Tuesday, 11 April 2017

जालियनवाला बाग


घुमान येथे होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जायचे तेंव्हा किमान अमृतसरला तरी भेट द्यायची असे ठरवले होतेच. तिथल्या इतिहासाच्या पाऊलखुणा बघायच्या. लहानपणी शालेय पाठ्यपुस्तकात इतिहासात जालियानवाला हत्याकांड यांवर धडा होता. त्या धड्यातला एक प्रसंग मनावर कोरला गेला होता तो म्हणजे, ब्रिटिशानी अंदाधुंद चालवलेल्या गोळीबारात अमृतसर मध्ये लोकांनी जीवाच्या भीतीने विहिरीत उड्या टाकल्या. बापरे ! या विषयाचं गांभीर्य त्या लहान वयात काही फारस नव्हतं. मात्र आज त्या विहिरीसमोर आम्ही उभे होतो अत्यंत गंभीरपणे. वरवर बघता ही जालियानवाला बाग छान, सुंदर निगराणीत ठेवलेली बाग. पण आत जाताच या काळ्या इतिहासाच्या खुणानी भरलेली, दु:खाने भारलेली, विश्वातल्या सर्वात मोठ्या नरसंहाराची वेदना सोसलेली ही जागा.




१०,११,१२ एप्रिल १९१९ पंजाब धुमसत होताच. लोकप्रिय नेते डॉ.सत्यपाल आणि सैफ़ुद्दिन किचलू आणि महात्मा गांधी यांना पंजाब मध्ये प्रवेश बंदी करण्यात आली होती. जाळपोळ सुरु होती. कर्फ्यू लावला गेला होता. संतप्त झालेल्या लोकांनी मोर्चा काढला, त्यावर सैनिकांनी गोळीबार केला, परिस्थिती आणखीनच चिघळली. लोकांना न्याय हवा होता.  



१३ एप्रिल १९१९ चा रविवार, बैसाखी चा सण. त्यामुळे अमृतसरच्या आजूबाजूच्या गावातील अनेक शेतकरी व इतर लोक बैसाखी साजरा करायला अमृतसरला आले होते. दुपारी साडेचारची वेळ: जालियानवाला बाग-ब्रिटीश सरकारने केलेल्या रौलेक्ट कायद्या विरोधात शांततापूर्ण निषेध करण्यासाठी सभेचे आयोजन केले होते. यासाठी २०,००० लोक एकत्र आले होते. सैनिकांनी बागेला संपूर्ण वेढा दिला होता. आत जाण्यासाठी एकच अरुंद रस्ता होता. तिथपासून चारी बाजूला सैनिकांचा वेढा. जनरल डायर १५० सैनिकांबरोबर बागेत पोहोचला. मुख्य प्रवेश दारावर एका उंच ठिकाणी त्याने स्वत:ची जागा निश्चित केली. सूर्यास्ताला सहा मिनिटे बाकी असताना त्याने कोणतीही पूर्वसूचना न देता सैनिकांना जमलेल्या लोकांवर बंदूक चालवण्याचे आदेश दिले. जमलेल्या लोकांमध्ये स्त्रिया, लहान मुले, म्हातारी माणसे सुद्धा होती. १० ते १५ मिनिटांत एक हजार सहाशे पन्नास गोळ्या चालल्या. गोळ्या संपेपर्यंत सैनिकांच्या बंदुका चालूच  होत्या. जीव वाचविण्यासाठी सगळे जण बाहेरचा रस्ता शोधत, दिसेल तिकडे पळत होते. जीवाच्या आकांताने जखमी लोक सैरावैरा पळत होते. काही चेंगराचेंगरीत गेले. शेकडो लोकांनी विहिरीत उड्या घेतल्या. मृतांचे आणि जखमींचे ढीग पडले होते. बैसाखी सणाच्या दिवशीचे हे हत्याकांड.




या हत्याकांडात हजारो निरपराध लोक मारले गेले. दोन हजारावर जखमी झाले. या हत्याकांडानंतर इंग्रजांनी मार्शल लॉं लागू केला. अनेकांची धरपकड केली, भारतीय सदस्य शंकर नायर यांनी या हत्याकांड विरोधात व्हाइसरॉय च्या कार्यकारिणी समितीचा राजीनामा दिला. रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना मिळालेली ‘सर’ ही उपाधी परत केली. जालियानवाला बाग या ठिकाणी होणाऱ्या जनसभेत भाग घ्यायला महात्मा गांधी सुद्धा निघाले होते, परंतु त्याआधीच त्यांना पलवल रेल्वे स्टेशनवर १० एप्रिलला अटक करण्यात आली. ब्रिटीश सरकारच्या या क्रूर आणि निर्दयी  अत्याचाराची ही करणी नुसते पंजाबच नाही तर संपूर्ण भारतात स्वातंत्र्याचा वन्ही चेतवण्यास कारणीभूत ठरली. असे हे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील बलिदानाचे एक महत्वाचे प्रतिक म्हणजे जालियानवाला बाग !




हे ठिकाण अमृतसर शहराच्या मध्यभागी असून कुठूनही येथे पोहोचण्यासाठी सायकल रिक्षा, रिक्षा उपलब्ध आहेत. अशा या बागेत मुख्य प्रवेशदारातून एकदा आत गेलं कि डोक्यात फक्त विचार असतो तो इथे असे काय घडले या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा. इथे दिसतात, घडलेल्या हत्याकांडांचे दुख:द आठवण करून देणाऱ्या खुणा, घडलेल्या घटनेच्या साक्षीदार असलेल्या प्रतिमा. डावीकडे शहीदी चित्र कलादालन आहे ज्यात या घटनेच्या इतिहासाची ओळख होते. पुढे गेल्यावर अंदाधुंद गोळीबार होत असताना उड्या घेतल्या ती विहीर आहे. जी आज स्मारक म्हणून उभी आहे. त्याच्या शेजारीच पुढे लागून असलेल्या घरांच्या भिंतीवर अजूनही बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणा तशाच असलेल्या भिंती. बुलेट मार्क असलेल्या एका भिंतीवर तर गोळ्यांच्या २८ खुणा स्पष्ट दिसतात. एक हजार सहाशे पन्नास राउंड फायर केले गेले होते. समोर शहिदांचे स्मारक आणि ‘अमर ज्योती’ -निरपराध लोकांच्या हत्येची सतत आठवण करून देणारी धगधगती ज्योती ! सारंच कसं अंगावर शहारे आणणारे !




शहीदि चित्रशाला मध्ये मोठ्ठं पेंटिंग लावलंय, मन घट्ट करून ते पाहावं लागतं. हत्याकांडा वेळी काय दृश्य होतं ते बघून मन थरकापतं. पेंटिंग बारकाईने बघितले तर प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावरच्या त्या क्षणाच्या भावना, भीती, हे  चित्रकाराने हुबेहूब रंगवलंय. या प्रसंगाची भयानक वास्तवता हे पेंटिंग दाखवतं.

अमृतसर हे अखंड भारतातलं पंजाब प्रांतातील एक मुख्य शहर. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अग्रेसर सहभाग असलेले. पंजाब आणि लाहोर च्या फाळणीची झळ सोसलेले.





संत नामदेवांची कर्मभूमी घुमानला गेल्यावर, आमच्या संतांचे दुसऱ्या प्रांतात केलेले अतुलनीय काम बघून मन जेव्हढे अभिमानाने भरून आले, तेव्हढेच जालियानवाला बाग बघून स्वातंत्र्य योद्ध्यांपुढे मन अभिमानाने  नतमस्तक ही झाले. देशासाठी जीव गमवाव्या लागलेल्या या निरपराध लोकांना शतश: प्रणाम!
                                                     _________________
   

-  डॉ. नयना कासखेडीकर.

       

Wednesday, 25 January 2017

भारतरत्न-पंडित भीमसेन जोशी

                  

               भारतरत्न पंडित भीमसेन जोशी
                    
   

   संगीताचा ध्या त्यासाठी केलेले अविरत कष्ट, अखंड परिश्रम, एकनिष्ठ गुरुसेवापंच्याहत्तर वर्ष गुरूंची स्वरसाधना केलेले अद्वितीय कलासाधक अर्थात पंडित भीमसेन जोशी.किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक. त्यांची ख्याल शैली आणि भजन गायन यासाठी ते प्रसिद्ध होते. शुद्ध कल्याण, मिया की तोडी, पुरीया  धनश्री, मुलतानी, भीमपलास, दरबारी, रामकली हे राग म्हणजे त्यांचे खास वैशिष्ट्य होते. त्यांनी आपल्या तेजस्वी दमदार आणि आक्रमक सुरांनी कोटीकोटी रसिक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य केले. त्यांना मिळालेला भारतरत्न पुरस्कार म्हणजे त्यांच्या संगीत साधनेला केलेला मानाचा मुजराच. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि इतर अनेक पुरस्कारा नंतर आता भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराची बातमी ऐकून त्यांच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सर्वजण मनातून आनंदले होते.  जो तो आपल्या परीने आनंद व्यक्त करत होता. धन्यता अनुभवत होता. पंडितजींचे भक्त आणि संगीताचे अभ्यासक पंडित विजय कोपरकर, तसेच पंडितजींच्या सहवासातले त्यांचे साथीदार, टाळ वादक माऊली टाकळकर, तबला वादक चंद्रकांत कामत यांनी अनुभवलेले क्षण, प्रसंग, किस्से पंडितजींचा भूतकाळ उलगडून दाखवतात.   

     कार्यक्रमातल्या आणि पंडितजींच्या सहवासातल्या आठवणी सांगताना माऊली टाकळकर म्हणतात, "१९७६' पंडितजींची आणि माझी ओळख झाली. ठाण्याला होणाऱ्या कार्यक्रमात त्यांचे टाळकरी येणार नव्हते. तेव्हा माझे मित्र विठ्ठल कदमांनी मला विचारले मला एकदम दडपण आले. एवढ्या मोठ्या माणसाला साथ करायची मी भीतीने नाही म्हटले. पण अडचण लक्षात घेऊन शेवटी होम्हटल. यावेळी केलेल्या साथीवर पंडितजी एवढे खुश झाले. त्यांनी सांगितले यांना आपल्या कार्यक्रमात नेहमीसाठी घ्या. तेव्हापासुन आजपर्यंत आमचे सूर जुळलेले राहिले. हे पूर्व जन्मीचे संचीतच होय."  

     पंडितजी एकदा का कार्यक्रमात गायला बसले की त्यांचा पहिला सा लागताना उपस्थित श्रोत्यांची खात्रीच पटायची की आजचा कार्यक्रम एकदम जमून जाणार. मी ३३ वर्षे त्यांच्याबरोबर साथ केली आहे. ३००० संतवाणीचे कार्यक्रम केले आहेत. १९९० जेव्हा संतवाणी बंद केला तेव्हा मी काळजीने त्यांना विचारलं, "आता माझे पुढे काय?" ते म्हणाले, "माझ काय म्हणजे तू आता माझ्या बरोबर कायमच राहणार. मी क्लासिकलमधे प्रत्येकवेळी एक अभंग म्हणणारच. तेव्हा तुला एका अभंगासाठी का होईना घेऊन जाणार. मी त्यांच्याबरोबर संपूर्ण महाराष्ट्र एवढंच काय भारतभर तसच अमेरिका, इंडोनेशिया, जकार्ता, सिंगापूर, दुबई, अबुधाबी, मस्कत, बहारीन, शारजा इथेही गेलो. भारताबाहेर पंडितजींबद्दल फार आदर आहे. संतवाणीची अफाट लोकप्रियता हे त्यांनी घेतलेल्या कष्टाचे फळ आहे. तेवढी त्या गाण्याची तपश्चर्या आहे. तीर्थ विठ्ठल... हा अभंग गाताना ते जेव्हा विठ्ठल विठ्ठल...... ठ्ठ्लss.... ठ्ठ्ल.....s.....s म्हणायचे तेव्हा आमच्या अंगावरचे केस ताठ उभे रहायचे. एवढी त्यांच्या गाण्याशी एकरूपता होती. शब्दोच्चार व त्याच्याशी एकरूप होण्याची सवय, त्यातल्या भावाचे सादरीकरण म्हणजे स्वर ब्रम्हानंदीच लागायचा. त्यामुळे आम्ही सुद्धा तल्लीन व्हायचो. 

       गाण्यातल्या शब्दांचे उच्चार जसेच्या तसे अभंगात यायला हवेत. याकडे वत्सलाबाईंचाही फार कटाक्ष असायचा. एखादा शब्द मागेपुढे झाला की त्यांच्या लगेच लक्षात यायचं. गाण्याच्या रेकॉर्डींगला त्या जातीने हजर असत. खटलेल्या गोष्टीत रेकॉर्डींग थांबवन त्यावर चर्चा करून लगेच दुरुस्ती करवुन घेत.            

        पंडितजी बालगंधर्वांना गुरूप्रमाणेच मानत. त्यांच्या संपूर्ण संतवाणीमध्ये बालगंधर्व, मा. कृष्णराव आणि सवाई गंधर्व यांचा मिलाफ असे. कान्होबा तुझी घोंगडी... म्हणताना, पंडितजी मा. कृष्णरावच जणू उभे करायचे. तीर्थ विठ्ठल, इंद्रायणी काठी, नामाचा गजर, अणुरणीया थोकडा हे सर्वच अभंग लोकप्रिय. कितीही वेळा ऐकले असले तरी लोक त्यांचीच फर्माईश करायचे. कारण या सगळ्या गाण्यात पंडितजींनी जीव ओतला. जस लोकांच त्यांच्या गाण्यावर प्रेम तस पंडितजींच लोकांवर प्रेम. गेल्या सवाई गंधर्व महोत्सवात पंडितजी गायले. ते म्हणाले गेली दोन वर्षे मी गायलो नाही. लोक नाराज होतात. यावेळी मी १५ मिनिटे गाईन आणि दोन वर्षात गाण्याला स्पर्शही नव्हता. आजारी होते. तरीही ठरवन गायले. सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अहो परमेश्वरी कृपेशिवाय हे होऊच शकत नाही. त्यांची ७५ वर्षांची सुरांची तपश्चर्या ही काही साधीसुधी नव्हती.  

      एकदा पैठणला महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेला, नाथषष्ठीचा कार्यक्रम होता. संध्याकाळच्या कीर्तनानंतर रात्री १० ला संतवाणीचा कार्यक्रम होता. पैठणला जात असताना वाटेत आमची आणि पंडितजींच्या गाडीची चुकामुक झाली. आम्ही वेळेत पोहोच शकलो नाही. तिथे जमलेले लोक मात्र आमची वाट पाहून तिथेच झोपी गेले होते. प्रचंड गर्दी. ८० हजारावर लोक होते. आम्ही पोहोचल्यावरपंडितजी आल्याचे कळताच सर्व रसिक झोपेतून उठून कार्यक्रमाला हजर आणि रात्री २ वाजता कार्यक्रम सुरु झाला.

     कन्नडमध्ये त्यांची जवळजवळ १५० भजने आहेत. मराठीत १२५ भजने त्यांनी गायिली आहेत. सगळीच्या सगळी लोकप्रिय झाली. ते कलाकार आम्हा साथीदारांनाही खुश ठेवायचे. मान द्यायचे. आपलेपणाने वागवायचे. दुजाभाव कधीही केला नाही. फारफार मोठ्या मनाचे. त्यांनी आम्हाला खूप प्रेम दिले.

      चंद्रकांत कामत १९५६ ते १९६७ पर्यंतचा काळ पंडितजींच्या बरोबर तबल्याची साथ करायला होते. त्यांच्या अनेक गाजलेल्या कार्यक्रमाच्या व प्रवासातल्या आठवणी सांगताना ते म्हणतात "आकाशवाणी पुणे केंद्रावर तबलावादक म्हणून रुजू झालो आणि त्याच सुमारास आकाशवाणीच्या संगीत सभेत भीमसेनजी गाणार होते. त्यावेळी या सभांचे आकाशवाणीवरून थेट प्रसारण होत असे. त्यात थिरकवा साहेबांचे तबलावादन सुरुवातीला आणि नंतर पंडितजींचे गाणे. पंडितजींनी मला धीर दिला की तू तुझ्या पद्धतीने वाजव ताण घेऊ नकोस. मी तर नॉर्मलच होतो. भीमसेनजींनी अभोगीराग गायला. 'चरण घर आये....'  ही झपतालातील बंदीश होती. कार्यक्रमानंतर ते आतमध्ये आले आणि मला मिठीच मारली. म्हणाले, फारच सुंदर ठेका दिलात. आता तुम्हाला माझ्या बरोबर गाण्याला घेऊन जाणार. मी बोलवीन तेव्हा माझ्या बरोबर यायचं.” आणि लगेच १५ दिवसात फलटणच्या कार्यक्रमाचा निरोप आला. त्यांच्या गाण्याच्या बैठकीचा साचा ठरलेला असायचा. त्यात बदल नाही. पहिला एक राग, नंतर ठुमरीत्यानंतर इंद्रायणी काठी, मग मध्यंतर! त्यानंतर मालकंस, मग नाट्यसंगीत आणि शेवटी भैरवी. असं पाच ते सहा तास गाणं व्हायचं. ते ही एका दमात. पंडितजी एक राग दोन तास गायचे. ते नावाप्रमाणेच 'भीम' होते.

                           

       संतवाणीच्या जन्माची कहाणी सांगताना चंद्रकांत कामत म्हणाले, "बेडेकर गणपतीवाले गोविंद बेडेकर आणि रमेश देशमुख पंडितजींना म्हणाले, की नुसत्या अभंगांचा एक कार्यक्रम करू." त्यानुसार नुकतचं पुणे आकाशवाणी केंद्रावर अणुरणीया, तीर्थ विठ्ठल, अधिक देखणेपण, पंढरीनिवासा, हे अभंग रेकॉर्ड झाले होते. आषाढी एकादशीनिमित्त कार्यक्रम करायचा ठरला. पेपरला जाहिरात दिली. पण कार्यक्रमाची रूपरेषाच ठरली नव्हती. आषाढी एकादशी, वारकरी संप्रदाय या पार्श्वभूमीवर सुरुवात जयजय रामकृष्ण हरीनेच व्हायला पाहिजेना. शिवाय संतवाणी मध्ये अभंगच हवेत. दुसरी गाणी चालणार नाहीत. मग तशी रचना ठरली. 'रूप पाहता लोचनीहे सुरु झाल्याशिवाय अभंग सुरूच करत नाही. असा रिवाजच आहे मुळात. पण पंडितजी म्हणाले या पद्धतीने एकदाच गाईन. पुन्हा गाणार नाही. मी म्हटलं, अहो तुम्हाला आवडत नसलं तरी लोकांना तेच आवडतयं. त्यामुळे तुम्हाला तसच गावं लागेल. त्यांना वाटलं हे आपल्याला नेहेमी जमणार नाही. या कार्यक्रमाची तिकीट विक्री केव्हाच संपली. पहिलाच हाउसफुल्ल कार्यक्रम पुणे विद्यार्थिगृहात झाला. इतकी अलोट गर्दी झाली की पोलीस बंदोबस्त बोलवायला लागला. नंतर लगेच कार्तिकी एकादशीला कार्यक्रम झाला. मग मागणी वाढतच गेली. कुणी संस्थेकरता, कुणी मदतीकरता, कुणी एखाद्या निमित्ताने कार्यक्रम ठेवु लागले. प्रत्येक ठिकाणी अलोट गर्दी.

     पैठणच्या कार्यक्रमात तर एवढी प्रचंड गर्दी. आमचा कार्यक्रम सुरु झाला. पंडितजींनी ख्याल सुरु केला. प्रेक्षकात समोरच प्रचंड कोलाहल सुरु होता. एक आवर्तन होत नाही तोवर लोक उठून जाऊ लागले. पंडितजी मला म्हणाले अरे काय करायचं. तू काय वाजवतोस हे मला काहीही ऐकायला येत नाही. मी म्हटलं तुम्ही काय गाताय हे मलाही ऐकू येत नाही. इतका कोलाहल होता. त्यांनी द्रुत चीज सुरु केली आणि समोरच्या महिला एकदम उठल्या त्यांना वाटलं गाण संपल. त्यांनी ऐकलेलच नव्हत कधी. ते पाहून पंडितजींनी एवढा मोठा षड्ज लावला आणि अवघाची संसार अभंग सुरु केला. क्षणातच सर्व लोक खाली बसले. शांतता पसरली. सहा अभंग, मध्यंतर, नंतर सात अभंग असा संतवाणीचा कार्यक्रम झाला.          

    कर्नाटकातल्या कोप्पळ गावाला कार्यक्रम ठरला होता. गाव यायच्या दहा मैल अलीकडेच एका जंगलात गाडी नादुरुस्त झाली. काय बिघडलय ते समजेना. पंडितजी स्वतःच चालवित होते. शेवटी कोप्पळला वाट पहात असतील म्हणून निरोप देण्यासाठी माधव गुडेला चालत जायला सांगितले. रात्रभर आम्ही विश्रांती घेतली. सकाळी उठून पंडितजींनी पुन्हा प्रयत्न केला. तर गाडी सुरु झाली. आम्ही तासाभरात साडेसातला कोप्पळला पोहोचलो. समोरच दृश्य पाहून लोकांच्या प्रेमाची कल्पना आली. गाणं ऐकायला पंचक्रोशीतली पाच ते सहा हजारावर माणसे रात्रीपासन वाट पहात थांबली होती. पंडितजींनी लोकांची माफी मागितली आणि संतवाणीचा कार्यक्रम झाला. इतकी कर्नाटकात सुद्धा त्यांची लोकप्रियता होती. भारतरत्न पुरस्काराचा जेवढा आनंद आपल्याला झाला तेवढाच आनंद पंडितजींच गाणं ऐकताना कर्नाटकातल्या लोकांच्या चेहऱ्यावर मी पाहिल आहे. प्रेमापोटी हे लोक एक काय दोन-दोन दिवस वाट पहात थांबले आहे.  

    भीमसेनजींच्या दातृत्वाची एक आठवण सांगताना म्हणाले, केवढं दिलदार व्यक्तिमत्व आहे. १९७३-७४ ची गोष्ट आहे. नागपूरला साईबाबांचे मंदीर बांधण्यासाठी निधी संकलन म्हणून संतवाणीचा कार्यक्रम होणार होता. त्याला अभिनेते दिलीप कुमार हजर होते. तेव्हा दोन ते तीन लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. पहिल्या रांगेतल्या लोकांनी १० हजार रुपये दिले होते. राखीव खुर्चीचा दर जाहीर करण्याची पद्धत तेव्हा नव्हती. त्याचप्रमाणे दिलीप कुमार यांची सही असलेल्या फोटोचा लिलाव केला जात होता. हे सर्व संस्थेच्या मदतीसाठीच होते. शेवटची फोटोची बोली ५०० रु. झाली. त्यापुढे किंमत जातच नव्हती. शेवटी भीमसेनजींनी तो फोटो ६०६ रुपयांना विकत घेतला. हा फोटो आजही त्यांच्या घरात लावला आहे.      

    पंडित विजय कोपरकर आठवण सांगताना म्हणतात, पंडितजींचे कार्यक्रमातील गायलेले तास मोजले तर त्यांच्या इतक रेकॉर्ड कुणी केले असेल असं मला वाटत नाही. अगदी दुर्गम भागापासन लांब लांबवर प्रवासाला जाऊन ५-५/६-६ तासांच्या मैफली त्यांनी केल्या आहेत. त्यांचा पहिला कार्यक्रम १९५६ ला झाला, असे म्हणतात. तेव्हापासुन ५२ वर्षे ते संगीताची दीर्घ साधना केली. कुठेही गेले तरी त्यांच गाणं तितकच लोकप्रिय होत. हे त्यांचं वैशिष्ट्य.

     किराणा घराण्याचे संस्कार व ते गाणं त्यांच्यामध्ये आहेच. पण ते नेहेमी सांगायचे की, मी अमीरखाँ साहेब, केसरबाई केरकर, अंजनीबाई यांच्या गाण्याचा अभ्यास खूप बारकाईने केला आहे. अमीरखाँ आणि बालगंधर्वांच्या गाण्यांचे ते निःस्सीम चाहते आहेत. त्यांनी केलेल्या 'नाट्यरंग' या कार्यक्रमातून ते प्रेम दिसतंच, त्यांच्या गायकीत घराण्यांचा, संस्काराबरोबरच जो वेगवेगळ्या गोष्टींचा अविष्कार दिसतो तो त्यांच्या प्रतिभेचा भाग आहे. दुसरे म्हणजे किराणा घराण्याची सूरप्रधान व संथगायकी ही त्यांच्यात होतीच. पण त्याचबरोबर ग्वाल्हेर घराण्याची लयकारी ज्याला सुप्त लयकारी म्हणतात तीही होतीच.      

     त्यामुळे भीमसेनजींच्या गाण्याला लोक खिळून जायचे. कारण त्यांचे कुठलेही शब्द म्हणा, बोल त्या लयीच्या आवर्तनाशी अतिशय बांधन यायचे. त्यांची तपश्चर्या म्हणजे, त्यांनी सात-सात,  आठ-आठ  तास रियाज केला आहे. गुरु सवाई गंधर्वाच्या घरी कष्ट केले आहे, त्यांची सेवा केली आहे. तेव्हा हे संगीताचं वैभव त्यांना मिळालं आहे. ही कष्टसाध्य विद्या त्यांनी मिळविली, पुढेही रियाज करून, साधना करून जी सिद्धी त्यांना मिळाली म्हणूनच त्यांच गाणं सामान्य माणसालाही भावल. जसे 'पिया मिलन की आंस.....', ही ठुमरी असेल 'जो भजे हरी को सदा.....', हे भजन किंवा कोमल रिषभ आसावरीमधली  'मै तो तुमरो दास.....'  ही बंदीश. असं कुठलही गाणं भावपूर्णच आहे. मग ते क्लासिकलमध्ये असो, वा ठुमरीमध्ये. ते रसप्रधानच आहे. आणि हा त्यांचा स्वतःचा विचार आहे. या भावपूर्ण गायकीमध्ये त्यांच्या 'संतवाणी' चाही मोठा वाटा आहे.

    भीमसेनजींनी आपली किराणा घराण्याची गायकी सुयोग्य वैशिष्ट्यांनी अलंकृत करून मांडल्याने व रागदारीवर आधारलेली अभंगवाणी लोकप्रिय केल्याने जनमानसात आवडत्या गायकाचे खास स्थान निर्माण केले आहे. संतवाणीमुळे त्यांचं गाणं अगदी सामान्य गावातल्या लोकांपर्यंत, वारकरी संप्रदायापर्यंत आणि संत परंपरेपर्यंत ते लोकप्रिय झाल. 'संतवाणी' म्हणजे काय होतं ?  उदा.  "जय जय राम कृष्ण हरी..."  हे काय त्यांच्या दृष्टीने यमनच होता. 'केतकी गुलाब...',  'धन्य ही स्वर्गाहून लंका...'  ही सिनेमातली गाणी ऐकताना सुरांचा बाज आणि भारदस्तपणा आपल्याला जाणवतो ".           

    संतवाणी आणि अभंगवाणी हे अल्बम राम फाटक आणि श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केले होते. ते तर मैलाचा दगड ठरले. त्यांनी चित्रपटांसाठीही गायन केले. तानसेन’, ‘सुरसंगम’, ‘बसंत बहार’(१९५५गीत- केतकी गुलाब जुही... शंकर जयकिशन यांच्या आग्रहस्तव मन्नाडे यांच्या बरोबर जुगलबंदी ), ‘अनकहीया चित्रपटासाठी ते गायले आहेत. अनकही(१९८४) या अमोल पालेकर दिग्दर्शित चित्रपटात पंडितजींनी दोन भजनं गायली आहेत. अमोल पालेकर यांनी, ‘ही भजने आपण गावीतअशी विनंती पंडितजींना केली.त्यांनी चित्रपटाची कथा ऐकली, व्यक्तिरेखा समजून घेतली आणि विचारलं, संगीत कोण देतय? ‘जयदेव. हे  ऐकताच, कानाला हात लावत, “फार मोठा संगीतकार ,मी जरूर गाईन, फक्त एक अट आहे, जयदेवजींनी मला गाणं नीट शिकवायला हवं,माझी नीट तालिम त्यांनी करून घ्यायला हवी”. असे ठरल्यावर प्रत्यक्ष भेटीत, जयदेवना त्यांनी सांगितलं, मी तुमचं नवखा शिष्य आहे असं समजून मला शिकवा. गाण्यातली प्रत्येक जागा नं जागा मला समजावून सांगा. असं निक्षून सांगितलं.मोठ्या भारावलेल्या वातावरणात रघुवर तुमको मेरी लाज आणि ठुमक ठुमक पग ही भजनं रेकॉर्ड झाली. याला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.       

त्यांच्या अशा अनेक आठवणी संगीत क्षेत्रात बर्‍याच जणांकडे आहेत, त्यांच्या आत्मचरित्रात सुद्धा अनेक प्रसंग दिले आहेत, ज्यामुळे एका संगीताचार्याचे आयुष्य कसे होते, कलेकडे बघण्याचा दृष्टीकोण, गुरूंकडे बघण्याचा दृष्टीकोण कसा होता, कष्ट करण्याची तयारी, घराण्याची शिस्त या सर्व गोष्टींचे आकलन आपल्याला होते. स्वत: सोळा सोळा तास रियाज केलेल्या पंडितजींनी एकदा संस्कार भारतीने आयोजित केलेल्या, संगीत मार्गदर्शन कार्यशाळेत विद्यार्थ्यांना, 'रियाज कसा करावा' या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी रियाजाबद्दल बोलताना ते म्हणाले, रियाज  आणि  महफिल  यात  असा  फरक  आहे  की, जे  आपल्याला  येतं ते  गाणं,  म्हणजेच  ती  महफिल  असते  आणि  जे आपल्याला  येत  नाही  ते  करणं  म्हणजे  रियाज  असतो  .      

                               
    दूरदर्शनवरच्या प्रतिभा आणि प्रतिमा या कार्यक्रमात त्यांना सुहासिनी मुळगावकरांनी प्रश्न विचारला की, प मोठमोठे कलाकार परदेशात जाऊन येतात तुम्हीही जाऊन आलात, तुम्हाला काय वाटतं? त्यावर पंडितजी म्हणाले, कावळे आणि पक्षीही परदेशात जातात. त्यात काय विशेष आहे.

     तसच, राजकारणात जावसं वाटलं नाही का?  या पुढच्या प्रश्नावर ते मार्मिकपणे म्हणाले, "आमचं वरून सिलेक्शन झालेलं आहे. त्यांनीच आम्हाला निवडून खाली पाठविले आहे."

      पंडितजिंची लोकप्रियता इतकी वाढली होती की, ते संगीत मैफिलींसाठी वारंवार विमान प्रवास करत असत. कधी कधी तर एका दिवशी दोन वेगळ्या शहरात मैफिली असत, तेंव्हा विमानाने जाण्याशिवाय पर्याय नाही. यामुळे पु.ल. देशपांडे यांनी गमतीने त्यांना हवाईगंधर्वही पदवी दिली होती.

     राजकारणी पुढाऱ्यांमध्येही पंडितजींचे असंख्य चाहते आहेत. अफाट लोकप्रियता असतानाही त्यांनी त्याचा कधीच गैरफायदा घेतला नाही. पंतप्रधान झाल्यावर "मी गाडीत आपल्याच कैसेट एकतो" असे राजीव गांधींनी सांगितले. त्यांनी राज्यसभेचे मानद सभासद होण्याचे निमंत्रण दिले. पण पंडितजींनी स्पष्ट नकार दिला. ही पदं मिळविण्यासाठी काही जण रितसर धडपड करीत असतात. पण पंडितजींनी ते नम्रपणे नाकारले. याबाबत राजीव गांधींनी स्वतः फोन करून विचारले असता पंडितजींकडून त्यांना शांतपणे उत्तर मिळाले की, "मेरे दो तानपुरे ही मेरे लिये राज्यसभा और लोकसभा है" असे इतके नम्र आणि समाधानी .

    साथीदारांनाही ते खुप प्रोत्साहन देत. त्यांच्या कुठल्याही अटी नसायच्या. त्यांना ते खुप संधी देत. कधीही त्यांनी साथीदारांचा अपमान केला नाही. अपशब्द नाहीत. रागावणं नाही. दूरदर्शनने १९८५ मध्ये तयार केलेले देस रागातील 'मिले सूर मेरा तुम्हारा' या अभिनव प्रयोगानंतर भीमसेनजी घराघरात पोहचले. या क्षेत्रातले ते आयडॉल झाले. आपल्या गुरूंच्या स्मरणार्थ त्यांनी पुण्यात सुरू केलेला सवाई गंधर्व संगीत महोत्सव दरवर्षीच त्यांचे स्मरण करून देणारा असेल. हा महोत्सव म्हणजे पुण्याची शान आहे. आज ते आपल्यात नाहीत. मात्र, त्यांना पाहिलेले क्षण, त्यांच्या ऐकलेल्या महफिली अशा त्यांच्या आठवणी आणि त्यांचा आवाज कायम आपल्यासोबत असणार आहे. अजूनही गेली कित्येक दशके आमची सकाळ पंडितजींच्या अभंगाने सुरू होते आणि दिवस रात्रीच्या दुर्गा, मालकंस, दरबारी अशा रागातल्या शास्त्रीय गायनाने संपतो. संगीताच्या इतिहासात त्यांचे स्थान अजरामर राहील. त्यांचे एक गीत ऐकून निरोप घेऊया ! 

हे पंडितजींचं गाणं तुमच्यासाठी --- भाग्यदा लक्ष्मी ...खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा . 

https://www.youtube.com/watch?v=_tdYY6lUw9g      

© डॉ.नयना कासखेडीकर.

---------------------------------------

 (हा लेख पंडितजींना भारतरत्न मिळाले तेंव्हा लिहिला होता .)