Sunday, 30 April 2023

विचार – पुष्प ,भाग ६५,मातृभूमीचे पहिले दर्शन

                                                                             उत्तरार्ध

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा,

प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका

विचार – पुष्प ,भाग ६५

मातृभूमीचे पहिले दर्शन

  जहाजाने इंग्लंड सोडले आणि मातृभूमीच्या परतीचा प्रवास सुरू झाला. मनात अनेक स्वप्न बाळगुनच. इतकी वर्षे भारताबाहेरचे प्रगत देश पाहिलेपाश्चात्य संस्कृती अनुभवली, तिथले लोकजीवन पाहिलेत्यांचे सामर्थ्य आणि ऐश्वर्य पाहिले. तिथल्या लोकांचे त्यांच्या धर्माबद्दलचे विचार ऐकले, समजून घेतले, तिथला सुधारलेला समाज जवळून अनुभवला. वेळोवेळी आपला भारत देश आणि त्याच्या आठवणीने त्यांचे मन भरून यायचे. मनात तुलना व्हायचीच, आपल्या देशातले अज्ञान, काही रूढीपरंपरा, दारिद्र्य आठवले की मन दु:खी व्हायचे. पण आपल्या मातृभूमीचा वारसा, अध्यात्म, धर्म, विचार या बद्दल मात्र आदर वाटायचा आणि गौरवाने मान ताठ व्हायची.

   पण बाहेरच्या देशात त्यांना ख्रिस्त धर्म व त्याची शिकवणूक हे आणखी स्पष्ट अनुभवायला मिळत होतं. आता इंग्लंडहून निघून ते फ्रांसला उतरले होते. ख्रिस्त धर्म प्रसाराचा आरंभ जिथे झाला त्या इटलीत . ऐतिहासिक रोमन साम्राज्य आणि तिथल्या परंपरा, जगद्विख्यात चित्रकार लिओ नार्दो द व्हिंची च्या कलाकृती, पिसा चा झुकता मनोरा, उद्याने वस्तु संग्रहालये पाहण्याचा त्यांनी आनंद घेतला आणि काय आश्चर्य तिथे उद्यानात अचानक हेल पतिपत्नीची भेट झाली . दोघेही सुखावले. अमेरिकेत उतरल्यावर प्रथम ज्यांनी घरात आश्रय दिला होता त्यांची ही जणू निरोपाचीच भेट असावी.

     रोमचा इतिहास त्यांनी अभ्यासला होताच. युरोपातले रोम आणि भारतातले दिल्ली ही शहरे मानव जातीच्या इतिहासातल्या महत्वाच्या घटनांचे साक्षीदार असलेली शहरे होत असे विवेकानंदांना वाटत असे.  त्यामुळे रोम मधील सौंदर्य आणि इतिहासाच्या खाणाखुणा सर्व पाहताना ते चटकन संदर्भ लावू शकत होते.संन्यासी असले तरी ते स्वत: कलाकार होते, रसिक होते म्हणून तिथल्या सौंदर्याचे दर्शन घेताना ते आनंदी होत होते.  योगायोगाने ख्रिस्त जन्माच्या दिवशी विवेकानंद रोम मध्ये होते. मेरीच्या कडेवरील बालरूपातील ख्रिस्त आणि आमच्या हिंदू धर्मातील बाळकृष्ण यात विवेकानंदांना साम्य वाटले. आणि मेरीचा मातृरूप म्हणून आदर पण वाटला. आई मेरी आणि बाळ येशू यांच्या विषयी भक्तीभाव मनात तरळून गेला. हेल पती पत्नी विवेकानंदांबरोबर इथे आठवडा भर होती. आणि ही साम्यस्थळांची वर्णने स्वामीजींकडून ऐकून ते दोघे भारावून गेले होते.विवेकानंदांच्या मनात सर्व धर्मांबद्दल आदरभाव होता तो त्यांच्या भाषणातून सगळ्यांनी अनुभवला होता. तरीही काही प्रसंग असे घडत ,की हिंदू धर्माबद्दल गरळ ओकणारे विवेकानंदांना भेटत, याच प्रवासात दोन ख्रिस्त धर्म प्रचारक जहाजावर होते. विवेकानंद त्यांच्याशी अर्थात हिंदू धर्म आणि ख्रिस्त धर्म यांची तुलना आणि श्रेष्ठत्व यावर बोलत होते. विवेकानंद यांच्यापुढे आपला टिकाव लागत नाही असे लक्षात आल्याने ते दोघे आता हिंदू देवदेवता आणि आचार विचार यांची टवाळी करण्यावर आले. स्वामीजींनी या निंदेकडे बराच वेळ दुर्लक्ष केलं.पण आता सहनशक्तीचा अंत झाला आणि स्वामीजींनी एकाची कॉलर पकडून, जवळ जवळ दरडाऊनच दम भरला की आता माझ्या धर्माबद्दल पुढे काही बोललात तर धरून समुद्रात फेकून देईन. त्यामुळे त्या धर्म प्रचारकांचे तोंड गप्प झाले. स्वामीजींना उदार मनोवृत्ती मुळे आपल्या धर्मा बद्दल कोणीही काहीही बोलेल ते आपण ऐकून घ्यायचे मुळीच पटत नव्हते. त्यात त्यांना दौर्बल्य तर वाटायचेच पण, पाश्चात्य देशातील लोकांना धर्मा धर्मातील भेद बाजूला सारून एकाच विश्वधर्माशी पोहोचावे असा विचार त्यांनी दिला होता आणि भारतात मात्र ख्रित धर्म प्रचारकांच्या प्रचारला बळी पडून अनेक हिंदू धर्मांतर करत होते, तर सुशिक्षित समाज याकडे दुर्लक्ष करत होता हे त्यांना अजिबात आवडले नव्हते.

    अशा अनेक गोष्टींना, प्रसंगांना विवेकानंद आपल्या भ्रमण यात्रेत सामोरे जात होते. “नरेन एक दिवस सारं जग हलवेल” असा त्यांच्या गुरूंचा रामकृष्णांचा शब्द खरा करून दाखवलेला हा नरेंद्र सहा वर्षांपूर्वी शारदा देविंचा आशीर्वाद घेऊन निघाला होता तो आता विश्व विजेता होऊन भारतात परतत होता. त्यामुळे त्यांच्या गुरुबंधूंना कोण आनंद झाला असेल ना? स्वामींनी सर्वधर्म परिषदेला शिकागो येथे जाण्यासाठी सर्वांनी कष्ट घेतले होते.ते सर्वजण खूप आनंदले होते. त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी चालू होती. विवेकानंद सुद्धा  मातृभूमीला भेटायला उत्सुक होते. हा विचारच त्यांच्या अंगावर रोमांच उभे करत होता. भारताच्या आत्म्याला जाग आणण्यासाठी पुढे प्रयत्न करून हिमालयात अद्वैताश्रम उभा करायचे स्वप्न आणि योजना त्यांचे मन आखत होते. पंधरा जानेवारी चा सूर्योदय पहिला तो श्रीलंकेच्या किनार्‍यावरचा अर्थात तेंव्हाच्या सिलोन चा. जहाज पुढे पुढे जात होते तसतसे किनार्‍यावरीला नारळीच्या बागा दिसू लागल्या. कोलंबो बंदर लागले. भारताचे दर्शन झाल्याने स्वामीजींच्या चेहर्‍यावर समाधानाचे भाव होतेच. आता उतरल्यावर आपल्या बरोबर आलेले तीन पाश्चात्य सह प्रवासी म्हणजेच पाश्चात्य शिष्य यांची उतरल्यावर राहण्याची सोय करायची हाच विचार त्यांच्या डोक्यात होता.

   कोलंबो बंदरात जहाज थांबले आणि एक नाव घेऊन स्वामीजींना उतरवायला गुरु बंधु निरंजनानंद आणि काही प्रतिष्ठित नागरिक आले. विवेकानंद, सेव्हियर पती पत्नी, आणि गुडविन यांना त्या नावेतून किनार्‍यापर्यंत आणले. प्रचंड जमलेल्या जन समुदायाच्या साक्षीने पी कुमारस्वामी यांनी भला मोठा पुष्पहार घालून स्वामीजींचे स्वागत केले आणि सजवलेल्या घोडा गाडीत चौघांना बसवून त्यांची स्वागताप्रीत्यर्थ मिरवणूक सुरू झाली, हे सर्व अनपेक्षित होतंप्रचंड जल्लोषात स्वामी विवेकानंद यांचे पहिले स्वागत भारतात करण्यात आले.

    रस्त्यावरून जाताना नयनरम्य स्वागत सोहळा अनुभवत होते स्वामीजी,आणि विशेषत त्यांचे पाश्चात्य शिष्य. सुशोभित भव्य कमानी, स्वागत करणारे भव्य फलक, रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या पताका, घरांवर केलेली  सजावटप्रकांड, मंडप, व्यासपीठ, मस्तकावर होणारी पुष्पवृष्टी, मंगल वाद्यांचे स्वर, तमिळ व संस्कृत मध्ये म्हटले जाणारे मंत्र, नागरिकांनी लिहिलेले मानपत्र अहाहा केवढा तो आनंदी सोहळा होता. हा सोहळा उत्स्फूर्तपणे ,प्रेमापोटी होत होता. त्यात उच्च पदस्थापासून सर्व सामान्य लोकांपर्यंत सर्वजण सहभागी झाले होते. एखाद्या धनाढ्याचा प्रायोजित मॅनेज केलेला स्वागत सोहळा नव्हता, तो निष्कांचन असलेल्या एका सन्याशाच्या स्वागताचा सोहळा होता. या संस्कृतीमधून विवेकानंद यांना भारतीय आत्म्याचा एक सुंदर आविष्कार दिसला होता. यात ते आपल्या महान संस्कृतीचे वैशिष्ठ्य अनुभवत होते आणि ते जतन केले पाहिजे असे त्यांना वाटत होते. इथेच सुरू झाली होती त्यांची गौरवयात्रा.

     ही तर सुरुवात होती भारतातल्या स्वागताची. छत्री,अबदागिरी, पताका, निशाणे, वाद्ये, मंत्र पठण, या सर्व पारंपारिक प्रकारांचा समावेश या स्वागतात केला गेला होता. जणू भगवान शिवाचा अवतार म्हणूनच विवेकानंद यांची पुजा केली होती. हा सर्व आश्चर्यकारक स्वागत सोहळा स्वत: गुड्विन यांनी पत्राने बुल यांना कळवला होता आणि म्हटले होते की, स्वामी विवेकानंद यांच्या बरोबर सेव्हीयर पतिपत्नी आणि मी, आम्हा तिघांच्याही वाट्याला हे जिव्हाळा असलेले स्वागत/सन्मान आले.

     त्यानंतर त्यांनी श्रीलंकेतले प्राचीन मोठे शहर अनुराधापुरम, जाफना इथे भेट दिली. २००० लोकांपुढे त्यांचे व्याख्यान झाले. सार्वजनिक सत्कार, मानपत्र३ किलोमीटर लांब रस्त्यावर केळीचे खांब दुतर्फा लावून सुशोभित केलेले. शेकडो लोकांची मशाली हातात घेऊन विवेकानंदांना आणण्यासाठी निघलेली मिरवणूक, त्यात पंधरा हजार लोकांचा सहभाग,आणि आसपासच्या लहान मोठ्या गावातून विवेकानंदांना पहाण्यासाठी अमाप उत्साहात आलेले लोक. त्यात गौरवपर झालेली भाषणे, विवेकानंद यांचे व्याख्यान आणि लोकाग्रहास्तव झालेले सेव्हीयर यांचे भाषण. हे सगळं कशाच द्योतक होतं? हा तर स्वामी विवेकानंद यांच्या बद्दलचा व्यक्त झालेला आदरभाव होता. त्यांच्या कामाची पावती होती. आता सुरू होणार होता पुढचा प्रवास ...(क्रमश:)

-            -      डॉ.नयना कासखेडीकर   

---------------------

  

Friday, 21 April 2023

विल्यम शेक्सपिअर आणि जागतिक पुस्तक दिन

 



विल्यम शेक्सपिअर आणि जागतिक पुस्तक दिन

                                           

२३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा होतो. जगातल्या लेखकांचा व पुस्तकांचा सन्मान करणे आणि लोकांमध्ये वाचनाची सवय वाढीस लावणे हा उद्देश असतो.आपणही कुसुमाग्रजांचा जन्म दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून सजरा करतो तसाच, जगातील ख्यातकीर्त इंग्रजी कवी, नाटककार विल्यम शेक्सपिअर यांचा हा जन्म दिवस जगात पुस्तक दिन म्हणून साजरा होतो. हा दिवस सर्वप्रथम युनेस्कोने जाहीर केला. विशेष म्हणजे २३ एप्रिल हा शेक्सपिअर यांचा जन्म दिवस आणि मृत्यू दिवस पण आहे. (२३ एप्रिल, १५६४–२३ एप्रिल १६१६)

      नाट्यतंत्राचा कसून केलेला अभ्यास, अनुभव, अल्पावधीत नाट्य क्षेत्रात मिळालेले व्यावसायिक यश यामुळे शेक्सपिअर यांना ‘फादर ऑफ ड्रामा’ असेही म्हटले जाते. शेक्सपीअर १५९० ते १६१२ या काळात अखंड पणे नाटके लिहीत होता. त्यांच्या नाटकांचे विषय असत ऐतिहासिक, शोकात्मिका,सुखांतिका आणि सुख दुखाचे मिश्रण असणारे रोमान्स.१५९२ ते १५९४ या काळात प्लेगमुळे नाट्यगृहे बंद होती. या काळात विल्यम यांनी सुंदर काव्य निर्मिती केली. १५९४ मध्ये नाट्यगृहे पुन्हा चालू झाली तेंव्हा किंग्ज मेन नाट्य मंडळीमध्ये शेक्सपिअर झळकला. १५९४ ते १६०३ या काळात त्याने दर वर्षाला दोन नाटके लिहिली. इथून सुरू झाले त्यांचे वैभवचे दिवस.

     अशा जगप्रसिद्ध विल्यम शेक्सपिअर ची मराठी माणसाने आठवण काढलीच पाहिजे. कारण मराठी भाषेत शेक्सपिअर यांची अनेक नाटके आहेत. तीही अत्यंत गाजलेली. अनेक साहित्यिकांनी त्यांच्या नाटकांचा व साहित्याचा अनुवाद मराठीत केला आहे. तो तितकाच मराठी प्रेक्षकांना भावला आहे. अगदी ‘हॅम्लेट’ या नाटकाचं मराठीत गोपाळ गणेश आगरकर, गोविंद कानिटकर, आनंद बर्वे, नाना जोग, भा. द. खेर, परशुराम देशपांडे, नानासाहेब फाटक, सई परांजपे, प्रभाकर देशपांडे, वि.वा.शिरवाडकर(गगनभेदी ) यांनी हॅम्लेट मराठीत अनुवादीत केलाय. कवि मंगेश पाडगावकरांनी रोमिओ अँड जूलिएट केला. वीर वामनराव जोशी यांनी मेझर फॉर मेझर (संगीत झोटिंगशाही), मॅकबेथचा अनुवाद वि वा शिरवाडकर, शि. म. परांजपे, यांनी केला आहे आणि आपल्या सर्वांच्या ओळखीचे वि.वा. शिरवाडकरांचे गाजलेले ,आम्हा प्रेक्षकांनी अत्यंत गौरविलेले ‘नटसम्राट’ याची मराठीत ९ लेखकांनी भाषांतरे केली आहेत.

   To be? or not to be? that is the question

जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. ह्या दुनियेच्या ऊकिरड्यावर खरकट्या
पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं ?
का फेकुन द्यावं देहाचं लक्तर मृत्यूच्या काळाशार डोहामध्ये?
आणि करावा शेवट सर्वांचा एकाच प्रहाराने? ....


   हे अप्पासाहेब बेलवरकरांचे नटसम्राट मधील स्वगत, मराठी नाट्य रसिक प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करून आहे. ‘नटसम्राट’ हे विल्यम शेक्सपिअर यांच्या कलाकृतीवरून प्रेरणा घेऊन लिहिलेले नाटक. आजही अनेक दशकानंतर या नाटकाचे नावीन्य तसेच आहे आणि ते तसेच टिकून राहील. विल्यम शेक्सपियर यांच्या नाट्य पंढरीचा स्वताला वारकरी समजणारे कुसुमाग्रज यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. मानवी जीवनाचा सामाजिक, कौटुंबिक, राजकीय, आणि वैयक्तिक असा धांडोळा घेतला तर जे जे काही मनुष्य स्वभावाचे कंगोरे, उदा. कट -कारस्थाने, विश्वासघात, सत्यता, असत्य, अहंकार, मत्सर आणि लोभ, प्रेमातला संघर्ष,आणि जीवनमूल्ये रंगभूमीवर मांडून ती जगात सगळीकडे सारखीच आहेत हे सिद्ध झालं, ते शेक्सपिअर यांच्या साहित्यामुळेच. म्हणूनच जगातल्या जवळ जवळ सर्वच भाषेत त्यांचे साहित्य भाषांतरित झाले आहे आणि अमर झाले आहे.

   ऑथेल्लो हेही एक नाटक महादेवशास्त्री कोल्हटकर, गोविंद बल्लाळ देवल. वि वा शिरवडकर यांनी अनुवाद केलेलं आहे. त्यांच्या नाटकनवरून ‘हॅम्लेट’, ‘अंगूर’ (हिन्दी) ‘मकबुल’ हिन्दी (मॅक बेथ वर आधारित) आणि ‘ओमकारा’(ऑथेल्लो वर आधारित) हे चित्रपट निघाले आहेत. अंगूर सिनेमा आपण सर्वांनीच पाहिला आहे. हा विनोदी चित्रपट १९८२ मध्ये प्रकाशित झाला. गुलजार यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. याची कथा विल्यम शेक्सपिअर च्या ‘कॉमेडी ऑफ एरर्स’ या नाटकाची आहे. आज हा चित्रपट सर्वश्रेष्ठ विनोदी चित्रपट म्हणून नावाजला जातो.

                                                    

     शेक्सपिअर ची काव्ये आणि नाटके हे दोन साहित्य प्रकार अजरामर झाले आहेत. त्यांचे विशेष काव्य प्रकार म्हणजे सुनीत लिहिली (sonnets १४ ओळींची कविता) शिवाय दीर्घकाव्ये सुद्धा. त्यांनी ३८ नाटके, १५४ सुनीते, दीर्घ कविता, स्फुट कविता असे लेखन केले. शेक्सपिअर ची सुनीत-माला इंग्रजी साहित्यातला बहुमोल अलंकार मानला जातो.

    परभणीचे प्रभाकर देशपांडे तर शेक्सपिअर च्या नाटकाने झपाटलेलेच होते. त्यांनी तर शेक्सपियर यांच्या नाटकांचे अनुवाद केलेले पाच खंडच लिहिले आहेत. त्यात ७ शोकांतिका, ७ सुखांतिका, ७ नाटके, ८ ऐतिहासिक नाटके आणि इतर १५ नाटके असे पाच खंडात लिखाण केले आहे. हे खंड विशेष म्हणजे जागतिक ग्रंथ दिनी म्हणजे २३ एप्रिललाच २०१५ मध्ये प्रकाशित केले गेले. वाईचे गणेश ढवळीकर यांनीही शेक्सपिअरची, मर्चंट ऑफ व्हेनिस, सिंबेलाईन, ऑगस्टस सीझर, मॅकबेथ, हॅम्लेट, लिअर राजा, रोमिओ अँड जूलिएट , टेंपेस्ट ही नाटके कथारूपात मराठीत अनुवादीत केली आहेत.

    विल्यम शेक्सपिअर यांच्या साहित्याने सर्व जगालाच भुरळ पडलेली दिसते. याचा इतका प्रभाव होता की शेक्सपीअर यांच्या साहित्याची सूक्ष्म समीक्षा केली गेली. त्यांनी नाटकातून उभे केलेली पात्रे,काव्ये, प्रतीके, त्यांनी वाप्रलेले शब्द, वृत्त,राज्यशास्त्र, वैद्यक शास्त्र, ज्योतिष, नाट्य शास्त्र, संगीत या सगळ्या विषईंचे ज्ञान यांचा पण अभ्यास केला गेला. शेक्स पियर नाटककार म्हणून मोठा की कवि म्हणून मोठा यावे चर्चा झडल्या, त्यांच्या नाटकातील पात्रांची सूची तयार केली गेली,नाटकातील प्रसंग .घडामोडी आणि व्यक्ति प्रत्यक्षात होऊन गेल्या होत्या का याचा ही शोध घेतला गेला.

    जगातल्या मुख्य भाषा सोडाच पण मराठी सारख्या प्रादेशिक भाषेत पण त्यांच्या साहित्याला स्थान दिल्याचे दिसते. म्हणूनच त्यांच्या जीवनावरील, नाटकांवरील, त्यांच्या विचारांवर, त्यांच्या काळातील इंग्रजी रंगभूमी वर अभ्यास झालेला दिसतो. मग ती शोकनाटये, सुखांतिका, सुनीते, कथा, कविता, त्यांच्या नाटकातील सौंदर्य स्थळे, मराठी नाटक आणि शेक्सपिअर असा सर्वच विषयांचा लेखाजोखा आपल्या मराठी भाषेमध्ये मांडला गेला आहे.


स्ट्रॅटफर्ड-ऑन-अॅव्हन या शेक्सपीअर यांच्या जन्मगावी त्यांचे स्मारक आहे. अॅव्हन नदीच्या काठावर एक नाट्यगृह, ग्रंथालय व वस्तुसंग्रहालय आहे. यात शेक्सपीअर यांच्यावरील दहा हजारांवरील दुर्मिळ पुस्तके ठेवली आहेत. हस्तलिखिते आहेत. मार्च ते ऑक्टोबर या काळात येथील नाट्यगृहात शेक्सपीअरची नाटके सादर केली जातात. जगाच्या पाठीवरचा हा नावाजलेला कवी आणि नाटककार २३ एप्रिल चा महानायक (हीरो) आहे. अभ्यासकांना आणि वाचकांना एक दिशा देणारे त्यांचे साहित्य आहे. वाचकांनी आपल्या मराठी भाषेतली त्यांची साहित्यकृती नक्की वाचावी, समजून घ्यावी.

(हा लेख काल प्रकाशित झालेल्या 'साहित्य परिमळ' या ई साहित्य पत्रिकेत प्रसिद्ध झाला.हा अंक वाचण्यासाठी लिंक -- https://online.flippingbook.com/view/898043842/ )

- - डॉ. नयना कासखेडीकर
                                                              ----------------------------



Monday, 17 April 2023

भाग –६४. मातृभूमिकडे प्रयाण

                                                                           उत्तरार्ध 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा,

प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका

विचार - पुष्प - उत्तरार्ध

भाग –६४. मातृभूमिकडे प्रयाण

                                     

    स्वामी विवेकानंद शिकागो ला सर्व धर्म परिषदेला येण्यापूर्वी भारतात ते परिव्राजक म्हणून फिरले होते आणि आता अमेरिकेत सगळीकडे परिव्राजक म्हणूनच फिरत होते. पण दोन्ही कडचे परिव्राजकत्व खूप वेगळे होते. दोन्हीकडील लोक, शिक्षण, परंपरा, तत्वज्ञान, धर्म, अध्यात्म ,विचार व मूल्य ,आर्थिक परिस्थिति सगळच वेगळं. इथे वैयक्तिक भेटीतून त्यांनी तळागाळातील भारत समजून घेतला तसच, आता दीड वर्षापासून ते अमेरिकेत फिरत होते. तेथेही भेटी घेणे, विविध चर्चा,भाषणे, सार्वजनिक ठिकाणची व्याख्याने, तिकडच्या विद्वान लोकांच्या भेटी, नामवंतांशी झालेल्या चर्चा, यामुळे तिकडची संस्कृती, ते लोक याचा जवळून परिचय होत होता. अनेक कुटुंबे विवेकानंद यांच्याशी पर्यायाने हिंदू तत्वज्ञानशी जोडले गेले होते. तिथल्या वृत्तपत्रातून विवेकानंद यांच्या विषयी अनेक वर्णने छापून आल्यामुळे लोकांना त्यांचा परिचय व्हायचा. त्यांच्या भेटीनंतर आणि ओळख पटल्यानंतर पाश्चात्य संस्कृतीतल्या स्त्रिया सुद्धा विवेकानंद यांच्याकडे मातृभावाने बघू लागल्या होत्या. भारतात जसे त्यांचे शिष्यगण तयार झाले होते तसे आता अमेरिकेत सुद्धा लोकांचा यातला रस वाढू लागला होता.त्यातून अनेक शिष्य ही तयार झाले.

सुरूवातीला सर्व धर्म परिषदेपर्यंत त्यांना कोणी ओळखतही नव्हते, नंतर मात्र ते तेंव्हापासून आणि नंतरही विद्वानात सुद्धा चांगलेच परिचित झाले. एक मानाचे स्थान त्यांना प्राप्त झाले होते. सुरूवातीचे विषय सुद्धा हिंदू धर्माचे प्रतिनिधी याच नात्याने असत. खरा हिंदू धर्म समजून सांगणे, गैरसमज दूर करणे, हेच उद्दिष्ट्य त्यांनी ठेवलेले दिसते.

आता स्वामीजींनी अमेरिकेचा निरोप घेऊन पुढच्या कार्याला लागायचे ठरवले होते, अनेक जणांना पत्र लिहून निरोप दिला. पंधरा एप्रिलला न्यू यॉर्क हून लिव्हरपुल ला निघाले.  बरेच जण जहाजावर निरोप द्यायला आले होते. आधी भारतात अडीच वर्षे परिव्राजक म्हणून ते फिरले, तसे अमेरिकेत सुद्धा जवळ जवळ ते अडीच वर्षे फिरले. आता ते इथून इंग्लंड ला निघाले होते. एस.एस. जर्मनीक जहाजाने किनारा सोडून अमेरिकेचा भूप्रदेश दिसेनासा होईपर्यन्त ते बाहेर उभे होते. या अमेरिकेच्या भूमिने आपल्याला काय काय दिले याचा लेखा जोखा मांडत.         

  स्वामीजी इंग्लंड ला पोहोचले. इथे एक आनंदाचा प्रसंग स्वामीजींनी अनुभवला. तो म्हणजे, पाच वर्षांनंतर गुरुबंधू सारदानंद यांची इंग्लंड मध्ये भेट. भारतभ्रमण सुरू होताना ते भेटले त्यानंतर स्वामीजींना अमेरिकेतील वास्तव्यात आलेले अनुभव, मिळालेले यश आणि किर्ती हे सारे बघून सारदानंद केव्हढे आनंदी झाले असतील याची कल्पना आपण करू शकतो. स्वामीजींना खूप वर्षानी आपल्या मातृभाषेत बंगालीत बोलायला मिळाले याचाही आनंद होता. पत्रव्यवहार होत असला तरी अनेक गोष्टी आता प्रत्यक्षात एकमेकांशी बोलायला मिळत होत्या त्याचे एक समाधान होते दोघांना. ही भेट झाल्यानंतर स्वामीजींनी आपल्या सर्व गुरुबंधूंना उद्देशून सविस्तर पत्र लिहिले, त्यात मठातील दैनंदिन व्यवहार कसा असावा, त्याचे नियम काय असावेत, मी भारतात परत आल्यानंतर आपल्याला एक संस्था उभी करायची आहे ती कशी असेल, त्याचे ध्येय काय असेल, ती कशी चालवायची, याचे चिंतन होते. ही संस्था म्हणजेच रामकृष्ण मिशन ची तयारी होय. रामकृष्ण मिशन चे काम पुढे कसे वाढले आणि त्याचा प्रसार कसा झाला हे आज आपण रामकृष्ण मठ आणि मिशन चे कार्य बघितले की कळते.



       इंग्लंडला जशी सारदानंदांची भेट झाली तशीच अचानक स्वामीजींचे लहान भाऊ महेंद्रनाथ यांची पण अनपेक्षित भेट झाली, ही बंधुभेट फार फार महत्वाची होती, कारण संन्यास घेतल्यापासून नरेंद्र ने घर सोडले होते, त्यानंतरची घरातली परिस्थिति, आर्थिक विवंचना, त्यांच्या आईना झालेला अत्यंत क्लेश, आणि आलेले सर्व वाईट अनुभवांचे महेंद्रनाथ दत्त साक्षीदार होते. म्हणून अनेक स्थित्यंतरांनंतर ही दोन भावांची भेट याला महत्व होते. महेंद्रनाथ वकिलीचा अभ्यास करायला इंग्लंडला आले होते. महेंद्रनाथांनी लिहीलेल्या लंडने स्वामी विवेकानंद या पुस्तकात या बंधुभेटीचा वृत्तान्त लिहिला आहे, महेंद्रनाथ दत्त हे पुढे ग्रंथकार म्हणून ओळखले जाऊ लागले. नरेंद्रचे (स्वामीजींचे)सर्वात धाकटे भाऊ भुपेंद्रनाथ दत्त बंगाल मधील सशस्त्र क्रांतिकारक चळवळीत सहभागी झाले. युगांतर मासिकाचे ते संपादक होते. अमेरिकेत ते पी एच डी झाले. त्यांनीही अनेक ग्रंथ लिहिले. नंतर ते साम्यवादी विचारांचे खंदे कार्यकर्ते आले, स्वामीजींचे चरित्र पण त्यांनी लिहिले आहे आणि द्रष्टा देशभक्त म्हणून स्वामीजींची प्रतिमा त्यातून त्यांनी उभी केली आहे. भुवनेश्वरी देवी आणि विश्वनाथ दत्त यांची तीन मुले, एक संन्यासी, एक ग्रंथकार, आणि एक साम्यवादी असे तीन दिशांनी कार्य करणारे कीर्तीवंत असे पुत्र होऊन गेले.

  लंडन मध्ये स्वामीजींनी वर्ग सुरु केला होता. तिथे सीसेम क्लब नुकताच वर्षभरापूर्वी स्थापन झाला होता. बुद्धिजीवी आणि विचारवंत स्त्रिया आणि पुरुष असा दोघांचा हा क्लब होता. शिक्षणाचा सर्वांगीण विचार असा त्याचा उद्देश होता. त्यात आठवड्यातून एक दिवस साहित्य विषयक चर्चा होत असे. ठरलेले वक्ते येऊ शकणार नव्हते म्हणून स्वामी विवेकानंद यांना व्याख्यानासाठी अचानक बोलवण्यात आले. तिथे त्यांनी मांडलेले विचार फार महत्वचे होते. शाळेत दिले जाणारे भौतिक विद्येच्या क्षेत्रातील शिक्षण शेवटपर्यंत थेट पोहोचले पाहिजे. कारण स्वामीजींच्या मते समाजातील अज्ञान दूर करण्याची ही पहिली पायरी होती. आणि मानवामध्ये सुप्त असलेले पूर्णत्व प्रकाशात आणणे ही शिक्षणाची फलश्रुति होती. धर्माईतकेच शिक्षणाला महत्व आहे आणि धर्माचा जसा व्यापार होता कामा नये तसाच,  शिक्षणाचा बाजार होता कामा नये, असा स्वामी विवेकानंद यांचा दृष्टीकोण होता. भारतातील प्राचीन गुरुकुल पद्धती त्यांना आदर्श वाटत होती.

युरोप मध्ये प्रवास चालू होता, आता तर अभेदानंद हे गुरुबंधु पण स्वामिजिना भेटले. मूलर यांच्याकडे विवेकानंद राहत होते तिथे अभेदानंद आलेले पाहताच स्वामीजींना कोण आनंद झाला होता. जूनलाच  स्वामीजींचा भारतात निरोप गेला होता की “कालीला ताबडतोब पाठवून द्या”. मग काय? स्वामीजी आणि काली पुढचे पंधरा दिवस वेदान्त विचाराच्या प्रसाराचे कार्य आणि फक्त त्याचीच चर्चा, असे आनंदात दिवस गेले. अभेदानंद सर्व वेद ग्रंथ, शतपथ ब्राह्मण, काही सूत्र ग्रंथ, असे अनेक ग्रंथ घेऊन आले होते. ही सर्व पुढच्या कामाची तयारी होती. सार्‍या मानव जातीला एक नवी दिशा द्यायची आहे असे स्वप्न स्वामीजींनी बघितले होते. आता विवेकानंद यांचे परदेशातील वास्तव्य संपत आले होते. इंग्लंड मध्ये अभेदानंद आणि  अमेरिकेत सारदानंद पुढचे काम बघणार होते. स्वामी विवेकानंद आता आपल्या मातृभूमिकडे परत येणार होते, ते जवळ जवळ साडे तीन वर्षांनंतर, त्यांना निरोप द्यायला सगळे जमले होते. १६ डिसेंबर १८९६ रोजी स्वामीजींनी इंग्लंड चा किनारा सोडला. मातृभूमी त्यांना बोलवत होती. 

(क्रमश :) 

© डॉ.नयना कासखेडीकर    

                                             -------------------

Wednesday, 15 March 2023

मुलखावेगळी ती -लेखमाला

 

मुलखावेगळी ती -

निर्मला थोरमोटे

   



सौंदर्य म्हणजे कायम आनंद ! निसर्गाचे सौंदर्य माणसासाठी नुसते नेत्रसुखासाठीच नाही तर मानसिक स्वास्थ्यासाठी ,शारीरिक स्वास्थ्यासाठी आणि मनशांती व आनंद मिळवण्यासाठी एक वरदान आहे. त्यामुळे पुढे भविष्यात हा निसर्ग अबाधित ठेवण्यासाठी ,तो वृद्धिंगत होण्यासाठी आणि तो सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकाने पर्यावरण संतुलित राखले पाहिजे. प्रदूषण रोखले पाहिजे, (नद्या, परिसर, नाले, ओढे, समुद्र व त्याचे किनारे, जंगले, शहरातील बागबगीचे, वाहनांचे धूर, प्लास्टिकचा वापर व कुठेही फेकून द्यायची सवय.) निसर्गाचं सौंदर्य वाढविणे हे आपल्या हातात आहे. त्यासाठी माणसाने जागे व्हायला हवे. एव्हढ्या मोठ्या लोकसंख्येला शासन एकटे किती पुरणार? त्यांना वेळीचं जागं करणं ही नैतिक वं सामाजिक जबाबदारी कुणी घ्यायला हवी. (पण कुणी? कारण शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात –ही वृत्ती) हे काम करताहेत निर्मलाताई थोरमोटे. स्वत:च्या सोसायटी पासून ते परिसरातील इतर सोसायट्या, बागा, टेकड्या,रस्ते, ट्रॅफिक, अशा विषयात निर्मला ताईंनी खूप वेगळं काम केलं आहे. ‘पर्यावरण वाचवा, जीव वाचवा’ हे म्हणायला सोप्पं आहे, पण लोकांच्या मनात हा विचार रुजविणे तेव्हढेच अवघड आहे.

आपल्याला एखाद्या पर्यटन स्थळी गेल्यावर जो निर्मल व खरा आनंद मिळतो तो तिथल्या वातावरणामुळे, स्वच्छ हवेमुळे. हे निर्माण करणं, केवळ आणि केवळ मनुष्याच्याच म्हणजे आपल्याच हातात आहे. प्रत्येकाने आपले घर आणि परिसर स्वच्छता करणं आणि शून्य कचरा व्यवस्थापन करणं हे कर्तव्य केलं पाहिजे. हे तुमचे कर्तव्य आहे असे लोकांच्या मनावर बिंबवले गेले पाहिजे. बापरे हे कसे शक्य आहे? कोण करणार हे काम? इथे कोणाला अशा कामासाठी फुरसत नाही. आणि काय अडलय लोकांना शिकवायचे? एव्हढी मोठी लोकसंख्या आणि पर्यावरण, शून्य कचरा व्यवस्थापन कोणाकोणा ला शिकवत बसणार? हा प्रश्न स्वाभाविक आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ‘निर्मलाताई थोरमोटे’. निर्मलाताईंनी पर्यावरण क्षेत्रात काम केल्याचे कळले होते ,तो विषय बोलता बोलता लक्षात आले की, त्या प्रत्यक्ष झाडे लावत नाहीत, की शून्य कचरा व्यवस्थापना मध्ये कचरा उचलत नाहीत. तर लोकांमध्ये जागृती निर्माण करून या गोष्टी टाळता येतील, लोक स्वत:, पुढे येऊन, समजून घेऊन, यात सहभागी होतील असा वरवर आपल्याला अवघड दिसणारा प्रयत्न त्या सहज करतात. असे अनेक उपक्रम त्यांनी राबविले आहेत.

पुणे शहरात गेल्या काही वर्षात कचरा निर्माण होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. ‘कचरामुक्त शहर’ किंवा ‘कचरामुक्त आपले गाव’ हे मोठे आव्हान सर्वांसमोरच आहे. कचर्‍याचे व्यवस्थापन करायला, एक मोठे व्यवस्थापन शासकीय पातळीवर काम करत आहे. निर्मला ताईंनी स्व नुभवातून रोटरी क्लब, इनरव्हिल क्लब,सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये आणि प्रत्यक्ष नागरिक यांन बरोबर घेऊन मोठ मोठे उपक्रम राबवले आहेत.

इनर व्हील क्लबचे काम करता असताना मनोरंजना कडे कधी ओढा नसायचा पण सामाजिक काम, लोकांना बरोबर घेऊन उपक्रम करणे यातच रस असलेल्या निर्मला ताई आपल्या संवाद कौशल्याचा उपयोग समाजोपयोगी कामासाठी करतात.

त्यांना हॉटेलिंग, मनोरंजन, गप्पा टप्पा ,पार्ट्या ,गॉसिपिंग अजिबात आवडत नाही. तोच वेळ चांगल्या क्रिएटिव्ह कामासाठी त्या देतात. त्यांचं काम वाढल्याने आणि त्याचा प्रसार आणखी वाढवण्यासाठी त्यांनी DO SAVE ही संस्था सुरू केली. DO SAVE यात व्यापक अर्थ दडला आहे. यातून त्या समाजाला पर्यावरण वाचवा, स्वच्छता ठेवा आरोग्य सांभाळा, शून्य कचरा व्यवस्थापन, रक्तदान करा जीव वाचवा, शून्य कचरा व्यवस्थापन, प्लॅस्टिक आणि सॅनिटरी वेस्ट मॅनेजमेंट, पर्यावरण पूरक गणपती विसर्जन, रस्ते सुरक्षा आणि वाहतुकीचे नियम पाळा, रस्त्यावर असताना अॅम्बुलन्स सायरन वाजत असताना तिला पुढे जायला जागा कशी द्यायची हे समजून घ्या म्हणजे पेशंटचा जीव वाचू शकतो ,नुसते अॅम्बुलन्स आली वाटतं म्हणून विचार करत बसू नका,जागा करून द्यायची चटकन कृती करा. नुसते पर्यावरण वाचवा हा इवेंट म्हणून झाडे लावू नका, लावलेली झाडे, कशी वाढवायची व जपायची इकडेही लक्षं द्या. अशीच त्यांच्या कामाची यादी विचार करायला लावणारी आहे नक्कीच.

ईलेक्ट्रोनिक इंजिनीअर असणार्‍या पण समाजक्षेत्रात अधिकार वाणीने वावरणार्‍या निर्मला ताई स्वत: रेग्युलर रक्तदात्या आहेत.

‘आपला परिसर कचरा मुक्त करूया’ म्हणून अभियान त्यांनी राबविलं. स्वतच्या कचर्‍याचं योग्य व्यवस्थापन करून वीज, पाणी वाचवून, रसायन वापर टाळून, छोट्या छोट्या गोष्टी अमलात आणून प्रत्येकाने आपले घर पर्यावरण पूरक हरित घर करावे असे आवाहन ‘हरित घर सप्ताहा’त त्यांनी केलं. त्या म्हणतात, “घरातला ओला कचरा घरातच जिरवा बाहेर टाकू नका. माझा कचरा ही माझी जबाबदारी आहे”. हे करण्यासाठी त्या म्हणतात, Refuse, Reduce, Reuse, Return, Recycle या 5 R वर भर द्या.

स्वच्छ परिसर, स्वच्छ शहर, स्वच्छ देश. ही महत्वाची स्लोगन खूप काही शकविते. नुसतं कचरा व्यवस्थापन केल की आरोग्याचा केव्हढा मोठा प्रश्न मार्ग लागतो. निर्मला ताई अनेक माध्यमातून प्रत्यक्ष संवाद साधून सांगत आहेत की, कचऱ्याचे वर्गीकरण करा.

“तुमचा ओला कचरा तुम्ही स्वतःच जिरवा.

एक चौ.फूट मात्र इतक्या जागेत तुम्ही हे करू शकता.

प्लास्टिक कचरा (स्वच्छ आणि कोरडा) वेगळा करा आणि पुनर्प्रक्रियेसाठी पाठवा.

थर्माकोलचा वापर पूर्णपणे बंद करा.

इतरही कोरडा कचरा जमेल तितका वेगळा करा.

हे सगळं स्वतः करा आणि इतरांनाही सांगा.

पर्यावरण वाचवा...जीव वाचवा!”

स्वच्छता सर्वेक्षण 2022-23 च्या त्या ब्रॅंड अॅम्बेसिडर, धनकवडी- सहकार नगर वॉर्ड,म्हणून निवड , लातूर च्या येळम मित्र संस्थेने त्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविले, स्वच्छ पुणे च्या उपक्रमात असलेल्या योगदाना बद्दल पुणे महानगर पालिकेने पण गौरविले, सामाजिक कामासाठी अचिव्हर अवॉर्ड . शांतीदूत परिवाराकडून ‘शांतीदूत जीवनदाता पुरस्कार’ ,लातूर च कोरोंना योद्धा पुरस्कार अशा त्यांच्या कामाची दखल अनेकांनी घेतली आहे.

- ले – डॉ. नयना कासखेडीकर

----------------------------------------

मुलखावेगळी ती-लेख माला

 

मुलखावेगळी ती

सौ. मृदुल गणेश पाठक

  

 सामाजिक मूल्य कुटुंबात रुजलेले असले आणि समाजाप्रती संवेदनशीलता असेल तर पूर्ण कुटुंबच आपल संपूर्ण आयुष्य समाजासाठी देतो. घरात लहानपणापासून हे सामाजिक संस्कार मुलांवर झालेली कुटुंबं फार वेगळी असतात. आपल्या वडिलांच्या समाज सेवेचा वारसा आणि भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या संस्कारात वं सहवासात समाज सेवेचा घेतलेला वसा, पुढच्या पिढीपर्यंत नेणारी मुलखावेगळी ती- मृदुल ताई .दीनदयाल शोध संस्थान मध्ये पूर्ण वेळ काम केलेल्या शिक्षण, महिला सबलीकरण आणि ग्रामविकास याच कामाला वाहून घेतलेल्या मृदुल ताई, अनेक अडचणी आल्या पण १९७८ पासून आज पर्यन्त सतत ४५ वर्षे अविरत सामाजिक काम करणार्‍या समाजशिल्पी आहेत, विद्यार्थी दशेतच सामाजिक कामाची आस असणार्‍या मृदुल भांगेनी शिक्षण झाल्यावर विवेकानंद केंद्राचं काम करण्याचं मनाशी ठरवलं होतं. आणि लग्न केलचं तर सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या आणि हुंडा न घेणार्‍या मुलाशीच करायचं असा पण केलेल्या मृदुलाताईना जोडीदार पण तसाच मिळाला. त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांनी हा सामाजिक कामाचा पटच उलगडून दाखवला ,अत्यंत आनंदाने आणि समाधानाने अजूनही काम करत असलेल्या मृदुल ताईंना, समाजाला आपला उपयोग झाला याचा आणि नानाजी देशमुख या थोर व्यक्तीबरोबर काम करण्याचे भाग्य लाभले याचा अभिमान आहे.    

त्यांनी कामाची सुरुवात कशी झाली हे सांगताना म्हणतात,  “वडील संघ स्वयंसेवक असल्याने सतत प्रचारक आणि कार्यकर्त्यांचे घरी येणे जाणे असे.संघ कार्यकर्ते विश्वनाथ लिमये नेहमी येत असत. ते सतत विचारात असत शिक्षणांतर काय ? मीही विचार केला की लग्न केंव्हातरी होणारच आहे आणि नाही झालं तरी तेच आयुष्यच ध्येय नाही आपल्या ,लग्न नाही झालं तर, राष्ट्र सेविका समितीचे काम आयुष्यभर करू एव्हढ मोठ काम आहे. ते करायचं हा विचार मनात पक्का झाला होता. मग हळू हळू गोंदिया च्या आजूबाजूच्या परिसरात समितीच्या शाखा सुरू करून त्याचं काम वाढवत गेले, आजही या शाखा सुरू आहेत याचा अभिमान वाटतो.  याच सुमारास नागपूरला दीनदयाल शोध संस्थान चे बालजगत चे काम सुरू झाले होते आणि ओळखीच्या काकूंनी हे स्थळ सांगितलं होतं. नानाजी देशमुख यांच्या बरोबर काम करतोय मुलगा हिलाही सामाजिक कामाची आवड आहे तर हे स्थळ पहावे. नानाजी देशमुखच मला बघायला आले होते. त्यांनी तेंव्हाच सांगितलं की लग्नानंतर तुला गोंदियाला शाळा सुरू करायची आहे. नानाजींची कल्पना अशी होती की परिवाराने प्रचारक म्हणून काम करावं. दिन दयाल संस्थेमध्ये समाजशिल्पी ही संकल्पना राबवली जायची.    

मा. नानाजी देशमुख यांच्या बरोबर काम करणार्‍या कार्यकर्ता गणेश पाठक यांच्याशी नानाजींच्या आशीर्वादाने लग्न झालं. समाजशिल्पी परिवारात मृदुलताई सामील झाल्या. सुरुवातिच्या कामाबद्दल त्या सांगतात, “ नानाजींची कल्पना अशी होती की परिवाराने प्रचारक म्हणून काम करावं. दिन दयाल संस्थेमध्ये समाजशिल्पी ही संकल्पना राबवली जायची. नानाजींनी राजकारणातून संन्यास घेऊन, मे ७८ मध्ये या सामाजिक कामाची सुरुवात केली होती.त्या पहिल्या दिवसापासून माझे पती नानाजीं बरोबर काम करत होते. मी लग्नानंतर गोंदिया तून गोंडा प्रकल्पात काम करायला गेले.वाहनाची सोय नाही. आजूबाजूच्या १५ गावातून फिरून काम सुरु केले. ३६ मुलांपासून शाळा सुरू केली.शिक्षण त्या भागातील लोकांना नवीनच होते. शिवाय मुलींना शिकवतात हेच माहिती नव्हते. अशा लोकांसाठी त्यांच्या मुलांमुलीसाठी हे काम होते. त्यांचा विकास हेच उद्दीष्ट.शाळांमधून राष्ट्रीय शिक्षण ही कल्पना नानाजींची होती. गोरखपुरला त्यांच्या कल्पनेतले पहिले शिशुमंदिर साकार झाले”.

 गोंडा प्रकल्पाच्या शैक्षणिक कामा साठी मला B.Ed करावं लागलं. आणि अयोध्या युनीवर्सिटीतून नवीनच सुरू झालेले एज्युकेशन मध्ये MA पण केलं.त्या काळात वीज कनेक्शन असून लाइट नसायचे ग्रामीण भागात. दिवसा फक्त शेतकर्‍यांसाठी लाइट यायचे. त्यामुळे अभ्यासासाठी रात्री कंदील किंवा लॅम्प वापरावा लागे . तिकडे स्त्रियांना घुंघट घालावे लागायचे ,अगदी महिलाना महिलांसमोर सुद्धा घुंघट घेऊनच बोलायला लागायचे. सतत संवाद साधून हे कमी झाले.भजनाचा ग्रुप करून त्यांना एकत्र आणायला सुरुवात केली. मी मुख्याध्यापिका असल्याने शाळेत जेंव्हा मुली यायला लागल्या, तेंव्हा त्यांची फी (१० रुपये फक्त,) भरायला वडिलांच्या ऐवजी आईनेच यावे असा आग्रह केल्याने, त्या महिला शाळेत यायला लागल्या. त्यातून त्यांचे दर महिन्याला एकत्रीकरण, खेळ ,प्रार्थना असे उपक्रम सुरू झाले. एक समितीच सुरू झाली. या निमित्ताने त्या महिला घराबाहेर पडू लागल्या. या केंद्रात मा. रज्जु भैय्या, उषा काकू, प्रमिलताई आणि अनेक मान्यवर कार्यकर्ते भेट द्यायला यायचे त्यांच्याशी संपर्क होत असे. सहवास होत असे. नानाजी बरोबरच काम होत असे त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हीही घडत होतो. त्या वेळी माहिती नव्हतं की हे एव्हढे मोठे आहेत. ज्यावेळी त्यांना भारतरत्न मिळालं त्या कार्यक्रमाला आम्ही दिल्लीला गेलो त्यावेळी नानाजी किती मोठे व्यक्तिमत्व होते ते जाणवलं. कारण ते इतके साधे होते आणि आपल्यातलेच एक वाटत . अभिमान वाटला, अशा व्यक्तीचा सहवास आणि मार्गदर्शन आपल्याला जीवनातली नऊ वर्षे लाभले आहे.”

त्यानंतर बीड मध्ये काम सुरू करायचे होते. डोंगरी मध्ये साखर कारखान्यातल्या कामगारांच्या मुलांसाठी . ते काम आम्ही बघाव असे ठरलं. नानाजींच काम प्रत्येक गावाप्रमाणे, शहरं प्रमाणे, तिथल्या गरजा ओळखून योजलेले असायचे . मागसलेले गाव असेल त्याप्रमाणे तशी योजना ठरायची. गोंडा, नागपुर, बीड याठिकाणी काम उभा केलं, चित्रकूटला व्यवस्थित प्लॅन करून यशस्वी प्रयोग झाला. मग पुढे पुढे आधी १०० गावं नंतर ५०० गावं दत्तक घेऊन प्रत्येक ५ गावांमागे एक समाजशिल्पी परिवार कामाला लागला होता. तसे आवाहनच केले होते प्रत्येक परिवाराने आपल्या जीवनातला काही काळ समाजासाठी द्यावा. नानाजींची सौंदर्य दृष्टी खूप महत्वाची होती. अनेक गोष्टी त्यातून शिकायला मिळाल्या . जरी सामाजिक काम करत असलो तरी ते इतके व्यवस्थित हवे नीट नेटके हवे की कोणालाही तिथे यावेसे वाटले पाहिजे.

 महिलांसाठी छोटे छोटे कुटीरोद्योग आणि कलेच्या माध्यमातून त्यांना व्यवसाय सुरू करून देणे त्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण देणे आणि बाजारपेठ उपलब्ध करून देणे.जेणे करून महिला स्वतच्या पायावर उभ्या राहतील. हे काम खूप चांगलं उभं झालाय, त्यासाठी आधी महिलांसाठी कला वर्ग घेतले. शिवण क्लास घेतले. अनेक प्रकार शिकविले , बॅग, बाळंतविडे, ड्रेसेस. हँड एम्ब्रोयडरीला तर खूप मागणी आहे. ब्युटिपार्लर, बटाटा चिप्स मशीन्स, लेदर बॅग,कापड तयार करणे, शेवया बनविणे, असे उपयुक्त काम सुरू आहे. नोकरी करणार्‍या महिलांसाठी बाळांची सोय म्हणून पाळणाघर आणि बालवाडी सुरू केली. बीड भागात जशा गरजा होत्या तसे काम उभे केले. आदर्श शैक्षणिक मॉडेल तयार करायचे आणि लोकांना द्यायचे.  विद्यार्थ्याला दहावीनंतर व्यवसाय प्रशिक्षण द्यायचे ज्यामुळे नंतर त्याला नोकरी नाही मिळाली तरी तो काही उद्योग चालू करू शकेल.

गोंडा प्रकल्पात काम सुरू केल्यानंतर इतक्या वर्षांनी तिथे चार पाच वर्षापूर्वी जाण्याचा योग आला तो संस्कार भारतीच्या कार्यकर्त्यांनी नानाजी देशमुख यांच्या जन्म शताब्दी वर्षा निमित्त सगळ्या जुन्या कार्यकर्त्यांचा स्नेह संमेलन ठेवलं होतं. त्या 5 दिवसात आम्ही ज्यावेळी 90, 91 पर्यन्त गोंडा ला काम करत होतो त्यावेळी जेव्हढे विद्यार्थी शिकत होते, त्यांना आम्ही आलो असे कळताच,त्या सगळ्यांनी दिवसभराचे सकाळी, दूध, नाश्ता, जेवण, दुपारचं चहा, नाश्ता, रात्रीचे जेवण आणि रात्री दूध असे सात वेळांचे प्रत्येकाकडे वेळापत्रक ठरवून आम्हाला आग्रहाने नेलं. आज आता त्यांची मुले त्या शाळेत शिकत आहेत, प्रगती करत आहेत. असं समाधानकारक बदललेलं चित्र पाहायला मिळालं.  

 बीड ला वेगळ्या प्रकारे काम करावे लागले. खूप निरक्षर महिला होत्या. त्यांना आधी साक्षर करून निदान थोडे वाचता येईल असे शिकवून मग इतर प्रशिक्षण द्यावे लागले. त्यासाठी आम्ही छोट्या लायब्ररी सुरू केल्या, छोट्या गोष्टी शिकवून वाचायला लावून त्या सांगणे स्वत:च आपल्या विकासात पुढाकार घेऊन केले तर लवकर प्रगती होते.मागे वळून पाहताना समाधान वाटतं की आपण आपल्याला नेमून दिलेल्या कामाला न्याय दिला आहे.”  

  आता पूर्ण वेळ काम थांबवावे असा विचार केलेल्या मृदुला ताई काम पुन्हा कसं सुरू झालं ते सांगतात, “ २०१३ आम्ही आता या कामातून थांबायचे ठरवले.कारण पूर्ण वेळ आम्ही दोघांनी संस्था म्हणेल तसा व तिथे वेळ दिला होता.पुढे काय करावं हे ठरवलं नव्हतं .वर्ध्याला गेलो. तिथे खेळघर सुरू केलं. लहान मुलांना दिशा देणे हाच आमचा उद्देश होता. आम्ही एक गाव पण दत्तक घेतलं होतं पण कौटुंबिक कारणाने २०१८ ला पुण्याला शिफ्ट व्हावं लागलं. लॉक डाउन सुरू झालं . या काळात संस्कृत भारतीचा कोविद कोर्स केलं अभ्यास केलं. अहमदाबाद च्या एका युनिव्हर्सिटी साठी एक पुस्तक लिहिण्याचा योग आला. नंतर एकनाथजी रानडे यांच्यावरील मराठी पुस्तकाचा हिन्दी अनुवाद केला आहे”.

“सध्या राष्ट्र सेविका समितीने पश्चिम महाराष्ट्रचे सेवा विभागाचे दायित्व दिले आहे . तळेगावला मा. ताई आपटे यांच्या नावाने मोठी वास्तु बांधली आहे तिथले प्रकल्प सुरू आहेत, त्याचे उदघाटन नानाजी यांनीच  केलेले आहे. पुन्हा नानाजींच्या प्रकल्पात मी सामील झाले आहे .

संघटन तर करायचेच पण जोडलेल्या लोकांना काम करण्यास प्रवृत्त पण करायचे हे महत्वाचे आहे. माझ्या मुली पण लग्नानंतर स्वेच्छेने कामात आहेत, समितीचा काम करतात. मुलीची मुलगी माझी नात समितीशी जोडली आहे आणि माझी आई पण समितीचं काम करते अशा आम्ही चार पिढ्या या कामात आहोत . नानाजींचे म्हणणे होते संपूर्ण परिवार कामात हवा, समाजशिल्पी परिवार !                                  

 अनेक अडचणीं ना तोंड देत काम करावं लागत पण अडचणी आपण कुटुंबात काम करतो तेंव्हाही असतातच , त्या सोडवतच आपण पुढे जात असतो, तसच या कामात सुद्धा अडचणी सोडवत पुढे जायचं”.अशा मृदुल ताई पाठक प्रामाणिक पणे समाज कार्य करणार्‍या मुलखावेगळ्या कार्यकर्त्या आहेत.(ही मुलाखत विश्व संवाद केंद्र,आणि इतर पोर्टल्स वर प्रसिद्ध झाली)

-      -  डॉ नयना कासखेडीकर

-       ----------------------------   

Friday, 10 March 2023

मुलखावेगळी ती...

 

 मुलखावेगळी ती...

मृण्मयी परळीकर 

      एखाद्या हिर्‍याला पैलू पाडल्यावर तो अधिक चमकू लागतो किंवा तो अधिक तेजस्वी होतो. असेच हिरे प्रत्येकाच्या कुटुंबात मुलांच्या रूपाने असतात. त्यांना अन्न, वस्त्र, निवारा पालकांच्या छत्राखाली मिळतच असतो. पण त्याही पेक्षा त्यांच्या आयुष्याला चांगले वळण देण्याची गरज असते. धैर्यवान, सामर्थ्यवान, निरोगी, नीतीमूल्ये आणि सामाजिक मूल्यांचे भान असणारी मुले घडविणे पालकांचे कर्तव्य असते. कुटुंबा बरोबरच शाळांमधून, महाविद्यालयातून आणि समाजात घडणार्‍य चांगल्या गोष्टीतून मुलांवर संस्कार होत असतात. अशाच वातावरणात घडलेली युवती स्वत: पुरता विचार न करता देश पातळीवर विचार करू लागते. आजची हि मुलूखावेगळं काम करणारी, आई आणि वडिलांनी सामाजिक संस्कारांनी घडविलेली मृण्मयी परळीकर ,साप्ताहिक विवेकच्या पाठ्यवृत्तीसाठी 370 कलम रद्द केल्यानंतरचा बदललेला कश्मीर अभ्यासण्यासाठी धाडस दाखविणारी मृण्मयी.

तिच्याशी बोलल्यावर, दोनच वर्षापूर्वी पोस्ट ग्रॅजुएट होऊन बाहेर पडलेली राज्यशास्त्राची विद्यार्थिनी, असा देशपातळीवरचा, तोही एकेकाळी धगधगत्या असलेल्या, आजही अशांत असलेल्या कश्मीर बद्दल विचार करते याचे कौतुक वाटले.

                                 

कश्मीर सारख्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या भारतातल्या नंदनवनाचा आम्ही आमच्या पातळीवर फक्त पर्यटन म्हणून विचार करतो. कारण कश्मीर कळत्या वयापासूनच सिनेमांमध्ये पाहिलेलं असत, तेंव्हा पासून हा प्रदेश बघायची सुप्त ओढ सर्वांनाच असते.हि इच्छा वेगवेगळ्या टुर्स बरोबर जाऊन पूर्ण करूनही घेत असतो आपण, पण यातल्या किती जणांना कश्मीरमधल्या निसर्ग सोडून असलेल्या परिस्थिति बद्दल ची जाणीव असते? ट्रीप, खरेदी, फोटोसेशन, मौज मजा ,तिथल्या खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेणं झालं की, टूरचं इतिकर्तव्य समाप्त. परंतु मृण्मयी ला नियंत्रण रेषेला लागून असलेल्या पाकिस्तान पासून ६ किलोमिटर वर असलेल्या ‘मच्छल’ एरियात जवानांना आणि लोकांना प्रेरणा देत उभा असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ,कारगिल चे जवानांचे स्मृति स्थळ आणि सर्वात मोठा भारताचा तिरंगा बॉर्डरवर फडकताना पाहिला की तरुण मृण्मयी नतमस्तक होते. जवानांचे बलिदान बघून अश्रु ओघळू लागतात. हे बघत असताना मनात ज्या राष्ट्रीय भावना आलेल्या असतात त्यामुळे कश्मीर मध्ये जाऊनही गुलमर्ग वगैरे ठिकाणी जाऊन वेगळे निसर्ग सौंदर्य बघायला जायची मृण्मयीला गरज वाटत नाही. म्हणून ती आपल्या पेक्षा वेगळी आहे.
  

                                

मृण्मयी ज्ञानप्रबोधिनित शिकली. तिने पुण्याच्या सर परशुराम भाऊ महाविद्यालयात राज्यशात्र घेऊन २०२०ला मास्टर डिग्री घेतली आणि Teach for india साठी टिचिंग फेलो आणि फेलो अडव्हायजर म्हणून काम करते. Tree Foundation साठी पण २०१८ साली छत्तीसगड मध्ये जाऊन प्रोजेक्ट केलं. (Transformation through Research, Education & Empowerment) अरुणाचल प्रदेशात जाऊन काम केलं. आणि ३७० कलम रद्द झाल्यानंतरचा कश्मीर प्रदेश त्या नंतर ३ वर्षानी काय बदलला आहे. कसा बदलला आहे हे जाणून घेण्यासाठी कश्मीर दौर्‍यावर गेली. सद्द स्थिति काय हे जाणून घ्यायला तिने तिथल्या आठवडाभराच्या वास्तव्यात विविध स्तरांतील व्यावसायिक, शेतकरी, कारागीर, युवक, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, विद्यार्थी, महिला, राजकारणी, सरपंच, शरणागत अतिरेकी, लष्करी अधिकारी ते या केंद्रशासित प्रदेशाच्या नायब राज्यपालांपर्यंत अनेकांच्या भेटी घेतल्या. गप्पा मारल्या. वेगवेगळ्या प्रश्नांमधून त्यांच्या मनातल्या भावना, सल समजून घेण्याचा प्रयत्न केला.

भारतीय राज्यघटनेतील काश्मीर बद्दलची जी कलमं आहेत ३७० आणि ३५ अ, जी जम्मू कश्मीरला स्वायत्तता आणि विशेष दर्जा देणारी होती ती एकत्र कधीच रद्द होऊ शकणारी नाहीत आणि जर रद्द झालीच तर अनेक गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असे गंभीर चित्र उभे केले गेले होते. पण खरच ही कलमं रद्द होऊन तीन वर्षे झाली मग आता काय झालं असेल कश्मीर मध्ये ? असा स्वाभाविक प्रश्न मृण्मयीला पडला आणि तिने या अभ्यासासाठी जाण्याचे ठरवले. कारण देशात घडणार्‍या घटना घडामोडींचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम ती अनुभवत होती. या कलमांमुळे भारतापेक्षा कश्मीर ची घटना वेगळी, ध्वज वेगळा, सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण आणि दळण वळण बाबी सोडल्या तर कश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे हे लोकांच्या मनाशी आणि हृदयाशी न भिडता फक्त कागदावरच राहिला. मृण्मयी ज्या तरुणांना भेटली त्यांनाही, “ही कलमं म्हणजे आमची अस्मिता आहे आमची ओळख आहे ती आम्ही गमावून बसलो आहोत असे वाटते” अशा भावना व्यक्त केल्या. याचाच फायदा घेऊन पाकिस्तान आणि इतर काही देशांनी कश्मीर सतत अशांत राहील असे प्रयत्न केले.

पण रिसर्च करणारा एक तरुण म्हणाला, इथल्या सतत सक्रिय असणार्‍या अतिरेकी संघटना, त्यांना असलेला पाकिस्तानचा पाठिंबा आणि दीर्घ काल कुठलीही ठोस कृती, कार्यक्रम नसल्याने तरुण वर्ग अतिरेकी कारवायांकडे आकर्षित झाला आहे. लहान मुलांना सुद्धा गन चालवून बघण्याचे आकर्षण आहे. ही अॅक्टिविस्ट तरुण मुलं सधन कुटुंबातली आहेत, कुणाला कलेक्टर व्हावसं वाटतय, कुणाला देशासाठी सैन्यात जावेसे वाटतेय, ती चांगल्या संधीच्या शोधात आहेत” असे आशादायक चित्र मृण्मयी ने अनुभवले.

मच्छल मध्ये मराठा रेजिमेंट काम करते तिथे शिवरायांचा पुतळा तर आहेच. पण, तिथे शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. मच्छल मेला भरतो, लष्कराचं ढोल लेझीम पथक आहे. सीमा सुरक्षा या मुख्य कामा पलीकडे जाऊन, सर्व काश्मिरी लोकांना देशाच्या प्रवाहात आणण्यांचे जिवापाड प्रयत्न लष्कराचे जवान करतात. कलमं रद्द झाल्यानंतर आणखी एक बदल झाला की, आत्ता पर्यन्त अस्तित्वात नसलेले पक्के रस्ते तिथे बांधले गेले. दळण वळणाची साधने निर्माण झाली.


                                
                   स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित मुलांच्या हातात तिरंगा आणि मनात देशभक्ति

मृण्मयी म्हणते, कश्मीर मध्ये शिक्षणाचा अभाव नाही, तर राष्ट्रीय शिक्षणाचा अभाव आहे. प्रेरणा देणारी व्यक्तिमत्वे चंद्र शेखर आझाद ,स्वामी विवेकानंद, राणा प्रताप यांची चरित्रच तिथे माहिती नाहीत. त्यामुळे असे आदर्शच डोळ्यासमोर नाहीत मुलांच्या. तिथे घडणार्‍य अतिरेकी कारवायांबद्दल तरुणांच्या मनात चीड आहे.

मृण्मयी जेंव्हा तिथल्या राज्यपालांना भेटते तेंव्हा “ही कलमं रद्द होणं आवश्यकच होतं. ती रद्द झाल्यामुळे राष्ट्राच्या मुख्य धारेत, मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदत होते आहे. इथे लागू नसलेले जवळजवळ १८० कायदे थेट लागू झाले. त्यासाठी कोणतीही वेगळी प्रक्रिया करावी लागली नाही. पुढेही करावी लागणार नाही.

विकासासाठी, समृद्धीसाठी शांतता आवश्यक असते. इथे सतत दहशतीचं वातावरण. शांततेशिवाय प्रगती साधणार कशी? ३७०, ३५ अ रद्द झाल्यामुळे इथे शांतता नांदू शकेल. आता काश्मिरी वेगळा न राहता भारताचा, या राष्ट्राचा, नागरिक म्हणून ओळख बळकट होईल आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी ते पूरक ठरेल.” असे कश्मीर च्या परिस्थितीचे आश्वासक बोल तिला ऐकायला मिळतात आणि राज्यपाल म्हणून नियुक्ती झाल्यावर तिथे राबवत असलेल्या अनेक योजनांची यादीच तिला ऐकायला मिळते. हीच तिथल्या बदलांची नांदी आहे असे मृण्मयी म्हणते.

शेती, शिक्षण, उद्योजकता, सामाजिक विकास, कायदेप्रक्रिया, अंतर्गत व सीमा सुरक्षा, पर्यटन, कला, क्रीडा, खाद्य, संस्कृती, ऊर्जा, तंत्रज्ञान, महिला सक्षमीकरण, या सर्वच क्षेत्रांत सकारात्मक बदलांना सुरुवात झाली आहे .

निसर्ग सौंदर्याने नटलेले,भारतातले नंदनवन असलेले कश्मीर!

दैदीप्यमान इतिहास लाभलेले कश्मीर!

सिंधु, झेलम, चिनाब सारख्या नद्यांनी समृद्ध असलेले कश्मीर !

कवी कल्हणच्या राजतरंगिणी खंडात ,महाभारतात, हडप्पा सारख्या प्राचीन अवशेषात हजारो वर्षांचा इतिहास सांगणारी, कश्यप ऋषींची ओळखली जाणारी ही भूमी, अशी दु:खी का?

सुवासिक अत्तरे तयार होणार्‍या या भूमीला दहशतवादी कृत्यांचा वास का?

लहान मुले आणि तरुणाईला बंदुका हाताळण्याचे आकर्षण का?

शत्रुपासून देशाचं रक्षण करणार्‍या, आपली सगळी स्वप्न बाजूला सारून आलेल्या, भारतीय सैनिकांचं वीरमरण ?

आता तर 370 कलम रद्द केलय, मग अजूनही परिस्थिति अशी आहे? असे एक नाही, अनेक प्रश्न मृण्मयी ला एक राज्यशास्त्राची विद्यार्थिनी म्हणून पडलेले. याची उत्तरे शोधण्यासाठी केलेला कश्मीर प्रवास, 370 कलम रद्द केल्यानंतर बदललेला कश्मीर बघण्याची उत्सुकता असलेल्या मृण्मयीच्या विचारांची बैठक चांगली घडली आहे हे लक्षात येतं.
                                 

चांगले शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या चांगल्या संधी सोडून सेवा वृत्तीने आणि जोखीम घेऊन काम करण्याची प्रेरणा मृण्मयीला तिच्या कुटुंबातून आणि शाळा कॉलेज मधूनच मिळाली. असे अभ्यास करण्याची संधी मृण्मयी सारख्या योग्य व्यक्तिला मिळाली तर स्वताला सिद्ध करून दाखवणारी ती चांगली यंग ‘अचिव्हर’ असेल यात शंका नाही. केवळ महिला दिनीच अशांचा विचार करण्याऐवजी मुलीच्या जन्मापासून आयुष्यभरच तिला चांगल्या संधी देऊन, तिच्याकडे चांगले लक्ष देऊन, जडण घडण केली तर अशा अनेक ‘अचिव्हर’ तयार होतील असे वाटते .(मृण्मयी मंदार परळीकर हिची, महिला दिन ८ मार्च २०२३ रोजी विश्व संवाद केंद्रातर्फे मुलाखत घेता आली आणि या निमित्ताने तिचा परिचय सर्वांना करून देता आला याचे समाधान वाटले. हाच विषय ‘मुलखावेगळी ती’ घेऊन विश्व संवाद च्या पोर्टल वर या मालिकेत प्रसिद्ध झाला.)

© डॉ. नयना कासखेडीकर

---------------------------

Monday, 20 February 2023

ललित कलांची जननी ‘साहित्य’

 

ललित कलांची जननी साहित्य

     मनुष्याचे विचार अभिव्यक्त करण्याचे प्रमुख माध्यम 'साहित्य' आहे. समाजाला अर्थपूर्ण दिशा देण्याचे काम साहित्य करते. अखिल भारतीय स्तरावर संस्कार भारतीचे काम, साहित्य आणि चित्र, शिल्प, रंगावली, नाट्य, संगीत, नृत्य आणि लोककला अशा विविध कलांमध्ये सुरू आहे. साहित्य विभागामध्ये विशेषत: लेखन आणि वाचन ही कार्ये येतात. साहित्य विभाग (विधा) ही इतर ललित कला विधांची जननी आहे असे म्हणता येईल. कारण चित्रकला, नृत्यकला, शिल्पकला, रंगावली, नाटक, संगीत आणि लोककला या सर्व ललित कलांची अभिव्यक्तीची एक भाषा आहे आणि भाषेचा आधार शब्द आहे. तो लिखित असतो. या शब्दाला एक अर्थ असतो, एक विचार असतो, विचारधारा असते, संस्कृती असते, त्याचे आदानप्रदान होताना किंवा संवाद साधताना भाषाच आधार असते. या सर्व कलांना आस्वाद्य बनविण्याचे कार्य भाषा करत असते. शिवाय त्याचा आशय सतत ताजा ठेवण्याचं कार्यही भाषा करते.

शब्द आणि अर्थ यांचे एकत्रित अस्तित्व म्हणजे 'साहित्य' असे म्हणतात. इंग्रजी टीकाकार ए.सी. ब्रॅडली यांनी ‘व्हेअर साऊंड अँड मीनिंग आर वन’ अशी साहित्याची व्याख्या केली आहे. शब्द म्हणजे ध्वनी किंवा अक्षरसमूह, त्याचे तयार झालेले वाक्य आणि वाक्य समुहातून तयार होणारा आशय म्हणजेच शब्द असतो. त्यात संवेदना, विचार आणि कल्पना असतात. शब्द आहेत म्हणूनच त्यातून मानवाच्या भावना व्यक्त होतात. शब्दसुमनांची गुंफण करत वाक्यांचे अलंकार निर्माण होतात आणि सर्व शक्तिनिशी ते नाद, गंध आणि रंग उधळीत जातात. त्याच शब्दांच्या कविता होतात, पुढे गीतांच्या रचना होतात आणि लोकप्रिय संगीत कलेतून गाणी निर्माण होतात, जी श्रोत्यांच्या मनावर पिढ्यान पिढ्या राज्य करतात. त्याचप्रमाणे कथा- कादंबर्‍या होतात, नाटके लिहिली जातात. यात लेखकाची प्रतिभा असते. त्यातून उत्कट भावाविष्कार, अनेक कल्पनाविलास, चिंतन, विचार यांचे दर्शन घडते. साहित्यात मानवी जीवनातले व्यावहारिक चित्रण असते, भाष्य केलेले असते. काल्पनिक, वैचारिक याबरोबरच जीवनाचे वास्तववादी चित्र पण दिसते.

साहित्य म्हणजे नुसते शब्द नाहीत, नुसता लिखित मजकूर नाही, तर आपल्या संस्कृतीचा व्यापक इतिहास आहे. जो विविध कलांमधून व्यक्त होत असतो, तो शब्दांमुळेच टिकून आहे. असे हे ललित साहित्य, कलाविश्वातील मनोरंजना बरोबरच उच्च अभिरुची रुजवत असते.

                                         

अगदी आदिम काळात चित्रभाषा होती. गुहा चित्रे, लेण्यातील चित्रे, आदिवासींची चित्रकला(वारली) यातून त्या काळातली संस्कृती व पद्धती समजे. त्या नंतरच्या काळात मौखिक साहित्य परंपरा होती. नंतर ती लिखित स्वरुपात आली. उदा. वेद, धर्मग्रंथ, रामायण महाभारत, पुराणे, शास्त्रे इत्यादि. प्राचीन संस्कृत वाद्मयातिल सर्व ग्रंथ श्लोकबद्ध असत. काव्यात असत. मौखिक असल्याने ते गेय व पाठांतरास सोपे असे. म्हणून ते पठणाद्वारे प्रसारित व्हायचे. हे ज्ञान एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे प्रसारित व्हायचे.

      प्राचीन काळात काव्य हाच वाड्मय प्रकार प्रामुख्याने होता. त्यात गद्य, पद्य, नाटक हे प्रकार असत. संस्कृत वाद्मयात याची उदाहरणे सापडतात. पद्य म्हणजे लयबद्ध अक्षररचना अशी व्याख्या डॉ मध्यावरव पटवर्धन यांनी मांडली आहे. तत्वज्ञान, नीती, व्याकरण असे शास्त्रीय ग्रंथसुद्धा पद्य प्रकारात असत. ते मौखिक मार्गाने टिकवून ठेवण्याची पद्धत सगळीकडे होती. मुद्रणकलेचा शोध गटेनबर्गने लावला आणि कागदावर अक्षरे उमटू लागली तसे जगभरात गद्य साहित्य तयार होऊ लागले. रोजनिशी, स्मरणिका, चरित्र, आत्मवृत्त, कादंबरी लेखन प्रकार भरभराटीस लागले. दीर्घ लांबीचे साहित्य तयार होऊ लागले. पुढे ललित आणि ललितेतर वाद्मयीन साहित्य प्रकार असे वर्गीकरण झाले. आज आपण ज्या साहित्यातून विविध सौंदर्याच्या पातळीवर आस्वाद घेत असतो, असे ललित प्रकार म्हणजे, काव्य, कथा, कादंबरी, नाटके, एकांकिका, नाट्यछटा, प्रहसने, महानाटये, अतिनाट्य, नाट्यगीत, कथाकाव्य, महाकाव्य, खंडकाव्य, नृत्यनाट्य, भावगीत, बॅलड, मुक्तछंद, वात्रटिका, लोककथा, लोकगीते, गोंधळ, अभंग, भजन, कीर्तन, पोवाडे, लावणी, आरत्या इत्यादि आहेत. असे ललित साहित्य प्रकार चार घटका मनोरंजन, विरंगुळा आणि जीवनातील ताणतणाव यापासून सुटका याबरोबरच सामाजिक सुधारणा, रूढी-परंपराबद्दल मार्गदर्शन, राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम, मानवी मूल्ये, प्रबोधन, जिज्ञासातृप्ति आणि अलौकिक आनंद देतात. त्यातून काही गोष्टींचा नवा अर्थ समजतो. सांस्कृतिक मूल्यांची जाणीव होते, जीवनातल्या समस्यांवर प्रकाश टाकला जातो. मानवी जीवन व तत्वज्ञान याचीही माहिती मिळते. मग एखादी कथा चित्रपट किंवा नाटकाचा आत्मा असते. तर एखादी काव्यरचना घेऊन गायकांच्या स्वरात एखादा संगीतकार वेगळा आकार देतो आणि त्या रचना, गाण्याची महफिल, विविध कार्यक्रम यातून नाट्यगीते, भावगीते, चित्रगीते, भक्तिगीते, बालगीते, लोकगीते, स्फूर्तीगीते या माध्यमातून सादर केल्या जातात.

                               

या साहित्याच्या आधारेच बहुतेक सर्व ललित कलांचे सादरीकरण होत असते.मनुष्याला विचार करण्याची क्षमता ईश्वराने बहाल केली आहे. त्याद्वारे या शब्द शक्तीचा वापर तो अभिव्यक्त होण्यासाठी करत असतो. या शब्दाबरोबर नाद लय, ताल, गंध आणि रंग येतात तेंव्हा नवीन निर्मिती होते. श्री संत तुकाराम महाराज म्हणतात,
‘आम्हां घरी धन, शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे, यत्न करू।।
शब्दची आमुच्या जीवीचे जीवन। शब्दे वाटू धन, जनलोक।।
तुका म्हणे पाहा, शब्दचि हा देव। शब्दाची गौरव पूजा करू।।’ आपले विचार प्रथम साहित्यातून आणि नंतर इतर कलांतून प्रकट होतात.

शब्दशक्तीचे एक सुंदर उदाहरण म्हणजे संतांच्या अभंग रचना. निर्गुण निराकार शक्तीचे सगुण रूप भक्तांच्या मनात तंतोतंत उभे करणारे हे शब्द. अशा अनेक भक्तिरचना शतकानुशतके आपल्या मनावर राज्य करत आहेत. ‘मोगरा फुलला..’, ‘ओम नमो जी आद्या’, ‘घणू वाजे घुणघुणा वारा वाहे रुणझुणा’..., अशा अनेक संत ज्ञानेश्वर आणि इतर संतांच्या रचना स्व.लता मंगेशकर यांच्या आवाजात अजरामर झाल्या आहेत. वेगवेगळ्या गायकांनी संतांच्या रचना मधून लोकांच्या मनात भक्तीभाव निर्माण केला आहे.

बुगडी माझी सांडली गं.. ही आशाताई भोसले यांच्या आवाजातली लावणी असो किंवा ‘पदरावरती जरतारीचा, मोर नाचरा हवा,

आई मला नेसव शालू नवा’..

गदिमांची ही लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांच्या आवाजात अजरामर होते. जगदीश खेबुडकरांच्या 'आज प्रीतीला पंख हे लाभले रे' .. अशी गीते जीवनाचे स्वप्न रंगवायला शिकवतात. 'अरे संसार संसार' या गीतातून कवयित्री बहिणाबाई चौधरी, संसार कसा असतो याची कल्पना देतात.

                                                
चित्रपट आणि नाटके या माध्यमातून संदेश दिला जातो. समाज प्रबोधन, इतिहास, देशभक्ती आणि जगात वागावे कसे याचेही मार्गदर्शन नाटके व चित्रपटातून होत असते. 'संगीत शारदा', 'एकच प्याला', 'नटसम्राट', 'सन्यस्त खड्ग', 'जग काय म्हणेल'? तो मी नव्हेच, अशा नाटकांनी समाजाला संदेश दिला. साधी माणसं, शामची आई, वहिनीच्या बांगड्या, वंदे मातरम, या चित्रपटांनीही इतिहास घडविला.

                                                     
 नृत्य नाट्यातूनही कथा रंगविल्या जातात. चित्रकला, रंगावली, शिल्पकला या कला माध्यमातून अनेक विषय मांडले जातात. चरित्र, व्यक्तिचित्र असे विषय सुद्धा यातून मांडता येतात. कै. बाबासाहेब पुरंदरे यांचं महानाट्य 'जाणता राजा' हे छत्रपती शिवरायांचे चरित्रच आहे. हाच इतिहास चित्रकलेतून,शिल्प कलेतून,रंगावलीतून,सादर करता येतो. सर्व ललित कलांचा आधार म्हणजे साहित्य आहे, नव्हे ती जननीच आहे .

(हा लेख संस्कार भारतीच्या पिंपरी चिंचवड च्या साहित्यवैभव या पहिल्या अंकासाठी लिहिला होता. या अंकाचे प्रकाशन ज्येष्ठ लेखिका व कन्नड मराठी अनुवादिका डॉक्टर उमा ताई कुलकर्णी यांच्या हस्ते मराठी भाषा दिना निमित्त १७ फेब्रुवारी २३ला प्रसिद्ध झाला. )

© लेखन- डॉ. नयना कासखेडीकर.

---------------------