Saturday 25 June 2022

‘स्वराज्य ७५’ लेखमाला- कवी विंदा करंदीकर

 

    स्वराज्य ७५ लेखमाला

स्वातंत्र्यपूर्व काळातील राष्ट्रीय कवी

लेखन – डॉ.नयना कासखेडीकर

लेखांक  - १७

                 विंदा करंदीकर - गोविंद विनायक करंदीकर

(१९१८ ते २०१०) ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त

"देणार्‍याने देत जावे

घेणाऱ्याने घेत जावे

आपल्या सर्वांना माहिती असलेली ही कविता म्हणजे मरगळलेल्या मनाला उभारी देणारी विंदांची भावकविता आहे.  सब घोडे बारा टक्के ही कविता पण माहिती आहे.

सिंधुदुर्गातील गोविंद करंदीकर यांचे कोल्हापूर येथे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी रत्नागिरी, मुंबई इथल्या महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून अध्यापनाचे काम केले.  

 कवी विंदा करंदीकर यांनी मराठी साहित्यात रंजक आणि वैचारिक धाटणीची भर घातली.त्यांनी  मराठीमध्ये बालकवितेची मुहूर्तमेढ रोवली.त्यांनी मुख्यत: बालकविता, विरुपिका, छंदोबद्ध काव्य,मुक्तछंद,लघुनिबंध असे साहित्य प्रकार हाताळले.राणीची बाग,परी ग परी, सर्कसवाला ,एकदा काय झाले?, एटू लोकांचा देश, अजबखाना, पिशी मावशी आणि तिची भुतावळ.अडम -तडम. बागूल बुवा,टॉप,सात एके सात हे त्यांचे बाल कविता संग्रह.

१९४९ साली त्यांनी लिहिलेला स्वेदगंगा हे पहिलं प्रकाशित साहित्य. या काव्यसंग्रहात स्वातंत्र्य आंदोलांनाच्या काळातील कवितांचा समावेश आहे. प्रार्थना, विजयी भारत, या त्यातील कवितांमधून राष्ट्रीय भावना प्रकट झाली आहे. १९४२ च्या चले जाव आंदोलनात आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी भाग घेतला. तर हैदराबाद मुक्ति संग्रामात सुद्धा भाग घेतला होता. तेंव्हा त्यांना तुरुंगवास पण भोगावा लागला होता. भारतमातेसाठी जीवन व मरण हवे आहे असे सांगताना ते प्रार्थना या कवितेत म्हणतात,

प्रार्थना

जीवन दे मज मरण तिच्यास्तव मरण्या

मरण तिच्या मृदु प्रेमळ मांडीवरती

वंदेमातरम मुखातून स्वर गर्जत जे येती ||

तर,

ध्वजगीत कवितेत ते म्हणतात,

अखिल हिंद राष्ट्रात्मा मूर्तीमंत जो

जो नीती ज्ञान, शौरी तेज दावितो ||

विजयी भारत चे चित्र कवितेत दिसते ते असे

विजयी भारत विजयी भारत विजयी भारत प्यारा

मुकुट हिमाचल आचल शिरावरी,

निर्मल गंगा हृदयस्थळावरी,

सागर चकार पदकामला छुरी

दिशदिशातूनी वाहे जेथे पवित्रतेचा वारा ||

परत्नातर्‍याबद्दल त्यांना चीड आहे ती पण कवितेत उमटली आहे

पुढे पाशवी क्रूर साम्राज्य शाही

कुणा जन्मठेप कुणा देत फाशी

कुणा हद्दपारी नी करा कुणाही

कुणा राक्षसी यातनांनीच नाशी

तरी नष्ट ना जाहला क्रांतीमंत्र संजीवनी मंत्र, स्वातंत्र्य स्वातंत्र्य ||

---------

समतेचे हे तुफान

उठले ऊठ ऊठ सह्याद्रे, घुमवित बोल मराठी खडे;
समतेचे हे तुफान उठले; उठले सागराकडे.

हीच मराठी जिच्या मुखाने वदली ज्ञानेश्वरी;
शिवबाने तरवार घासली याच मराठीवरी;
हिच्या स्वागतासाठी झडले तोफांचे चौघडे.

टिळक, गोखले, फुले, रानडे, आगरकर वैखरी -
स्वातंत्र्याच्या पाच मशाली जळती वेदीवरी;
ह्या ज्योतीवर दीप पेटवा चला भविष्याकडे.

स्वतंत्रतेचा मंत्र जयांना गर्भामध्ये मिळे,
तेच मराठे आम्ही;
आम्ही सह्याद्रीचे सुळे;
स्वराज्यांतुनी पुढे चला रे, चला सुराज्याकडे.

दर्याच्या भरतीच्या लाटा महाराष्ट्रअंगना
कंकणनादा भिउनी तयांच्या शत्रु सोडिती रणा;
वीज माळुनी वेणीवरती त्याही घुसल्या पुढे.

ऊठ खेडुता, पुन्हा एकदा झाडुनिया घोंगडी;
ऊठ मजुरा, पुन्हा मारण्या आघाडीवर उडी;
एकजूट ही पाहुन पडतिल अन्यायाला तडे.
||

अशीच एक कविता, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मुंबईत जो गोळीबार झाला तेथे मृत्युमुखी पडलेल्या एका सामान्य माणसाविषयी लिहिलेली,

पण हे श्रेय तुझेच आहे

 

अंधाराच्या मस्तीवरती रक्ताची गुळणी थुंकून
तू मातीच्या कुशीत शिरलास
ह्याची मांडी मोडू नका; हा माणूस शेवटपर्यंत उभा होता,
बुडणार्‍या गलबताच्या डोलकाठीसारखा. ह्याच्या हाताच्या मुठी वळा;
भिऊ नका, त्याच्या हातांतील सर्व घट्टे खास त्याच्याच मालकीचे आहेत.
त्याचे उघडे तोंड असे आवळू नका, पैशाच्या पिशवीसारखे;
मेला असला तरी मवाली आहे...पटकन शिवी घालील!...
आणि उपचारासाठी कवटी फ़ुटेपर्यंत थांबूही नका;
ती अगोदरच फ़ुटलेली अहे...
पहा उगवतील फ़टफ़टले आहे, आणि उद्याची ताजी बातमी
शाई पिऊन झिंगली आहे.
अंधाराच्या मस्तीवरती रक्ताची गुळणी थुंकून
तू मातीच्या कुशीत शिरलास
ती माती तुला विसरणार नाही,

अन्यायाची निदान अज्ञानाला चीड आहे.
ह्या शेवटच्या दगडाचा आधार घेऊन

एक बुरुज अजून दांत विचकर उभा राहील.
तुझ्या अभावाजवळ मी अजून उभा आहे.

अंधार आणि अधिक अंधार यांच्यामधील रित्या रेताडांत

डावा पाय रोवून मी अजून उभा आहे...

पण हे श्रेय तुझेच आहे.

त्यांचे आणखी काव्य संग्रह म्हणजे मृद्गंध(१९५४), धृपद(१९५९), जातक(१९६८), विरुपिका(१९८१), अष्टदर्शने(२००३) होत.आठ तत्वचिंतकांच्या विचारांचे छंदोबद्ध काव्य रूप असलेल्या अष्टदर्शने या साहित्य कृतीसाठी त्यांना साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च समाजाला जाणारा पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार २००३ मध्ये दिला गेला.  शिवाय बालकवितसंग्रह, ललित निबंध,समीक्षा ,इंग्लिश समीक्षा, अनुवाद,इत्यादि साहित्य प्रकार आहेत. प्रबोधणा बरोबर विनोदी काव्यलेखन त्यांनी केले. स्पर्शाची पालवी(१९५८) आणि आकाशाचा अर्थ(१९६५) हे त्यांचे लघुनिबंध तर त्यांची घराघरात माहिती असलेली भावगीते म्हणजे, मानवाचे अंती गोत्र एक,सर्वस्व तुला वाहून, माझ्या घरी मी पाहुणी ही होत. परंपरा आणि नवता आणि उद्गार ही समीक्षा तर अॅरिस्टॉटल चे काव्य शास्त्र,फाऊस्ट भाग १ आणि राजा लियर ही भाषांतरे आहे. 

 

भारत माता की जय !

 © डॉ. नयना कासखेडीकर

 ------------------------- 

No comments:

Post a Comment