कर्तृत्वशलिनी अहिल्यादेवी
भाग ६ - 'दानशूर
अहिल्याबाई'
(जन्म-३१ मे १७२५-चौंडी,अहमदनगर, मृत्यू- १३ ऑगस्ट १७९५,इंदोर.)
अहिल्याबाईंनी राज्यकारभार हातात घेतल्यापासून म्हणजे इ. स. १७६७ ते १७९५ हा काळ संक्रमण अवस्थेचा होता.मुघली कारभाराची पद्धती विकृत झाली होती असा उल्लेख इतिहासात आहे. त्यामुळे मुघली करभाराला तोंड द्यायचे आणि आपली राज्यव्यवस्था अंमलात आणून ती वाढवायची व टिकवायची अशी दुहेरी जबाबदारी, त्या काळातील सुभेदारांवर पडली होती. पेशव्यांच्या बरोबर राहून मल्हारराव सुद्धा ही कामगिरी चोख करत होते. प्रांतात नवा जम बसवून त्यांनी तो अहिल्याबाईंच्या हाती सुपूर्द केला होता. अहिल्याबाईंनी तर आपल्या कामाने यावर कळसच चढवला.अहिल्याबाईंची कारकीर्द हा होळकर राजवटीचा सुवर्णकाळ होता असे म्हटले जाते.
‘ऐकावे जनाचे, करावे मनाचे’असा अहिल्याबाईंचा बाणा होता.राज्य कारभाराच्या अनुभवाप्रमाणेच मोठमोठाले ग्रंथ वाचून त्यावर चिंतन मनन सुद्धा असेलच.अभ्यास असेल. कारण त्यांच्या संग्रही असलेले ग्रंथ पाहिले की आपल्या धर्माबाबत त्या कशा उदार व विधायक वृत्तीच्या होत्या, धर्म आणि संस्कृती टिकविण्यात त्यांचा कसा सहभाग होता हे पटते, देवीचा संग्रह, रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी पोथी, गीता, अणू वेदान्त, विष्णुसहस्त्र नाम, अमरकोष, पद्मपुराण, भागवत, सूर्यनमस्कार, श्रीसप्तशतीपाठ, श्री गणपती सहस्त्रनाम, श्री तुळशी प्रदक्षिणा,श्री अश्वत्थ प्रदक्षिणा, श्री अध्यात्म रामायण आणि इतर महत्वाचे ग्रंथ ही हस्तलिखिते त्यांच्या संग्रही होती.त्यांचं मोठं ग्रंथालय च होतं. होळकर राजघराणे हे सर्व सम आदराने करत असत. म्हणून संस्थानाबाहेर सुद्धा या क्षेत्रांचा आणि देवादिकांचा विचार होत असे.
राष्ट्राच्या म्हणजे प्रजाजनांच्या हिताचे निर्णय विशेषता आर्थिक सोय त्या आवर्जून करत. म्हणूनच त्या दानशूर धर्मकारिणी ठरल्या आहेत. इस्लामिक शासकांच्या काळात धुळीस मिळालेली अनेक हिंदू मंदिरे अहिल्याबाईंनी पुनःस्थापित केली. मुस्लिम आपली देवळे पाडतात तो त्यांचा धर्मांधपणा झाला,पण ही भग्न देवालये आपण नीट नाही केली तर आपली अस्मिता ती काय राहील? ती जपण्यासाठी देवालयांचा उद्धार करून मुस्लिमांना अनेक ठिकाणी समजाऊन सांगितले की बादशहाच्या रक्षणाची जबाबदारी मराठ्यांनी घेतली आहे ,भाईचारा ठेवा, मी तुम्हास मशीद ही बांधून देते पण तुम्ही देवळांचा विध्वंस करू नका.दानधर्म करताना त्या भेदभाव करत नसत. श्रावणात फकीरांना सुद्धा सढळ हाताने दान देत आणि सांगत, “आम्ही आपल्या दर्ग्यास वर्षासने देतो, मंदिरांचा नाश करणाऱ्या आपल्या भावांना सांगा, धर्म वैर करायला शिकवीत नाही”. धर्म म्हणजे सन्मार्गावर ठेवणारे एक सूत्र. धर्म वैर करायला शिकवीत नाही ,बंधुभाव सांगतो. असे अहिल्याबाईंचे म्हणणे होते.
केवळ महेश्वरलाच ७० ते ८० मंदिरे जीर्णोद्धार केली व काही नवीन बांधली. महेश्वरच्या किल्ल्यावर वेदशास्त्र संपन्न पुजारी, याज्ञिकी, शास्त्री, महंत, कीर्तनकार, ज्योतिष शास्त्री अशांची किल्ल्यावर वस्ती करून त्यांची ही सोय लावली. नुसते देऊळ बांधून उपयोग नाही त्याकरता त्यानंतर त्याची पूजा, अर्चना व इतर व्यवस्था पण त्यांनी लावली होती.
प्रवास करणाऱ्या पांथस्थ ब्राह्मणाला धर्मकार्य म्हणून अन्नदान केलेच पाहिजे त्यासाठी अहिल्याबाईंनी वर्षभराची सोय म्हणून व्यवस्था लावली. नर्मदा परिक्रमा करणाऱ्याना चिखलदा येथे अन्न छत्र सुरू केले. अहिल्याबाई नेहमी म्हणत की, “स्नानाने देहशुद्धी होते, ध्यानाने मनशुद्धी होते आणि दानाने धनशुद्धी होते”. त्याग आणि सेवा तसेच दानधर्म याला आपल्या संस्कृतीत फार महत्व आहे. अहिल्याबाईंचे सारे जीवन, त्याग आणि सेवा यासाठीच खर्ची झालेले दिसते.त्याग आणि सेवा म्हणजे ईश्वर भक्ती च त्या मानत असत.विशेष म्हणजे अहिल्याबईनी खाजगी संपत्ति चा वापर अनेक देवळे आणि घाट बांधायला खर्च केलेली दिसते. त्याचा गाजावाजा व प्रसिद्धी न करता दानधर्म केला आहे. तसेच खाजगी खर्चासाठी सरकारी तिजोरीतिल पैसा वापरणे हा त्या गुन्हा समजत. माणसातलं माणूसपण सदैव वाढत राहावं यासाठी त्यांनी मंदिरे , पूजा अर्चना याचे महत्व जाणले होते.मंदिरात तेल वाती ची व्यवस्था अशा बारीक गोष्टींचा विचार त्या करत.
कवी माधव जूलियन म्हणतात,
--ले. डॉ. नयना कासखेडीकर
-----------------------------------------