Sunday, 12 January 2025

कर्तृत्वशलिनी अहिल्यादेवी भाग ६ - 'दानशूर अहिल्याबाई'

 

कर्तृत्वशलिनी अहिल्यादेवी

भाग ६ - 'दानशूर अहिल्याबाई'

(जन्म-३१ मे १७२५-चौंडी,अहमदनगर, मृत्यू- १३ ऑगस्ट १७९५,इंदोर.)


अहिल्याबाईंनी राज्यकारभार हातात घेतल्यापासून म्हणजे इ. स. १७६७ ते १७९५ हा काळ संक्रमण अवस्थेचा होता.मुघली कारभाराची पद्धती विकृत झाली होती असा उल्लेख इतिहासात आहे. त्यामुळे मुघली करभाराला तोंड द्यायचे आणि आपली राज्यव्यवस्था अंमलात आणून ती वाढवायची व टिकवायची अशी दुहेरी जबाबदारी, त्या काळातील सुभेदारांवर पडली होती. पेशव्यांच्या बरोबर राहून मल्हारराव सुद्धा ही कामगिरी चोख करत होते. प्रांतात नवा जम बसवून त्यांनी तो अहिल्याबाईंच्या हाती सुपूर्द केला होता. अहिल्याबाईंनी तर आपल्या कामाने यावर कळसच चढवला.अहिल्याबाईंची कारकीर्द हा होळकर राजवटीचा सुवर्णकाळ होता असे म्हटले जाते.

‘ऐकावे जनाचे, करावे मनाचे’असा अहिल्याबाईंचा बाणा होता.राज्य कारभाराच्या अनुभवाप्रमाणेच मोठमोठाले ग्रंथ वाचून त्यावर चिंतन मनन सुद्धा असेलच.अभ्यास असेल. कारण त्यांच्या संग्रही असलेले ग्रंथ पाहिले की आपल्या धर्माबाबत त्या कशा उदार व विधायक वृत्तीच्या होत्या, धर्म आणि संस्कृती टिकविण्यात त्यांचा कसा सहभाग होता हे पटते, देवीचा संग्रह, रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी पोथी, गीता, अणू वेदान्त, विष्णुसहस्त्र नाम, अमरकोष, पद्मपुराण, भागवत, सूर्यनमस्कार, श्रीसप्तशतीपाठ, श्री गणपती सहस्त्रनाम, श्री तुळशी प्रदक्षिणा,श्री अश्वत्थ प्रदक्षिणा, श्री अध्यात्म रामायण आणि इतर महत्वाचे ग्रंथ ही हस्तलिखिते त्यांच्या संग्रही होती.त्यांचं मोठं ग्रंथालय च होतं. होळकर राजघराणे हे सर्व सम आदराने करत असत. म्हणून संस्थानाबाहेर सुद्धा या क्षेत्रांचा आणि देवादिकांचा विचार होत असे.

राष्ट्राच्या म्हणजे प्रजाजनांच्या हिताचे निर्णय विशेषता आर्थिक सोय त्या आवर्जून करत. म्हणूनच त्या दानशूर धर्मकारिणी ठरल्या आहेत. इस्लामिक शासकांच्या काळात धुळीस मिळालेली अनेक हिंदू मंदिरे अहिल्याबाईंनी पुनःस्थापित केली. मुस्लिम आपली देवळे पाडतात तो त्यांचा धर्मांधपणा झाला,पण ही भग्न देवालये आपण नीट नाही केली तर आपली अस्मिता ती काय राहील? ती जपण्यासाठी देवालयांचा उद्धार करून मुस्लिमांना अनेक ठिकाणी समजाऊन सांगितले की बादशहाच्या रक्षणाची जबाबदारी मराठ्यांनी घेतली आहे ,भाईचारा ठेवा, मी तुम्हास मशीद ही बांधून देते पण तुम्ही देवळांचा विध्वंस करू नका.दानधर्म करताना त्या भेदभाव करत नसत. श्रावणात फकीरांना सुद्धा सढळ हाताने दान देत आणि सांगत, “आम्ही आपल्या दर्ग्यास वर्षासने देतो, मंदिरांचा नाश करणाऱ्या आपल्या भावांना सांगा, धर्म वैर करायला शिकवीत नाही”. धर्म म्हणजे सन्मार्गावर ठेवणारे एक सूत्र. धर्म वैर करायला शिकवीत नाही ,बंधुभाव सांगतो. असे अहिल्याबाईंचे म्हणणे होते.

केवळ महेश्वरलाच ७० ते ८० मंदिरे जीर्णोद्धार केली व काही नवीन बांधली. महेश्वरच्या किल्ल्यावर वेदशास्त्र संपन्न पुजारी, याज्ञिकी, शास्त्री, महंत, कीर्तनकार, ज्योतिष शास्त्री अशांची किल्ल्यावर वस्ती करून त्यांची ही सोय लावली. नुसते देऊळ बांधून उपयोग नाही त्याकरता त्यानंतर त्याची पूजा, अर्चना व इतर व्यवस्था पण त्यांनी लावली होती.

प्रवास करणाऱ्या पांथस्थ ब्राह्मणाला धर्मकार्य म्हणून अन्नदान केलेच पाहिजे त्यासाठी अहिल्याबाईंनी वर्षभराची सोय म्हणून व्यवस्था लावली. नर्मदा परिक्रमा करणाऱ्याना चिखलदा येथे अन्न छत्र सुरू केले. अहिल्याबाई नेहमी म्हणत की, “स्नानाने देहशुद्धी होते, ध्यानाने मनशुद्धी होते आणि दानाने धनशुद्धी होते”. त्याग आणि सेवा तसेच दानधर्म याला आपल्या संस्कृतीत फार महत्व आहे. अहिल्याबाईंचे सारे जीवन, त्याग आणि सेवा यासाठीच खर्ची झालेले दिसते.त्याग आणि सेवा म्हणजे ईश्वर भक्ती च त्या मानत असत.विशेष म्हणजे अहिल्याबईनी खाजगी संपत्ति चा वापर अनेक देवळे आणि घाट बांधायला खर्च केलेली दिसते. त्याचा गाजावाजा व प्रसिद्धी न करता दानधर्म केला आहे. तसेच खाजगी खर्चासाठी सरकारी तिजोरीतिल पैसा वापरणे हा त्या गुन्हा समजत. माणसातलं माणूसपण सदैव वाढत राहावं यासाठी त्यांनी मंदिरे , पूजा अर्चना याचे महत्व जाणले होते.मंदिरात तेल वाती ची व्यवस्था अशा बारीक गोष्टींचा विचार त्या करत. 

काशी विश्वेश्वरच्या मंदिराचा जीर्णोद्धार ,मनकर्णिका घाट, दशाश्वमेध घाट . चित्रकूटला श्रीरामाचे मंदिर बांधून रामपंचयातन ची स्थापना केली.जेजूरीचे मल्हार गौतमेश्वर मंदिर, परळीत वैजनाथ मंदिराचा जीर्णोद्धार, वेरूळ च्या घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार,गजनीच्या महंमदाने तोडफोड केलेले सोमनाथ चे मंदिर पुनः बांधले. मूर्तीची स्थापना केली. याशिवाय हृषीकेश,सुलपेशवर, सांगमणेर, नाशिक, दिंडोरी(निफाड), संबळ. श्री शैल्य,मंडलेश्वर, भुसावळ, गया, पंढरपूर, पुष्कर,चौंडी ,बद्रीनारायण ,गंगोत्री,अयोध्या, आलमपुर,उज्जैन, ओंकार मांधाता ,इथे मंदिरे बांधली. देवलयांची गरज त्यांनी ओळखली होती. प्रजेमध्ये सदाचार निर्माण करणं या हेतूने खाजगी पैशानेच देवळे, अन्नछत्रे, विहिरी, धर्मशाळा, अनाथ आश्रम , घाट, पाणपोया, कुंड बांधून घेतल्या . ती कायम स्वरूपी चालू राहतील अशी आर्थिक व्यवस्था केली.पूजाऱ्याला उपजीविके साठी काही गावे धर्मादाय दिली. प्रेमाने आणि धर्मशक्तीने अहिल्याबाईनी भारतातील सर्व प्रांतांना जिंकले होते. हिंदू संस्कृतीच्या जीर्णोद्धार कार्यात अहिल्यादेवी होळकर यांचे योगदान खूप मोठे आहे. त्या भगवान शंकराच्या निस्सीम भक्त होत्या. आपले राज्य त्यांनी शिवार्पण करूनच राज्य कारभार केला होता.त्यांच्या दरबारी आदेशावर ‘श्रीशंकर आज्ञेवरुन’ अशी राजमुद्रा दिसते.

कवी माधव जूलियन म्हणतात,

कुणी काय बांधिले

स्थळे शोधूनी निसर्ग सुंदर रम्य मंदिरे घाट कुणी |

वा पडशाळा बांधून केले येते जाते लोक ऋणी ||

पुनरुद्धारे नवी पाहता किती मंदिरे भग्न जुनी |

धन्यवाद आसेतू हिमाचल मिळती कोणाला अजुनी ?

अन्नछत्रही विद्याभिक्षुक यात्रिक यास्तव करून सुरू |

संसृतीचिंतेतून सोडविले विद्याध्यापक धर्मगुरू?

जिच्या व्यक्तिगत उत्पन्नातून वाहे दानाची सरिता ,

ती गंगाजल निर्मल राणी कोण जिचा नच कोश रिता?

भोगपरान्मुख होय परी न घे कर्तव्याचा संन्यास |

निदिध्यास घे सदा शिवाचा योग कठीण हा अन्यास ||

राजयोग जनकाचा नाही भाकड गोष्ट पुराणीची |

रहस्य डावी इतिहासाची कथा अहिल्या राणीची ||

कांचनगंगा वाहवूनी जी उभवी यशाचा धवलगिरी |

होळकरकुलप्रभा ,कोण हो ततस्मृतिला न धारील शिरी?



--ले. डॉ. नयना कासखेडीकर

-----------------------------------------

कर्तृत्वशलिनी अहिल्यादेवी भाग ५ – धैर्यशील अहिल्यादेवी

 

कर्तृत्वशलिनी अहिल्यादेवी

भाग ५ – धैर्यशील अहिल्यादेवी

(जन्म-३१ मे १७२५-चौंडी,अहमदनगर, मृत्यू- १३ ऑगस्ट १७९५,इंदोर.)


बाजीराव पेशवे यांच्या बरोबर लढाईहून परतत असताना सैन्याचा तळ चौंडी गावात सीना नदीच्या काठी मुक्कामी होता. नदीकाठी असलेल्या महादेवाच्या देवळात छोटी अहिल्या देवदर्शनाला आली होती. नदीकाठी मैत्रिणींबरोबर ती वाळूत शिवलिंग तयार करत होती. तेव्हढ्यात सैन्याचा घोडा उधळला आणि मैत्रिणी ओरडून पाळल्या पण अहिल्या पिंडीचे रक्षण करत तशीच उभी राहिली होती आणि घोडा तिच्या बाजूने उधळून निघून गेला . मल्हारराव व बाजीराव हे पाहताच धावत आले आणि बाजीराव अहिल्येला रागवून म्हणाले, “इथे का थांबलीस पोरी? घोडा तुला तुडवून गेला असता तर? त्यावर धीट अहिल्या म्हणाली, “जे आपण घडवावे ते प्रसंगी जीव सांडूनही रक्षण करावे असेच वडिलधारी माणसे सांगतात , तेच मी केले, मी घडवलेल्या पिंडीचे मीच रक्षण केले. माझे काही चुकले का?” तिचे हे बाणेदार उत्तर ऐकून बाजीराव पेशवे म्हणाले, "मल्हारराव, हिला तुमची सून करा , तिला राज्याच्या लायक करा .ती राज्य नावारूपाला आणेल. राज्यकारभाराच्या अनेक पदराचं हिला शिक्षण द्या" आणि खरच लग्नानंतर अहिल्येचे असे सर्वच शिक्षण सुरू झाले. अहिल्या सर्वच विषयात प्रगती करत होती. वाचन आणि अभ्यासा बरोबरच हिशोब बघणे, वसूली जमा खर्च तपासणे, न्यायनिवाडे करणे, सरदारांना पत्रे पाठवणे, आणि मुख्य म्हणजे फौजा तयार ठेवणे, गोळाबारूद, बाण भाते, ढाल तलवारी सज्ज ठेवणे, ही कामे ती करत असे. सासरे बुवा मल्हारराव कौतुकाने म्हणत, “आम्ही तलवार गाजवतो, ती सुनबाईंच्या भरोशावर” विशेष म्हणजे अहिल्याबाई, पती खंडेरावांना पण रणविद्या शिकण्यास प्रोत्साहित करत असत. खंडेरावला यात रस नसे. त्यामुळे लग्नानंतर अवघ्या दहा वर्षांच्या काळात, अहिल्याबाई दिवसें दिवस जास्तच समर्थ होत गेल्या.

मल्हारराव सतत लढाया करण्यात गुंतलेले असत तेंव्हा, ते असतील तिथून पत्रे पाठवून अहिल्येला सल्ला देत, कामे करायला संगत. अहिल्या मल्हाररावांबरोबर रणांगणावर सुद्धा जात होत्या. अहिल्या आपल्या अनुपस्थितीत कारभार पहाते म्हणजे आपणच पाहतो असा खूप विश्वास वाटे त्यांना. त्यांचा पत्र संवाद फार छान आहे. ते म्हणतात, "अहिल्येस आशीर्वाद! तुम्ही इंदोरला आहात , सात हजार फौजेच्या तयारीत असावे, जंबुरा, तोफा, गाडे यात कुचराई नको, शागिर्दाप्रती वर्तन दयाळू ठेवावे.प्रजेकडुन रुपये येतात त्यांच्या सुखसोयी नेटक्या कराव्यात”.

त्याला अहिलेने पाठवलेले उत्तर- “तीर्थरुप वडिलांप्रति साष्टांग दंडवत. आशीर्वाद असू द्यावा, चुकभुल तर होणे आहेच, एकशे वीस जंबुर तोफा आणि बारूद पक्की सहा मण, सोबत तेज गोलंदाज, रोज दिडीने, पण निशाणी पक्की, आम्ही परीक्षा करून घेतली आहे. भरणा वसूल नेटका चालू आहे. आपल्या तलवारीस यशच आहे. आपल्या हुकूमाप्रमाणे शिकस्त करते". – आपली आज्ञाधारक - सौ.अहिल्या.”

१७५४ च्या कुंभेरीच्या लढाईत तर मल्हारराव, खंडेराव आणि अख्खे कुटुंबच अजमेर येथे गेले होते. तिथे सुद्धा अहिल्याबाई पहाटे उठून पुजा करत, सर्वांना अंगारा लावून, मग मुदपाखान्यात लक्ष घालून, पुढे जखमींवर उपचार करून, शस्त्रांस्त्रांची व्यवस्था करवून घेऊन, दिवसभर तोफखाना सांभाळायचा अशी दीड महीना कामे केली. मात्र याच लढाईत अहिल्येच्या भाळी वैधव्य आले. खंडेराव मारला गेला. छातीवर दगड ठेऊन मल्हार रावांच्या मार्गदर्शनाखाली पुढची वाटचाल सुरू केली. आता पुढचे आयुष्य प्रजेसाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी घालवण्याचा 'पण' अहिल्याबाई यांनी केला.

पुढे अहिल्याबाईनी इंदोर मध्ये तोफांचा कारखाना उघडला . स्वत: जातीने त्यातील कामकाजाची धुरा सांभाळत . यातली युद्ध साहित्याची इत्थंभूत माहिती त्यांना होती.

पानिपतच्या युद्धात मल्हार रावांच्या हुकूमा प्रमाणे अहिल्या तोफखाना घेऊन ग्वाल्हेरला गेल्या होत्या. यात लाखो योद्धे मारले गेले. या युद्धाने खूप मोठे नुकसान झाले होते.पानिपतची रसद तुटली होती. अनेक सैनिक अन्न आणि पाणी, पाणी करत कोसळले होते. अहिल्या इंदोर ला येऊन राजवाड्यात असलेल्या जखमी लोकांना उपचार करू लागली. सेवा पथके उभारली. सगळ्यांना धीर देऊ लागली. वैद्यकीय उपचार सुरू केले, चुली पेटवून सर्वांना पोटभर खायला देत होती. हजारो लोक राबत होते. करुणेची प्रतिमा असलेली अहिल्या यावेळी जनतेची आई म्हणून सिद्ध झाली होती. ती आईच्या मायेची फुंकर युद्धात जखमी व असहाय्य झालेल्यांना घालत होती.

पानिपतच्या युद्धानंतर मल्हारराव सतत मोहिमांवर जाऊ लागले होते. पाच वर्षात उत्तरेकडील घडी त्यांनी नीट बसविली. या सुमारास अहिल्या इंदोरचा राज्य कारभार नीट सांभाळत होती. पानिपतच्या युद्धाच्या अनुभवावरुन लक्षात ठेऊन अहिल्याबाईंनी ठिकठिकाणी विहिरी खोदून घेतल्या जेणे करून सैन्याला युद्ध प्रसंगात कुठेही पाण्याची कमतरता भासणार नाही. दंगाफसादाच्या वेळी आश्रयस्थान हवे म्हणून धर्मशाळा बांधून घेतल्या . रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग याप्रमाणे अशा युद्ध समयी सुद्धा अहिल्याबाई न डगमगता , धैर्याने तोंड देत असत. पुढेही असेच अनेकदा प्रसंग आले, यातून निभावत, अनुभव घेत, शेवटच्या क्षणापर्यंत प्रजेसाठी दक्ष राहिल्या.

ले. डॉ. नयना देवेश्वर कासखेडीकर .


                                                            ------------------------------

कर्तृत्वशलिनी अहिल्यादेवी भाग-४ - रूढी, परंपरा आणि अहिल्याबाई

 

कर्तृत्वशलिनी अहिल्यादेवी

भाग-४ - रूढी, परंपरा आणि अहिल्याबाई

(जन्म-३१ मे १७२५-चौंडी,अहमदनगर, मृत्यू- १३ ऑगस्ट १७९५,इंदोर.)

अष्ट वर्षात भवेत कन्या .... या सूत्रा प्रमाणे अठराव्या शतकात मुलीचा आठव्या वर्षीच विवाह केला जाई. तसेच वयाच्या कुठल्याही वर्षी वैधव्य आले तरी ती पत्नी/मुलगी, नवर्‍याबरोबर सती जाई. अगदी ८,९ वर्षांच्या कोवळ्या बालिका पण केवळ प्रथा म्हणून सती जात. अशी अनेक बंधने स्त्रियांना त्या काळी पाळावी लागत होती. वास्तविक स्त्रियांना जी जाचक असत. अन्यायकारक असत आणि या बंधनाचे मूळ धर्माशी जोडले जाई. याचा काही लोक गैरफायदा सुद्धा घेत. ही सर्व बंधने स्त्रिया मुकाट्याने सहन करत, पाळत असत. याच वातावरणात अहिल्येचे आयुष्य गेले. परंपरेप्रमाणे तिचा विवाह लहान वयातच झाला. पण तिच्या तजेल बुद्धीने कळत्या वयापासूनच निरीक्षण, अनुभव यातून, बुद्धीच्या कसोटीवर प्रत्येक अशा परंपरा आणि रूढी या गोष्टींचा विचार केला. वृत्तीने धार्मिक असूनही या विरोधात विचार करतात म्हणून लोकांना आश्चर्य वाटे.  

       सासरे सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुळेच अहिल्यादेवीचे अस्तित्व उरले होते ते, केवळ तिला खंडेरावाबरोबर त्यांनी सती जाऊ दिले नाही म्हणून. प्रथेप्रमाणे अहिल्या सती गेली असती तर? एव्हढे मोठे कार्य उभेच राहले नसते. पण सती जाण्याचा प्रसंग अहिल्येवर २९ व्या वर्षी ओढवलाच होता. सासर्‍यांच्या रूपात एक पुरुषच या प्रथेविरुद्ध अहिल्येच्या मदतीला धाऊन आला होता. पण अहिल्येशिवाय घरात ज्या स्त्रिया होत्या त्या सर्वच सती गेल्या. मल्हाररावांच्या दोन पत्नी, खंडेरावच्या इतर बायका (सवती), मुलगा मालेरावाच्या दोन्ही बायका(वय वर्ष ८च्या ), मुलगी मुक्ता, दोन नातसुना, अशा स्वत:च्या घरातच १८ बायका सती गेल्या . याचे शल्य अहिल्यादेविना सतत बोचत राहिले. कारण त्यांनी कडाडून विरोध केला तरी काही झाले नाही. उलट सुना आणि नात सुना सती जात होत्या तेंव्हा अहिल्यादेविंना भूल देऊन झोपवले जात होते. त्यांना हा त्रास सहन होत नव्हता. घरातच भोगलेल्या या दु:खामुळे समाजासाठी सती विरोधात लोकांची मते सुधारण्यासाठी त्या सतत काम करत राहिल्या. ज्या रूढी परंपरा पटत नाहीत त्याच्या विरोधात जाऊन निर्णय पण घेतले. कृती केली.

दोन्ही सुना (मालेराव च्या बायका) सती जायला निघाल्या,तेंव्हा इवल्याशा पोरींना सतीची वस्त्रे नेसवली तेंव्हा त्या व्याह्यांना विरोध करत म्हणाल्या का जायचं एव्हढ्याशा पोरींनी सती? पण रूढी होत्या. व्याही म्हणाले, “आमचे घराणे सतीचे आहे, आमच्या घरात एकही विधवा नाही, आमच्याकडची कन्या पण सतीचं वाण घेऊनच जन्माला येते”. अहिल्यादेवी कळवळल्या. कुटुंबातील लोकांना पण वाटत होते की एव्हढी स्त्री पण धर्म विरोधी कृत्याला परवानगी देते. उलट अहिल्या सती न गेल्याने तीनेच धर्म विरोधी कृत्य केले आहे असे त्यांचे म्हणणे होते.

अहिल्यादेवींचे जसे हे सती विरोधी विचार होते तसे लग्न लावण्याच्या बाबतीत पण स्वत:च्याच घरात त्यांनी धारिष्ट्य दाखवून प्रयोग केला. तो म्हणजे, मुलगी मुक्ताचे लग्न ठरवताना,स्वयंवर सारखा पण ठेवला. या भागात प्रजेची सुरक्षितता, प्रवाशांची आणि रस्त्याने जाणार्‍या यात्रेकरूंची लूट करणार्‍या , भिल्ल लोकांचा जो बंदोबस्त करील त्याच मुलाशी माझ्या मुक्ताचे लग्न लावून देईन असा तो पण होता. यालासुद्धा लोकांनी नावे ठेवली. दूषण दिले. मुक्ता अठरा वर्षाची झाली आणि हा पण पूर्ण करणारा शूर युवक यशवंत फणसे याच्याशी मुक्ताचे लग्न लावून दिले. इथे लग्नाचे वय आणि स्वता विधवा असून मुक्ताच्या कन्यादानाचे कर्तव्य पार पाडत ही परंपरा अहिल्याबाईनी मोडीत काढली होती. लोकांना म्हणूनच हा धक्का होता.

अहिल्याबाईंच्या मते ज्या रूढी अंधारकडून उजेडकडे नेतात त्याच मानाव्यात. उजेडाकडून अंधाराकडे नेणार्‍या रूढी त्यांना मान्य नव्हत्या. लग्न वयाप्रमाणेच हुंडा पद्धत पण त्यांना अजिबात मान्य नव्हती. स्त्रियांना आदिशक्ती, देवी, देवतासम मानणे म्हणजे स्त्रियांच्या कौतुकाची नुसती ढोंगबाजी वाटायची त्यांना. तिला लग्न करून घरी आणताना मात्र हुंडा घेणे, मानपान करून घेणे, सोनेनाणे घेणे, पैसे घेणे हा सारा स्वार्थी खेळ ? मग काय त्यांनी राज्यात हुंडा बंदी केली. राज्यात कुठल्याही जाती जमातीत विवाह समयी कन्येच्या पालनकर्त्याकडून पैसे घेतल्यास तो गुन्हा समजण्यात येईल. असा आदेश त्यांनी काढला .   हुंडा घेणारा, हुंडा देणारा आणि मध्यस्थ या सगळ्यांना दंड ठोठावला जाण्याची कायद्यात तरतूद केली. त्या काळात हा निर्णय घेणे म्हणजे धैर्याचीच गोष्ट होती. वास्तविक त्यांना स्वताला याचा काय उपयोग ? पण सामाजिक चालीरीतिंचा स्त्रियांना त्रास होऊ नये हे प्रजेचे हित त्यांनी लक्षात घेतले होते.    

पितृपंधरवडयात त्यांच्या कडे श्राद्धे घातली जात. आजही स्त्रिया पाणी देत नाहीत. अंत्यविधी करत नाहीत. स्वता अहिल्यादेवी ही श्राद्धे करत. त्या म्हणत मला स्त्री त्या देवानेच केले आणि विधवा पण त्यानेच केले मग मी जशी आहे तशानेच कार्य करत्ये.

त्यांना वाटे स्त्रियांचा सन्मान म्हणजे माळवा प्रांतातला लौकिकअसला पाहिजे. विधवेकडून नजराणा घेणे ही राजयकारभाराची प्रथा म्हणजे शुद्ध दरोडाच आहे असे म्हणून त्यांनी विधवा महिलांना मूल दत्तक घेण्याची परवानगी दिली होती. म्हणजे वारस असतांना कुणी त्या विधवेला पैसे मागणार नाहीत.   

स्त्री असल्याने स्वता रूढी परंपरा व त्याची दु:खे भोगल्यामुळे ,स्त्रीत्वाची बंधने सांभाळून .संघर्ष करत करतच आपले जीवन कर्तव्यपूर्तीने सफल केले.       

-        लेखिका. डॉ. नयना कासखेडीकर, पुणे .

--------------------------------

Tuesday, 29 October 2024

कर्तृत्वशालिनी अहिल्यादेवी भाग 3 – ‘लोकहितदक्ष अहिल्याबाई’

 




कर्तृत्वशालिनी अहिल्यादेवी

भाग 3 – ‘लोकहितदक्ष अहिल्याबाई’

(जन्म-३१ मे १७२५-चौंडी,अहमदनगर, मृत्यू- 13 ऑगस्ट १७९५,इंदोर.)


                                                           

            अहिल्याबाईंचा दिनक्रम अगदी आखीव रेखीव होता. पहाटे उठून स्नान आटोपून शंकराची पूजा. स्तोत्र पठण. थोडे दूध पिऊन मग दिवसभराच्या कामाची आखणी व आढावा घेणे, आलेल्या तक्रारींचे कागद वाचून ठेवणे. गुप्त पत्रे लिहिणे. कोतवालीत जाऊन कामे बघणे. तोपर्यंत भोजनाची वेळ होई मग भोजन आटोपून, न्यायदानाची कामे, हिशोब असे दिवसभर चाले. कधी कधी रात्री उशिरापर्यंत काम चाले. कधी हिशोबांचा गुंता झाला असेल तर त्या रात्रभर जागून स्वत: मार्गी लावत असत. १७६७ ला अहिल्याबाईंचा कारभार सुरू झाला . पाच वर्षे झाली तरी आर्थिक गणित नीट बसत नव्हते. घरात एका पाठोपाठ एक मृत्यू झालेले, पती खंडेराव, सासरे मल्हारराव, मुलगा मालेराव, आणि या तिघांच्या सती गेलेल्या बायका. स्वत:च्याच घरात तेरा जणी सती गेल्या होत्या. या सगळ्याची सल मनात ठेऊन त्या कारभार करत होत्या. आता फक्त मुलगी मुक्ताचाच त्यांना आधार होता. अशा मानसिक अवस्थेत सुद्धा अहिल्याबाई राज्याचा कारभार अत्यंत कर्तव्य निष्ठेने करत होत्या. प्रजेचा अपमान किंवा अनादर केलेला त्यांना आवडत नसे. त्यांच्या बरोबर असत्य किंवा अनुचित व्यवहार केलेलाही चालत नसे, त्यांच्या मते प्रजेसाठी आपण आहोत. गावात एखादा अनुचित प्रकार कानावर आला तर लगेच त्याला समज देत. हिशोबत गोंधळ असेल तर त्यांना तो लगेचच लक्षात येई. प्रजेच्या पाठीशी उभे राहून अधिकार्‍यांना जबाबदार धरत. वेळप्रसंगी त्याला अधिकार पदावरून काढून टाकत.

          एकदा गावात श्रीमंत व्यापारी मरण पावला. त्याच्या मागे फक्त पत्नी होती. मुलबाळ नव्हते. वारस नसल्याने सर्व संपत्ती सरकारजमा होईल, त्या ऐवजी त्यांच्या विधवा पत्नीने अहिल्यादेवीकडे ती दान करायची असे ठरविले. मात्र न्यायप्रिय अहिल्यादेविंनी विधवा पत्नीला बोलवून संगितले की, “हा पैसा तुमच्या पतीचा आहे, आता तुम्हीच त्याच्या मालक आहात. तुम्ही स्वेच्छेने हा पैसा एखाद्या अन्नछत्राला द्या, अनाथ मुलांचा शिक्षणाचा खर्च करा, पाणपोया उघडा, धर्मशाळा बांधून द्या. घाट बांधायला पैसे द्या, विहिरी खोदा, दानाचे सुख घ्या”. असा एक मोठा सामाजिक संदेश त्या काळात अहिल्यादेवी देत होत्या. पक्षपात, भेदभाव असे त्यांच्या ठायी नव्हतेच. सर्वांना न्यायपूर्ण वागणूक देत.
 
                        

त्या मृदु होत्या, मायाळू होत्या. तरीही वेळ आली तर तितक्याच कठोर पण होत्या. मल्हार राव हो;ल्करांचे बाजीराव पेशव्यांशी संबंध चांगले होते. ते तसेच त्यांच्या नंतर सुद्धा अहिल्याबाईंनी चांगले सांभाळले होते. त्या हुशार, व्यवहारी, मुत्सद्दी, धीट आणि फटकळ सुद्धा होत्या. त्यामुळे व्यवहार अगदी चोख असत. कोणाला त्यात काही गडबड करू देत नसत. केलीच तर चांगले फैलावर घेत. कोणाच्या स्वार्थी मनात कशाचे इमले आहेत हे त्या लगेच ओळखत.


                        

         एकदा, पुणे दरबारातून अहिल्याबाईंनी आपल्याला पाठिंबा द्यावा म्हणून, भेटायला हरिपन्त आले होते. त्यांनी हरिपंतांना स्पष्ट संगितले की, “सुभेदार मल्हाररावांपासून आमची निष्ठा बाजीराव पेशव्यां बरोबर आहे. हा एकनिष्ठेचा बेलभंडार आम्ही कधीच उचलला आहे तो काही उगीच नाही”. हरीपंताना लगेच सगळे ध्यानात आले. शिवाय महेश्वर मधल्या, बाजारपेठा, संशोधन केंद्रे, युद्धभंडार, चिलखते, भाला- बरच्या, तोफा हे सर्व पाहून ते थक्क झाले. त्यांच्या मनात आता अहिल्याबाई न्यायदान कसे करतात त्याचा अनुभव घ्यावा असे आल्याने ते शेतकर्‍याचा वेष घेऊन दरबारात आले. त्यावेळी एक कवी दरबारात आला आणि

देवी अहिल्ये, शुद्धमति तू, सर्वांची माता ,

ईश्वर आला तुझ्या स्वरूपे होऊनिया त्राता |

तव पायाशी तीर्थे सगळी, देवदेवळे ती,

स्वर्गामद्धे नारद तुंबर तव लीला गाती |

असे कवन गाऊ लागला. हे ऐकताच अहिल्यादेवी म्हणाल्या, “कविराज, तुमची माझ्याविषयी जी श्रद्धा आहे याचा मी आदर करते पण, माझे हे अतिशयोक्तीचे वर्णन मला पटत नाही. एकतर ईश्वराने माझ्या रूपात अवतार घेणे अशक्य आहे. नारद तुंबर स्वर्गात माझी लीला गाणं हे ही अशक्य आहे. देवांना आणी देवळांना तुम्ही माझ्या अभागिनीच्या पायाशी आणून ठेवलत. हा अपराध आहे तुमचा. कशासाठी गाता असे? चांगले काव्यगुण दैवाने मिळाले आहेत ते चार पैशांसाठी सत्ताधार्‍यांची कौतुके गाण्यात का दवडता ? त्या ऐवजी समाजाची दु:खे काव्यातून मांडा. ईश्वराची लीला रचा. शौर्याचे पोवाडे गा. मग सोन्याचे कडेही देईन. पण आज ती चोपडी इकडे द्या, नर्मदेत बुडविते. या तुम्ही.” हरिपन्त हा प्रसंग पाहून आश्चर्यचकीत झाले. देवलाही आपली स्तुति आवडते आणि अहिल्याबाई ? त्यांच्या विषयी केलेली स्तुति नर्मदेत फेकली ?


                                        
  
          असे अनेक प्रसंग घडले, इतिहासात त्याची नोंद आहे. काशी येथे अहिल्यादेविंनी ब्रम्हपूर स्थापन केले. कारण एकदा काशीचे ब्राह्मण अहिल्यादेवींकडे आले. मुसलमानांचा उच्छाद सुरू होता, वेदाभ्यास करायला जागा नव्हती. मुसलमान हल्ला करत तेंव्हा शिष्यगण सैरावैरा पळून जात, आश्रमास कोणी जागा देत नसे. अहिल्यादेवींनी एकाला त्या ब्राम्हणांबरोबर देऊन काशीला पाठवून ,आता हे आश्रमासाठी जागा शोधून देतील असे संगितले. ब्राम्हण आनंदले. पण त्या म्हणाल्या, “एक गोष्ट ध्यानात ठेवा, जी वास्तू बनेल त्याचे नाव ब्रम्हपुरी असेल. दर तीन महिन्यांनी आमचे गुप्तहेर कुठल्याही वेशात तिथे येतील, तिथली पाहणी करतील. ज्ञानदान नीट चालले असेल तर प्रश्नच नाही . तसे नसेल तर शिक्षा च”. अशा प्रकारे त्या प्रेम आणि शक्तीने जनतेचे हित, प्रजेची सोय नेहमी बघायच्या.वास्तविक वाराणशी महेश्वर पासून वेगळा प्रांत होता तरीही तिकडील लोक सुद्धा अहिल्याबाईंकडे असा न्याय मागायला यायचे. नुसत्या धर्मशाळा उघडल्या तरी त्यात सोयी करत. तिथे पहारेकरी असे, आतमध्ये तुळस आणि शिवलिंग मंदिर तसेच पाण्याची सोय म्हणून विहीर आणि अन्नछत्र एव्हढी सोय त्या लोकांसाठी त्या करत असत. अशा कामांमुळे व निर्णयांमुळे त्या लोकांच्या विश्वासाला पात्र ठरल्या होत्या.



- डॉ. नयना कासखेडीकर. पुणे



--------------------------------------

कर्तृत्वशालिनी - अहिल्याबाई होळकर - भाग २

  

कर्तृत्वशालिनी - अहिल्याबाई होळकर

भाग २


छत्रपती शिवरायांच्या नंतर जो हिंदवी स्वराज्याचा विस्तार झाला त्यात अनेक सरदार व अनेक घराणी यांचे महत्वाचे योगदान आहे.त्यापैकीच एक इंदूरचे होळकर घराणे. होळकर घराण्याचे मूळ पुरुष, ज्यांनी होळकरशाहीचा पाया रोवला ते मल्हारराव होळकर. यशस्वी बावन्न लढाया लढणारे मल्हारराव, मराठेशाहीचे आधारस्तंभच. मल्हाररावांच्या नंतर लोककल्याणकारी राज्य चालवले ते अहिल्याबाईनी .

     राज्य कारभार हातात येण्याआधी अहिल्याबाईंची मनोपृष्ठभूमी अनेक अनुभवातून तयार झाली होतीच. पती खंडेराव यांच्या (१७५४मध्ये )मृत्यूमुळे वैधव्याचं दु:ख पदरी आलं होतं. मात्र केवळ आणि केवळ सासरे मल्हारराव होळकर यांच्या दूरदृष्टीमुळे अहिल्येचे सती जाणे वाचले होते. दहा वर्षांनी १७६६मध्ये मल्हारराव यांचे निधन झाले. मल्हारराव यांच्या दोन्ही पत्नी बनाबाई आणि द्वारकाबाई सती गेल्या.  आपल्या डोक्यावरचे छत्र हारपले याची जाणीव अहिल्याबाईंना झाली. नाही म्हटले तरी सासरा - सुनेचे हे नाते, स्वामी आणि सेवकाशिवाय, गुरु शिष्याचे नाते पण होतेच.आपल्या मुलाच्या खंडेरावाच्या मृत्यूनंतर पैशांचे हिशोब, वेगवेगळे राजकीय संबंध या बद्दल दोघात सल्ला मसलत, चर्चा होत असत. मल्हार राव आणि अहिल्याबाई यांना एकमेकांबद्दल आदर होता विश्वास होता. त्यांच्या मार्गदर्शना खाली अहिल्याबाई थोडा फार कारभार बघत होत्या. अनुभवाने शिकत होत्या. काही चुकीचे निर्णय घेतले गेले तर तिथल्या तिथे मल्हार राव स्पष्ट पणे दुरूस्ती करून काय योग्य काय अयोग्य हे सांगत. या दहा वर्षांच्या काळात अनेक घटना घडल्या, त्याच्या साक्षीदार अहिल्याबाई होत्या. आता राज्याचा वारस म्हणून अहिल्याबाई आणि खंडेराव यांचा एकुलता एक मुलगा मालेराव याच्या हाती येणे साहजिक होते.

खंडेराव होळकर 
मल्हारराव गेल्यानंतर, मालेराव यांस लिहीलेल्या पत्रात अहिल्यादेवी त्यांना धीर देतात, कसं वागायला हवं ते सांगतात. त्या म्हणतात, “आता शोक करत बसायची वेळ नाही. आपलं प्रथम कर्तव्य सरदारकी आहे. ती कशी चालली पाहिजे याचा विचार केला पाहिजे. दौलत चालली पाहिजे. हे समजून घेऊन यात आता विचारपूर्वक लक्ष घालावे. तुमच्या तीर्थस्वरूप वडिलांनी ज्याप्रमाणे कामाचा पाया घालून लौकिक निर्माण केला त्या प्रमाणे तुम्हीही कार्य करा. वडिलांची किर्ति लक्षात घ्या . त्याही पेक्षा तुम्ही अधिक लौकिक संपादन करा”.

    जरी मालेराव याच्या हाती कारभार आला होता तरी अहिल्याबाईंचे जातीने लक्ष होते. अननुभवी तरुण मालेराव कारभार कसा चालविल याची आई म्हणून त्यांना काळजी होतीच. दुर्दैवाने वर्षभरातच मालेराव चे निधन झाले. मालेराव च्या दोन्ही पत्नी सती गेल्या. या सर्व घटनेनंतर एक आई म्हणून अहिल्याबाई यांची काय अवस्था झाली असेल याची आपल्याला कल्पना येते. अं:तकरण हेलावून गेलेल्या अहिल्याबाईना राज्य कारभारा पुढे फार शोक करत बसणे परवडणार नव्हते. होळकर राज्याचे तीन वारस गेले. आता इंदोरला होळकर वाड्यात राहणे त्यांच्या उद्विग्न मनाला नकोसे वाटू लागले. अहिल्याबाईनी महेश्वर राहण्यासाठी निवडले. मल्हारराव होळकरांनी मोगलांकडून जिंकून महेश्वर ताब्यात घेतले होते आणि महेश्वर वसविले होते. आता पुढे काय? राज्य चालवायचे कोणी? कसे? या जनतेच्या मनातील प्रश्नांचे उत्तर अहिल्यादेवीच देणार होत्या.  

मालेराव होळकर 
मालेराव च्या मृत्यूनंतर अहिल्याबाई महेश्वरला येऊन राहिल्या. नर्मदा घाट, किल्ल्यातून च होणारे नर्मदेचे  दर्शन व दिसणारे विहंगम दृश्य, भोवतालची मंदिरे आणि सात्विक व मंगल वातावरणामुळे दु:खी अहिल्याबाईना इथे जरा शांत वाटत होते. असे होते तरी बाहेर राज्यकारभाराबाबत काय काय शिजतय, काय होऊ शकते याची कल्पना त्यांना आली होती. म्हणून त्या सावध सुद्धा होत्या. एका पाठोपाठ होळकर  घराण्यात तिघांचे निधन झाल्याने, होळकर घराणे पारंपरिक राजकीय दृष्ट्या निर्वंश झाले होते. एक तर अधिकृतरित्या आता होळकर राज्याला वारस असा कोणीच नाही, एकटी बाई माणूस काय करेल ? असा समज नेहमी स्त्रियांच्या बाबतीत असतो तो होताच. तशी वेळ आली तेंव्हा अहिल्याबाईंनी ठणकाऊन सांगितले की, “होळकर घराण्याच्या  कैलासवासी सुभेदारांच्या वारसातल्या एकाची मी पत्नी तर, दुसर्‍याची माता आहे. त्यामुळे दत्तक वारस जरी निवडायचा झाला तरी तो अधिकार माझाच आहे”. याला दुजोरा, थोरले माधवराव पेशवे यांनी दिला होता. त्यांनी सांगितले की, “खंडेराव यांच्या विधवा पत्नीला कारभार पाहण्याचा अधिकार आहे”.झाले.

आणि अधिकृतपणे अहिल्याबाई होळकर आता महेश्वरहून राज्यकारभार पाहू लागल्या.

तत्पूर्वी त्यांनी प्रतिज्ञा केली की, “माझे कार्य प्रजेला सुखी करणे आहे. माझ्या प्रत्येक कृतीला मी स्वत: जबाबदार आहे. सत्तेच्या अधिकारामुळे मी येथे जे जे काही करत आहे, त्या प्रत्येक कृत्याचा जाब मला परमेश्वरा पुढे देणे आहे. परमेश्वराने ज्या जबाबदर्‍या माझ्यावर सोपवल्या आहेत त्या मला पार पाडावयाच्या आहेत”. 

 

लेखन- डॉ. नयना कासखेडीकर, पुणे

संपर्क- ०७७६७०८१०५७      

-----------------------------------------------

Sunday, 6 October 2024

प्रजाहितदक्ष अहिल्याबाई होळकर

 

प्रजाहितदक्ष अहिल्याबाई होळकर

 



सती धन्य धन्य कलियुगी अहिल्याबाई । गेली कीर्ति करूनिया भूमंडळाचे ठायी ॥ ध्रुवपद ॥

महाराज अहिल्याबाई पुण्य प्राणी । सम्पूर्ण स्त्रियांमधी श्रेष्ठ रत्‍नखाणी ।

दर्शने मोठ्या पापाची होईल हानी । झडतात रोग पापांचे पिता पाणी ।

वर्णिती कीर्ति गातात संत ते गाणी । झाली दैवदशे ती होळकरांची राणी ॥

- अनंत फंदी

         जगाच्या इतिहासात  उत्कृष्ट प्रशासिका म्हणून नोंद घेतली गेलेल्या अहिल्याबाई होळकर . नगर जिल्ह्यात, जमखेड तालुक्यातील चौंडी गावच्या माणकोजी शिंदे आणि सुशीलाबाई शिंदे यांचे कन्यारत्न.

अठराव्या शतकातील, २८ वर्षे यशस्वीपणे राज्य सांभाळणार्‍या मुत्सद्दी, धैर्यवान, शूर, चतुर, धर्मनिष्ठ, दूरदर्शी अशा बहुपेडी स्त्री राज्यकर्ती म्हणजे अहिल्यादेवी . अहिल्यादेवी यांचा राज्याचा काळ ( १७६७ - गादीवर बसून ते १७९५- निधन होईपर्यंत )म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातले सोनेरी पान. सर्वसामान्य कुटुंबातली अहिल्या  एका वैभवशाली होळकर राज्याच्या स्वामींनी झाल्या. आपल्या मुलाच्या खंडेरावाच्या मृत्यूनंतर त्याची जागा सुनेला, अहिल्येला देणारे मल्हारराव होळकर ( इंदूरच्या होळकर घराण्याचे संस्थापक ) घराण्याचा वंशाचा दिवा मुलगाच हे मानण्याच्या काळात एक स्त्री असूनही,आपला पुत्र खंडेराव याचे निधन झाल्यानंतर, अहिल्या जेंव्हा सती जाण्यास निघाली, तेंव्हा मल्हार राव म्हणाले,  “खंडूच्या अपमृत्यूमुळे मी निर्जीव झालो आहे.आता तूही मला सोडून जाणार? आता माझा पुत्र होण्याचे सोडून कुठे निघलीस? माला अनाथ करून जाऊ नकोस पोरी. तूच माझा खंडू आहेस. हे राज्य तुझेच आहे. जीव द्यायचाच तर या प्रजेसाठी दे. या प्रजेची आई हो”.आणि अहिल्येने  त्याच क्षणी आपले अलंकार, वस्त्र रंग, उपभोग हे सर्व चितेत टाकले आणि आणि यापुढे फक्त शुभ्र वस्त्रे नेसेन आणि पुढचे आयुष्य प्रजेसाठी आणि राज्यासाठी देईन,” अशी शपथ घेतली. एक अनमोल रत्न चितेत जाण्यापासून आपण वाचवले याचे मल्हाररावांना त्या दु:खी प्रसंगातही समाधान झाले . विधवा झालेल्या सुनेला मुलाच्या जागी राजपदाची सूत्रे बहाल केली. तेंव्हा पासून मल्हार रावांनी पण अहिल्येला एकेरी हाक मारणे बंद केले.

        सुरुवातीपासूनच मल्हाररावांनी अहिल्ये मधील जात्याच विशेष गुण ओळखून तिला शिक्षण देण्यास गुरु नेमले. गणित, इतिहास, भूगोल अशा सर्व विषयांचे ज्ञान तिला मिळत होते. लवकरच ती हिशोब करू लागली. घोडेस्वारी शिकली. रामायण, महाभारत व महत्वाचे ग्रंथ वाचून संपवले. राज्यकरभारातील हिशोब करावेत, पत्रे पाठवावित, फौजा तयार कराव्यात, वसूली जमा करावी, खातेनिहाय पैसे वाटप करावेत, गोलाबारूद, ढाल तलवारी सारखे साहित्य सज्जा करावे, अशा प्रकारे अहिल्या मल्हारराव सांगतील तसे धडे गिरवीत होती. अनुभव घेत होती आणि तिची कुशलता वाढत होती.राज्य कारभाराचे सर्व पदर मल्हार रावांनी अहिल्येला शिकविले होते. त्यातल्या खाचा खोचा शिकवल्या. आपल्या मुलाच्या खंडेरावाच्या मृत्यूनंतर पैशांचे हिशोब, वेगवेगळे राजकीय संबंध या बद्दल दोघात सल्ला मसलत, चर्चा होत असत. मल्हार राव आणि अहिल्याबाई यांना एकमेकांबद्दल आदर होता विश्वास होता. त्यांच्या मार्गदर्शना खाली अहिल्याबाई थोडा फार कारभार बघत होत्या. अनुभवाने शिकत होत्या. काही चुकीचे निर्णय घेतले गेले तर तिथल्या तिथे मल्हार राव स्पष्ट पणे दुरूस्ती करून काय योग्य काय अयोग्य हे सांगत. मल्हार राव आणि गौतमाबाई अहिल्येच्या पाठीशी सर्वार्थाने खंबीरपणे उभे राहिले.  

     मल्हारराव मोहिमेवर गेले की सर्व कारभार अहिल्या बघत असे. मल्हाररावांच्या सूचनेनुसार सर्व व्यवस्था करीत असत. हिंदुस्थानात अब्दालीच्या करामतींच्या बातम्या कानवर येत होत्या. त्याने मथुरा वृंदावनात मुंडक्यांच्या राशी घातल्या, हे कळल्यावर त्यांनी ठरविले की, हिंदूंना आता चिरेबंद आश्रयस्थाने हवीत . त्यांनी ठिकठिकाणी धर्मशाळा बांधून घेतल्या.    

     राजकारण करता करता एकाच वेळी ब्रिटिश चोहोबाजूंनी वाढत असता, आपल्या समाजाचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्या प्रयत्न करत होत्या. संस्कृती टिकवण्याचे प्रयत्न करत होत्या. राज्यात पाणी पुरवठा सुधारणा घडवल्या. त्यांनी अन्नछत्रे उघडली, धर्मशाळा बांधल्या, चिरेबंदी विहिरी खोदल्या, राज्यातून उन्हाळ्यात प्रवास करणार्‍या लोकांसाठी पाणपोया बांधल्या, पांथशाळा, आश्रयशाळा बांधल्या, मंदिरे बांधली, नद्यांवर घाट बांधले, स्त्रियांसाठी कपडे बदलण्यासाठी व सुरक्षित स्नानासाठी बंदिस्त ओवर्‍या बांधल्या, वेळोवेळी आक्रमणात उध्वस्त झालेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला.

     पुलांचे बांधकाम, रस्ते निर्मिती, रस्ते दुरूस्ती, डाक व्यवस्था,रायते साथी शिक्षणाची व्यवस्था ग्रंथ संग्रह व ग्रंथ निर्मिती, आरोग्यासाठी दवाखाने , औषधी बागा, शेतीसाठी सिंचना सोयी, जमीनिसाठी ९\ ११चा  कायदा ,माळरानावर वृक्षलागवड  आरक्षित गयरान , करप्रणाली ,विद्वान आणि कलाकार यांना राजाश्रय  अशा अनेक गोष्टी केल्या .

     त्यांचे कार्य इंदूर उज्जैन पर्यन्त्च मर्यादित नव्हते. केदारनाथ, रामेश्वर, जगन्नाथ पुरी,ते द्वारका असे चारही दिशांना होते. विशेष म्हणजे सर्व प्रांतातील माणसे जोडण्याची कला त्यांच्याकडे होती. त्यांनी गंगेचे पाणी महाशिवरात्रीला प्रांताप्रांतात कावडीने नेण्याची पद्धत सुरू केली. त्यामुळे प्रांतीय भारत जोडला गेला. ते कुठलीही सक्ती न करता, सात्विकता या त्यांच्या गुणामुळेच.माणसांबरोबरच पशू, पक्षी, प्राणी यांचाही विचार त्या करत. त्यांच्यासाठी डोण्या, वैद्यकीय उपचाराची सोय केली होती. सर्पदंशावर उपचार करण्यासाठी हकीम व वैद्य नेमले, एव्हढेच काय मुंग्या व जलचर प्राण्यांसाठी सुद्धा साखर, कणकेच्या गोळ्या असे  अन्नदान करीत. गोरगरिबांना सणासुदीला अन्नदान, कपडे ,थंडीपासून संरक्षण म्हणून घोंगड्या वाटप करीत. 

त्यांच्याकडे दुर्मिळ हस्तलिखित ग्रंथसंग्रह होता. विद्वान आणि कलावंत यांची त्या कदर करीत, योग्य तो मानसन्मान देत.तीर्थ क्षेत्रांच्या ठिकाणी इतर प्रांतातील शास्त्री, पंडित , वैद्य व वैदिक यांना आणून,राहण्याची सोय करून त्यांनी एक प्रकारे ज्ञान संवर्धन व संरक्षण केले. उदा. काशी येथील ब्रह्मपुरी,

     लोकांसाठी रोजगार निर्माण व्हावेत म्हणून योग्य ते धोरण त्यांनी आखले होते. राज्यकारभार चालवताना त्यांनी जनतेच्या अन्न ,वस्त्र, निवारा या मूलभूत गोष्टीबरोबरच, समता शांतता, बंधुता, न्याय, विचार स्वातंत्र्य आणि आत्मसन्मान या मुल्यांची जपणूक त्यांच्या काळात झालेली दिसते.

    अहिल्याबाईंच्या बुद्धीचातुर्य, मुत्सदीपणा ,प्रजाहित दक्ष आणि धर्मपरायणतेमुळे धर्म टिकला, संस्कृती संवर्धन झाले. कलेला प्रोत्साहन मिळाले. चरीतार्थाची साधने उपलब्ध झाली. त्यांनी आपल्या सासर्‍यांचे ,होळकर घराण्याचे नाव स्व -कर्तृत्वाने इतिहासात अजरामर केले.(हा लेख विश्व संवाद केंद्राने 5 ऑक्टोबर 24 रोजी प्रसिद्ध केला.)

---- डॉ. नयना कासखेडीकर ,पुणे .

 

------------------------------------

Friday, 16 August 2024

कर्तृत्वशालिनी अहिल्यादेवी

 

कर्तृत्वशालिनी अहिल्यादेवी

(जन्म-३१ मे १७२५-चौंडी,अहमदनगर, मृत्यू- १३ ऑगस्ट १७९५,इंदोर.)


भारताच्या इतिहासातले , महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे व्यक्तिमत्व अहिल्याबाई होळकर यांचे हे जन्म त्रिशताब्दीवर्ष आहे. या निमित्त या कर्तृत्वशालिनीची ओळख करण्याचा जागर अखिल भारतात मांडला जातोय. नव्हे तो मांडलाच पाहिजे, त्याशिवाय या अठराव्या शतकातील, 28 वर्षे यशस्वीपणे राज्य सांभाळणार्‍या मुत्सद्दी, धैर्यवान, शूर, चतुर, धर्मनिष्ठ, दूरदर्शी अशा बहुपेडी स्त्री राज्यकर्तीची ओळख कशी होणार? रूढी परांपरांनी जखडलेल्या भारतात सामाजिक सुधारणा करण्याचे प्रयत्न 19 व्या शतकात सुरू झाले होते. पण त्या आधीचा काळ ? स्त्रियांना प्रतिकूलच होता.

अहिल्यादेवी यांचा राज्याचा काळ ( १७६७ - गादीवर बसून ते १७९५- निधन होईपर्यंत )म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातले सोनेरी पान. सर्वसामान्य कुटुंबातली अहिल्या एका वैभवशाली होळकर राज्याच्या स्वामींनी झाल्या. आपल्या मुलाच्या खंडेरावाच्या मृत्यूनंतर त्याची जागा सुनेला, अहिल्येला देणारे मल्हारराव होळकर ( इंदूरच्या होळकर घराण्याचे संस्थापक ) खरंच ग्रेट च होते. त्यांचे ही कौतुक वाटते. त्यांचा हा पाठिंबा म्हणजे आज स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोण कसा असावा हे सांगणारा आहे. घराण्याचा वंशाचा दिवा मुलगाच हे मानण्याच्या काळात एक स्त्री असूनही,आपला पुत्र खंडेराव याचे निधन झाल्यानंतर, विधवा झालेल्या सुनेला त्याच्या जागी राजपदाची सूत्रे बहाल केली. तिचे अंगीभूत गुणवैशिष्ट्य हेरून तिला घडविणारे मल्हारराव म्हणूनच वेगळे आहेत. अशी घडलेली एक स्त्री काय करू शकते ,कसा पराक्रम गाजवू शकते हा इतिहास समजून घ्यायला हवा.


राजकारण करता करता एकाच वेळी ब्रिटिश चोहोबाजूंनी वाढत असता ,आपल्या समाजाचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्या प्रयत्न करत होत्या. संस्कृती टिकवण्याचे प्रयत्न करत होत्या.त्यांनी अन्नछत्रे उघडली, धर्मशाळा बांधल्या, चिरेबंदी विहिरी खोदल्या, राज्यातून उन्हाळ्यात प्रवास करणार्‍या लोकांसाठी पाणपोया बांधल्या, पांथशाळा, आश्रयशाळा बांधल्या, मंदिरे बांधली, नद्यांवर घाट बांधले, स्त्रियांसाठी कपडे बदलण्यासाठी व सुरक्षित स्नानासाठी बंदिस्त ओवर्‍या बांधल्या, वेळोवेळी आक्रमणात उध्वस्त झालेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला.

त्यांचे कार्य इंदूर उज्जैन पर्यन्त्च मर्यादित नव्हते. केदारनाथ, रामेश्वर, जगन्नाथ पुरी,ते द्वारका असे चारही दिशांना होते. विशेष म्हणजे सर्व प्रांतातील माणसे जोडण्याची कला त्यांच्याकडे होती. त्यांनी गंगेचे पाणी महाशिवरात्रीला प्रांताप्रांतात कावडीने नेण्याची पद्धत सुरू केली. त्यामुळे प्रांतीय भारत जोडला गेला. ते कुठलीही सक्ती न करता, सात्विकता या त्यांच्या गुणामुळेच.माणसांबरोबरच पशू, पक्षी, प्राणी यांचाही विचार त्या करत. त्यांच्यासाठी डोण्या, वैद्यकीय उपचाराची सोय केली होती. सर्पदंशावर उपचार करण्यासाठी हकीम व वैद्य नेमले, एव्हढेच काय मुंग्या व जलचर प्राण्यांसाठी सुद्धा साखर, कणकेच्या गोळ्या असे अन्नदान करीत. गोरगरिबांना सणासुदीला अन्नदान, कपडे ,थंडीपासून संरक्षण म्हणून घोंगड्या वाटप करीत.

त्यांच्याकडे दुर्मिळ हस्तलिखित ग्रंथसंग्रह होता. विद्वान आणि कलावंत यांची त्या कदर करीत, योग्य तो मानसन्मान देत.तीर्थ क्षेत्रांच्या ठिकाणी इतर प्रांतातील शास्त्री, पंडित , वैद्य व वैदिक यांना आणून,राहण्याची सोय करून त्यांनी एक प्रकारे ज्ञान संवर्धन व संरक्षण केले. उदा. काशी येथील ब्रह्मपुरी,

लोकांसाठी रोजगार निर्माण व्हावेत म्हणून योग्य ते धोरण त्यांनी आखले होते. राज्यकारभार चालवताना त्यांनी जनतेच्या अन्न ,वस्त्र, निवारा या मूलभूत गोष्टीबरोबरच, समता शांतता, बंधुता, न्याय, विचार स्वातंत्र्य आणि आत्मसन्मान या मुल्यांची जपणूक त्यांच्या काळात झालेली दिसते.

अहिल्याबाईंच्या बुद्धीचातुर्य, मुत्सदीपणा ,प्रजाहित दक्ष आणि धर्मपरायणतेमुळे धर्म टिकला, संस्कृती संवर्धन झाले. कलेला प्रोत्साहन मिळाले. चरीतार्थाची साधने उपलब्ध झाली. त्यांनी आपल्या सासर्‍यांचे ,होळकर घराण्याचे नाव स्व -कर्तृत्वाने इतिहासात अजरामर केले. या अहिल्यादेवींच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण आणि त्यांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग, घटना, त्यांचे कार्य यांचा आढावा घेणारी ही मालिका, त्यांच्या जन्म त्रिशताब्दी निमित्ताने क्रमश:

कर्तृत्वशालिनी अहिल्यादेवी ही मालिका अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी निमित्त दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्रातर्फे त्यांच्या महिला विश्व च्या ऑगस्ट च्या अंकात सुरू झाली. ही मालिका ,दर महिन्याला एक अशी वर्षभर प्रसिद्ध होणार आहे.

© --ले. डॉ. नयना कासखेडीकर               

                                                        ---------------------------