Sunday 31 March 2019

सावरकरांचे विचार शाहीरी कलेतून पोहोचविणार्‍या विनता काळे-जोशी





स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नात विनता ची मुलाखत ----

सावरकरांची अभ्यासपूर्ण चरित्रं अनेकांनी लिहिली. प्रबंध लिहिले. चिकित्सा केली. त्यातून हिंदुत्व निष्ठ सावरकर,विज्ञाननिष्ठ सावरकर, भक्तांचे सावरकर असे सावरकरांचे दर्शन झाले. त्यांचा व्यक्तीगत सावरकर हा पण एक पैलू आहे. त्यातली त्यांची रक्ताच्या नात्यातली माणसे कुटुंबात,सामाजिक कार्यात,आणि देशकार्यात पण एकमेकांना धरून होती, आधार देत राहिली. सावरकर तीन भाऊ ,एक बहीण यांच्या नात्याची वीण  शेवटपर्यंत घट्ट होती .

त्यांच्या कुटुंबातली विनता जोशी, माहेरची विनता काळे .स्वातंत्र्यवीर सावरकरांचे धाकटे भाऊ डॉक्टर नारायण राव सावरकर त्यांची नात. त्यांच्या धाकट्या मुलीची मुलगी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी त्यांच्याशी मारलेल्या गप्पातून उलगडलेले सावरकर प्रेम आणि अभिमान.  



“आईचं माहेर सावरकर , सावरकरांच्या घरातच एका अर्थाने जन्म झाला, म्हंटल्यानंतर आपोआपच रक्तातले गुण रक्तात उतरतात. घरातूनच  बाळकडू मिळालं त्यामुळे  वाचनाचा दांडगा छंद ही होताच. विविध क्रांतिकारकांची चरित्र, स्वातंत्र्याचा विस्तृत इतिहास, खुद्द सावरकरांनी लिहिलेली पुस्तके तर होतीच पण इतरही लेखकांची उदा. पु. ल. देशपांडे यांची पुस्तके , गदिमा यांचं काव्य, इतरही अनेक पुस्तके वाचल्यामुळे बुद्धीही प्रगल्भ होत गेली. लहानपणी वाचलेली पुस्तके, त्यामुळे फार कळत होत असे नाही, ती भाषा त्या लहान वयाला झेपत नव्हती म्हणा, त्या गोष्टी डोक्यावरुन जायच्या, पण जस मोठ होत गेले तसा अर्थ लागत गेला, आणि 1983 साल जस जवळ आल, तस सावरकरांचे जन्मशताब्दी वर्ष आता आहे,  हे जरा गाजायला लागले, मी तेव्हा दहावीत गेले होते. आणि मला वाटले की आतापर्यंत जे आपण वाचले आहे ते, लोकांपर्यंत पोहोचले तर पाहिजे, ज्या प्रमाणात पोहोचवायस हवे होते तेवढ्या  प्रमाणात ते पोहोचलेले नाही हे त्या शालेय जीवनात पण जाणवत होते. कळायच की खूप कमी माहिती आहे लोकांना सावरकरांबद्दल...मग काही तरी आपण याच्यापास्न काम करू या, सावरकरांच काम पोहोचवायच”
..  
जन्मशताब्दी निमित्ताने काहीतरी कार्यक्रम करण्याचा कुटुंबातून ठरलं होत का किंवा तसे काही मार्गदर्शन मिळाल का ? यावर विनता जोशींनी त्यांच्या शालेय जीवनापासूनचा आढावा घेतला आणि समाज प्रबोधनासाठी पोवाडा हे माध्यम कसं स्वीकारलं ते सांगितलं.

“घरातून सावरकर जन्मशताब्दी वर्ष आहे म्हणून काहीतरी कर असं काही संगितले नव्हते..पण विरोध कुठल्याही  कामाला नव्हता.. म्हणजे लहानपणापासून मतस्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य, पुर्णपणे होतं. सावरकरांच्या घरात जन्म झाला म्हणून आता त्यांचेच साहित्य वाच असं काही बंधन नव्हते. आम्ही कुठलेही विचार मांडू शकत होतो. मत मांडू शकत होतो. मात्र माझ्याच मनाला असं वाटत होतं की आपण काही वेगळा कार्यक्रम केला पाहिजे, काय करायचं हे मात्र निश्चित होत नव्हते. शाळेच्या वयात आपण गोंधळलेले असतो..हे पण करावं .. ते पण करावं असं वाटत असते...पण दरम्यान काय झाले आमच्या शाळेत एक डोंबिवलीच्या बाई आल्या होत्या..त्यांनी आम्हाला एक पंधरा मिनिटांचा छोटासा पोवाडा झाशीच्या राणीच्यावर केलेला म्हणून दाखवला..डफ बिफ घेऊन ..खूप भारावून गेलो आम्ही.. म्हणजे तोपर्यंत पोवाडा आम्हाला माहिती नव्हता. पण समोर बसून जेव्हा पोवाडा ऐकला, तेव्हा त्या माध्यमाची ताकद कळली. आणि आम्ही एकदमच भारावून गेलो. 

आमच्या ग्यादरींगला आम्ही आमच्या वर्गशिक्षिका पोळ बाईंना विचारलं की, करू का असा पोवाडा सादर?” तेव्हा, तुम्ही तुमचाच मिळवा असं सांगून त्यांनी परवानगी दिली. पण म्हंटले की काहीतरी दृश्य बसवा त्यावरची.  सुरूवातीला आम्ही शाहीर बाबासाहेब देशमुखांनी लिहिलेला तानाजी मालुसरे यांच्यावरील पोवाडा बसवला...तो कार्यक्रम फारच सुंदर प्रभावी झाला.  शाळेच्या स्नेह संमेलनात हे प्रथमच घडले..तेव्हाच माझ्या लक्ष्यात आल की पोवाडा हे फार ताकदीचे माध्यम आहे आणि आपल्याला काय सांगायचे आहे ते चित्र जसाच्या तसं यातून आपण लोकांपुढे उभे करू शकतो., माझ्या मनात विचार आला की आपण तात्यांच्या (सावरकरांच्या ) जीवनावरच जर असा पोवाडा सादर केला तर त्यांचे जीवन लोकांसमोर येईल. तात्यांची पुस्तके वाचून त्यांचे विचार लोकांना सांगून कितपत प्रभावी होतील माहीत नाही.  त्यापेक्षा पोवाड्यातून चरित्रच समोर प्रभावीपणे मांडू शकतो अस वाटलं.निदान सावरकरांची गोष्ट तरी जनमानसात माहिती होईल”.



“आणि मग शाहीर गोविंद स्वामी आफळे यांनी लिहिलेला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पोवाडा मला माहिती होता. त्यांना पुण्याला येऊन भेटले. त्यांचा सावरकर घराण्याशी स्नेह होताच पहिल्यापासून. मी त्यांचा पोवाडा म्हणणार हे ऐकून ते खुश झाले, ते म्हणाले, अगदी माझा पोवाडा जरूर म्हण. जन्मशताब्दी सुरू होणाच्या चार दिवस आधी तो पोवाडा हातात मिळाला. मग मी आणि माझ्या आई बाबांनी तो ऐकून त्याच सगळं निवेदन लिहून काढलं आणि 28 मे 1983 ला नाशिकला पसावा नाट्यगृहात साने गुरुजी कथा मालेत पहिल्यांदा मी आणि माझ्या मैत्रिणीने निवेदनासकट सादर केला. सगळ्यांना खूप आवडलं, कुणीही कंटाळले नाहीत”.

पोवाड्यातून स्वातंत्र्यवीर सावरकर लोकांपर्यंत पोहोचण्याची कल्पना यशस्वी झाल्याचे सांगताना त्या म्हणतात,  
“एक कळलं की सगळ्यांना सावरकरांची ही गोष्ट आवडली आहे. तिथेच इतरांनी पुढचे निमंत्रण दिले की आमच्याकडे सावरकरांचा हा पोवाडा सादर करावा म्हणून. कुठेही याची जाहिरात करावी लागली नाही. तेंव्हापासून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. माझं दहावीचं वर्ष, नंतर बारावीचं सायन्स चं वर्ष, पण मी कुठेही मागे हटले नाही. कधी कधी प्रॅक्टिकल बुडवून कार्यक्रम करून यायचे. इतकी त्या कार्यक्रमात मी बुडून गेले होते. तेंव्हापासून ठरवलं की पोवाडेच कार्यक्रम म्हणून करायचे. लोकांची अपेक्षा खूप वाढली. त्यांना आता मोठा कार्यक्रम हवा होता. अजून एक संकल्पना समोर आली की जयोस्तुते आणि सागरा प्राण तळमळला ही गाणी तर मंगेशकरांनी अजरामर करून ठेवली आहेत. ती लोकांची तोंडपाठ आहेत, त्यांच्या मनात त्या गाण्यांना खूप मोठ्ठं स्थान आहे. पण जी गीते, कविता, माहिती लोकांना माहिती नाहीत, जी सावरकरांनी रचली आहेत आणि त्या गाण्यांची प्रचंड मोठी ताकद आहे, अशी गाणी घेऊन, जसं, अनादि मी अनंत मी’, किंवा प्रियकर हिंदुस्तान’,  तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधु बंधु हे हिंदू एकता गीत, शस्त्र गीत अशी सावरकरांची गाणी आणि दोन पोवाडे घेऊन आमचा एक कार्यक्रम चालू झाला”.

“1986 ची गोष्ट आहे, त्यावेळी अरुणाचल प्रदेशात चाळीस हजार आदिवासी लोकं ख्रिश्चन धर्मात गेले होते. धर्मांतराचा खूप मोठा प्रश्न समोर आला होता तेंव्हा . देशभर विश्व हिंदू परिषदेतर्फे हिंदू एकता जनजागरण अभियान चालवलं गेलं होतं. तसं ते नाशिक जिल्ह्यात पण आलं.मुख्यता आदिवासी लोकांसाठी त्या भागात ते सुरू होत. नेत्यांची, विविध वक्त्यांची भाषणे व्हायची. पण लोकांना नुसती भाषणे कंटाळवाणे व्हायला नको म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने माझे पोवाडे त्याला जोडले. सुरूवातीला पोवाडे मग भाषणे, पुन्हा पोवाडे, गाणी असा कार्यक्रम रंगायचा, खूप गर्दी व्हायची . नाशिक जिल्ह्याच्या  सर्व आदिवासी भागात जाऊन आले. कार्यक्रम वाढतच गेले. काही वेळा तर दिवसातून तीन तीन कार्यक्रम होत. याच 2,3 वर्षात माझे अडीचशे ते पावणेतिनशे कार्यक्रम झाले.
1989 ला लग्नानंतर पुण्यात आले. थोडा खंड पडला. एक दोन एक दोन कार्यक्रम व्हायचे. आधीच्या सहकारी नाशिकमधल्या. आता पुण्यात एकटी कार्यक्रम करायला लागले लहान लहान.
पुढे स्वरूप वाढले मागणी वाढली. 1997 साली मात्र स्वातंत्र्याचं सुवर्ण महोत्सवी वर्ष होतं. तेंव्हा पुणे महापालिकेने खास महिलांसाठी पोवाडा स्पर्धा आयोजित केली होती. शोभा ठाकुर या मैत्रिणीच्या मदतीने भाग घेतला. पहिला नंबर मिळाला. आणि आता ग्रुप तयार झाला. नंतर बालचित्रवाणी, बाहेर च्या गावातून असे जोरात कार्यक्रम सुरू झाले.

बाबासाहेब पुरंदरे यांचा आशीर्वाद मिळणं ही गोष्ट त्या स्वाभिमानाने सांगतात,
“पण पुन्हा एकदा कार्यक्रमाला मोठं स्वरूप मिळालं ते अबुधाबी व दुबईच्या कार्यक्रमाला. प्रसिद्धीची आणि जाहिरातीची सवयच नव्हती. पण अचानक एक दिवस दुबईहून फोन आला. माझी एका वेबसाइट वरील मुलाखत वाचून पूर्वी विद्यार्थी परिषदेच्या कामात ओळखणारा आणि महाराष्ट्र मंडळाच काम करणार्‍या एकाचा की,  तुमचा कार्यक्रम आम्हाला अबुधाबी आणि दुबई साठी हवाय असा फोन. हे सगळ स्वप्नवतच होत. हा कार्यक्रम होता आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांच्या बरोबर. त्यांचा 2 तास आणि माझा 2 तास असा कार्यक्रम अप्रतिम प्रतिसादात रंगला. हा कार्यक्रम असा होता की सावरकर आणि स्वातंत्र्य संग्राम, शिवाजींच्या काळापासून, तेंव्हापासून आम्ही लढ्वय्ये आहोत, ते आम्ही, सावरकर आमचे क्रांतिकारकांचे मुकुटमणि आहोत. ते त्यांची काव्ये इथपर्यन्त आम्ही येतो. बाबासाहेबांनी यावेळी जाहीर गौरवोद्गार काढले ते म्हणजे मला आशीर्वाद होते. सन्मान होता.  अवॉर्ड होत आमच्यासाठी ते”.



अजून एक मोठी गोष्ट .पु. ल देशपांडे यांच्या समोर माझा हा कार्यक्रम सादर झाला. ते पार्किंसन्स ने आजारी होते. पण त्यांच्या घरी त्यांच्या समोर केलेला कार्यक्रम,ते आजारी असतांनाही दिलेली दाद हे मोठे आशीर्वादाचे क्षण होते .
एकदा 92, 93 साली बाळासाहेब देवरस नाशिकला नजरकैदेत होते, तेंव्हा माझी मुलगी लहान होती. मी  नाशिकला होते. बाळासाहेब देवरासांना कळलं की इथे सावरकरांची नात आहे आणि ती सावरकर यांची गाणी आणि पोवाडे छान सादर करते. त्यांनी मला निरोप पाठवून बोलावून घेतलं आणि त्यांच्या समोर मी पोवाडा आणि सावरकरांची गाणी सादर केली. हा माझ्यासाठी खूप सन्मानचा योग होता. एव्हढ्या मोठ्या व्यक्तिने बोलावून घेणे यातच मी कृतकृत्य झाले होते. त्यांनी काढलेले प्रशंसोद्गार खूप अभिमानाची गोष्ट होती. त्यांची सावरकरांची गाणी पाठ होती. त्यांनी अगदी हे गाणं म्हणून दाखव म्हणून एकेक सांगून गाणं  म्हणवून घेतलं. ते स्वता सावरकर भक्त होते. जयोस्तुते’..  सुद्धा म्हणायला लावलं होतं”.

विनायक दामोदर सावरकर या नावाचं वलय समाजात किती मूळापर्यंत आहे याची अनुभूती विनता जोशी यांना कार्यक्रम करताना सतत येत होती. 
                “हे कार्यक्रम मी चालू केले तेंव्हा यातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत सावरकर पोहोचविणे हाच मुख्य उद्देश होता. तो बर्‍याच अंशी यशस्वी झाला. अगदी छोट्या आदिवासी पाड्यावर सुध्हा पोवड्यातून सांगीतलेली सावरकरांची गोष्ट जास्त आवडत होती. त्यांना तर हे काहीच माहिती नसत जिथे त्यांना त्यांच्या गरजच भागविण कठीण असतं तिथे अशी काही माहिती असणं दूरच.
           
पोवाडा हे माध्यम कसं प्रभावी आहे हे सांगताना त्यांनी ते प्रेक्षकांना किती कळतं याबद्दल ही निरीक्षण नोंदविलं. त्या म्हणाल्या,   पोवाडा हे माध्यम फार वेगळं आणि प्रभावी आहे. कुठलाही एक चांगला विचार समाजापर्यंत पोहोचवायचा असेल तर पोवाडा अत्यंत प्रभावी माध्यम आहे. लय, ताल, संगीत, अभिनय, आवाज यामुळे दृक श्राव्य माध्यम नसतानाही एक दृश्य तुम्ही तुमच्या म्हणण्यातून उभं करू शकता अशी ताकद आहे. बर्‍याच ठिकाणी असा अनुभव आला की लोकांना सावरकरांबद्दल जी काहीच  माहिती नव्हती ती पोवाड्यातून पोहोचते आहे. कारण चरित्रच आहे त्यांचं त्यात . असेही काही अनुभव आहेत उदा. गणेश उत्सवात हा कार्यक्रम ठेवला तर त्यांना काहीही देणं घेण नसतं. स्टेजवर काय चाललाय काही कळत नाही. हे अनुभव घेऊन आता मला स्टेजवर उभं राहिल्यानंतर लगेच एका मिनिटातच प्रेक्षक ओळखू येतो की त्यांना सावरकर कळणार आहेत की नाही? अशा वेळी ओळखून सुरूवातीला त्यांना तानाजीचा पोवाडा ऐकवायचा. नाट्यरूपात, करूणरस, वीररस घेऊन मग शौर्यरसाकडे घेऊन जायचं. असे वेगवेगळे अनुभव येतात.

कार्यक्रमाला प्रेक्षक किती रसिकतेने दाद देतो किंवा किती गांभीर्याने पाहत असतो याचा त्यांना आलेला अनुभव प्रेक्षकांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे.              
   एकदा तर एका मोठ्या उच्चभ्रू सोसायटीच्या कार्यक्रमात माझ्या आधीच्या कथाकथनाच्या कार्यक्रमात महिलांमध्ये गप्पा, चौकशा सुरू होत्या. ते पाहून  शेवटी कलाकाराने कथाकथन थांबवले. कलाकाराबद्दल साधं आदर राखण्याचा भाग आपण पाळू शकत नाही याच फार वाईट वाटलं. मग पोवाडा सुरू होण्या आधी मी स्पष्ट केल. की, “ कथाकथनालाच अशी वेळ येत असेल, तर माझा पूर्ण वेगळा, देशभक्तीचा आणि देशप्रेमाचा कार्यक्रम आहे, आज तुम्ही ज्या गप्पा मारताय, चैनीत जगताय न त्यासाठी खूप जणांनी आपल्या आयुष्याचं बलिदान दिलय. ज्या वेळेला तुमचा भारत स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारतात तुमचं जन्म झाला.  पण हे स्वातंत्र्य तुम्ही का भोगू शकताय? आणि आत्ता सुद्धा तुम्ही लक्षात घ्या, आपल्या घरादारची पर्वा न करता, जे सीमेवर आता खडा पहारा देताहेत न त्यामुळे तुम्ही इथे शांतपणे, निर्भयपणे बसू शकता आहात”. या शब्दांची जादू झाली. माझा कार्यक्रम पिनड्रॉप सायलेन्स मध्ये झाला. सगळ्यांनी शांतपणे ऐकला. त्यांना खूप आवडला, समजला. असे खूप वेगवेगळे अनुभव आले”.
          
लोकांना सावरकर अजून कळले नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्या म्हणतात, “मला अजूनही वाटतं की सावरकर अजूनही पोहोचले नाहीत पेक्षा सावरकर अजूनही कळलेच नाहीत. सुशिक्षित लोकांनाही ते अजून कळले नाहीत. सावरकरांच हिंदुत्व कळलच नाही अजून लोकांना. हिंदुत्व म्हणजे हिंदुईजम किंवा कट्टरवाद नव्हे. हिंदुत्वाची व्याख्याच अशी आहे,    

आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका ।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: ॥
      
     
सिंधु नदीपासून सागरा पर्यंत पसरलेल्या या विस्तीर्ण भूमीवर ज्याची श्रद्धा आहे ,या शब्दातच सगळं येतं. सिंधुस्थान ही ज्याची केवळ पितृभूमी नव्हे, तर पुण्यभूमीही आहे ,ज्याचं या देशावर प्रेम आहे तो हिंदू. अशी विशाल व्याख्या होती हिंदूची. म्हणजे हे हिंदुत्व, धर्मात अडकलं आहे का?  माझी जर का श्रद्धा हिंदू भूमीवर आहे तर मी हिंदू आहे. माझा धर्म माझ्या घरात जो काही असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, पारशी असेल जो असेल तो. पण माझ्या मनात देशाबद्दल प्रेम असेल, ती माझी पितृभू पुण्यभू असेल तर मी हिंदू आहे.

सावरकरांचे विज्ञाननिष्ठ विचार हे झेपलेच नाहीत. त्यामुळे काही ठिकाणी सावरकरांच्या अनुयायांनीच त्यांचा पराभव केला. सावरकर समजाऊन सांगण्यात त्यांचे अनुयायी पण कमी पडतात. की नक्की सावरकरांना काय म्हणायचं आहे? हे अनुयायांना कळलेल नसतं. दोन वाक्य उचलून त्याचा अर्थ लागत नाही. त्यांचे विज्ञाननिष्ठ निबंध परत परत वाचावे लागतात. मी लहान वयात वाचलेले निबंध मला नाही कळले ,पण मोठं झाल्यावर बुद्धी प्रगल्भ झाल्यावर पुन्हा वाचले तर थोडे थोडे कळले. प्रत्येक वेळी ते नव्याने समजतात. सावरकर हा इतका मोठा विषय आहे. एव्हढे पैलू असलेला हा माणूस की जो क्रांतिकारकांचा मुकुटमणी होताच. पण त्याच वेळेला ते लेखक होते. कवि होते, नाटककार होते विज्ञाननिष्ठ होते, समाजसुधारक होते. रत्नागिरीत त्यांनी जे समाज सुधारण्याचं काम केलय ते भल्या भल्या समाजसुधारकांनी केलं नाहीये असं काम आहे. पण आज सावरकर समाजसुधारक म्हणून अजूनही आम्ही स्वीकारले नाहीत. त्या वेळेला मोठी मोठी सहभोजनं घालणं,पतितपवन सारखं मंदिर बांधणे की जे देशातल पहिलं मंदिर आहे . त्या मंदिरातल्या मूर्तिची प्रतिष्ठापनाच  हरिजनांच्या हस्ते झालेली आहे. ते सगळ्यांसाठी खुलं केलं गेलं. ही इतिहासातली खूप मोठी कामगिरी आहे.

तुम्ही आम्ही सकल हिंदू, बंधु बंधू
तो महादेवजी पिता आपुला चला तया वंदू.
ब्राम्हण वा क्षत्रीय चांग, जरी झाला,
कसलेही रूप वा रंग, जरी ल्याला.
तो महार अथवा मांग, सकलाला ,
ही एकची आई हिंदू जाती आम्हांस, तिला वंदू .

1925 साली हे सर्वमान्य हिंदू गीत मोठमोठ्या सभांमधून हजारो लोकांनी एक कंठाने वृंदगीता प्रमाणे म्हणण्याचा परिपाठ महाराष्ट्र भर झाला होता. इतर भाषतून अनुवाद होऊन तिथेही ते असेच गायले जात होते.
हे इतक सुंदर गाणं आहे सावरकरांच ते लोकांना माहितीच नाही .अशी गाणी निवडून ती लोकांपर्यंत पोहोचवायची हा उद्देश आहे कार्यक्र्म करण्यामागे. त्यातून त्यांचे विचार काय होते हे लोकांना कळेल.

सावरकर लोकांना कळले नाहीत हे सांगताना त्या समाधान व्यक्त करतात की बर्‍याच संस्था आणि शाळांमधून आता सावरकर या विषयावर वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. ही समाधानाची बाब आहे. की त्या निमित्ताने सावरकर साहित्य वाचले जाईल. कारण तसे विषय दिले असतील म्हणजे समाजसुधारक सावरकर, विज्ञाननिष्ठ सावरकर,देशभक्त सावरकर असे. तर ती मुले त्या विषयाच्या अनुषंगाने वाचन करतील आणि आपली मते मांडतील. हे एक चांगलं चित्र आहे की आताची पिढी जरा सावरकर विषय वाचायला लागली आहेत. त्यांना त्यातलं कळायला लागलं आहे. सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंध, विचार या पिढीला प्रचंड आवडणारे आहेत. आता नव्या पिढीला प्रत्येक गोष्टी मगच विज्ञान समजाऊन सांगायला लागत. ती आज गरज आहे. कारण सावरकरांनी प्रत्येक गोष्ट विज्ञानाधारीत सांगितली आहे. त्यांनी धर्मग्रंत्यह वाचू नका असं नाही सांगितलं, त्यांच्या मते प्रत्येक धर्मग्रंथ हा इतिहास म्हणून कपाटात असलाच पाहिजे आपल्या. पण ज्या कालबाह्य  झालेल्या रूढी आहेत त्या आताच्या काळाला सुसंगत नसतील तर बाजूला ठेवल्या पाहिजेत. त्यांनी युरोपच उदाहरण दिलं की जेंव्हा युरोपने बायबलला सन्माननीय ग्रंथ म्हणून कपाटात ठेवले तेंव्हाच त्यांची प्रगती झाली. त्यावेळेला समाजाला संघटित करायची गरज होती म्हणून ते लिहिलं गेलं होत. आता गरज नाही परिस्थिति बदलली आहे . परंपरा पळण्यात परिस्थितीनुसार बदल झाले पाहिजेत.त्यातलं विज्ञान ते सांगत. बदल हा उत्क्रांतीच दर्शवतो न. तुमच्यात बदल झाले पाहिजेत. विचारात बदल झाले पाहिजेत. या सर्व अनुषंगाने सावरकर अजूनही तेव्हढ्याच याने लोकांपर्यंत पोहोचायला हवेत. असे वाटते.   

सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंध आजच्या मुलांपर्यंत कसे पोहोचतील याबद्दल विनता म्हणतात, की हे सावरकरांचे विचार आजच्या मुलांना समजले पाहिजेत. पण त्याची भाषा जरा क्लिष्ट असल्याने ती कदाचित जशीच्या तशी समजणार नाही, तेंव्हा त्यांच्याकडून ती पुस्तकं वाचून घेऊन त्यावर चर्चा घडवून आणायला हवी. त्यांच्याकडून च त्यांना काय समजले हे काढून घेऊन त्यावर परिसंवाद घडवून आणायचा. त्यांना सावरकर आपले वाटायला लागतात कारण त्यांना कळत की हे तर आपल्यासारखे च विचार आहेत. मुलांना खूप आवडत असं. इतिहासाची गोष्ट घ्या ना, आपल्याकडे शाळेत इतिहास नीट शिकवला जात नाही. सावरकरांबद्दल तर इतिहासात काहीच नाही. दोन तीन ओळींशिवाय. सावरकरांनी समुद्रात उडी मारली आणि त्यांना अंदमानात शिक्षा झाली एव्हढाच इतिहास शाळेत शिकवला जातो. सावरकरच काय अनेक क्रांतिकारक आहेत ज्यांच्या बद्दल इतिहासात काही शिकवलं जात नाही.
शाळेत मुलांना इतिहास कसा शिकवला पाहिजे याबद्दल त्यांचा अनुभव लक्षात घेण्यासारखा आहे. 

इतिहास नीट समजला तर चांगली गोष्ट होईल मुलांसाठी. माझ्या मुलींच्या शाळेत मी सावरकरांचा पोवाडा त्यातल्या प्रसंगासहित बसवला होता, मुलांनी खूप छान अप्रतिम सादर केला. पुढे ते पाचवीत गेले, त्यांच्या परीक्षेत प्रश्न होता कारणे द्या मध्ये , चाफेकर बंधूंनी  Rand चा वध केला. माझ्या पोवड्यात जी मुले होती त्यांनी या प्रश्नाचं सविस्तर उत्तर निवेदांनासहित लिहिलं. कारण ते त्या नाटकात या भूमिका जगले होते. त्यामुळे सर्व पाठ होते आणि समजले ही होते. पुस्तकात एव्हढंच  होत की, पुण्यात प्लेगची साथ आली. चाफेकर बंधूंनी Rand ल गोळ्या घालून मारलेत्यांच्या इतिहासाच्या बाईंनी विचारलं, अरे एव्हढी पान -पान उत्तर आणली कुठून तुम्ही? गोष्ट च्या गोष्ट कुठून आणलीत? मुलं म्हणाली आम्ही केलं होत न नाटक आणि पोवाडा, काकूंनी आम्हाला छान शिकवलं होत.त्यातूनच लिहिलं आम्ही .  मग मलाही बाईंनी शाळेत बोलावून घेतलं. मी त्यांना सांगितलं की इतिहास हा पाठांतर करून घ्यायचा विषय नाही. सनावळी घोकण्याचा उपयोग नाही. ते प्रसंग त्यांना शिकवले गेले पाहिजेत. छोट्या छोट्या प्रसंगातून गोष्टीतून तो त्यांना जास्त चांगला समजतो.त्यांच्या मनावर ठसतो. तो परीक्षा घेण्याचा विषयच नाही. बाजीरावांनी किती साली काय केल हे विचारण्यापेक्षा ते कशी एकही लढाई हरले नाहीत ते कसे जिंकत गेले हे सांगा. हे कोणालाच संगितले जात नाही”.

सावरकर जिथे जिथे फिरले तिथे तिथे भेटी देऊन विनता ताईंनी या विषयाचं  पुन्हा एकदा जागरण केल. याबद्दल त्यांनी सांगितलं.

“सावरकर जिथे जिथे गेले राहिले व काम केल तिथे तिथे जाऊन मी कार्यक्रम केले. भगूर,नाशिक, रत्नागिरी, पुणे- फर्ग्युसन कॉलेज, सावरकर स्मारक, मुंबई, अंदमान, लंडन सुधा. अंदमानात वेगवेगळ्या कंपन्यांबरोबर जाऊन कार्यक्रम करते. लंडन मध्ये यावर्षी 15 ऑगस्ट ल स्वातंत्र्य दिना दिवशी तिथल्या महाराष्ट्र मंडळात कार्यक्रम करायला मिळाला. तिथे माझ्या हस्ते ध्वजारोहण झालं. हा अविस्मरणीय अनुभव होता माझा. यावेळी मनात भावनांचा कल्लोळ होता. ज्या ब्रिटीशांनी सावरकरान्वर अनन्वित अत्याचार केले ,त्यांच्याच देशात आपल्याच स्वातंत्र्य दिनाला 15 ऑगस्ट ला त्यांच्याच नातीच्या हस्ते ध्वजारोहण, ही रोमांचकारी घटना होती माझ्यासाठी. डोळ्यात पाणी आलं. आजही भरून येतं. उपस्थिती तर खूप होती. त्यांचं ऑडिटोरियम खचाखच भरल होत जे एरव्ही 20 - 25 लोक असतात. त्यामुळे पदाधिकार्‍यांनाही खूप आश्चर्य वाटलं. हे सगळ सावरकरांवरचं प्रेम, आदर आणि आपल्या देशावरच प्रेम होत. लंडनला मुलाखत पण झाली टीव्ही वर .



“अंदमानला तर लोकांना सावरकरांबद्दल खूप आदर आहे. मी अनुभवते आहे.रोस आयलंड च्या अनुराधा ताई राव आहेत त्यांचा विलक्षण अनुभव आहे. त्सुनामी मध्ये सर्व काही गेल त्या एकट्याच उरल्या घरातल्या. पण त्या रोस आयलंड च संपूर्ण इतिहास डोळ्यासमोर उभा करतात. त्याच अनुषंगाने त्या सांगतात की अंदमानातल, मी एकाच व्यक्तिमत्वाला मानते ते म्हणजे माझ्या या अंदमानात सावरकर होते त्यांना . त्या सावरकरांबद्दल बोलतात तेंव्हा जाज्वल्य अभिमानाने बोलतात. भरून येत, नाहीतर अंदमानात जे जे लोक पर्यटक येतात त्यातल्या कित्येकांना सावरकर या नावा पलीकडे काहीही माहिती नसतं. पर्यटन तुम्ही जरूर करा पण ज्या स्थानाला जे महत्व आहे जी शुचिर्भूतता आहे, जे पावित्र्य आहे त्याचा भंग करू नका. हे आपल्याच कडे आहे, परदेशात हे सांगावं लागत नाही लोकांना” .    

“ सावरकरांचा माफीनामा या न कळलेल्या विषयाची चर्चा चालू आहे ती लाजिरवाणी आहे. केवळ राजकीय आहे. इतिहासाचं राजकारण केल्याने खरा इतिहास अजून कळलेला च नाही. स्वातंत्र्याच्या लढ्यात किती ज्ञात-अज्ञात वीर झाले ते कोणापर्यंत पोहोचलेच नाहीत. त्यांची नावं सुधा माहिती नाहीत कोणाला. अंदमानात बंगाली जास्तीत जास्त क्रांतिकारक, मग पंजाबी आणि फक्त तीनच महाराष्ट्रियन क्रांतिकारक होते. त्यातले दोन तर सावरकर बंधुच .एक जोशी. जगाच्या इतिहासात असं एकमेव उदाहरण असेल की एकाच घरातले दोन सख्खे भाऊ एकाच वेळी शिक्षा भोगताहेत पण,  2 महीने त्या एकमेकांना माहिती नव्हतं की ते एकाच तुरुंगात आहेत”.
आपल्या शाहीरी कलेबद्दल त्यांनी आठवण सांगितली.

“सगळ्यांना प्रश्न पडतो की शाहीरी कला कशी काय तुमच्याकडे? मी जेंव्हा सावरकरांवर कार्यक्रम चालू केले तेंव्हा माझी आज्जी लक्ष्मीबाई सावरकर होत्या.म्हणजे नारायणरावांच्या पत्नी. जसे माझे पोवाडे तिने ऐकले, तेंव्हा तिची ताबडतोब प्रतिक्रिया होती, अगं, तू तर अगदी ह्यांच्या सारखी म्हणजे डॉक्टर नारायण रावांसारखी तुझ्याकडे ही कला आली आहे”. माझे आजोबा डॉक्टर नारायणराव सावरकर हे लहान पणापासून उत्तम पोवाडे गायचे. म्हणजे तात्यांचे पोवाडे मित्रमेळयातून सादर करायचे ते माझे आजोबाच.      
असे सावरकर विचार पोहोचविण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करतोय. मी माझ्या परीने करते आणि करतच राहणार आहे”.
तुमच्यासाठी अंदमानच्या कोठडीतील सादरीकरण--  
      


       मुलाखत –  डॉ. नयना कासखेडीकर