Saturday, 21 June 2025

ऋतु हिरवा ऋतु बरवा

 

सकाळ ( गुढीपाडवा) विशेषांक श्रावण लेख २०२५

ऋतु हिरवा ऋतु बरवा

श्रावण आला गं वनी श्रावण आला.

दरवळे गंध मधुर ओला..

 


गदिमांनी श्रावणाच्या महिन्याचे अत्यंत बोलके वर्णन या कवितेत के;ले आहे. ग्रीष्म ऋतुतले ज्येष्ठ आणि आषाढ सरून वर्षा ऋतूच्या श्रावण भाद्रपदाकडे निसर्गाची वाटचाल सुरू होते आणि सगळा निसर्गच बदलतो . आपल्या हिंदू पंचांगाप्रमाणे आपले सण आणि व्रते महीने आणि ऋतु यांच्या समिकरणातूनच साजरे होतात.

   श्रावणात सृजनाचा उत्सव चालू होतो. निष्पर्ण झालेले वृक्ष, लता -वेली, झाडं- झुडपं, भेगाळलेली कोरडी शेतजमीन, पाण्याविना ओस पडलेले तलाव व पाणवठे, ओढे या सृजनाच्या उत्सवात न्हाऊन निघतात, एक नवचैतन्याची लहर निसर्गात दौडते . पहिल्याच पावसाने निसर्ग शुचिर्भूत होतो. पहिल्या पावसाचा मृद्गंध मन आणि शरीर सुखावून टाकतो.  सगळी धूळ झटकून झाडं नव्या पालवी सहित चकचकीत आणि टवटवीत दिसू लागतात. उन्हाच्या काहिलीने झालेली मरगळ दूर होते. पहिला जोरात पाऊस येतो, तोपर्यंत कावळ्याची पिल्लं मोठी झालेली असतात. आषाढातच त्यांनी घरटी बांधून अंडी घातलेली असतात. श्रावण सुरू होतो त्या आधीच कावळ्याच्या पिल्लांचे नवे जीवन सुरू झालेले असते.(माझ्या घरासमोरच्या वडाच्या झाडावरील वर्षानुवर्षे घेतलेला अनुभव) निसर्ग जसा आनंदाने बहरतो तसंच मानवी मन सुद्धा या ऋतु परिवर्तनाने आनंदाने बहरते. साहित्यिक आणि कवींना या मनभावन श्रावणाचा मोह होणार नाही असे कसे? म्हणून तर पाऊस आणि श्रावण याची अनेक वर्णने साहित्यात दिसतात. म्हणून आषाढ, ज्येष्ठ, श्रावण, भाद्रपद या चार महिन्यातला ‘सावन का महिना’ खूप लोकप्रिय महिना असतो.      

     शेतकरी दादा शेतं तयार करून चातकासारखी वाट पाहताच असतात पावसाची.आषाढवारीला गेलेल्या शेतकर्‍यांनी /वारकर्‍यांनी पंढरीच्या पांडुरंगाला भेटून, ‘चांगला पाऊस पाड बाबाअसं साकडं घातलेलं च असतं. सगळ्या चराचर जीवसृष्टीला, माणसांना, पक्षांना, प्राण्यांना आनंददायी असलेला, मनभावन निसर्ग असतो, या महिन्यात निसर्गात फुलणारी फुले, देवपूजेची चाललेली लगबग सगळं सगळं उत्साह देणारं. याच महिन्यात असलेली व्रतवैकल्ये धर्माची जोड देऊन जरी साजरे करत असले तरी त्याचा संबंध सात्विकतेशी, ऋतुचक्राशी आणि जीवन शैलीशी असलेला दिसतो. आपल्या आरोग्यासाठी चातुर्मासाच्या निमित्त आणि सणाच्या निमित्ताने का होईना योग्य आहार विहार ,सद्धर्म पाळणे, व्रतस्थ राहणे आणि अनुशासन पाळणे या गोष्टी माणसांकडून केल्या जात आहेत.मनुष्याला एक शिस्तीची चौकट आखून द्यावी लागते कोणीतरी (कर्मकांड नव्हे) मग सद्भावना, सदहेतू आणि सत्कार्य हातून घडतं.     

श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा महिना आहे.तर इंग्रजी कॅलेंडर नुसार जुलै किंवा ऑगस्ट मध्ये येणारा महिना. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरुन या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिना म्हटलं की निर्मळ वातावरण, पवित्र महिना आणि शिवभक्तांसाठी तर त्यांच्या आराध्य महादेवांना प्रसन्न करण्याचा महिना. श्रावण म्हणजे अशी समजूत आहे की शिव कैलासावरून उतरून शिवालयात विराजमान होतात. फक्त संपूर्ण श्रावण महिना हा भोलेनाथ आपल्या शिवभक्तांची गार्हाणी ऐकत असतो. बाकी वेळ संपूर्ण सृष्टीचे संचालन करण्यात जातो. म्हणून श्रावण महिना शिवभक्त भक्तिभावाने शिवाची सेवा करत असतात. 


कावड यात्रा हा एक सेवेचा आणखी एक मार्ग असतो. देशातल्या पवित्र नद्यांचे जल आणून त्याने शिवाभिषेक करण्याचा संकल्प भक्तगण करतात. ज्यामुळे शिव खुश होऊन भक्ताना आशीर्वाद देतात मनोकामना पूर्ण होते असा समज आहे. अशी कावड घेऊन जाणाऱ्या शिवभक्ताला कांवरिया म्हणतात. दिल्ली ते हरिद्वार तसेच इतर ही कावड पथ असतात त्यावरून दिल्ली, हरियाणा, पंजाब, यूपी, बिहार, झारखंड, छत्तीसगढ, मध्य प्रदेश इथून हजारो शिवभक्त या कावड यात्रेत अथवा कावड मेळयात सामील होतात. वाराणसी आणि बैदयनाथ धाम येथे शिवाला जलअभिषेक करतात. या वैदिक अनुष्ठानाच्या वातावरणात ब्रह्मचर्य, शुद्ध विचार, सात्विक आहार, नैसर्गिक दिनचर्या असणाऱ्या कांवरिया भक्तांचा भक्तीभाव हा अद्भुत मिलाफ अनुभवायला मिळतो.

श्रावण महिन्यात बहुतेक प्रत्येक दिवशी एकतरी धर्मकृत्य केलं जातं. श्रावणी सोमवार,जसे सोमवारी एकभुक्त किंवा नक्त राहायचे, दर सोमवारी शिवामुठ, मंगळवारी मंगळागौरीची पूजा, बुधवारी बुधबृहस्पती पूजन, गुरुवारी गुरुचरित्र पठन, शुक्रवारी वरदलक्ष्मीची पूजा, शनिवार मारूतीरायाचा तर रविवार आदित्य म्हणजेच सूर्य पूजेचा. याच प्रमाणे दूर्वा गणपती व्रत, सितला सप्तमी, पुत्रदा एकादशी, अजा एकादशी, श्रावणातली शिवरात्र, द्वादशीची वत्स द्वादशी साजरी करतात. शिवाय देवस्थानात वेगवेगळे कथा-पुराणं, मंत्रजागर असे विशेष उत्सव होतात. अगदी प्रत्येक श्रावणी सोमवार सुद्धा एक सण म्हणून साजरा होतो. श्रावण हा महिना चातुर्मासातला श्रेष्ठ महिना मानला जातो. नुसतं महाराष्ट्रात नाही तर इतर प्रांतातही या महिन्यात विविध उत्सव असतात.

 उदाहरणार्थ- उत्तरेत झुलान यात्रा, रक्षाबंधन, नंदोत्सव आणि जन्माष्टमी आणि विशेषता दक्षिण भागात श्रावणात नागपंचमी, श्रावणी, पोवती पौर्णिमा, नारळी पौर्णिमा, श्रीकृष्ष्ण जन्माष्टमी, नंदोत्सव, पिठोरी अमावास्या, मातृदिवस, कावड यात्रा, खांदेशात कानबाई उत्सव.

कानबाई उत्सव खांदेश 

श्रावणी सोमवार –शिवामुठ –शिवामुठ म्हणजे श्रावणात प्रत्येक सोमवारी भगवान शंकराला एक मूठ वेगवेगळे धान्य अर्पण करणे.तांदूळ, तीळ, मुग आणि जव या धान्यांनी शिवामुठ वाहिली जाते. पाचवा सोमवार आलाच तर सत्तू ची शिवामुठ वाहतात. याला शिवमुष्टि व्रत सुद्धा म्हणतात.


इथेही महादेवाला पूजून आपल्या मागण्या देवाला सांगून त्याच्याकडून आशीर्वाद घ्यावेत. मागण्या काय तर, त्याच्या अनेक आख्यायिका आढळतात. पण त्या समाजातले प्रतिबिंब च असते. आवडते- नावडते, सख्खे –सावत्र अशा नात्यांमध्ये असणारा दुरावा घरातल्या स्त्रीला नकोसा असतो. मग मनशांती मिळून, सकारात्मक भाव मनात निर्माण होऊन, आयुष्याकडे योग्य दिशेने बघण्याचा दृष्टिकोण मिळावा, नात्यांमधील प्रेम वाढावे, आयुष्य सुंदर आणि सुखाचे व्हावे म्हणून अशा कथातून, कहाण्यातून स्त्रियांना मार्गदर्शन होत असावे. उदा . “शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा. सासूसासर्‍या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा.” हे व्रत करून शिवपूजा करून उपवास करून शिवामुठ वाहावी. आशा श्रवणातल्या सर्व सोमवारी महादेवची पूजा,करावी शिव महिमा गावा, शिवमंत्र, शिवाष्टक,शिव तांडव स्तोत्र, शिव चाळीस, शिओव महिम्न स्तोत्र, जप श्रद्धा आणि भक्तीने करून गंगा जल. बेल पत्रं, अक्षता वाहून परिपूर्ण पूजा करावी असे श्रावणात अपेक्षित असते. शिवलिंग हे ब्रह्मांडाचे प्रतीक मानले गेले आहे. तर ब्रह्मांडात सर्व ग्रह समाविष्ट असतात. प्राचीन ग्रंथात सुद्धा शिवामुठ बद्दल उल्लेख आढळतो. उपास तपास व अशी व्रते मनुष्याला संयम राखायला शिकवतात. नियम पाळायला शिकवतात.

     श्रावण सुरू होताच ठेवणीतून बाहेर येतो जिवतीचा फोटो. घरातली आई आपल्या मुलाबाळांसाठी, त्यांच्या कल्याणसाठी, देव्हार्‍यात तो स्थानापन्न करून त्याला फूल पत्री, वस्त्र वाहून नैवेद्य दाखवते. संतती रक्षण म्हणून ही पूजा असते. एक मातृ शक्तीने दुसऱ्या रक्षक आणि पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजे जरा जीवंतिका पूजन .  श्रद्धावान लोक असे धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन श्रावणात आणि चातुर्मासात करत असतात आणि आत्मिक समाधान मिळवतात. जीवतीच्या या प्रतिमेवर नरसिंह, कालीयामर्दन करणारा  कृष्ण, (गदिमांच्या- सर्प फणीवर कृष्ण नाचला यमुनेच्या डोही, अशी अलौकिक कथा कुणी कधी ऐकलीच नाही.. या गीतात संपूर्ण वर्णन आहे) मुलांना खेळवणाऱ्या जरा जीवंतिका(जीवंतिका म्हणजे दीर्घायु प्रदान करणारी देवी) आणि बुध -बृहस्पती असतात.


                                                  जरे जीवन्तिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी ।

रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्तुते ।।

श्रावण महिना सुरू व्हायच्या आधी दिपपुजेच्या दिवशी विदर्भात झाडीपट्टीत जिवती हा सण वैशिष्ट्यपूर्ण असतो. आई वडिलांची सेवा करणाऱ्या श्रावण बाळाची आठवण म्हणून हा दिवस साजरा होतो. हा भाव किती सुंदर आहे. यावेळी स्वयंपाक घरातील देव्हाऱ्याजवळची भिंत शेणाने सारवून त्यावर जिवती चितारतात. हे चित्र असते खांद्यावर कावड घेतलेल्या त्यात आपले आईवडील घेऊन चाललेल्या श्रावण बाळाचे. त्याशिवाय तुळस, चंद्र, सूर्य, मोर, झाडे, शेत, नांगर, वखार, कामगार नाग अशी चिन्हे सुद्धा असतात. गृहीणींचे चित्र कौशल्य या बरोबरच आपल्या मुलाबाळांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून हे आशीर्वाद असतात.     

आणखी एक म्हणजे श्रावण महिना कहाण्यांचा सुद्धा उत्सव च नाही का?

मला आठवतं, लहानपणी आजीची पुजा-अर्चा झाली की, श्रावणात रोज तिला कहाणी वाचून दाखवायची.हे माझं काम आणि ती अगदी तल्लीन होऊन ,दाद देत या कहाण्या ऐकत असे. शुक्रवारची कहाणी. खुलभर दुधाची आणि अजून काही. वर्षानुवर्षे वाचलेल्या, माहिती असलेल्या त्याच त्याच कहाण्या आजी प्रत्येक वेळी मन लावून ऐकायची, त्यात खरं तर काही नावीन्य नसे, पण मनातली श्रद्धा हेच एकमेव कारण, अशीच गोष्ट नागपंचमीची. रूढी प्रमाणे चालत आलेली, आज तवा चुलीवर ठेवत नाहीत. किंवा भाजी चिरत नाहीत. असे परंपरेने सांगितले गेलेले. नागपंचमीच्याच कहाणीत त्याचे उत्तर दडलेले आहे. कारण या कहाण्या अर्थात गोष्टी, या प्रबोधनासाठीच रचल्या गेल्या आहेत हे डोळसपणे वाचले की लक्षात येईल. 


श्रवणातली शुक्ल पक्षातील तृतीया म्हणजे ‘हरियाली तीज’हा एक सण साजरा केला जातो.भगवान शिव आणि देवी पार्वती ची पूजा करून आपल्या सुखी संसारासाठी, वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद मागण्याचा हिंदू विवाहित महिलांचा पवित्र दिवस. हरियाली  तीज उत्तर भारतात विशेषता,उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड या भागात साजरी करतात. तसा हा दिवस शिव व पार्वती यांच्या पुनर्मीलनाचा दिवस मानतात.तसेच अविवाहित महिला अर्थात कुमारिका आपल्याला असा पती मिळावा जो भगवान शिवाचे  जेव्हढे पार्वती साठी प्रेम आहे तसेच प्रेम आम्हाला आमच्या पतीकडून मिळावे म्हणून शिव पार्वतीची पूजा करून, निर्जल उपवास धरून व्रत करतात. असे उपवास, भक्ती मार्ग म्हणजे भारतीय कुटुंब व्यवस्था आणि विवाह संस्था टिकवण्याचे सात्विक मार्ग आहेत. (अंधविश्वास सोडून) लग्न व्यवस्थेमुळे जी सुंदर नाती निर्माण होतात ती टिकण्यासाठी , सकारात्मक जीवन होण्यासाठी, एकमेकांवरचा विश्वास आणि प्रेम वाढण्यासाठी मुलांसाठी, पतीसाठी आणि कुटुंबासाठी अशी महिलांची व्रते खरंच हितकारक आहेत.              

 नागपंचमी ,श्रावण वद्य पंचमी- हिंदुस्थानच्या सर्व भागात साजरा होणारा सर्प पूजेचा हा सण आहे. महाराष्ट्र, दक्षिण भाग, गुजरात, बंगाल सगळीकडे सर्प पुजा किंवा नागप्रतिमांची पुजा करतात. नागांचा अधिपति राखेश्वर म्हणजे शिव समजून डोंगराळ प्रदेशात पंचमीला पुजा केली जाते. उदयपूरला या दिवशी घराच्या दाराशी एक प्रकारची वनस्पति आणून ठेवतात म्हणजे विषारी प्राणी घरात येत नाहीत. तर नेपाळ मध्ये नाग आणि गरुड यांच्यात मोठ्ठ युद्ध झालं, तो हा दिवस विशेष उत्सव साजरा करतात. आगरा, अयोध्या, पंजाब, गढवाल मधेही सर्पपूजेची पद्धत आहे. हे सांगण्याचं कारण एव्हढच की, परमेश्वराच्या अतर्क्य शक्तीबद्दल मनुष्याला आश्चर्य वाटले त्यामुळे त्याची सेवा करणे म्हणजे त्यांनेच निर्माण केलेले सर्व प्राणी, झाडे यांची पुजा करणे महत्वाचे वाटले असावे. म्हणून नागपंचमी सारखे सण सुरू झाले असणार.


नागपंचमी, मंगळागौर, गौरी गणपती, राखी पौर्णिमा या निमित्ताने त्या मुलीला माहेरच्या लोकांना भेटण्याची संधी दिली जायची, म्हणूनच,

फांद्यावरी बांधिले गं मुलींनी हिंदोळे...,

पंचमीचा सण आला डोळे का ग ओले ?’

ज्येष्ठ भावगीत गायक गजानन वाटवे यांनी गायलेल्या गदिमांच्या या गीतातील मुलींच्या डोळ्यात पाणी येते कारण ते वातावरण त्यांना ओढ लावते. नागपंचमीला फेर धरून गाणी म्हणणे, झिम्मा- फुगड्या, आट्या- पाट्या खेळणे, याबरोबरच यातील गाण्यांमधून काही पौराणिक कथा की ज्यातून जीवनमूल्ये शिकवली जातील, अशा कथांचं कथन होई. हीच मूल्ये तिला पुढच्या आयुष्यात स्वत:साठी उपयोगी पडत. कल्पनाशक्तीला वाव मिळे.


निसर्ग पूजक भारतीय लोक वृक्ष, झाडे, पत्री, फुले, जमीन/ वसुंधरा,पशू, पक्षी प्राणी यांच्या बद्दल सुद्धा कृतज्ञता व्यक्त करतात. मध्यंतरी मी मेळघाटात गेले होते. तिथे रस्त्याने जाताना कडेला छोटसं एक फुटाचं दगडाचं मंदिर होतं. त्यात एक दगडच विराजमान झाला होता. वर लिहिलं होतं, ||बाघ देव प्रसन्न || चौकशी केली तेंव्हा कळलं. की या जंगलात हे प्राणी वास्तव्यास असल्याने तो शक्तीशाली व आपला संरक्षणकर्ता आहे अशी तिथल्या आदिवासींची समजूत आहे. म्हणून या रस्त्याने जाताना आधी या बाघ देवाला नमस्कार करतात. म्हणजे खर तर दोघेही एकमेकांचं रक्षण करतात. अशा अनेक समजुती वेगवेगळे दिवस व सण साजरे करताना पाळत असलेले दिसतात.

    मंगळागौर पूजन महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. नवविवाहितेने लग्नानंतर पाच वर्षे करायचे हे व्रत. बंगाल मध्येही मंगलचंडिका म्हणून या सौभाग्यदायिनी देवीची पुजा करण्याचा प्रघात आहे. श्रावणातली मंगळागौर म्हणजे गौरी गौरी सौभाग्य देअशी प्रार्थना करत मांडलेली पार्वतीची पूजा. मंगळागौर म्हणजे पार्वतीच्या रुपातील अन्नपूर्णा. मंगळागौरीची पूजा करणं हे विशेषता महाराष्ट्रातले पारंपरिक व्रत. पुराण ग्रंथात भगवती मंगल चंडिका स्तोत्र आहे . शिव शंकराने तिला जगन्माता म्हटलं आहे. ही भगवती सर्व संकटनाचा नाश करणारी आणि सदैव कल्याण करण्यात तत्पर असणारी आहे. सढळ हाताने शुभ, मंगल करणारी, मंगल ग्रहाची पण इष्ट देवता असणारी मंगलाधिष्ठात्री आहे .या स्तुतीतले हे वर्णन भगवान शंकराने भगवतीची उपासना करताना केलेलं आहे असे म्हंटले आहे. या मंगला देवीची सर्व प्रथम श्री शंकराने उपासना केली त्यानंतर, देवता, मुनि आणि नंतर मानवाने ही उपासना सुरू केली.मग विश्वात सगळीकडे ही पूजली जाऊ लागली. स्त्रियांनी सुद्धा आपले कल्याण व्हावे म्हणून या देवीची उपासन केली. आणि बरोबरच आहे आपले आयुष्य सुखासमाधानात जावे,मुला-बाळांचे कल्याण व्हावे, संकटे येऊ नयेत असे कुणाला वाटणार नाही? त्यामुळे मनाला विश्वास देणारी एक शक्ती आपण मानत असतो.हा मनुष्य स्वभाव आहे. त्यामुळेच अशा उपासना होत असतात.पद्धती वेगवेगळ्या असतात एव्हढंच. ही संस्कृती मनुष्याने आपले जीवन सुखकर व आनंदी व्हावे म्हणून ती निर्माण केली आहे.ती तो सामूहिक पद्धतीने पाळत असतो ,यात आपले विविध सण, उत्सव, पूजा-अर्चा यासारख्या धार्मिक गोष्टी आणि त्या निमित्ताने वडीलधारी माणसे लहान मुलामुलींवर जीवनातल्या चांगल्या मूल्यांचा संस्कार करत असतात.    


                                         मम पुत्र पौत्रादिवृद्धये अवैधव्य भर्तुरारोग्यादि सकलकामना

                             सिद्धीद्वारा श्री शिवमंगलागौरी प्रीत्यर्थं पञ्च-वर्षात्मकं मंगलागौरीव्रतम करिष्ये !

असा संकल्प नवीन लग्न झालेल्या मुली या पूजेच्या वेळी करतात. यातला धार्मिक दृष्टीकोण थोडा बाजूला ठेऊन पाहिलं तर, तो एक प्रकारचा कौटुंबिक संस्कार सुद्धा आहे. हिंदू धर्मातील कुटुंब व्यवस्था टिकविण्यासाठीचा मूल्यसंस्कारच. कारण शिव आणि पार्वती हे आदर्श गृहस्थाश्रमाचे उदाहरण मानले जाते. पती-पत्नी मधील प्रेम आणि निष्ठा याचं हे उदाहरण आहे. मंगळागौर पूजेचे हे अधिष्ठान म्हणजे हेच आदर्श आमच्यात यावेत. अशी मनोकामना करतात.

मंगळागौरी पूजनानिमित्त समवयस्क मैत्रिणी व बहिणी जमलेल्या असताना आपले अनुभव एकमेकांना सांगताना, गप्पा मारताना आणि एक मनोरंजन म्हणून सुद्धा मंगळागौरीचे खेळ व गाणी म्हणण्याची पद्धत आहे. यात रात्री जागरण करून हे अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात. हे खेळ म्हणजे सर्वांगाला व्यायाम होणारे असतात. ती एक प्रकारची आसनेच असतात.स्त्रियांना फक्त घरातली कामेच करावी न लागता त्यांना मनोरंजन पण हवे ,आनंद मिळावा या हेतूने गाण्याची ही जोड देऊन हे खेळ खेळले जातात.हे जिम्नास्टिकच आहे.मनाची एकाग्रता, शरीराची लवचिकता, नेम साधणे हे सर्व आजच्या आरोबीक्स प्रमाणे  गीतांच्या तालावर व चालींवर खेळले जातात.     

            

                                                                  

जवळ जवळ ११० प्रकारचे खेळ यात खेळले जातात. यात खेळताना स्वयंपाक घरातील वस्तूंचा वापर केलेला असतो. या गीतांतून त्या नवविवाहितेच्या मनातील विचारच प्रगट होत असतात. आचार विचार महत्वाचे आहेत पण आता याच्या जोडीला परंपरा म्हणून दागिन्यांना पण महत्व आलेलं आहे. नटण मुरडण, खेळणं बागडण हे जात्याच स्त्री विशेष गुण. मनात काहीतरी असतं, कुठेतरी खुपत असतं, काही गुपित पण असतं, तर कुठला आनंद आणि कुठल तरी दु:ख, कोणाला तरी सांगावसं वाटतं, तिथे औपचारिकता नको असते. पण यासाठी भेटायला हवं ना? मग निमित्तही हवं त्याला.

नारळीपोर्णिमा शास्त्रा प्रमाणे वरुण देवतेची पुजा करून कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे नारळी पोर्णिमा. हिंदुस्थानच्या पूर्व आणि पश्चिम किनार्‍यावर असलेले लोक विशेषत: व्यापारी वर्गाला याचे जास्त महत्व. प्राचीन काळी ते जलमार्गाने प्रवास करीत असत आणि व्यापार आणि दळणवळण पण चालत असे. समुद्र हे वरूणाचे  स्थान समजले जाते. समारंभ पूर्वक समुद्राचे दर्शन घेऊन त्यास नारळ अर्पण करून समुद्रावर सत्ता गाजविणार्‍या वरुण देवाची आठवण ठेवणे व कृतज्ञता व्यक्त करणे असा उद्देश असतो. वर्षा ऋतुत हा समुद्र क्षुब्ध झालेला असतो. शिवाय हा काळ माशांच्या प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे या काळात मासेमारी करायला कोली बांधव जात नाहीत. श्रवण पौर्णिमेला सागर पूजन झाले की मासेमारी सुरू होते. श्रावण पौर्णीमेपासून जलमार्गावर वाहतूक सुरू होते. असा हा समुद्र पूजनाचा दिवस.ही परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे.


श्रावण पौर्णिमा दक्षिण भारतात ‘नारळी पौर्णिमा’ ,मध्य भारतात ‘काजरी पूनम’,उत्तर भारतात ‘रक्षाबंधन’,आणि गुजराथ मध्ये ‘पवित्रोपना’ म्हणून साजरी करतात. खरं तर सण आणि उत्सवांची विविधता हेच आपल्या भारतीय परंपरेचे वैशिष्ट्य आहे. 

यालाच पोवती पौर्णिमाही म्हणतात, सुटची पोवती करून ती विष्णु, शिव आणि सूर्य यांना अर्पण करतात.     हाच दिवस वैदिक धर्म पाळणार्‍यांसाठी श्रावणी म्हणून पाळला जातो. या तिथीला जानवे बदलायचा विधी सांगितला आहे. तर गुरुकुलातील विद्यार्थ्यांना शिकविण्याचा हा पहिला दिवस असतो.

      कृष्ण जन्माष्टमी - याच महिन्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी असते. श्रवणात वद्य अष्टमीला रात्री श्रीकृष्णाचा जन्म झाला. म्हणून हा दिवस कृष्ण जयंती, गोकुळाष्टमी किंवा जन्माष्टमी म्हणून ओळखतात.  तो दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा करतात.सबंध हिंदुस्थानात गोकुळ,मथुरा वृंदावन, द्वारका, पुरी, इथे हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. वृंदावन मध्ये या दिवशी दोलोत्सव साजरा करतात. कोकणात व महाराष्ट्रात दहीहंडी वा गोपाळकाला होतो. दुसऱ्या दिवशी उत्तर भारतात नंदोत्सव साजरा केला जातो.


  पिठोरी अमावास्या- पोळा- श्रावण अमावास्येला बैल पोळा साजरा करतात. शेतकरी लोक आपल्या खिलार्‍या बैलांना रंगवून, सजवून त्यांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढतात, पुजा करतात,त्यांचे औक्षण करतात.  गोडधोड करून त्यांना खाऊ घालतात. आपल्या उपयुक्त व वर्षभर आपल्यासाठी राबणार्‍या या गुरांबद्दल आदरभाव दाखविण्याचा हा दिवस. या दिवशी बैलांकडून कोणतेही काम करून घेतले जात नाही.  बहिणाबाई चौधरी यांनी ‘बैल पोया’ या कवितेत याचं महत्त्व सांगितलं आहे. त्या म्हणतात,

आला आला शेतकर्‍या, पोयाचा रे सन मोठा,

आता बांधा रे तोरन, सजवा रे घरदार |

करा अंघोयी बैलाच्या, लावा शिंगाले  शेंदूर,

उठा उठा बहिनाई, चुले पेटवा पेटवा |

आज बैलाले निवद, पुरणाच्या पोया ठेवा,

वढे नांगर वखार, नही कष्टाले गनती |

पीक शेतकर्‍या हाती, याच्या जिवावर शेती ||

या सणाला दक्षिण महाराष्ट्रात बेंदूर असेही म्हणतात. हा सण पाळण्यामागे अशी समजूत आहे की, धनधान्य आणि गोधनाची समृध्द्धी होते.पशुपूजन म्हणजे कृतज्ञ होणच. 

 


 चातुर्मास म्हणजे पवासाळयातील चार महीने. आणि श्रावण हा तर चतुर्मासातला श्रेष्ठ व पवित्र मानला जाणार महिना. पावसाळा हा ऋतु नाही म्हटलं तरी आरोग्य बिघडवणारा असतो काही वेळा. या कालावधीत पचनशक्ति मंदावते. पावसामुळे बाहेरचे वातावरण आरोग्याला हानिकारक व रोगराईला पोषक असते. अशुद्ध व गढूळ पाणी वापरात येते. साहजिकच सर्दी, ताप, खोकला, पोट बिघडणे हे आजार उद्भवतात. त्यामुळे पचायला हलका आणि साधा आहार घ्यायला लागतो. यालाच आपल्या पूर्वजांनी धार्मिक जोड देऊन एकभुक्तं राहणं, उपवास करणं, एक धान्य खाण यासाठी नेम धर्म आखून दिले त्याचा शास्त्रीय फायदा व अर्थ लक्षात घेतला तर कसे ऊपयोगाचेच आहेत हे लक्षात येईल. नीट विचार केला तर लक्षात येईल की, चातुर्मासात आहार विहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्रत वैकल्ये करायला सांगितली आहेत. 

   कुठल्याही गोष्टींचा धार्मिक संबंध लावताना तो डोळसपणे बघावा. अंधश्रद्धेने नको. आजची नवी पिढी चौकस आहे. तिला प्रत्येक गोष्टीचा शास्त्रीय आधार हवा आहे आणि हा शास्त्रीय आधार हिंदू धर्मात आहे. पालकांनी/मोठ्यांनी तो अभ्यासला पाहिजे.  परंपरेने चालत आलेल्या रूढी आहेत त्या तशाच्या तशा नवी पिढी स्वीकारणार नाहीत. त्यामुळे नवा अर्थ देऊन, पण पहिलेच महत्व कायम ठेऊन त्यांच्या पर्यन्त तो पोहोचवण्याची जबाबदारी आजच्या पालकांवरती आहे.    

      ऋतुचक्र आणि आपले हे उत्सव, व्रत वैकल्ये एकमेकांशी निगडीत आहेत. आषाढ शुद्ध एकादशी पासून कार्तिक शुद्ध एकादशी पर्यन्त पाळला जाणारा चातुर्मास. नियम पाळणे, धार्मिक पुजा-पाठ, पारायण करणे, उपासना करणे या बरोबरच उपवास धरणे. यात आपल्या दिनचर्येची ऋतूंशी सांगड घातलेली दिसते. आणि ओघानेच आपल्या आरोग्याशी पण. खर तर ही आपल्या ऋषीमुनींची आपल्याला देणगीच आहे. त्याची नीट व्यवहार्यता, उद्देश, त्यातलं वैद्यक शास्त्र हे पण आपण समजून घेतले पाहिजे. आपले उत्सव, जत्रा, सण, समारंभ, प्रवचने, कथा, कीर्तने यातून आपली कायिक, वाचिक आणि मानसिक प्रगती व्हावी हाच उद्देश आहे. म्हणूनच परंपरा पाळताना समजून उमजून पाळाव्यात.


तर असा हा इंद्रधनु ल्यायलेला ,ऋतु हिरवा ऋतु बरवा, मनभावन श्रावण, सणांचा महिना खूप काही शिकवण देणारा असतो यात शंका नाही.

 © डॉ. नयना कासखेडीकर,पुणे .

---------------------------------------

 

भाग ९ - अहिल्याबाईंचे महेश्वर

 

कर्तृत्वशालिनी अहिल्यादेवी

भाग ९  - अहिल्याबाईंचे महेश्वर

(जन्म-३१ मे १७२५-चौंडी,अहमदनगर, मृत्यू- १३ ऑगस्ट १७९५,इंदोर.)



मध्यप्रदेश मध्ये इंदूरपासून केवळ शहाण्णव किलोमिटर अंतरावर नर्मदेच्या तटावर वसलेले, महेश्वर म्हणजे होळकर राज्याची राजधानी. महेश्वर म्हणजे ‘भगवान शिवाचे घर’. महेश्वरचा किल्ला मुघल काळात बांधलेला होता, पण पेशव्यांकडून माळव्याची जहागिरी होळकरांना मिळाल्यानंतर मल्हाररावांनी किल्ल्यासकट वास्तु मंदिरे यांची डागडुजी करून नीट घडी बसवली. अहिल्याबाईनी पुढे आपल्या कारकिर्दीत १७६७ ते १७९५ या काळात महेश्वरचे रंग रूपच पालटले. महेश्वर एक संरक्षित शहर झाले. औरंगजेबाच्या काळात नष्ट केलेल्या हिंदू मंदिराचे अहिल्या बाईनी पुनर्निर्माण केले. इथे कालेश्वर, वृद्धकालेश्वर, केशव मंदिर, चतुर्भुजन मंदिर, बाणेश्वर, मातरगेश्वर,अशी काही मंदिरे दहाव्या शतकापासून अस्तित्वात होती.


सासरे मल्हारराव गेले, पुढे मुलगा मालेराव गेला. इंदूरच्या गादिला वारस नाही , बरोबर अनुभवी कोणी व्यक्ति नाही तरीही अहिल्याबाई डगमगल्या नाहीत. त्यानंतर माधवराव पेशवे यांनी अहिल्याबईना १७६७ साली अधिकृतपणे खासगी जहागिरीची अधिकारी बनवले. याच वेळी अहिल्याबाईनी आपली राजधानी इंदूरहून महेश्वर येथे हलवली. पुढचे सर्व आयुष्य त्यांनी महेश्वर या राजधानीतच घालविले.   

अहिल्याबाई यांनी खूप विचार विनिमय करून महेश्वर राजधानी म्हणून निवडले होते. याचे प्राचीन नाव महिष्मती. वायुपुराणातले महेश्वरपूर. नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले एक सुंदर धार्मिक आणि व्यापरिक दृष्टीने महत्वपूर्ण शहर म्हणजे महेश्वर. इथल्या जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार, प्रासाद, घाट यांची निर्मिती अहिल्याबईनी केली. इथला अहिल्या घाट म्हणजे सर्वात सुंदर असा घाट आहे. चारही दिशांना शिवाची लहान मोठी मंदिरे आहेत. ठिक ठिकाणी शिवलिंगे आहेत. याच्या पार्श्वभूमीवर होळकर राजवंशाची ऐतिहासिक खूण म्हणून असलेला महेश्वर किल्ला अहिल्याबाई होळकर घराण्याच्या कर्तृत्वाची साक्ष म्हणून दिमाखात उभा आहे.


या सर्वांवर अहिल्याबाईंचे बारकाईने लक्ष असे. आपले राजधानीचे शहर व त्यात राहणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी धर्मशाळ, नदीवर घाट, मंदिरे, रस्ते , पिण्याच्या पाण्यासाठी सोय म्हणून विहिरी व तलाव बांधले, तीर्थक्षेत्र च्या ठिकाणी प्रवासी, गोरगरीब, अपंग असहाय लोकांसाठी अन्नछत्र सुरू केले. त्यांना राहण्याची सोय केली.


                                 

त्यांचे आर्थिक नियोजन सुद्धा असे. आपल्या राज्यातल्या व्यापार वृद्धीसाठी अहिल्याबाई नेहमीच प्रोत्साहन देत असत. राज्याबाहेरच्या व्यापाऱ्याना सहाय्य म्हणून आपल्या राज्यात त्या व्यापारासाठी बोलावत. एकदा म्हैसूर राज्यात दुष्काळ पडला असताना हजारो जन मृत्युमुखी पडले. त्यातील शेंकडो विणकरांना अहिल्याबाईनी महेश्वर ला आणून जिवदान दिले, रोजगार दिल. आर्थिक सहाय्य केले. राहायला घरे दिली. माहेश्वरच्या किल्ल्यात हातमाग सुरू करून त्यात त्यांना कामावर ठेवले. त्या हातमागावर विणलेल्या साड्या लवकरच उद्योगाच्या मुख्य प्रवाहात आल्या. प्रगती झाली.

महेश्वर ला आल्यावर महेश्वर किल्ल्यात त्यांनी विणकरांसाठी स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध करून दिली. तिथल्या सावकार व व्यापारी मंडळीना आदितवर व मंगळवार पेठची निर्मिती केली. विणकर लोकांचा व्यवसाय उभा राहीला. या विणकरांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी विणलेले वस्त्र मोठ्या प्रमाणावर अहिल्याबाई स्वत: खरेदी करत. त्या स्वतासाठी तसेच त्यांच्याकडे येणाऱ्या नतेवाईकांसाठी, घराण्यातील महिलांसाठी, पाहुणे मंडळींसाठी वा कुणी अचानक आलेल्या अतिथिना भेट म्हणून देण्यासाठी त्या खरेदी करत असत. हस्त कौशल्याच्या या महेश्वरी साड्यांची कीर्ती भारताबाहेर आहे. महेश्वर किल्ल्याच्या आत राजराजेशवर मंदिराच्या पुढे रेवा सोसायटी ही हातमाग करणाऱ्यांची संस्था म्हणून आज हस्त शिलपीचे काम उभे केले आहे. अहिल्याबाईनी दुष्काळाच्या काळात वेगवेगळ्या राज्यातल्या हैदराबाद, सूरत म्हैसूर इथल्या हातमाग कारागिराना महेश्वरला बोलावून काम दिले. त्यामुळे विणकरांची ही कारागिरी टिकली, कला टिकली, कारागीर टिकले. अजूनही हे काम महेश्वर येथे सुरू आहे.

रेवा सोसायटी हातमाग 

पाचव्या शतकापासून महेश्वर हे हातमागावरील वस्त्रासाठी विणकरांचे केंद्र होतेच. १९६४ साली अहिल्याबाईनी या वस्त्रोद्योगाला नवी ओळख दिली. नव्या सुविधा देऊन कर्नाटक, माळवा, गुजराथ, हैदराबाद येथून विणकरांना महेश्वरला बोलवून काम सुरू केले. सूती आणि सिल्क धाग्यानी जरी काठाच्या, विविध नक्षिच्या साड्या ही माहेश्वरची कायमची ओळख बनली. इथल्या इतिहासाची ओळख म्हणून अहिल्याबाईनी या साड्यांवर तिथल्या स्थापत्य कलेची नक्षी काढावी असे सांगितले होते. हीच खरी महेश्वरी साड्यांची ओळख आहे. पण अहिल्याबाईनी केलेल्या दूरदर्शी नियोजनामुळे आजही हे काम महेश्वर येथे सुरू आहे.

त्याच प्रमाणे छोटे छोटे ग्रामोद्योग सुद्धा निर्माण केले. त्यामुळे छोट्या व्यापऱ्याना बाजारपेठ मिळाली. त्यांचे जीवनमान सुधारले. यात काम करणारे सर्वच जाती धर्माचे कलाकार, विणकर, कारागीर कलात्मक वस्तु तयार करून विकू लागले. बांबू च्या वस्तु सुद्धा कारागीर उत्साहाने करू लागले. शेती साठी लागणाऱ्या वस्तु पण कारागीर तयार करत होते. सामाजिक विकासा बरोबरच आर्थिक विकासाची घडी नीट बसत होती.


                                                         

माळवा प्रांतात गोंड भिल्ल यांचा उपद्रव त्या काळात वाढत चालला होता . यात्रेकरू व्यापारी प्रवासी आणि प्रजेच्या लुटमारीच्या अनेक तक्रारी रोज येऊ लागल्या. दरोडे घालणे, रस्ते अडविणे, लूटमार चारही दिशांना सुरू होते, याला आळा घालण्यासाठी अहिल्याबाईनी युक्ति लढवली. आणि एक महत्वाची घोषणा केली. “जो कोणी आपल्या भागातील डाकू आणि चोर यांचे पारीपत्य करेल त्याच्या बरोबर माझी एकुलति एक मुलगी मुक्ता चा विवाह लावून देण्यात येईल”. आणि खरंच काय आश्चर्य यशवंतराव फणसे याने हा विडा उचलला आणि डाकू व चोरांचा बंदोबस्त केला. त्यामुळे अहिल्यादेवींनी खरचच दोघांचा विवाह लावून दिला. यशवंत फणसे त्यांचा जावई झाला. पुढे अहिल्याबाईंनी गोंड, भिल्ल यांना अभय देऊन त्यांना शेती, व्यापार आणि तीर्थयात्री यांचे रक्षण करण्याचे महत्वाचे काम सोपवले. उपजीविकेचे साधन नसल्याने. या जमाती असे कृत्य करत होत्या. दूषप्रवृत्तीचे परिवर्तन सत्प्रवृत्ती मध्ये झाले. हे एक समाज कल्याणच होते.

भारतातील विविध भागातील ब्राह्मण, विद्वान, ज्योतिष शास्त्री ,वेदशास्त्री, कीर्तनकार, कलाकार, विविध कारागीर यांना अहिल्याबईनी महेश्वरला बोलावून घेऊन तिथेच आश्रय दिला. सर्वाना काम दिले. यात आर्थिक घडी तर बसवलीच पण धार्मिक कृतीला महत्व देऊन हिंदू धर्माची पताका सतत फडफडत ठेवली. महेश्वरला राजधानी हलवण्यापूर्वीचे महेश्वर आणि नंतरचे महेश्वर यात आमूलाग्र बदल झाला. तो अहिल्याबाईंच्या अनेक निर्णयामुळेच. त्यांच्या ३२ वर्षांच्या कारकिर्दीत कधीच दुष्काळ पडला नाही कारण त्यांनी आर्थिक विकासाची घडीच तशी बसवली होती.अत्यंत धोरणाने. आदर्श राज्यकर्ता कसा असावा, त्याने काय व कसे काम करावे हे सर्व त्यांनी एका ग्रंथात लिहून ठेवले आहे ही मार्गदर्शक तत्वे त्यांनी धर्मशास्त्र विद्वानांकडून अहल्या कामधेनु हा आठ अध्यायांचा ग्रंथ लिहून त्यात सांगितली आहेत. राजाची कर्तव्ये काय हे त्यात सांगितले आहे. याचा अभ्यास आताच्या राज्यकर्त्या लोकानी नक्कीच करायला हवा. कारण ते अनुभवाचे बोल आहेत.

                 

मुक्ता व यशवंत राव फणसे यांची छत्री ,स्मारक 

  मुलगी मुक्ता व जावई फणसे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मरणार्थ आजच्या फणसे घाटावर एक छत्री तयार केली ही अहिल्याबाईनी केलेली शेवटची वास्तु निर्मिती. माहेश्वर नगरच्या गल्ल्या गल्ल्यात ,घराघरात, घाटांवर, किल्ल्यामध्ये, किल्ल्याबाहेर, बाजारपेठेत, मंदिरात, देवी अहिल्या प्रत्येकात स्मरणात आहेत. प्रत्येकाच्या तोंडी त्यांचेच नाव आहे. त्यांच्या बद्दल आदर आहे, त्या आपल्या कर्तृत्वाने तिथे अमर झाल्या आहेत. त्यांच्या सर्व आठवणी तिथले लोक आजही आत्मियतेने जपताना दिसतात.आज महेश्वर च्या ऐतिहासिक जागी अहिल्याबाईंच्या स्मरणार्थ भव्य छत्री यशवंत राव होळकर यांनी बांधून इतिहास पुढच्या पिढीसाठी साक्षात समोर ठेवला आहे.

लेखन- डॉ. नयना कासखेडीकर,पुणे

----------------------------------------------      

 

भाग ८ - अहिल्याबाईंचे माहेर

 

कर्तृत्वशालिनी अहिल्यादेवी

भाग ८  - अहिल्याबाईंचे माहेर

 (जन्म-३१ मे १७२५-चौंडी,अहमदनगर, मृत्यू- १३ ऑगस्ट १७९५,इंदोर.)



चौंडी हे गाव २०२४-२५ या वर्षात शेकडो वर्षानंतर इतिहास जगविणारे तीर्थस्थळ म्हणून प्रसिद्ध झाले. वर्षभर या गावात आदराने नाव घेणारे, अहिल्याबाईंची कामाची दखल घेणारे, त्यांना मानवंदना देणारे, या जन्मस्थळाला भेट देऊन त्यांच्या स्मृति जागवणारे, राजकीय दृष्ट्या स्मृतिस्थळ आणि विकास यांचा लेखाजोखा मांडून या चौंडीचा विचार करणारे अशा हजारो नागरिकांनी भेट दिली. नाहीतर या आधी महेश्वर, इंदोर या माळव्यातील गावांशी अहिल्यादेवींचे नाव जोडले होते. गेली अनेक वर्षेच काय वर्तमानातही लोकाना चौंडी माहिती नव्हते. आज अनेक महिला अभिवादन कार्यक्रमानिमित्त मात्र चौंडीला आल्या होत्या.प्रत्येकीच्या मनात कुतूहल होतं. काहीजणी तर अहिल्याबाई हे नाव आजच ऐकत होत्या. काहीना अहिल्याबाईनी एव्हढे काम केले आहे. ते कशा काळात, कशा परिस्थितीत ? याची आपल्याला आजच माहिती मिळते याचे आश्चर्य वाटत होते. खंत वाटत होती.

भारतभर हे वर्ष अहिल्यादेवींचे त्रिजन्मशताब्दी साजरे होत असताना मलाही याच दिवशी चौंडीला भेट देण्याचा योग आला. अहिल्यादेवी यांचे माहेर अर्थात जन्मगाव चौंडी. निजाम राजवटीमध्ये औरंगाबाद सुभ्यातल्या बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात चौंडी गाव होते. अहमद निजामाच्या ताब्यात हे नगर होते त्यामुळे अहमदनगर असे त्याच्या नावानेच ओळखले जात होते.प्रदीर्घ काळ येथे दख्खनी मुस्लिम राजवट होती. मात्र स्वातंत्र्यानंतर ते निजामाचे राज्य जाऊन जामखेड तालुका अहमदनगर जिल्ह्यात आले. आणि आता या अहमदनगरला अहिल्याबाईंच्या माहेराला चौंडी च्या कन्येचा मान व आदर म्हणून अहिल्यानगर अशी ओळख मिळाली आहे आणि ही रास्तच आहे. अहिल्यादेवींचे चरित्र वाचल्यावर चौंडीला भेट दिल्यावर जाज्वल्य इतिहासाची साक्ष पटून अहिल्यादेवींचे कर्तृत्व आणि तो काळ आपल्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहतो.

चौंडी हे शहर आजच्या अहिल्यानगर पासून ८५ किलोमीटरवर तर, जामखेड पासून ३५ किलोमीटर वर वसलेले गाव. चौंडी च्य दक्षिणेला दक्षिण वाहिनी सीना नदी वाहते. अहिल्या बाईंचे वडील माणकोजी शिंदे (गावचे पाटील) यांचे हे गाव. याचे सुरुवातीच्या काळातले नाव मल्हारपीठ होते असेही सांगतात. सुशीलाबाई आणि माणकोजी शिंदे यांच्या पोटी जन्मलेले कन्यारत्न म्हणजे अहिल्या, जीने हिंदुस्तानात तब्बल २८ वर्षे तत्वाने, ज्ञानाने आणि न्यायाने आदर्श असे राज्य करून लोककल्याणकारी माता, पुण्यश्लोक राजमाता म्हणून जगभरात कीर्ती मिळवली.

माणकोजी शिंदे यांची गढी आज त्याच डौलात उभी आहे. जशी च्या तशी . अहिल्यादेवी यांच्या जन्म स्थळी चौंडी या गावी त्यांच्या कारकीर्दीचा इतिहास सांगणारी शिल्पसृष्टी उभी केली आहे. अहिल्येसह त्यांचे दोन भाऊ शहाजी आणि महादजी,तसेच आई सुशीलाबाई व वडील माणकोजी शिंदे यांची शिल्पे आपल्याशी बोलून जणू इतिहास सांगताहेत असेच वाटते. अहिल्येच्या जन्माने पावन झालेली खोली, व त्या बाहेर मल्हारराव होळकर, हरिहर बुक्क चंद्रगुप्त मौर्य यांची शिल्पे आहेत. लाकडी माळवदाचा चिरेबंदी पण ऐश्वर्यसंपन्न वाडा, माची, बुरूज, संरक्षक कठडे या सहित उभा आहे.इथे लक्षात येते की मल्हारराव होळकर अहिल्येचे सासरे असले तरी या तिच्या माहेरी सुद्धा त्यांच्या कर्तृत्वाचे तेव्हढेच महत्व होते.

अहिल्याबाईंनी विकासाच्या यादीत आपल्या या जन्मगावालाही स्थान दिले आहे. त्यांनी २५० वर्षांपूर्वी इथल्या छोट्याशा सीना नदीवर रेखीव घाट बांधला होता तो अजूनही आपली ओळख कायम ठेऊन आहे. घाटावरच शिंदे आणि पाटलांच्या समाधी आहेत. शिलालेख आहेत. येथे चौंडेश्वरी ग्रामदेवता आणि महादेवाचे मंदिर आहे. याच मंदिरात ३०० वर्षापूर्वी छोटी अहिल्या वडील माणकोजी शिंदे यांच्या बरोबर महादेवाच्या पूजेला आली असताना पेशवे व मल्हारराव यांनी तिला पाहून होळकर घराण्याची सून म्हणून निश्चिती केली होती.

अहिल्याबाईंनी देशभरात मंदिरे घाट आणि बारव बांधल्या, त्यातलीच एक चौंडी पासून ८ किलोमिटर अंतरावर जवळा शिवारात शके १७०८ (उत्तरायण ,वैशाख शुद्ध शके १७०८ )मध्ये बारव बांधली होती. येथे असलेल्या शिलालेखात या पुरातन ऐतिहासिक बारव निर्माणचा उल्लेख आहे.५० बाय ५० फूट आकाराची चौकोनी बारव आतून अष्टकोनी आहे. यात मोटेने पाणी काढण्यासाठी सोय, खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत.आत नंदकेश्वर शिवलिंग आहे. पाऊस पडला नाही तर याच बारवेत नंदकेश्वराची पूजा करून प्रार्थना केली जाते, ही परंपरा अजूनही सुरू आहे. बारवेच्या पश्चिमेला भैरवनाथाचे हेमाडपंथी मंदिर आहे, येथे दरवर्षी चैत्र अष्टमीला उत्सव साजरा केला जातो.

अलीकडे सीना नदीचे जलसंधारण कामात रुंदीकरण करण्यात आले. अहिल्यादेवींनी इथल्या मंदिरांचा पण जिर्णोद्धार केला होता. शेतकरी, कारागीर यांना अहिल्यादेवींनी माळवा प्रांतात जसे बळ दिले होते, त्या प्रमाणे इथल्या आताच्या परिस्थितीत इथला सांस्कृतिक विकास ,महेश्वर प्रमाणे कापड उद्योगास चालना जुने उत्सव व परंपरा यांनाही चालना मिळावी अशी रास्त अपेक्षा जनतेची आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी काळात ऐतिहासिक गावातील शाळांचा विकास करण्याकरता,महाराष्ट्र शासनाने निधी मंजूर केला त्यात चौंडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचा समावेश आहे.

अशा या लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव चौंडी येथे आता तीन एकर जागेत स्मृती स्तंभ बांधले आहे,मंदिराचा जिर्णोधार् करून त्यांच्या महेश्वर दरबाराची आठवण जागविणारी प्रतिकृति उभी केली आहे. अहिल्येच्या जन्मवेळच्या प्रसववेणा अनुभवलेला हा वाडा स्तब्ध तरी अभिमानाने आपल्याला साद घालतो. अशी ही अहिल्येच्या माहेरची वाट एकदा तरी जाऊन अनुभवावी .

© ले. डॉ. नयना कासखेडीकर, पुणे

------------------------------

भाग ७ - 'युद्धवीरांचा देव आणि अहिल्याबाई'

 

कर्तृत्वशालिनी अहिल्यादेवी

भाग ७  - 'युद्धवीरांचा देव आणि अहिल्याबाई'

 (जन्म-३१ मे १७२५-चौंडी,अहमदनगर, मृत्यू- १३ ऑगस्ट १७९५,इंदोर.)

                             

ही आहे होळकर राज्याची राज्यमुद्रा. द्वितीय तुकोजिराव होळकर यांच्या करकीर्दी पासून हा राज्याचा शिक्का म्हणून वापरण्यात येऊ लागला. या चिन्हामध्ये वर छत्री (राजछत्र) सूर्य, नंदी, घोडा, मध्यभागी भाला आणि रुंद पातीची तलवार,तर खाली गहू आणि अफुची रोपे अशी प्रतीके आहेत. होळकर घराण्यातील राजे शैवपंथी होते आणि खंडोबाचे उपासक होते. वीरपुरुष खंडोबाला शिवावतार मानतात.त्याने मल्लांचे  निर्दालन केले म्हणून त्याला मल्लारी असेही म्हणतात. पुढे त्याचेच मल्हारी झाले. दुसरे नाव मार्तंड (सूर्याचे नाव) आहे. असे हे मल्हारी मार्तंड महाराष्ट्राचे कुलदैवत आहे . तसेच होळकर घराण्याचेही कुलदैवत होते.  पुरातन काळापासून भारताची दक्षिण काशी असलेल्या जेजूरीचा हा मल्हारी मार्तंड शंकराचा अवतार समाजाला जातो. १३ व्या शतकात जेजूरी गड बांधल्याचा पुरावा तिथल्या शिलालेखात आढळतो.

 खंडोबाभक्त मल्हारराव होळकरांनी माळव्याची सुभेदारी मिळाल्यानंतर या गडाचे जीर्णोद्धाराचे काम केले. पोर्तुगीजांवर विजय मिळवून त्यांच्याकडून हस्तगत केलेल्या घंटा, मल्हाररावांनी जेजूरीच्या खंडोबाला  दान केल्या. रंगमहाल, बालद्वारी, नगारखाना, दिपमाळा, वेशी, दगडी कमानी बांधले. पुढे धर्मनिष्ठ, दानशूर अहिल्याबाईंनी देशभरातल्या तीर्थस्थानी अनेक विकासकामे केली. त्याचप्रमाणे जेजूरी नगरीची जडण घडण केली. अहिल्यादेवी जेजूरीच्या विकासाच्या शिल्पकार समजल्या जातात. त्यांनी ऐतिहासिक होळकर तलाव, चिंचेची बाग, चिलावती कुंड, या वास्तूंची निर्मिती केली .१७७० मध्ये त्यांनी जेजूरी गडाला किल्ले सदृश तटबंदी बांधली. मंदिरासमोर दिपमाळा, अष्टकोनी टेहळणी बुरूज आहे. होळकर कुटुंबाने जेजूरी च्या खंडोबा देवस्थान साठी मुक्त हस्ताने दान केले आहे. धर्मसत्ता व राजसत्ता यांचा सुरेख समन्वय अहिल्यादेवी यांनी साधला आहे.   

बारा ज्योतिर्लिंग, सप्तपुरी, चारधाम आणि विविध पंथ आणि संप्रदाय या संगळ्यांसाठीच अहिल्याबाईनी विविध देणग्या देऊन सोयी व सुधारणा केल्या. तशा श्रीक्षेत्र जेजूरी येथे श्री मालखर गौतमेश्वर तालीमखाना, सरकारी वाद (दत्त पादुका व विहीर आहे) विठ्ठल राखुमाईचे मंदिर, किल्ला, श्री जनईचे कुरण, बाग, इमानी जमीन, मल्हार तलाव यांच्या व्यवस्था निर्माण केल्या. सगळयाना समान न्यायाने दान दिले.निरनिराळ्या तऱ्हेची मदत केली.

परकीयांच्या आक्रमणा आधी सर्व हिंदू राजे आपापल्या प्रांतातील तीर्थक्षेत्रांची काळजी घेत असत. त्यामुळे तीर्थक्षेत्रे ,विद्या संपन्न घराणे टिकून होते. परकीय आक्रमणानंतर हिंदू राज्येच विलयाला गेली. शेकडो वर्षे अशीच परिस्थिति राहिली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील लोककल्याणची आणि हिंदू संस्कृतीची संपन्न परंपरा पुन्हा अहिल्याबईनी भरतखंडात सुरू केली. होळकरांच्या राज्यात मंदीरे, धर्मशाळा, घाट ,जीर्णोद्धार यांची कामे, दुष्काळ किंवा सुकाळ असला तरी सतत सुरू राहत असत.त्यामुळेच भारत देशातील कारागीरांना सतत काम असे म्हणून ही कारागिरी व कौशल्य टिकून राहिलेले दिसते. विविध वास्तु व मंदिरांचे स्थापत्य शास्त्राचे नमुने सतत निर्माण होत राहिले. शिल्पकला टिकली व वाढीस लागली. अहिल्याबाईंचे तत्व  होते की, देवळांचा जीर्णोद्धार करणे म्हणजे आपयशाच्या खुणा धुवून टाकणे . त्यांची श्रद्धा अशी होती की हे राज्य आपण शंकराच्या आज्ञे वरुन चालवीत आहोत. म्हणून त्यांच्या पत्राच्या खाली सुद्धा त्यांची सही -- शंकर आज्ञेवरुन असे लिहीत. शंकरभक्त अहिल्यादेवी यांनी मृत्यूसमयी  ॐ नम: शिवाय ! हाच शब्द उच्चरला होता आणि अखेरच्या यात्रेला निघाल्या होत्या.

महाराष्ट्रातले हे खंडोबा कुल दैवत परंपरा होळकर घराण्याने इंदूरला नेली. हाच मराठी संस्कृतीचा माळव्यात प्रवेश होता. इंदोरच्या राजवाड्यात मल्हारी मार्तंडचे मंदिर आणि पूजा स्थान तयार केले गेले. आजही हे दैवत या राजवाड्यात विराजमान आहे. 

ले. डॉ. नयना कासखेडीकर,पुणे

----------------------------------------------

Sunday, 12 January 2025

कर्तृत्वशलिनी अहिल्यादेवी भाग ६ - 'दानशूर अहिल्याबाई'

 

कर्तृत्वशलिनी अहिल्यादेवी

भाग ६ - 'दानशूर अहिल्याबाई'

(जन्म-३१ मे १७२५-चौंडी,अहमदनगर, मृत्यू- १३ ऑगस्ट १७९५,इंदोर.)


अहिल्याबाईंनी राज्यकारभार हातात घेतल्यापासून म्हणजे इ. स. १७६७ ते १७९५ हा काळ संक्रमण अवस्थेचा होता.मुघली कारभाराची पद्धती विकृत झाली होती असा उल्लेख इतिहासात आहे. त्यामुळे मुघली करभाराला तोंड द्यायचे आणि आपली राज्यव्यवस्था अंमलात आणून ती वाढवायची व टिकवायची अशी दुहेरी जबाबदारी, त्या काळातील सुभेदारांवर पडली होती. पेशव्यांच्या बरोबर राहून मल्हारराव सुद्धा ही कामगिरी चोख करत होते. प्रांतात नवा जम बसवून त्यांनी तो अहिल्याबाईंच्या हाती सुपूर्द केला होता. अहिल्याबाईंनी तर आपल्या कामाने यावर कळसच चढवला.अहिल्याबाईंची कारकीर्द हा होळकर राजवटीचा सुवर्णकाळ होता असे म्हटले जाते.

‘ऐकावे जनाचे, करावे मनाचे’असा अहिल्याबाईंचा बाणा होता.राज्य कारभाराच्या अनुभवाप्रमाणेच मोठमोठाले ग्रंथ वाचून त्यावर चिंतन मनन सुद्धा असेलच.अभ्यास असेल. कारण त्यांच्या संग्रही असलेले ग्रंथ पाहिले की आपल्या धर्माबाबत त्या कशा उदार व विधायक वृत्तीच्या होत्या, धर्म आणि संस्कृती टिकविण्यात त्यांचा कसा सहभाग होता हे पटते, देवीचा संग्रह, रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी पोथी, गीता, अणू वेदान्त, विष्णुसहस्त्र नाम, अमरकोष, पद्मपुराण, भागवत, सूर्यनमस्कार, श्रीसप्तशतीपाठ, श्री गणपती सहस्त्रनाम, श्री तुळशी प्रदक्षिणा,श्री अश्वत्थ प्रदक्षिणा, श्री अध्यात्म रामायण आणि इतर महत्वाचे ग्रंथ ही हस्तलिखिते त्यांच्या संग्रही होती.त्यांचं मोठं ग्रंथालय च होतं. होळकर राजघराणे हे सर्व सम आदराने करत असत. म्हणून संस्थानाबाहेर सुद्धा या क्षेत्रांचा आणि देवादिकांचा विचार होत असे.

राष्ट्राच्या म्हणजे प्रजाजनांच्या हिताचे निर्णय विशेषता आर्थिक सोय त्या आवर्जून करत. म्हणूनच त्या दानशूर धर्मकारिणी ठरल्या आहेत. इस्लामिक शासकांच्या काळात धुळीस मिळालेली अनेक हिंदू मंदिरे अहिल्याबाईंनी पुनःस्थापित केली. मुस्लिम आपली देवळे पाडतात तो त्यांचा धर्मांधपणा झाला,पण ही भग्न देवालये आपण नीट नाही केली तर आपली अस्मिता ती काय राहील? ती जपण्यासाठी देवालयांचा उद्धार करून मुस्लिमांना अनेक ठिकाणी समजाऊन सांगितले की बादशहाच्या रक्षणाची जबाबदारी मराठ्यांनी घेतली आहे ,भाईचारा ठेवा, मी तुम्हास मशीद ही बांधून देते पण तुम्ही देवळांचा विध्वंस करू नका.दानधर्म करताना त्या भेदभाव करत नसत. श्रावणात फकीरांना सुद्धा सढळ हाताने दान देत आणि सांगत, “आम्ही आपल्या दर्ग्यास वर्षासने देतो, मंदिरांचा नाश करणाऱ्या आपल्या भावांना सांगा, धर्म वैर करायला शिकवीत नाही”. धर्म म्हणजे सन्मार्गावर ठेवणारे एक सूत्र. धर्म वैर करायला शिकवीत नाही ,बंधुभाव सांगतो. असे अहिल्याबाईंचे म्हणणे होते.

केवळ महेश्वरलाच ७० ते ८० मंदिरे जीर्णोद्धार केली व काही नवीन बांधली. महेश्वरच्या किल्ल्यावर वेदशास्त्र संपन्न पुजारी, याज्ञिकी, शास्त्री, महंत, कीर्तनकार, ज्योतिष शास्त्री अशांची किल्ल्यावर वस्ती करून त्यांची ही सोय लावली. नुसते देऊळ बांधून उपयोग नाही त्याकरता त्यानंतर त्याची पूजा, अर्चना व इतर व्यवस्था पण त्यांनी लावली होती.

प्रवास करणाऱ्या पांथस्थ ब्राह्मणाला धर्मकार्य म्हणून अन्नदान केलेच पाहिजे त्यासाठी अहिल्याबाईंनी वर्षभराची सोय म्हणून व्यवस्था लावली. नर्मदा परिक्रमा करणाऱ्याना चिखलदा येथे अन्न छत्र सुरू केले. अहिल्याबाई नेहमी म्हणत की, “स्नानाने देहशुद्धी होते, ध्यानाने मनशुद्धी होते आणि दानाने धनशुद्धी होते”. त्याग आणि सेवा तसेच दानधर्म याला आपल्या संस्कृतीत फार महत्व आहे. अहिल्याबाईंचे सारे जीवन, त्याग आणि सेवा यासाठीच खर्ची झालेले दिसते.त्याग आणि सेवा म्हणजे ईश्वर भक्ती च त्या मानत असत.विशेष म्हणजे अहिल्याबईनी खाजगी संपत्ति चा वापर अनेक देवळे आणि घाट बांधायला खर्च केलेली दिसते. त्याचा गाजावाजा व प्रसिद्धी न करता दानधर्म केला आहे. तसेच खाजगी खर्चासाठी सरकारी तिजोरीतिल पैसा वापरणे हा त्या गुन्हा समजत. माणसातलं माणूसपण सदैव वाढत राहावं यासाठी त्यांनी मंदिरे , पूजा अर्चना याचे महत्व जाणले होते.मंदिरात तेल वाती ची व्यवस्था अशा बारीक गोष्टींचा विचार त्या करत. 

काशी विश्वेश्वरच्या मंदिराचा जीर्णोद्धार ,मनकर्णिका घाट, दशाश्वमेध घाट . चित्रकूटला श्रीरामाचे मंदिर बांधून रामपंचयातन ची स्थापना केली.जेजूरीचे मल्हार गौतमेश्वर मंदिर, परळीत वैजनाथ मंदिराचा जीर्णोद्धार, वेरूळ च्या घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार,गजनीच्या महंमदाने तोडफोड केलेले सोमनाथ चे मंदिर पुनः बांधले. मूर्तीची स्थापना केली. याशिवाय हृषीकेश,सुलपेशवर, सांगमणेर, नाशिक, दिंडोरी(निफाड), संबळ. श्री शैल्य,मंडलेश्वर, भुसावळ, गया, पंढरपूर, पुष्कर,चौंडी ,बद्रीनारायण ,गंगोत्री,अयोध्या, आलमपुर,उज्जैन, ओंकार मांधाता ,इथे मंदिरे बांधली. देवलयांची गरज त्यांनी ओळखली होती. प्रजेमध्ये सदाचार निर्माण करणं या हेतूने खाजगी पैशानेच देवळे, अन्नछत्रे, विहिरी, धर्मशाळा, अनाथ आश्रम , घाट, पाणपोया, कुंड बांधून घेतल्या . ती कायम स्वरूपी चालू राहतील अशी आर्थिक व्यवस्था केली.पूजाऱ्याला उपजीविके साठी काही गावे धर्मादाय दिली. प्रेमाने आणि धर्मशक्तीने अहिल्याबाईनी भारतातील सर्व प्रांतांना जिंकले होते. हिंदू संस्कृतीच्या जीर्णोद्धार कार्यात अहिल्यादेवी होळकर यांचे योगदान खूप मोठे आहे. त्या भगवान शंकराच्या निस्सीम भक्त होत्या. आपले राज्य त्यांनी शिवार्पण करूनच राज्य कारभार केला होता.त्यांच्या दरबारी आदेशावर ‘श्रीशंकर आज्ञेवरुन’ अशी राजमुद्रा दिसते.

कवी माधव जूलियन म्हणतात,

कुणी काय बांधिले

स्थळे शोधूनी निसर्ग सुंदर रम्य मंदिरे घाट कुणी |

वा पडशाळा बांधून केले येते जाते लोक ऋणी ||

पुनरुद्धारे नवी पाहता किती मंदिरे भग्न जुनी |

धन्यवाद आसेतू हिमाचल मिळती कोणाला अजुनी ?

अन्नछत्रही विद्याभिक्षुक यात्रिक यास्तव करून सुरू |

संसृतीचिंतेतून सोडविले विद्याध्यापक धर्मगुरू?

जिच्या व्यक्तिगत उत्पन्नातून वाहे दानाची सरिता ,

ती गंगाजल निर्मल राणी कोण जिचा नच कोश रिता?

भोगपरान्मुख होय परी न घे कर्तव्याचा संन्यास |

निदिध्यास घे सदा शिवाचा योग कठीण हा अन्यास ||

राजयोग जनकाचा नाही भाकड गोष्ट पुराणीची |

रहस्य डावी इतिहासाची कथा अहिल्या राणीची ||

कांचनगंगा वाहवूनी जी उभवी यशाचा धवलगिरी |

होळकरकुलप्रभा ,कोण हो ततस्मृतिला न धारील शिरी?



--ले. डॉ. नयना कासखेडीकर

-----------------------------------------

कर्तृत्वशलिनी अहिल्यादेवी भाग ५ – धैर्यशील अहिल्यादेवी

 

कर्तृत्वशलिनी अहिल्यादेवी

भाग ५ – धैर्यशील अहिल्यादेवी

(जन्म-३१ मे १७२५-चौंडी,अहमदनगर, मृत्यू- १३ ऑगस्ट १७९५,इंदोर.)


बाजीराव पेशवे यांच्या बरोबर लढाईहून परतत असताना सैन्याचा तळ चौंडी गावात सीना नदीच्या काठी मुक्कामी होता. नदीकाठी असलेल्या महादेवाच्या देवळात छोटी अहिल्या देवदर्शनाला आली होती. नदीकाठी मैत्रिणींबरोबर ती वाळूत शिवलिंग तयार करत होती. तेव्हढ्यात सैन्याचा घोडा उधळला आणि मैत्रिणी ओरडून पाळल्या पण अहिल्या पिंडीचे रक्षण करत तशीच उभी राहिली होती आणि घोडा तिच्या बाजूने उधळून निघून गेला . मल्हारराव व बाजीराव हे पाहताच धावत आले आणि बाजीराव अहिल्येला रागवून म्हणाले, “इथे का थांबलीस पोरी? घोडा तुला तुडवून गेला असता तर? त्यावर धीट अहिल्या म्हणाली, “जे आपण घडवावे ते प्रसंगी जीव सांडूनही रक्षण करावे असेच वडिलधारी माणसे सांगतात , तेच मी केले, मी घडवलेल्या पिंडीचे मीच रक्षण केले. माझे काही चुकले का?” तिचे हे बाणेदार उत्तर ऐकून बाजीराव पेशवे म्हणाले, "मल्हारराव, हिला तुमची सून करा , तिला राज्याच्या लायक करा .ती राज्य नावारूपाला आणेल. राज्यकारभाराच्या अनेक पदराचं हिला शिक्षण द्या" आणि खरच लग्नानंतर अहिल्येचे असे सर्वच शिक्षण सुरू झाले. अहिल्या सर्वच विषयात प्रगती करत होती. वाचन आणि अभ्यासा बरोबरच हिशोब बघणे, वसूली जमा खर्च तपासणे, न्यायनिवाडे करणे, सरदारांना पत्रे पाठवणे, आणि मुख्य म्हणजे फौजा तयार ठेवणे, गोळाबारूद, बाण भाते, ढाल तलवारी सज्ज ठेवणे, ही कामे ती करत असे. सासरे बुवा मल्हारराव कौतुकाने म्हणत, “आम्ही तलवार गाजवतो, ती सुनबाईंच्या भरोशावर” विशेष म्हणजे अहिल्याबाई, पती खंडेरावांना पण रणविद्या शिकण्यास प्रोत्साहित करत असत. खंडेरावला यात रस नसे. त्यामुळे लग्नानंतर अवघ्या दहा वर्षांच्या काळात, अहिल्याबाई दिवसें दिवस जास्तच समर्थ होत गेल्या.

मल्हारराव सतत लढाया करण्यात गुंतलेले असत तेंव्हा, ते असतील तिथून पत्रे पाठवून अहिल्येला सल्ला देत, कामे करायला संगत. अहिल्या मल्हाररावांबरोबर रणांगणावर सुद्धा जात होत्या. अहिल्या आपल्या अनुपस्थितीत कारभार पहाते म्हणजे आपणच पाहतो असा खूप विश्वास वाटे त्यांना. त्यांचा पत्र संवाद फार छान आहे. ते म्हणतात, "अहिल्येस आशीर्वाद! तुम्ही इंदोरला आहात , सात हजार फौजेच्या तयारीत असावे, जंबुरा, तोफा, गाडे यात कुचराई नको, शागिर्दाप्रती वर्तन दयाळू ठेवावे.प्रजेकडुन रुपये येतात त्यांच्या सुखसोयी नेटक्या कराव्यात”.

त्याला अहिलेने पाठवलेले उत्तर- “तीर्थरुप वडिलांप्रति साष्टांग दंडवत. आशीर्वाद असू द्यावा, चुकभुल तर होणे आहेच, एकशे वीस जंबुर तोफा आणि बारूद पक्की सहा मण, सोबत तेज गोलंदाज, रोज दिडीने, पण निशाणी पक्की, आम्ही परीक्षा करून घेतली आहे. भरणा वसूल नेटका चालू आहे. आपल्या तलवारीस यशच आहे. आपल्या हुकूमाप्रमाणे शिकस्त करते". – आपली आज्ञाधारक - सौ.अहिल्या.”

१७५४ च्या कुंभेरीच्या लढाईत तर मल्हारराव, खंडेराव आणि अख्खे कुटुंबच अजमेर येथे गेले होते. तिथे सुद्धा अहिल्याबाई पहाटे उठून पुजा करत, सर्वांना अंगारा लावून, मग मुदपाखान्यात लक्ष घालून, पुढे जखमींवर उपचार करून, शस्त्रांस्त्रांची व्यवस्था करवून घेऊन, दिवसभर तोफखाना सांभाळायचा अशी दीड महीना कामे केली. मात्र याच लढाईत अहिल्येच्या भाळी वैधव्य आले. खंडेराव मारला गेला. छातीवर दगड ठेऊन मल्हार रावांच्या मार्गदर्शनाखाली पुढची वाटचाल सुरू केली. आता पुढचे आयुष्य प्रजेसाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी घालवण्याचा 'पण' अहिल्याबाई यांनी केला.

पुढे अहिल्याबाईनी इंदोर मध्ये तोफांचा कारखाना उघडला . स्वत: जातीने त्यातील कामकाजाची धुरा सांभाळत . यातली युद्ध साहित्याची इत्थंभूत माहिती त्यांना होती.

पानिपतच्या युद्धात मल्हार रावांच्या हुकूमा प्रमाणे अहिल्या तोफखाना घेऊन ग्वाल्हेरला गेल्या होत्या. यात लाखो योद्धे मारले गेले. या युद्धाने खूप मोठे नुकसान झाले होते.पानिपतची रसद तुटली होती. अनेक सैनिक अन्न आणि पाणी, पाणी करत कोसळले होते. अहिल्या इंदोर ला येऊन राजवाड्यात असलेल्या जखमी लोकांना उपचार करू लागली. सेवा पथके उभारली. सगळ्यांना धीर देऊ लागली. वैद्यकीय उपचार सुरू केले, चुली पेटवून सर्वांना पोटभर खायला देत होती. हजारो लोक राबत होते. करुणेची प्रतिमा असलेली अहिल्या यावेळी जनतेची आई म्हणून सिद्ध झाली होती. ती आईच्या मायेची फुंकर युद्धात जखमी व असहाय्य झालेल्यांना घालत होती.

पानिपतच्या युद्धानंतर मल्हारराव सतत मोहिमांवर जाऊ लागले होते. पाच वर्षात उत्तरेकडील घडी त्यांनी नीट बसविली. या सुमारास अहिल्या इंदोरचा राज्य कारभार नीट सांभाळत होती. पानिपतच्या युद्धाच्या अनुभवावरुन लक्षात ठेऊन अहिल्याबाईंनी ठिकठिकाणी विहिरी खोदून घेतल्या जेणे करून सैन्याला युद्ध प्रसंगात कुठेही पाण्याची कमतरता भासणार नाही. दंगाफसादाच्या वेळी आश्रयस्थान हवे म्हणून धर्मशाळा बांधून घेतल्या . रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग याप्रमाणे अशा युद्ध समयी सुद्धा अहिल्याबाई न डगमगता , धैर्याने तोंड देत असत. पुढेही असेच अनेकदा प्रसंग आले, यातून निभावत, अनुभव घेत, शेवटच्या क्षणापर्यंत प्रजेसाठी दक्ष राहिल्या.

ले. डॉ. नयना देवेश्वर कासखेडीकर .


                                                            ------------------------------