Wednesday 15 March 2023

मुलखावेगळी ती -लेखमाला

 

मुलखावेगळी ती -

निर्मला थोरमोटे

   



सौंदर्य म्हणजे कायम आनंद ! निसर्गाचे सौंदर्य माणसासाठी नुसते नेत्रसुखासाठीच नाही तर मानसिक स्वास्थ्यासाठी ,शारीरिक स्वास्थ्यासाठी आणि मनशांती व आनंद मिळवण्यासाठी एक वरदान आहे. त्यामुळे पुढे भविष्यात हा निसर्ग अबाधित ठेवण्यासाठी ,तो वृद्धिंगत होण्यासाठी आणि तो सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकाने पर्यावरण संतुलित राखले पाहिजे. प्रदूषण रोखले पाहिजे, (नद्या, परिसर, नाले, ओढे, समुद्र व त्याचे किनारे, जंगले, शहरातील बागबगीचे, वाहनांचे धूर, प्लास्टिकचा वापर व कुठेही फेकून द्यायची सवय.) निसर्गाचं सौंदर्य वाढविणे हे आपल्या हातात आहे. त्यासाठी माणसाने जागे व्हायला हवे. एव्हढ्या मोठ्या लोकसंख्येला शासन एकटे किती पुरणार? त्यांना वेळीचं जागं करणं ही नैतिक वं सामाजिक जबाबदारी कुणी घ्यायला हवी. (पण कुणी? कारण शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात –ही वृत्ती) हे काम करताहेत निर्मलाताई थोरमोटे. स्वत:च्या सोसायटी पासून ते परिसरातील इतर सोसायट्या, बागा, टेकड्या,रस्ते, ट्रॅफिक, अशा विषयात निर्मला ताईंनी खूप वेगळं काम केलं आहे. ‘पर्यावरण वाचवा, जीव वाचवा’ हे म्हणायला सोप्पं आहे, पण लोकांच्या मनात हा विचार रुजविणे तेव्हढेच अवघड आहे.

आपल्याला एखाद्या पर्यटन स्थळी गेल्यावर जो निर्मल व खरा आनंद मिळतो तो तिथल्या वातावरणामुळे, स्वच्छ हवेमुळे. हे निर्माण करणं, केवळ आणि केवळ मनुष्याच्याच म्हणजे आपल्याच हातात आहे. प्रत्येकाने आपले घर आणि परिसर स्वच्छता करणं आणि शून्य कचरा व्यवस्थापन करणं हे कर्तव्य केलं पाहिजे. हे तुमचे कर्तव्य आहे असे लोकांच्या मनावर बिंबवले गेले पाहिजे. बापरे हे कसे शक्य आहे? कोण करणार हे काम? इथे कोणाला अशा कामासाठी फुरसत नाही. आणि काय अडलय लोकांना शिकवायचे? एव्हढी मोठी लोकसंख्या आणि पर्यावरण, शून्य कचरा व्यवस्थापन कोणाकोणा ला शिकवत बसणार? हा प्रश्न स्वाभाविक आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ‘निर्मलाताई थोरमोटे’. निर्मलाताईंनी पर्यावरण क्षेत्रात काम केल्याचे कळले होते ,तो विषय बोलता बोलता लक्षात आले की, त्या प्रत्यक्ष झाडे लावत नाहीत, की शून्य कचरा व्यवस्थापना मध्ये कचरा उचलत नाहीत. तर लोकांमध्ये जागृती निर्माण करून या गोष्टी टाळता येतील, लोक स्वत:, पुढे येऊन, समजून घेऊन, यात सहभागी होतील असा वरवर आपल्याला अवघड दिसणारा प्रयत्न त्या सहज करतात. असे अनेक उपक्रम त्यांनी राबविले आहेत.

पुणे शहरात गेल्या काही वर्षात कचरा निर्माण होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. ‘कचरामुक्त शहर’ किंवा ‘कचरामुक्त आपले गाव’ हे मोठे आव्हान सर्वांसमोरच आहे. कचर्‍याचे व्यवस्थापन करायला, एक मोठे व्यवस्थापन शासकीय पातळीवर काम करत आहे. निर्मला ताईंनी स्व नुभवातून रोटरी क्लब, इनरव्हिल क्लब,सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये आणि प्रत्यक्ष नागरिक यांन बरोबर घेऊन मोठ मोठे उपक्रम राबवले आहेत.

इनर व्हील क्लबचे काम करता असताना मनोरंजना कडे कधी ओढा नसायचा पण सामाजिक काम, लोकांना बरोबर घेऊन उपक्रम करणे यातच रस असलेल्या निर्मला ताई आपल्या संवाद कौशल्याचा उपयोग समाजोपयोगी कामासाठी करतात.

त्यांना हॉटेलिंग, मनोरंजन, गप्पा टप्पा ,पार्ट्या ,गॉसिपिंग अजिबात आवडत नाही. तोच वेळ चांगल्या क्रिएटिव्ह कामासाठी त्या देतात. त्यांचं काम वाढल्याने आणि त्याचा प्रसार आणखी वाढवण्यासाठी त्यांनी DO SAVE ही संस्था सुरू केली. DO SAVE यात व्यापक अर्थ दडला आहे. यातून त्या समाजाला पर्यावरण वाचवा, स्वच्छता ठेवा आरोग्य सांभाळा, शून्य कचरा व्यवस्थापन, रक्तदान करा जीव वाचवा, शून्य कचरा व्यवस्थापन, प्लॅस्टिक आणि सॅनिटरी वेस्ट मॅनेजमेंट, पर्यावरण पूरक गणपती विसर्जन, रस्ते सुरक्षा आणि वाहतुकीचे नियम पाळा, रस्त्यावर असताना अॅम्बुलन्स सायरन वाजत असताना तिला पुढे जायला जागा कशी द्यायची हे समजून घ्या म्हणजे पेशंटचा जीव वाचू शकतो ,नुसते अॅम्बुलन्स आली वाटतं म्हणून विचार करत बसू नका,जागा करून द्यायची चटकन कृती करा. नुसते पर्यावरण वाचवा हा इवेंट म्हणून झाडे लावू नका, लावलेली झाडे, कशी वाढवायची व जपायची इकडेही लक्षं द्या. अशीच त्यांच्या कामाची यादी विचार करायला लावणारी आहे नक्कीच.

ईलेक्ट्रोनिक इंजिनीअर असणार्‍या पण समाजक्षेत्रात अधिकार वाणीने वावरणार्‍या निर्मला ताई स्वत: रेग्युलर रक्तदात्या आहेत.

‘आपला परिसर कचरा मुक्त करूया’ म्हणून अभियान त्यांनी राबविलं. स्वतच्या कचर्‍याचं योग्य व्यवस्थापन करून वीज, पाणी वाचवून, रसायन वापर टाळून, छोट्या छोट्या गोष्टी अमलात आणून प्रत्येकाने आपले घर पर्यावरण पूरक हरित घर करावे असे आवाहन ‘हरित घर सप्ताहा’त त्यांनी केलं. त्या म्हणतात, “घरातला ओला कचरा घरातच जिरवा बाहेर टाकू नका. माझा कचरा ही माझी जबाबदारी आहे”. हे करण्यासाठी त्या म्हणतात, Refuse, Reduce, Reuse, Return, Recycle या 5 R वर भर द्या.

स्वच्छ परिसर, स्वच्छ शहर, स्वच्छ देश. ही महत्वाची स्लोगन खूप काही शकविते. नुसतं कचरा व्यवस्थापन केल की आरोग्याचा केव्हढा मोठा प्रश्न मार्ग लागतो. निर्मला ताई अनेक माध्यमातून प्रत्यक्ष संवाद साधून सांगत आहेत की, कचऱ्याचे वर्गीकरण करा.

“तुमचा ओला कचरा तुम्ही स्वतःच जिरवा.

एक चौ.फूट मात्र इतक्या जागेत तुम्ही हे करू शकता.

प्लास्टिक कचरा (स्वच्छ आणि कोरडा) वेगळा करा आणि पुनर्प्रक्रियेसाठी पाठवा.

थर्माकोलचा वापर पूर्णपणे बंद करा.

इतरही कोरडा कचरा जमेल तितका वेगळा करा.

हे सगळं स्वतः करा आणि इतरांनाही सांगा.

पर्यावरण वाचवा...जीव वाचवा!”

स्वच्छता सर्वेक्षण 2022-23 च्या त्या ब्रॅंड अॅम्बेसिडर, धनकवडी- सहकार नगर वॉर्ड,म्हणून निवड , लातूर च्या येळम मित्र संस्थेने त्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविले, स्वच्छ पुणे च्या उपक्रमात असलेल्या योगदाना बद्दल पुणे महानगर पालिकेने पण गौरविले, सामाजिक कामासाठी अचिव्हर अवॉर्ड . शांतीदूत परिवाराकडून ‘शांतीदूत जीवनदाता पुरस्कार’ ,लातूर च कोरोंना योद्धा पुरस्कार अशा त्यांच्या कामाची दखल अनेकांनी घेतली आहे.

- ले – डॉ. नयना कासखेडीकर

----------------------------------------

मुलखावेगळी ती-लेख माला

 

मुलखावेगळी ती

सौ. मृदुल गणेश पाठक

  

 सामाजिक मूल्य कुटुंबात रुजलेले असले आणि समाजाप्रती संवेदनशीलता असेल तर पूर्ण कुटुंबच आपल संपूर्ण आयुष्य समाजासाठी देतो. घरात लहानपणापासून हे सामाजिक संस्कार मुलांवर झालेली कुटुंबं फार वेगळी असतात. आपल्या वडिलांच्या समाज सेवेचा वारसा आणि भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या संस्कारात वं सहवासात समाज सेवेचा घेतलेला वसा, पुढच्या पिढीपर्यंत नेणारी मुलखावेगळी ती- मृदुल ताई .दीनदयाल शोध संस्थान मध्ये पूर्ण वेळ काम केलेल्या शिक्षण, महिला सबलीकरण आणि ग्रामविकास याच कामाला वाहून घेतलेल्या मृदुल ताई, अनेक अडचणी आल्या पण १९७८ पासून आज पर्यन्त सतत ४५ वर्षे अविरत सामाजिक काम करणार्‍या समाजशिल्पी आहेत, विद्यार्थी दशेतच सामाजिक कामाची आस असणार्‍या मृदुल भांगेनी शिक्षण झाल्यावर विवेकानंद केंद्राचं काम करण्याचं मनाशी ठरवलं होतं. आणि लग्न केलचं तर सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या आणि हुंडा न घेणार्‍या मुलाशीच करायचं असा पण केलेल्या मृदुलाताईना जोडीदार पण तसाच मिळाला. त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांनी हा सामाजिक कामाचा पटच उलगडून दाखवला ,अत्यंत आनंदाने आणि समाधानाने अजूनही काम करत असलेल्या मृदुल ताईंना, समाजाला आपला उपयोग झाला याचा आणि नानाजी देशमुख या थोर व्यक्तीबरोबर काम करण्याचे भाग्य लाभले याचा अभिमान आहे.    

त्यांनी कामाची सुरुवात कशी झाली हे सांगताना म्हणतात,  “वडील संघ स्वयंसेवक असल्याने सतत प्रचारक आणि कार्यकर्त्यांचे घरी येणे जाणे असे.संघ कार्यकर्ते विश्वनाथ लिमये नेहमी येत असत. ते सतत विचारात असत शिक्षणांतर काय ? मीही विचार केला की लग्न केंव्हातरी होणारच आहे आणि नाही झालं तरी तेच आयुष्यच ध्येय नाही आपल्या ,लग्न नाही झालं तर, राष्ट्र सेविका समितीचे काम आयुष्यभर करू एव्हढ मोठ काम आहे. ते करायचं हा विचार मनात पक्का झाला होता. मग हळू हळू गोंदिया च्या आजूबाजूच्या परिसरात समितीच्या शाखा सुरू करून त्याचं काम वाढवत गेले, आजही या शाखा सुरू आहेत याचा अभिमान वाटतो.  याच सुमारास नागपूरला दीनदयाल शोध संस्थान चे बालजगत चे काम सुरू झाले होते आणि ओळखीच्या काकूंनी हे स्थळ सांगितलं होतं. नानाजी देशमुख यांच्या बरोबर काम करतोय मुलगा हिलाही सामाजिक कामाची आवड आहे तर हे स्थळ पहावे. नानाजी देशमुखच मला बघायला आले होते. त्यांनी तेंव्हाच सांगितलं की लग्नानंतर तुला गोंदियाला शाळा सुरू करायची आहे. नानाजींची कल्पना अशी होती की परिवाराने प्रचारक म्हणून काम करावं. दिन दयाल संस्थेमध्ये समाजशिल्पी ही संकल्पना राबवली जायची.    

मा. नानाजी देशमुख यांच्या बरोबर काम करणार्‍या कार्यकर्ता गणेश पाठक यांच्याशी नानाजींच्या आशीर्वादाने लग्न झालं. समाजशिल्पी परिवारात मृदुलताई सामील झाल्या. सुरुवातिच्या कामाबद्दल त्या सांगतात, “ नानाजींची कल्पना अशी होती की परिवाराने प्रचारक म्हणून काम करावं. दिन दयाल संस्थेमध्ये समाजशिल्पी ही संकल्पना राबवली जायची. नानाजींनी राजकारणातून संन्यास घेऊन, मे ७८ मध्ये या सामाजिक कामाची सुरुवात केली होती.त्या पहिल्या दिवसापासून माझे पती नानाजीं बरोबर काम करत होते. मी लग्नानंतर गोंदिया तून गोंडा प्रकल्पात काम करायला गेले.वाहनाची सोय नाही. आजूबाजूच्या १५ गावातून फिरून काम सुरु केले. ३६ मुलांपासून शाळा सुरू केली.शिक्षण त्या भागातील लोकांना नवीनच होते. शिवाय मुलींना शिकवतात हेच माहिती नव्हते. अशा लोकांसाठी त्यांच्या मुलांमुलीसाठी हे काम होते. त्यांचा विकास हेच उद्दीष्ट.शाळांमधून राष्ट्रीय शिक्षण ही कल्पना नानाजींची होती. गोरखपुरला त्यांच्या कल्पनेतले पहिले शिशुमंदिर साकार झाले”.

 गोंडा प्रकल्पाच्या शैक्षणिक कामा साठी मला B.Ed करावं लागलं. आणि अयोध्या युनीवर्सिटीतून नवीनच सुरू झालेले एज्युकेशन मध्ये MA पण केलं.त्या काळात वीज कनेक्शन असून लाइट नसायचे ग्रामीण भागात. दिवसा फक्त शेतकर्‍यांसाठी लाइट यायचे. त्यामुळे अभ्यासासाठी रात्री कंदील किंवा लॅम्प वापरावा लागे . तिकडे स्त्रियांना घुंघट घालावे लागायचे ,अगदी महिलाना महिलांसमोर सुद्धा घुंघट घेऊनच बोलायला लागायचे. सतत संवाद साधून हे कमी झाले.भजनाचा ग्रुप करून त्यांना एकत्र आणायला सुरुवात केली. मी मुख्याध्यापिका असल्याने शाळेत जेंव्हा मुली यायला लागल्या, तेंव्हा त्यांची फी (१० रुपये फक्त,) भरायला वडिलांच्या ऐवजी आईनेच यावे असा आग्रह केल्याने, त्या महिला शाळेत यायला लागल्या. त्यातून त्यांचे दर महिन्याला एकत्रीकरण, खेळ ,प्रार्थना असे उपक्रम सुरू झाले. एक समितीच सुरू झाली. या निमित्ताने त्या महिला घराबाहेर पडू लागल्या. या केंद्रात मा. रज्जु भैय्या, उषा काकू, प्रमिलताई आणि अनेक मान्यवर कार्यकर्ते भेट द्यायला यायचे त्यांच्याशी संपर्क होत असे. सहवास होत असे. नानाजी बरोबरच काम होत असे त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हीही घडत होतो. त्या वेळी माहिती नव्हतं की हे एव्हढे मोठे आहेत. ज्यावेळी त्यांना भारतरत्न मिळालं त्या कार्यक्रमाला आम्ही दिल्लीला गेलो त्यावेळी नानाजी किती मोठे व्यक्तिमत्व होते ते जाणवलं. कारण ते इतके साधे होते आणि आपल्यातलेच एक वाटत . अभिमान वाटला, अशा व्यक्तीचा सहवास आणि मार्गदर्शन आपल्याला जीवनातली नऊ वर्षे लाभले आहे.”

त्यानंतर बीड मध्ये काम सुरू करायचे होते. डोंगरी मध्ये साखर कारखान्यातल्या कामगारांच्या मुलांसाठी . ते काम आम्ही बघाव असे ठरलं. नानाजींच काम प्रत्येक गावाप्रमाणे, शहरं प्रमाणे, तिथल्या गरजा ओळखून योजलेले असायचे . मागसलेले गाव असेल त्याप्रमाणे तशी योजना ठरायची. गोंडा, नागपुर, बीड याठिकाणी काम उभा केलं, चित्रकूटला व्यवस्थित प्लॅन करून यशस्वी प्रयोग झाला. मग पुढे पुढे आधी १०० गावं नंतर ५०० गावं दत्तक घेऊन प्रत्येक ५ गावांमागे एक समाजशिल्पी परिवार कामाला लागला होता. तसे आवाहनच केले होते प्रत्येक परिवाराने आपल्या जीवनातला काही काळ समाजासाठी द्यावा. नानाजींची सौंदर्य दृष्टी खूप महत्वाची होती. अनेक गोष्टी त्यातून शिकायला मिळाल्या . जरी सामाजिक काम करत असलो तरी ते इतके व्यवस्थित हवे नीट नेटके हवे की कोणालाही तिथे यावेसे वाटले पाहिजे.

 महिलांसाठी छोटे छोटे कुटीरोद्योग आणि कलेच्या माध्यमातून त्यांना व्यवसाय सुरू करून देणे त्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण देणे आणि बाजारपेठ उपलब्ध करून देणे.जेणे करून महिला स्वतच्या पायावर उभ्या राहतील. हे काम खूप चांगलं उभं झालाय, त्यासाठी आधी महिलांसाठी कला वर्ग घेतले. शिवण क्लास घेतले. अनेक प्रकार शिकविले , बॅग, बाळंतविडे, ड्रेसेस. हँड एम्ब्रोयडरीला तर खूप मागणी आहे. ब्युटिपार्लर, बटाटा चिप्स मशीन्स, लेदर बॅग,कापड तयार करणे, शेवया बनविणे, असे उपयुक्त काम सुरू आहे. नोकरी करणार्‍या महिलांसाठी बाळांची सोय म्हणून पाळणाघर आणि बालवाडी सुरू केली. बीड भागात जशा गरजा होत्या तसे काम उभे केले. आदर्श शैक्षणिक मॉडेल तयार करायचे आणि लोकांना द्यायचे.  विद्यार्थ्याला दहावीनंतर व्यवसाय प्रशिक्षण द्यायचे ज्यामुळे नंतर त्याला नोकरी नाही मिळाली तरी तो काही उद्योग चालू करू शकेल.

गोंडा प्रकल्पात काम सुरू केल्यानंतर इतक्या वर्षांनी तिथे चार पाच वर्षापूर्वी जाण्याचा योग आला तो संस्कार भारतीच्या कार्यकर्त्यांनी नानाजी देशमुख यांच्या जन्म शताब्दी वर्षा निमित्त सगळ्या जुन्या कार्यकर्त्यांचा स्नेह संमेलन ठेवलं होतं. त्या 5 दिवसात आम्ही ज्यावेळी 90, 91 पर्यन्त गोंडा ला काम करत होतो त्यावेळी जेव्हढे विद्यार्थी शिकत होते, त्यांना आम्ही आलो असे कळताच,त्या सगळ्यांनी दिवसभराचे सकाळी, दूध, नाश्ता, जेवण, दुपारचं चहा, नाश्ता, रात्रीचे जेवण आणि रात्री दूध असे सात वेळांचे प्रत्येकाकडे वेळापत्रक ठरवून आम्हाला आग्रहाने नेलं. आज आता त्यांची मुले त्या शाळेत शिकत आहेत, प्रगती करत आहेत. असं समाधानकारक बदललेलं चित्र पाहायला मिळालं.  

 बीड ला वेगळ्या प्रकारे काम करावे लागले. खूप निरक्षर महिला होत्या. त्यांना आधी साक्षर करून निदान थोडे वाचता येईल असे शिकवून मग इतर प्रशिक्षण द्यावे लागले. त्यासाठी आम्ही छोट्या लायब्ररी सुरू केल्या, छोट्या गोष्टी शिकवून वाचायला लावून त्या सांगणे स्वत:च आपल्या विकासात पुढाकार घेऊन केले तर लवकर प्रगती होते.मागे वळून पाहताना समाधान वाटतं की आपण आपल्याला नेमून दिलेल्या कामाला न्याय दिला आहे.”  

  आता पूर्ण वेळ काम थांबवावे असा विचार केलेल्या मृदुला ताई काम पुन्हा कसं सुरू झालं ते सांगतात, “ २०१३ आम्ही आता या कामातून थांबायचे ठरवले.कारण पूर्ण वेळ आम्ही दोघांनी संस्था म्हणेल तसा व तिथे वेळ दिला होता.पुढे काय करावं हे ठरवलं नव्हतं .वर्ध्याला गेलो. तिथे खेळघर सुरू केलं. लहान मुलांना दिशा देणे हाच आमचा उद्देश होता. आम्ही एक गाव पण दत्तक घेतलं होतं पण कौटुंबिक कारणाने २०१८ ला पुण्याला शिफ्ट व्हावं लागलं. लॉक डाउन सुरू झालं . या काळात संस्कृत भारतीचा कोविद कोर्स केलं अभ्यास केलं. अहमदाबाद च्या एका युनिव्हर्सिटी साठी एक पुस्तक लिहिण्याचा योग आला. नंतर एकनाथजी रानडे यांच्यावरील मराठी पुस्तकाचा हिन्दी अनुवाद केला आहे”.

“सध्या राष्ट्र सेविका समितीने पश्चिम महाराष्ट्रचे सेवा विभागाचे दायित्व दिले आहे . तळेगावला मा. ताई आपटे यांच्या नावाने मोठी वास्तु बांधली आहे तिथले प्रकल्प सुरू आहेत, त्याचे उदघाटन नानाजी यांनीच  केलेले आहे. पुन्हा नानाजींच्या प्रकल्पात मी सामील झाले आहे .

संघटन तर करायचेच पण जोडलेल्या लोकांना काम करण्यास प्रवृत्त पण करायचे हे महत्वाचे आहे. माझ्या मुली पण लग्नानंतर स्वेच्छेने कामात आहेत, समितीचा काम करतात. मुलीची मुलगी माझी नात समितीशी जोडली आहे आणि माझी आई पण समितीचं काम करते अशा आम्ही चार पिढ्या या कामात आहोत . नानाजींचे म्हणणे होते संपूर्ण परिवार कामात हवा, समाजशिल्पी परिवार !                                  

 अनेक अडचणीं ना तोंड देत काम करावं लागत पण अडचणी आपण कुटुंबात काम करतो तेंव्हाही असतातच , त्या सोडवतच आपण पुढे जात असतो, तसच या कामात सुद्धा अडचणी सोडवत पुढे जायचं”.अशा मृदुल ताई पाठक प्रामाणिक पणे समाज कार्य करणार्‍या मुलखावेगळ्या कार्यकर्त्या आहेत.(ही मुलाखत विश्व संवाद केंद्र,आणि इतर पोर्टल्स वर प्रसिद्ध झाली)

-      -  डॉ नयना कासखेडीकर

-       ----------------------------   

Friday 10 March 2023

मुलखावेगळी ती...

 

 मुलखावेगळी ती...

मृण्मयी परळीकर 

      एखाद्या हिर्‍याला पैलू पाडल्यावर तो अधिक चमकू लागतो किंवा तो अधिक तेजस्वी होतो. असेच हिरे प्रत्येकाच्या कुटुंबात मुलांच्या रूपाने असतात. त्यांना अन्न, वस्त्र, निवारा पालकांच्या छत्राखाली मिळतच असतो. पण त्याही पेक्षा त्यांच्या आयुष्याला चांगले वळण देण्याची गरज असते. धैर्यवान, सामर्थ्यवान, निरोगी, नीतीमूल्ये आणि सामाजिक मूल्यांचे भान असणारी मुले घडविणे पालकांचे कर्तव्य असते. कुटुंबा बरोबरच शाळांमधून, महाविद्यालयातून आणि समाजात घडणार्‍य चांगल्या गोष्टीतून मुलांवर संस्कार होत असतात. अशाच वातावरणात घडलेली युवती स्वत: पुरता विचार न करता देश पातळीवर विचार करू लागते. आजची हि मुलूखावेगळं काम करणारी, आई आणि वडिलांनी सामाजिक संस्कारांनी घडविलेली मृण्मयी परळीकर ,साप्ताहिक विवेकच्या पाठ्यवृत्तीसाठी 370 कलम रद्द केल्यानंतरचा बदललेला कश्मीर अभ्यासण्यासाठी धाडस दाखविणारी मृण्मयी.

तिच्याशी बोलल्यावर, दोनच वर्षापूर्वी पोस्ट ग्रॅजुएट होऊन बाहेर पडलेली राज्यशास्त्राची विद्यार्थिनी, असा देशपातळीवरचा, तोही एकेकाळी धगधगत्या असलेल्या, आजही अशांत असलेल्या कश्मीर बद्दल विचार करते याचे कौतुक वाटले.

                                 

कश्मीर सारख्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या भारतातल्या नंदनवनाचा आम्ही आमच्या पातळीवर फक्त पर्यटन म्हणून विचार करतो. कारण कश्मीर कळत्या वयापासूनच सिनेमांमध्ये पाहिलेलं असत, तेंव्हा पासून हा प्रदेश बघायची सुप्त ओढ सर्वांनाच असते.हि इच्छा वेगवेगळ्या टुर्स बरोबर जाऊन पूर्ण करूनही घेत असतो आपण, पण यातल्या किती जणांना कश्मीरमधल्या निसर्ग सोडून असलेल्या परिस्थिति बद्दल ची जाणीव असते? ट्रीप, खरेदी, फोटोसेशन, मौज मजा ,तिथल्या खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेणं झालं की, टूरचं इतिकर्तव्य समाप्त. परंतु मृण्मयी ला नियंत्रण रेषेला लागून असलेल्या पाकिस्तान पासून ६ किलोमिटर वर असलेल्या ‘मच्छल’ एरियात जवानांना आणि लोकांना प्रेरणा देत उभा असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ,कारगिल चे जवानांचे स्मृति स्थळ आणि सर्वात मोठा भारताचा तिरंगा बॉर्डरवर फडकताना पाहिला की तरुण मृण्मयी नतमस्तक होते. जवानांचे बलिदान बघून अश्रु ओघळू लागतात. हे बघत असताना मनात ज्या राष्ट्रीय भावना आलेल्या असतात त्यामुळे कश्मीर मध्ये जाऊनही गुलमर्ग वगैरे ठिकाणी जाऊन वेगळे निसर्ग सौंदर्य बघायला जायची मृण्मयीला गरज वाटत नाही. म्हणून ती आपल्या पेक्षा वेगळी आहे.
  

                                

मृण्मयी ज्ञानप्रबोधिनित शिकली. तिने पुण्याच्या सर परशुराम भाऊ महाविद्यालयात राज्यशात्र घेऊन २०२०ला मास्टर डिग्री घेतली आणि Teach for india साठी टिचिंग फेलो आणि फेलो अडव्हायजर म्हणून काम करते. Tree Foundation साठी पण २०१८ साली छत्तीसगड मध्ये जाऊन प्रोजेक्ट केलं. (Transformation through Research, Education & Empowerment) अरुणाचल प्रदेशात जाऊन काम केलं. आणि ३७० कलम रद्द झाल्यानंतरचा कश्मीर प्रदेश त्या नंतर ३ वर्षानी काय बदलला आहे. कसा बदलला आहे हे जाणून घेण्यासाठी कश्मीर दौर्‍यावर गेली. सद्द स्थिति काय हे जाणून घ्यायला तिने तिथल्या आठवडाभराच्या वास्तव्यात विविध स्तरांतील व्यावसायिक, शेतकरी, कारागीर, युवक, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, विद्यार्थी, महिला, राजकारणी, सरपंच, शरणागत अतिरेकी, लष्करी अधिकारी ते या केंद्रशासित प्रदेशाच्या नायब राज्यपालांपर्यंत अनेकांच्या भेटी घेतल्या. गप्पा मारल्या. वेगवेगळ्या प्रश्नांमधून त्यांच्या मनातल्या भावना, सल समजून घेण्याचा प्रयत्न केला.

भारतीय राज्यघटनेतील काश्मीर बद्दलची जी कलमं आहेत ३७० आणि ३५ अ, जी जम्मू कश्मीरला स्वायत्तता आणि विशेष दर्जा देणारी होती ती एकत्र कधीच रद्द होऊ शकणारी नाहीत आणि जर रद्द झालीच तर अनेक गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असे गंभीर चित्र उभे केले गेले होते. पण खरच ही कलमं रद्द होऊन तीन वर्षे झाली मग आता काय झालं असेल कश्मीर मध्ये ? असा स्वाभाविक प्रश्न मृण्मयीला पडला आणि तिने या अभ्यासासाठी जाण्याचे ठरवले. कारण देशात घडणार्‍या घटना घडामोडींचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम ती अनुभवत होती. या कलमांमुळे भारतापेक्षा कश्मीर ची घटना वेगळी, ध्वज वेगळा, सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण आणि दळण वळण बाबी सोडल्या तर कश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे हे लोकांच्या मनाशी आणि हृदयाशी न भिडता फक्त कागदावरच राहिला. मृण्मयी ज्या तरुणांना भेटली त्यांनाही, “ही कलमं म्हणजे आमची अस्मिता आहे आमची ओळख आहे ती आम्ही गमावून बसलो आहोत असे वाटते” अशा भावना व्यक्त केल्या. याचाच फायदा घेऊन पाकिस्तान आणि इतर काही देशांनी कश्मीर सतत अशांत राहील असे प्रयत्न केले.

पण रिसर्च करणारा एक तरुण म्हणाला, इथल्या सतत सक्रिय असणार्‍या अतिरेकी संघटना, त्यांना असलेला पाकिस्तानचा पाठिंबा आणि दीर्घ काल कुठलीही ठोस कृती, कार्यक्रम नसल्याने तरुण वर्ग अतिरेकी कारवायांकडे आकर्षित झाला आहे. लहान मुलांना सुद्धा गन चालवून बघण्याचे आकर्षण आहे. ही अॅक्टिविस्ट तरुण मुलं सधन कुटुंबातली आहेत, कुणाला कलेक्टर व्हावसं वाटतय, कुणाला देशासाठी सैन्यात जावेसे वाटतेय, ती चांगल्या संधीच्या शोधात आहेत” असे आशादायक चित्र मृण्मयी ने अनुभवले.

मच्छल मध्ये मराठा रेजिमेंट काम करते तिथे शिवरायांचा पुतळा तर आहेच. पण, तिथे शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. मच्छल मेला भरतो, लष्कराचं ढोल लेझीम पथक आहे. सीमा सुरक्षा या मुख्य कामा पलीकडे जाऊन, सर्व काश्मिरी लोकांना देशाच्या प्रवाहात आणण्यांचे जिवापाड प्रयत्न लष्कराचे जवान करतात. कलमं रद्द झाल्यानंतर आणखी एक बदल झाला की, आत्ता पर्यन्त अस्तित्वात नसलेले पक्के रस्ते तिथे बांधले गेले. दळण वळणाची साधने निर्माण झाली.


                                
                   स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित मुलांच्या हातात तिरंगा आणि मनात देशभक्ति

मृण्मयी म्हणते, कश्मीर मध्ये शिक्षणाचा अभाव नाही, तर राष्ट्रीय शिक्षणाचा अभाव आहे. प्रेरणा देणारी व्यक्तिमत्वे चंद्र शेखर आझाद ,स्वामी विवेकानंद, राणा प्रताप यांची चरित्रच तिथे माहिती नाहीत. त्यामुळे असे आदर्शच डोळ्यासमोर नाहीत मुलांच्या. तिथे घडणार्‍य अतिरेकी कारवायांबद्दल तरुणांच्या मनात चीड आहे.

मृण्मयी जेंव्हा तिथल्या राज्यपालांना भेटते तेंव्हा “ही कलमं रद्द होणं आवश्यकच होतं. ती रद्द झाल्यामुळे राष्ट्राच्या मुख्य धारेत, मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदत होते आहे. इथे लागू नसलेले जवळजवळ १८० कायदे थेट लागू झाले. त्यासाठी कोणतीही वेगळी प्रक्रिया करावी लागली नाही. पुढेही करावी लागणार नाही.

विकासासाठी, समृद्धीसाठी शांतता आवश्यक असते. इथे सतत दहशतीचं वातावरण. शांततेशिवाय प्रगती साधणार कशी? ३७०, ३५ अ रद्द झाल्यामुळे इथे शांतता नांदू शकेल. आता काश्मिरी वेगळा न राहता भारताचा, या राष्ट्राचा, नागरिक म्हणून ओळख बळकट होईल आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी ते पूरक ठरेल.” असे कश्मीर च्या परिस्थितीचे आश्वासक बोल तिला ऐकायला मिळतात आणि राज्यपाल म्हणून नियुक्ती झाल्यावर तिथे राबवत असलेल्या अनेक योजनांची यादीच तिला ऐकायला मिळते. हीच तिथल्या बदलांची नांदी आहे असे मृण्मयी म्हणते.

शेती, शिक्षण, उद्योजकता, सामाजिक विकास, कायदेप्रक्रिया, अंतर्गत व सीमा सुरक्षा, पर्यटन, कला, क्रीडा, खाद्य, संस्कृती, ऊर्जा, तंत्रज्ञान, महिला सक्षमीकरण, या सर्वच क्षेत्रांत सकारात्मक बदलांना सुरुवात झाली आहे .

निसर्ग सौंदर्याने नटलेले,भारतातले नंदनवन असलेले कश्मीर!

दैदीप्यमान इतिहास लाभलेले कश्मीर!

सिंधु, झेलम, चिनाब सारख्या नद्यांनी समृद्ध असलेले कश्मीर !

कवी कल्हणच्या राजतरंगिणी खंडात ,महाभारतात, हडप्पा सारख्या प्राचीन अवशेषात हजारो वर्षांचा इतिहास सांगणारी, कश्यप ऋषींची ओळखली जाणारी ही भूमी, अशी दु:खी का?

सुवासिक अत्तरे तयार होणार्‍या या भूमीला दहशतवादी कृत्यांचा वास का?

लहान मुले आणि तरुणाईला बंदुका हाताळण्याचे आकर्षण का?

शत्रुपासून देशाचं रक्षण करणार्‍या, आपली सगळी स्वप्न बाजूला सारून आलेल्या, भारतीय सैनिकांचं वीरमरण ?

आता तर 370 कलम रद्द केलय, मग अजूनही परिस्थिति अशी आहे? असे एक नाही, अनेक प्रश्न मृण्मयी ला एक राज्यशास्त्राची विद्यार्थिनी म्हणून पडलेले. याची उत्तरे शोधण्यासाठी केलेला कश्मीर प्रवास, 370 कलम रद्द केल्यानंतर बदललेला कश्मीर बघण्याची उत्सुकता असलेल्या मृण्मयीच्या विचारांची बैठक चांगली घडली आहे हे लक्षात येतं.
                                 

चांगले शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या चांगल्या संधी सोडून सेवा वृत्तीने आणि जोखीम घेऊन काम करण्याची प्रेरणा मृण्मयीला तिच्या कुटुंबातून आणि शाळा कॉलेज मधूनच मिळाली. असे अभ्यास करण्याची संधी मृण्मयी सारख्या योग्य व्यक्तिला मिळाली तर स्वताला सिद्ध करून दाखवणारी ती चांगली यंग ‘अचिव्हर’ असेल यात शंका नाही. केवळ महिला दिनीच अशांचा विचार करण्याऐवजी मुलीच्या जन्मापासून आयुष्यभरच तिला चांगल्या संधी देऊन, तिच्याकडे चांगले लक्ष देऊन, जडण घडण केली तर अशा अनेक ‘अचिव्हर’ तयार होतील असे वाटते .(मृण्मयी मंदार परळीकर हिची, महिला दिन ८ मार्च २०२३ रोजी विश्व संवाद केंद्रातर्फे मुलाखत घेता आली आणि या निमित्ताने तिचा परिचय सर्वांना करून देता आला याचे समाधान वाटले. हाच विषय ‘मुलखावेगळी ती’ घेऊन विश्व संवाद च्या पोर्टल वर या मालिकेत प्रसिद्ध झाला.)

© डॉ. नयना कासखेडीकर

---------------------------