Friday 10 March 2023

मुलखावेगळी ती...

 

 मुलखावेगळी ती...

मृण्मयी परळीकर 

      एखाद्या हिर्‍याला पैलू पाडल्यावर तो अधिक चमकू लागतो किंवा तो अधिक तेजस्वी होतो. असेच हिरे प्रत्येकाच्या कुटुंबात मुलांच्या रूपाने असतात. त्यांना अन्न, वस्त्र, निवारा पालकांच्या छत्राखाली मिळतच असतो. पण त्याही पेक्षा त्यांच्या आयुष्याला चांगले वळण देण्याची गरज असते. धैर्यवान, सामर्थ्यवान, निरोगी, नीतीमूल्ये आणि सामाजिक मूल्यांचे भान असणारी मुले घडविणे पालकांचे कर्तव्य असते. कुटुंबा बरोबरच शाळांमधून, महाविद्यालयातून आणि समाजात घडणार्‍य चांगल्या गोष्टीतून मुलांवर संस्कार होत असतात. अशाच वातावरणात घडलेली युवती स्वत: पुरता विचार न करता देश पातळीवर विचार करू लागते. आजची हि मुलूखावेगळं काम करणारी, आई आणि वडिलांनी सामाजिक संस्कारांनी घडविलेली मृण्मयी परळीकर ,साप्ताहिक विवेकच्या पाठ्यवृत्तीसाठी 370 कलम रद्द केल्यानंतरचा बदललेला कश्मीर अभ्यासण्यासाठी धाडस दाखविणारी मृण्मयी.

तिच्याशी बोलल्यावर, दोनच वर्षापूर्वी पोस्ट ग्रॅजुएट होऊन बाहेर पडलेली राज्यशास्त्राची विद्यार्थिनी, असा देशपातळीवरचा, तोही एकेकाळी धगधगत्या असलेल्या, आजही अशांत असलेल्या कश्मीर बद्दल विचार करते याचे कौतुक वाटले.

                                 

कश्मीर सारख्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या भारतातल्या नंदनवनाचा आम्ही आमच्या पातळीवर फक्त पर्यटन म्हणून विचार करतो. कारण कश्मीर कळत्या वयापासूनच सिनेमांमध्ये पाहिलेलं असत, तेंव्हा पासून हा प्रदेश बघायची सुप्त ओढ सर्वांनाच असते.हि इच्छा वेगवेगळ्या टुर्स बरोबर जाऊन पूर्ण करूनही घेत असतो आपण, पण यातल्या किती जणांना कश्मीरमधल्या निसर्ग सोडून असलेल्या परिस्थिति बद्दल ची जाणीव असते? ट्रीप, खरेदी, फोटोसेशन, मौज मजा ,तिथल्या खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेणं झालं की, टूरचं इतिकर्तव्य समाप्त. परंतु मृण्मयी ला नियंत्रण रेषेला लागून असलेल्या पाकिस्तान पासून ६ किलोमिटर वर असलेल्या ‘मच्छल’ एरियात जवानांना आणि लोकांना प्रेरणा देत उभा असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ,कारगिल चे जवानांचे स्मृति स्थळ आणि सर्वात मोठा भारताचा तिरंगा बॉर्डरवर फडकताना पाहिला की तरुण मृण्मयी नतमस्तक होते. जवानांचे बलिदान बघून अश्रु ओघळू लागतात. हे बघत असताना मनात ज्या राष्ट्रीय भावना आलेल्या असतात त्यामुळे कश्मीर मध्ये जाऊनही गुलमर्ग वगैरे ठिकाणी जाऊन वेगळे निसर्ग सौंदर्य बघायला जायची मृण्मयीला गरज वाटत नाही. म्हणून ती आपल्या पेक्षा वेगळी आहे.
  

                                

मृण्मयी ज्ञानप्रबोधिनित शिकली. तिने पुण्याच्या सर परशुराम भाऊ महाविद्यालयात राज्यशात्र घेऊन २०२०ला मास्टर डिग्री घेतली आणि Teach for india साठी टिचिंग फेलो आणि फेलो अडव्हायजर म्हणून काम करते. Tree Foundation साठी पण २०१८ साली छत्तीसगड मध्ये जाऊन प्रोजेक्ट केलं. (Transformation through Research, Education & Empowerment) अरुणाचल प्रदेशात जाऊन काम केलं. आणि ३७० कलम रद्द झाल्यानंतरचा कश्मीर प्रदेश त्या नंतर ३ वर्षानी काय बदलला आहे. कसा बदलला आहे हे जाणून घेण्यासाठी कश्मीर दौर्‍यावर गेली. सद्द स्थिति काय हे जाणून घ्यायला तिने तिथल्या आठवडाभराच्या वास्तव्यात विविध स्तरांतील व्यावसायिक, शेतकरी, कारागीर, युवक, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, विद्यार्थी, महिला, राजकारणी, सरपंच, शरणागत अतिरेकी, लष्करी अधिकारी ते या केंद्रशासित प्रदेशाच्या नायब राज्यपालांपर्यंत अनेकांच्या भेटी घेतल्या. गप्पा मारल्या. वेगवेगळ्या प्रश्नांमधून त्यांच्या मनातल्या भावना, सल समजून घेण्याचा प्रयत्न केला.

भारतीय राज्यघटनेतील काश्मीर बद्दलची जी कलमं आहेत ३७० आणि ३५ अ, जी जम्मू कश्मीरला स्वायत्तता आणि विशेष दर्जा देणारी होती ती एकत्र कधीच रद्द होऊ शकणारी नाहीत आणि जर रद्द झालीच तर अनेक गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असे गंभीर चित्र उभे केले गेले होते. पण खरच ही कलमं रद्द होऊन तीन वर्षे झाली मग आता काय झालं असेल कश्मीर मध्ये ? असा स्वाभाविक प्रश्न मृण्मयीला पडला आणि तिने या अभ्यासासाठी जाण्याचे ठरवले. कारण देशात घडणार्‍या घटना घडामोडींचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम ती अनुभवत होती. या कलमांमुळे भारतापेक्षा कश्मीर ची घटना वेगळी, ध्वज वेगळा, सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण आणि दळण वळण बाबी सोडल्या तर कश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे हे लोकांच्या मनाशी आणि हृदयाशी न भिडता फक्त कागदावरच राहिला. मृण्मयी ज्या तरुणांना भेटली त्यांनाही, “ही कलमं म्हणजे आमची अस्मिता आहे आमची ओळख आहे ती आम्ही गमावून बसलो आहोत असे वाटते” अशा भावना व्यक्त केल्या. याचाच फायदा घेऊन पाकिस्तान आणि इतर काही देशांनी कश्मीर सतत अशांत राहील असे प्रयत्न केले.

पण रिसर्च करणारा एक तरुण म्हणाला, इथल्या सतत सक्रिय असणार्‍या अतिरेकी संघटना, त्यांना असलेला पाकिस्तानचा पाठिंबा आणि दीर्घ काल कुठलीही ठोस कृती, कार्यक्रम नसल्याने तरुण वर्ग अतिरेकी कारवायांकडे आकर्षित झाला आहे. लहान मुलांना सुद्धा गन चालवून बघण्याचे आकर्षण आहे. ही अॅक्टिविस्ट तरुण मुलं सधन कुटुंबातली आहेत, कुणाला कलेक्टर व्हावसं वाटतय, कुणाला देशासाठी सैन्यात जावेसे वाटतेय, ती चांगल्या संधीच्या शोधात आहेत” असे आशादायक चित्र मृण्मयी ने अनुभवले.

मच्छल मध्ये मराठा रेजिमेंट काम करते तिथे शिवरायांचा पुतळा तर आहेच. पण, तिथे शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. मच्छल मेला भरतो, लष्कराचं ढोल लेझीम पथक आहे. सीमा सुरक्षा या मुख्य कामा पलीकडे जाऊन, सर्व काश्मिरी लोकांना देशाच्या प्रवाहात आणण्यांचे जिवापाड प्रयत्न लष्कराचे जवान करतात. कलमं रद्द झाल्यानंतर आणखी एक बदल झाला की, आत्ता पर्यन्त अस्तित्वात नसलेले पक्के रस्ते तिथे बांधले गेले. दळण वळणाची साधने निर्माण झाली.


                                
                   स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित मुलांच्या हातात तिरंगा आणि मनात देशभक्ति

मृण्मयी म्हणते, कश्मीर मध्ये शिक्षणाचा अभाव नाही, तर राष्ट्रीय शिक्षणाचा अभाव आहे. प्रेरणा देणारी व्यक्तिमत्वे चंद्र शेखर आझाद ,स्वामी विवेकानंद, राणा प्रताप यांची चरित्रच तिथे माहिती नाहीत. त्यामुळे असे आदर्शच डोळ्यासमोर नाहीत मुलांच्या. तिथे घडणार्‍य अतिरेकी कारवायांबद्दल तरुणांच्या मनात चीड आहे.

मृण्मयी जेंव्हा तिथल्या राज्यपालांना भेटते तेंव्हा “ही कलमं रद्द होणं आवश्यकच होतं. ती रद्द झाल्यामुळे राष्ट्राच्या मुख्य धारेत, मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदत होते आहे. इथे लागू नसलेले जवळजवळ १८० कायदे थेट लागू झाले. त्यासाठी कोणतीही वेगळी प्रक्रिया करावी लागली नाही. पुढेही करावी लागणार नाही.

विकासासाठी, समृद्धीसाठी शांतता आवश्यक असते. इथे सतत दहशतीचं वातावरण. शांततेशिवाय प्रगती साधणार कशी? ३७०, ३५ अ रद्द झाल्यामुळे इथे शांतता नांदू शकेल. आता काश्मिरी वेगळा न राहता भारताचा, या राष्ट्राचा, नागरिक म्हणून ओळख बळकट होईल आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी ते पूरक ठरेल.” असे कश्मीर च्या परिस्थितीचे आश्वासक बोल तिला ऐकायला मिळतात आणि राज्यपाल म्हणून नियुक्ती झाल्यावर तिथे राबवत असलेल्या अनेक योजनांची यादीच तिला ऐकायला मिळते. हीच तिथल्या बदलांची नांदी आहे असे मृण्मयी म्हणते.

शेती, शिक्षण, उद्योजकता, सामाजिक विकास, कायदेप्रक्रिया, अंतर्गत व सीमा सुरक्षा, पर्यटन, कला, क्रीडा, खाद्य, संस्कृती, ऊर्जा, तंत्रज्ञान, महिला सक्षमीकरण, या सर्वच क्षेत्रांत सकारात्मक बदलांना सुरुवात झाली आहे .

निसर्ग सौंदर्याने नटलेले,भारतातले नंदनवन असलेले कश्मीर!

दैदीप्यमान इतिहास लाभलेले कश्मीर!

सिंधु, झेलम, चिनाब सारख्या नद्यांनी समृद्ध असलेले कश्मीर !

कवी कल्हणच्या राजतरंगिणी खंडात ,महाभारतात, हडप्पा सारख्या प्राचीन अवशेषात हजारो वर्षांचा इतिहास सांगणारी, कश्यप ऋषींची ओळखली जाणारी ही भूमी, अशी दु:खी का?

सुवासिक अत्तरे तयार होणार्‍या या भूमीला दहशतवादी कृत्यांचा वास का?

लहान मुले आणि तरुणाईला बंदुका हाताळण्याचे आकर्षण का?

शत्रुपासून देशाचं रक्षण करणार्‍या, आपली सगळी स्वप्न बाजूला सारून आलेल्या, भारतीय सैनिकांचं वीरमरण ?

आता तर 370 कलम रद्द केलय, मग अजूनही परिस्थिति अशी आहे? असे एक नाही, अनेक प्रश्न मृण्मयी ला एक राज्यशास्त्राची विद्यार्थिनी म्हणून पडलेले. याची उत्तरे शोधण्यासाठी केलेला कश्मीर प्रवास, 370 कलम रद्द केल्यानंतर बदललेला कश्मीर बघण्याची उत्सुकता असलेल्या मृण्मयीच्या विचारांची बैठक चांगली घडली आहे हे लक्षात येतं.
                                 

चांगले शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या चांगल्या संधी सोडून सेवा वृत्तीने आणि जोखीम घेऊन काम करण्याची प्रेरणा मृण्मयीला तिच्या कुटुंबातून आणि शाळा कॉलेज मधूनच मिळाली. असे अभ्यास करण्याची संधी मृण्मयी सारख्या योग्य व्यक्तिला मिळाली तर स्वताला सिद्ध करून दाखवणारी ती चांगली यंग ‘अचिव्हर’ असेल यात शंका नाही. केवळ महिला दिनीच अशांचा विचार करण्याऐवजी मुलीच्या जन्मापासून आयुष्यभरच तिला चांगल्या संधी देऊन, तिच्याकडे चांगले लक्ष देऊन, जडण घडण केली तर अशा अनेक ‘अचिव्हर’ तयार होतील असे वाटते .(मृण्मयी मंदार परळीकर हिची, महिला दिन ८ मार्च २०२३ रोजी विश्व संवाद केंद्रातर्फे मुलाखत घेता आली आणि या निमित्ताने तिचा परिचय सर्वांना करून देता आला याचे समाधान वाटले. हाच विषय ‘मुलखावेगळी ती’ घेऊन विश्व संवाद च्या पोर्टल वर या मालिकेत प्रसिद्ध झाला.)

© डॉ. नयना कासखेडीकर

---------------------------

1 comment:

  1. वेगळी वाटचाल करणाऱ्या मृण्मयी ताईंना शुभेच्छा

    ReplyDelete