Sunday 30 April 2023

विचार – पुष्प ,भाग ६५,मातृभूमीचे पहिले दर्शन

                                                                             उत्तरार्ध

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा,

प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका

विचार – पुष्प ,भाग ६५

मातृभूमीचे पहिले दर्शन

  जहाजाने इंग्लंड सोडले आणि मातृभूमीच्या परतीचा प्रवास सुरू झाला. मनात अनेक स्वप्न बाळगुनच. इतकी वर्षे भारताबाहेरचे प्रगत देश पाहिलेपाश्चात्य संस्कृती अनुभवली, तिथले लोकजीवन पाहिलेत्यांचे सामर्थ्य आणि ऐश्वर्य पाहिले. तिथल्या लोकांचे त्यांच्या धर्माबद्दलचे विचार ऐकले, समजून घेतले, तिथला सुधारलेला समाज जवळून अनुभवला. वेळोवेळी आपला भारत देश आणि त्याच्या आठवणीने त्यांचे मन भरून यायचे. मनात तुलना व्हायचीच, आपल्या देशातले अज्ञान, काही रूढीपरंपरा, दारिद्र्य आठवले की मन दु:खी व्हायचे. पण आपल्या मातृभूमीचा वारसा, अध्यात्म, धर्म, विचार या बद्दल मात्र आदर वाटायचा आणि गौरवाने मान ताठ व्हायची.

   पण बाहेरच्या देशात त्यांना ख्रिस्त धर्म व त्याची शिकवणूक हे आणखी स्पष्ट अनुभवायला मिळत होतं. आता इंग्लंडहून निघून ते फ्रांसला उतरले होते. ख्रिस्त धर्म प्रसाराचा आरंभ जिथे झाला त्या इटलीत . ऐतिहासिक रोमन साम्राज्य आणि तिथल्या परंपरा, जगद्विख्यात चित्रकार लिओ नार्दो द व्हिंची च्या कलाकृती, पिसा चा झुकता मनोरा, उद्याने वस्तु संग्रहालये पाहण्याचा त्यांनी आनंद घेतला आणि काय आश्चर्य तिथे उद्यानात अचानक हेल पतिपत्नीची भेट झाली . दोघेही सुखावले. अमेरिकेत उतरल्यावर प्रथम ज्यांनी घरात आश्रय दिला होता त्यांची ही जणू निरोपाचीच भेट असावी.

     रोमचा इतिहास त्यांनी अभ्यासला होताच. युरोपातले रोम आणि भारतातले दिल्ली ही शहरे मानव जातीच्या इतिहासातल्या महत्वाच्या घटनांचे साक्षीदार असलेली शहरे होत असे विवेकानंदांना वाटत असे.  त्यामुळे रोम मधील सौंदर्य आणि इतिहासाच्या खाणाखुणा सर्व पाहताना ते चटकन संदर्भ लावू शकत होते.संन्यासी असले तरी ते स्वत: कलाकार होते, रसिक होते म्हणून तिथल्या सौंदर्याचे दर्शन घेताना ते आनंदी होत होते.  योगायोगाने ख्रिस्त जन्माच्या दिवशी विवेकानंद रोम मध्ये होते. मेरीच्या कडेवरील बालरूपातील ख्रिस्त आणि आमच्या हिंदू धर्मातील बाळकृष्ण यात विवेकानंदांना साम्य वाटले. आणि मेरीचा मातृरूप म्हणून आदर पण वाटला. आई मेरी आणि बाळ येशू यांच्या विषयी भक्तीभाव मनात तरळून गेला. हेल पती पत्नी विवेकानंदांबरोबर इथे आठवडा भर होती. आणि ही साम्यस्थळांची वर्णने स्वामीजींकडून ऐकून ते दोघे भारावून गेले होते.विवेकानंदांच्या मनात सर्व धर्मांबद्दल आदरभाव होता तो त्यांच्या भाषणातून सगळ्यांनी अनुभवला होता. तरीही काही प्रसंग असे घडत ,की हिंदू धर्माबद्दल गरळ ओकणारे विवेकानंदांना भेटत, याच प्रवासात दोन ख्रिस्त धर्म प्रचारक जहाजावर होते. विवेकानंद त्यांच्याशी अर्थात हिंदू धर्म आणि ख्रिस्त धर्म यांची तुलना आणि श्रेष्ठत्व यावर बोलत होते. विवेकानंद यांच्यापुढे आपला टिकाव लागत नाही असे लक्षात आल्याने ते दोघे आता हिंदू देवदेवता आणि आचार विचार यांची टवाळी करण्यावर आले. स्वामीजींनी या निंदेकडे बराच वेळ दुर्लक्ष केलं.पण आता सहनशक्तीचा अंत झाला आणि स्वामीजींनी एकाची कॉलर पकडून, जवळ जवळ दरडाऊनच दम भरला की आता माझ्या धर्माबद्दल पुढे काही बोललात तर धरून समुद्रात फेकून देईन. त्यामुळे त्या धर्म प्रचारकांचे तोंड गप्प झाले. स्वामीजींना उदार मनोवृत्ती मुळे आपल्या धर्मा बद्दल कोणीही काहीही बोलेल ते आपण ऐकून घ्यायचे मुळीच पटत नव्हते. त्यात त्यांना दौर्बल्य तर वाटायचेच पण, पाश्चात्य देशातील लोकांना धर्मा धर्मातील भेद बाजूला सारून एकाच विश्वधर्माशी पोहोचावे असा विचार त्यांनी दिला होता आणि भारतात मात्र ख्रित धर्म प्रचारकांच्या प्रचारला बळी पडून अनेक हिंदू धर्मांतर करत होते, तर सुशिक्षित समाज याकडे दुर्लक्ष करत होता हे त्यांना अजिबात आवडले नव्हते.

    अशा अनेक गोष्टींना, प्रसंगांना विवेकानंद आपल्या भ्रमण यात्रेत सामोरे जात होते. “नरेन एक दिवस सारं जग हलवेल” असा त्यांच्या गुरूंचा रामकृष्णांचा शब्द खरा करून दाखवलेला हा नरेंद्र सहा वर्षांपूर्वी शारदा देविंचा आशीर्वाद घेऊन निघाला होता तो आता विश्व विजेता होऊन भारतात परतत होता. त्यामुळे त्यांच्या गुरुबंधूंना कोण आनंद झाला असेल ना? स्वामींनी सर्वधर्म परिषदेला शिकागो येथे जाण्यासाठी सर्वांनी कष्ट घेतले होते.ते सर्वजण खूप आनंदले होते. त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी चालू होती. विवेकानंद सुद्धा  मातृभूमीला भेटायला उत्सुक होते. हा विचारच त्यांच्या अंगावर रोमांच उभे करत होता. भारताच्या आत्म्याला जाग आणण्यासाठी पुढे प्रयत्न करून हिमालयात अद्वैताश्रम उभा करायचे स्वप्न आणि योजना त्यांचे मन आखत होते. पंधरा जानेवारी चा सूर्योदय पहिला तो श्रीलंकेच्या किनार्‍यावरचा अर्थात तेंव्हाच्या सिलोन चा. जहाज पुढे पुढे जात होते तसतसे किनार्‍यावरीला नारळीच्या बागा दिसू लागल्या. कोलंबो बंदर लागले. भारताचे दर्शन झाल्याने स्वामीजींच्या चेहर्‍यावर समाधानाचे भाव होतेच. आता उतरल्यावर आपल्या बरोबर आलेले तीन पाश्चात्य सह प्रवासी म्हणजेच पाश्चात्य शिष्य यांची उतरल्यावर राहण्याची सोय करायची हाच विचार त्यांच्या डोक्यात होता.

   कोलंबो बंदरात जहाज थांबले आणि एक नाव घेऊन स्वामीजींना उतरवायला गुरु बंधु निरंजनानंद आणि काही प्रतिष्ठित नागरिक आले. विवेकानंद, सेव्हियर पती पत्नी, आणि गुडविन यांना त्या नावेतून किनार्‍यापर्यंत आणले. प्रचंड जमलेल्या जन समुदायाच्या साक्षीने पी कुमारस्वामी यांनी भला मोठा पुष्पहार घालून स्वामीजींचे स्वागत केले आणि सजवलेल्या घोडा गाडीत चौघांना बसवून त्यांची स्वागताप्रीत्यर्थ मिरवणूक सुरू झाली, हे सर्व अनपेक्षित होतंप्रचंड जल्लोषात स्वामी विवेकानंद यांचे पहिले स्वागत भारतात करण्यात आले.

    रस्त्यावरून जाताना नयनरम्य स्वागत सोहळा अनुभवत होते स्वामीजी,आणि विशेषत त्यांचे पाश्चात्य शिष्य. सुशोभित भव्य कमानी, स्वागत करणारे भव्य फलक, रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या पताका, घरांवर केलेली  सजावटप्रकांड, मंडप, व्यासपीठ, मस्तकावर होणारी पुष्पवृष्टी, मंगल वाद्यांचे स्वर, तमिळ व संस्कृत मध्ये म्हटले जाणारे मंत्र, नागरिकांनी लिहिलेले मानपत्र अहाहा केवढा तो आनंदी सोहळा होता. हा सोहळा उत्स्फूर्तपणे ,प्रेमापोटी होत होता. त्यात उच्च पदस्थापासून सर्व सामान्य लोकांपर्यंत सर्वजण सहभागी झाले होते. एखाद्या धनाढ्याचा प्रायोजित मॅनेज केलेला स्वागत सोहळा नव्हता, तो निष्कांचन असलेल्या एका सन्याशाच्या स्वागताचा सोहळा होता. या संस्कृतीमधून विवेकानंद यांना भारतीय आत्म्याचा एक सुंदर आविष्कार दिसला होता. यात ते आपल्या महान संस्कृतीचे वैशिष्ठ्य अनुभवत होते आणि ते जतन केले पाहिजे असे त्यांना वाटत होते. इथेच सुरू झाली होती त्यांची गौरवयात्रा.

     ही तर सुरुवात होती भारतातल्या स्वागताची. छत्री,अबदागिरी, पताका, निशाणे, वाद्ये, मंत्र पठण, या सर्व पारंपारिक प्रकारांचा समावेश या स्वागतात केला गेला होता. जणू भगवान शिवाचा अवतार म्हणूनच विवेकानंद यांची पुजा केली होती. हा सर्व आश्चर्यकारक स्वागत सोहळा स्वत: गुड्विन यांनी पत्राने बुल यांना कळवला होता आणि म्हटले होते की, स्वामी विवेकानंद यांच्या बरोबर सेव्हीयर पतिपत्नी आणि मी, आम्हा तिघांच्याही वाट्याला हे जिव्हाळा असलेले स्वागत/सन्मान आले.

     त्यानंतर त्यांनी श्रीलंकेतले प्राचीन मोठे शहर अनुराधापुरम, जाफना इथे भेट दिली. २००० लोकांपुढे त्यांचे व्याख्यान झाले. सार्वजनिक सत्कार, मानपत्र३ किलोमीटर लांब रस्त्यावर केळीचे खांब दुतर्फा लावून सुशोभित केलेले. शेकडो लोकांची मशाली हातात घेऊन विवेकानंदांना आणण्यासाठी निघलेली मिरवणूक, त्यात पंधरा हजार लोकांचा सहभाग,आणि आसपासच्या लहान मोठ्या गावातून विवेकानंदांना पहाण्यासाठी अमाप उत्साहात आलेले लोक. त्यात गौरवपर झालेली भाषणे, विवेकानंद यांचे व्याख्यान आणि लोकाग्रहास्तव झालेले सेव्हीयर यांचे भाषण. हे सगळं कशाच द्योतक होतं? हा तर स्वामी विवेकानंद यांच्या बद्दलचा व्यक्त झालेला आदरभाव होता. त्यांच्या कामाची पावती होती. आता सुरू होणार होता पुढचा प्रवास ...(क्रमश:)

-            -      डॉ.नयना कासखेडीकर   

---------------------

  

Friday 21 April 2023

विल्यम शेक्सपिअर आणि जागतिक पुस्तक दिन

 



विल्यम शेक्सपिअर आणि जागतिक पुस्तक दिन

                                           

२३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा होतो. जगातल्या लेखकांचा व पुस्तकांचा सन्मान करणे आणि लोकांमध्ये वाचनाची सवय वाढीस लावणे हा उद्देश असतो.आपणही कुसुमाग्रजांचा जन्म दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून सजरा करतो तसाच, जगातील ख्यातकीर्त इंग्रजी कवी, नाटककार विल्यम शेक्सपिअर यांचा हा जन्म दिवस जगात पुस्तक दिन म्हणून साजरा होतो. हा दिवस सर्वप्रथम युनेस्कोने जाहीर केला. विशेष म्हणजे २३ एप्रिल हा शेक्सपिअर यांचा जन्म दिवस आणि मृत्यू दिवस पण आहे. (२३ एप्रिल, १५६४–२३ एप्रिल १६१६)

      नाट्यतंत्राचा कसून केलेला अभ्यास, अनुभव, अल्पावधीत नाट्य क्षेत्रात मिळालेले व्यावसायिक यश यामुळे शेक्सपिअर यांना ‘फादर ऑफ ड्रामा’ असेही म्हटले जाते. शेक्सपीअर १५९० ते १६१२ या काळात अखंड पणे नाटके लिहीत होता. त्यांच्या नाटकांचे विषय असत ऐतिहासिक, शोकात्मिका,सुखांतिका आणि सुख दुखाचे मिश्रण असणारे रोमान्स.१५९२ ते १५९४ या काळात प्लेगमुळे नाट्यगृहे बंद होती. या काळात विळ्यां यांनी सुंदर काव्य निर्मिती केली. १५९४ मध्ये नाट्यगृहे पुन्हा चालू झाली तेंव्हा किंग्ज मेन नाट्य मंडळीमध्ये शेक्सपिअर झळकला. १५९४ ते १६०३ या काळात त्याने दर वर्षाला दोन नाटके लिहिली. इथून सुरू झाले त्यांचे वैभवचे दिवस.

     अशा जगप्रसिद्ध विल्यम शेक्सपिअर ची मराठी माणसाने आठवण काढलीच पाहिजे. कारण मराठी भाषेत शेक्सपिअर यांची अनेक नाटके आहेत. तीही अत्यंत गाजलेली. अनेक साहित्यिकांनी त्यांच्या नाटकांचा व साहित्याचा अनुवाद मराठीत केला आहे. तो तितकाच मराठी प्रेक्षकांना भावला आहे. अगदी ‘हॅम्लेट’ या नाटकाचं मराठीत गोपाळ गणेश आगरकर, गोविंद कानिटकर, आनंद बर्वे, नाना जोग, भा. द. खेर, परशुराम देशपांडे, नानासाहेब फाटक, सई परांजपे, प्रभाकर देशपांडे, वि.वा.शिरवाडकर(गगनभेदी ) यांनी हॅम्लेट मराठीत अनुवादीत केलाय. कवि मंगेश पाडगावकरांनी रोमिओ अँड जूलिएट केला. वीर वामनराव जोशी यांनी मेझर फॉर मेझर (संगीत झोटिंगशाही), मॅकबेथचा अनुवाद वि वा शिरवाडकर, शि. म. परांजपे, यांनी केला आहे आणि आपल्या सर्वांच्या ओळखीचे वि.वा. शिरवाडकरांचे गाजलेले ,आम्हा प्रेक्षकांनी अत्यंत गौरविलेले ‘नटसम्राट’ नाटक म्हणजेच विल्यम शेक्सपीअर चे ‘किंग लियर’चा अनुवाद. याची मराठीत ९ लेखकांनी भाषांतरे केली आहेत.

   To be? or not to be? that is the question

जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. ह्या दुनियेच्या ऊकिरड्यावर खरकट्या
पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं ?
का फेकुन द्यावं देहाचं लक्तर मृत्यूच्या काळाशार डोहामध्ये?
आणि करावा शेवट सर्वांचा एकाच प्रहाराने? ....


   हे अप्पासाहेब बेलवरकरांचे नटसम्राट मधील स्वगत, मराठी नाट्य रसिक प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करून आहे. ‘नटसम्राट’ हे विल्यम शेक्सपिअर यांच्या कलाकृतीवर आधारित नाटक. आजही अनेक दशकानंतर या नाटकाचे नावीन्य तसेच आहे आणि ते तसेच टिकून राहील. विल्यम शेक्सपियर यांच्या नाट्य पंढरीचा स्वताला वारकरी समजणारे कुसुमाग्रज यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. मानवी जीवनाचा सामाजिक, कौटुंबिक, राजकीय, आणि वैयक्तिक असा धांडोळा घेतला तर जे जे काही मनुष्य स्वभावाचे कंगोरे, उदा. कट -कारस्थाने, विश्वासघात, सत्यता, असत्य, अहंकार, मत्सर आणि लोभ, प्रेमातला संघर्ष,आणि जीवनमूल्ये रंगभूमीवर मांडून ती जगात सगळीकडे सारखीच आहेत हे सिद्ध झालं, ते शेक्सपिअर यांच्या साहित्यामुळेच. म्हणूनच जगातल्या जवळ जवळ सर्वच भाषेत त्यांचे साहित्य भाषांतरित झाले आहे आणि अमर झाले आहे.

   ऑथेल्लो हेही एक नाटक महादेवशास्त्री कोल्हटकर, गोविंद बल्लाळ देवल. वि वा शिरवडकर यांनी अनुवाद केलेलं आहे. त्यांच्या नाटकनवरून ‘हॅम्लेट’, ‘अंगूर’ (हिन्दी) ‘मकबुल’ हिन्दी (मॅक बेथ वर आधारित) आणि ‘ओमकारा’(ऑथेल्लो वर आधारित) हे चित्रपट निघाले आहेत. अंगूर सिनेमा आपण सर्वांनीच पाहिला आहे. हा विनोदी चित्रपट १९८२ मध्ये प्रकाशित झाला. गुलजार यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. याची कथा विल्यम शेक्सपिअर च्या ‘कॉमेडी ऑफ एरर्स’ या नाटकाची आहे. आज हा चित्रपट सर्वश्रेष्ठ विनोदी चित्रपट म्हणून नावाजला जातो.

                                                    

     शेक्सपिअर ची काव्ये आणि नाटके हे दोन साहित्य प्रकार अजरामर झाले आहेत. त्यांचे विशेष काव्य प्रकार म्हणजे सुनीत लिहिली (sonnets १४ ओळींची कविता) शिवाय दीर्घकाव्ये सुद्धा. त्यांनी ३८ नाटके, १५४ सुनीते, दीर्घ कविता, स्फुट कविता असे लेखन केले. शेक्सपिअर ची सुनीत-माला इंग्रजी साहित्यातला बहुमोल अलंकार मानला जातो.

    परभणीचे प्रभाकर देशपांडे तर शेक्सपिअर च्या नाटकाने झपाटलेलेच होते. त्यांनी तर शेक्सपियर यांच्या नाटकांचे अनुवाद केलेले पाच खंडच लिहिले आहेत. त्यात ७ शोकांतिका, ७ सुखांतिका, ७ नाटके, ८ ऐतिहासिक नाटके आणि इतर १५ नाटके असे पाच खंडात लिखाण केले आहे. हे खंड विशेष म्हणजे जागतिक ग्रंथ दिनी म्हणजे २३ एप्रिललाच २०१५ मध्ये प्रकाशित केले गेले. वाईचे गणेश ढवळीकर यांनीही शेक्सपिअरची, मर्चंट ऑफ व्हेनिस, सिंबेलाईन, ऑगस्टस सीझर, मॅकबेथ, हॅम्लेट, लिअर राजा, रोमिओ अँड जूलिएट , टेंपेस्ट ही नाटके कथारूपात मराठीत अनुवादीत केली आहेत.

    विल्यम शेक्सपिअर यांच्या साहित्याने सर्व जगालाच भुरळ पडलेली दिसते. याचा इतका प्रभाव होता की शेक्सपीअर यांच्या साहित्याची सूक्ष्म समीक्षा केली गेली. त्यांनी नाटकातून उभे केलेली पात्रे,काव्ये, प्रतीके, त्यांनी वाप्रलेले शब्द, वृत्त,राज्यशास्त्र, वैद्यक शास्त्र, ज्योतिष, नाट्य शास्त्र, संगीत या सगळ्या विषईंचे ज्ञान यांचा पण अभ्यास केला गेला. शेक्स पियर नाटककार म्हणून मोठा की कवि म्हणून मोठा यावे चर्चा झडल्या, त्यांच्या नाटकातील पात्रांची सूची तयार केली गेली,नाटकातील प्रसंग .घडामोडी आणि व्यक्ति प्रत्यक्षात होऊन गेल्या होत्या का याचा ही शोध घेतला गेला.

    जगातल्या मुख्य भाषा सोडाच पण मराठी सारख्या प्रादेशिक भाषेत पण त्यांच्या साहित्याला स्थान दिल्याचे दिसते. म्हणूनच त्यांच्या जीवनावरील, नाटकांवरील, त्यांच्या विचारांवर, त्यांच्या काळातील इंग्रजी रंगभूमी वर अभ्यास झालेला दिसतो. मग ती शोकनाटये, सुखांतिका, सुनीते, कथा, कविता, त्यांच्या नाटकातील सौंदर्य स्थळे, मराठी नाटक आणि शेक्सपिअर असा सर्वच विषयांचा लेखाजोखा आपल्या मराठी भाषेमध्ये मांडला गेला आहे.

    स्ट्रॅटफर्ड-ऑन-अॅव्हन या शेक्सपीअर यांच्या जन्मगावी त्यांचे स्मारक आहे. अॅव्हन नदीच्या काठावर एक नाट्यगृह, ग्रंथालय व वस्तुसंग्रहालय आहे. यात शेक्सपीअर यांच्यावरील दहा हजारांवरील दुर्मिळ पुस्तके ठेवली आहेत. हस्तलिखिते आहेत. मार्च ते ऑक्टोबर या काळात येथील नाट्यगृहात शेक्सपीअरची नाटके सादर केली जातात. जगाच्या पाठीवरचा हा नावाजलेला कवि आणि नाटककार २३ एप्रिल चा महानायक (हीरो) आहे. अभ्यासकांना आणि वाचकांना एक दिशा देणारे त्यांचे साहित्य आहे. वाचकांनी आपल्या मराठी भाषेतली त्यांची साहित्यकृती नक्की वाचावी, समजून घ्यावी.

(हा लेख काल प्रकाशित झालेल्या 'साहित्य परिमळ' या ई साहित्य पत्रिकेत प्रसिद्ध झाला.हा अंक वाचण्यासाठी लिंक -- https://online.flippingbook.com/view/898043842/ )

- - डॉ. नयना कासखेडीकर
                                                              ----------------------------



Monday 17 April 2023

भाग –६४. मातृभूमिकडे प्रयाण

                                                                           उत्तरार्ध 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा,

प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका

विचार - पुष्प - उत्तरार्ध

भाग –६४. मातृभूमिकडे प्रयाण

                                     

    स्वामी विवेकानंद शिकागो ला सर्व धर्म परिषदेला येण्यापूर्वी भारतात ते परिव्राजक म्हणून फिरले होते आणि आता अमेरिकेत सगळीकडे परिव्राजक म्हणूनच फिरत होते. पण दोन्ही कडचे परिव्राजकत्व खूप वेगळे होते. दोन्हीकडील लोक, शिक्षण, परंपरा, तत्वज्ञान, धर्म, अध्यात्म ,विचार व मूल्य ,आर्थिक परिस्थिति सगळच वेगळं. इथे वैयक्तिक भेटीतून त्यांनी तळागाळातील भारत समजून घेतला तसच, आता दीड वर्षापासून ते अमेरिकेत फिरत होते. तेथेही भेटी घेणे, विविध चर्चा,भाषणे, सार्वजनिक ठिकाणची व्याख्याने, तिकडच्या विद्वान लोकांच्या भेटी, नामवंतांशी झालेल्या चर्चा, यामुळे तिकडची संस्कृती, ते लोक याचा जवळून परिचय होत होता. अनेक कुटुंबे विवेकानंद यांच्याशी पर्यायाने हिंदू तत्वज्ञानशी जोडले गेले होते. तिथल्या वृत्तपत्रातून विवेकानंद यांच्या विषयी अनेक वर्णने छापून आल्यामुळे लोकांना त्यांचा परिचय व्हायचा. त्यांच्या भेटीनंतर आणि ओळख पटल्यानंतर पाश्चात्य संस्कृतीतल्या स्त्रिया सुद्धा विवेकानंद यांच्याकडे मातृभावाने बघू लागल्या होत्या. भारतात जसे त्यांचे शिष्यगण तयार झाले होते तसे आता अमेरिकेत सुद्धा लोकांचा यातला रस वाढू लागला होता.त्यातून अनेक शिष्य ही तयार झाले.

सुरूवातीला सर्व धर्म परिषदेपर्यंत त्यांना कोणी ओळखतही नव्हते, नंतर मात्र ते तेंव्हापासून आणि नंतरही विद्वानात सुद्धा चांगलेच परिचित झाले. एक मानाचे स्थान त्यांना प्राप्त झाले होते. सुरूवातीचे विषय सुद्धा हिंदू धर्माचे प्रतिनिधी याच नात्याने असत. खरा हिंदू धर्म समजून सांगणे, गैरसमज दूर करणे, हेच उद्दिष्ट्य त्यांनी ठेवलेले दिसते.

आता स्वामीजींनी अमेरिकेचा निरोप घेऊन पुढच्या कार्याला लागायचे ठरवले होते, अनेक जणांना पत्र लिहून निरोप दिला. पंधरा एप्रिलला न्यू यॉर्क हून लिव्हरपुल ला निघाले.  बरेच जण जहाजावर निरोप द्यायला आले होते. आधी भारतात अडीच वर्षे परिव्राजक म्हणून ते फिरले, तसे अमेरिकेत सुद्धा जवळ जवळ ते अडीच वर्षे फिरले. आता ते इथून इंग्लंड ला निघाले होते. एस.एस. जर्मनीक जहाजाने किनारा सोडून अमेरिकेचा भूप्रदेश दिसेनासा होईपर्यन्त ते बाहेर उभे होते. या अमेरिकेच्या भूमिने आपल्याला काय काय दिले याचा लेखा जोखा मांडत.         

  स्वामीजी इंग्लंड ला पोहोचले. इथे एक आनंदाचा प्रसंग स्वामीजींनी अनुभवला. तो म्हणजे, पाच वर्षांनंतर गुरुबंधू सारदानंद यांची इंग्लंड मध्ये भेट. भारतभ्रमण सुरू होताना ते भेटले त्यानंतर स्वामीजींना अमेरिकेतील वास्तव्यात आलेले अनुभव, मिळालेले यश आणि किर्ती हे सारे बघून सारदानंद केव्हढे आनंदी झाले असतील याची कल्पना आपण करू शकतो. स्वामीजींना खूप वर्षानी आपल्या मातृभाषेत बंगालीत बोलायला मिळाले याचाही आनंद होता. पत्रव्यवहार होत असला तरी अनेक गोष्टी आता प्रत्यक्षात एकमेकांशी बोलायला मिळत होत्या त्याचे एक समाधान होते दोघांना. ही भेट झाल्यानंतर स्वामीजींनी आपल्या सर्व गुरुबंधूंना उद्देशून सविस्तर पत्र लिहिले, त्यात मठातील दैनंदिन व्यवहार कसा असावा, त्याचे नियम काय असावेत, मी भारतात परत आल्यानंतर आपल्याला एक संस्था उभी करायची आहे ती कशी असेल, त्याचे ध्येय काय असेल, ती कशी चालवायची, याचे चिंतन होते. ही संस्था म्हणजेच रामकृष्ण मिशन ची तयारी होय. रामकृष्ण मिशन चे काम पुढे कसे वाढले आणि त्याचा प्रसार कसा झाला हे आज आपण रामकृष्ण मठ आणि मिशन चे कार्य बघितले की कळते.



       इंग्लंडला जशी सारदानंदांची भेट झाली तशीच अचानक स्वामीजींचे लहान भाऊ महेंद्रनाथ यांची पण अनपेक्षित भेट झाली, ही बंधुभेट फार फार महत्वाची होती, कारण संन्यास घेतल्यापासून नरेंद्र ने घर सोडले होते, त्यानंतरची घरातली परिस्थिति, आर्थिक विवंचना, त्यांच्या आईना झालेला अत्यंत क्लेश, आणि आलेले सर्व वाईट अनुभवांचे महेंद्रनाथ दत्त साक्षीदार होते. म्हणून अनेक स्थित्यंतरांनंतर ही दोन भावांची भेट याला महत्व होते. महेंद्रनाथ वकिलीचा अभ्यास करायला इंग्लंडला आले होते. महेंद्रनाथांनी लिहीलेल्या लंडने स्वामी विवेकानंद या पुस्तकात या बंधुभेटीचा वृत्तान्त लिहिला आहे, महेंद्रनाथ दत्त हे पुढे ग्रंथकार म्हणून ओळखले जाऊ लागले. नरेंद्रचे (स्वामीजींचे)सर्वात धाकटे भाऊ भुपेंद्रनाथ दत्त बंगाल मधील सशस्त्र क्रांतिकारक चळवळीत सहभागी झाले. युगांतर मासिकाचे ते संपादक होते. अमेरिकेत ते पी एच डी झाले. त्यांनीही अनेक ग्रंथ लिहिले. नंतर ते साम्यवादी विचारांचे खंदे कार्यकर्ते आले, स्वामीजींचे चरित्र पण त्यांनी लिहिले आहे आणि द्रष्टा देशभक्त म्हणून स्वामीजींची प्रतिमा त्यातून त्यांनी उभी केली आहे. भुवनेश्वरी देवी आणि विश्वनाथ दत्त यांची तीन मुले, एक संन्यासी, एक ग्रंथकार, आणि एक साम्यवादी असे तीन दिशांनी कार्य करणारे कीर्तीवंत असे पुत्र होऊन गेले.

  लंडन मध्ये स्वामीजींनी वर्ग सुरु केला होता. तिथे सीसेम क्लब नुकताच वर्षभरापूर्वी स्थापन झाला होता. बुद्धिजीवी आणि विचारवंत स्त्रिया आणि पुरुष असा दोघांचा हा क्लब होता. शिक्षणाचा सर्वांगीण विचार असा त्याचा उद्देश होता. त्यात आठवड्यातून एक दिवस साहित्य विषयक चर्चा होत असे. ठरलेले वक्ते येऊ शकणार नव्हते म्हणून स्वामी विवेकानंद यांना व्याख्यानासाठी अचानक बोलवण्यात आले. तिथे त्यांनी मांडलेले विचार फार महत्वचे होते. शाळेत दिले जाणारे भौतिक विद्येच्या क्षेत्रातील शिक्षण शेवटपर्यंत थेट पोहोचले पाहिजे. कारण स्वामीजींच्या मते समाजातील अज्ञान दूर करण्याची ही पहिली पायरी होती. आणि मानवामध्ये सुप्त असलेले पूर्णत्व प्रकाशात आणणे ही शिक्षणाची फलश्रुति होती. धर्माईतकेच शिक्षणाला महत्व आहे आणि धर्माचा जसा व्यापार होता कामा नये तसाच,  शिक्षणाचा बाजार होता कामा नये, असा स्वामी विवेकानंद यांचा दृष्टीकोण होता. भारतातील प्राचीन गुरुकुल पद्धती त्यांना आदर्श वाटत होती.

युरोप मध्ये प्रवास चालू होता, आता तर अभेदानंद हे गुरुबंधु पण स्वामिजिना भेटले. मूलर यांच्याकडे विवेकानंद राहत होते तिथे अभेदानंद आलेले पाहताच स्वामीजींना कोण आनंद झाला होता. जूनलाच  स्वामीजींचा भारतात निरोप गेला होता की “कालीला ताबडतोब पाठवून द्या”. मग काय? स्वामीजी आणि काली पुढचे पंधरा दिवस वेदान्त विचाराच्या प्रसाराचे कार्य आणि फक्त त्याचीच चर्चा, असे आनंदात दिवस गेले. अभेदानंद सर्व वेद ग्रंथ, शतपथ ब्राह्मण, काही सूत्र ग्रंथ, असे अनेक ग्रंथ घेऊन आले होते. ही सर्व पुढच्या कामाची तयारी होती. सार्‍या मानव जातीला एक नवी दिशा द्यायची आहे असे स्वप्न स्वामीजींनी बघितले होते. आता विवेकानंद यांचे परदेशातील वास्तव्य संपत आले होते. इंग्लंड मध्ये अभेदानंद आणि  अमेरिकेत सारदानंद पुढचे काम बघणार होते. स्वामी विवेकानंद आता आपल्या मातृभूमिकडे परत येणार होते, ते जवळ जवळ साडे तीन वर्षांनंतर, त्यांना निरोप द्यायला सगळे जमले होते. १६ डिसेंबर १८९६ रोजी स्वामीजींनी इंग्लंड चा किनारा सोडला. मातृभूमी त्यांना बोलवत होती. 

(क्रमश :) 

© डॉ.नयना कासखेडीकर    

                                             -------------------