादने याच्या निर्यातीला पाठींबा मिळायला हवा. बाजारपेठेत प्रवेशाची हमी मिळायला हवी.

7.      महिला शेतकर्यांना शेतात काम करताना  येणाऱ्या अडचणींना मदत म्हणून व सोयी सुविधा उदा. शेताजवळ स्वच्छ पाणीपुरवठा, पाळणाघर, उर्जा अशा सुविधा उपलब्ध असाव्यात.शिवाय त्यांच्या मुलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा सुरक्षित असायला हवा .  

8.      कृषी संबधित राष्ट्रीय आर्थिक धोरणात महिलांच्या श्रमाचा व त्या देत असलेल्या वेळेचा विचार व्हावा.

9.      निर्णय प्रक्रियेत महिला शेतकर्यांना स्थान द्यावे .    

10.    पुरुष आणि महिला असा लिंगाधारित वेतन भेदभाव करू नये. त्यांच्या श्रमाचा योग्य मोबदला मिळावा.

11.     शेतकरी म्हणून स्त्रियांना सुद्धा विमा हवा.

 

ले. डॉ नयना कासखेडीकर, पुणे. 

--------------------------------- 

 

 

women in indian agriculture -

 


                                       







हा लेख,  The think line या मासिकात ८ मार्च २०२६ ,महिला दिना निमित्त प्रसिद्ध झाला . 
--डॉ.नयना कासखेडीकर 








Wednesday, 18 March 2026

चैत्र शुद्ध प्रतिपदा

                                                                      
                                                                  चैत्र शुद्ध प्रतिपदा 


नव वर्षाभिनंदन ! नव्या वर्षाच्या शुभेच्छा! किंवा happy new year! आणि भरभरून दिलेल्या शुभ संदेशाने आपलं अत्यंत प्रिय माध्यम, म्हणजेच आपला अॅन्ड्रोईड मोबाईल आज ओसंडून वाहत असेल.फक्त आपल्या देशातीलच नाही तर परदेशातील भारतीय सुद्धा गुढी पाडव्याला या नव वर्ष शुभेच्छा देतात. 


तसं पाहिलं तर, नविन वर्ष सुरू होतं तेंव्हा जगभरातच त्या त्या कॅलेंडर नुसार शुभेच्छा देण्याची पद्धत आहे. ती सगळीकडेच पुरातन चालत आलेली परंपरा आहे.गेल्या वर्षी जगन्नियंत्याने आपले रक्षण केले त्या बद्दल त्याचे मन:पुर्वक आभार मानणे आणि येणारे वर्ष सर्वांना सुखाचे जावे अशी प्रार्थना करून एकमेकांना तशा शुभेच्छा देऊन आनंद व्यक्त करणे असा उद्देश असतो. त्याचा काळानुसार दिवस व प्रकार बदलत गेला आहे एव्हढच. जेंव्हा सौरमान आणि चांद्रमाना प्रमाणे काल गणना होत असे तेंव्हा वसंतातला पहिला दिवस हाच नव वर्षाचा पहिला दिवस असे. काही ठिकाणी जानेवारी, फेब्रुवारी त नवीन वर्ष साजरे केले जाते.पण आपण मात्र चैत्र शुद्ध प्रतिपदाच वर्षारंभ मानतो. 

        चैत्र शुद्ध प्रतिपदा! याच दिवशी सृष्टीच्या निर्मात्याने, ब्रम्हदेवाने युगारंभ केला, कृतज्ञता म्हणून ‘गुढी’ अर्थात ‘ब्रम्हध्वज’ पूजन करण्याची पद्धत आहे. हा वसंत ऋतूच्या आगमनाचा दिवस सुद्धा. आपल्या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदा, साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. 

 ब्रह्मध्वज नमस्तेऽस्तु सर्वाभीष्टफलप्रद।
 प्राप्तेऽस्मिन्‌ वत्सरे नित्यं मग्द्ऋहे मंगलं कुरु।। 

      गुढीपाडवा हा ऋतुंवरून प्रचारात आलेला सण आहे. त्याच बरोबर त्याला धार्मिक अधिष्ठान आहे आणि पर्यावरण संदर्भ सुद्धा आहे. चैत्रापासून पुढील चार महीने सर्व प्राणिमात्रांसाठी जलदान करावे, पाणपोई बांधावी. किंवा रोज एकाच्या घरी माठ भरून पाणी नेऊन द्यावे ई ... इथे धार्मिक दृष्ट्या दान म्हटले असले तरी दान म्हणजे समोरच्याला मदत किंवा त्याची सोय करणे असा आहे. इथे हा पर्यावरण वादी दृष्टीकोण दिसतो. हे चार महीने उन्हाळा असतो. जसे मनुष्य प्राण्याला उन्हाचा त्रास होतो, तसे प्राणी आणि पक्ष्यांना पण होतो. झाडांना पण होतो. एरव्ही सुद्धा आपण आपल्याकडे भर उन्हात कोणी आलं, अगदी पोस्टमन, सिलिंडर घेऊन येणारा, कुरीयर वाला, किंवा कुणीही घरी आल्यानंतर त्याला प्रथम पाणी देण्याची पद्धत आहे. उन्हाळा असेल तर द्यायलाच हवे. हाच धर्म आहे म्हणजे कर्तव्य आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला मत्स्य जयंती आहे असे मानतात म्हणून पाण्याचे महत्व आहे. पाण्याशिवाय मासा जिवंत राहू शकत नाही हे सर्वांना माहिती आहेच.म्हणून पाण्याचं महत्व आहे. 

       पाडवा म्हणजे नव निर्मितीचा आरंभ होण्याचा दिवस असतो. पाडव्याला वर्षारंभीच सर्वांचे आशीर्वाद घ्यायचे आणि आपली कर्तव्ये करण्यास सुरुवात करायची असते. यात अनेक गोष्टी येतात. पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेताची मशागत करून ठेवणे, पाऊस यदा कदाचित कमी झालाच तर त्याची सोय म्हणून विहिरी, पाट, तलाव यांची नीट सोय करून ठेवणे, दुष्काळाची शक्यता लक्षात घेऊन धान्य, चारा यांची साठवण करून ठेवणे. बी बियाणे आणून ठेवणे अशी कामे पावसाळयापूर्वी उरकून ठेवायची असतात. तर नव्या गोष्टींचा आरंभ या दिवशी करतात.


वसंत ऋतु सर्वश्रेष्ठ ऋतु म्हणजेच ऋतूंचा राजा समजला जातो.जल, वायु, धरती, आकाश आणि अग्नी या पांच तत्वांचं मोहक रूप या काळात अनुभवता येतं. शरदानंतरच्या हेमंत आणि शिशिर ऋतुत लोप पावलेलं निसर्गाचं सौंदर्य, वसंतात पुन्हा प्राप्त होतं. वसंताचे आगमन होणार्‍या काळात शरीराला थंडावा देणार्‍या कडुनिंबाचे महत्व चैत्र प्रतिपदेला असतं. आरोग्यास हितवर्धक, पचन क्रिया सुधारणारा, पित्तनाशक, त्वचा रोग बरा करणारा, शिवाय धान्यातील किडिचा नायनाट करणारा कडूनिंब आयुर्वेद दृष्ट्या महत्वाचा आहे. म्हणून त्या दिवशी कडुनिंबाची पाने खायची प्रथा आहे. उन्हाळ्यात आरोग्य सांभाळण्याची ही प्रथा उपयोगीच आहे. वसंताचा उत्सव आशावादाचे प्रतिक आहे. 

      या दिवसाच्या अनेक कथा सांगितल्या जातात. शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळविला तो याच दिवशी. म्हणूनच शालिवाहन शक सुरू झाले आणि हा दिवस विजयोत्सव म्हणून लोक साजरा करू लागले. असाच विजयदिवस लंकाधिपती रावण वधानंतर, प्रभू श्रीराम अयोध्येला चौदा वर्षानी परत आले तो विजय आणि आनंदोत्सव म्हणून घरोघरी ब्रम्ह ध्वज /गुढ्या तोरणे उभी केली. ही गुढी /ब्रह्म ध्वज आनंदोत्सवाची द्योतक आहे. कवी योगेश्वर अभ्यंकर यांचं भावगीत तुम्हाला स्मरत असेल. श्रीरामांच्या स्वागतासाठी अयोध्या कशी सजली होती, लोकांना किती आनंद झाला होता याचं हे वर्णन खूप बोलकं आहे.

 विजयपताका श्रीरामाची, 
 झळकते अंबरी, 
प्रभू आले मंदिरी . 
गुलाल उधळून नगर रंगले, 
 भक्त गणांचे थवे नाचले, 
राम भक्तीचा गंध दरवळे, 
गुढ्या तोरणे घरोघरी .

 अशा उत्साहात लोकांनी हा आनंदउत्सव साजरा केला असल्याचा उल्लेख रामायणात आहे. अशी ही उत्सवी काठी किंवा गुढी यांचे पूजन इतिहासात सांगितले आहे. उत्सवी काठीचा उल्लेख एक प्राचीनतम पुजा म्हणून इतिहासात आढळतो. 

     आपल्या सारखाच इतर देशात काठीपूजा /ब्रम्ह ध्वजपूजन /गुढी पूजन करण्याची परंपरा होती. दक्षिण आफ्रिकेत दामारा जमाती मध्ये ,सायबेरियातील सामोयीड्स मध्ये, इस्रायल मध्ये, युरोप मध्ये ख्रिश्चन पूर्व काळात मेपॉल काठी उत्सव, पॅसिफिक क्षेत्रात, कुक बेटावर आदिवासींचा काठी पुजा उत्सव, तसंच, युनान, व्हिएतनाम, कोरिया, म्यानमार या ठिकाणी काठी उत्सवांची परंपरा होती. भारतीय उपखंडात याला निरनिराळी नावे आहेत.
 

नेपाळमध्ये काठी उत्सव, आसाममध्ये बास पुजा, मणीपुर त्रिपुरा मध्ये काठी पूजा, बलुचिस्तानात, राजस्थान, मध्यप्रदेश सुद्धा काठी पुजा आहे. तसेच, ओरिसामध्ये तर आदिवासींची ‘खंबेश्वरी’ देवीची पूजा ही काठी पूजा असते. 

       गुढी हे जसे प्रतीक मानले गेले आह तसेच काठी, खांब हे पण एक प्रतीक मानले गेले आहे. ठाणे जिल्ह्यात तिसगाव येथे खांबदेव आहे. आदिवासी बांधव, येणार्‍या संकटापासून हा खांबदेव गावाचे रक्षण करतो असे मानून त्याची पूजा करतात. 

 नाशिक जिल्ह्यात विरगावात, गुढी पाडवा ते अक्षय्य तृतीया असा काठीकवाडी उत्सव साजरा करतात. पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना महिती आहे, सोलापूर मध्ये गड्डा यात्रा भरते, यातील काठीला नंदिध्वज म्हणतात. याचा संदर्भ वेगळा असला तरी काठीला देवता मानले आहे. असेच कोकणात चैत्रातील जत्रेत जतरकाठी हा वीस फुटांचा सजवलेला बांबू अर्थात काठी वाजत गाजत देवस्थानात नेऊन विधिवत पूजतात. आपल्या या प्राचीन परंपरेचे उल्लेख महाराष्ट्राच्या अनेक साहित्यात सुद्धा दिसतात. 


                              ऋषि अभिषेकिती रायाला । थोर मनीं आनंदाला ॥७॥ 
राया प्राप्‍ती जाला पट । गुडी उभवी वसिष्‍ठ ॥८॥ 
                   येथुनी हरिश्चंद्र आख्यान । नामयाची जनी म्हण ॥९॥ - संत जनाबाई

 फोडा फोडारे भांडारें । आणवा गाईचीं खिल्लारें ॥५॥ 
उभवा उभवारे गुढी । सोडा वस्रांचीं गाठोडीं ॥६॥ 
झाडोनियां टाका खडे । घाला केशराचे सडे ॥७॥ 
नामा ह्मणे भूमंडळा । स्वामि माझा पहा डोळा ॥८॥ - संत नामदेव. 

 अधर्माचि अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं । 
सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं ॥ ५० ॥ - संत ज्ञानेश्वर – ज्ञानेश्वरी अध्याय चौथा.

  माझी अवसरी ते फेडी । विजयाची सांगें गुढी । 
येरु जीवीं म्हणे सांडीं । गोठी यिया ॥ ४१० ॥ 
म्हणौनि गौप्याचीही गुढी । उभविली जगीं ॥ ६१३ ॥- संत ज्ञानेश्वर .ज्ञनेश्वरी, अध्याय चौदावा 

 अगदी म्हाइंनभट्ट यांच्या लिळाचरित्र ग्रंथापासून ,संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, संत नामदेव, संत जनाबाई, संत चोखा मेळा, संत एकनाथ, संत तुकाराम,समर्थ रामदास, यांच्या अभंगात गुढीचा उल्लेख सापडतो. गुढी ही आनंदाचे व विजयाचे प्रतीक म्हणून परंपरेने मानले गेले आहे. 

या संवत्सर सणाची भारतात विविध प्रांतात, विविध नावे आहेत. आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यात या नव वर्ष संवत्सरास ‘उगादी’ म्हणतात. गोव्यातील कोकणी लोक ‘संवत्सर पडवो’ साजरा करतात, तामिळ मध्ये याला ‘पुथंडू’ म्हणतात. श्रीलंकेत सुद्धा हा सण साजरा होतो. कश्मीर मध्ये हा सण काश्मिरी हिंदू पंडित ‘नवरेह’ म्हणून साजरा कारतात. आसाम मध्ये ‘बिहू’, केरळ मध्ये ‘विशु’, बंगाल मध्ये ‘नोब बोर्ष’ ,पंजाब मध्ये ‘बैसाखी’ तर भारत आणि पाकीस्तानातले सिंधी लोक चैत्रात ‘चेटीचंड उत्सव’ साजरा करतात. 


 भारतात सगळीकडच्या या परंपरा पाहिल्या की लक्षात येतं आपली संस्कृती ही धर्म, विज्ञान, पर्यावरण, सामाजिक आणि कौटुंबिक सलोखा या धाग्याने बांधली आहे. नव्याचं स्वागत करा. जुने जाउद्या, विसरून जा, एकमेकांशी सौहार्दाने वागा! ही आणि अशी अनेक आदर्श मूल्ये आणि संस्कार अशा सणांमधुन प्रसारित होत असतात. 
    म्हणून कवयित्री बहिणाबाई त्यांच्या गुढीपाडवा या कवितेत हाच संदेश देतात, 

 गुढीपाडव्याचा सन, आतां उभारा रे गुढी | 
नव्या वरसाचं देनं, सोडा मनांतली आढी | 
 गेलं सालीं गेली आढी, आतां पाडवा पाडवा | 
तुम्ही येरांयेरांवरी, लोभ वाढवा वाढवा || 

आजच्या सामाजिक व राजकीय सद्य परिस्थितीत हा संदेश खूप महत्वाचा आहे. म्हणूनच, 

सर्वस्तरतु दुर्गाणि सर्वो भद्राणि पश्यतु । सर्वः कामानवाप्नोतु सर्वः सर्वत्र नन्दतु ।। 

© ले. डॉ. नयना कासखेडीकर
                                                -------------------------------------------------