Tuesday 20 May 2014

महापुरुष - बाळशास्त्री जांभेकर


महापुरुष - बाळशास्त्री जांभेकर    

             
लेखक यशवंत पाध्ये यांनी जांभेकर यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकावरील रेखाचित्र
             कोकणातल्या विजयदुर्ग ते कासार्डे या रस्त्यावर डावीकडे अचानक, 'बाळशास्त्री जांभेकर स्मारक तीन किलोमीटर आंत' , असा बोर्ड पहिला आणि मी चमकून पहिले.वृत्तपत्रांचा अभ्यास करताना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर कोकणातले एव्हढे माहिती होते,पण अचानक या ठिकाणाच्या जवळच आपण आहोत, हे कळल्यावर उत्सुकता वाढली. पण घाई असल्याने पुढे गेलो.एक वर्षापूर्वी पाहिलेली ही पाटी मी जाणून बुजून लक्षात ठेवली होती.वर्षभराने कोकणातल्या मुक्कामात असताना या स्मारकाला काहीही करून भेट द्यायचीच असा पण केला.स्मारक आहे लक्षात ठेवलं पण पोंभुर्ले हे नाव काही केल्या आठवेना. दोनचार जणांना विचारून पाहिलं पण त्यानाही माहिती नव्हतं.शेवटी पुस्तकाच्या दुकानात जाऊन जांभेकरांचे चरित्राचे अथवा माहितीचे पुस्तक घेऊ म्हटलं तर तेही मिळालं नाही.आता मी निश्चय केला कि विजयदुर्गच्या मुख्य रस्त्यावर जिथे पाटी होती तिथपर्यंत जायचं, पुढचं पुढे.  
              
             गाडीची व्यवस्था झाली आणि आम्ही स्मारकाला भेट द्यायला पोम्भूर्लेला निघालो. दरम्यान ड्रायव्हरने चौकशी करून पोंभुर्ले वर शिक्कामोर्तब केले होते म्हणाला मला माहिती आहे खारेपाटण कडून जाऊ,जवळचा रस्ता आहे. राजापूरच्या अलीकडे खारेपाटणहून आत वळलो,जेमतेम अर्धा किलोमीटर गेलो आणि सुरु झाला कोकणातल्या दुर्गम (माझ्या दृष्टीने अतिदुर्गमच होता तो.)भागातला प्रवास. चढ-उतार-तीव्र वळण, असा हा एकाला एक जोडलेल्या छोट्या डोंगरांवरचा कच्चा रस्ता,दाट झाडी, देवगडच्या आसपासचा हा भाग असल्याने हापूस आंब्याची झाडे मोहोराने गच्च बहरली होती.आंबेमोहोराचा सुगंध मनाला मोहवीत होता. कोसाकोसावर चारपाच-चारपाच घरं.रस्ता अत्यंत खराब,डांबरीकरणाचा पत्ता नाही.मुली बायका लांबून पाणी वाहून नेत आहेत.२०० वर्षांनंतर आज हे पोम्भूर्ल्याचे चित्र असेल तर बाळशास्त्री यांच्या वास्तव्यातले हे गाव अतिदुर्गमच म्हटले पाहिजे.अशा भागात वयाची बारा वर्ष बालपण गेलेल्या या तरुणाला महाराष्ट्राच्या विकासासाठी, इथल्या लोकांना नव्या ज्ञानाचा, पाश्चात्त्य विद्येचा परिचय व्हावा म्हणून मराठी भाषेत वृत्तपत्र काढण्यची इच्छा व्हावी ? म्हणून दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्राचा श्रीगणेशा करून ते ज्ञान मातृभाषेत लोकांपर्यंत पोहोचवावे, केव्हढा हा विचार होता.आजच्या राज्यकर्त्यांना विकास म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी अल्प स्वल्प आयुष्यात केलेले कार्य पाहावे. आज महाराष्ट्राचा विकास म्हणजे रस्ते, इरिगेशन, वीजप्रकल्प, पर्यटन आणि ब-याच काही कल्याणकारी योजनाचे कोट्यावधी रुपयांच्या घोषणा मंजूर करून घेणे एव्हढेच? कुठे जातात कोट्यावधी रुपये? महाराष्ट्राच्या कानाकोप-यात प्रवास केल्यावर हा प्रश्न पडतो. प्रवास करता करता नकळत तेंव्हाचे खरे समाजसुधारक आणि आताचे बेगडी आणि ढोंगी, स्वार्थी पुढारी नेते यांची आणि आत्ताच्या माध्यमांच्या मालक- संपादकांची मनात तुलना होत होती.      

             कसेबसे तासाभराच्या प्रवासानंतर कोर्ले नावाची पाटी दिसली.आता मात्र साशंक झालो. कोर्ले कि पोंभुर्ले? रस्त्यावरच्या जाणा-या मुलाला विचारून पाहा,जांभेकरांचे स्मारक कुठे आहे? तो म्हणाला, 'ग्रामपंचायतीच्या पुढे डावीकडे वळा '. मनात आलं पत्रकारितेतल्या क्षेत्रातल्या अनेकांना तरी हे नाव माहिती असेल का? आणि किती व्यावसायिक पत्रकारांनी, संपादकांनी या ठिकाणी भेट दिली असेल? पण त्या १०/१२ वर्षाच्या मुलाला जांभेकरांचे स्मारक माहिती होते. हे पाहून सुखद धक्का बसला.      
            

               पोम्भूर्ल्यात एका वाडीजवळ आमची गाडी थांबली. तिथे रस्ता संपत होता. स्मारक शोधण्याची धडपड चालली होती. ते काही दिसत नव्हतं. समोरच्या घराचा रस्ता आडवे बांबू लावून बंद केला होता. मनात कल्पना होती स्मारक म्हणजे मोठा मेन्टेन केलेला बगीचा, माहिती असलेले म्युझियम, पुतळा, फोटो, चित्र, बाळशास्त्रींनी काढलेले दर्पण दैनिकांचे व दिग्दर्शनचे अंक, त्यांची काही ग्रंथसंपदा.पण छें .तसे काहीच नव्हते.कराडला यशवंतराव चव्हाणांचे नदीकाठी असलेले सुंदर स्मारक पाहिले होते.किती मोठ्या जागेवर ते उभे केले आहे.अशी कितीतरी स्मारके शासनातर्फे उभारली जातात.भारतात स्वताचेच पुतळे, स्वताच्या नावाचे चौक यांचे स्वताच्याच हाताने उदघाटन करणारे महान नेते,पुढारी दिसतात. केवळ तेहेतीस वर्षाच्या आयुष्यात मराठी पत्रकारिता, मासिक, गद्य निबंध, शिक्षणक्षेत्र, अध्यापक शास्त्र, इतिहास संशोधन, ग्रंथ लेखन, समाज सुधारणा, चळवळी, स्वदेश, स्वभाषा, लोकशिक्षण या त्यांनी केलेल्या कामामुळे अजरामर झालेल्या बाळशास्त्री जांभेकर या नावाचे कुणालाच काही सोयरंसुतक नसाव?
                

               बाळशास्त्री जांभेकरांचे हे स्मारक म्हणजे त्यांच्या राहत्या घराशेजारी, जाम्भेकरांच्याच जागेवर जिथे आजही त्यांची पुढची पिढी राहते आहे. तिथे लोकवर्गणी आणि शासनाच्या अर्थ सहाय्यातून एक सभागृह बांधून, त्यात फक्त बाळशास्त्री जाम्भेकरांची माहिती लिहिलेले मोठे फलक व एक पुतळा एव्हढेच आहे. त्यांची जयंती आणि पुण्यतिथी हे दोन कार्यक्रम साजरे होतात.              
      
              २९ जानेवारी २०१४ मधला हा दिवस मला माझ्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा वाटत होता.त्यांच्या स्मारकाला भेट म्हणजे जणू काही या महाराष्ट्राला जागे करणा-या पहिल्या मान्यवर संपादकांना प्रत्यक्ष भेटण्याचा आनंद होता माझ्यासाठी.खूप प्रसन्न वाटत होतं. अभिमान वाटत होता.बाळशास्त्री जांभेकरांचे चुलत पणतू सुधाकर जांभेकरांनी आमचे स्वागत केले.सुधाकर त्यांच्या पत्नीबरोबर इथे राहतात.एल अँड टी ची मुंबईतली मोठी नोकरी सोडून जांभेकर कुळाचे मूळ घर जतन करण्यासाठी ते राहतात.आज जांभेकर कुटुंबात चुलतभाऊ मिळून ३५० ते ४०० जण आहेत.सगळे कामानिमित्त बाहेर असतात.बाळशास्त्रींचा जन्म याच घरात झाला.या वास्तुत आजही त्यांचे ५०० वर्षापूर्वीचे देवघर आहे.त्याची रोज पूजा-अर्चा होते.ही जबाबदारी सुधाकर यांनी घेतली आहे.बाळशास्त्री यांनी केलेलं काम पाहिलं कि त्यांच्या महान व्यक्तिमत्वाची कल्पना येते.  

               मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर पत्रकारितेतला दीपस्तंभ.जांभेकर कुळातला बालबृहस्पती आणि आद्याचार्य म्हणून त्यांना संबोधले जाते.गणेश गंगाधर जांभेकर यांनी १९४७ ला शतसांवत्सरिक पुण्यस्मरणार्थ लिहिलेल्या द्वादशश्लोकीत, बाळशास्त्रींना आधुनिक महाराष्ट्राचा आद्य राष्ट्रगुरु आणि पितामह म्हटले आहे.प्राचीन लिपीलेख लावणारा,नाना राष्ट्रेतिहास जाणणारा,आद्य भारतीय पुराणेतिहास संशोधक,अतुल गणिती व निष्णात ज्योतिषी असे त्यांचे वर्णन केले आहे.

        बाळशास्त्रींचा जन्म फेब्रुवारी १८१२,महाराष्ट्रातल्या देवगड तालुक्यातल्या पोंभुर्ले इथला.वडिल गंगाधर शास्त्री आणि आई सगुणाबाई. पोम्भूर्ल्यात मराठी शाळा नसल्याने त्यांचे शिक्षण घरगुती पद्धतीने वडिलांच्या सान्निध्यात झाले.त्यामुळे,बाळबोध,मोडी वाचन व लेखन,व्यावहारिक अंकगणित,तोंडी हिशोब, समर्थ रामदास,संत तुकाराम,कवी मोरोपंत यांच्या कविता,रामायण-महाभारत कथा,मराठ्यांच्या उपलब्ध ऐतिहासिक बखरी,हे सर्व वयाच्या आठव्या वर्षा पर्यंत त्यांनी पारंगत केले.उपनयन झाल्यावर वेदपठण,संस्कृत स्तोत्र,गीतापाठ,आणि अमरकोश,लघुकौमुदी,पंच महाकाव्य,हे बाराव्या वर्षी मुखोद्गत होते.हा काळ १८१८ चा, पेशवाईची अस्त आणि पहिल्या ब्रिटीश गव्हर्नर, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांच्या ताब्यात गेलेली मुंबई इलाख्याची सर्व प्रशासकीय सूत्रे असा होता. याच वेळी पाश्चात्य विद्येचा अभ्यास करण्याची संधी बाळशास्त्रींना मिळाली. गव्हर्नर चे धोरण अर्थातच ब्रिटीश राज्य वाढवावे हा होता. तरुणांना आकर्षित करण्यासाठी गव्हर्नरने मुंबईत, दि बॉम्बे नेटिव्ह स्कूल, इंजिनिअर्स  इंस्टीट्युशन स्थापत्य शाळा सुरु केली. शिळा छापखाना सुरु केला. या सगळ्या ठिकाणी इंग्रजी लोक शिकवायला होते. नेटिव्ह सेक्रेटरी म्हणून सदाशिव काशिनाथ छत्रे (बापू छत्रे)यांची नेमणूक झाली होती. या सुमारास पुण्याहून अनेक विद्वान मंडळी मुंबईत आली. त्यातलेच एक बाळशास्त्री होते. बापूसाहेब छत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळशास्त्री यांचे नवे आयुष्य सुरु झाले. इंग्रजी शाळेत प्रवेश घेतला आणि शिक्षण घेता घेता विद्यार्थी दशेतच त्यांना असामान्य बुद्धिमत्तेमुळे शिकवण्याचीही संधी मिळाली. मराठी, संस्कृत, कानडी, इंग्रजी, गुजराथी, बंगाली, फारसी, अरबी, लॅटिन, ग्रीक, फ्रेंच,भाषा व अंकगणित, बीजगणित, भूमिती, मूल्यमापन, लॉगेरिथम या विषयात त्यांनी वयाच्या सतराव्या वर्षी प्राविण्य मिळविले.बीजगणित तर मुखोद्गत होते त्यांचे. जांभेकर यांनी लिहिलेल्या क्रमिक पुस्तकांपैकी लहान मुलांचे मानसशास्त्र हा विषय प्रथमच लोकांना कळत होता .
          

          गुरु बापूसाहेब छत्रे यांनी सचिव पदाचा राजीनामा देवून त्याजागी बाळशास्त्री यांची नेमणूक करण्याची शिफारस केली.ताबडतोब अर्जाचा विचार झाला कारण त्यांची विद्वत्ता आणि योग्यता. सचिव म्हणून काम करताना ते अनुभवसंपन्न झाले.लेख आणि पुस्तकांचे मराठीत भाषांतर,नीतिकथा,सारसंग्रह,गोल्ड स्मिथच्या इंग्रजी बखरीचा इंग्लंड देशाची बखर भाग १ व २अशी मराठी पुस्तके लिहिली.प्राचीन शिलालेखांवर संशोधनात्मक लेख लिहिले.रॉयल एशियाटिक संस्थेच्या नियतकालिकात भारतीय शिलालेख,ताम्रपट या विषयांवर शोधनिबंध लिहिले.  हे करीत असताना अनेक परकीय भाषा शिकले.त्यांचे अनेक भाषांवरील प्रभुत्त्व बघून त्यांना अत्यंत प्रतिष्ठीत समजल्या जाणा-या रॉयल एशियाटिक संस्थेच्या मुंबई शाखेच्या सचिव पदाचीही जबाबदारी देण्यात आली.
            
            इंग्रजांनी सुरु केलेले,  शाळा, त्यासाठी विविध पुस्तके, कोष, वाड:मय, भाषांतरित पुस्तके, क्रमिक पुस्तके, त्याद्वारे ज्ञान आणि नोकरी मिळते, यामुळे मुंबईतले वातावरण बदलले. आपल्या लोकांतील वाढलेली गुलामगिरीची प्रवृत्ती आणि  हे ज्ञान अत्यंत जुजबी आहे हे कळल्यावर बाळशास्त्री यांनी सामान्य लोकामध्ये स्वातंत्र्या विषयी जागृती आणि ज्ञान प्रसार करण्याचे ठरविले. या सुमारास इंग्रजी, बंगाली आणि काही गुजराथी वर्तमानपत्रे निघत होती.१८३२ चा काळ म्हणजे इंग्लंड मध्ये पार्लमेंट मध्ये सुधारणा होऊनप्रागतिक राजकारणाचा उदय होण्याचा काळ होता. यावेळी बंगालचे पुढारी राजा राम मोहन रॉय इंग्लंड मध्ये गेले होते.त्यांनी आणि धर्म सुधारकांनी बंगाल मध्ये फार कमी वेळात लोकजागृती केली होती,बंगालची ही सुधारलेली स्थिती पाहून बाळशास्त्रींनाआपल्या राज्यातल्या सुधारणेची स्वप्ने पडू लागली.इथला अज्ञानांधकार आपण प्रयत्न केले तर लवकरच दूर होईल आणि आपण बंगाल सारखी प्रगती करू शकू असा विश्वास वाटू लागला.बंगाल प्रांतातील लोक पाश्चात्य विद्येच्या प्रसारामुळे पुढे गेले आहेत ही जाणीव त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.त्यासाठी एकाच मार्ग त्यांना दिसत होतं तो म्हणजे वृत्तपत्र आणि दर्पण हे पहिलं मराठी-इंग्रजी साप्ताहिक ६ जानेवारी १८३२ ला सुरु केलं.दर्पण हे पहिले मराठी नियतकालिक होते तसेच ते भारतीयांनी सुरु केलेले सर्वात पहिले इंग्रजी नियतकालिकही ठरलं. दर्पण चालवण्यामागे त्यांची एक निश्चित विचारधारा होती.

                समाज सुधारण्यासाठी आत्ता कोणत्या प्रकारच्या ज्ञानाची गरज आहे हे त्यांना माहित होते.इथल्या सामाजिक रूढी,व्यापार उद्योग,औद्योगिक चळवळी, राजकीय स्थिती,स्य्रीयांचे शिक्षण,विधवा पुनर्विवाह, धर्माच्या नावावर स्त्रियांचा मानसिक आणि शारीरिक छळ, धार्मिक सुधारणा आणि इतर विषयावर त्यांचे क्रांतिकारक लेखन असे.इंग्रंजांची विद्या आणि संस्कृती प्रगत का आहे ,आपण कुठे मागे आहोत याविषयी चे शास्त्रीय ज्ञान दर्पण मधून लोकांना देत असत.तेंव्हाही त्यांचे लेखांचे विषय पाहता उदाहरणार्थ, स्त्रियांचा विद्याभ्यास, मुंज मुलींची का नाही? स्त्री-पुरुषांना समान हक्क? स्त्री शिक्षणाची दिशा, रुक्मिणी व स्त्री-शिक्षण, दुराग्रही चालींवर झोड, १६५ वर्षापूर्वी त्यांचा स्त्रीयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन व  धार्मिक व सामाजिक सुधारणांची दूरदृष्टी लक्षात येते.

 
              बाळशास्त्री यांचे नियतकालिक निघण्यापूर्वी कोणत्याही मराठी गद्याची परंपरा नव्हती.पारतंत्र्य काळात, कुठलाही राजकीय आश्रय,कुठलीही आर्थिक मदत नसताना प्रतिकूल परिस्थितीत वृत्तपत्र काढणं निश्चितच सोपं नव्हतं . बाळशास्त्री साप्ताहिक दर्पण आणि मासिक दिग्दर्शन या नियतकालिकांचे संस्थापक ,आधुनिक मराठी गद्याचे प्रणेते,पहिले निबंधकार, मराठीतले आद्य पत्रकार,आद्य प्राध्यापक आहेत.तसेच शालेय क्रमिक पुस्तकांचे व बालवाड:मयाचे जनक पण आहेत. त्यांनी  ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे मराठीत सर्वप्रथम शिळाप्रेसवर प्रकाशन केले.१८४५ मध्ये त्यांनी लोकांना वाचनाची आवड लागावी म्हणून भारतीयांचे पहिले सार्वजनिक वाचनालय बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी स्थापन केली.मुंबईतल्या पहिल्या विद्यार्थी वसतिगृहाचे संस्थापक,पहिल्या अध्यापक वर्गाचे संचालक, कुलाबा वेधशाळेचे संचालक आणि नेटिव्ह इंप्रूव्हमेंट सोसायटी या मुंबईतल्या लोक सुधारणा व्यासपीठाचे संस्थापक होते.सार्वजनिक हिताच्या गोष्टीवर चर्चा होऊन त्यावर निर्भीड पणे मते मांडण्याकरता हे व्यासपीठ निर्माण केले होते.इंग्रजांनी १८४० मध्ये बाळशास्त्री यांना 'जस्टीस ऑफ पीस' हा अतिशय महत्त्वाचा बहुमान दिला होता.

      प्रचंड विद्याव्यासंग, अलौकिक कर्तुत्व यामुळे ते विद्यार्थ्यामध्येही ते लोकप्रिय होते. भारतीय पुराणेतिहास संशोधक डॉ.भाऊ दाजी लाड,राजकीय पितामह डॉ.दादाभाई नौरोजी,विख्यात गणिती व ज्योतिषी प्रो.केरो लक्ष्मण छत्रे,मुंबई व इंदूर संस्थांचे न्यायाधीश रा.ब.नाना मोरोजी त्रिलोकेकर, योराबजी शापूरजी बंगाली, के.शी भवाळकर, शंकरशास्त्री जोशी, डॉ.अनंत चंद्रोबा,ही सर्व यशस्वी व सुप्रसिध्द व्यक्तिमत्त्वे बाळशास्त्री जांभेकरांचे विद्यार्थी होत.भारतीयांची प्रगती घडवून आणायची तर शिक्षणासारखे प्रभावी साधन नाही .सर्व शिक्षकांना ते उपदेश देतात कि, 'गुरु दसपट ज्ञानी असेल तर तो शिष्यास एकपट ज्ञान देऊ शकेल.'

        १७ मे २०१४ ही त्यांची १६८ वी पुण्याथिती. अशी व्यक्तिमत्वे दखल न घेतल्यास इतिहासातून बाहेर टाकले जातील हे लक्षातही येणार नाही.तेव्हा बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्यावर संशोधन करून,संकलन करून ,त्यांची ग्रंथसंपदा,या त्यांच्या स्मारकात लोकांसाठी व माध्यमातल्या लोकांसाठी पाहण्यास व अभ्यासण्यास खुली करावी असे वाटते.
 
       अशी ही स्मारकाची भेट विचारमंथन करणारी ठरली.सुधाकर जांभेकर आणि त्यांच्या पत्नीने आमचे स्वागत केले.घर दाखविले.चहापान झाले आणि संक्रांतीचा काळ असल्याने वहिनींनी माझी हळदी कुंकू देवून, ओटी भरून आम्हाला निरोप दिला.  

- डॉ. नयना कासखेडीकर                                                                              

Saturday 10 May 2014

साडी आणि लावण्य




साडी आणि लावण्य


       वर्तमानपत्रं उघडलं आणि एक जाहिरात दिसली, ती नेहमी पेक्षा वेगळ्या कार्यक्रमाची.'साडी, लावण्य आणि संस्कृती ' पुण्यात साड्यांचे एक नवे दालन उघडणार होते.त्याच्या जाहिराती प्रीत्यर्थ हा साड्या नेसवून दाखविण्याचा म्हणजे साड्यांचे प्रकार शिकविण्याचा अभिनव कार्यक्रम होता.कार्यक्रम जाहीर होता, विनामूल्य होता. या वेगळ्या शोला जाण्याचा मोह झाला.चौकशी केली असता कळले, तीन तासांचा हा कार्यक्रम आहे, वाटलं, कशाला उगीच वेळ घालवायचा ?आपल्याला पाचवार, सहावर, नऊवार, ओच्याची आणि दुटांगी, गुजराती हे प्रकार नेसता येतात.पण...... मनात उत्सुकता होती. शेवटी गेले. सभागृहात पाय ठेवला तर काय ? बालगंधर्व रंगमंदिर खचाखच भरलेले होते. लावण्ण्यावर  प्रेम करणा-या, साडीवर प्रेम करणारा तमाम तरुण आणि जेष्ठ महिला वर्ग हजार होता.


         सौंदर्य ही स्त्रीला मिळालेली निसर्गाची देणगी आहे. तर सौंदर्य खुलवणं ही कला. प्रत्येक स्त्रीला आपण सुंदर दिसावं असं वाटत असतच. (पुरुष सुद्धा सुंदर दिसण्यासाठी धडपडत असतात.जागरूक असतात.)लक्ष्मीच्या अनेक गुणांचं वर्णन श्रीसूक्तात केलं आहे.ते असं,  ' लक्ष्मी कशी असावी? तर, हिरण्यवती म्हणजे सुवर्ण अलंकारांनी, उंची वस्त्रांनी नटलेली असावी. तिची कांती चंद्राप्रमाणे आल्हाददायक असावी. नेत्र तेजस्वी असावेत. देहयष्टी कांतिमान व भरदार असावी. ती सुस्मिता असावी. तिचे हृदय कोमल भावनांनी भरलेले असावे.तिच्या भोवतीच्या सुगंधाने तिचे अस्तित्व ओळखू यावे.ती जीवनदात्री असावी.' आजची एकविसाव्या शतकातली स्त्री नव्या बदलांना सामोरे जात जमेल तसं या श्रीसुक्तातल्या लक्ष्मी सारखं  होण्याचा कौशल्याने प्रयत्न करते हे या कार्यक्रमाच्या गर्दीवरून वाटलं .


          या कार्यक्रमात राजेशाही नऊवारी, दुटांगी व खानदेशी नऊवारी, कोळी, कोकणी, आदिवासी असे पारंपारिक प्रकार, प्रांतानुसार बंगाली, पारशी, आसामी साडी, त्याशिवाय गांधारी साडी, शकुन्तला साडी, वैजयंतीमाला साडी, आशा पारेख साडी, ड्रीमगर्ल साडी, जयाप्रदा साडी असे २६ प्रकार दाखविले गेले. हे झाले साडी नेसण्याचे म्हणजे त्या रचनेचे प्रकार. पण साड्यांना गावाच्या, राज्यांच्या, साडीच्या काठांच्या किंवा धाग्याच्या नावावरून ओळखले जाते. उदाहरणार्थ, आसामी, ओरिसी, इंदुरी, कलकत्ता, गढवाल, धारवाडी, बनारसी, मदुराई, लखनवी, महेश्वरी. तर मुगा सिल्क, बांधणी, तलम, टसर, जॉर्जेट, इरकल, सॅटीन, वुली, शीफॉन,सुती, रेशमी, गर्भरेशमी इत्यादी. तसं पाहिलं, तर साडी हे स्त्रियांनी गुंडाळून नेसण्याचे ठराविक लांबी रुंदीचे कापड. व्यापार, फॅशन, स्पर्धा, उपयुक्तता, सुलभता यामुळे या लांब-रुंद कापडावर संस्कार होत होत अनेक बदल झालेले दिसतात.वस्त्राच्या विविध पोतानुसार अनेक रंग,रंगछटा, काठपदर विविध आकृतीबंध, नक्षीकाम करण्याच्या पद्धती व तंत्रे विकसित झालेली पाहायला मिळतात.काठावरून साडीचे प्रकार म्हणाल तर रुद्र्काठी,नारळीकाठी,असावरीकाठी, गोमिकाठी, करवतकाठी, कोयरीकाठी,नारायण पेठी(आंध्र प्रदेशातील नारायणपेठ येथे या तलम साड्या प्रसिद्ध आहेत.पुण्यातली नारायण पेठ नाही.)          


        वस्त्र किंवा साडी वापरण्याची प्रथा भारतात प्राचीन काळापासून चालत आली आहे.संस्कृतीचा विकास होऊ लागला तसतशी सौंदर्य दृष्टी वाढत गेली आणि वेगवेगळ्या शैली निर्माण होत गेल्या.अनेक प्राचीन लेण्यांमध्ये ,गुहांमध्ये,मंदिरे किंवा वास्तू रचनेत असलेल्या विविध प्राचीन शिल्पांमध्ये त्याकाळच्या स्त्रिया कशी वस्त्रे वापरत होत्या हे समजते.इ.स.पूर्व ६४२ ते १९ व्या शतकापर्यंत साडीचे उल्लेख इतिहासात आढळतात. इ.स. तिस-या ते पाचव्या शतकात ऋतू मानानुसार वस्त्रे घालण्याची पद्धत होती. साड्यांवर फुले आणि चिमण्यांचे भरतकाम केलेले असायाचे. विसाव्या शतका पर्यंत डिझाईन मध्ये प्रचंड बदल झाला.                                


       साडी हा भारतीय स्त्रियांचा पारंपारिक ,वैशिष्ठपूर्ण वस्त्रप्रकार. वेशभूषा म्हणजे लोकजीवन, संस्कृती आणि इतिहासाचा आरसा असतो.वेशभूषेवरून त्या त्या प्रदेशाची सामाजिक आणि भौगोलिक स्थिती लक्षात येते.पोशाखा मुळे प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व उठून दिसते. सौंदर्य उठून दिसते.तर त्या पेहरावावरून त्या व्यक्तीची आवड-निवड, त्याची मन:स्थिती, त्याची कलादृष्टी याची ओळख होते. भारतात तर विविधतेत एकता सर्वदूर पहायला मिळते. साडीच्या प्रकार वरून अनेक प्रांत, त्यांची संस्कृती, कलाकुसर ,ऋतुमान, सांस्कृतिक वातावरण, याची ओळख होते.
महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये पाचवार व सहावर साडी वापरतात, आंध्र प्रदेशात आठवारी लुगडे २ ते ३ प्रकारात नेसतात. तामिळनाडू मध्ये लुगडे सात ते दहावार असते. आपल्याकडे नऊवार असते. ढोबळ मानाने स्त्रियांच्या मतानुसार साड्यांचे मुख्यत: दोन प्रकार पडतात.१ )घरात नेसाव्याच्या साध्या साड्या आणि २) बाहेर म्हणजे लग्न समारंभ ,कार्यक्रमाला जाताना नेसावयाच्या साड्या .(आज भारतीय टीव्ही वर घरातल्या घरात भरजरी वस्त्र, दागदागिने घालण्याची अत्यंत चुकीची नवी परंपरा सुरु झाली आहे.) लग्न समारंभ म्हटलं की आधी आठवतात त्या वधूच्या साड्या. प्रांतानुसार वधूचा पोशाखही बदलतो. वधूसाठी च्या साड्या भरजरी, भपकेबाज, आकर्षक असतात. ह्या साडीला महावस्त्र म्हणतात. नववधुचे महावस्त्र म्हणजे बहुतेक बनारसी शालू किंवा भरजरी पैठणी असते. हे ऐश्वर्याचे, वैभवाचे प्रतिक मानले जाते.पैठणीत इरकल पैठणी,शाही पैठणी, पारंपारिक पैठणी, असे अनेक प्रकार आणि हवी ती रेंज .


          भारतात प्रत्येक राज्यात या अशा साड्या त्यांची परंपरा टिकवून आहेत.बिहारची सुंगडी,वाराणसीची किनखाब,बंगालची बालुचारी, उत्तर प्रदेशातली जामदानी,ओरिसाची इक्कत,दक्षिणेकडची कलमकारी व कोरनाद, लखनवी चिकन,राजस्थानची बांधणी,सौराष्ट्राची घरचोला, मध्य प्रदेशातली चुनरी तर महाराष्ट्राची पैठणी, चंद्रकळा,पेशवाई नऊवारी .परंतु या सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण आणि रुबाबदार दिसते ती महाराष्ट्राची पारंपारिक नऊवारी साडी.हालचालीस सोपी,सुटसुटीत,व योग्य .शिवाय सर्वांग झाकले जाऊन शालीनता जपणारी ही नऊवारी आता सहावारी पैठणी अत्यंत शोभून दिसते.बालगंधर्वांच्या नाट्य प्रयोगात अशा एकापेक्षा एक साड्या वापरल्या आहेत.या साड्या तेव्हा अत्यंत लोकप्रिय झाल्या होत्या,रसिकांनी ते बालगंधर्वांचं युग अनुभवलं.अशा या जरतारी नऊवारीत स्त्री भूमिका साकारणारे पुरुष कलावंत एखाद्या खानदानी घराण्यातल्या स्त्री प्रमाणे उठून दिसत. आता मुली जरीचे ड्रेस शिवतात.पैठणीचाही ड्रेस,कुडते मिळतात.जमाना बदलतो पण तरीही जुनं ते सोनं टिकतं ,अगदी शंभर टक्के.साडीची सर कशालाही येत नाही हेच खरं. कार्यक्रम,लग्न ,सण ,समारंभ यासाठी साडीच शोभते.त्याला पर्याय नाही. 



-डॉ. नयना कासखेडीकर

Saturday 3 May 2014

शब्देविण संवादू...


'शब्देविण संवादू... '

            व्यंगचित्र म्हणजे चित्रमय विडंबन. पाहता क्षणी हसविणारे आणि मार्मिक भाष्य जाणवून देणारे चित्र.आपल्या सभोवताली विविध प्रसंगात, घडणा-या घटना-घडामोडीत, बोलण्या-वागण्यात, माणसांच्या प्रवृत्तीत अनेक ठिकाणी विसंगती आढळतात. या विसंगतीचं मार्मिक दर्शन व्यंग चित्रातून होतं. त्यात कधी थट्टा मस्करी असते, कधी उपहास असतो, तर कधी प्रबोधन असते. ही चित्रे रसिकांना योग्य अयोग्य काय याचं भान देतात. त्यांच्यातील खिलाडू वृत्ती वाढवितात. संवेदनक्षमता वाढवितात. कधी निर्मळ हास्य निर्माण करतात. यातला आशयच सामान्य वाचकाला भावत असतो, पण तो प्रभावी ठरतो, तो हे दृश्य माध्यम असल्यामुळे. कारण चित्रेही तेव्हढी परिणामकारक हवीत. रेषा, रंगसंगती, आकार, रचना, या बरोबरच चेहरे, हावभाव, पोशाख, शरीरयष्टी यांची निवड अत्यंत कौशल्याने केलेली असते. अशीच वैशिष्ठपूर्ण व्यंगचित्रे (गॅग) म्हणजे हास्यचित्रे यात उल्लेखनीय कार्य असणारे, व्यंगचित्रकार शि.द.फडणीस.


      शिवराम दत्तात्रय फडणीस यांचा जन्म बेळगाव जिल्ह्यातील भोज इथला. त्यांच मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण कोल्हापूरला झालं. १९४९ मध्ये मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टस मध्ये पदवी शिक्षण घेत असतानाच व्यंगचित्रांचा छंद जडला. मोहिनी, हंस सारख्या कितीतरी मासिकातून त्यांच्या मुखपृष्ठाद्वारे व आतील वैशिष्ट्यपूर्ण चित्रांच्या माध्यमातून ते आपल्याला १९५२ पासून सलग ६२ वर्षे भेटताहेत. 'शब्दविरहीत' चित्र आणि त्यातून निखळ आनंदाची निर्मिती हे त्यांच्या व्यंगचित्रांचे वैशिष्ट्य. अशी अनेक मासिके त्यांच्या हास्यचित्रां मुळेच आपल्या लक्षात कायम राहिली आहेत. ना.सी.फडके, द.मा.मिरासदार, पु.लं.देशपांडे या लेखकांच्या पुस्तकांच्या मुखपृष्ठावरही शि.दं.ची चित्रे आपल्याला भेटतात.


      कोणताही मनुष्य परिपूर्ण कधीच नसतो. त्याच्या वागण्या-बोलण्यात, जीवनात, स्वभावात कुठेतरी विसंगती आढळत असते. काही त्रुटी असतात आणि 'जे न देखे रवी ते देखे कवी ' या उक्ती नुसार हे व्यंग्य कलाकाराला नेमके दिसते आणि त्याची व्यंगचित्रे होतात. अशी ही चित्रे वा फोटो वाचकांना १००० शब्द सांगून जातात. शि.द.फडणीस यांची व्यंगचित्रेही अशीच साधी, सोपी, सरळ. सामान्य लोकांच्या मनातल्या सहज सुलभ भावना, विचार, प्रश्न सरांच्या चित्रात विनोदाच्या रुपात  आपल्यासमोर येतात. यात आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीवर भाष्यही असतं. त्यांची ही चित्रे जीवनातल वास्तव सांगणारी पण तरीही सुखद आणि आनंददायी असतात. त्यांच्या चित्राद्वारे राष्ट्रीय एकात्मता साधली जाते असे वाटते. कारण ही चित्रे भाषांची सीमा पार करतात.


     त्यांच्या या आत्तापर्यंतच्या प्रवासाबद्दल ते म्हणाले, व्यंगचित्रातून निखळ मनोरंजन होतेच पण या दृश्य कलेची चित्रभाषा हा एक गुण आहे. तो तुम्ही किती आत्मसात करता त्यावर कौशल्य अवलंबून आहे. मला लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती. जे. जे. त अॅडमिशन घेतल्यापासून माझ्या करियरची घरात सर्वांना काळजी वाटत होती. कारण व्यंगचित्र म्हणा चित्रकला म्हणा याला तसं फारसं महत्व नव्हत. दैनिकात, मासिकात तर फार तुरळक व्यंगचित्र असायची. मी सहज हौस म्हणून किर्लोस्करस्त्री यासारख्या मासिकांना व्यंगचित्र काढून पाठवायचो जेव्हा 'हंस' मासिकातर्फे मला पहिलं बक्षीस मिळाल तेव्हा जाणवले आपल्यात काहीतरी कौशल्य निश्चित आहे. वाचकांचाही प्रचंड प्रतिसाद मिळत गेला. तसतसे चित्र काढण्याचं प्रमाण वाढलं. १९५२ साली 'मोहिनी' दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर पहिलं चित्र छापलं गेलं. त्या संपादकांनी सांगितल तुमच्यातलं हे वैशिष्ट्य आहे हेच करियर करा.


       व्यंगचित्र या माध्यमाची गुणवत्ता कौशल्यावर अवलंबून असते आणि ते माझ्याकडे होतं. आपण शब्दाशिवाय चित्राने बोलू शकतो हे माझ्या चित्राचं वैशिष्ट्य इतरांनीच माझ्या लक्षात आणून दिलं. त्यामुळे फायदा असा झाला मी भाषेच्या, राज्यांच्या, देशांच्या सीमा ओलांडू शकलो. मला काय म्हणायचयं हे शब्दविरहीत चित्रांतून मराठी, कन्नड, तेलगु, गुजराथी, तामिळी एवढचं काय इंग्रजी भाषेच्या परदेशी माणसांनाही कळत. पाठ्यपुस्तक मंडळामुळे व्यंगचित्राचा 'बोधचित्र' हा एक गुण मला समजला. महाराष्ट्र राज्य शालेय पाठ्य पुस्तक मंडळाने गणिताच्या पाठ्यपुस्तकात सरांच्या चित्रांचा समावेश केला आहे. विद्यार्थ्यांच्या मनात शाळेत गणिता बद्दल खूप भीती असते. पण ही भीती  पुस्तकातील सरांच्या चित्रांमुळे कमी झाली. गणितातल्या अमूर्त संकल्पना सरांनी अगदी पहिलीच्या विद्यार्थ्यांपासून चित्रातून सुलभ करून दिल्या.  

             बँकिंग, आरोग्य, गणित, शास्त्र, कायदातत्वज्ञान या विषयाची पुस्तके त्यांनी सचित्र केली. चित्रांमुळे या विषयांचं वातावरण सुखद बनतं. विषयाची क्लिष्टता कमी होते. जिथे शब्द पोहचत नाहित तेथे चित्र काम करते. निरक्षरांना हे चित्र माध्यम फार महत्वाचे आहे. कॉम्प्युटर बद्दल त्यांना वाटते, आजच्या कॉम्प्युटर युगात कॉम्प्युटर हा सगळ्या सीमा ओलांडून काम करू शकतो. त्यामुळे सर्वांना वाटतं हे सहज शक्य झालंय. पण तसं नाही, चित्रकला किंवा चित्रकार म्हणून करियर करण्यासाठी मनुष्यामधल्या सृजनशक्तीला आव्हान असतं. हे आव्हान कॉम्प्युटर स्वीकारू शकत नाही. त्याला माणूसच हवा. कॉम्प्युटर फक्त आपले कष्ट व वेळ वाचवते कॉम्प्युटरचं एनिमेशन, चित्रकला, ग्राफिक्स या क्षेत्रात सर्वांसाठी स्वागतच करतो मी पण या सगळ्यांचा मुळ पाया चित्रकलाच आहे तो मजबूत हवा.


    चित्रांच्या शैलीबद्दल सांगताना ते म्हणाले, चित्रांची शैली म्हणजे एखाद्याच्या चित्रकलेचा चेहरा म्हणजेच त्याची ओळख असते. जी आपण स्वतः विकसित केलेली असते. तीच तुमची खरी शैली उद्देशपूर्ण व जाणीवपूर्वक चित्र ट्वीस्ट करता आली पाहिजेत. तुमची चित्रशैली अनुकरण मुक्त हवी. सरांची चित्रे डेकोरेटिव्ह व गोंडस असतात. कारण ते ही व्यंगचित्र केवळ ड्राईंग म्हणूनच एन्जॉय करतात. इंटरनेटमुळे जग जवळ आल्याचा अनुभव सरांनीही घेतलाय. 'फेस्टिव्हल ऑफ लाईटस चे अंतरराष्ट्रीय स्वरूप' या विषयावर कैलिफोर्नियातील कूपर्टिनो इथे विषय समजल्यापासून केवळ ३६ तासात व्यंगचित्र पाठविली. अर्थातच ई-मेल ने. तसेच दिवाळी अंकात 'सावली'  या अमेरिकेतील मराठी मासिकात सरांनी मुखपृष्ठ व आतील व्यंगचित्र काढली आहेत.

          अमेरिकेतील व्यंगचित्रकार नॉर्मल रॉकवेल यांची चित्रे त्यांना आवडतात. तर महाराष्ट्रातल्या चारुहास पंडितांचा चिंटू त्यांना खूप आवडतो. एनिमेशन क्षेत्रातला किंग वौल्टर डिस्ने त्यांना अत्यंत आवडतात. शि. द. फडणीस यांची हसरी गॅलरी, मिस्कील गॅलरी, चिमुकली गॅलरी, छोट्यांसाठी चित्रकला, भाग १ व भाग २ (इंग्रजी व मराठी) तसेच १९७२ पासून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाची गणिताची सचित्र पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांचं 'हसरी गॅलरी' हे चित्रांच पहिलं प्रदर्शन १९६५ मध्ये मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरलं. ही प्रदर्शने व स्लाईड शो भारतभर व इंग्लंड, अमेरिका, जर्मनी व इतर देशात सुद्धा झाले आहेत. सरांच्या चित्रप्रदर्शनांना उदंड प्रतिसाद मिळतो. नाशिकच्या प्रदर्शनात एक रसिक, पेशंट असूनही चक्क स्ट्रेचरवरूनच झोपल्या झोपल्या प्रदर्शन पाहून गेला. अशी ही व्यंगचित्रे सर्वाना आनंद देतात. 
      

      
      शि. द. ना त्यांच्या कारकिर्दीत, सु. ल. गद्रे मातोश्री पुरस्कार, मार्मिकचा जीवनगौरव पुरस्कार, गुणीजन कला पुरस्कार आणि बंगळूरच्या जीवनगौरव पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.  
शि.द.फडणीस यांनी रेखाटलेली शब्दविरहित चित्र मिश्किल, खट्याळ, खुमासदारव्यवहारिक व सदोदित तजेलदार अशी आहेत. ती पुन्हा पुन्हा बघाविशी व वाचाविशी वाटतात.     


- डॉ. नयना कासखेडीकर.