कर्तृत्वशालिनी अहिल्यादेवी
भाग
९ - अहिल्याबाईंचे महेश्वर
(जन्म-३१
मे १७२५-चौंडी,अहमदनगर, मृत्यू- १३ ऑगस्ट १७९५,इंदोर.)
मध्यप्रदेश मध्ये इंदूरपासून केवळ शहाण्णव किलोमिटर अंतरावर नर्मदेच्या तटावर वसलेले, महेश्वर म्हणजे होळकर राज्याची राजधानी. महेश्वर म्हणजे ‘भगवान शिवाचे घर’. महेश्वरचा किल्ला मुघल काळात बांधलेला होता, पण पेशव्यांकडून माळव्याची जहागिरी होळकरांना मिळाल्यानंतर मल्हाररावांनी किल्ल्यासकट वास्तु मंदिरे यांची डागडुजी करून नीट घडी बसवली. अहिल्याबाईनी पुढे आपल्या कारकिर्दीत १७६७ ते १७९५ या काळात महेश्वरचे रंग रूपच पालटले. महेश्वर एक संरक्षित शहर झाले. औरंगजेबाच्या काळात नष्ट केलेल्या हिंदू मंदिराचे अहिल्या बाईनी पुनर्निर्माण केले. इथे कालेश्वर, वृद्धकालेश्वर, केशव मंदिर, चतुर्भुजन मंदिर, बाणेश्वर, मातरगेश्वर,अशी काही मंदिरे दहाव्या शतकापासून अस्तित्वात होती.
सासरे मल्हारराव गेले, पुढे मुलगा मालेराव गेला. इंदूरच्या गादिला वारस नाही , बरोबर अनुभवी कोणी व्यक्ति नाही तरीही अहिल्याबाई डगमगल्या नाहीत. त्यानंतर माधवराव पेशवे यांनी अहिल्याबईना १७६७ साली अधिकृतपणे खासगी जहागिरीची अधिकारी बनवले. याच वेळी अहिल्याबाईनी आपली राजधानी इंदूरहून महेश्वर येथे हलवली. पुढचे सर्व आयुष्य त्यांनी महेश्वर या राजधानीतच घालविले.
त्यांचे आर्थिक नियोजन सुद्धा असे. आपल्या राज्यातल्या व्यापार वृद्धीसाठी अहिल्याबाई नेहमीच प्रोत्साहन देत असत. राज्याबाहेरच्या व्यापाऱ्याना सहाय्य म्हणून आपल्या राज्यात त्या व्यापारासाठी बोलावत. एकदा म्हैसूर राज्यात दुष्काळ पडला असताना हजारो जन मृत्युमुखी पडले. त्यातील शेंकडो विणकरांना अहिल्याबाईनी महेश्वर ला आणून जिवदान दिले, रोजगार दिल. आर्थिक सहाय्य केले. राहायला घरे दिली. माहेश्वरच्या किल्ल्यात हातमाग सुरू करून त्यात त्यांना कामावर ठेवले. त्या हातमागावर विणलेल्या साड्या लवकरच उद्योगाच्या मुख्य प्रवाहात आल्या. प्रगती झाली.
महेश्वर ला आल्यावर महेश्वर किल्ल्यात त्यांनी विणकरांसाठी स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध करून दिली. तिथल्या सावकार व व्यापारी मंडळीना आदितवर व मंगळवार पेठची निर्मिती केली. विणकर लोकांचा व्यवसाय उभा राहीला. या विणकरांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी विणलेले वस्त्र मोठ्या प्रमाणावर अहिल्याबाई स्वत: खरेदी करत. त्या स्वतासाठी तसेच त्यांच्याकडे येणाऱ्या नतेवाईकांसाठी, घराण्यातील महिलांसाठी, पाहुणे मंडळींसाठी वा कुणी अचानक आलेल्या अतिथिना भेट म्हणून देण्यासाठी त्या खरेदी करत असत. हस्त कौशल्याच्या या महेश्वरी साड्यांची कीर्ती भारताबाहेर आहे. महेश्वर किल्ल्याच्या आत राजराजेशवर मंदिराच्या पुढे रेवा सोसायटी ही हातमाग करणाऱ्यांची संस्था म्हणून आज हस्त शिलपीचे काम उभे केले आहे. अहिल्याबाईनी दुष्काळाच्या काळात वेगवेगळ्या राज्यातल्या हैदराबाद, सूरत म्हैसूर इथल्या हातमाग कारागिराना महेश्वरला बोलावून काम दिले. त्यामुळे विणकरांची ही कारागिरी टिकली, कला टिकली, कारागीर टिकले. अजूनही हे काम महेश्वर येथे सुरू आहे.
पाचव्या शतकापासून महेश्वर हे हातमागावरील वस्त्रासाठी विणकरांचे केंद्र होतेच. १९६४ साली अहिल्याबाईनी या वस्त्रोद्योगाला नवी ओळख दिली. नव्या सुविधा देऊन कर्नाटक, माळवा, गुजराथ, हैदराबाद येथून विणकरांना महेश्वरला बोलवून काम सुरू केले. सूती आणि सिल्क धाग्यानी जरी काठाच्या, विविध नक्षिच्या साड्या ही माहेश्वरची कायमची ओळख बनली. इथल्या इतिहासाची ओळख म्हणून अहिल्याबाईनी या साड्यांवर तिथल्या स्थापत्य कलेची नक्षी काढावी असे सांगितले होते. हीच खरी महेश्वरी साड्यांची ओळख आहे. पण अहिल्याबाईनी केलेल्या दूरदर्शी नियोजनामुळे आजही हे काम महेश्वर येथे सुरू आहे.
माळवा प्रांतात गोंड भिल्ल यांचा उपद्रव त्या काळात वाढत चालला होता . यात्रेकरू व्यापारी प्रवासी आणि प्रजेच्या लुटमारीच्या अनेक तक्रारी रोज येऊ लागल्या. दरोडे घालणे, रस्ते अडविणे, लूटमार चारही दिशांना सुरू होते, याला आळा घालण्यासाठी अहिल्याबाईनी युक्ति लढवली. आणि एक महत्वाची घोषणा केली. “जो कोणी आपल्या भागातील डाकू आणि चोर यांचे पारीपत्य करेल त्याच्या बरोबर माझी एकुलति एक मुलगी मुक्ता चा विवाह लावून देण्यात येईल”. आणि खरंच काय आश्चर्य यशवंतराव फणसे याने हा विडा उचलला आणि डाकू व चोरांचा बंदोबस्त केला. त्यामुळे अहिल्यादेवींनी खरचच दोघांचा विवाह लावून दिला. यशवंत फणसे त्यांचा जावई झाला. पुढे अहिल्याबाईंनी गोंड, भिल्ल यांना अभय देऊन त्यांना शेती, व्यापार आणि तीर्थयात्री यांचे रक्षण करण्याचे महत्वाचे काम सोपवले. उपजीविकेचे साधन नसल्याने. या जमाती असे कृत्य करत होत्या. दूषप्रवृत्तीचे परिवर्तन सत्प्रवृत्ती मध्ये झाले. हे एक समाज कल्याणच होते.
भारतातील विविध भागातील ब्राह्मण, विद्वान, ज्योतिष शास्त्री ,वेदशास्त्री, कीर्तनकार, कलाकार, विविध कारागीर यांना अहिल्याबईनी महेश्वरला बोलावून घेऊन तिथेच आश्रय दिला. सर्वाना काम दिले. यात आर्थिक घडी तर बसवलीच पण धार्मिक कृतीला महत्व देऊन हिंदू धर्माची पताका सतत फडफडत ठेवली. महेश्वरला राजधानी हलवण्यापूर्वीचे महेश्वर आणि नंतरचे महेश्वर यात आमूलाग्र बदल झाला. तो अहिल्याबाईंच्या अनेक निर्णयामुळेच. त्यांच्या ३२ वर्षांच्या कारकिर्दीत कधीच दुष्काळ पडला नाही कारण त्यांनी आर्थिक विकासाची घडीच तशी बसवली होती.अत्यंत धोरणाने. आदर्श राज्यकर्ता कसा असावा, त्याने काय व कसे काम करावे हे सर्व त्यांनी एका ग्रंथात लिहून ठेवले आहे ही मार्गदर्शक तत्वे त्यांनी धर्मशास्त्र विद्वानांकडून अहल्या कामधेनु हा आठ अध्यायांचा ग्रंथ लिहून त्यात सांगितली आहेत. राजाची कर्तव्ये काय हे त्यात सांगितले आहे. याचा अभ्यास आताच्या राज्यकर्त्या लोकानी नक्कीच करायला हवा. कारण ते अनुभवाचे बोल आहेत.
मुक्ता व यशवंत राव फणसे यांची छत्री ,स्मारक
मुलगी मुक्ता व जावई फणसे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मरणार्थ आजच्या फणसे घाटावर एक छत्री तयार केली ही अहिल्याबाईनी केलेली शेवटची वास्तु निर्मिती. माहेश्वर नगरच्या गल्ल्या गल्ल्यात ,घराघरात, घाटांवर, किल्ल्यामध्ये, किल्ल्याबाहेर, बाजारपेठेत, मंदिरात, देवी अहिल्या प्रत्येकात स्मरणात आहेत. प्रत्येकाच्या तोंडी त्यांचेच नाव आहे. त्यांच्या बद्दल आदर आहे, त्या आपल्या कर्तृत्वाने तिथे अमर झाल्या आहेत. त्यांच्या सर्व आठवणी तिथले लोक आजही आत्मियतेने जपताना दिसतात.आज महेश्वर च्या ऐतिहासिक जागी अहिल्याबाईंच्या स्मरणार्थ भव्य छत्री यशवंत राव होळकर यांनी बांधून इतिहास पुढच्या पिढीसाठी साक्षात समोर ठेवला आहे.
लेखन- डॉ. नयना
कासखेडीकर,पुणे
----------------------------------------------
No comments:
Post a Comment