Tuesday, 6 August 2019

गायक -श्रीधर फडके


एक मुलाखत---                  

बाबूजींच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त संगीतकार व गायक श्री श्रीधर फडके यांची मुलाखत -----
              

बाबूजीअर्थात, सुधीर फडके  हे नाव मराठी संगीतातले अजरामर असे नाव. बाबूजी यांचं जगाच्या पाठीवर हे आत्मचरित्र वाचून, तसंच त्यांच्या सहवासातून, त्यांच्या गाण्यातून, त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांच्या अनुभवातून त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख रसिक श्रोत्यांना होते. बाबूजी यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. योगायोग असा की गदिमांचेही जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिमित्ताने बाबूजींचा वारसा जपणारे त्यांचे सुपुत्र, मराठी सुगम संगीतात आपल्या प्रतिभेने रसिकांची मने जिंकलेले,  श्रेष्ठ संगीतकार व गायक श्रीधर फडके यांची बाबूजींच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकणारी मुलाखत. नव्हे, तर पुणे येथे कार्यक्रमानिमित्त आले असताना अत्यंत व्यस्त्तता असतांनाही त्यांनी बहुमूल्य वेळ दिला. त्यावेळी  त्यांच्याशी मारलेल्या या अनौपचारिक गप्पा.

श्रीधर जी :   “1942-43 च्या काळातील म्हणजे, अगदी सुरुवातीच्या काळातील परिस्थिति जगाच्या पाठीवर मध्ये बाबूजींनी  लिहिली आहे. त्यांना सर्वात पहिला चित्रपट मिळाला तो प्रभातने काढलेला हिन्दी पिक्चर गोकुळ. त्यातली गाणी फार सुंदर होती.  कहां हमारे श्याम चले....,  हे अतिशय सुंदर गीत, जी.एम. दुराणी (गुलाम मुस्तफा दुराणी) म्हणून नामवंत कलाकार होते, त्यांनी गायलंय. त्यांनी बाबूजींचं खुप कौतुक केलं. म्हणाले की, फडके साब आप इतना अच्छा गाते हो, मुझे क्युं गाने के लिये बुलाया ? जी.एम. दुराणी हे फार प्रसिद्ध व मोठे गायक, अभिनेता व संगीतकार होते त्यावेळचे".  
               
      "तुम्ही जगाच्या पाठीवर हे अभ्यासलं, तर तुम्हाला दिसेल, त्यावेळी बाबूजींच्या आयुष्याचा खूप खडतर प्रवास चालू होता. पण ते जिथे जिथे फिरले, जिथे जिथे गेले, उत्तर प्रदेशात, मध्य प्रदेशात, राजस्थान मध्ये गेले, तिथे तिथे त्यांना जे ऐकायला मिळालं, त्यातून ते समृद्ध होत गेले, शिवाय त्यांची विलक्षण प्रतिभा आणि प्रचंड बुद्धिमत्ता होती, संगीताचा आवाका मोठ्ठा होता त्यांचा, क्लासिकल उत्तम गायचे ते. ते कोल्हापूरला पाध्येबुवांकडे शिकले होते. त्यामुळे चित्रपटाचं गाणं नेमकं कसं करावं हे कौशल्य त्यांनी फार लवकर अभ्यास करून अवगत केलं. त्यामुळे कुठल्याही चित्रपटातलं त्यांचं गाणं बघा, अगदी त्यावेळेपासून ते अलीकडच्या चित्रपटापर्यन्त, वेगळं वाटत नाही . ते चित्रपटाच्या दृश्याला पोषक असतं, बाबूजींनी त्या वेळेपासून चित्रपट संगीताचा बाज बदलला. पॅटर्न बदलले. विलक्षण मोहक संगीत असे त्यांचे. मुखडा इतका आकर्षक असतो आणि अंतरेही खूप आकर्षक असत. एकातून एक असे उलगडत जातात. ते सर्व लॉजिकल असत.  हे फार महत्वाचं  आहे". 
     "संगीतकाराला सर्जनशीलताही महत्वाची आहे. या दोन्ही गोष्टी बाबूजींकडे होत्या.  कुठल्याही निर्मिती साठी प्रतिभा लागते, चाल सुचणं, काव्य समोर असताना एखाद्या कवितेला नेमकी चाल लावणं, ही फार विलक्षण गोष्ट असते. गोकुळ नंतर, वंदेमातरम  चित्रपट आला. कथा एका स्वातंत्र्यसैनिकावर होती. याची गीते गदिमांची  होती. मुख्य भूमिकेत होते पु.ल.देशपांडे आणि सुनीताबाई. संगीत बाबूजींच होतं ,यातली किती तरी गाणी लोकप्रिय झाली. वेदमंत्राहुनी आम्हा, वंद्य वंदे मातरम ..., अपराध मीच केला, शिक्षा तुझ्या कपाळी ..,   झडल्या भेरी, झडतो डंका, पुढचे पाऊल पुढेच टाका...,  ही गाणी खूप लोकप्रिय झाली होती. देशभक्ती आणि स्वातंत्र्य या पार्श्वभूमीवर ही गाणी देशप्रेम जागविणारी होती. अजूनही वेद मंत्राहुनी आम्हा हे गाणं लोक आवडीने ऐकतात. हे बाबूजींचं यश आहे. गदिमा आणि बाबूजी यांची छान जोडी जमली होती. गदिमांच्या गाण्यांना जेंव्हा बाबूजींचं संगीत लाभायचं ना तेंव्हा ते वेगळच असायचं. इतर संगीतकारांनी पण छान चाली दिल्यात. पण गदिमा आणि बाबूजी म्हणजे एक अद्वैत होतं. जसे त्यांचे शब्द तशीच बाबूजींची चाल यायची. जसेच्या तसे भाव यायचे त्यात. त्याचं आदर्श उदाहरण म्हणजे गीतरामायण’. गदिमांनी रामायणात जशा व्यक्तिरेखा लिहिल्या आहेत, तशाच बाबूजींच्या चाली आल्या आहेत”.
            
     बाबूजींच्या मनातल्या, श्रीरामाच्या प्रतिमेबद्दल श्रीधरजी सांगतात, “बाबूजी, रामाला, स्वत:च्या करणीने देवत्वाला पोहोचलेला माणूस, असे मानायचे. राम, रामचंद्र हा माणूसच ना? हा मानवावतार. पण स्वत:च्या कर्तृत्वाने ते पोहोचले ना? हे बाबूजींना फार अप्रूप होतं. बाबूजी तसे धार्मिक नव्हते. हिंदुत्व मानायचे, पण अंधश्रद्धा विरोधी होते. त्यांची श्रद्धास्थाने होतीच. शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ हेडगेवार  ही त्यांची श्रद्धास्थाने होती. ते रामजन्मभूमीच्या  सत्याग्रहातले पहिले अनुयायी होते. या रामानेच आपल्या देशाला एकत्र केलं अशी त्यांची धारणा होती. म्हणूनच रामायण त्यांच्या हृदयातून आलंय. स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. हेडगेवार, विनोबा भावे, गोळवलकर गुरुजी, डॉ राजेंद्र प्रसाद, या सर्वांनी गीत रामायण ऐकलं. यशवंतराव चव्हाणांना तर गीतरामायण तोंडपाठ होतं”.       
           
       गायक म्हणून बाबूजींची वैशिष्ठ्य सांगताना ते म्हणाले, “बाबूजींचे चित्रपटातले गाणे चालू झाल्यानंतर त्यांनी त्यांचा पहिला अनुभव सांगितला आहे, जेंव्हा बाबूजी कोल्हापूरला होते तेंव्हा एचएमव्ही कंपनी नवीन आर्टिस्ट शोधत आले होते, वसंतराव कामेरकर हे त्यांचे नवे अधिकारी होते. माधवराव माडगावकर रेकॉर्डिस्ट होते. बाबूजींना त्यांनी गाणं म्हणायला सांगितलं. बाबूजी गायला लागले, जोरात गायलं तर, रेकॉर्डिंग होतांना त्यावर खड्डा पडायचा, तेंव्हा रेकॉर्ड मेणाच्या असायच्या. 7, 8 रेकॉर्ड खराब झाल्या. काय करावं हे एचएमव्ही च्या लोकांना कळेना, शेवटी माधवराव माडगावकरांनी बाबूजींना समजावून सांगितलं की, तुम्ही चांगलं गाता परंतु कंट्रोल्ड व्हॉईस पाहिजे. कुठला शब्द दाबून म्हणायाचा हे व्हॉईस कल्चर समजून सांगीतले. बाबूजींनी त्याचा खूप अभ्यास केला. बाबूजींनी माडगावकरांना फार मोठ श्रेय दिलंय आपल्या गायकीसाठी.  विशेषत: रेकॉर्डिंग साठी गाणं कसं गावं याबद्दल. बाबूजींनी 1948 पासून ते1993 / 94, पर्यन्त जी चित्रपटगीतं गायली आहेत ना, ती त्या त्या नटाना, नायकांना, मग राजा परांजपे असोत, राजा गोसावी, असोत, सूर्यकांत असोत, रमेश देव, अरुण सरनाईक असोत. ती त्या त्या पात्रांना योग्य वाटतात. चित्रपट पाहताना ती व्यक्तिरेखाच गीत गातेय असं प्रेक्षकांना वाटतं. तसा आवाज होता बाबूजींचा. विलक्षण गोड, माधुर्य, दुसरं म्हणजे भाव व्यक्त करणं. भावनाशील गाणं म्हणणं फार अवघड असतं. मी आता म्हंटलं की भाव ओता, तर तसं होणार नाही, ते इथून हृदयातून आलं पाहिजे. त्या गाण्यात तो भाव दिसला पाहिजे”.    
       
    पुण्याच्या आकाशवाणी केंद्रावर गीत रामायणाचे पहिले गीत 1 एप्रिल 1955 ला  स्वयें श्री राम प्रभू ऐकती, कुश लव रामायण गाती. प्रसारित झालं. ही गीतांची मालिका 19 एप्रिल 1956 पर्यन्त रामनवमी पर्यन्त वर्षभर चालू होती. वाल्मिकिंच रामायण जसं अजरामर झालं आहे तेव्हढच गदिमां नी रचलेलं आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत रामायण चिरंजीव झालं आहे. 
          
   गदिमांची रससिद्ध प्रज्ञा आणि बाबूजींची सांगीतिक प्रतिभा यांचा अजोड आविष्कार म्हणजे गीतरामायण. या गीत रामायणाने निर्मितीनंतर गेली पासष्ट वर्षे मराठी मनावर अधिराज्य केलंय. गदिमा आणि बाबूजी यांनी श्रीरामाचे मूर्तीमंत चित्र या कथेतून उभं केलंय. कवीच्या शब्दातील भावना बाबूजींनी जशाच्या तशा रसिकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. आजही लोकप्रिय असलेल्या बाबूजींच्या गीतरामायणा बद्दल श्रीधर फडके यांनी समाधान व्यक्त केले आणि गीतरामायण बाबूजींसारखं दुसरं कोणीच म्हणू शकत नाही असा दृढ विश्वास ही व्यक्त केला. ते म्हणतात, “ते इतक विलक्षण आहे, की त्यातलं वर्णन गाण्यातून व्यक्त करताना त्यातले भाव  तसेच व्यक्त करावे लागतात. शूर्पणखेचं गाणं असेल, शूर्पणखा रावणाकडे गेल्यानंतरच वर्णन, तिचे नाक कापल्यानंतरचे वर्णन, तर राम किती सुंदर होता हे तिच्या तोंडून निघलेल वर्णन हे गदिमांनी एका अंतर्‍यात आणलय.  कुंभकर्णाचं गाणं आहे, योग्य समयी जागविले ... , नंतर प्रभू रामचंद्रांची गाणी, सीतेच गाणं, लक्ष्मण, भरत, कौसल्या या सगळ्या व्यक्तिरेखांची गाणी तशीच्या तशी  भावपूर्ण  मांडल्यामुळे त्या प्रसंगाची चित्रे डोळ्यासमोर उभी राहतात. म्हणून ती लोकांना भावली आहेत. गदिमांचं वैशिष्ठ्य काय की शब्दात ते चित्र दिसायचे आणि बाबूजींचं वैशिष्ठ्य म्हणजे ते चित्र स्वरातून दिसायचे. हे महत्वाच आहे. मी गीत रामायण चालू ठेवलं आहे ते टिकण्यासाठीच, मी माझ्या परीने ते म्हणण्याचा प्रयत्न करतो. पण बाबूजींसारखं ते कोणीच म्हणू शकत नाहीत”.
           
    गीत रामायणातली 56 गीते ही भूप. मिश्र काफी, जोगिया, भैरवी, पिलु, शंकरा, केदार, मारू बिहाग, मधुवंती तोडी, सारंग, मालकंस अशा विविध रागांवर आधारित आहेत. ही गीते इतकी लोकप्रिय झाली की, त्याची आजपर्यंत हिन्दी, गुजराती, कानडी, बंगाली, आसामी, तेलगू, मल्याळी, संस्कृत, कोंकणी या भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. विशेष म्हणजे ही त्या भाषात सुद्धा बाबूजींनी दिलेल्या मूळ चालींवरच गायली जातात. यावरून गीत रामायणाची प्रादेशिक भाषातही असलेली लोकप्रियता लक्षात येते.
          
     भविष्यात गीतरामायण टिकून राहण्यासाठी काय केलं पाहिजे हे सांगताना श्रीधर फडके म्हणाले, “ गीत रामायण आतापर्यंत टिकल आहे, ते टिकणारच आहे, पण पुढच्या पिढीने ते टिकवण्यासाठी त्याचा त्यांनी नीट अभ्यास करावा. काही जण गीतरामायण गातात. अवश्य गावं. कौतुकच आहे. पण ते पूर्ण गाणं गात नाहीत. चार अंतरे नका म्हणू. जेंव्हा गदिमांनी तो प्रसंग रामायणातून, गीतात उभा केलेला आहे, त्याचे  दहा अंतरे असतील,  तर ते  दहाही अंतरे म्हटलेच पाहिजेत. त्याशिवाय ती कथा, तो संपूर्ण प्रसंग आणि वातावरण निर्मिती होणारच नाही . गीताचा अर्थ लोकांना कळणार नाही. आणि अजून एक, एखादा भावगीत किंवा भक्तीगीताचा कार्यक्रम चालू आहे, त्यात एक रामायणातल गीत म्हणायचं. अजिबात नाही करायच. बाबूजी कधीही करायचे नाहीत असं. त्यांचा तो नियम होता आणि तो मीही पाळतो. रामायणाचा पूर्ण अर्थ कळणे आणि रामायणाचे पावित्र्य टिकवणे, हे झालच पाहिजे. त्यासाठी पूर्ण रामायण म्हटलं गेलं पाहिजे”.
              
  ‘वीर सावरकर  या महत्वाकांशी चित्रपटची निर्मिती बाबूजींनी केली. हा निर्मितीचा प्रवास आत्यंतिक खडतर झाला, संकटांनी बाबूजींची परीक्षाच पाहिली पण कोणत्याही अडचणीला न जुमानता, त्यांनी हे अडथळ्यांचे डोंगर पार केले, निर्मितीची ही एकहाती लढाई चिवटपणे लढत बाबुजी जिंकले आणि ही अप्रतिम कलाकृती रसिकांना सादर केली. बाबूजींची अतूट  श्रद्धा होती स्वातंत्र्यवीर  विनायक दामोदर सावरकर यांच्यावर....या विषयी श्रीधर म्हणतात,  “घरात ताण असायचाच ! गंभीर वातावरण होत, पण बाबुजी खंबीर होते आणि दुसरं म्हणजे आईची त्यांना संपूर्ण साथ होती, ती त्यांच्या मागे उभी होती, मला वाटतं हे महत्वाचे होते. मी नोकरीस होतो आणि मला फारसे काही करता येण्यासारखे नव्हते, पण माझी आई, पत्नी, काका, काकू, मुली सगळे त्यांच्या पाठीशी होते. त्यांच्या पाठीशी लोक ही उभे होते खंबीरपणे, त्यांचा बाबूजींवर विश्वास होता. बाबूजींवर टीकाही झाली. या कामासाठी दादरहून पार्ल्याच्या कार्यालयात ते बसने जात असत. पण एकदा प्रवासात ते पडले, त्यांना ओळखणार्‍या एक माणसाने त्यांना मदत केली पण मग ट्रस्टने ठरवले की त्यांना वाहन द्यायलाच पाहिजे. ही निर्मिती त्यांनी एका ध्येयाप्रती केली. ते अतिशय साधेपणाने, तत्वनिष्ठेने जगले.
            
   बाबूजीन्चे कुटुंबियांसाठी व्यक्तिमत्व कसे होते सांगताना श्रीधरजी म्हणतात , “बाबूजींना मी अण्णा म्हणायचो. घरात त्यांचा दबदबा होता. त्यांच्या बद्दल भितियुक्त आदर होता मनात. त्यांच्याशी थेट बोलायची हिम्मत होत नसे. मग मध्यस्थ असायची आई. तिच्या मार्फत बाबूजींना सांगायचे. काही मुले वडीलांशी, मित्रा सारखे बोलतात वागतात, आईवडिलांविषयी सर्वांनाच प्रेम असतं, पण बाबूजींबद्दल त्यांच्या स्वभावामुळे स्वच्छता टापटीप, शिस्त, त्यांची तत्त्वे यामुळे त्यांच्याशी बोलण्याची हिम्मत व्हायची नाही. जराशी भीती वाटायची. धाक वाटायचा.
           
      स्वच्छता आणि नीटनेटकेपणा त्यांच्या व्यक्तिमत्वात भरलेला  होता. स्वच्छतेचे धडे त्यांनीच आम्हाला दिले, नीटनेटकेपणा अतिशय प्रिय, धूळ आवडत नसे, हे सगळे धडे  त्यांनी आम्हाला लहानपणापासूनच दिले, गादी घालतांना चादरीला सुरकुत्या पडता कामा नयेत, गादीवर पाय देऊन चालायचे नाही, पाणी वाया घालवावायचे नाही, आंघोळ करणे, दात घासणे, याबाबतीत तर ते फारच जागरूक होते. साध्या साध्या  गोष्टी व्यवस्थित करण्यावर त्यांचा भर असायचा. संध्याकाळी जेवण झाल्यावर भांडी आवरणे, घासणे, लावून ठेवणे ई. साठी आईला मदत करीत. कोणी भेटायला आले तर त्यांच्यासाठी चहा करणे अशी अनेक कामे ते करीत. माझ्या मते आमच्यावर झालेले हे संस्कार होत.
          
    दुसरं म्हणजे स्वभाव निश्चयी होता. एखादे काम करायचे ठरवले की ठरविले. त्यात बदल  नाही. एखाद्या गाण्याची चाल ठरविली की त्यात बदल नसे. एखादा निर्माता किंवा दिग्दर्शकाने त्यांना एखादी चाल अशी नको, अशी हवी असे सुचविले आणि त्यांना वाटले की तो बदल आवश्यक वाटला तरच ते करीत अन्यथा तीच चाल कायम ठेवत, नि म्हणत, की तुम्ही संगीतकार बदला, पण मी चाल नाही बदलणार.  अशी गाणीच पुढे खूप लोकप्रिय झाली ...त्यांनी बालगंधर्वांच्या गायकीचा अभ्यास केला होता. पुलं नी  लिहून ठेवलंय की, गायकी आत्मसात केलेले म्हणजे सुधीर फडके...बालगंधर्व त्यांच्याकडे गायलेत ! याशिवाय हिराबाई बडोदेकर, आशाबाई (भोसले) ...गाणे बसवून घ्यायचे, जागा नि जागा घोटवून घ्यायचे...आशाबाईंनी याचा विशेष उल्लेख केला आहे.. जागा, शब्दोच्चार ...म्हणूनच तर त्यांच्या गाण्यात फडकेंचे बाबूजी दिसतात !
            
    संघ स्वयंसेवक बाबूजी कसे होते हे सांगताना, ते म्हणाले, “संघाचा स्वयंसेवक म्हणून बाबूजींचा पहिल्यापासूनच संबंध. यामुळे मा. अटलजी, मा. बाळासाहेब देवरस आदि अनेक थोर आमच्या घरी आलेले आहेत..वेळ असेल तेव्हा ते शिवाजी पार्कच्या शाखेत जात असत..उत्सवासाठी जात असत..तळजाईच्या शिबिरासाठी त्यांनी हिंदू सारा एक .. हे गीत म्हंटले होते..(प.पू. डॉक्टर हेडगेवार यांचेवरील ) लो श्रद्धांजली राष्ट्रपुरुष... तसेच चाहीये आशीष माधव (मा. श्रीगुरूजीवरील गीत) ही गीतंही लोकांच्या स्मरणात आहेत !
        
   बाबूजींच्या कार्यकर्ता म्हणून गोवा मुक्ति संग्रामच्या आठवणी श्रीधर फडके यांनी जागविल्या. “या संग्रामात ते संघ स्वयंसेवक म्हणूनच गेले होते आणि बाकी स्वयंसेवकांना एकत्र आणून त्यांनी गोवा, दादरा नगर हवेली हा भाग पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला आणि भारत सरकारला परत दिला...आपल्या देशाचा भूभाग गत साडेचारशे वर्ष पोर्तुगीजांच्या ताब्यात आहे आणि मुक्त करणे आपले कर्तव्य आहे..त्यासाठी  घर दर मुलगा सगळे सोडून ते त्यात सहभागी झाले.. माझी आई सुद्धा त्यात होती..त्यात राजा वाकणकर, नाना काजरेकर, बाबूजी, बाबासाहेब पुरंदरे असे अनेक जण होते.. तसेच गोवा स्वातंत्र्यवीर मोहन रानडे, तेलू मस्कारेन्हास् यांच्या मुक्ततेसाठी सुद्धा पुष्कळ लढले.... या लढ्यासाठी बाबूजी लंडनला २-३ वेळा, आणखी इतर ठिकाणी बरेच वेळा जाऊन आले..मला वाटते हेगला सुद्धा गेले होते..त्यांच्या मुक्ततेसाठी समिति स्थापन केली होती.. त्यासाठी ते तत्कालीन  पंतप्रधान श्रीमती इंदिराजींना सुद्धा भेटले  होते”.
          
    “बाबूजी अष्टपैलू होते.. संगीतकार.. सर्वोत्तम , गायक  म्हणून सर्वोत्तम.. त्यांची देशभक्तीची भावना प्रखर होती.. आपण देशाचे, समाजाचे देणे लागतो ही भावना त्यांच्या मनात सदैव जागृत होती.. देशासाठी काहीही त्याग करायची तयारी होती.. अगदी प्राण देण्याची आवश्यकता असेल तर त्यालाही ते सदैव तयार होते”.
        
  ‘जगाच्या पाठीवर या अपूर्ण आत्मचरित्रातील उल्लेख फार हृदयस्पर्शी आहेत, त्यामुळे वाचतांना मन भरून येते (असे त्यांना अनुभव आल्यामुळे )... पुढे काय काय घडले त्याबद्दल उत्सुकता आहे हे विचारताच , “त्यांच्या  आयुष्यावर लवकरच एक  चरित्रपट येतोय. दोन तासांच्या अवधीचा... त्याची तयारी झाली आहे, लतादीदी, आशाबाई यांच्याकडूनही माहिती विचारली  आहे ... पण दोन तासांत काय मांडायचे असा प्रश्न पडलाय”.
            
   एखाद्या वटवृक्षाच्या छायेत बाकी झाडं वाढत नाहीत, खुरटतात, असा जगाचा अनुभव असतांना तुम्ही मात्र बाबूजींच्या सारखच काम केलय... यावर प्रसन्नपणे स्मित हास्य करीत श्रीधर फडके म्हणाले, “मी त्यांच्याकडून गाण नाही  शिकलो, मी शास्त्रीय संगीत नाही शिकलो हे मला जाणवतं .. पण माझी शैली - स्टाईल आपोआप तयार झाली, हे मुद्दाम करून काही होत नाही, तर आपोआप होते.... ऐकून ऐकून जे कानावर पडले तेच काय ते शिक्षण .. तेच संस्कार ..पण जे काही केल त्याचं दोघांना (म्हणजे बाबूजी आणि मातोश्री) फारच अप्रूप होते, समाधान होत..त्यांनी गाणं कस करायला पाहिजे, मुखडा, नंतर अंतरा, त्याबद्दल संगितले ..पण एकदा सांगितल्यावर नंतर पुन्हा विचारायला गेलो असताना, “यापुढे तुझ्या चाली तुच बांधल्या पाहिजेत. तरच तुझी शैली तयार होईल” म्हणून संगितले...आणि बाबूजींनी मला कधीही गाणं शिक असा आग्रह केला नाही. तुझ्या आवडीचं जे आहे ते आधी शिक. कारण त्यांना इंजिनियर व्हायचं होतं पण ते शक्य नाही झालं. त्यांचं म्हणणं होतं विद्यार्थ्यानी आधी शिक्षण पूर्ण केलं पाहिजे. मला करियर बद्दल स्वातंत्र्य दिल होतं. म्हणूनच मी आवडीच्या क्षेत्रात शिक्षण, नोकरी करून मग निवृत्तींनंतर आता पूर्ण वेळ गाणं च करतोय”.
           
             "जन्म शताब्दीच्या निमित्ताने एक सांगावेसे वाटते की, बाबूजींचे गाणे आणि त्यांनी समाजासाठी केलेले काम सर्वांपर्यंत पोहोचावे आणि त्यांचे पुतळे उभे करू नका त्याऐवजी एखादे नवे होणारे कलामंदीर किंवा नाट्यगृह असेल त्याला बाबूजींचे नाव द्या, तिथे एखादी संगीताची लायब्ररी करा ज्यात भारतीय आणि अमेरिकन, क्यारेबियन, चायनीज, यूरोपियन अशा आणि इतर देशांच्या संगीताचा अभ्यास करता येईल. काव्याची पुस्तके ठेवावी, त्याचा अभ्यास करावा. संगीताचे विविध फॉर्म्स ऐकता येतील अशी व्यवस्था करावी   
अशा या पिता पुत्रांनी मराठी संगीत क्षेत्रात मोलाची भर घातली आहे. या अनुभवाच्या आणि तत्वांच्या आधारावर नव्या पिढीला ती तत्वं नक्कीच मार्गदर्शक ठरतील. 

मुलाखत – डॉ. नयना कासखेडीकर, पुणे.


Sunday, 31 March 2019

सावरकरांचे विचार शाहीरी कलेतून पोहोचविणार्‍या विनता काळे-जोशी





स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नात विनता ची मुलाखत ----

सावरकरांची अभ्यासपूर्ण चरित्रं अनेकांनी लिहिली. प्रबंध लिहिले. चिकित्सा केली. त्यातून हिंदुत्व निष्ठ सावरकर,विज्ञाननिष्ठ सावरकर, भक्तांचे सावरकर असे सावरकरांचे दर्शन झाले. त्यांचा व्यक्तीगत सावरकर हा पण एक पैलू आहे. त्यातली त्यांची रक्ताच्या नात्यातली माणसे कुटुंबात,सामाजिक कार्यात,आणि देशकार्यात पण एकमेकांना धरून होती, आधार देत राहिली. सावरकर तीन भाऊ ,एक बहीण यांच्या नात्याची वीण  शेवटपर्यंत घट्ट होती .

त्यांच्या कुटुंबातली विनता जोशी, माहेरची विनता काळे .स्वातंत्र्यवीर सावरकरांचे धाकटे भाऊ डॉक्टर नारायण राव सावरकर त्यांची नात. त्यांच्या धाकट्या मुलीची मुलगी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी त्यांच्याशी मारलेल्या गप्पातून उलगडलेले सावरकर प्रेम आणि अभिमान.  



“आईचं माहेर सावरकर , सावरकरांच्या घरातच एका अर्थाने जन्म झाला, म्हंटल्यानंतर आपोआपच रक्तातले गुण रक्तात उतरतात. घरातूनच  बाळकडू मिळालं त्यामुळे  वाचनाचा दांडगा छंद ही होताच. विविध क्रांतिकारकांची चरित्र, स्वातंत्र्याचा विस्तृत इतिहास, खुद्द सावरकरांनी लिहिलेली पुस्तके तर होतीच पण इतरही लेखकांची उदा. पु. ल. देशपांडे यांची पुस्तके , गदिमा यांचं काव्य, इतरही अनेक पुस्तके वाचल्यामुळे बुद्धीही प्रगल्भ होत गेली. लहानपणी वाचलेली पुस्तके, त्यामुळे फार कळत होत असे नाही, ती भाषा त्या लहान वयाला झेपत नव्हती म्हणा, त्या गोष्टी डोक्यावरुन जायच्या, पण जस मोठ होत गेले तसा अर्थ लागत गेला, आणि 1983 साल जस जवळ आल, तस सावरकरांचे जन्मशताब्दी वर्ष आता आहे,  हे जरा गाजायला लागले, मी तेव्हा दहावीत गेले होते. आणि मला वाटले की आतापर्यंत जे आपण वाचले आहे ते, लोकांपर्यंत पोहोचले तर पाहिजे, ज्या प्रमाणात पोहोचवायस हवे होते तेवढ्या  प्रमाणात ते पोहोचलेले नाही हे त्या शालेय जीवनात पण जाणवत होते. कळायच की खूप कमी माहिती आहे लोकांना सावरकरांबद्दल...मग काही तरी आपण याच्यापास्न काम करू या, सावरकरांच काम पोहोचवायच”
..  
जन्मशताब्दी निमित्ताने काहीतरी कार्यक्रम करण्याचा कुटुंबातून ठरलं होत का किंवा तसे काही मार्गदर्शन मिळाल का ? यावर विनता जोशींनी त्यांच्या शालेय जीवनापासूनचा आढावा घेतला आणि समाज प्रबोधनासाठी पोवाडा हे माध्यम कसं स्वीकारलं ते सांगितलं.

“घरातून सावरकर जन्मशताब्दी वर्ष आहे म्हणून काहीतरी कर असं काही संगितले नव्हते..पण विरोध कुठल्याही  कामाला नव्हता.. म्हणजे लहानपणापासून मतस्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य, पुर्णपणे होतं. सावरकरांच्या घरात जन्म झाला म्हणून आता त्यांचेच साहित्य वाच असं काही बंधन नव्हते. आम्ही कुठलेही विचार मांडू शकत होतो. मत मांडू शकत होतो. मात्र माझ्याच मनाला असं वाटत होतं की आपण काही वेगळा कार्यक्रम केला पाहिजे, काय करायचं हे मात्र निश्चित होत नव्हते. शाळेच्या वयात आपण गोंधळलेले असतो..हे पण करावं .. ते पण करावं असं वाटत असते...पण दरम्यान काय झाले आमच्या शाळेत एक डोंबिवलीच्या बाई आल्या होत्या..त्यांनी आम्हाला एक पंधरा मिनिटांचा छोटासा पोवाडा झाशीच्या राणीच्यावर केलेला म्हणून दाखवला..डफ बिफ घेऊन ..खूप भारावून गेलो आम्ही.. म्हणजे तोपर्यंत पोवाडा आम्हाला माहिती नव्हता. पण समोर बसून जेव्हा पोवाडा ऐकला, तेव्हा त्या माध्यमाची ताकद कळली. आणि आम्ही एकदमच भारावून गेलो. 

आमच्या ग्यादरींगला आम्ही आमच्या वर्गशिक्षिका पोळ बाईंना विचारलं की, करू का असा पोवाडा सादर?” तेव्हा, तुम्ही तुमचाच मिळवा असं सांगून त्यांनी परवानगी दिली. पण म्हंटले की काहीतरी दृश्य बसवा त्यावरची.  सुरूवातीला आम्ही शाहीर बाबासाहेब देशमुखांनी लिहिलेला तानाजी मालुसरे यांच्यावरील पोवाडा बसवला...तो कार्यक्रम फारच सुंदर प्रभावी झाला.  शाळेच्या स्नेह संमेलनात हे प्रथमच घडले..तेव्हाच माझ्या लक्ष्यात आल की पोवाडा हे फार ताकदीचे माध्यम आहे आणि आपल्याला काय सांगायचे आहे ते चित्र जसाच्या तसं यातून आपण लोकांपुढे उभे करू शकतो., माझ्या मनात विचार आला की आपण तात्यांच्या (सावरकरांच्या ) जीवनावरच जर असा पोवाडा सादर केला तर त्यांचे जीवन लोकांसमोर येईल. तात्यांची पुस्तके वाचून त्यांचे विचार लोकांना सांगून कितपत प्रभावी होतील माहीत नाही.  त्यापेक्षा पोवाड्यातून चरित्रच समोर प्रभावीपणे मांडू शकतो अस वाटलं.निदान सावरकरांची गोष्ट तरी जनमानसात माहिती होईल”.



“आणि मग शाहीर गोविंद स्वामी आफळे यांनी लिहिलेला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पोवाडा मला माहिती होता. त्यांना पुण्याला येऊन भेटले. त्यांचा सावरकर घराण्याशी स्नेह होताच पहिल्यापासून. मी त्यांचा पोवाडा म्हणणार हे ऐकून ते खुश झाले, ते म्हणाले, अगदी माझा पोवाडा जरूर म्हण. जन्मशताब्दी सुरू होणाच्या चार दिवस आधी तो पोवाडा हातात मिळाला. मग मी आणि माझ्या आई बाबांनी तो ऐकून त्याच सगळं निवेदन लिहून काढलं आणि 28 मे 1983 ला नाशिकला पसावा नाट्यगृहात साने गुरुजी कथा मालेत पहिल्यांदा मी आणि माझ्या मैत्रिणीने निवेदनासकट सादर केला. सगळ्यांना खूप आवडलं, कुणीही कंटाळले नाहीत”.

पोवाड्यातून स्वातंत्र्यवीर सावरकर लोकांपर्यंत पोहोचण्याची कल्पना यशस्वी झाल्याचे सांगताना त्या म्हणतात,  
“एक कळलं की सगळ्यांना सावरकरांची ही गोष्ट आवडली आहे. तिथेच इतरांनी पुढचे निमंत्रण दिले की आमच्याकडे सावरकरांचा हा पोवाडा सादर करावा म्हणून. कुठेही याची जाहिरात करावी लागली नाही. तेंव्हापासून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. माझं दहावीचं वर्ष, नंतर बारावीचं सायन्स चं वर्ष, पण मी कुठेही मागे हटले नाही. कधी कधी प्रॅक्टिकल बुडवून कार्यक्रम करून यायचे. इतकी त्या कार्यक्रमात मी बुडून गेले होते. तेंव्हापासून ठरवलं की पोवाडेच कार्यक्रम म्हणून करायचे. लोकांची अपेक्षा खूप वाढली. त्यांना आता मोठा कार्यक्रम हवा होता. अजून एक संकल्पना समोर आली की जयोस्तुते आणि सागरा प्राण तळमळला ही गाणी तर मंगेशकरांनी अजरामर करून ठेवली आहेत. ती लोकांची तोंडपाठ आहेत, त्यांच्या मनात त्या गाण्यांना खूप मोठ्ठं स्थान आहे. पण जी गीते, कविता, माहिती लोकांना माहिती नाहीत, जी सावरकरांनी रचली आहेत आणि त्या गाण्यांची प्रचंड मोठी ताकद आहे, अशी गाणी घेऊन, जसं, अनादि मी अनंत मी’, किंवा प्रियकर हिंदुस्तान’,  तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधु बंधु हे हिंदू एकता गीत, शस्त्र गीत अशी सावरकरांची गाणी आणि दोन पोवाडे घेऊन आमचा एक कार्यक्रम चालू झाला”.

“1986 ची गोष्ट आहे, त्यावेळी अरुणाचल प्रदेशात चाळीस हजार आदिवासी लोकं ख्रिश्चन धर्मात गेले होते. धर्मांतराचा खूप मोठा प्रश्न समोर आला होता तेंव्हा . देशभर विश्व हिंदू परिषदेतर्फे हिंदू एकता जनजागरण अभियान चालवलं गेलं होतं. तसं ते नाशिक जिल्ह्यात पण आलं.मुख्यता आदिवासी लोकांसाठी त्या भागात ते सुरू होत. नेत्यांची, विविध वक्त्यांची भाषणे व्हायची. पण लोकांना नुसती भाषणे कंटाळवाणे व्हायला नको म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने माझे पोवाडे त्याला जोडले. सुरूवातीला पोवाडे मग भाषणे, पुन्हा पोवाडे, गाणी असा कार्यक्रम रंगायचा, खूप गर्दी व्हायची . नाशिक जिल्ह्याच्या  सर्व आदिवासी भागात जाऊन आले. कार्यक्रम वाढतच गेले. काही वेळा तर दिवसातून तीन तीन कार्यक्रम होत. याच 2,3 वर्षात माझे अडीचशे ते पावणेतिनशे कार्यक्रम झाले.
1989 ला लग्नानंतर पुण्यात आले. थोडा खंड पडला. एक दोन एक दोन कार्यक्रम व्हायचे. आधीच्या सहकारी नाशिकमधल्या. आता पुण्यात एकटी कार्यक्रम करायला लागले लहान लहान.
पुढे स्वरूप वाढले मागणी वाढली. 1997 साली मात्र स्वातंत्र्याचं सुवर्ण महोत्सवी वर्ष होतं. तेंव्हा पुणे महापालिकेने खास महिलांसाठी पोवाडा स्पर्धा आयोजित केली होती. शोभा ठाकुर या मैत्रिणीच्या मदतीने भाग घेतला. पहिला नंबर मिळाला. आणि आता ग्रुप तयार झाला. नंतर बालचित्रवाणी, बाहेर च्या गावातून असे जोरात कार्यक्रम सुरू झाले.

बाबासाहेब पुरंदरे यांचा आशीर्वाद मिळणं ही गोष्ट त्या स्वाभिमानाने सांगतात,
“पण पुन्हा एकदा कार्यक्रमाला मोठं स्वरूप मिळालं ते अबुधाबी व दुबईच्या कार्यक्रमाला. प्रसिद्धीची आणि जाहिरातीची सवयच नव्हती. पण अचानक एक दिवस दुबईहून फोन आला. माझी एका वेबसाइट वरील मुलाखत वाचून पूर्वी विद्यार्थी परिषदेच्या कामात ओळखणारा आणि महाराष्ट्र मंडळाच काम करणार्‍या एकाचा की,  तुमचा कार्यक्रम आम्हाला अबुधाबी आणि दुबई साठी हवाय असा फोन. हे सगळ स्वप्नवतच होत. हा कार्यक्रम होता आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांच्या बरोबर. त्यांचा 2 तास आणि माझा 2 तास असा कार्यक्रम अप्रतिम प्रतिसादात रंगला. हा कार्यक्रम असा होता की सावरकर आणि स्वातंत्र्य संग्राम, शिवाजींच्या काळापासून, तेंव्हापासून आम्ही लढ्वय्ये आहोत, ते आम्ही, सावरकर आमचे क्रांतिकारकांचे मुकुटमणि आहोत. ते त्यांची काव्ये इथपर्यन्त आम्ही येतो. बाबासाहेबांनी यावेळी जाहीर गौरवोद्गार काढले ते म्हणजे मला आशीर्वाद होते. सन्मान होता.  अवॉर्ड होत आमच्यासाठी ते”.



अजून एक मोठी गोष्ट .पु. ल देशपांडे यांच्या समोर माझा हा कार्यक्रम सादर झाला. ते पार्किंसन्स ने आजारी होते. पण त्यांच्या घरी त्यांच्या समोर केलेला कार्यक्रम,ते आजारी असतांनाही दिलेली दाद हे मोठे आशीर्वादाचे क्षण होते .
एकदा 92, 93 साली बाळासाहेब देवरस नाशिकला नजरकैदेत होते, तेंव्हा माझी मुलगी लहान होती. मी  नाशिकला होते. बाळासाहेब देवरासांना कळलं की इथे सावरकरांची नात आहे आणि ती सावरकर यांची गाणी आणि पोवाडे छान सादर करते. त्यांनी मला निरोप पाठवून बोलावून घेतलं आणि त्यांच्या समोर मी पोवाडा आणि सावरकरांची गाणी सादर केली. हा माझ्यासाठी खूप सन्मानचा योग होता. एव्हढ्या मोठ्या व्यक्तिने बोलावून घेणे यातच मी कृतकृत्य झाले होते. त्यांनी काढलेले प्रशंसोद्गार खूप अभिमानाची गोष्ट होती. त्यांची सावरकरांची गाणी पाठ होती. त्यांनी अगदी हे गाणं म्हणून दाखव म्हणून एकेक सांगून गाणं  म्हणवून घेतलं. ते स्वता सावरकर भक्त होते. जयोस्तुते’..  सुद्धा म्हणायला लावलं होतं”.

विनायक दामोदर सावरकर या नावाचं वलय समाजात किती मूळापर्यंत आहे याची अनुभूती विनता जोशी यांना कार्यक्रम करताना सतत येत होती. 
                “हे कार्यक्रम मी चालू केले तेंव्हा यातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत सावरकर पोहोचविणे हाच मुख्य उद्देश होता. तो बर्‍याच अंशी यशस्वी झाला. अगदी छोट्या आदिवासी पाड्यावर सुध्हा पोवड्यातून सांगीतलेली सावरकरांची गोष्ट जास्त आवडत होती. त्यांना तर हे काहीच माहिती नसत जिथे त्यांना त्यांच्या गरजच भागविण कठीण असतं तिथे अशी काही माहिती असणं दूरच.
           
पोवाडा हे माध्यम कसं प्रभावी आहे हे सांगताना त्यांनी ते प्रेक्षकांना किती कळतं याबद्दल ही निरीक्षण नोंदविलं. त्या म्हणाल्या,   पोवाडा हे माध्यम फार वेगळं आणि प्रभावी आहे. कुठलाही एक चांगला विचार समाजापर्यंत पोहोचवायचा असेल तर पोवाडा अत्यंत प्रभावी माध्यम आहे. लय, ताल, संगीत, अभिनय, आवाज यामुळे दृक श्राव्य माध्यम नसतानाही एक दृश्य तुम्ही तुमच्या म्हणण्यातून उभं करू शकता अशी ताकद आहे. बर्‍याच ठिकाणी असा अनुभव आला की लोकांना सावरकरांबद्दल जी काहीच  माहिती नव्हती ती पोवाड्यातून पोहोचते आहे. कारण चरित्रच आहे त्यांचं त्यात . असेही काही अनुभव आहेत उदा. गणेश उत्सवात हा कार्यक्रम ठेवला तर त्यांना काहीही देणं घेण नसतं. स्टेजवर काय चाललाय काही कळत नाही. हे अनुभव घेऊन आता मला स्टेजवर उभं राहिल्यानंतर लगेच एका मिनिटातच प्रेक्षक ओळखू येतो की त्यांना सावरकर कळणार आहेत की नाही? अशा वेळी ओळखून सुरूवातीला त्यांना तानाजीचा पोवाडा ऐकवायचा. नाट्यरूपात, करूणरस, वीररस घेऊन मग शौर्यरसाकडे घेऊन जायचं. असे वेगवेगळे अनुभव येतात.

कार्यक्रमाला प्रेक्षक किती रसिकतेने दाद देतो किंवा किती गांभीर्याने पाहत असतो याचा त्यांना आलेला अनुभव प्रेक्षकांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे.              
   एकदा तर एका मोठ्या उच्चभ्रू सोसायटीच्या कार्यक्रमात माझ्या आधीच्या कथाकथनाच्या कार्यक्रमात महिलांमध्ये गप्पा, चौकशा सुरू होत्या. ते पाहून  शेवटी कलाकाराने कथाकथन थांबवले. कलाकाराबद्दल साधं आदर राखण्याचा भाग आपण पाळू शकत नाही याच फार वाईट वाटलं. मग पोवाडा सुरू होण्या आधी मी स्पष्ट केल. की, “ कथाकथनालाच अशी वेळ येत असेल, तर माझा पूर्ण वेगळा, देशभक्तीचा आणि देशप्रेमाचा कार्यक्रम आहे, आज तुम्ही ज्या गप्पा मारताय, चैनीत जगताय न त्यासाठी खूप जणांनी आपल्या आयुष्याचं बलिदान दिलय. ज्या वेळेला तुमचा भारत स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारतात तुमचं जन्म झाला.  पण हे स्वातंत्र्य तुम्ही का भोगू शकताय? आणि आत्ता सुद्धा तुम्ही लक्षात घ्या, आपल्या घरादारची पर्वा न करता, जे सीमेवर आता खडा पहारा देताहेत न त्यामुळे तुम्ही इथे शांतपणे, निर्भयपणे बसू शकता आहात”. या शब्दांची जादू झाली. माझा कार्यक्रम पिनड्रॉप सायलेन्स मध्ये झाला. सगळ्यांनी शांतपणे ऐकला. त्यांना खूप आवडला, समजला. असे खूप वेगवेगळे अनुभव आले”.
          
लोकांना सावरकर अजून कळले नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्या म्हणतात, “मला अजूनही वाटतं की सावरकर अजूनही पोहोचले नाहीत पेक्षा सावरकर अजूनही कळलेच नाहीत. सुशिक्षित लोकांनाही ते अजून कळले नाहीत. सावरकरांच हिंदुत्व कळलच नाही अजून लोकांना. हिंदुत्व म्हणजे हिंदुईजम किंवा कट्टरवाद नव्हे. हिंदुत्वाची व्याख्याच अशी आहे,    

आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका ।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: ॥
      
     
सिंधु नदीपासून सागरा पर्यंत पसरलेल्या या विस्तीर्ण भूमीवर ज्याची श्रद्धा आहे ,या शब्दातच सगळं येतं. सिंधुस्थान ही ज्याची केवळ पितृभूमी नव्हे, तर पुण्यभूमीही आहे ,ज्याचं या देशावर प्रेम आहे तो हिंदू. अशी विशाल व्याख्या होती हिंदूची. म्हणजे हे हिंदुत्व, धर्मात अडकलं आहे का?  माझी जर का श्रद्धा हिंदू भूमीवर आहे तर मी हिंदू आहे. माझा धर्म माझ्या घरात जो काही असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, पारशी असेल जो असेल तो. पण माझ्या मनात देशाबद्दल प्रेम असेल, ती माझी पितृभू पुण्यभू असेल तर मी हिंदू आहे.

सावरकरांचे विज्ञाननिष्ठ विचार हे झेपलेच नाहीत. त्यामुळे काही ठिकाणी सावरकरांच्या अनुयायांनीच त्यांचा पराभव केला. सावरकर समजाऊन सांगण्यात त्यांचे अनुयायी पण कमी पडतात. की नक्की सावरकरांना काय म्हणायचं आहे? हे अनुयायांना कळलेल नसतं. दोन वाक्य उचलून त्याचा अर्थ लागत नाही. त्यांचे विज्ञाननिष्ठ निबंध परत परत वाचावे लागतात. मी लहान वयात वाचलेले निबंध मला नाही कळले ,पण मोठं झाल्यावर बुद्धी प्रगल्भ झाल्यावर पुन्हा वाचले तर थोडे थोडे कळले. प्रत्येक वेळी ते नव्याने समजतात. सावरकर हा इतका मोठा विषय आहे. एव्हढे पैलू असलेला हा माणूस की जो क्रांतिकारकांचा मुकुटमणी होताच. पण त्याच वेळेला ते लेखक होते. कवि होते, नाटककार होते विज्ञाननिष्ठ होते, समाजसुधारक होते. रत्नागिरीत त्यांनी जे समाज सुधारण्याचं काम केलय ते भल्या भल्या समाजसुधारकांनी केलं नाहीये असं काम आहे. पण आज सावरकर समाजसुधारक म्हणून अजूनही आम्ही स्वीकारले नाहीत. त्या वेळेला मोठी मोठी सहभोजनं घालणं,पतितपवन सारखं मंदिर बांधणे की जे देशातल पहिलं मंदिर आहे . त्या मंदिरातल्या मूर्तिची प्रतिष्ठापनाच  हरिजनांच्या हस्ते झालेली आहे. ते सगळ्यांसाठी खुलं केलं गेलं. ही इतिहासातली खूप मोठी कामगिरी आहे.

तुम्ही आम्ही सकल हिंदू, बंधु बंधू
तो महादेवजी पिता आपुला चला तया वंदू.
ब्राम्हण वा क्षत्रीय चांग, जरी झाला,
कसलेही रूप वा रंग, जरी ल्याला.
तो महार अथवा मांग, सकलाला ,
ही एकची आई हिंदू जाती आम्हांस, तिला वंदू .

1925 साली हे सर्वमान्य हिंदू गीत मोठमोठ्या सभांमधून हजारो लोकांनी एक कंठाने वृंदगीता प्रमाणे म्हणण्याचा परिपाठ महाराष्ट्र भर झाला होता. इतर भाषतून अनुवाद होऊन तिथेही ते असेच गायले जात होते.
हे इतक सुंदर गाणं आहे सावरकरांच ते लोकांना माहितीच नाही .अशी गाणी निवडून ती लोकांपर्यंत पोहोचवायची हा उद्देश आहे कार्यक्र्म करण्यामागे. त्यातून त्यांचे विचार काय होते हे लोकांना कळेल.

सावरकर लोकांना कळले नाहीत हे सांगताना त्या समाधान व्यक्त करतात की बर्‍याच संस्था आणि शाळांमधून आता सावरकर या विषयावर वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. ही समाधानाची बाब आहे. की त्या निमित्ताने सावरकर साहित्य वाचले जाईल. कारण तसे विषय दिले असतील म्हणजे समाजसुधारक सावरकर, विज्ञाननिष्ठ सावरकर,देशभक्त सावरकर असे. तर ती मुले त्या विषयाच्या अनुषंगाने वाचन करतील आणि आपली मते मांडतील. हे एक चांगलं चित्र आहे की आताची पिढी जरा सावरकर विषय वाचायला लागली आहेत. त्यांना त्यातलं कळायला लागलं आहे. सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंध, विचार या पिढीला प्रचंड आवडणारे आहेत. आता नव्या पिढीला प्रत्येक गोष्टी मगच विज्ञान समजाऊन सांगायला लागत. ती आज गरज आहे. कारण सावरकरांनी प्रत्येक गोष्ट विज्ञानाधारीत सांगितली आहे. त्यांनी धर्मग्रंत्यह वाचू नका असं नाही सांगितलं, त्यांच्या मते प्रत्येक धर्मग्रंथ हा इतिहास म्हणून कपाटात असलाच पाहिजे आपल्या. पण ज्या कालबाह्य  झालेल्या रूढी आहेत त्या आताच्या काळाला सुसंगत नसतील तर बाजूला ठेवल्या पाहिजेत. त्यांनी युरोपच उदाहरण दिलं की जेंव्हा युरोपने बायबलला सन्माननीय ग्रंथ म्हणून कपाटात ठेवले तेंव्हाच त्यांची प्रगती झाली. त्यावेळेला समाजाला संघटित करायची गरज होती म्हणून ते लिहिलं गेलं होत. आता गरज नाही परिस्थिति बदलली आहे . परंपरा पळण्यात परिस्थितीनुसार बदल झाले पाहिजेत.त्यातलं विज्ञान ते सांगत. बदल हा उत्क्रांतीच दर्शवतो न. तुमच्यात बदल झाले पाहिजेत. विचारात बदल झाले पाहिजेत. या सर्व अनुषंगाने सावरकर अजूनही तेव्हढ्याच याने लोकांपर्यंत पोहोचायला हवेत. असे वाटते.   

सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंध आजच्या मुलांपर्यंत कसे पोहोचतील याबद्दल विनता म्हणतात, की हे सावरकरांचे विचार आजच्या मुलांना समजले पाहिजेत. पण त्याची भाषा जरा क्लिष्ट असल्याने ती कदाचित जशीच्या तशी समजणार नाही, तेंव्हा त्यांच्याकडून ती पुस्तकं वाचून घेऊन त्यावर चर्चा घडवून आणायला हवी. त्यांच्याकडून च त्यांना काय समजले हे काढून घेऊन त्यावर परिसंवाद घडवून आणायचा. त्यांना सावरकर आपले वाटायला लागतात कारण त्यांना कळत की हे तर आपल्यासारखे च विचार आहेत. मुलांना खूप आवडत असं. इतिहासाची गोष्ट घ्या ना, आपल्याकडे शाळेत इतिहास नीट शिकवला जात नाही. सावरकरांबद्दल तर इतिहासात काहीच नाही. दोन तीन ओळींशिवाय. सावरकरांनी समुद्रात उडी मारली आणि त्यांना अंदमानात शिक्षा झाली एव्हढाच इतिहास शाळेत शिकवला जातो. सावरकरच काय अनेक क्रांतिकारक आहेत ज्यांच्या बद्दल इतिहासात काही शिकवलं जात नाही.
शाळेत मुलांना इतिहास कसा शिकवला पाहिजे याबद्दल त्यांचा अनुभव लक्षात घेण्यासारखा आहे. 

इतिहास नीट समजला तर चांगली गोष्ट होईल मुलांसाठी. माझ्या मुलींच्या शाळेत मी सावरकरांचा पोवाडा त्यातल्या प्रसंगासहित बसवला होता, मुलांनी खूप छान अप्रतिम सादर केला. पुढे ते पाचवीत गेले, त्यांच्या परीक्षेत प्रश्न होता कारणे द्या मध्ये , चाफेकर बंधूंनी  Rand चा वध केला. माझ्या पोवड्यात जी मुले होती त्यांनी या प्रश्नाचं सविस्तर उत्तर निवेदांनासहित लिहिलं. कारण ते त्या नाटकात या भूमिका जगले होते. त्यामुळे सर्व पाठ होते आणि समजले ही होते. पुस्तकात एव्हढंच  होत की, पुण्यात प्लेगची साथ आली. चाफेकर बंधूंनी Rand ल गोळ्या घालून मारलेत्यांच्या इतिहासाच्या बाईंनी विचारलं, अरे एव्हढी पान -पान उत्तर आणली कुठून तुम्ही? गोष्ट च्या गोष्ट कुठून आणलीत? मुलं म्हणाली आम्ही केलं होत न नाटक आणि पोवाडा, काकूंनी आम्हाला छान शिकवलं होत.त्यातूनच लिहिलं आम्ही .  मग मलाही बाईंनी शाळेत बोलावून घेतलं. मी त्यांना सांगितलं की इतिहास हा पाठांतर करून घ्यायचा विषय नाही. सनावळी घोकण्याचा उपयोग नाही. ते प्रसंग त्यांना शिकवले गेले पाहिजेत. छोट्या छोट्या प्रसंगातून गोष्टीतून तो त्यांना जास्त चांगला समजतो.त्यांच्या मनावर ठसतो. तो परीक्षा घेण्याचा विषयच नाही. बाजीरावांनी किती साली काय केल हे विचारण्यापेक्षा ते कशी एकही लढाई हरले नाहीत ते कसे जिंकत गेले हे सांगा. हे कोणालाच संगितले जात नाही”.

सावरकर जिथे जिथे फिरले तिथे तिथे भेटी देऊन विनता ताईंनी या विषयाचं  पुन्हा एकदा जागरण केल. याबद्दल त्यांनी सांगितलं.

“सावरकर जिथे जिथे गेले राहिले व काम केल तिथे तिथे जाऊन मी कार्यक्रम केले. भगूर,नाशिक, रत्नागिरी, पुणे- फर्ग्युसन कॉलेज, सावरकर स्मारक, मुंबई, अंदमान, लंडन सुधा. अंदमानात वेगवेगळ्या कंपन्यांबरोबर जाऊन कार्यक्रम करते. लंडन मध्ये यावर्षी 15 ऑगस्ट ल स्वातंत्र्य दिना दिवशी तिथल्या महाराष्ट्र मंडळात कार्यक्रम करायला मिळाला. तिथे माझ्या हस्ते ध्वजारोहण झालं. हा अविस्मरणीय अनुभव होता माझा. यावेळी मनात भावनांचा कल्लोळ होता. ज्या ब्रिटीशांनी सावरकरान्वर अनन्वित अत्याचार केले ,त्यांच्याच देशात आपल्याच स्वातंत्र्य दिनाला 15 ऑगस्ट ला त्यांच्याच नातीच्या हस्ते ध्वजारोहण, ही रोमांचकारी घटना होती माझ्यासाठी. डोळ्यात पाणी आलं. आजही भरून येतं. उपस्थिती तर खूप होती. त्यांचं ऑडिटोरियम खचाखच भरल होत जे एरव्ही 20 - 25 लोक असतात. त्यामुळे पदाधिकार्‍यांनाही खूप आश्चर्य वाटलं. हे सगळ सावरकरांवरचं प्रेम, आदर आणि आपल्या देशावरच प्रेम होत. लंडनला मुलाखत पण झाली टीव्ही वर .



“अंदमानला तर लोकांना सावरकरांबद्दल खूप आदर आहे. मी अनुभवते आहे.रोस आयलंड च्या अनुराधा ताई राव आहेत त्यांचा विलक्षण अनुभव आहे. त्सुनामी मध्ये सर्व काही गेल त्या एकट्याच उरल्या घरातल्या. पण त्या रोस आयलंड च संपूर्ण इतिहास डोळ्यासमोर उभा करतात. त्याच अनुषंगाने त्या सांगतात की अंदमानातल, मी एकाच व्यक्तिमत्वाला मानते ते म्हणजे माझ्या या अंदमानात सावरकर होते त्यांना . त्या सावरकरांबद्दल बोलतात तेंव्हा जाज्वल्य अभिमानाने बोलतात. भरून येत, नाहीतर अंदमानात जे जे लोक पर्यटक येतात त्यातल्या कित्येकांना सावरकर या नावा पलीकडे काहीही माहिती नसतं. पर्यटन तुम्ही जरूर करा पण ज्या स्थानाला जे महत्व आहे जी शुचिर्भूतता आहे, जे पावित्र्य आहे त्याचा भंग करू नका. हे आपल्याच कडे आहे, परदेशात हे सांगावं लागत नाही लोकांना” .    

“ सावरकरांचा माफीनामा या न कळलेल्या विषयाची चर्चा चालू आहे ती लाजिरवाणी आहे. केवळ राजकीय आहे. इतिहासाचं राजकारण केल्याने खरा इतिहास अजून कळलेला च नाही. स्वातंत्र्याच्या लढ्यात किती ज्ञात-अज्ञात वीर झाले ते कोणापर्यंत पोहोचलेच नाहीत. त्यांची नावं सुधा माहिती नाहीत कोणाला. अंदमानात बंगाली जास्तीत जास्त क्रांतिकारक, मग पंजाबी आणि फक्त तीनच महाराष्ट्रियन क्रांतिकारक होते. त्यातले दोन तर सावरकर बंधुच .एक जोशी. जगाच्या इतिहासात असं एकमेव उदाहरण असेल की एकाच घरातले दोन सख्खे भाऊ एकाच वेळी शिक्षा भोगताहेत पण,  2 महीने त्या एकमेकांना माहिती नव्हतं की ते एकाच तुरुंगात आहेत”.
आपल्या शाहीरी कलेबद्दल त्यांनी आठवण सांगितली.

“सगळ्यांना प्रश्न पडतो की शाहीरी कला कशी काय तुमच्याकडे? मी जेंव्हा सावरकरांवर कार्यक्रम चालू केले तेंव्हा माझी आज्जी लक्ष्मीबाई सावरकर होत्या.म्हणजे नारायणरावांच्या पत्नी. जसे माझे पोवाडे तिने ऐकले, तेंव्हा तिची ताबडतोब प्रतिक्रिया होती, अगं, तू तर अगदी ह्यांच्या सारखी म्हणजे डॉक्टर नारायण रावांसारखी तुझ्याकडे ही कला आली आहे”. माझे आजोबा डॉक्टर नारायणराव सावरकर हे लहान पणापासून उत्तम पोवाडे गायचे. म्हणजे तात्यांचे पोवाडे मित्रमेळयातून सादर करायचे ते माझे आजोबाच.      
असे सावरकर विचार पोहोचविण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करतोय. मी माझ्या परीने करते आणि करतच राहणार आहे”.
तुमच्यासाठी अंदमानच्या कोठडीतील सादरीकरण--  
      


       मुलाखत –  डॉ. नयना कासखेडीकर      

Wednesday, 15 August 2018

मॅडम भिकाजी कामा ( मादाम कामा )


मॅडम भिकाजी कामा 


स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करणारी, मातृभूमीवर अपार श्रद्धा. प्रेम व निष्ठा असणारी,आपला देश स्वतंत्र आणि एकसंध झालेला दिसावा अशी इच्छा बाळगून स्वातंत्र्य वीर सावरकरांच्या संपूर्ण क्रांतीपर्वात सक्रीय भाग घेणारी एकमेव महिला म्हणजे मॅडम भिकाजी रुस्तुम कामा.स्वातंत्र्य लढ्यातील त्यांची कामगिरी महिलांना ललामभूत ठरणारीच आहे.

एकशे अकरा वर्षापूर्वी म्हणजेच १८ ऑगस्ट १९०७ या दिवशी,स्वतंत्र भारताचा ध्वज एका आंन्तराष्ट्रीय मेळाव्यात फडकीवणाऱ्या धाडसी मॅडम कामांचे नाव भारताच्या स्वातंत्र्याच्या ऐतिहासिक लढ्यात ठळकपणे लिहिले गेले आहेच.परंतु जगभरातही त्यांचे नांव आदराने घेतले जात असे.त्याचे कारण,हिंदुस्थानातल्या ब्रिटीशांच्या दडपशाहीचा अर्थ व स्वरूप,त्यांनी अमेरिका,फ्रान्स व इंग्लंड मध्ये जाऊन तिथल्या जनते समोर उलगडून दाखविला .हिंदुस्थानाबद्दल व स्वातंत्र्य मिळण्याबाबत तिथल्या जनतेला आपल्या भाषणातून,वृत्तपत्रीय लेखनातून,प्रसिद्धी पत्रकातून,बैठकांमधील चर्चातून जनमत वळवण्याचा प्रयत्न मडॅम कामा यांनी केला.

मडॅम कामा पारशी कुटुंबातल्या.इराण देश अरबांनी जिंकल्यावर,अनेक पारशी कुटुंबे स्थलांतरित होऊन,चीन व हिंदुस्थानात येऊन राहिले.जे हिंदुस्थानातल्या ठाणे येथील  बंदरात उतरले ते सर्व पारशी कुटुंब मुंबईत स्थाईक झाले.त्यापैकीच एका श्रीमंत पारशी कुटुंबात भिकाजींचा जन्म २४ सप्टेंबर १८६१ या दिवशी झाला.त्यांचे नाव भिकाजी सोराबजी पटेल.आई जायजी आणि वडील सोराबजी फ्रामजी पटेल,एक प्रतिष्ठीत व श्रीमंत व्यापारी होते.
गोऱ्यापान वर्णाची,गुटगुटीत व अवखळ भिकू म्हणजे वडिलांची लाडकी मुलगी, मोठी झाल्यावर मुंबईच्या अलेक्झांड्रा नेटिव्ह गर्ल्स इंग्लिश इंस्टिट्युशन या शाळेत शिक्षण घेऊ लागली.

भिकू ,उत्तम घोड्यांच्या विक्टोरिया गाडीतून डौलाने शाळेत जात असे.त्या वेळच्या परिस्थितीत पारशी समाजातही मुलींनी शाळेत गेल्यास खळबळ माजत असे. परंतु दादाभाई नौरोजी व इतरांच्या पुढाकाराने मुलींना शाळेत घालण्याच्या प्रथेला पटेलांचीही मान्यता होती. पण भिकू महाविद्यालयात मात्र गेल्या नाहीत.तरीही लेखन-वाचन सुरूच ठेवले.गुजराथी,हिंदी,इंग्रजी,मराठी या भाषा उत्तम येत होत्या त्यांना.उत्तम संभाषणा बरोबरच खेळ व क्रिकेट यातही त्या प्रवीण होत्या.लग्नाचे वय झालेल्या भिकाजीचे लग्न,के.आर.कामा या प्राच्यविद्या पंडितांचे चिरंजीव रुस्तम खुर्शीद कामा यांच्याशी,३ ऑगस्ट १८८५ ला मोठ्या थाटामाटात पार पडले.भिकू पटेल आता भिकाजी रुस्तुम कामा झाल्या.रुस्तुम प्रसिध्द सोलीसीटर होते.

परंतु लग्नाआधी या बुद्धिमान आणि संवेदनशील भिकाजीवर तत्कालीन राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा खोलवर प्रभाव पडत होता. दिवसेंदिवस देशभक्तीची ओढ आकर्षित करीत होती.सामान्यपणे लग्नानंतर तिचे मन बदलेल असे कुटुंबियांना वाटले.शिवाय रुस्तुम कामा इंग्रजांचे कट्टर भोक्ते.स्वातंत्र्य लढा सुरु होण्याआधी जी सौम्य आंदोलने होत होती,त्यात व समाजसेवेत पतीच्या विरोधाला न जुमानता काम करत.

मुंबईतल्या एका कॉंग्रेस अधिवेशनाला भिकाजी हजर राहिल्या आणि त्यांच्या जीवनाला कलाटणीच मिळाली.तेंव्हापासून त्या कडव्या देशभक्त झाल्या. पती-पत्नीच्या राजकीय मतभेदांमुळे नाईलाजाने दोघांमध्ये फारकत झाली.देशाचा संसार तोच आपला संसार अशी मनाशी खुणगाठ बांधून मातृभूमीच्या सेवेसाठी त्यांनी आयुष्य झोकून दिले.


मुंबईला १८९६ मध्ये आलेल्या प्लेगच्या साथीच्या वेळी,पारसी फिवर हॉस्पिटल निघाले.त्यात भिकाजी कामांसह  अनेक पारशी महिला मानद परिचारिका म्हणून काम करीत.१८९९ मध्ये पुन्हा दुसऱ्यांदा प्लेगच्या साथीने डोके वर काढले.यावेळी मात्र सेवा सुश्रुषा करता करता खुद्द भिकाजी कामांनाच प्लेगची लागण झाली.त्यांची प्रकृती खालावली.वैद्यकीय सल्ल्यानुसार,हवापालट आणि प्रकृती सुधारण्यासाठी त्या युरोप मध्ये गेल्या.जर्मनी, फ्रान्स, स्कॉटलंड इथे एक एक वर्ष राहिल्या.सुधारणा झाल्यावर १९०६ मध्ये त्या लंडन मध्ये आल्या.तब्बल चौतीस वर्ष त्या विलायतेत राहिल्या.त्यांचे घर म्हणजे स्वातंत्र्य समरातील क्रांतीविरांसाठीचेच घर झाले होते.मातृभूमीच्या सेवेचा निर्धार त्यांना गप्प बसू देईना.लंडनला दादाभाई नौरोजींनी लंडन इंडिया सोसायटी काढून ब्रिटीशांच्या हिंदुस्थानातील शोषणावर हल्ले चढवीत.भिकाजी कामा ही त्यांच्यात सहभागी होऊन काम करू लागल्या.ब्रिटीश संसदेवर निवडून येण्यासाठीभिकाजींनी नौरोजीना खूप मदत केली.याचं वेळी,शामजी कृष्ण वर्मा यांच्या आंदोलनाने जहाल रूप धारण केले होते.

दादाभाई नौरोजी व शामजी कृष्ण वर्मा ,ब्रिटिशांना सनदशीर मार्गाने हिंदुस्थानातून घालवून देता येईल असा विश्वास व्यक्त करीत आणि त्याच अनुरोधाने भिकाजी कामा खणखणीत आवाजात उत्तम अशा इंग्रजी भाषेतून लंडन च्या हाईड पार्क वरील सभेत, स्वातंत्र्यावरील भाषणे करीत.ही भाषणे आणि स्वातंत्र्याची घोषणा त्या काळात क्रांतिकारकच होती.त्यांच्या या घोषणांनी साम्राज्यवादी इंग्रजही हादरले होते.लंडन च्या हाय गेट भागात हिंदी तरुणांना सहाय्य करण्यासाठी इंडिया हाउस ही वास्तू उभी राहिली.त्याचे उद्घाटन हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचे जहाल पुरस्कर्ते एच.एम.हिंडमन यांच्या हस्ते झाले होते. त्यांच्या सारख्या इतर जहाल इंग्रजांशी भिकाजी कामांची चांगली मैत्री झाली.दादाभाई नौरोजी,अॅनी बेझंट  यांच्या प्रमाणेच रशियन,फ्रेंच व जर्मन समाजवाद्यांशी भिकाजींचे चांगले मैत्रीचे संबंध होते.त्यामुळे रशियन क्रांतिकारकांशीही त्यांच्या ओळखी झाल्या.हिंडमन यांच्या ओळखीतूनही खूप जणांशी ओळखी झाल्या. या सर्वानांच भिकाजिंबद्दल अतिशय आदर व आपुलकी वाटत असे.या आपुलकी मुळेच मिसेस कामा ऐवजी त्या मॅडम कामा म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

या काळात उच्च शिक्षण घेण्यासाठी किंवा ते निमित्त सांगून,हिंदुस्थानी युवक इंग्लंड ला जात असत. मॅडम कामा त्यांच्या संपर्कात राहून त्यांना हवी ती मदत करत असत. ‘ब्रिटीश पारतंत्र्यातून भारताची संपूर्ण मुक्तता हे साध्य व सशस्त्र क्रांती हे साधन’ हे ब्रीदवाक्य असणारी ‘अभिनव भारत’ ही संस्था स्वातंत्रवीर सावरकरांनी १९०४ मध्ये स्थापन  केली होती. बॅरिस्टर च्या उच्च शिक्षणासाठी सावरकर इंग्लंड ला गेल्यावर अभिनव भारतला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. लंडनला मॅडम कामाही त्याच्या सदस्य बनून काम करू लागल्या. या गुप्त शाखेचे सदस्य वाढविण्यासाठी तिचीच प्रकट संस्था म्हणून, फ्री इंडिया सोसायटीची स्थापना होऊन,इंडिया हाउस मध्ये बैठका सुरु झाल्या.मदनलाल धिंग्रा,ग्यानचंद वर्मा,वामनराव फडके,अय्यर,लाल हरदयाळ,वीरेंद्र चट्टोपाध्याय ,निरंजन पाल हे लंडन मध्ये वास्तव्यास असलेले बुद्धिवान तरुणही सावरकरांना सामिल झाले.

सावरकरांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाची व क्रांतीप्रणालीची छाप पडून मॅडम कामाही त्या विचाराने भारावून गेल्या.त्या सशस्त्र क्रांतीवादी बनल्यामुळे त्यांच्या जहाल वक्तव्याला एक वेगळेच तेज चढले.या क्रांतिकारक कारवायांमुळे ब्रिटीश सरकारने त्यांना इंग्लंड सोडून जावे ,अन्यथा तुमच्या विरोधी कारवाई करावी लागेल अशी सूचना केली.मॅडम कामांनी विचार केला की,आपले स्वातंत्र्य गमावण्यापेक्षा लंडन सोडून जाणे केंव्हाही चांगले आणि त्या पॅरीसला बॅरिस्टर राणा यांच्याकडे जाऊन १९०७ मध्ये तिथेच स्थायिक झाल्या. 

पॅरीस ला आल्यावर मॅडम कामांनी अभिनव भारताच्या नावावरूनच न्यू इंडिया सोसायटीची स्थापना केली.वेगवेगळ्या हिंदी राष्ट्रवाद्यांमध्ये ऐक्य निर्माण करणे या उद्देशाने स्थापन केलेल्या या संस्थेचे अध्यक्ष के.आर.कोतवाल होते.हिंदुस्थानातील ब्रिटीशांची वाढलेली दडपशाही बघून आता यापुढे सशस्त्र लढ्यानेच स्वातंत्र्य मिळू शकेल याची त्यांना मनोमन खात्री पटली.आणि सावरकरांच्या लंडन मध्ये चाललेल्या लढ्याच्या परीस मधील त्या प्रमुख झाल्या.मॅडम कामा रशियन मार्गाचा पुरस्कार करू लागल्या.प्रत्येक माणसाला याचे महत्त्व पटवून द्यायला हवे असे त्यांना वाटत होते.

गांधीजी दक्षिण आफ्रिकेतील हिंदी जनतेची गाऱ्हाणी घेऊन १९०६ मध्ये लंडनला आले, तेंव्हाही मॅडम  कामांनी आपले विचार त्यांच्या समोर आवेशाने मांडले होते. बंगालच्या फाळणी नंतर लाला लजपत राय ,सरदार अजितसिंग यांना अटक करून स्थानबद्ध करून ठेवले होते. या पार्श्वभूमीवर बॅरीस्टर राणां नी पॅरीस येथे जाहीर सभा बोलावली.यात मॅडम कामानी मुख्य भाषण केले. त्या म्हणाल्या, “ हिंदुस्थानच्या स्त्री पुरुषांनो ,अशा पारदास्यात  जगण्यापेक्षा आपण सर्वच्या सर्व लोक नष्ट होऊन गेलो तरी चांगले असा निर्धार तुम्ही करा”.
शूर राजपुतांनो, शिखांनो,पठाणांनो,गुराख्यांनो,देशभक्त मराठ्यांनो,आणि बंगाल्यांनो,उद्योगी पारश्यांनो,मुसलमानांनो आणि सौम्य वृत्तीच्या जैनांनो,धीम्या वृत्तीच्या हिंदुनो,तुम्ही आपल्या स्वताच्या .परंपरांप्रमाणे जीवन का जगात नाहीत? चला पुढे व्हा.स्वराज्यातील स्वातंत्र्य,समता यांची प्रतिष्ठापना करा.तुमच्या स्वतासाठी आणि मुलाबाळांसाठी पुढे या.मानवी हक्कांची लढाई लढा.पौर्वात्य लोक  पाश्चीमात्यांना काही नवे शिकवू शकतात हे जगाला दाखवून द्या.

लाला लजपत राय यांना अटक झाली.या क्रूर अन्यायाविरुध्द आपला संताप अनावर झाला असताना ,ही गोष्ट कुणीही निमुटपणे सहन करू शकणार नाही.देशभक्त लाल लजपत राय यांना बंदिवसाच्या वाईट वातावरणात राहू देणे योग्य नाही.परकीय सत्ताधाऱ्यांच्या  आश्वासनानंतर तुम्ही विसंबून राहू नका.कारण ते हिंदुस्थानात आहेत.ते तुम्हांला सहाय्य करण्यासाठी नव्हे तर,तुमचे शोषण करण्यासाठी आहेत याची जाणीव ठेवा.आपला देश तत्काळ स्वतंत्र व्हायला हवा असेल तर आपण सर्वांनी एकी राखायला हवी.लाल लजपत राय यांचे शौर्य डोळ्यासमोर सतत ठेवले तर,सर्वाना सीमापार करण्यापूर्वी किंवा तुरुंगात टाकण्यापूर्वी सरकारने कितीही किल्ले आणि तुरुंग बांधले तरी ते अपुरेच पडतील.जो आपले स्वातंत्र्य गमावतो तो आपले शीलच गमावून बसतो.हे विसरून चालणार नाही.
मित्रहो,स्वाभिमान दाखवावा.वंदेमातरम मंत्राच्या स्फूर्तीने हिंदी लोकांनी एकत्र येऊन जागृत राहायला हवं.” कामांच्या भाषणा नंतर हे पत्रक काढून ते इंडिअन सोशालीजीस्ट या अंकात प्रसिद्ध करण्यासाठी शामजी कृष्ण वर्मांकडे लंडन ला पाठवले .ते जून १९०७ च्या अंकात जसेच्या तसे छापून ,तो अंक प्रसिध्द होण्यापूर्वीच शामजी वर्मा अटक टाळण्यासाठी परीस ला राहायला आले आणि स्वातंत्र्य लढ्यातील जहाल विचारांच्या कार्यकर्त्या म्हणून कामा प्रसिध्द झाल्या.येथील रशियन क्रांतीकारकांनाही कामांविषयी अधिक आस्था वाटू लागली.

१८ ऑगस्ट १९०७ ला जर्मनीतील स्टुटगार्ड येथे आंतरराष्ट्रीय समाजवादी कॉंग्रेस चे अधिवेशन भरविण्यात आले होते.याचे अध्यक्ष जर्मनीचेच पॉल सिंगेर होते.जगातल्या पंचवीस देशांतील एक हजार प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित होते.पूर्व परीचायामुळे जां जोरे यांनी मॅडम कामांना ही येण्याचे आमंत्रण दिले होते.सावरकरांनी एक ठराव लिहून तो मड म कामांनी परिषदेत मांडावा असे ठरले.परिषदेत इतर सर्व राष्ट्रांचे ध्वज येणार .पण,हिंदू स्वातंत्र्य वाद्यांना त्यांचा ध्वज च नाही.हे क्रांतिकारकांच्या लक्षात आले.सावरकरांनी ध्वजाची कल्पना सर्वांसमोर मांडली.मग मॅडम कामांनी उंची रेशमी कापड विकत आणले.हिरवा,केशरी व तांबडा असे तीन रंग ,वरील बाजूस ‘आठ प्रांतांची आठ कमळे’ ,मधल्या पट्ट्यावर ‘वंदेमातरम’ हा मंत्र विणलेला.तर खालच्या पट्टीवर ‘सूर्य आणि चंद्र’ यांच्या आकृत्या असा स्वताच्या हाताने विणून हा ध्वज तयार केला.अशा प्रकारे हिंदुस्थानच्या पहिल्या राष्ट्र ध्वजाचा जन्मच लंडन मध्ये झाला.

ध्वज एकच असला तर परिषदेत जाईपर्यंत वाटेत काही अडचण येऊ नये या हेतूने कामांनी असे तीन ध्वज बनविले.त्यातला एक ध्वज आपल्या पोलक्यात लपवून पॅरीस ला नेला. दुसरे दोन ध्वज बॅरीस्टर राणांनी बाहेर नेले. बॅरीस्टर राणांबरोबर मडॅम कामा स्टुटगार्ड ला रवाना झाल्या.परिषदेत मॅडम कामा इंग्लंड च्या प्रतिनिधी म्हणून गेल्या असल्या तरी त्यांच्या ठराव मांडण्यावर आक्षेप घेऊन तो ठराव संमत होणार नाही पण, वाचून दाखविता येईल असे सांगितले.

व्याख्यान देण्यासाठी कामा व्यासपीठावर उभ्या राहिल्या.प्रास्ताविका नंतर शांतपणे त्यांनी ठराव वाचून दाखविला आणि आपल्या पोलक्यात दडवून ठेवलेला तिरंगी ध्वज मोठ्या कौशल्याने व नाट्यमयरित्या परिषदेत फडकविला.परिषदेतले सर्व उपस्थित चक्रावून गेले.तिरंगा फडकवून त्या खणखणीत व धीरगंभीर आवाजात म्हणाल्या, “This is the flag of Indian Independence .Behold it is boon. it is already sanctified by the blood of the martyred Indian youths! I call upon you, gentlemen! To rise and salute this flag of new India of Indian indepedance.”

“हा पहा हा हिंदू स्वातंत्र्याचा ध्वज आहे. आज याचा जन्म झालाय.हिंदुस्थानच्या तरुण हुतात्म्यांच्या रक्ताने तो आधीच पावन झालेला आहे. नागरिकहो उठा आणि या अभिनव भारताच्या, या हिंदवी स्वातंत्र्याच्या ध्वजाला प्रणाम करा”.या त्यांच्या स्फूर्तीदायक आवेशाने सर्व प्रतिनिधी भारावून गेले.आणि या ध्वजाला सर्वांनी उभे राहून अभिवादन केले.वातावरण एकदम भारावून गेले.या कृतीबरोबरच कामांचं खानदानी सौंदर्य ,उंची पोशाख,असे तेजस्वी व्यक्तिमत्त्व बघून सभागृहात जो तो म्हणू लागला, “She is an Indian Princess” .

कामांनी ध्वज फडकविल्यानंतर त्यावरील रंग व चिन्हांचा अर्थ सर्वाना समजावून सांगितला आणि स्वतंत्र हिंदुस्थानचा पहिला ध्वज, युरोपात फडकविणाऱ्या मॅडम कामा पहिल्या वीरांगना ठरल्या.कामांनी बनवलेल्या तिरंग्यात काही बदल करून आजचा राष्ट्र ध्वज बनविण्यात आलाआहे.प्धाच्या काळात परीस मध्ये सर्व हिंदी क्रांतिकारक एकत्र जमले कि,मॅडम  कामांच्या टेबलावर हा ध्वज दिमाखात उभा असे.कामांनी या ध्वजाचे बज व पदक ही बनवून घेतले होते.हे पदक त्या स्वतः पोलक्यावर लावीत असत.या लढ्याचा कामांनी अमेरिकेत जाऊन प्रचार केला.याचं वेळी लंडन येथे इंडिया हाउस मध्ये १८५७ च्या हुतात्त्म्यांच्या स्मरणार्थ १० मे १९०८ ला भव्य स्मृती समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.अमेरिकेतून कामा नुकत्याच परीस ला पोहोचल्यामुळे त्या या समारंभाला उपस्थित राहू शकणार नव्हत्या,म्हणून त्यांनी बॅरीस्टर रानांच्या बरोबर ७५ रुपयांची देणगी व विशेष संदेशही पाठविला.ही देणगी राणानी सभेत जाहीर केली तेंव्हा टाळ्यांचा मोठा गजर झाला.तसेच त्यांचा संदेश वाचून दाखवण्यात आल्यानंतर देशभक्तांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.

१९०८ मध्ये खुदिराम बोसांना मुझफ्फुरच्या तुरुंगात फाशी देण्यात आले.त्यावेळी देशभर शोकसभा घेण्यात आल्या.कॅक्सटन च्या हॉल मध्ये झालेल्या भाषणाच्या वेळी,मॅडम कामांनी ध्वज फडकविला आणि त्या म्हणाल्या, “याच ध्वजासाठी खुदिराम बोस व प्रफुल्ल चाकी यांनी देह ठेवले”. हे ऐकताच सर्व सभा उठून उभी राहिली.आणि हुतात्म्यांना मानवंदना दिली.वंदेमातरम चा जयघोष झाला.या भारावलेल्या वातावरणात कामांनी आवेशाने श्रोत्यांना विचारले, “तुम्ही काय आता स्वस्थ बसून स्वातंत्र्यासाठी स्त्रियांनीच पहिला प्रहर करावा म्हणून वाट पाहत बसणार आहात का?आणि देशद्रोह्यांना व रानटी लोकांना आपल्यावर राज्य करू देणार आहात काय ?.या भाषणाच्या प्रती लंडनहून हिंदुस्थानात टपालाने गुप्तपणे पाठविण्यात आल्या होत्या.
सावरकरांनी ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हे पुस्तक १९०८ मध्ये मराठीत लिहून पुरे केले.त्याचे हस्तलिखित प्रसिध्द करण्याचे बरेच प्रयत्न झाले.इंग्रजांविरुध्द ते असल्याने कोणीच मुद्रक छपाई साठी तयार होईनात.त्यामुळे बाबाराव सावरकरांनी ते नाशिकहून पुन्हा सावरकरांना पाठवून दिले.शेवटी त्याचे इंग्रजीत भाषांतर करून युरोप मध्ये कुठेतरी प्रसिध्द करण्याचे ठरविले.

सावरकरांचे सहकारी वामनराव फडके व हरिश्चंद्र कोरेगावकर यांनी त्याचे भाषांतर केले. युरोप मधेही मुद्रक तयार होईनात.मॅडम कामांच्या महत्प्रयासानंतर  ‘रॉटरडॅम  शे आर्ट अँड बुक प्रिंटींग कंपनी हरिंग्वालिएट’ या मुद्रणालयात हॉलंड मध्ये ते गुप्तपणे छापले.

सरकारला सुगावा लागू न देता या पुस्तकाच्या विक्रीची व वितरणाची व्यवस्था कामांनी अगदी व्यवस्थित पणे केली. पुस्तकाचे प्राप्तीस्थळ म्हणून स्वतःचा पत्ता, ‘मिसेस बी.आर.कामा,पब्लिकेशन कमिटी, ७४९ थर्ड अव्येन्यू,न्यूयॉर्क’. असा देऊन वाचकांना ते नीट मिळेल याची कौशल्याने योजना आखली.निरनिराळ्या देशांत हिंदी तरुणांनी याच्या प्रति मागवून घेतल्या.हिंदुस्थानात सुद्धा कित्येक वेळी कामानीच चापून घेतलेल्या बेवर्ले कादंबरीच्या किंवा पिक् विक् पेपर्स च्या खोट्या वेष्टनातून पाठवलेल्या प्रती सुरक्षितपणे टपालान मिळत असत.असा हा क्रांतिकारक ग्रंथ आपल्या लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी मॅडम कामांनी अतोनात कष्ट घेतले.अनेक क्लृप्त्या लढविल्या.
   
हिंदुस्थानात इंग्रजांचे दडपशाहीचे नवेनवे अविष्कार घडतच होते. १९०९ मध्ये बाबाराव सावरकरांनी राजद्रोही कविता प्रसिध्द केल्या म्हणून त्यांना जन्म ठेपेची शिक्षा दिली गेली.त्याला उत्तर म्हणून मदनलाल धिंग्रांनी कर्झन वायलीचा लंडन मधेच गोळ्या घालून वध केला. शामजी कृष्ण वर्मांनाही यात आरोपी करावं अशी मागणी वृत्तपत्रांनी केली. या पार्श्व भूमीवर मॅडम कामा जराही  विचलित झाल्या नाही. या प्रकरण नंतर लंडन मधील इंडिया हाउस बंद करण्यात आले.हिंदुस्थानाबाहेर राहूनच स्वातंत्र्याचा लढा चालू ठेवावा या उद्देशाने लाल हरदयाळ पॅरीस ला परत आले.

मॅडम कामांनी १० सप्टेंबर १९०९ ला हरदयाळांसाठी  ‘वंदेमातरम’ हे पत्र सुरु केलं.भारतीय स्वातंत्र्याच्या या मासिक मुखपत्रासाठी सर्व आर्थिक बोजा कामांनी स्वतः उचलला होता. हे मुखपत्र स्वित्झर्लंड मध्ये जिनिव्हा येथून प्रसिध्द होत असे.यातील सर्व लिखाण कामा स्वतः संपादित करत असत.याची वितरण व्यवस्थाही कुशलपणे त्यांनी केली होती. याचा पुरावा ब्रिटीश सरकारला शोधूनही सापडला नव्हता.

कामांनी आता वीरेंद्र चट्टोपाध्याय यांच्यासाठी ,मदनलाल धिंग्रा यांच्या स्मरणार्थ मदन तलवार हे पत्रही सुरु केले.याचा पहिला अंक १ नोहेंबर १९०९ ला प्रसिध्द झाला. याच सुमारास स्वातंत्रवीर सावरकर दगदगीमुळे आजारी पडले.इकडे हिंदुस्थानात अनंत कान्हेरे यांनी कलेक्टर जॅक्सन यांचा गोळ्या घालून वध केला. या असंतोषाचे मूळ सावरकरच आहेत असे उघडपणे इंग्रजी पत्रे म्हणू लागली.सावरकरांनी फ्रान्स ला जावे असे त्यांच्या सहकाऱ्यांनी सुचविले.सावरकर पॅरीसला आले. आता राष्ट्रीय प्रयत्नांचे केंद्र परीस झाले होते.आजारी असलेल्या सावरकरांना मॅडम कामांनी स्वताच्या घरी ठेऊन त्यांची उत्तम व्यवस्था ठेवली.सावरकरांच्या अटकेची शक्यता वाढली होती.अशा परिस्थितीत त्यांनी लंडन ला जाऊ नये म्हणून मड म कामांनी त्यांना सांगितले पण ते लंडनला रवाना झाले आणि मॅडम कामांची भीती खरी ठरली.लंडनला पोहोचताच सावरकरांना अटक करण्यात आली.याचा कामांना वज्र प्रहारासारखा धक्का बसला.सावरकरांना सोडविण्यासाठी त्यांनी आकाशपाताळ एक केले.या अवैध अटकेसाठी त्या सतत तीन महिने लढल्या.मार्सेलीसच्या समुद्रात मारलेल्या सावरकरांच्या जगप्रसिध्द उडी नंतर त्यांना पुन्हा झालेली अटक व घडलेल्या घटना यामुळे सावरकरांची सुटका हेच ध्येय ठेवून कामा धडपडत होत्या.सावरकरांविषयी विविध वृत्त पत्रातून माहिती लिहून जनमत तयार करीत होत्या.



मॅडम कामा चतुरस्त्र क्रांतिकारक होत्या.त्यांची देशभक्ती त्यांच्या कुटुंबातील स्वाभिमानी व्यक्तीतही फोफावली होती.मुंबईच्या इतर पारशी महिलाही कामांच्या क्रांती प्रणालीमुळे भरल्या गेल्या होत्या.
बाबाराव सावरकर तुरुंगात गेल्यानंतर कुटुंबाची वाताहत झाली.कामांना याची कल्पना होती.त्या बाबारावांच्या पत्नी येसूवहिनी यांना मदत म्हणून दर महिन्याला ३० रुपये पाठवीत असत.त्यांची वेळो वेळी विचारपूस करून धीर देत असत. हा सगळा वृत्तांत अंदमानातल्या सावरकरांना धाकट्या भावाकडून पत्रातून कळत असे. ते वाचून कामांविषयी अधिकच जिव्हाळा वाटू लागे.स्वातंत्र्यवीर सावरकर, त्यांचे बंधू डॉ सावरकर यांना पाठवलेल्या पत्रात म्हणतात, “मी इकडे आल्यापासून मॅडम कामा या तुला जणू दुसऱ्या आईच होत आलेल्या आहेत. आणि उदात्तपणे व एकाग्र चित्ताने आपल्या आयुष्यातील अत्यंत संकटमय काळात आपल्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत.फ्रान्स वर जर्मनीची स्वारी झाल्यानंतर तुला मॅडम कामांचे पत्राद्वारे वर्तमान कळणार नाही. अशी मला खूप भीती वाटत होती.पण या जागतिक गोंधळाच्या परिस्थितीतही त्यांना तुझी आठवण होतेच आणि त्या तुला नियमितपणे पत्र पाठवतात,हे  निश्चितपणे कळल्यावर मला फार आनंद झाला.अशा विश्वासपूर्ण उदात्त आणि प्रेमळ हाताच्या एका स्पर्शानेही मानवते वरील विश्वास आपल्या अंतकरणात पुन्हा जिवंत होतो.त्यांच्या या आस्थेला मी किती मौल्यवान समजतो हे मला त्यांना सांगता येत नाही ही शोचनीय गोष्ट आहे. तरीही प्राप्त परिस्थितीत मॅडम कामांना माझी ही वाहावा आणि आदराची भावना आपल्या नातेवाईकांपैकी कोणालाही कळविण्याच्या आधी कळव.कारण ते आपल्यासाठी काही करतात त्यात नवल ते काय?पण त्या करतात आणि इतके करतात हेच खरे नवलकारक आहे”.

अंदमानातून सावरकरांना वर्षातून एकदाच कुटुंबाला पत्र पाठवता येत असे.त्या प्रत्येक पत्रात ते कामांची चौकशी करत असत. डॉ सावरकर हा निरोप पत्राने, कामांना पोहोचवत असत. डॉ सावरकर तर कामांना मदर ऑफ दि रेव्होल्युशनरी पार्टी  म्हणत.अशा प्रकारे स्वातंत्रवीर सावरकरांच्या क्रांतीजीवनात मॅडम कामांच खूप आधार होता.
१९१७ मध्ये रशियन क्रांती झाली.एव्हाना सावरकर आणि मडम कामांचे नांव युरोपभर गाजले होतेच.रशियाचा सर्वाधिकारी असलेला खुद्द लेनिन सुद्धा मॅडम कामांना भेटायला आला होता. त्यांनी तर रशियाला येऊन राहण्याचे आमंत्रण च दिले होते कामांना.पण ते त्यांनी नाकारले.कारण त्यांना हिंदुस्थानात मायभूमीला परत जायचे होते.

सरकारचे कामांच्या हालचालींवर बारीक लक्ष होते.त्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. कामा आता वृद्धत्वामुळे आजारी झाल्या होत्या.अर्धांग वायूचा झटका येऊन गेलेला होता.आपला मृत्यू तरी हिंदुस्थानात व्हावा असे त्यांना वाटत होते.१९६५ च्या सुमारास सर कावसजी जहांगीर युरोपला गेले असताना ,कामांना भेटायला गेले.त्यांची अवस्था पाहून,कावसजींचे  मन हेलावले.त्यांनी मंत्रालयात विनंती करून कामांना हिंदुस्थानात नेण्याची परवानगी घेतली. 

'मी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष राजकारणात भाग घेणार नाही' अशी हमी सरकारने त्यांच्या कडून लिहून घेतली.
आणि तेहेतीस वर्षांनी १९३५ ला मॅडम कामा हिंदुस्थानात परत आल्या. परत येताना त्यांनी या वृध्धावस्थेतही आक्षेपार्ह सामान व आपला स्वातंत्र्यध्वज  बरोबर आणला होता.कामांना पारसी हॉस्पिटल मध्येच भारती केले गेले.प्रकृतीत चढ उतार चालूच होता. डॉ.सावरकरही त्यांना येऊन भेटत असत. ११ ऑगस्ट १९३६ ला त्या अत्यवस्थ झाल्या आणि १२ ऑगस्ट १९३६ ला त्यांनी इहलोकीची यात्रा संपवली.  

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्याचे क्रांती कुंड सातासमुद्रापार अखंड धगधगत राहावे यासाठी आपल्या आयुष्याची समिधा देणाऱ्या भिकाजी कामा यांचं आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पुन्हा एकदा पुण्यस्मरण.

                                                                                         

लेखन - डॉ. नयना कासखेडीकर, पुणे.