Thursday 22 April 2021

वसुंधरा दिवस

 वसुंधरा दिवस

आज  जागतिक ‘Earth Day’ म्हणजेच  ‘वसुंधरा दिवस’

समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले

विष्णु पत्नी नमस्तुभ्यं पाद: स्पर्शं क्षमस्वमे  ॥

      रात्रभरची विश्रांति झाल्यावर आपण उठतो, पाय भूमिवर ठेऊन उभे राहतो आणि क्षमायाचना करतो त्यावेळेसचे हे संबोधन आहे. यात विष्णु पत्नी म्हणजे पृथ्वीदेवीची स्तुती केली आहे आणि माझ्या पायांचा स्पर्श तुला होणार आहे, म्हणून मी तुला नमस्कार करतो, मला क्षमा कर अशी विनंती पण या पृथ्वीला केलेली आहे. तसं पाहिलं तर पृथ्वी हा सूर्यमालेतला जीवसृष्टि धारण करणारा एकमेव ग्रह आहे. मग इथे देवत्व कशाला बहाल केलंय असा सामान्यजनांना प्रश्न पडेल. पण कृतज्ञता व्यक्त करणे हा आपल्या संस्कृतीचा स्थायी भाव आहे आणि म्हणून सूर्य, चंद्र, अग्नी, जल, वायु यांना आपण महत्व देतो.    

    हिंदू धर्मात पृथ्वीला विष्णुपत्नी लक्ष्मी मानले गेले आहे. ऋग्वेद, अथर्ववेद, भूमी सूक्त आणि इतर ग्रंथात पृथ्वीचा उल्लेख आढळतो. पृथ्वीची अनेक नावे आहेत. भूमी, भुवनी, भुवनेश्वरी, अवनी, वसुमती, वसुधा, वसुंधरा, वैष्णवी, विष्णुपत्नी, द्यावापृथिवी इत्यादी. आपण पृथ्वीला धरतीमाता म्हणतो तसे, फक्त भारतातच हे महत्व नाही, तर इंडोंनेशियात सुद्धा पृथ्वीला राष्ट्रीय महत्व आहे. पृथ्वी देवतेची( Ibu Pertiwi ) मूर्ती त्यांच्याकडे पण आहे.

 

इंडोनेशिया ची पृथ्वी देवता 

     धरतीमाता आपली पोषणकर्ती आहे असे मानले जाते आणि ते खरंच आहे. पृथ्वी मानवाचे निवासस्थान आहे. मनुष्याच्या विविध गरजा भागवण्यासाठी लागणार्‍या सर्व वस्तु त्याला पृथ्वी मधूनच मिळतात. साधं अन्न, वस्त्र, निवारा या मूळ गरजासुद्धा पृथ्वीपासून मिळणार्‍या द्रव्य/ वस्तूंपासूनच मिळत असतात. ही द्रव्य  जमिनीतून महासागरातून आणि वातावरणातून मनुष्याला मिळत असतात. गोडे पाणी, शेतजमिनी, खनिजपदार्थांचे साठे, प्राणिसृष्टी, जंगले आणि कुरणे यापासून औषधे ते पोलादापर्यंतच्या सर्व वस्तु बनवता येतात. जमिनीवरील या साधनसंपत्तीप्रमाणे सागरी संपत्तीचा उपयोग आणि वातावरणातून मिळणा-या प्राणवायू (ऑक्सीजन), नत्रवायू (नायट्रोजन) यांचाही उपयोग होत असतो. मानवाला निसर्गाकडून मिळणारी ही साधनसंपत्ती आहे. सर्व जीवनोपयोगी वस्तु पृथ्वीपासूनच मिळत असल्याने कृतज्ञतेपोटीच प्राचीन काळापासून पृथ्वीची प्रार्थना केली जाते. म्हणूनच शांखायन अरण्यकात पृथ्वीला वसुमती म्हटलेलं आहे. म्हणजे संपत्तीने परिपूर्ण अशी. या संपत्तीचा उपयोग आदिमानव करत होता. तो त्यावर अवलंबून होता आणि आजपण मानव तितकाच या नैसर्गिक साधन संपत्तीवर अवलंबून आहे, जरी सुखसोयीसाठी असंख्य साधने त्याने निर्माण केली असली तरीही.          

                                   
      नुसती पृथ्वीवरची भुस्वरूपे बघितली तरी, पर्वत, दर्‍या, खचदर्‍या, समुद्र, उपसागर, आखात, भूशिरे, ज्वालामुखी बेटे, किनारे, सरोवरे, नद्या, हिमनद्या, त्रिभुज प्रदेश, वाळवंटे इतकी आहेत. या सगळ्यांवर भरती, ओहोटी, लाटा, पाऊस, प्रवाह, जमीन वर उचलली जाणे/खचणे, हवामान बदल, ज्वालामुखी, भूकंप यांचा परिणाम महासागर आणि जमिनीवर नैसर्गिकपणे होत असतोच. त्यात मानवाने भौतिक विकास करून यावर परिणाम करणार्‍या घटकांची आणखी भर घातली आहे. ग्लोबल वॉर्मिंग सर्वजण जाणतो. त्याचप्रमाणे प्रदूषण ही एक अक्राळविक्राळ जागतिक समस्या झाली आहे. याचे मूळ कारण म्हणजे निसर्गाचा बिघडलेला समतोल. नैसर्गिक साधन संपत्तीचा अतिवापर आणि गैरवापरसुद्धा हा समतोल ढळायला कारणीभूत  आहे.     

     भौतिक सुखाचे जग हा विकास वाटत असेल तर आधी जमिनीवर या म्हणजे पृथ्वीवर या, ती आहे म्हणून आपण आहोत. आधी तिला वाचवा. पृथ्वी म्हणजे पाणी, वन्यप्राणी, वनश्री, प्रदूषण आणि याच्याशी संबधित सर्व काही आले. प्लॅस्टिक, कागद, इलेक्ट्रोनिक कचरा यांचा अमर्याद वापर वाढला आहे. हवा, पाणी आणि आवाज प्रदूषण वाढलं आहे. आज कोरोंना साथी मध्ये आपण रोज बघतोय की जगण्यासाठी श्वास घेणं किती महत्वाच आहे. शुद्ध हवा अर्थात ऑक्सीजन किती आवश्यक आहे, सतत काही ना काही नैसर्गिक संकटामुळे जागतिक पातळीवर पृथ्वीला वाचवण्याची चर्चा होते, विचार होतो. काही काळाने ते हवेत विरून जाते, पुन्हा रहाटगाडगं चालू आणि मग वर्षातून एक दिवस डे आला की पुन्हा त्याचा एक दिवस विचार. असा पृथ्वी वाचवण्याचा डे साजरा होतो दरवर्षी.                

     सन १९७० पासून हा अर्थ डे जगभर साजरा केला जातोय. जगातील पहिला अर्थ डे साजरा झाला २२ एप्रिल १९७० ला अमेरिकेत. अमेरिकेतल्या विस्कॉन्सिन राज्यातील तेंव्हाचे सिनेटर गेलार्ड नेल्सन यांनी पुढाकार घेऊन, संपन्नतेचे लक्षण म्हणून गाड्या असणे व त्याच्या इंधनाच्या धुरामुळे वातावरणाला कसा धोका आहे, हे त्यांनी लाखो लोकांसमोर आणले. तेंव्हापासून हा दिवस अर्थ डे म्हणून पाळतात. त्यासाठी स्वच्छ हवा, पाणी व दुर्मिळ सजीवांच्या जाती यांच्यासाठी कायदा करण्यात आला. १९९० मध्ये हा दिवस जागतिक पातळीवर वसुंधरा दिवस म्हणून साजरा होऊ लागला. सन १९९० च्या वसुंधरा दिनामुळे टाकाऊ वस्तूंवर पुनर्प्रक्रिया करून त्यांचा पुनर्वापर करण्याच्या (रिसायकलिंग) विषयाला जागतिक पातळीवर चालना मिळाली. २००० पर्यंत १८४ देशांत हा दिवस साजरा होऊ लागला. आज तर पृथ्वी वरील सर्व मानव जातीला पर्यावरणाचा ऱ्हास, पृथ्वीचे वाढते तापमान, नैसर्गिक संकटे याचे परिणाम भोगावे लागले आहेत, लागत आहेत आणि आता काही तरी ठोस उपाय करण्याची वेळ (कधीच) आली आहे. यावर्षी ची Earth Day ची संकल्पना  आहे 'Restore our Earth'

                 

    मनुष्याच्या कचरा करण्याच्या आणि अस्वच्छता करण्याच्या प्रवृत्तीचा फटका आपल्या प्राचीन स्थळांना, देवालये, वास्तू, नद्या, समुद्र, गड, टेकड्या, पर्वत, किल्ले, लेणी, जंगले, पशु पक्षी, प्राणी, शहरे, गावे, आणि  मनुष्याला स्वतःला बसतोय. ‘विज्ञान- शाप कि वरदान’ ? या विषयावर शाळेत असताना डोकं लढवून लढवून  निबंध लिहिला होता आम्ही. तो अज्ञानी असताना. मात्र सज्ञान झाल्यावर आम्हाला घरटी प्रत्येकी एक टू व्हीलर घ्यावी लागली. गरज होती ती. ग्लोबल वार्मिंग मुळे तापमान खूप वाढलं, सिमेंटच्या घरांत असह्य होतं,  AC,  कुलर घ्यावाच लागला. गरज होती ती. बँका आणि फायनान्स कंपन्या कर्जाच्या जाहिराती आणि सूट, सहज मिळणारं कर्ज आणि घरापासून लांब असणारी नोकरी व शाळा यासाठी फोर व्हीलर घ्यावीच लागली. गरज होती ती. याच भौतिक गरजा पर्यावरणात असमतोल निर्माण करताहेत. त्यामुळे वायू प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण प्रचंड वाढलं आहे. लोक जिथे जिथे जातात तिथे तिथे बेजबाबदारपणे वागतात. अगदी समुद्रसपाटीपासून उंच असणार्‍या जगातला एव्हरेस्टचा माथासुद्धा सुटला नाही यातून. चीन, अमेरिका व रशियातील गिर्यारोहक तुकड्यांनी तिथला कचरा टनाने खाली आणून त्याची विल्हेवाट लावली.

     एका जागतिक सर्वेक्षणांनुसार आपल्या पृथ्वीवरची किमान १५ कोटी झाडे दरवर्षी नष्ट होत आहेत. म्हणजे ५६ एकर वरील जंगल एका मिनिटाला नष्ट होत आहेत. हा वेग पाहता भविष्य कसे असेल आपले याचा विचार केलाच पाहिजे. मानवाच्या भौतिक प्रगतीच्या हव्यासापोटी पृथ्वीची काय अवस्था झाली आहे हे वेगवेगळे प्रदूषण पाहिले की लक्षात येते. साधं पाणी म्हंटलं की त्याचे प्रदूषण मानव निर्मित आहे, नद्या, नाले, ओढे, तलाव, समुद्र बघितले की त्यात टाकण्यात येणारं प्रदूषित पाणी, प्लॅस्टिक कचरा, वस्तु आणि आपल्या देशातल्या गणपती, दुर्गा उत्सवात व धार्मिक उत्सवात प्रचंड प्रमाणात टाकण्यात येणारे निर्माल्य आणि विसर्जन होणार्‍या मूर्ति पाणी प्रदूषित करतं. रस्त्यावरून धावणारी असंख्य वाहने, औद्योगिक कारखान्यातील धूर यामुळे प्रदूषित होणारी हवा मनुष्यासाठी घातक आहे. जगाच्या पातळीवरचा विचार जाऊ द्या, आपण आपल्या स्थानिक पातळीवर, आपल्यापासून विचार केला पाहिजे. अर्थ डे वर्षातून एक दिवस साजरा करण्यापेक्षा आपल्या दैनंदिन जीवनात रोजच याचा विचार झाला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीतून प्रत्येकजण खूप काही करू शकतो.

    आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी रस्त्यावर काहीही फेकण्याची सवय सोडली पाहिजे. असे प्रत्येकाने स्वत:पासून सुरू केले तर आपली पृथ्वी /वसुंधरा मोकळा श्वास घेईल, नुसती तिची /लक्ष्मीची पुजा करून हे साध्य होणार नाही.

संतवाणीत संतश्रेष्ठ तुकारामांनी केलेलं पृथ्वीचं वर्णन बघा,     

                                           वृक्षवल्ली आम्हा सोयरीं वनचरी |

पक्षी ही सुस्वरे आळविती ||

येणे सुखे रुचे एकांताचा वास |

नाही गुण दोष अंगा येत ||

आकाश मंडप पृथुवी  |

रमे तेथे मन क्रीडा करी ||

 

कंथा कुमंडलू देह उपचारा |

जाणवितो वारा अवसरू ||

हरिकथा भोजन परवडी विस्तार |

करोनी प्रकार सेवूं रुची ||

तुका म्हणे होय मनासी संवाद |

                 आपुलाची वाद आपणांसी || - संत तुकाराम

     त्या काळातले निसर्गाच्या सान्निध्याचे वर्णन संत तुकाराम करतात. मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतात. तसंच श्रीसमर्थ रामदासांनी दासबोधामध्ये पण वर्णन केलं आहे की, “पृथ्वी रत्नांची खाण आहे, इथली जीवसृष्टि विविध आहे, झाडे झुडपे, वृक्ष वेली, जीवजंतु याने पृथ्वी नटून गेली आहे. या वृक्षवेलींमध्ये अनेक गुणकारी औषधे आहेत”. 

     जग १९७० ला या बाबतीत जागं झालय, पण वसुंधरेचा विचार आपल्या संस्कृतीत प्राचीन काळापासून आहेच. संतांचं हे चारशे वर्षापूर्वीचे हे वर्णन आहे . आज इतक्या वर्षानी आपण कुठे पोहोचलो आहोत याचा विचार आपण अंतर्मुख होऊन करायला हवा आणि म्हणूनच, सुखाच्या मागे लागलेल्या मानवाला जागृत करण्यासाठीच हा वसुंधरा दिवस साजरा केला जातो. तेंव्हा सुख कशाला मानायचं याची व्याख्या प्रत्येकाने करावी, ते ओरबाडून घेऊ नये, समाधानी राहावं. आपल्याला जगविणार्‍या या पृथ्वी देवते/वसुंधरे समोर नतमस्तक व्हावं. तिचा बर्थ डे फक्त २२ एप्रिलला करू नये तो रोज साजरा करावा. तिचं संवर्धन करण्यात आपला वाटा उचलावा, आपलं कर्तव्य करावं एव्हढीच कळकळीची विनंती !  ( हा लेख आजच्या सोलापूर तरुण भारत वृत्तपत्रात पान 2 वर प्रसिद्ध झाला आणि विश्व संवाद केंद्रा तर्फेही प्रसिद्ध झाला.तसेच news24pune या वेब पोर्टल वर पण प्रसिद्ध झाला.)सर्व फोटो इंटरनेट वरून साभार . 

   ©- ले - डॉ.नयना कासखेडीकर  

                                                -----------------------------  

Tuesday 13 April 2021

संवत्सर प्रतिपदा

 

                              संवत्सर प्रतिपदा

          चैत्र शुद्ध प्रतिपदा , श्री शालिवाहन शके १९४३

                           ब्रह्मध्वज नमस्तेऽस्तु सर्वाभीष्टफलप्रद।
                   प्राप्तेऽस्मिन्‌ वत्सरे नित्यं मग्द्ऋहे मंगलं कुरु।।

   संवत्सर प्रतिपदा ! चैत्र शुद्ध प्रतिपदा, म्हणजे वर्षारंभाचा दिवस. याच दिवशी सृष्टीच्या निर्मात्याने, ब्रम्हदेवाने युगारंभ केला, कृतज्ञता म्हणून गुढी अर्थात ब्रम्हध्वज पूजन करण्याची पद्धत आहे. हा वसंत ऋतूच्या आगमनाचा दिवस सुद्धा. आपल्या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदा, साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो.

                                     

     गुढीपाडवा हा ऋतुंवरून प्रचारात आलेला आपला सण आहे. त्याच बरोबर त्याला धार्मिक अधिष्ठान पण आहे. तर पर्यावरण संदर्भ सुद्धा आहे. चैत्रापासून पुढील चार महीने सर्व प्राणिमात्रांसाठी जलदान करावे, पाणपोई बांधावी. किंवा रोज एकाच्या घरी माठ भरून पाणी नेऊन द्यावे ई ...  इथे धार्मिक दृष्ट्या दान म्हटले असले तरी दान म्हणजे समोरच्याला मदत किंवा त्याची सोय करणे असा आहे. इथे हा पर्यावरण वादी दृष्टीकोण दिसतो. हे चार महीने उन्हाळा असतो. जसे मनुष्य प्राण्याला उन्हाचा त्रास होतो, तसे प्राणी आणि पक्ष्यांना पण होतो. झाडांना पण होतो. एरव्ही सुद्धा आपण आपल्याकडे भर उन्हात कोणी आलं, अगदी पोस्टमन, सिलिंडर घेऊन येणारा, कुरीयर वाला, किंवा कुणीही घरी आल्यानंतर त्याला प्रथम पाणी देण्याची पद्धत आहे. उन्हाळा असेल तर द्यायलाच हवे. हाच धर्म आहे म्हणजे कर्तव्य आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला मत्स्य जयंती आहे असे मानतात म्हणून पाण्याचे महत्व आहे. पाण्याशिवाय मासा जिवंत राहू शकत नाही हे सर्वांना माहिती आहेच. 

   पाडवा म्हणजे नव निर्मितीचा आरंभ होण्याचा दिवस असतो. पाडव्याला वर्षारंभीच सर्वांचे आशीर्वाद घ्यायचे आणि आपली कर्तव्ये करण्यास सुरुवात करायची असते. यात अनेक गोष्टी येतात. पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेताची मशागत करून ठेवणे, पाऊस यदा कदाचित कमी झालाच तर त्याची सोय म्हणून विहिरी, पाट, तलाव यांची नीट सोय करून ठेवणे, दुष्काळाची शक्यता लक्षात घेऊन धान्य, चारा यांची साठवण करून ठेवणे. बी बियाणे आणून ठेवणे अशी कामे पावसाळयापूर्वी उरकून ठेवायची असतात. तर नव्या गोष्टींचा आरंभ या दिवशी करतात.               

    वसंताचे आगमन होणार्‍या काळात शरीराला थंडावा देणार्‍या कडुनिंबाचे महत्व चैत्र प्रतिपदेला असते. आरोग्यास हितवर्धक, पचन क्रिया सुधारणारा, पित्तनाशक, त्वचा रोग बारा करणारा, शिवाय धान्यातील किडेचा नायनाट करणारा कडूनिंब आयुर्वेद दृष्ट्या महत्वाचा आहे म्हणून त्या दिवशी कडुनिंबाची पाने खायची प्रथा आहे. उन्हाळ्यात आरोग्य सांभाळण्याची ही प्रथा उपयोगीच आहे. 

    शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळविला तो याच दिवशी. म्हणूनच शालिवाहन शक सुरू झाले आणि हा दिवस विजयोत्सव म्हणून लोक साजरा करू लागले. असाच विजयदिवस लंकाधिपती रावण वधानंतर, प्रभू श्रीराम अयोध्येला चौदा वर्षानी परत आले तो विजय आणि आनंदोत्सव म्हणून घरोघरी ब्रम्ह ध्वज /गुढ्या तोरणे उभी केली. ही गुढी /ब्रह्म ध्वज आनंदोत्सवाची द्योतक आहे. कवी योगेश्वर अभ्यंकर यांचं भावगीत तुम्हाला स्मरत असेल. श्रीरामांच्या स्वागतासाठी अयोध्या कशी सजली होती, लोकांना किती आनंद  झाला होता याचं हे वर्णन खूप बोलकं आहे.    

विजयपताका श्रीरामाची, झळकते अंबरी,

प्रभू आले मंदिरी .

गुलाल उधळून नगर रंगले, भक्त गणांचे थवे नाचले,

राम भक्तीचा गंध दरवळे,

गुढ्या तोरणे घरोघरी ...

   अशा उत्साहात लोकांनी हा आनंदउत्सव साजरा केला असल्याचा उल्लेख रामायणात आहे.

अशी ही उत्सवी काठी किंवा गुढी यांचे पूजन इतिहासात सांगितले आहे. उत्सवी काठीचा उल्लेख एक प्राचीनतम पुजा म्हणून इतिहासात आढळतो. आपल्या सारखाच इतर देशात काठीपूजा /ब्रम्ह ध्वजपूजन /गुढी पूजन करण्याची परंपरा होती. दक्षिण आफ्रिकेत दामारा जमाती मध्ये ,सायबेरियातील सामोयीड्स मध्ये, इस्रायल मध्ये, युरोप मध्ये ख्रिश्चन पूर्व काळात मेपॉल काठी उत्सव, पॅसिफिक क्षेत्रात, कुक बेटावर आदिवासींचा काठी पुजा उत्सव, तसंच, युनान, व्हिएतनाम, कोरिया, म्यानमार या ठिकाणी काठी उत्सवांची परंपरा होती. भारतीय उपखंडात याला निरनिराळी नावे आहेत. नेपाळमध्ये काठी उत्सव, आसाम मध्ये बास पुजा, मणीपुर त्रिपुरा मध्ये काठी पूजा, बलुचिस्तानात, राजस्थान, मध्यप्रदेश, तर ओरिसा मध्ये तर आदिवासींची खंबेश्वरी देवीची पूजा ही काठी पूजा असते.

आपल्या या प्राचीन परंपरेचे उल्लेख महाराष्ट्राच्या अनेक साहित्यात सुद्धा दिसतात. अगदी म्हाइंनभट्ट यांच्या लिळा चरित्र ग्रंथापासून ,संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, संत नामदेव, संत जनाबाई, संत चोखा मेळा, संत एकनाथ, संत तुकाराम यांच्या अभंगात गुढीचा उल्लेख सापडतो.     

   गेल्या वर्षीचा गुढीपाडवा कोरोंना साथी मुळे अत्यंत चिंतायुक्त वातावरणात झाला. लॉकडाउन मध्ये झाला. जरा परिस्थिति सुधारते असं वाटत असतानाच आता पुनः दुसरी लाट सदृश्य परिस्थिति निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदाचा पाडवा सुद्धा चिंतेत च साजरा होणार/किंवा कसा होईल हे सांगता येत नाही. पण मागच्या वर्षी पेक्षा या पाडव्याला सगळ्या राम भक्तांच्या मनात सुखद आनंदाची लहर आहे, ती रामजन्मभूमीचे काम सुरू झाल्याची. २०ऑगस्ट २०२० ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येमध्ये राम मंदिराचा भूमिपूजन सोहोळा पार पडला होता. या वेळेचं वातावरण म्हणजे अयोध्यावासीयांची दिवाळीच होती जणू. संकट काळात भक्तांच्या मनाला, उभारी देणार्‍या श्रीरामांच्या मंदिराची निर्मिती होणार आहे . मग यंदा आम्हाला घरातच राहून, कुठल्याही तयारी शिवाय हा उत्सव साजरा करावा लागणार असला तरी मन या गोष्टीने आनंदी असणार आहे हे नक्की. दु:खाच्या आणि चिंतेच्या मन:स्थितीत मनाचा एक कोपरा आनंदी असणार आहे हे या परिस्थितीत सकारात्मकता वाढवणारे असेल.

    हे राम मंदिर उभे करण्यात सर्व लोकांचे समर्पण भावाने दान आले आहे. लोकांच्या सहभागातून हे मंदिर उभे राहणार आहे हे याचे विशेष आहे. एक विशेष नोंद घ्यावीशी वाटते ती म्हणजे, या मंदिरात त्या शिवाय अध्ययन केंद्र असणार आहे. ग्लोबल एनसायक्लोपेडिया ऑफ द रामायण अर्थात रामायण विश्व महाकोशाचे खंड तयार होणार आहेत. यात पुरातत्व, इतिहास, सर्व संस्कृतिक, साहित्यिक दृष्टीकोणातून माहिती असणार आहे, तसेच अयोध्याच्या इक्ष्वाक्षू वंशाची सर्व ६५ राजांची माहिती असेल. असे अनेक खंड, जवळ जवळ २०० खंड, अभ्यासकांसाठी उपलब्ध होणार आहेत. त्यांचे इंग्लिश. हिन्दी, तामिळ अशा भाषांतून भाषांतर होणार आहे. जगातल्या २०५ देशातील रामायणाचे मूर्त-अमूर्त माहिती या कोशात असेल. तो तयार करण्यासाठी सर्व राज्यातील विद्वान सहभागी होतील. सर्व भाषेतील, सर्व परांपरतील, सर्व लोककथातील भगवान श्रीरामाची माहिती यात सर्वांना वाचायला मिळेल. असे नियोजन अयोध्या शोध संस्थान तर्फे करण्यात आले आहे. ही फार मोठी आणि महत्वाची निर्मिती होईल असे मला वाटते. कारण या विषयाच्या संशोधनासाठी अभ्यासकांना महत्वाचे संदर्भ उपलब्ध होणार आहेत.   

रामायणात विज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय आहे. यातील सर्व घटनांमध्ये श्रीरामांनी स्वताला मानवी मर्यादेमध्ये सिद्ध केलं आहे. त्यात मार्गदर्शक तत्वे आहेत. म्हणून ती आज लागू आहेत. 

चैत्रांगण रंगावली 
या संवत्सर सणाची भारतात विविध प्रांतात, विविध नावे आहेत. आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यात या नव वर्ष संवत्सरास उगादी म्हणतात. तामिळ मध्ये पुथंडू म्हणतात. श्रीलंकेत सुद्धा हा सण साजरा होतो. कश्मीर मध्ये हा सण काश्मिरी हिंदू पंडित नवरेह म्हणून साजरा कारतात. आसाम मध्ये बिहू, केरळ मध्ये विशु, बंगाल मध्ये नोब बोर्ष ,पंजाब मध्ये बैसाखी तर भारत आणि पाकीस्तानातले सिंधी लोक चैत्रात चेटीचंड उत्सव साजरा करतात.

भारतात सगळीकडच्या या परंपरा पाहिल्या की लक्षात येतं आपली संस्कृती धर्म, विज्ञान, पर्यावरण, सामाजिक आणि कौटुंबिक सलोखा या धाग्याने बांधली आहे. नव्याचं स्वागत करा. जुने जाउद्या, विसरून जा, एकमेकांशी सौहार्दाने वागा ही आणि अशी अनेक आदर्श मूल्ये आणि संस्कार अशा सणांमधुन प्रसारित होत असतात.

म्हणून थोर कवयित्री बहिणाबाई चौधरी त्यांच्या कवितेत हाच संदेश देतात,

 गुढीपाडव्याचा सन,
आतां उभारा रे गुढी
|
नव्या वरसाचं देनं
,
सोडा मनांतली आढी
|
गे
लं सालीं गेली आढी,
आतां पाडवा पाडवा
|
तुम्ही येरांयेरांवरी
,
लोभ वाढवा वाढवा
||

आजच्या सामाजिक व राजकीय सद्य परिस्थितीत हा संदेश खूप महत्वाचा आहे. म्हणूनच,

                                              सर्वस्तरतु दुर्गाणि सर्वो भद्राणि पश्यतु।

सर्वः कामानवाप्नोतु सर्वः सर्वत्र नन्दतु।।

आताच्या कठीण परिस्थितीला धैर्याने सामोरे जाऊन ,सर्वांच कल्याण होईल याची योजना करून येणारं वर्ष सर्वांसाठी  मंगल ठरो, हीच प्रार्थना !

(हा लेख आज 'विश्व संवाद केंद्र' ,'सोलापूर तरुण भारत' गुढीपाडवा विशेष पान आणि 'न्यूज 24 पुणे' या वेब पोर्टल वर प्रसिद्ध झाला )

 © ले. डॉ. नयना कासखेडीकर 

                                                 -------------------------

Sunday 11 April 2021

गदिमा स्मारक होतंय

 

                                                     गदिमा स्मारक होतंय.....

    



   मराठी साहित्यात आणि मराठी जनतेच्या मनात अलौकिक ठसा उमटविणारे, आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखले जाणारे गदिमा यांचे गेली अनेक दशकं रखडलेलं स्मारक आता पुणे येथे महात्मा सोसायटी, कोथरूडला साकार होतय. स्मारकाच्या या जागेचा भूमिपूजन सोहळा नुकताच २२मार्चला संपन्न झाला. हा सोहळा कोरोंनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांच्या, गदिमांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पार पडला. याविषयी जाणून होतेच, पण नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे यांच्याशी बोलून स्मारकाविषयी आणखी जाणून घेतले. त्या महानगरपालिकेच्या मराठी भाषा संवर्धन समितीच्या सदस्या आहेत, कमलानेहरू उद्यानाच्या साहित्य कट्ट्याच्या संयोजकसुद्धा आहेत, त्यामुळे मराठी सारस्वतांबद्दल सतत त्यांचा विचार असतो. याबाबत त्यांचा पुढाकार म्हणून महत्वाचा आहे.    

  गेली अनेक वर्षे या विषयाचा पाठपुरावा सुरू होता. जन्मशताब्दी वर्षात तरी स्मारक होईल अशी आशा नागरिकांना आणि माडगुळकर कुटुंबीयांना होती, परंतु अनेक प्रशासकीय बाबी पूर्ण करणं आवश्यक होते आणि कोरोंना साथीमुळे नियोजनात येणारे असंख्य अडथळे दूर करत करत हे काम पुढे कसे नेता येईल हे आव्हान होते. २०१७ मध्ये (तत्कालीन महापौर) मुक्ता टिळक यांनी या स्मारकाची घोषणा गदिमा यांच्या जन्मशताब्दी सांगता कार्यक्रमात केली होती. सरतेशेवटी सर्व नियोजन पूर्ण करून महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या मुख्य उपस्थितीत या स्मारकाचे भूमिपूजन दि. २२ मार्च २०२१ रोजी संपन्न झाले, ही सर्वांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणावी लागेल. काही गदिमाप्रेमीनी हे स्मारक व्हावं म्हणून डिसेंम्बर २०२० मध्ये आंदोलन केलं. विशेष म्हणजे गेल्या ४० वर्षांपासून हि गदिमा स्मारकाची मागणी होत होती. 

 गदिमा हे  १२ वर्षे काँग्रेसतर्फे  महाराष्ट्र  विधानपरिषद नियुक्त सदस्य होते. त्यांचे चिरंजीव  कै. श्री श्रीधर माडगूळकर यांनी १९८० मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर पुण्यात विधानसभा निवडणूक लढवली होती. पण सुमारे तीन दशकाहून अधिक काळ कॉंग्रेस विचारांच्या पक्षांकडेच पुणे मनपाची सूत्रे होती, तरी गदिमा स्मारकाचा विषय मार्गी लागला नव्हता हे विशेष! 

  पुण्यात गदिमा जन्मशताब्दी मध्ये राज्यसरकार पुरस्कृत महोत्सव झाला. यात माडगूळकर कुटुंबीयांचा पुढाकार होता. पण पुण्याच्या साहित्यिक, सांस्कृतिक जगताने काही प्रातिनिधिक कार्यक्रम केले पण भरीव असे कोणत्याही संस्थेने केले नाही हे वास्तव आहे.

  स्मारक म्हणजे पुतळा उभा करू नये तर,ते कलात्मक असावे असे गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर म्हणाले होते. गदिमांचे स्मारक व्हावे म्हणून त्यांनी आणि त्यांचे कुटुंबिय आणि माधुरी सहस्त्रबुद्धे यांनी सतत पाठपुरावा केला. हे स्मारकसुद्धा वेगळे असेल. त्यात अनेक महत्वाच्या गोष्टींचा विचार केला असेल. नव्या कल्पना असतील. ज्यामुळे ते स्मारक कायम स्मरणात राहील आणि उपयुक्त ठरेल.           

  स्मारक म्हणजे एखाद्या विशेष घटनेची किंवा विशेष व्यक्तीची दीर्घकाळ आठवण रहावी म्हणून निर्मिलेली वास्तू/रचना ज्यामुळे त्या व्यक्तीचे सतत स्मरण होत राहील, प्रेरणा मिळत राहील,असे आदर्श पुढच्या पिढीपर्यंत प्रसृत होत राहतील. प्रसंगांची आणि व्यक्तींची आठवण राहण्यास त्या निमित्ताने मदत होते. अशा आठवणी अनेक देशात स्मारकांच्या रूपाने अस्तित्वात आहेतच.

   मराठी वाड:ग्मयामध्ये आपल्या प्रतिभेचा ठसा उमटविणारे प्रतिभासंपन्न साहित्यिक म्हणून गदिमा यांचे नाव सर्वपरिचित आहे. महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रात आधुनिक मराठी साहित्याची सुरुवात केलेले अनेक साहित्यिक आहेत जे मराठी अस्मितेचे मानबिंदू ठरावेत,या परंपरेतले एक नाव म्हणजे गदिमा. मराठी साहित्यात कवी, कथालेखक, कादंबरीकार, नाटककार, संपादक म्हणून योगदान, तर मराठी चित्रपट क्षेत्रात कथाकार, पटकथाकार, गीतकार, अभिनेता आणि निर्माता म्हणून सुद्धा योगदान असलेले गदिमा. यांनी १५७ पटकथा लिहिल्या, २५ हिन्दी चित्रपट, २००० पेक्षा जास्त गाणी लिहिली,त्यांच्या काळातले चित्रपट तर सुवर्णकाळ घेऊन आले. गीतरामायण ही तर त्यांची अजरामर साहित्यकृती.

  यशवंतराव चव्हाण यांनी गदिमांच्या काव्य प्रतिभेवर प्रसन्न होऊन म्हटलं होतं की, “मी जर राजा असतो तर कविवर्याच्या हाती सोन्याचं कडं चढवलं असतं”. या सगळ्या कारकीर्दीचा आढावा प्रदर्शनरूपी दालनात रसिकांना अनुभवायला मिळाला तर रसिकश्रोते धन्य होतील.    

 अशा गदिमांचे स्मारक पुण्यातील महात्मा सोसायटी परिसराजवळ असेल. एक्सिबिशन सेंटर आणि गदिमास्मारक असे या संकुलाचे एकंदर स्वरूप असेल.

एकूण २५ हजार ११० चौरस मीटर आरक्षित क्षेत्रात हे एक्झिबिशन सेंटर आणि स्मारक असणार आहे. त्यातील वास्तू ३ हजार ७२२ चौरस मीटर क्षेत्रफळाची असेल. ही वास्तू तीन मजली असेल.

  यात गीतरामायण, साहित्यदालन, चित्रपटदालन, वैयक्तिक दालन, डिजिटल दालन अशी पाच दालने पहिल्या आणि तिसऱ्या मजल्यावर असतील.

  दुसऱ्या मजल्यावर एक बहुउपयोगी सभागृह असेल. ज्याला जोडून एक भोजनगृह असेल.

श्री सुमित्र माडगुळकर यांनी या स्मारकाची एक छान संकल्पना मांडली आहे. त्यात कलात्मकता, आधुनिकता आणि सोय याचा चांगला मेळ साधला आहे. आशा आहे की प्रस्तावित स्मारकात या सर्व बाजूंचा विचार करून पुण्याची विशेष ओळख सांगणारे असे स्मारक उभे राहिल.

श्री सुमित्र माडगुळकर यांनी केलेल्या सूचना अशा आहेत.

गीत रामायण दालन -

 पहिल्या मजल्यावर गीतरामायण दालन असेल. यात गीतरामायणाची ५६ गीते शिल्पासारखी मोठ्या अक्षरात ग्रॅनाईटवर कोरलेली असावीत. सर्व कलाकारांची नावासकट छायाचित्र असावीत. सुधीर फडके या मूळ गायकाच्या आवाजातील ही गीते ऑडिओ बूथवर ऐकता यावीत, गीतरामायणाचा इतिहास व छायाचित्रे असावीत,रामायणातील काही प्रसंग म्युरल्सच्या स्वरुपात असावेत. गीतरामायणाच्या आठवणी वाचता किंवा ऐकता याव्यात. गीतरामायणाचे अनेक भाषात भाषांतर झाले आहे, ते उपलब्ध असावे. गीतरामायण मराठी व इतर भाषेतील त्याचे भाषांतर याची पुस्तके सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध व्हावीत.   

 साहित्यदालन–

यात गदिमांची सर्व ३७ पुस्तके, गीतगोपाळ डिस्प्लेला असावीत व ती वाचता यावीत.निवडक कवितांची शिल्पे किंवा म्युरल्स काढावीत. गदिमांच्या हस्ताक्षरातील कविता असाव्यात. त्यांच्या आवाजातील भाषणे, कविता ऑडिओ बूथवरुन ऐकता याव्यात. गदिमांच्या पुस्तकांची  ई -बुक्स करावीत. सर्व मराठी नामवंत साहित्यिकांचे फोटो या दालनात असावेत.  

 एक वैयक्तिक दालन, -

हे गदिमांनी वापरलेल्या त्यांच्या वैयक्तिक वस्तूंचे दालन असावे. त्यांच्या वापरतील वस्तु,विविध पुरस्कार, हस्तलिखिते, त्यांच्या आवाजातील कविता व भाषणे, गदिमांवर इथे चित्रपट अथवा डॉक्युमेंटरी पाहता यावी. त्यांच्या १२ वर्षांच्या आमदारकीच्या काळात झालेली त्यांची भाषणे, छायाचित्रे असावीत.  

चित्रपट दालन-

यात गदिमांचे १५७ मराठी व २५ हिन्दी चित्रपट असावेत त्यात, चित्रपटांची सूची, व छायाचित्रे असावीत. चित्रपटाची पोस्टर्स असावीत. चित्रपटा संबंधी मिळालेले पुरस्कार असावेत. चित्रपटा तील गाणी त्यांची निर्मितीची कथा ऑडिओ बुथवर ऐकता यावी. त्या सर्वांच्या CD/DVD/MP3 विक्रीस असाव्यात.

 गदिमा डिजिटल दालन-

गदिमा यांच्यावर चित्रपट व डॉक्युमेंटरी असावी. गदिमा यांची gadima.com ही वेबसाइट अधिक समृद्ध करावी. गदिमांचे चित्रपट या साइटवरून पाहता यावेत. ऑडिटोरियम किंवा कलादालन असावे . 200 ते 300 लोक बसू शकतील असे हे दालन साहित्यिक कार्यक्रमांसाठी उपलब्ध व्हावे. आणि मुख्य म्हणजे या स्मारकात वर म्हटल्याप्रमाणे गदिमांचा पुतळा उभारू नये,त्या ऐवजी भव्य पेंटिंग असावे. स्मारकाभोवती सुंदर हिरवळ किंवा बाग असावी. विक्री हा भाग स्मारकाच्या देखभाल खर्चासाठी वापरावा.  

इतका विचार या स्मारकामागे केला आहे. संकल्पनेत दिल्याप्रमाणे हे जसेच्या तसे साकारले गेल्यास एक आदर्श असे हे गदिमा स्मारक महाराष्ट्राची शान वाढविणारे ठरेल यात शंका नाही. डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग हा आधुनिक काळात महत्वाचा ठरेल.पर्यटनाचे आणि साहित्यप्रेमींचे हे आकर्षण केंद्र ठरेल.

हे स्मारक नुसते गदिमा यांचेच नाही तर रामायणाचे पर्यायाने प्रभू श्रीरामचंद्राचे स्मारक असेल. ज्या गीतरामायणाने गेली अनेक वर्षे मराठी मनावर राज्य केलय,त्या गीतरामायणाचं गदिमास्मारक ही एक पवित्र, मंगल अशी भारलेली जागा असेल. हे स्मारक पूर्ण व्हायला साधारणपणे

दोन वर्षे लागतील असा अंदाज आहे. जसे बालगंधर्व रंगमंदिर बालगंधर्वांची आठवण करून देतं, तसं हे गदिमास्मारक म्हणजे गदिमा यांची आठवण करून देणारं, पुणे महानगरपालिकेच्या इतिहासातलं सोनेरी पान असेल. या स्मारकाची सर्व रसिकश्रोते आतुरतेने वाट पाहत आहेत. ते लवकर पूर्ण होवो ही सदिच्छा !

 © ले- डॉ. नयना कासखेडीकर.

                          ---------------------------------        

लंडनलिंक

  

  • v      पुस्तक परिचय

            लंडनलिंक

 लंडनलिंक  या पुस्तकाच्या नावावरूनच पुस्तकात लंडन बद्दल माहिती असेल हे कळतच. तर हे प्रवास वर्णन आहे का असेही वाटणारच. पण हे प्रवास वर्णन नाही तर लेखकाचं त्या शहाराशी अनेक वर्षे तिथे राहून बांधलं गेले घट्ट नातं आणि जवळीक यात वाचायला मिळते. लंडनचा राजेशाही थाट, खानदानी अदब,सुबक शहर रचना ,तिथली सभ्यता, देखणेपणा आणि तिथली वैभवसंपन्नता पाहून भारावून जाऊन ते पाहिल्याचा आनंद ,झालेलं समाधान आपण वाचकांपर्यंत पोहोचवावं म्हणून लेखक वि मा. जोशी यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. यात तब्बल ६८ छोटी छोटी प्रकरणं आहेत. अत्यंत मनोरंजक, लंडनची  वैशिष्ठ्य सांगणारी, तिथल्या संस्कृती व पाऊलखुणा यांचा वेध घेणारी ही प्रकरणे आहेत.

                           

     
लंडन मधल्या विशेष वास्तु, त्यांचा इतिहास, तिथे घडलेल्या घटना व प्रसंग, तिथले लोकजीवन त्यांची जीवन मूल्ये आणि आपली मूल्ये वं त्याचे संदर्भ तपासून घेत घेत, लेखकाने पुस्तकाचा शेवट ब्रिटन आणि भारत यांचा परस्पर संबंध वं त्यांचे नाते काय असले पाहिजे यावरही प्रकाशा टाकला आहे. दोन्ही देशातली साम्यस्थळे दाखवून दिली आहेत. मग इंग्रजी भाषेचा दोन्ही देशांचा जिव्हाळ्याचा संबंध, आहारातली करी(जेवणातील रस्सा), लोकप्रिय क्रिकेटचा खेळ, शिक्षण पद्धती हे सांगून ब्रिटनला भारत हा इतर देशांपेक्षा कसा अधिक जवळचा आहे हे पटवून दिले आहे.

          आज ४००,५००  वर्षांनंतरही ज्याच्या नावाची मोहिनी कमी झालेली नाही असे इंग्रजीने जगाला दिलेले नाटककार शेक्सपियर व कवी वर्डसवर्थ ह्यांचे लंडन मधल्या लोकांच्या मनातले स्थान त्यांचा या दोघांबद्दलचा अभिमान लेखक सांगतो. जो भारतीय लोकांनी अतिशय विचार करण्यासारखा आहे. जगभरातल्या नाट्य प्रेमींना शेक्सपियर चं गाव स्टँटफर्ड याचं का आकर्षण वाटतं ते वाचण्यासारख आहे.

अशा या पुस्तकात लंडन च्या वेलिंग्टन कोर्ट, ट्रफलगार चौक, लंडन आय, स्कॉटलंड च्या लेक डिस्ट्रिक्ट मधलं रोमॅन्टिक वाटणार्या  परिसरातलं असं कवी वर्डसवर्थचं डोव्ह कॉटेज या बरोबरच हिंदूंचं लंडन मधलं वैभव  स्वामींनारायण मंदिर, मुंबईचे डबेवाल्यांचा सत्कार, भारत-पाकिस्तानची  क्रिकेट मॅच, योगसाधना, तिथलं महाराष्ट्र मंडळ असे बरेच यथार्थ वर्णन या पुस्तकात आहे. अनुभव आहेत. ते वाचून लंडनला आपणही  राहून आलो की काय असे वाटायला लागते इतके ते बोलके आणि सुंदर अनुभव देणारे आहे. सर्वांनी आवर्जून वाचावे असे आहे.                          

 © ले.डॉ. नयना कासखेडीकर.

                               --------------------------------------

देशोदेशींच्या पंतप्रधान

  

v पुस्तक परिचय

                                             देशोदेशींच्या पंतप्रधान

       एखाद्या संवेदनशील सामाजिक कार्यकर्त्याला लोकांनी निवडून दिले तर ? एक सिनेमा आठवतोय आजचा दिवस माझा’. यात नोकरशाही आणि राजकारण यांच्यातले संबंध व संघर्ष दाखवला आहे. एक दिवस मुख्यमंत्री सामाजिक जाणिवेने निर्णय घेताना दाखविले आहेत. समाजाचं देणं आपण लागतो त्याची फेड आपण कशी करू शकतो याचा विचार करून तो मुख्यमंत्री जे शक्य होईल तेव्हढी चांगली कामे करतो. आणि ज्याला आपल्या देशासाठी आपण काम करणे हे आपले कर्तव्य आहे असे वाटत असते तो/ती जर मुख्यमंत्रीच काय पंतप्रधान झाला/झाली तर. केव्हढी कारकीर्द गाजवू शकतो. आणि पंतप्रधानपदी महिला असेल तर. अर्थात असे प्रगत देश असेल तरच घडेल असे आपल्याला वाटेल. पण नाही, जिथे समाजात स्त्रीला स्थानच नसते अशा देशात सुद्धा स्त्रिया पंतप्रधान झालेल्या आहेत.आफ्रिका खंडासारख्या अविकसित देशात सुद्धा देशाचे नेतृत्व स्त्रीने केले आहे. राजकरणात स्त्रीयांचे प्रमाण कमी आहेच. पण 1912 पर्यन्त जवळजवळ 193 देशांपैकी 50 देशांमध्ये पंतप्रधान महिला होत्या.त्यांचा कार्यकाळ अगदी दोन दिवसांपासून ते 15 वर्षांपर्यंत असा होता.

    महिला पंतप्रधान म्हटलं की चटकन डोळ्यासमोर येतात आपल्या इंदिराजी ,बेनजिर भुट्टो, मार्गरेट थॅंचर ,चंद्रिका कुमार तुंगा, शेख हासिना, खलिदा झिया इतक्याच आपल्याला माहिती असतात.गोल्डा मायर आणि अँजेला मर्केल, हेलन क्लार्क ही नाव पण ओळखीची आहेत. पण तानसू सिलर,इरिना डिगुटिनी , पोर्शिया ल्युक्रेशिया, सिमन्स मिलर, आयव्हीटा रॅडीकोव्हा आणि अशी आणखी काही नावे महिला पंतप्रधान असलेली कधी वाचली नाहीत. माहिती नाहीत.

अशा 50 महिलांचा परिचय करून देणारं पुस्तक म्हणजे शिल्पा बेळे यांनी लिहिलेले देशोदेशींच्या पंतप्रधान महिला हे पुस्तक. परम मित्र पब्लिकेशनचं हे पुस्तक छान आहे. यात या महिलांचा कार्यकाळ, देश, देशाचे क्षेत्रफळ, लोकसंख्या, पक्ष,सरकार पद्धती कोणती, देशाच स्थान कुठे आहे आणि स्वातंत्र्यदिन कधी असतो या छोट्या पण महत्वाच्या माहितीशिवाय त्या पंतप्रधान महिलांची थोडक्यात माहिती दिली आहे. 

यावरून महिलांची राजकीय कारकीर्द किती होती हे लक्षात येते. त्यांचे राजकारणातले पूर्वीचे अनुभव काय होते हे समजते.दक्षिण कोरियाची पहिली महिला पंतप्रधान चॅङ्ग सॅंग . यांना फक्त 20 दिवस कार्यकाल मिळाला. त्या 11 जुलै 2002 ते 31  जुलै 2002 एव्हढा काळ पंतप्रधान राहिल्या. कुणी 4 तर कुणी 6 महीने, कुणी दोन वर्षे, तर कुणी 10 वर्षे किंवा 15 वर्षे सुद्धा पंतप्रधानपदावर राहिल्या.

  एक नाव उल्लेखनीय वाटलं ते म्हणजे अँजेला मर्केल. 2005 सालापासून जर्मनीच्या पंतप्रधानपदी म्हणजे चाँन्सेलर पदी विराजमान झालेल्या पहिल्या महिला.रशियन भाषा येते, क्वांटम केमिस्ट्री मध्ये त्यांची PhD आहे. संशोधक म्हणून त्यांनी काम केले आहे. पुढे लोक्षाहीसाठीच्या चळवळीत भाग घेतला आणि बर्लिनची भिंत पाडल्यावर म्हणजे पूर्व आणि पश्चिम जर्मनी एकत्र झाल्यावर त्या राजकारणात सक्रिय झाल्या.सर्वात तरुण मंत्री, आधी युवा मंत्री, मग महिला मंत्री आणि मग पर्यावरण व अन्नसुरक्षा मंत्री अशी विज्ञान विषयक कामे त्यांनी केली.खूप बदल घडवून आणले.मंदीतून देशाला बाहेर काढलं, G8 गटाचे नेतृत्व केले. त्यांचं परराष्ट्र धोरण सुधारले. 2011 मध्ये झालेल्या अणुसंकटानंतर त्यांनी जर्मनी मधल्या जुन्या अणुभट्ट्या तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले.               

   अँजेला मर्केल मध्य युरोप मधल्या जर्मनी च्या फेडरल रिपब्लिक मध्ये, आजही राजकरणात सक्रिय आहेत म्हणून हे सांगण्याचा प्रपंच. अनेक पुरस्कार मिळवले आहेत. फोर्ब्स च्या यादीत त्या मोस्ट पावरफुल 100 वुमेन म्हणून, 2006 ते 2010 या पाच वर्षात अव्वल स्थानावर होत्या. अँजेला या मूळ ग्रीक शब्दाचा अर्थ देवाची दूत असा होतो म्हणतात.

असे एकेक महिलांची माहिती थोडक्यात असली तरी आपल्याला नंतर ची माहिती वाचण्याचा व शोधण्याचा छंद लागतो आणि आपल्या ज्ञानात नक्कीच भर पडते म्हणून अशी हटके पुस्तके वाचावीत. तुम्ही नक्की वाचा हे पुस्तक. लेखिकेने आकाशवणीसाठी गोल्डा मायर यांच्यावर भाषण लिहिता लिहिता पुढे जगातील राजकारणातील, कर्तृत्ववान स्त्रियांच्या माहितीच्या या पुस्तकाचा कसा विचार झाला ते सांगितले आहे. वा! गरज ही शोधाची जननी असते पण शोध असा इंटरेस्टिंग सुद्धा असतो की.

© ले- डॉ. नयना कासखेडीकर

-----------------------------------