Sunday 17 September 2017

योजकस्तत्र दुर्लभः।

                                                 
                                                                   पुस्तक परीक्षण



अमंत्रं अक्षरं नास्ति नास्ति मूलमनौषधम्।

अयोग्यः पुरुषो नास्ति योजकस्तत्रदुर्लभः।।



ज्यात मन्त्रशक्ति नाही असे एकहि अक्षर नाही.
ज्याला औषधी गुण नाही असे मूळ नाही.
पूर्णतः निरुपयोगी असा माणूस नाही.
पण या सगळ्यांना कामाला लावणारा म्हणजे योजक- तो दुर्मिळ असतो.

     योजना करणारा योजक दुर्मिळ असतो, पण तो असला की काय बदल घडतात हे सगळी जनता बघतेय. अनुभवते आहे. भारतातल्या परीवर्तनाचा शिलेदार मा पंतप्रधान नरेंद्र मोदी ! त्यांच्याच बद्दल लेखक डॉ.भा.ना.काळे यांनी ‘योजकस्तत्र दुर्लभ:’ हे पुस्तक लिहून त्यांच्या अडीच वर्षांच्या कालावधीतले त्यांनी घेतलेले कष्ट, लावलेली शिस्त, घेतलेले निर्णय, परदेशात निर्माण केलेली भारताची एक वेगळीच प्रतिमा या सगळ्या विषयांचा उहापोह केला आहे.

     






या पुस्तकात आठ प्रकारणे आहेत. त्यात लेखकाने, नरेंद्र मोदी लहानपणापासून कसे घडत होते, तेंव्हापासून संघात त्यांच्यावर कोणते संस्कार झाले, त्यांनी संघाशी जोडलेले नाते, इथपासून ते पंतप्रधान झाल्यानंतरची अडीच वर्षे, यात त्या त्या काळातली सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती, आंतरराष्ट्रीय संबंध व भारताला भेडसावणाऱ्या समस्या आणि देशाच्या प्रगतीसाठी व विकासासाठी त्यांनी केलेले प्रामाणिक प्रयत्न याचा अतिशय मार्मिक शब्दात आढावा घेतला आहे.

     ॐ केशवाय नम: या पहिल्या प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना, त्यापूर्वीचा हिंदुस्थान आणि संघाच्या मुशीतून घडणारा स्वयंसेवक ही माहिती नव्याने संघात येणाऱ्या व संघाबाहेरच्या अज्ञानी लोकांना व टीकाकारांना अत्यंत उपयोगी व मार्गदर्शक वाटते. केवळ ऐकीव आणि द्वेषाने प्रचार केलेल्या गोष्टी किती खोट्या असतात व वास्तव वेगळेच असते हे या प्रकरणातून उमगते. आरोग्यासाठी योगासने, व्यायाम, शुद्ध आचार विचार, मातृभूमीसाठी त्यागवृत्ती, कमालीची समर्पण भावना, हाती घेतलेल्या कार्याप्रती निष्ठा, शिस्त, शाकाहार, ब्रम्हचर्य, निर्व्यसन अश्या कित्येक गुणांचा समुच्चय मोदींच्या व्यक्तीमत्वात झालेला दिसतो.

     दुसऱ्या प्रकरणात १९४७ ला स्वतंत्र झालेल्या भारतात, चीन, पाकिस्तान, ताश्कंद करार यावेळी काय घडलं आणि १९५१-५२ मध्ये झालेली पहिली सार्वत्रिक निवडणूक ते २००९ च्या पंधराव्या सार्वत्रिक निवडणुकीचा धांडोळा लेखकाने घेतला आहे. यापैकी दीर्घकाळ कॉंग्रेस/युपीएची केंद्रात सत्ता होती. या विरोधी सरकारच्या काळातही  नरेंद्र मोदी यांनी तब्बल १२ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्रीपद सांभाळले होते. विकासाचे ‘गुजरात मॉडेल’ तयार केले जे इतर राज्यांनाही मार्गदर्शक ठरले. २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत मोदी यांनी चौथ्यांदा घवघवीत यश मिळवलं. देशात आणि विदेशातही त्यांना कसे आणि काय काय अडथळे येत होते आणि ते सर्वाना कसे सामोरे गेले याचे यथार्थ वर्णन या प्रकरणात आहे. गुजरातचा विकास काय व कसा केला ? जामनगर मधली निवडणूक, वीज, पाणी, रस्ते या जनतेच्या मुलभूत समस्यांचे निराकरण, दारूबंदी, पर्यटन, व्यापार, अर्थव्यवस्था या माहितीमुळे गुजराथ मॉडेल ठळकपणे समोर येते.

     प्रचारकार्य हे या पुस्तकातील सर्वात मोठे प्रकरण. पंतप्रधान होण्यापूर्वी नरेंद्र मोदी प्रकाश झोतात आले कसे आणि लोकांच्या गळ्यातले ताईत झाले कसे याचं तंत्र समजून घ्यायचं तर हे प्रकरण इंटरेस्टिंग आहे. २००१ ची निवडणूक, गोधरा, बाबरी मशीद, दंगली, युरोपात येण्याची बंदी असे अनेक प्रसंग, त्याचा प्रचार-अपप्रचार, तर    २०१४ च्या निवडणुकीचे हाताळलेले प्रचारतंत्र, मागील १३ वर्षातील उल्लेखनीय काम, मोदी यांचे झंझावाती प्रचारदौरे, सभा, रॅली, नव्या टेक्नॉलॉजीचा त्यांनी प्रचारासाठी करून घेतलेला समर्पक उपयोग, त्याचा परिणाम, चहावला मुलगा, (चायवाला !) याची विरोधकांनी उडवलेली टर, अगदी त्यांचे वैयक्तिक जीवन सुद्धा टीका करताना सोडले नाही. असे प्रतिमा मलीन करण्याचे उद्योग का व कसे केले याचे लेखकाने यथार्थ वर्णन केले आहे.

     प्रतिकूल परिस्थितीत अत्यंत धीराने सामोरा गेलेला अन तावून सुलाखून बाहेर पडलेला माणूस २०१४ मध्ये निवडून दिला तर नक्कीच उत्कृष्ठ प्रशासन अन आर्थिक विकास या उद्दिष्ठांची पूर्ती होणार हे प्रचारकार्यातून  लोकांच्या लक्षात आले. या निमित्ताने नरेंद्र मोदी व्यक्ती म्हणून कसे आहेत हे निवडणुकीच्या काळातील प्रचारात लोकांना समजून सांगाव लागले नाही तर आपोआप त्यांच्या कामाने ओळखता आले. ते सरळमार्गी आहेत, ते दारू पीत नाहीत, कुठलेही व्यसन त्यांना नाही. स्त्री शिक्षणाबद्दल त्यांचे प्रगतीशील विचार आहेत, घोषणा देऊन आकर्षित करणारे ते नाहीत, ठरवलेले काम ते पूर्ण करत्तात, राष्ट्रकार्यासाठी परिश्रमाची पराकाष्ठा करतात. पैशापासून दूर आहेत व भ्रष्टाचार नाही ! माणसं जोडण्याची व ती सांभाळण्याची हातोटी हे लेखकाने उदाहरणासहित स्पष्ट केलय. जे आपल्यालाही अनुभवाने दिसतंय. त्यांच्या बद्दलच्या अनेक गोष्टी नव्याने समजल्या. गैरसमज दूर झाले. मला वाटतं या पुस्तकाचा उद्देश तोच आहे.

     लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत नेहमीपेक्षा जास्त मतदान झालं. ६६.४% एव्हढे. जे यापूर्वी झाले नव्हतं. भारतातल्या जनतेला आता घराणे आणि परंपरेने चालणारे राजकारण नको होते. बदल हवा होता तो त्यांनी कौल देऊन करून दाखवला. ते मोदी यांचं व्यक्तिमत्व जवळून समजल्यामुळेच. निवडून आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आपल्या आईचे आशीर्वाद घेतले. त्यांची वयोवृद्ध आई मतदान करायला रिक्षातून गेली. अलिशान गाडीतून नाही. संसदेत प्रवेश करताना प्रथम ते पहिल्या पायरीवर डोके ठेऊन नतमस्तक झाले. हा प्रसंग आणि त्यांच्या ठायी दिसणारा संस्कार व मूल्यांबद्दल असणारा आदरभाव याचं दर्शन वेळोवेळी बातम्या व टीव्ही, वर्तमानपत्रे आदि माध्यमातून वेळोवेळी झाले आहे. २६ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर झालेले परिवर्तन लेखकाने यात विषद केले आहे.     

 पिन्डे पिन्डे मतिर्भिन्न: कुंडे कुंडे नवं पया ||
 जातो: जातो: नवाचारा: नवा वाणी मुखे मुखे ||

कोणाकडून काम करून घेता येईल, कसं करून घेता येईल, योग्य कामासाठी योग्य व्यक्ती कोणती- याची चुणूक मंत्रिमंडळ स्थापन करताना दिसली. आपल्या मंत्रिमंडळातील पदे कर्तव्यदक्ष, निष्णात अशा व्यक्तींना त्यांनी  दिली. या व्यक्ती कशा आहेत व त्यांची वैशिष्टे लेखकाने सांगितली आहेत. त्यांचाही परिचय यातून होतो.

     देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर, निवडणुकांपूर्वी केलेल्या भाषणात दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची जबाबदारी पार पाडण्याची तयारी सुरु झाली. स्वच्छता अभियान, गंगा सफाई, परदेशी संबंधातील सुधारणा, व्यापार-वृद्धी, खेडी व लहान गावांचा विकास, यासाठी नागरिकांचा सहभाग, पोषक वातावरण निर्मिती, त्या बरोबरीने भ्रष्टाचार आणि लपवून ठेवलेला पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदी निर्णय, सरकारचा कर चुकवून परदेशी बँकातील गुंतवलेला काळा पैसा उजेडात आणणे, पावसाचे पाणी अडवा पाणी जिरवा, सौर उर्जा, अशा कामांची सुरुवात झाली. बांगला देशाचा घुसखोरी, अतिक्रमण आणि सीमाप्रश्न  पंतप्रधान झाल्यावर त्यांनी दोन वर्षात मार्गी लावले. सीमा ठरवून घेण्यात आल्या,     
     ‘योग’ हे भारताचे वैशिष्ट्य ! याचे विसरत चाललेले महत्व लक्षात घेऊन भारतात पुन्हा प्रसार करता करता, आंतरराष्ट्रीय स्तरावर योग पोहोचविणे त्यांना आवश्यक वाटले आणि २४ सप्टेंबर २०१४ ला राष्ट्रसंघात केलेल्या भाषणात मोदींनी या बद्दल अपेक्षा व्यक्त केली, तर संयुक्त राष्ट्रसंघाने ११ डिसेंबर २०१४ ला त्याला मान्यताही दिली. २१ जूनचा दिवस हा दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून पाळला जाऊ लागला.

      पुस्तकातल्या, केल्याने देशाटन या प्रकरणात देशात आर्थिक विकास व्हायला हवा असेल तर परदेशी गुंतवणूक  वाढली पाहिजे आणि आपली  निर्यातही वाढली पाहिजे, त्यासाठी मेक इन इंडिया अशी घोषणा देऊन नुसते न थांबता व्यापारवृद्धी साठी प्रयत्न केले. त्यासाठी परदेशी दौरे केले. २०१४ मध्ये ३४ देशांना भेटी दिल्या,२०१५ मध्ये सहा देशांना, तर २०१६ मध्ये अमेरिकेत दौरा केला हे सांगितले आहे. इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, नेपाळ, पाकिस्तान, हे दौरे आंतरराष्ट्रीय संबंध सुधारण्यास कारणी लागले असे म्हणता येईल. याबरोबरच लष्करात, वन रँक वन पेन्शन, जन धन योजना, भारतातील सर्व राज्यात एकच समान कर जी.एस.टी सेवा कर याची योजना, नद्याजोड प्रकल्प, पर्यटन विकास, आरक्षण, बेटी बचाव बेटी पढाव, मेक इन इंडिया आदि महात्वाकांशी उपक्रमांबरोबरच सबका साथ सबका विकास ही मोदींची घोषणा, अशा सगळ्या विषयांची थोडक्यात सामान्य माणसाला समजेल अशी माहिती डॉ.भा.ना.काळे यांनी या पुस्तकात दिली आहे. आपले पंतप्रधान कसे आहेत हे देशातल्या प्रत्येकाला माहिती असणं आवश्यक आहे.

     योजकस्तत्र दुर्लभ: हे पुस्तक नागपूरच्या ज्ञानेश प्रकाशनने प्रकाशित केले आहे. पुस्तकाचा विषयच महत्वाचा असल्याने पुस्तकाबद्दल लिहायचे तर पंतप्रधान मोदींबद्दल व त्यांच्या व्यक्तीमत्वाबद्दल लिहायलाच हवे. देशाभिमानाचा विचार करता आमच्या पंतप्रधानांचा आम्हाला परिचय असायलाच हवा.
 ----------------------------------------------------------------------------------                                                                                                                         

 --- डॉ. नयना कासखेडीकर