Sunday, 12 January 2025

कर्तृत्वशलिनी अहिल्यादेवी भाग ५ – धैर्यशील अहिल्यादेवी

 

कर्तृत्वशलिनी अहिल्यादेवी

भाग ५ – धैर्यशील अहिल्यादेवी

(जन्म-३१ मे १७२५-चौंडी,अहमदनगर, मृत्यू- १३ ऑगस्ट १७९५,इंदोर.)


बाजीराव पेशवे यांच्या बरोबर लढाईहून परतत असताना सैन्याचा तळ चौंडी गावात सीना नदीच्या काठी मुक्कामी होता. नदीकाठी असलेल्या महादेवाच्या देवळात छोटी अहिल्या देवदर्शनाला आली होती. नदीकाठी मैत्रिणींबरोबर ती वाळूत शिवलिंग तयार करत होती. तेव्हढ्यात सैन्याचा घोडा उधळला आणि मैत्रिणी ओरडून पाळल्या पण अहिल्या पिंडीचे रक्षण करत तशीच उभी राहिली होती आणि घोडा तिच्या बाजूने उधळून निघून गेला . मल्हारराव व बाजीराव हे पाहताच धावत आले आणि बाजीराव अहिल्येला रागवून म्हणाले, “इथे का थांबलीस पोरी? घोडा तुला तुडवून गेला असता तर? त्यावर धीट अहिल्या म्हणाली, “जे आपण घडवावे ते प्रसंगी जीव सांडूनही रक्षण करावे असेच वडिलधारी माणसे सांगतात , तेच मी केले, मी घडवलेल्या पिंडीचे मीच रक्षण केले. माझे काही चुकले का?” तिचे हे बाणेदार उत्तर ऐकून बाजीराव पेशवे म्हणाले, "मल्हारराव, हिला तुमची सून करा , तिला राज्याच्या लायक करा .ती राज्य नावारूपाला आणेल. राज्यकारभाराच्या अनेक पदराचं हिला शिक्षण द्या" आणि खरच लग्नानंतर अहिल्येचे असे सर्वच शिक्षण सुरू झाले. अहिल्या सर्वच विषयात प्रगती करत होती. वाचन आणि अभ्यासा बरोबरच हिशोब बघणे, वसूली जमा खर्च तपासणे, न्यायनिवाडे करणे, सरदारांना पत्रे पाठवणे, आणि मुख्य म्हणजे फौजा तयार ठेवणे, गोळाबारूद, बाण भाते, ढाल तलवारी सज्ज ठेवणे, ही कामे ती करत असे. सासरे बुवा मल्हारराव कौतुकाने म्हणत, “आम्ही तलवार गाजवतो, ती सुनबाईंच्या भरोशावर” विशेष म्हणजे अहिल्याबाई, पती खंडेरावांना पण रणविद्या शिकण्यास प्रोत्साहित करत असत. खंडेरावला यात रस नसे. त्यामुळे लग्नानंतर अवघ्या दहा वर्षांच्या काळात, अहिल्याबाई दिवसें दिवस जास्तच समर्थ होत गेल्या.

मल्हारराव सतत लढाया करण्यात गुंतलेले असत तेंव्हा, ते असतील तिथून पत्रे पाठवून अहिल्येला सल्ला देत, कामे करायला संगत. अहिल्या मल्हाररावांबरोबर रणांगणावर सुद्धा जात होत्या. अहिल्या आपल्या अनुपस्थितीत कारभार पहाते म्हणजे आपणच पाहतो असा खूप विश्वास वाटे त्यांना. त्यांचा पत्र संवाद फार छान आहे. ते म्हणतात, "अहिल्येस आशीर्वाद! तुम्ही इंदोरला आहात , सात हजार फौजेच्या तयारीत असावे, जंबुरा, तोफा, गाडे यात कुचराई नको, शागिर्दाप्रती वर्तन दयाळू ठेवावे.प्रजेकडुन रुपये येतात त्यांच्या सुखसोयी नेटक्या कराव्यात”.

त्याला अहिलेने पाठवलेले उत्तर- “तीर्थरुप वडिलांप्रति साष्टांग दंडवत. आशीर्वाद असू द्यावा, चुकभुल तर होणे आहेच, एकशे वीस जंबुर तोफा आणि बारूद पक्की सहा मण, सोबत तेज गोलंदाज, रोज दिडीने, पण निशाणी पक्की, आम्ही परीक्षा करून घेतली आहे. भरणा वसूल नेटका चालू आहे. आपल्या तलवारीस यशच आहे. आपल्या हुकूमाप्रमाणे शिकस्त करते". – आपली आज्ञाधारक - सौ.अहिल्या.”

१७५४ च्या कुंभेरीच्या लढाईत तर मल्हारराव, खंडेराव आणि अख्खे कुटुंबच अजमेर येथे गेले होते. तिथे सुद्धा अहिल्याबाई पहाटे उठून पुजा करत, सर्वांना अंगारा लावून, मग मुदपाखान्यात लक्ष घालून, पुढे जखमींवर उपचार करून, शस्त्रांस्त्रांची व्यवस्था करवून घेऊन, दिवसभर तोफखाना सांभाळायचा अशी दीड महीना कामे केली. मात्र याच लढाईत अहिल्येच्या भाळी वैधव्य आले. खंडेराव मारला गेला. छातीवर दगड ठेऊन मल्हार रावांच्या मार्गदर्शनाखाली पुढची वाटचाल सुरू केली. आता पुढचे आयुष्य प्रजेसाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी घालवण्याचा 'पण' अहिल्याबाई यांनी केला.

पुढे अहिल्याबाईनी इंदोर मध्ये तोफांचा कारखाना उघडला . स्वत: जातीने त्यातील कामकाजाची धुरा सांभाळत . यातली युद्ध साहित्याची इत्थंभूत माहिती त्यांना होती.

पानिपतच्या युद्धात मल्हार रावांच्या हुकूमा प्रमाणे अहिल्या तोफखाना घेऊन ग्वाल्हेरला गेल्या होत्या. यात लाखो योद्धे मारले गेले. या युद्धाने खूप मोठे नुकसान झाले होते.पानिपतची रसद तुटली होती. अनेक सैनिक अन्न आणि पाणी, पाणी करत कोसळले होते. अहिल्या इंदोर ला येऊन राजवाड्यात असलेल्या जखमी लोकांना उपचार करू लागली. सेवा पथके उभारली. सगळ्यांना धीर देऊ लागली. वैद्यकीय उपचार सुरू केले, चुली पेटवून सर्वांना पोटभर खायला देत होती. हजारो लोक राबत होते. करुणेची प्रतिमा असलेली अहिल्या यावेळी जनतेची आई म्हणून सिद्ध झाली होती. ती आईच्या मायेची फुंकर युद्धात जखमी व असहाय्य झालेल्यांना घालत होती.

पानिपतच्या युद्धानंतर मल्हारराव सतत मोहिमांवर जाऊ लागले होते. पाच वर्षात उत्तरेकडील घडी त्यांनी नीट बसविली. या सुमारास अहिल्या इंदोरचा राज्य कारभार नीट सांभाळत होती. पानिपतच्या युद्धाच्या अनुभवावरुन लक्षात ठेऊन अहिल्याबाईंनी ठिकठिकाणी विहिरी खोदून घेतल्या जेणे करून सैन्याला युद्ध प्रसंगात कुठेही पाण्याची कमतरता भासणार नाही. दंगाफसादाच्या वेळी आश्रयस्थान हवे म्हणून धर्मशाळा बांधून घेतल्या . रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग याप्रमाणे अशा युद्ध समयी सुद्धा अहिल्याबाई न डगमगता , धैर्याने तोंड देत असत. पुढेही असेच अनेकदा प्रसंग आले, यातून निभावत, अनुभव घेत, शेवटच्या क्षणापर्यंत प्रजेसाठी दक्ष राहिल्या.

ले. डॉ. नयना देवेश्वर कासखेडीकर .


                                                            ------------------------------

No comments:

Post a Comment