सकाळ
( गुढीपाडवा) विशेषांक श्रावण लेख २०२५
ऋतु हिरवा ऋतु बरवा
श्रावण आला गं वनी श्रावण आला.
दरवळे गंध मधुर ओला..
गदिमांनी
श्रावणाच्या महिन्याचे अत्यंत बोलके वर्णन या कवितेत के;ले आहे. ग्रीष्म ऋतुतले
ज्येष्ठ आणि आषाढ सरून वर्षा ऋतूच्या श्रावण भाद्रपदाकडे निसर्गाची वाटचाल सुरू
होते आणि सगळा निसर्गच बदलतो . आपल्या हिंदू पंचांगाप्रमाणे आपले सण आणि व्रते
महीने आणि ऋतु यांच्या समिकरणातूनच साजरे होतात.
श्रावणात
सृजनाचा उत्सव चालू होतो. निष्पर्ण झालेले वृक्ष, लता -वेली, झाडं- झुडपं, भेगाळलेली कोरडी शेतजमीन, पाण्याविना ओस पडलेले तलाव व पाणवठे, ओढे या सृजनाच्या
उत्सवात न्हाऊन निघतात, एक नवचैतन्याची लहर निसर्गात दौडते .
पहिल्याच पावसाने निसर्ग शुचिर्भूत होतो. पहिल्या पावसाचा मृद्गंध मन आणि शरीर
सुखावून टाकतो. सगळी धूळ झटकून झाडं नव्या
पालवी सहित चकचकीत आणि टवटवीत दिसू लागतात. उन्हाच्या काहिलीने झालेली मरगळ दूर
होते. पहिला जोरात पाऊस येतो, तोपर्यंत कावळ्याची पिल्लं
मोठी झालेली असतात. आषाढातच त्यांनी घरटी बांधून अंडी घातलेली असतात. श्रावण सुरू
होतो त्या आधीच कावळ्याच्या पिल्लांचे नवे जीवन सुरू झालेले असते.(माझ्या
घरासमोरच्या वडाच्या झाडावरील वर्षानुवर्षे घेतलेला अनुभव) निसर्ग जसा आनंदाने
बहरतो तसंच मानवी मन सुद्धा या ऋतु परिवर्तनाने आनंदाने बहरते. साहित्यिक आणि
कवींना या मनभावन श्रावणाचा मोह होणार नाही असे कसे? म्हणून
तर पाऊस आणि श्रावण याची अनेक वर्णने साहित्यात दिसतात. म्हणून आषाढ, ज्येष्ठ,
श्रावण, भाद्रपद या चार महिन्यातला ‘सावन का महिना’ खूप लोकप्रिय महिना असतो.
शेतकरी दादा शेतं तयार करून चातकासारखी वाट
पाहताच असतात पावसाची.आषाढवारीला गेलेल्या शेतकर्यांनी /वारकर्यांनी पंढरीच्या
पांडुरंगाला भेटून, ‘चांगला पाऊस पाड
बाबा’ असं साकडं घातलेलं च असतं. सगळ्या चराचर जीवसृष्टीला,
माणसांना, पक्षांना, प्राण्यांना
आनंददायी असलेला, मनभावन निसर्ग असतो, या
महिन्यात निसर्गात फुलणारी फुले, देवपूजेची चाललेली लगबग सगळं
सगळं उत्साह देणारं. याच महिन्यात असलेली व्रतवैकल्ये धर्माची जोड देऊन जरी साजरे
करत असले तरी त्याचा संबंध सात्विकतेशी, ऋतुचक्राशी आणि जीवन
शैलीशी असलेला दिसतो. आपल्या आरोग्यासाठी चातुर्मासाच्या निमित्त आणि सणाच्या
निमित्ताने का होईना योग्य आहार विहार ,सद्धर्म पाळणे,
व्रतस्थ राहणे आणि अनुशासन पाळणे या गोष्टी माणसांकडून केल्या जात
आहेत.मनुष्याला एक शिस्तीची चौकट आखून द्यावी लागते कोणीतरी (कर्मकांड नव्हे) मग
सद्भावना, सदहेतू आणि सत्कार्य हातून घडतं.
श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार
आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा महिना आहे.तर इंग्रजी कॅलेंडर
नुसार जुलै किंवा ऑगस्ट मध्ये येणारा महिना. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र
श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरुन या
महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिना म्हटलं की निर्मळ वातावरण,
पवित्र महिना आणि शिवभक्तांसाठी तर त्यांच्या आराध्य महादेवांना
प्रसन्न करण्याचा महिना. श्रावण म्हणजे अशी समजूत आहे की शिव कैलासावरून उतरून
शिवालयात विराजमान होतात. फक्त संपूर्ण श्रावण महिना हा भोलेनाथ आपल्या
शिवभक्तांची गार्हाणी ऐकत असतो. बाकी वेळ संपूर्ण सृष्टीचे संचालन करण्यात जातो.
म्हणून श्रावण महिना शिवभक्त भक्तिभावाने शिवाची सेवा करत असतात.
कावड यात्रा हा एक सेवेचा आणखी एक मार्ग असतो. देशातल्या पवित्र नद्यांचे जल आणून त्याने शिवाभिषेक करण्याचा संकल्प भक्तगण करतात. ज्यामुळे शिव खुश होऊन भक्ताना आशीर्वाद देतात मनोकामना पूर्ण होते असा समज आहे. अशी कावड घेऊन जाणाऱ्या शिवभक्ताला कांवरिया म्हणतात. दिल्ली ते हरिद्वार तसेच इतर ही कावड पथ असतात त्यावरून दिल्ली, हरियाणा, पंजाब, यूपी, बिहार, झारखंड, छत्तीसगढ, मध्य प्रदेश इथून हजारो शिवभक्त या कावड यात्रेत अथवा कावड मेळयात सामील होतात. वाराणसी आणि बैदयनाथ धाम येथे शिवाला जलअभिषेक करतात. या वैदिक अनुष्ठानाच्या वातावरणात ब्रह्मचर्य, शुद्ध विचार, सात्विक आहार, नैसर्गिक दिनचर्या असणाऱ्या कांवरिया भक्तांचा भक्तीभाव हा अद्भुत मिलाफ अनुभवायला मिळतो.
श्रावण महिन्यात बहुतेक प्रत्येक
दिवशी एकतरी धर्मकृत्य केलं जातं. श्रावणी सोमवार,जसे सोमवारी एकभुक्त किंवा नक्त
राहायचे,
दर सोमवारी शिवामुठ, मंगळवारी मंगळागौरीची पूजा, बुधवारी बुधबृहस्पती पूजन, गुरुवारी गुरुचरित्र पठन,
शुक्रवारी वरदलक्ष्मीची पूजा, शनिवार मारूतीरायाचा तर रविवार आदित्य
म्हणजेच सूर्य पूजेचा. याच प्रमाणे दूर्वा गणपती व्रत, सितला सप्तमी, पुत्रदा
एकादशी, अजा एकादशी, श्रावणातली शिवरात्र, द्वादशीची वत्स द्वादशी साजरी करतात.
शिवाय देवस्थानात वेगवेगळे कथा-पुराणं, मंत्रजागर असे विशेष
उत्सव होतात. अगदी प्रत्येक श्रावणी सोमवार सुद्धा एक सण म्हणून साजरा होतो.
श्रावण हा महिना चातुर्मासातला श्रेष्ठ महिना मानला जातो. नुसतं महाराष्ट्रात नाही
तर इतर प्रांतातही या महिन्यात विविध उत्सव असतात.
उदाहरणार्थ- उत्तरेत झुलान यात्रा,
रक्षाबंधन, नंदोत्सव आणि जन्माष्टमी आणि
विशेषता दक्षिण भागात श्रावणात नागपंचमी, श्रावणी, पोवती
पौर्णिमा, नारळी पौर्णिमा, श्रीकृष्ष्ण जन्माष्टमी, नंदोत्सव, पिठोरी अमावास्या, मातृदिवस, कावड यात्रा, खांदेशात कानबाई
उत्सव.
कानबाई उत्सव खांदेश
श्रावणी सोमवार –शिवामुठ
–शिवामुठ म्हणजे श्रावणात प्रत्येक सोमवारी भगवान शंकराला एक मूठ वेगवेगळे धान्य
अर्पण करणे.तांदूळ, तीळ, मुग आणि जव या धान्यांनी शिवामुठ वाहिली जाते. पाचवा
सोमवार आलाच तर सत्तू ची शिवामुठ वाहतात. याला शिवमुष्टि व्रत सुद्धा म्हणतात.
इथेही महादेवाला पूजून आपल्या मागण्या देवाला सांगून त्याच्याकडून आशीर्वाद घ्यावेत. मागण्या काय तर, त्याच्या अनेक आख्यायिका आढळतात. पण त्या समाजातले प्रतिबिंब च असते. आवडते- नावडते, सख्खे –सावत्र अशा नात्यांमध्ये असणारा दुरावा घरातल्या स्त्रीला नकोसा असतो. मग मनशांती मिळून, सकारात्मक भाव मनात निर्माण होऊन, आयुष्याकडे योग्य दिशेने बघण्याचा दृष्टिकोण मिळावा, नात्यांमधील प्रेम वाढावे, आयुष्य सुंदर आणि सुखाचे व्हावे म्हणून अशा कथातून, कहाण्यातून स्त्रियांना मार्गदर्शन होत असावे. उदा . “शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा. सासूसासर्या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा.” हे व्रत करून शिवपूजा करून उपवास करून शिवामुठ वाहावी. आशा श्रवणातल्या सर्व सोमवारी महादेवची पूजा,करावी शिव महिमा गावा, शिवमंत्र, शिवाष्टक,शिव तांडव स्तोत्र, शिव चाळीस, शिओव महिम्न स्तोत्र, जप श्रद्धा आणि भक्तीने करून गंगा जल. बेल पत्रं, अक्षता वाहून परिपूर्ण पूजा करावी असे श्रावणात अपेक्षित असते. शिवलिंग हे ब्रह्मांडाचे प्रतीक मानले गेले आहे. तर ब्रह्मांडात सर्व ग्रह समाविष्ट असतात. प्राचीन ग्रंथात सुद्धा शिवामुठ बद्दल उल्लेख आढळतो. उपास तपास व अशी व्रते मनुष्याला संयम राखायला शिकवतात. नियम पाळायला शिकवतात.
श्रावण सुरू होताच ठेवणीतून बाहेर येतो जिवतीचा
फोटो. घरातली आई आपल्या मुलाबाळांसाठी, त्यांच्या
कल्याणसाठी, देव्हार्यात तो स्थानापन्न करून त्याला फूल
पत्री, वस्त्र वाहून नैवेद्य दाखवते. संतती रक्षण म्हणून ही
पूजा असते. एक मातृ शक्तीने दुसऱ्या रक्षक आणि पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजे
जरा जीवंतिका पूजन . श्रद्धावान लोक असे
धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन श्रावणात आणि चातुर्मासात करत असतात आणि
आत्मिक समाधान मिळवतात. जीवतीच्या या प्रतिमेवर नरसिंह, कालीयामर्दन करणारा कृष्ण, (गदिमांच्या- सर्प फणीवर कृष्ण नाचला
यमुनेच्या डोही, अशी अलौकिक कथा कुणी कधी ऐकलीच नाही.. या गीतात संपूर्ण वर्णन
आहे) मुलांना खेळवणाऱ्या जरा जीवंतिका(जीवंतिका म्हणजे दीर्घायु प्रदान करणारी
देवी) आणि बुध -बृहस्पती असतात.
जरे जीवन्तिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी ।
रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्तुते ।।
श्रावण महिना सुरू व्हायच्या आधी
दिपपुजेच्या दिवशी विदर्भात झाडीपट्टीत जिवती हा सण वैशिष्ट्यपूर्ण असतो.
आई वडिलांची सेवा करणाऱ्या श्रावण बाळाची आठवण म्हणून हा दिवस साजरा होतो. हा भाव
किती सुंदर आहे. यावेळी स्वयंपाक घरातील देव्हाऱ्याजवळची भिंत शेणाने सारवून
त्यावर जिवती चितारतात. हे चित्र असते खांद्यावर कावड घेतलेल्या त्यात आपले आईवडील
घेऊन चाललेल्या श्रावण बाळाचे. त्याशिवाय तुळस, चंद्र, सूर्य, मोर, झाडे, शेत,
नांगर, वखार, कामगार नाग अशी चिन्हे सुद्धा असतात. गृहीणींचे चित्र कौशल्य या
बरोबरच आपल्या मुलाबाळांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून हे आशीर्वाद असतात.
आणखी एक म्हणजे श्रावण महिना
कहाण्यांचा सुद्धा उत्सव च नाही का?
मला आठवतं,
लहानपणी आजीची पुजा-अर्चा झाली की, श्रावणात
रोज तिला कहाणी वाचून दाखवायची.हे माझं काम आणि ती अगदी तल्लीन होऊन ,दाद देत या कहाण्या ऐकत असे. शुक्रवारची कहाणी. खुलभर दुधाची आणि अजून
काही. वर्षानुवर्षे वाचलेल्या, माहिती असलेल्या त्याच त्याच
कहाण्या आजी प्रत्येक वेळी मन लावून ऐकायची, त्यात खरं तर
काही नावीन्य नसे, पण मनातली श्रद्धा हेच एकमेव कारण,
अशीच गोष्ट नागपंचमीची. रूढी प्रमाणे चालत आलेली, आज तवा चुलीवर ठेवत नाहीत. किंवा भाजी चिरत नाहीत. असे परंपरेने सांगितले
गेलेले. नागपंचमीच्याच कहाणीत त्याचे उत्तर दडलेले आहे. कारण या कहाण्या अर्थात
गोष्टी, या प्रबोधनासाठीच रचल्या गेल्या आहेत हे डोळसपणे
वाचले की लक्षात येईल.
श्रवणातली शुक्ल पक्षातील तृतीया म्हणजे ‘हरियाली तीज’हा एक सण साजरा केला जातो.भगवान शिव आणि देवी पार्वती ची पूजा करून आपल्या सुखी संसारासाठी, वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद मागण्याचा हिंदू विवाहित महिलांचा पवित्र दिवस. हरियाली तीज उत्तर भारतात विशेषता,उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड या भागात साजरी करतात. तसा हा दिवस शिव व पार्वती यांच्या पुनर्मीलनाचा दिवस मानतात.तसेच अविवाहित महिला अर्थात कुमारिका आपल्याला असा पती मिळावा जो भगवान शिवाचे जेव्हढे पार्वती साठी प्रेम आहे तसेच प्रेम आम्हाला आमच्या पतीकडून मिळावे म्हणून शिव पार्वतीची पूजा करून, निर्जल उपवास धरून व्रत करतात. असे उपवास, भक्ती मार्ग म्हणजे भारतीय कुटुंब व्यवस्था आणि विवाह संस्था टिकवण्याचे सात्विक मार्ग आहेत. (अंधविश्वास सोडून) लग्न व्यवस्थेमुळे जी सुंदर नाती निर्माण होतात ती टिकण्यासाठी , सकारात्मक जीवन होण्यासाठी, एकमेकांवरचा विश्वास आणि प्रेम वाढण्यासाठी मुलांसाठी, पतीसाठी आणि कुटुंबासाठी अशी महिलांची व्रते खरंच हितकारक आहेत.
नागपंचमी
,श्रावण वद्य पंचमी- हिंदुस्थानच्या सर्व भागात साजरा होणारा सर्प पूजेचा हा सण
आहे. महाराष्ट्र, दक्षिण भाग,
गुजरात, बंगाल सगळीकडे सर्प पुजा किंवा
नागप्रतिमांची पुजा करतात. नागांचा अधिपति राखेश्वर म्हणजे शिव समजून डोंगराळ
प्रदेशात पंचमीला पुजा केली जाते. उदयपूरला या दिवशी घराच्या दाराशी एक प्रकारची
वनस्पति आणून ठेवतात म्हणजे विषारी प्राणी घरात येत नाहीत. तर नेपाळ मध्ये नाग आणि
गरुड यांच्यात मोठ्ठ युद्ध झालं, तो हा दिवस विशेष उत्सव
साजरा करतात. आगरा, अयोध्या, पंजाब,
गढवाल मधेही सर्पपूजेची पद्धत आहे. हे सांगण्याचं कारण एव्हढच की,
परमेश्वराच्या अतर्क्य शक्तीबद्दल मनुष्याला आश्चर्य वाटले त्यामुळे
त्याची सेवा करणे म्हणजे त्यांनेच निर्माण केलेले सर्व प्राणी, झाडे यांची पुजा करणे महत्वाचे वाटले असावे. म्हणून नागपंचमी सारखे सण
सुरू झाले असणार.
नागपंचमी, मंगळागौर, गौरी गणपती, राखी पौर्णिमा या निमित्ताने त्या मुलीला माहेरच्या लोकांना भेटण्याची संधी दिली जायची, म्हणूनच,
‘फांद्यावरी बांधिले गं मुलींनी हिंदोळे...,
पंचमीचा सण आला डोळे का ग ओले ?’
ज्येष्ठ भावगीत गायक गजानन वाटवे
यांनी गायलेल्या गदिमांच्या या गीतातील मुलींच्या डोळ्यात पाणी येते कारण ते
वातावरण त्यांना ओढ लावते. नागपंचमीला फेर धरून गाणी म्हणणे,
झिम्मा- फुगड्या, आट्या- पाट्या खेळणे,
याबरोबरच यातील गाण्यांमधून काही पौराणिक कथा की ज्यातून जीवनमूल्ये
शिकवली जातील, अशा कथांचं कथन होई. हीच मूल्ये तिला पुढच्या
आयुष्यात स्वत:साठी उपयोगी पडत. कल्पनाशक्तीला वाव मिळे.
निसर्ग पूजक भारतीय लोक वृक्ष, झाडे, पत्री, फुले, जमीन/ वसुंधरा,पशू, पक्षी प्राणी यांच्या बद्दल सुद्धा कृतज्ञता व्यक्त करतात. मध्यंतरी मी मेळघाटात गेले होते. तिथे रस्त्याने जाताना कडेला छोटसं एक फुटाचं दगडाचं मंदिर होतं. त्यात एक दगडच विराजमान झाला होता. वर लिहिलं होतं, ||बाघ देव प्रसन्न || चौकशी केली तेंव्हा कळलं. की या जंगलात हे प्राणी वास्तव्यास असल्याने तो शक्तीशाली व आपला संरक्षणकर्ता आहे अशी तिथल्या आदिवासींची समजूत आहे. म्हणून या रस्त्याने जाताना आधी या बाघ देवाला नमस्कार करतात. म्हणजे खर तर दोघेही एकमेकांचं रक्षण करतात. अशा अनेक समजुती वेगवेगळे दिवस व सण साजरे करताना पाळत असलेले दिसतात.
मंगळागौर पूजन महाराष्ट्रात
प्रसिद्ध आहे. नवविवाहितेने लग्नानंतर पाच वर्षे करायचे हे व्रत. बंगाल मध्येही
मंगलचंडिका म्हणून या सौभाग्यदायिनी देवीची पुजा करण्याचा प्रघात आहे. श्रावणातली
मंगळागौर म्हणजे ‘गौरी गौरी सौभाग्य
दे’ अशी प्रार्थना करत मांडलेली पार्वतीची पूजा. मंगळागौर
म्हणजे पार्वतीच्या रुपातील अन्नपूर्णा. मंगळागौरीची पूजा करणं हे विशेषता
महाराष्ट्रातले पारंपरिक व्रत. पुराण ग्रंथात भगवती मंगल चंडिका स्तोत्र आहे . शिव
शंकराने तिला जगन्माता म्हटलं आहे. ही भगवती सर्व संकटनाचा नाश करणारी आणि सदैव
कल्याण करण्यात तत्पर असणारी आहे. सढळ हाताने शुभ, मंगल
करणारी, मंगल ग्रहाची पण इष्ट देवता असणारी मंगलाधिष्ठात्री
आहे .या स्तुतीतले हे वर्णन भगवान शंकराने भगवतीची उपासना करताना केलेलं आहे असे
म्हंटले आहे. या मंगला देवीची सर्व प्रथम श्री शंकराने उपासना केली त्यानंतर,
देवता, मुनि आणि नंतर मानवाने ही उपासना सुरू
केली.मग विश्वात सगळीकडे ही पूजली जाऊ लागली. स्त्रियांनी सुद्धा आपले कल्याण
व्हावे म्हणून या देवीची उपासन केली. आणि बरोबरच आहे आपले आयुष्य सुखासमाधानात
जावे,मुला-बाळांचे कल्याण व्हावे, संकटे
येऊ नयेत असे कुणाला वाटणार नाही? त्यामुळे मनाला विश्वास
देणारी एक शक्ती आपण मानत असतो.हा मनुष्य स्वभाव आहे. त्यामुळेच अशा उपासना होत असतात.पद्धती
वेगवेगळ्या असतात एव्हढंच. ही संस्कृती मनुष्याने आपले जीवन सुखकर व आनंदी व्हावे
म्हणून ती निर्माण केली आहे.ती तो सामूहिक पद्धतीने पाळत असतो ,यात आपले विविध सण, उत्सव, पूजा-अर्चा
यासारख्या धार्मिक गोष्टी आणि त्या निमित्ताने वडीलधारी माणसे लहान मुलामुलींवर
जीवनातल्या चांगल्या मूल्यांचा संस्कार करत असतात.
मम पुत्र पौत्रादिवृद्धये अवैधव्य भर्तुरारोग्यादि सकलकामना
सिद्धीद्वारा श्री शिवमंगलागौरी प्रीत्यर्थं पञ्च-वर्षात्मकं मंगलागौरीव्रतम करिष्ये !
असा संकल्प नवीन लग्न झालेल्या मुली
या पूजेच्या वेळी करतात. यातला धार्मिक दृष्टीकोण थोडा बाजूला ठेऊन पाहिलं तर,
तो एक प्रकारचा कौटुंबिक संस्कार सुद्धा आहे. हिंदू धर्मातील कुटुंब
व्यवस्था टिकविण्यासाठीचा मूल्यसंस्कारच. कारण शिव आणि पार्वती हे आदर्श
गृहस्थाश्रमाचे उदाहरण मानले जाते. पती-पत्नी मधील प्रेम आणि निष्ठा याचं हे
उदाहरण आहे. मंगळागौर पूजेचे हे अधिष्ठान म्हणजे हेच आदर्श आमच्यात यावेत. अशी
मनोकामना करतात.
मंगळागौरी पूजनानिमित्त समवयस्क मैत्रिणी व बहिणी जमलेल्या असताना आपले अनुभव एकमेकांना सांगताना, गप्पा मारताना आणि एक मनोरंजन म्हणून सुद्धा मंगळागौरीचे खेळ व गाणी म्हणण्याची पद्धत आहे. यात रात्री जागरण करून हे अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात. हे खेळ म्हणजे सर्वांगाला व्यायाम होणारे असतात. ती एक प्रकारची आसनेच असतात.स्त्रियांना फक्त घरातली कामेच करावी न लागता त्यांना मनोरंजन पण हवे ,आनंद मिळावा या हेतूने गाण्याची ही जोड देऊन हे खेळ खेळले जातात.हे जिम्नास्टिकच आहे.मनाची एकाग्रता, शरीराची लवचिकता, नेम साधणे हे सर्व आजच्या आरोबीक्स प्रमाणे गीतांच्या तालावर व चालींवर खेळले जातात.
जवळ जवळ ११० प्रकारचे खेळ यात खेळले जातात. यात खेळताना स्वयंपाक घरातील वस्तूंचा वापर केलेला असतो. या गीतांतून त्या नवविवाहितेच्या मनातील विचारच प्रगट होत असतात. आचार विचार महत्वाचे आहेत पण आता याच्या जोडीला परंपरा म्हणून दागिन्यांना पण महत्व आलेलं आहे. नटण मुरडण, खेळणं बागडण हे जात्याच स्त्री विशेष गुण. मनात काहीतरी असतं, कुठेतरी खुपत असतं, काही गुपित पण असतं, तर कुठला आनंद आणि कुठल तरी दु:ख, कोणाला तरी सांगावसं वाटतं, तिथे औपचारिकता नको असते. पण यासाठी भेटायला हवं ना? मग निमित्तही हवं त्याला.
नारळीपोर्णिमा
–
शास्त्रा प्रमाणे वरुण देवतेची पुजा करून कृतज्ञता व्यक्त करण्याचा
दिवस म्हणजे नारळी पोर्णिमा. हिंदुस्थानच्या पूर्व आणि पश्चिम किनार्यावर असलेले
लोक विशेषत: व्यापारी वर्गाला याचे जास्त महत्व. प्राचीन काळी ते जलमार्गाने
प्रवास करीत असत आणि व्यापार आणि दळणवळण पण चालत असे. समुद्र हे वरूणाचे स्थान समजले जाते. समारंभ पूर्वक समुद्राचे
दर्शन घेऊन त्यास नारळ अर्पण करून समुद्रावर सत्ता गाजविणार्या वरुण देवाची आठवण
ठेवणे व कृतज्ञता व्यक्त करणे असा उद्देश असतो. वर्षा ऋतुत हा समुद्र क्षुब्ध
झालेला असतो. शिवाय हा काळ माशांच्या प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे या काळात
मासेमारी करायला कोली बांधव जात नाहीत. श्रवण पौर्णिमेला सागर पूजन झाले की
मासेमारी सुरू होते. श्रावण पौर्णीमेपासून जलमार्गावर वाहतूक सुरू होते. असा हा
समुद्र पूजनाचा दिवस.ही परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे.
श्रावण पौर्णिमा दक्षिण भारतात ‘नारळी पौर्णिमा’ ,मध्य भारतात ‘काजरी पूनम’,उत्तर भारतात ‘रक्षाबंधन’,आणि गुजराथ मध्ये ‘पवित्रोपना’ म्हणून साजरी करतात. खरं तर सण आणि उत्सवांची विविधता हेच आपल्या भारतीय परंपरेचे वैशिष्ट्य आहे.
यालाच पोवती पौर्णिमाही म्हणतात,
सुटची पोवती करून ती विष्णु, शिव आणि सूर्य यांना अर्पण करतात. हाच दिवस वैदिक धर्म पाळणार्यांसाठी श्रावणी
म्हणून पाळला जातो. या तिथीला जानवे बदलायचा विधी सांगितला आहे. तर गुरुकुलातील
विद्यार्थ्यांना शिकविण्याचा हा पहिला दिवस असतो.
कृष्ण जन्माष्टमी - याच महिन्यात
श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी असते. श्रवणात वद्य अष्टमीला रात्री
श्रीकृष्णाचा जन्म झाला. म्हणून हा दिवस कृष्ण जयंती, गोकुळाष्टमी किंवा
जन्माष्टमी म्हणून ओळखतात. तो दिवस
आनंदोत्सव म्हणून साजरा करतात.सबंध हिंदुस्थानात गोकुळ,मथुरा वृंदावन, द्वारका, पुरी,
इथे हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. वृंदावन मध्ये या
दिवशी दोलोत्सव साजरा करतात. कोकणात व महाराष्ट्रात दहीहंडी वा गोपाळकाला होतो.
दुसऱ्या दिवशी उत्तर भारतात नंदोत्सव साजरा केला जातो.
पिठोरी अमावास्या- पोळा- श्रावण अमावास्येला बैल पोळा साजरा करतात. शेतकरी लोक आपल्या खिलार्या बैलांना रंगवून, सजवून त्यांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढतात, पुजा करतात,त्यांचे औक्षण करतात. गोडधोड करून त्यांना खाऊ घालतात. आपल्या उपयुक्त व वर्षभर आपल्यासाठी राबणार्या या गुरांबद्दल आदरभाव दाखविण्याचा हा दिवस. या दिवशी बैलांकडून कोणतेही काम करून घेतले जात नाही. बहिणाबाई चौधरी यांनी ‘बैल पोया’ या कवितेत याचं महत्त्व सांगितलं आहे. त्या म्हणतात,
आला
आला शेतकर्या, पोयाचा रे सन मोठा,
आता
बांधा रे तोरन, सजवा रे घरदार |
करा
अंघोयी बैलाच्या, लावा शिंगाले
शेंदूर,
उठा
उठा बहिनाई, चुले पेटवा पेटवा |
आज
बैलाले निवद, पुरणाच्या पोया ठेवा,
वढे
नांगर वखार, नही कष्टाले गनती |
पीक
शेतकर्या हाती, याच्या जिवावर शेती ||
या
सणाला दक्षिण महाराष्ट्रात बेंदूर असेही म्हणतात. हा सण पाळण्यामागे अशी समजूत आहे
की, धनधान्य आणि गोधनाची समृध्द्धी होते.पशुपूजन म्हणजे कृतज्ञ होणच.
चातुर्मास म्हणजे पवासाळयातील चार महीने. आणि
श्रावण हा तर चतुर्मासातला श्रेष्ठ व पवित्र मानला जाणार महिना. पावसाळा हा ऋतु
नाही म्हटलं तरी आरोग्य बिघडवणारा असतो काही वेळा. या कालावधीत पचनशक्ति मंदावते.
पावसामुळे बाहेरचे वातावरण आरोग्याला हानिकारक व रोगराईला पोषक असते. अशुद्ध व
गढूळ पाणी वापरात येते. साहजिकच सर्दी, ताप,
खोकला, पोट बिघडणे हे आजार उद्भवतात. त्यामुळे
पचायला हलका आणि साधा आहार घ्यायला लागतो. यालाच आपल्या पूर्वजांनी धार्मिक जोड
देऊन एकभुक्तं राहणं, उपवास करणं, एक
धान्य खाण यासाठी नेम धर्म आखून दिले त्याचा शास्त्रीय फायदा व अर्थ लक्षात घेतला
तर कसे ऊपयोगाचेच आहेत हे लक्षात येईल. नीट विचार केला तर लक्षात येईल की,
चातुर्मासात आहार विहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्रत वैकल्ये करायला सांगितली
आहेत.
कुठल्याही गोष्टींचा धार्मिक संबंध लावताना तो डोळसपणे बघावा. अंधश्रद्धेने
नको. आजची नवी पिढी चौकस आहे. तिला प्रत्येक गोष्टीचा शास्त्रीय आधार हवा आहे आणि
हा शास्त्रीय आधार हिंदू धर्मात आहे. पालकांनी/मोठ्यांनी तो अभ्यासला पाहिजे. परंपरेने चालत आलेल्या रूढी आहेत त्या तशाच्या
तशा नवी पिढी स्वीकारणार नाहीत. त्यामुळे नवा अर्थ देऊन,
पण पहिलेच महत्व कायम ठेऊन त्यांच्या पर्यन्त तो पोहोचवण्याची
जबाबदारी आजच्या पालकांवरती आहे.
ऋतुचक्र आणि आपले हे उत्सव,
व्रत वैकल्ये एकमेकांशी निगडीत आहेत. आषाढ शुद्ध एकादशी पासून
कार्तिक शुद्ध एकादशी पर्यन्त पाळला जाणारा चातुर्मास. नियम पाळणे, धार्मिक पुजा-पाठ, पारायण करणे, उपासना करणे या बरोबरच उपवास धरणे. यात आपल्या दिनचर्येची ऋतूंशी सांगड
घातलेली दिसते. आणि ओघानेच आपल्या आरोग्याशी पण. खर तर ही आपल्या ऋषीमुनींची
आपल्याला देणगीच आहे. त्याची नीट व्यवहार्यता, उद्देश,
त्यातलं वैद्यक शास्त्र हे पण आपण समजून घेतले पाहिजे. आपले उत्सव,
जत्रा, सण, समारंभ,
प्रवचने, कथा, कीर्तने
यातून आपली कायिक, वाचिक आणि मानसिक प्रगती व्हावी हाच
उद्देश आहे. म्हणूनच परंपरा पाळताना समजून उमजून पाळाव्यात.
तर असा हा इंद्रधनु ल्यायलेला ,ऋतु हिरवा ऋतु बरवा, मनभावन श्रावण, सणांचा महिना खूप काही शिकवण देणारा असतो यात शंका नाही.
© डॉ. नयना कासखेडीकर,पुणे .
---------------------------------------
No comments:
Post a Comment