Friday 28 November 2014

कुंचला ते राजकारण




कुंचला ते राजकारण




     १७ नोहेंबर हा स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन. जरा दोन वर्षे मागे जावून पाहिलं कि आठवतो, तो त्यांना अखेरचा निरोप देणारा प्रचंड जनसागर. एव्हढी लोकप्रियता का मिळाली होती त्यांना? याची अनेक उत्तरे आहेत. कारणे आहेत. त्यांचा स्वभाव, नेतृत्त्व, निर्भयता, कणखरपणा, तीव्र सामाजिक जाणीव, संवेदनशील मन आणि त्यांच्यातील व्यंगचित्रकार, अर्थात कला. बाळासाहेबांनी एका ठिकाणी म्हटलंय, “आमच्या हाती कुंचला नसता तर आज राजकारणात व समाजात आम्ही ज्या शिखरावर जावून पोहोचलो आहोत ते शिखर आम्हाला कधीच गाठता आले नसते”.
     

   लोकशाहीतले राज्यकर्तेच काय, हुकुमशहा सुद्धा व्यंगचित्रकारांना व त्यांच्या फटका-यांना घाबरतात आणि एखाद्या देशात किती स्वातंत्र्य आहे हे, त्या देशातील व्यंगचित्रकाराला किती स्वातंत्र्य आहे यावरून ठरवता येते. कलाकाराला आपली राजकीय मते आणि सामाजिक दृष्टीकोन व्यक्त करण्याचे व्यंगचित्र हे एक माध्यम असते. राजकीय व्यंगचित्रे म्हणजे खरं तर चित्ररूप संपादकीयच असते. राजकीय व्यंगचित्रात चित्रकाराने राजकीय, सामाजिक किंवा सांस्कृतिक भाष्य केलेले असते.ज्याला अग्रलेखाची भाषा समजत नाही त्याला ती व्यंगचित्रातून समजते. अशी चित्रे सामान्य लोकांशी सहज व सुरेल संवाद साधतात. राजकीय व्यंगचित्रांच्या प्रभावामुळे लोकमत तयार होत असते.

व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनीही त्यांच्या राजकीय व्यंगचित्रातून अनेक राजकारण्यांना थरथर कापायला लावले. मराठी माणसाच्या हितासाठी व हिंदुत्वाच्या प्रसारासाठी जवळ जवळ पाच दशके कर्तृत्वाची व वक्तृत्वाची तळपती तलवार हातात घेवून त्यांनी महाराष्ट्रात सत्ता असताना व नसतानाही राज्याच्या राजकारणावर सतत अंकुश ठेवला. सत्ताधा-यांच्या कृतीवर व्यंगोक्तीपूर्ण टिप्पणी करून भंबेरी उडविण्याची शक्ती त्यांच्या कुंचल्यात होती.
     

           संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, सीमा प्रश्न, गोवा मुक्तीसंग्राम, केंद्रातले राजकारण, आंतरराष्ट्रीय राजकारण, भारताचे परराष्ट्र धोरण, तर दुष्काळ, महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, गिरणी कामगारांचे प्रश्न, भारत पाकिस्तान, काश्मीर प्रश्न, आसाममधील घुसखोरी, अशा विषयावरची व्यंगचित्रांची भाषा सर्व सामान्य लोकांना भावात होती. राजकीय, सामाजिक, कला आणि क्रीडा या विषयावरील व्यंगचित्रातून त्यांचे फटका-यांचे आसूड रोज उमटत होते. त्यांच्या व्यंगचित्रात संपूर्ण घटना, घडलेले प्रसंग आणि अपेक्षित काय याचा लेखाजोखाच मांडलेला असे. सामान्यांच्या मनातले रोखठोक व सडेतोडपणे मत मांडणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. सामान्य जनतेची नाडी त्यांना गवसली होती. कारण त्यांचे संवेदनशील मन, घटनांचे बारकाईने निरीक्षण, जिज्ञासा, कलेचा ध्यास आणि रियाज.

बाळासाहेबांनी म्हटलंय, ‘राजकीय व्यंगचित्र काढायला पॉलीटिकल डेप्थ लागतेच. पण ड्राफ्ट्समनशीप, कल्पना व रेषा यांचे मिश्रण जेंव्हा होते, तेंव्हाच ते परिणामकारक व्यंगचित्र होते’.त्यांना खंत होती की, आजच्या राजकीय व्यंगचित्रकाराकडे राजकारण्यांच्या विचाराची खोलीच नाही. व्यंगचित्रातून आता प्रहारही होत नाहीत. कॅरीकेचरसंबंधी त्यांची अलीकडची अडचण अशी होती, की त्यासाठी लायक असा एकही चेहरा त्यांना योग्य वाटत नव्हता. सुरुवातीच्या काळात त्यांना अर्कचित्रासाठी असंख्य चेहरे सापडायचे, त्यांच्या मते, चांगला चेहरा कोणता, तर जो व्यंगचित्रकाराला स्फूर्ती देतो तो. वृत्तपत्र सृष्टीतला मार्मिकचा कालखंड हा व्यंगचित्रांचा काळ होता. आपण व्यंगचित्रकार झाल्याचे सारे श्रेय बाळासाहेबांनी प्रबोधनकार ठाकरे आणि बाबूराव पेंटर यांना दिले आहे.


    बाळासाहेब व्यंगचित्रांकडे सर्वप्रथम आकर्षित झाले ते, दुस-या महायुद्धाच्या काळात टाईम्स ऑफ इंडियातील बॅनबेरीच्या व्यंगचित्रांमुळे. त्या काळात वर्तमानपत्रात येणारे व्यंगचित्र ते रोज न्याहाळायचे. वडिलांनी ते पाहून एक दिवस विचारले, “ काय पाहतोस रे?चित्र? आवडली का?” बाळासाहेब म्हणाले, “हो”. वडिल म्हणाले,“ मग आजपासून पेन्सिलने काढायला लाग. मी संध्याकाळी आल्यावर पाहीन.” प्रबोधनकार स्वत: चित्रकार होते. त्यांच्या प्रोत्साहनाने व्यंगचित्र काढणे सुरु झाले. या क्षेत्रातले पहिले गुरु त्यांचे वडीलच होते. त्यानंतर दिनानाथ दलाल व डेव्हिड लो यांना त्यांनी गुरुस्थानी मानले होते. दलालंचे फटकारे डेव्हिड लोंच्या स्टाईलने असायचे. लो यांच्या व्यंगचित्रांची ताकद एव्हढी होती कि, लो यांच्या व्यंगचित्रांमुळे हुकुमशहा हिटलर सुद्धा हैराण झाला होता. लो यांना जिंदा या मुर्दा हजर करण्याचं फर्मान त्यानं काढलं होतं.

बाळासाहेब संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या काळात फ्रीप्रेस नवशक्तीत ‘मावळा’ या नावाने सहा ते सात साप्ताहिकांसाठी व्यंगचित्रे काढीत. इथेच त्यांची चित्रकला बहरली. पुढे व्यवस्थापन बदलले व व्यंगचित्रकारांवर सेन्सॉरशिप लागल्याने, त्यांना हि नोकरी सोडावी लागली आणि इथेच वृत्तपत्रसृष्टीत मार्मिकची एन्ट्री झाली. दिल्लीतल्या शंकर्स विकली सारखे राजकीय व्यंगचित्र साप्ताहिक, मराठीत काढण्याचा ध्यास बाळासाहेबांनी घेतला होता. मार्मिकचा जन्म झाला. १३ ऑगस्ट १९६० ला मार्मिक हे मराठी व्यंगचित्र साप्ताहिक वाचकांच्या सेवेत रुजू झालं. निराधार मराठी मनांना एक भक्कम आधार मिळाला. व्यंगचित्रांची लयलूट आणि विचारांचे सोने उधळणा-या मार्मिकने अल्पावधीतच लोकप्रियता गाठली. बाळ ठाकरे, द.पा.खांबेटे व श्रीकांत ठाकरे या त्रयींनी मराठी मनावर भुरळ घातली.

     बाळासाहेबांचं राजकीय भाष्य करणारं मुखपृष्ठावरील व्यंगचित्र ,रविवारची जत्रा, श्रीकांत ठाकरे यांची दोन व्यंगचित्रे, काही सदरे व खांबेटे यांचे विनोदी लेख याला वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला. मार्मिक हातात घेतल्यावर वाचक प्रथम बाळासाहेबांनी काढलेले मुखपृष्ठावरचे व्यंगचित्र न्याहाळीत, मगच मधली पाने पहात. चित्रातून केलेले भाष्य वाचून वाचकांची करमणूक व्हायची. पण रविवारची जत्रा मराठी वाचकांची प्रेरणा व्हायची. लढायचं बळ देणारी शक्ती व्हायची. मार्मिकमधले ज्वलंत विचार व मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी निर्भीडपणे केलेले लिखाण वाचून अस्वस्थ मराठी माणूस मार्मिकचे ऑफिस किंवा बाळासाहेबांचे घर गाठायचा. असे पुढे पुढे माणसांचे लोंढेच्या लोंढे धडकायचे. या गर्दीलाच एका क्षणाला १९ जून १९६६ या दिवशी आकार मिळाला आणि शिवसेना ही ओळख सुद्धा. असे हे मराठी माणसाची शक्ती दाखवणारे एक मोठे संघटन तयार झाले. त्याचा प्रवास कलेपासून सुरु होऊन राजकीय पक्षापर्यंत पोहोचला.


     मार्मिक लोकांचे मुखपत्र झाले. त्याने व्यंगचित्रांच्या विश्वात इतिहास घडविला. बाळासाहेबांच्या राजकीय कॅरीकेचर्सने धम्माल उडवली. बाळासाहेबांची संघटनेवर हुकुमत होती. राजकारणातही ते हुकुमत गाजवीत. पण, मार्मिकमध्ये व्यंगचित्रे काढणा-या चित्रकाराचे स्वातंत्र्य त्यांनी कधीही हिरावून घेतले नाही. ते जातिवंत कलासाधक होते. कलाकाराचे स्वातंत्र्य ते जाणून होते.


व्यंगचित्रकलेत त्यांचा आवडता विषय ‘कॅरीकेचर’. त्यांचे अनेक कॅरीकेचर मास्टरपीस ठरले आहेत. बाळासाहेबांची व्यंगचित्रे ‘न्यूयॉर्क टाईम्स’ व ‘असाही शिम्बून’ या जपानी दैनिकात प्रसिध्द झाली होती. इंग्लंडचे पंतप्रधान विस्टन चर्चिल यांच्या व्यंगचित्रात्मक चरित्रात सुद्धा बाळासाहेबांची व्यंगचित्रे छापली होती. निवडक व्यंगचित्रकारांच्या पुस्तकात एकमेव भारतीय व्यंगचित्रकार म्हणजे बाळासाहेब ठाकरे होते. व्यंगचित्रं हि लोकशाहीची अहिंसक भाषा, मार्मिकच्या माध्यमातून बाळासाहेबांनी महाराष्ट्राला शिकविली.


    आपल्या लोकांना आपलं राजकारण व आपले प्रश्न समजावून सांगितले पाहिजेत असे त्यांना वाटत होते. त्यामुळे व्यंगचित्रे केवळ वाचकाला समजून चालणार नाहीत, ते ज्यांच्यासाठी काढलंय त्यानाही समजले पाहिजे, असाही त्यांचा आग्रह असे. तसेच वाकड्या तिकड्या रेघा म्हणजे व्यंगचित्रे नव्हेत. व्यंगचित्रकाराला, ‘अॅनाटॉमी’ म्हणजे शरीररचनेचे भान असायला हवे. तो अभ्यास नसेल तर उत्तम व्यंगचित्रकार होऊ शकत नाही. या त्यांच्याच म्हणण्याचा अनुभव आपल्याला त्यांच्या फटका-यातून साकारलेल्या व्यंगचित्रातून येतो. एक कलाकार त्याच्या कुंचल्याच्या जोरावर एव्हढे मोठे सशक्त संघटन उभे करू शकतो, ही कला प्रांतातील कलाकाराला प्रेरणा देणारी एकमेवाद्वितीय घटना आहे.
                                                    (सर्व चित्रे 'फटकारे' या पुस्तकातून )

- डॉ.नयना कासखेडीकर.