Saturday, 21 June 2025

भाग ७ - 'युद्धवीरांचा देव आणि अहिल्याबाई'

 

कर्तृत्वशालिनी अहिल्यादेवी

भाग ७  - 'युद्धवीरांचा देव आणि अहिल्याबाई'

 (जन्म-३१ मे १७२५-चौंडी,अहमदनगर, मृत्यू- १३ ऑगस्ट १७९५,इंदोर.)

                             

ही आहे होळकर राज्याची राज्यमुद्रा. द्वितीय तुकोजिराव होळकर यांच्या करकीर्दी पासून हा राज्याचा शिक्का म्हणून वापरण्यात येऊ लागला. या चिन्हामध्ये वर छत्री (राजछत्र) सूर्य, नंदी, घोडा, मध्यभागी भाला आणि रुंद पातीची तलवार,तर खाली गहू आणि अफुची रोपे अशी प्रतीके आहेत. होळकर घराण्यातील राजे शैवपंथी होते आणि खंडोबाचे उपासक होते. वीरपुरुष खंडोबाला शिवावतार मानतात.त्याने मल्लांचे  निर्दालन केले म्हणून त्याला मल्लारी असेही म्हणतात. पुढे त्याचेच मल्हारी झाले. दुसरे नाव मार्तंड (सूर्याचे नाव) आहे. असे हे मल्हारी मार्तंड महाराष्ट्राचे कुलदैवत आहे . तसेच होळकर घराण्याचेही कुलदैवत होते.  पुरातन काळापासून भारताची दक्षिण काशी असलेल्या जेजूरीचा हा मल्हारी मार्तंड शंकराचा अवतार समाजाला जातो. १३ व्या शतकात जेजूरी गड बांधल्याचा पुरावा तिथल्या शिलालेखात आढळतो.

 खंडोबाभक्त मल्हारराव होळकरांनी माळव्याची सुभेदारी मिळाल्यानंतर या गडाचे जीर्णोद्धाराचे काम केले. पोर्तुगीजांवर विजय मिळवून त्यांच्याकडून हस्तगत केलेल्या घंटा, मल्हाररावांनी जेजूरीच्या खंडोबाला  दान केल्या. रंगमहाल, बालद्वारी, नगारखाना, दिपमाळा, वेशी, दगडी कमानी बांधले. पुढे धर्मनिष्ठ, दानशूर अहिल्याबाईंनी देशभरातल्या तीर्थस्थानी अनेक विकासकामे केली. त्याचप्रमाणे जेजूरी नगरीची जडण घडण केली. अहिल्यादेवी जेजूरीच्या विकासाच्या शिल्पकार समजल्या जातात. त्यांनी ऐतिहासिक होळकर तलाव, चिंचेची बाग, चिलावती कुंड, या वास्तूंची निर्मिती केली .१७७० मध्ये त्यांनी जेजूरी गडाला किल्ले सदृश तटबंदी बांधली. मंदिरासमोर दिपमाळा, अष्टकोनी टेहळणी बुरूज आहे. होळकर कुटुंबाने जेजूरी च्या खंडोबा देवस्थान साठी मुक्त हस्ताने दान केले आहे. धर्मसत्ता व राजसत्ता यांचा सुरेख समन्वय अहिल्यादेवी यांनी साधला आहे.   

बारा ज्योतिर्लिंग, सप्तपुरी, चारधाम आणि विविध पंथ आणि संप्रदाय या संगळ्यांसाठीच अहिल्याबाईनी विविध देणग्या देऊन सोयी व सुधारणा केल्या. तशा श्रीक्षेत्र जेजूरी येथे श्री मालखर गौतमेश्वर तालीमखाना, सरकारी वाद (दत्त पादुका व विहीर आहे) विठ्ठल राखुमाईचे मंदिर, किल्ला, श्री जनईचे कुरण, बाग, इमानी जमीन, मल्हार तलाव यांच्या व्यवस्था निर्माण केल्या. सगळयाना समान न्यायाने दान दिले.निरनिराळ्या तऱ्हेची मदत केली.

परकीयांच्या आक्रमणा आधी सर्व हिंदू राजे आपापल्या प्रांतातील तीर्थक्षेत्रांची काळजी घेत असत. त्यामुळे तीर्थक्षेत्रे ,विद्या संपन्न घराणे टिकून होते. परकीय आक्रमणानंतर हिंदू राज्येच विलयाला गेली. शेकडो वर्षे अशीच परिस्थिति राहिली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील लोककल्याणची आणि हिंदू संस्कृतीची संपन्न परंपरा पुन्हा अहिल्याबईनी भरतखंडात सुरू केली. होळकरांच्या राज्यात मंदीरे, धर्मशाळा, घाट ,जीर्णोद्धार यांची कामे, दुष्काळ किंवा सुकाळ असला तरी सतत सुरू राहत असत.त्यामुळेच भारत देशातील कारागीरांना सतत काम असे म्हणून ही कारागिरी व कौशल्य टिकून राहिलेले दिसते. विविध वास्तु व मंदिरांचे स्थापत्य शास्त्राचे नमुने सतत निर्माण होत राहिले. शिल्पकला टिकली व वाढीस लागली. अहिल्याबाईंचे तत्व  होते की, देवळांचा जीर्णोद्धार करणे म्हणजे आपयशाच्या खुणा धुवून टाकणे . त्यांची श्रद्धा अशी होती की हे राज्य आपण शंकराच्या आज्ञे वरुन चालवीत आहोत. म्हणून त्यांच्या पत्राच्या खाली सुद्धा त्यांची सही -- शंकर आज्ञेवरुन असे लिहीत. शंकरभक्त अहिल्यादेवी यांनी मृत्यूसमयी  ॐ नम: शिवाय ! हाच शब्द उच्चरला होता आणि अखेरच्या यात्रेला निघाल्या होत्या.

महाराष्ट्रातले हे खंडोबा कुल दैवत परंपरा होळकर घराण्याने इंदूरला नेली. हाच मराठी संस्कृतीचा माळव्यात प्रवेश होता. इंदोरच्या राजवाड्यात मल्हारी मार्तंडचे मंदिर आणि पूजा स्थान तयार केले गेले. आजही हे दैवत या राजवाड्यात विराजमान आहे. 

ले. डॉ. नयना कासखेडीकर,पुणे

----------------------------------------------

No comments:

Post a Comment